मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत… भाग-2 … श्री श्रीपाद  सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किंमत… भाग – 2 … श्री श्रीपाद  सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

(आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली. ) इथून पुढे —-

तंद्रीत अचानक ती स्विमिंग पूलच्या समोर येऊन उभी राहिली. तिथे तीन चार जण पाण्यात डुंबत होते. ती गडबडीने मागे फिरणार तेव्हढ्यात तिला हाक ऐकायला आली,

” ए मुली, लाजू नको. ये इकडे….”

पन्नास वयाची अट असताना इथे मुलगी कशी काय आली? हे पाहण्यासाठी तिने मान वळवली. नऊवारी साडीतल्या एक आजी स्विमिंग पूलमधून बाहेर येता येता तिलाच हाक मारत होत्या. पन्नाशी उलटलेली मुलगी ! तिला गंमत वाटली. तोपर्यंत आजी तिच्याजवळ पोहोचल्या होत्या. तिला शेकहॅंड करत त्या म्हणाल्या,

” मी अरुणा प्रधान. तुला पोहता येत नसलं तरी नुसतं डुंबायला येऊ शकतेस. अगं, पाण्यात शिरलं ना, की तन आणि मन आपोआप हलकं होऊन जातं. जगाचा विसर पडतो, षडरिपू गळून पडतात. मला तर आईला भेटल्यासारखं वाटतं.”

पाण्याला आईची उपमा दिलेली पाहून ती हळवी झाली. बराच वेळ त्या दोघी पाण्यात खेळत राहिल्या. खेळताना मध्येच ती प्रधान आजींना म्हणाली,

” मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.”

“आधी जेवूया मग झाडाखाली बसून गप्पा मारू.”

जेवण झाल्यावर एक छानशी जागा बघून तिथे ऐसपैस बसल्यावर आजी म्हणाल्या,

” माझ्याबद्दल मी तुला सांगते. तूही मनमोकळेपणाने स्वतः बद्दल सांग. आधी तू बोलत्येस की मी बोलू?”

“आधी मी बोलते.”

असं म्हणून तिने सकाळी घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणाली,.. ” तीस वर्षं व्रतवैकल्यं केली,उपासतापास केले. जे केलं ते नक्की कोणासाठी केलं? असं आताशा माझ्या मनात यायला लागलं आहे. कारण जे काही मी करते ते मला वाटतं म्हणून करते, असा सर्वांचा भाव असतो. माझ्या राबण्याला, माझ्या भावनांना किंमत नाही असं आताशा वाटू लागलंय. पण आता बास झालं असं मी ठरवलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतला. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती….. आमच्या संसाराला तीस वर्षं झाली. आतापर्यंत नातं परिपक्व व्हायला हवं होतं नाही? पण, काहीतरी ‘मिसिंग’ आहे, असं उलटंच वाटायला लागलंय. ‘अपूर्णतेतंच खरा आनंद आहे ‘, ‘ भिन्नतेतच गंमत आहे ‘, वगैरे विचार डोक्यात येतात, पण हे सर्व भंपक आहे असंही वाटतं. तीस वर्षांनंतरही पावलोपावली मतभिन्नता?  खरं तर आम्ही नाटक-सिनेमाला जातो, हॉटेलिंग करतो, वर्षांतून दोन तीन ट्रीप असतात. पण आता हेही सर्व रूटीन झाल्यासारखं वाटतं. सगळं निरस होत चाललंय. नवरा वाईट नाही, पण टिपीकल पुरुषी मनोवृत्ती आहे. सध्या मी गोंधळलेली आहे. मला नेमकं काय हवंय ते कळत नाहीये. पण खात्री आहे की कधीतरी सापडेल. तोपर्यंत शोध घ्यायचाय. त्याचाच भाग म्हणून मी इथे आल्येय.” .. दीर्घ श्वास घेऊन ती थांबली. आता आपण बोलायचं आहे हे ओळखून, प्रधान आजींनी डोळे मिचकावत तिला विचारलं,

” हं…. तर काय जाणून घ्यायचंय माझ्याबद्दल…..?”

” किती छान आहात‌ तुम्ही. खरं तर स्वतः विषयी जे जे सांगाल ते सर्व ऐकण्याची उत्सुकता आहे.”

ह्या तिच्या वक्तव्यावर प्रधान आजी हसून म्हणाल्या,

” मी अरुणा प्रधान, वय वर्षे शहात्तर. एक मुलगा आहे, ऑस्ट्रेलियात असतो. पस्तीस वर्षं अर्धांगिनी होऊन संसार केला, आता गेली पंधरा वर्षं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. नाही… नाही…. गैरसमज करून घेऊ नकोस. नवरा तोच आहे. माझ्यापुरतं मी स्टेटस बदललंय. आता मी अर्धांगिनी नाही आणि वामांगीही नाही. संसारात राहूनही अलिप्त झाल्येय. गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांना जमेल तेवढी मदत करत असतो. पण एकमेकांवर अवलंबून नाही, उत्तरदायी नाही. आम्ही एकमेकांना मोकळं केलं आहे.” 

” म्हणजे एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही वानप्रस्थाश्रम एन्जॉय करताय….” ती हसत हसत म्हणाली.

” अगदी बरोबर ! अगं, पंधरा वर्षांपूर्वी माझ्या स्टोरीत नवऱ्याची, मुलाची, सुनेची, नातवंडांची स्टोरी इतकी मिसळलेली होती की ती फक्त माझी स्टोरी नसायची. आता मात्र तसं नाहीये. माझी स्टोरी ही फक्त माझीच स्टोरी आहे. ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ असं पाडगांवकरांनी म्हटलंय. पण असं प्रेम करण्यासाठी आपल्याला नोकरी-व्यवसाय करताना, संसाराचा गाडा ओढताना वेळ कुठे मिळतो? आणि म्हणूनच आपल्यासारख्यांच्या आयुष्यात, वानप्रस्थाश्रम महत्त्वाचा टप्पा ठरतो. सहजीवनातील प्रेम, आदर, मैत्री आणि सहवासाची गरज उतार वयातही असते. पण सहजीवनाच्या बरोबरीने स्वजीवनही असतंच की…. आणि म्हणूनच स्वजीवनाचा आनंद घेण्यासाठी मी स्वतःला बंधनातून मोकळं केलंय.”

” प्रधान साहेबांचं काय मत आहे? “

तिने उत्सुकतेने विचारलं.

” तुला काय वाटतं, तूच कल्पना करून सांग.”

प्रधान आजींच्या प्रश्नाने ती भांबावली. तिचा चेहरा पाहून त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,

“अगं, माझा नवरा जगावेगळा आहे. त्याचं म्हणणं असं आहे, की आपला संसार कसा असावा, आपलं नातं कसं असावं ह्याचा विचार समाजाच्या अदृष्य दडपणाखाली बरीचशी जोडपी ठरवत असतात. संसारातील गोडी टिकवायची असेल तर, प्रत्येक जोडप्याने दर दहा वर्षांनी किमान सहा महिन्यांसाठी वेगळं रहायला हवं. माझ्या नवऱ्याची अशी मतं असल्यामुळे मला निर्णय घेणं खूपच सोपं गेलं. ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ ही कल्पना त्याला बेहद्द आवडली. खरं सांगू, बंधन नसल्यामुळे आता आम्ही एकमेकांना उलट जास्तच समजून घेतो.”

तिचा गंभीर चेहरा पाहून आजींनी तिला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, ” नको काळजी करू एवढी. उद्या रात्रीपर्यंत इतकी धमाल कर, की घरी जाताना एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. अधूनमधून इथे येत जा. वर्षातून एकदोनदा, दहा पंधरा दिवसांची सोलो ट्रीप कर. बघ तुझ्यात कसा आमूलाग्र बदल होतो की नाही ! शेवटी एकच कानमंत्र देते, जी गोष्ट सहज प्राप्य असते तिची किंमत नसते.”

समाप्त  

लेखक – श्री श्रीपाद सप्रे

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत… भाग-1 … श्री श्रीपाद सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किंमत… भाग – 1 … श्री श्रीपाद  सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

‘चला, उद्या महिन्यातला दुसरा शनिवार ! सुट्टी आहे,  जरा आरामात उठलं तरी चालेल.’ असा विचार करत त्याने अंथरूणावर अंग टाकलं. तिला मात्र बराच वेळ झोप नव्हती. ‘आपल्याला हे सर्व जमेल ना? सर्व नीट सुरळीत व्हायला हवं…. जमेल, न जमायला काय झालं? नव्हे…. नव्हे….जमायलाच हवं.’ विचार करता करता  कधीतरी उशिरा तिला झोप लागली.

ती सकाळी जेव्हा उठली तेव्हा नवरा, मुलगा आणि सून डाराडूर झोपलेले होते. ती चहा नाश्त्याच्या तयारीला लागली. हळूहळू सर्व जण डायनिंग टेबलवर जमले. चार जणांच्या डिश बघून नवरा म्हणाला,

“आज वटपौर्णिमेचा उपास करणार नाहीस का?”

नवऱ्याचा प्रश्न साधा सरळ असला तरी तिला प्रश्नातला खवचटपणा लक्षात आला होता.

“नाही, आज एका रिसॉर्टवर जात्येय. उद्या रात्री जेऊनच येईन. मला यायला उशीर झाला तरी तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे किल्ली आहे. मी दार उघडून येईन. तुमची झोपमोड होऊ देणार नाही.”

…. अशी कशी काय ही अचानक जात्येय या विचाराने तिघांच्या तोंडातला घास तसाच राहिला होता.

आपल्या टायमिंगवर ती बेहद्द खूष झाली. नवऱ्याने अडकलेला घास पाण्याच्या घोटाबरोबर आत ढकलला. मुलाने चेहरा शक्य तितका भावनारहित ठेवला होता. ‘ ठीक आहे, हा तुमचा निर्णय आहे ‘ असं दर्शवत सुनेने किंचित खांदे उडवले.

“अगं, कुठे जाणार आहेस, काय करणार आहेस, कोणाबरोबर जाणार आहेस, काही सांगशील की नाही.” 

आवाजावर नियंत्रण ठेवत नवऱ्याने विचारलं.

” पन्नासच्यावर वय असलेल्या व्यक्तींची ‘मुक्त छंद’ नावाची संस्था आहे. मी ह्या ग्रुपबद्दल कोणाकडून तरी ऐकलं होतं. हा ग्रुप महिन्यातून दोन दिवस एक रिसॉर्ट बुक करतो. ते दोन दिवस, तिथे जमलेले सर्वजण एकमेकांशी गप्पा मारतात, चर्चा करतात. अगदी वैवाहिक जीवनापासून ते साहित्य, संगीत, व्यावसायिक करिअर अशा कोणत्याही विषयावर गप्पा होतात. विषयाचे बंधन नाही. तुम्ही तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर समविचारी पार्टनरसोबत गप्पा मारायच्या. कंटाळा आला की खायचं, प्यायचं, आराम करायचा, गाणी गायची. थोडक्यात, तुमचं मन जे म्हणेल ते करायचं. तिथे दोन सिंगल बेड असलेली बरीच कॉटेजेस आहेत. शिवाय एक दोन डॉर्मेटरीज आहेत. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ आहेत. लायब्ररी आहे. स्विमिंग पूल, रेन डान्स, कराओके असं बरंच काही आहे.”

“समजा कॉटेजमध्ये झोपण्याचा निर्णय घेतलास आणि कोणी महिला पार्टनर मिळाली नाही तर?”

आपली अस्वस्थता लपवत नवऱ्याने विचारलं.

” तर…. खरं म्हणजे, तसा विचार केला नाही, पण अगदीच वाटलं तर डॉर्मेटरी आहेच. एवढा घाबरू नकोस रे…. तुझ्या बायकोची पन्नाशी उलटल्येय. आता कोणी उचलून पळवून नेणार नाही तिला.”

…. आपल्यात इतका व्रात्यपणा अचानक कुठून आला हे तिला कळत नव्हतं. तिची सून तर अवाक् होऊन पहात होतीच, पण तिच्या उत्तराने मुलाच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.

“आणि मीही तुझ्याबरोबर आलो तर?”

कित्येक वर्षांनी आपला नवरा इतका पझेसिव्ह झाला आहे, हे बघून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

” काहीच हरकत नाही. फक्त दोन दिवस तू तुझे पार्टनर शोधून त्यांच्यासोबत रहायचं आहे. तशी त्या संस्थेची अटच आहे.”

” बाबा, तुम्ही आधी नीट विचार करा आणि निर्णय घ्या. कारण दोन दिवस अनोळखी व्यक्तींसोबत रहाणं, तुम्ही एंजॉय कराल का?”

मुलाने वास्तवाची कल्पना दिल्यावरही तो म्हणाला, ” तिथे टीव्ही असेलच ना, मी टीव्ही बघत बसेन.”

मुलाने आणि सुनेने एकाच वेळी हैराण होऊन त्याच्याकडे पाहिले. ती मात्र खाली मान घालून नाश्ता संपविण्यात मग्न होती.

“तू मजा करायला चाललीस, आमच्या जेवणा-खाण्याचे काय?” चिरक्या आवाजात नवऱ्याने अंतिम अस्त्र काढलं. तिने उत्तर न देता शांतपणे सुनेकडे पाहिले. त्या थंडगार नजरेचा सुनेने ह्यापूर्वी कधी अनुभव घेतलेला नव्हता. ती गडबडीने म्हणाली .. ” बाबा, मी आहे ना. आपण मॅनेज करू काही तरी.” 

कपडे, आवडती एक दोन पुस्तकं आणि आणखी किरकोळ वस्तू भरून तिने बॅकपॅक खांद्यावर टाकली. पायात स्पोर्ट्स शूज घातले. डोळ्यावर गॉगल चढवला. घराबाहेर पाऊल टाकताना तिने विवंचना घरातच सोडल्या होत्या.

सोनचाफ्याचं फूल, पेन-नोटपॅड, कॉटेजची किल्ली देऊन सर्वांचं रिसॉर्टवर स्वागत करण्यात येत होतं. कॉटेजमध्ये बॅग ठेवून ती चहा प्यायला गेली. एका मोठ्या आमराईत चहा कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती. एखाद्या झाडाखाली बसून चहा पिण्याचं सुख ह्यापूर्वी तिने कधीच अनुभवलं नव्हतं. चहापान झाल्यावर एका हॉलमध्ये सर्वांना बोलावण्यात आलं. छोट्याश्या स्टेजवर सत्तरीचे गृहस्थ आणि साधारण त्याच वयाच्या बाई उभ्या होत्या…..  

” ‘मुक्त छंद’ ह्या उपक्रमात आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. पुढचा दीड दिवस हा फक्त आणि फक्त तुमचा आहे. ह्या दीड दिवसात काय करायचं  ते तुम्ही ठरवायचं आहे. जे कराल त्यातून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. समविचारी मित्र मैत्रिणी शोधा. अर्थात, तसा आग्रह अजिबात नाही हं…. कारण तुम्हीच स्वतःचे ‘प्रथम मित्र’ आहात. खूप धमाल करा…..आणि बरं का, एंजॉयमेंटचंही अजीर्ण होतंय असं वाटलं तर ह्या विस्तीर्ण आमराईत कुठेही जाऊन ध्यानस्थ व्हा. वाटलं तर एखाद्या झाडाखालच्या पारावर अंग सैलावलंत तरी चालेल.”

…. आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली. 

— क्रमशः भाग पहिला…  

लेखक – श्री श्रीपाद सप्रे

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विवाह करार – भाग-2 ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ विवाह करार – भाग-2 ☆ सौ. प्रांजली लाळे

(पण असं खास भेटायचे म्हणजे जरा वेगळंच वाटले तिला..तिने खुप विचारांती कैवल्यला भेटायला येत असल्याचे सांगितले..) इथून पुढे —–

कैवल्यही जवळ जवळ अशाच मनस्थितीत होता..ओ.पी.डी.संपली..मनाला लागलेली हुरहूर..मनाला पडलेले अनामिक प्रश्न..आज सर्वच प्रश्नांची उत्तरे सापडवायचीच.. ह्यावर ठाम असलेला कैवल्य..मस्त तयार झाला..डेट सदृश्य भेटीसाठी…पीटर इंग्लंडचा त्याचा आवडता आकाशी शर्ट..मंद दरवळणारा परफ्युम..भारीच दिसत आहोत.. अशा आविर्भावात शिळ घालत गाडी निघाली ना काव्याला भेटायला!!

कैवल्य जरा वेळेच्या आधीच पोहचलेला…काय बोलायचं ह्या गोंधळात!!असाही मितभाषी असलेला..काय होणार आहे आता??कपाळावर आलेली किंचित घामाची टिपूसं  रुमालानी पुसली..

काव्या त्याच्या समोर येऊन उभी राहिली..स्वप्नवत वाटत होते..मस्त गुलाबी रंगाचा अनारकली..हलकासा मेकअप..कपाळावर छोटीशी चंद्रकोर..सादगीमेंही सुंदरता माननारी काव्या..

दोघेही एकमेकांना कधीही न पाहिल्याप्रमाणे पहात होते..दोघेही न बोलताही बरंच काही बोलून गेले..शब्दरुपं आले मुक्या भावनांना..असेच..

पहल कोणी करायची..ह्या गोंधळात असतानाच..कैवल्यने वेटरला आवाज दिला..मस्त मटर बटाटा कटलेट आणि मस्त वाफाळणारी कॉफी !! आता सुरुवात तर कैवल्यलाच करावी लागणार होती..कारण त्यानंच तर बोलावले होते काव्याला..मनातले बोलायला..

काव्याही आतुरतेने वाट पाहत होतीच..कशी आहेस गं?? छान दिसते आहेस..त्यानं असे म्हंटल्यावर मोरपीसं फिरल्यागत तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली..थँक्यु..जुजबी बोलली..

आपली ओळख होऊन सात आठ महिने होतील..पण तुला पाहिल्या क्षणी मनात झालेली चलबिचल..अजूनही आठवतेय..तुझ्याशी बोलून अधिकच गुंतत गेलो..काल आईनं विषय काढल्यावर मनात काहूर उठलेय..ते मिटवायचंय गं आज..बस्स!!

मी काय बोलणार रे?? मीही तुझ्यात त्या क्षणीच गुंतलेले..प्रथम तुज पाहता जीव वेडावला..असेच झालेले…पण खरं सांगू लग्न या गोष्टीमधे गुंतायचे की नाही ह्या विवंचनेत आहे मी..

हो माझेही तेच म्हणणे आहे..एकमेकांना जाणून घेऊया..मग लग्नाचे पाहू..सहा महिन्यात जाणून घेऊ आपल्या आवडी, निवडी ,स्वभाव..मग आयुष्यभरासाठी एकत्र येऊ..काय वाटते तुला?? इति कैवल्य.

तिचे त्याच्यावर मनापासून प्रेम होते.तरी असा लग्न न करता एकत्र राहण्याचा विचार ती कदापि करणार नव्हती..हा तिचा स्वभावच नव्हता..रिबेलिअस होण्याचा !!

मला विचार करायला थोडा वेळ देशील का रे???

दोघांनी काहीच न बोलता कटलेटचा आणि कॉफीचा आस्वाद घेतला..या भेटीत दोघे उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नचिन्ह घेऊनच घरी परतले..

कैवल्य विचारांच्या तंद्रीतच घरी कधीचा पोहचला..काय असेल काव्याच्या मनात??काय हरकत आहे काही दिवस लिव्ह इन मध्ये राह्यला..आजकाल बरेच जणं असेच तर राहतात.एकमेकांना समजून घेण्यासाठी..वेळ तर हवाच..बरं ती नाही म्हंटली तर आयुष्य वाळवंटासम भासणार..ह्या विवंचनेत तो घरात प्रवेश करता झाला..आई नुकतीच बाहेर हॉलमध्ये येऊन बसलेली..इकडे तिकडे कुठेही लक्ष न देता कैवल्य त्याच्या खोलीत रवाना झाला..अगदी शुन्यात नजर लावून..हम्म..

इकडे काव्यानेही मनात काहीतरी ठरवूनच पुढच्या तयारीला लागली..कैवल्यला दोन दिवसात सांगायचे होते उत्तर..ती तिच्या निर्णयावर ठाम होती…पण कैवल्य अजूनही गोंधळलेला..टू बी ओर नॉट टू बी मधे अडकलेला..

दुसऱ्या दिवशी काव्यानं कैवल्यला फोन केला..आज भेटुया का?? कैवल्य जवळ जवळ उडालाच…हवाओंमें..कुठे..आणि का?? अरे थांब थांब..सांगते..माझी एक मैत्रीण आहे..तिला भेटायला जायचे आहे जरा..चालेल..दुपारी दवाखान्यात रुग्णांची वर्दळ कमी असते..तेव्हा जाऊया..ओके डन..

दुपारी काव्या आली..मोरपंखी कुर्ता..हलकासा मेकअप..नजर खिळवणारा तिचा प्रसन्न चेहरा..दिल खल्लास!!चल जाऊया का?? कुठे विचारायलाही वेळ न दवडता डॉ.कैवल्य काव्यामय झाल्यागत तिच्या मागे निघाले..खरंच प्रेम माणसाला बदलते..आमुलाग्र बदल घडतो माणसांत..क्या यही प्यार है?? आजच्या जीवनशैलीत प्रेम आणि शारिरीक आकर्षण ह्यात गफलत होते..त्याचा परिणाम खुप वाईट..

कैवल्य-काव्या एका आधुनिक गगनचुंबी इमारतीसमोर आले…अतिशय सुंदर इमारत..पुर्ण इमारत अति श्रीमंत लोकांची असावी असा कैवल्यचा प्राथमिक अंदाज..लिफ्टचे बटन दाबले..अकराव्या मजल्यावर दोघे पोहोचले..फ्लॅटचा दरवाजावरची बेल वाजवली..दरवाजा उघडताच त्यांना समवयस्क तरुणी समोर उभी !! विमनस्क,निस्तेज चेहऱ्याची..मूळची सुंदर असावी..मनातल्या मनात डॉक्टर साहेब पुटपुटले..या ना काव्या..

दोघेही प्रवेश करते झाले..मग सुरू झाल्या भरपूर गप्पा..बोलण्याच्या ओघात..त्या तरुणीचे नाव मधुरा असल्याचे कळले..ती तिच्या मित्राबरोबर इथेच राहतेय असे समजले..दोन वर्षे झालीत..आई बाबा भेटत नाहीत..अजूनही लग्न करण्याचा त्याचा मानस नाही..अजून तुला तेवढे ओळखतच नाही मी. असे म्हणणारा तो..हिला बायकोसारखे सर्व कामे सांगतो..हुकूमही सोडतो..पण लग्नसंस्थेवर विश्वासच नाही म्हणतो..पाच वर्षाचा करार संपल्यावर पाहू..मधूरा एक हुशार,तडफदार,आधुनिक विचारसरणीची मुलगी..आज एका चुकीच्या विचारामुळे एकटी पडली..समाजानं नाकारलेली..

पत्नी ही आयुष्यभराची साथीदार असते..पती हा हक्काचा जोडीदार असतो..हे त्यांच्या लक्षात न आल्यानं फक्त तात्पुरता विचार केल्याने पदरी फक्त निराशा आलेली..मधुरा निराशेच्या गर्तेत पुर्ण अडकलेली..तो केव्हाच आईबाबांकडे परतलेला..तिला कोणी पुन्हा स्विकारेल की नाही हे प्रश्नचिन्हं घेऊन वावरणारी..निराशाग्रस्त..मधुरा बोलतानाही दिग्मुढ वाटली..काव्यानं तिला जवळ घेतले..अगं काळजी करु नकोस सर्व काही ठिक होईल..बघूया..मी सर्व येणाऱ्या काळावर सोडलेय..हम्म..इति मधूरा..चल आम्ही निघतो गं..कैवल्य हे निश्चलपणे ऐकत होता..दोघेही निघाले..काहीच न बोलता बरंच काही समजून चुकलेले…

काव्याला आपले म्हणणे असेच पटवून द्यायला आवडायचे.प्रत्यक्ष अनुभवातुन…

कैवल्यच्या मनातले मळभही बरंचसं निवळलं..हळूहळू प्रश्नांची उत्तरंही मिळायला लागली..

त्याच्या आई बाबांचेही अरेंज म्यारेज..तीस वर्षांचा संसार..पण असे अजूनही वाटत नाही..मेड फॉर इच आदर असे..कधी दुःख तर कधी सुख..ऊन सावलीच्या खेळात त्यांचा संसार अधिक फुलला..पण तरीही कैवल्यला कुठेतरी सलत होते असं लग्न करणं वगैरे..नो रिस्क असं आयुष्य जगायचे होते ना !!

पण आयुष्यात रिस्क हवीच..कहानी में ट्वीस्ट होना ही चाहिए!!

आईशी बोलायलाच हवं असे ठरवून आईच्या खोलीत पोहचला..आईने वाचत असलेली कादंबरी बाजूला ठेवली..बोल माझ्या  राजा..काय वाटतय तुला..सांगशील का??

मनातलं साचलेले जर वेळेवर व्यक्त झाले नाही तर डबक्यागत तिथेच साचते..त्यावर कमळे नाहीत तर बुरशी उगवते!!आईशी बोलले की मन मोकळे होते असे त्याला नेहमी वाटायचं..आजही घडलेला प्रसंग त्यानं आईला सांगितला..आईनं ओळखले त्याच्या मनातल्या वादळाला..हे वादळ क्षमवायचा रामबाण उपाय म्हणजे माय लेकरांमधल्या संवादाची मैफिल!!

आई काव्यावर माझं खुप प्रेम आहे गं..पण ती आयुष्यभर साथ देईल का गं मला?? मला निभावता येतील का सर्व जबाबदाऱ्या लग्नानंतरच्या?

कैवल्या लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन असते..एकमेकांच्या मदतीने,विचाराने केलेला संसार म्हणजे लग्नं..काँन्ट्राक्ट म्यारेज हा फक्त करार आहे..प्रायोगिक तत्वावरचा!! जमले तर ठिक नाही तर दुसरे कोणीतरी!! एकमेकांच्या भावनांचा खेळखंडोबा कशासाठी करायचा?? बाळा लग्न झाल्यावर नवरा बायको दोघेही बंधनात अडकतात..ते बंधन असते प्रेमाचे,संस्काराचे!! काव्या चांगली मुलगी आहे.तिला माझी सून म्हणून घरी आण..पुन्हा एकदा विचार कर..तिच्याशी कायमचं नातं जोड..

खरं तर लग्नानंतर जोडीदाराचा स्वभाव समजायला त्याचा सहवास हवा..तो समजायला..काही लोकांना जोडीदाराचा स्वभाव समजण्यास क्षणही पुरतो..तर काहींना आयुष्य दवडावं लागते..हळू हळू नातं उमलू दे..नात्यांची वेल बहरु दे…

कैवल्या विवाह करार हा कागदोपत्री करण्यापेक्षा मनाने मनाशी बांधलेली खुणगाठ असावी प्रेमबंधनाची!! तुझे तुझे माझे माझे करायला हा बाहुला बाहुलीचा खेळ नव्हे..मला वाटते तुला आता समजलेच असेल मला काय म्हणायचेय ते..

कैवल्य स्थितप्रज्ञासारखा आईसमोर मुग्धं होऊन ऐकत होता..खरंच तर होते ते..काव्या त्याला आयुष्यभराची सहचारिणी म्हणून हवी होती..तो आता तिला फोन करणार होता संध्याकाळी..उद्या आईबाबांना घेऊन येतो तुझ्याकडे..तुझा हात मागायला..असं सांगणारा..गाणं गुणगुणतच तो त्याच्या खोलीत गेला..फिटे अंधाराचे जाळे..झाले मोकळे आकाशं..

–  समाप्त – 

संग्राहक :  सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विवाह करार – भाग-1 ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ विवाह करार – भाग-1 ☆ सौ. प्रांजली लाळे

कैवल्यनं ठरवले होते मस्त आयुष्य एन्जॉय करायचे.अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून..स्वच्छंदी जगायचे..भरपूर पैसा कमवायचा..पण फक्त स्वतःसाठीच..खाओ पिओ ऐश करो..अरे हेच तर आपलं लाईफ..तो तसा चारचौघात उठून दिसणारा.मुलींची लाईन वगैरे मागे नसली तरी एखादी तरी सहज मागे वळून पाहिल इतका स्मार्ट तर नक्कीच..करीअर आणि बस् करीअरच!! डॉक्टरकीची पदवी मिळाल्यानंतर त्याने आता स्वतःची प्रॅक्टिस सुरु केली..पंचवीशीतला तोरा आणि लवकरच पदरात पडलेले यश..यामुळे तो अधिकच रुबाबदार वाटू लागला..आई-बाबा आणि मोठी ताई एवढेच काय ते चौकोनी कुटुंब..ताईचेही लग्न ठरले..वेल सेटल्ड परागशी अरेंज म्यारेज झाले.तेही थाटामाटात..घरातील वातावरण अगदी आनंदात होते..

आता सर्वांची नजर कैवल्यवर होती..तु कधी करणार रे लग्न?? छे छे सध्या तरी नाहीये विचार..असे म्हणून टाळला त्याने विषय..मी भला  आणि माझं काम भलं..असे रुटीन सुरुच होते त्याचे..दवाखान्यातल्या बऱ्याच केसेस चुटकीसरशी सोडवणाऱ्या कैवल्यला मनातील गुंता काही सुटत नव्हता..लग्नाबाबतची कोणतीही रिस्क त्याला घ्यायची नव्हती..त्याच्या एक दोन मित्राचे कटू अनुभव तो ऐकून होता ना !!

असो..

एक दिवस सकाळीच दवाखान्यातुन इमर्जन्सीचा फोन आला..दुसऱ्या क्षणी कैवल्य गाडी काढून दवाखान्याकडे निघाला देखील..कर्तव्यदक्ष डॉक्टर!!

 एक तरुणी तिच्या बाबांना घेऊन आली होती..बाबांना सिविअर हार्ट अटॅक आला असावा..असा प्राथमिक अंदाज..तपासणी अंती तात्काळ ऑपरेशन करायचे ठरले..ती तरुणी अतिशय घाबरलेली..कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हती..सर्जरी आधी फॉर्मवर तर सही करावी लागणार होती..अतिशय नाजूक प्रकरण आहे हे कैवल्यने जाणलं..तिचं नाव काव्या असल्याचे समजले..तुझ्या बाबांना काही होणार नाही..ही फक्त फॉरमालिटी आहे..बाकी तुम्ही निर्धास्त रहा..असं म्हणताना तिच्याशी नजरा नजर झाली..आखीव रेखीव नाक- डोळे,गहू वर्णीय ती ललना..मनाचा ठाव तर घेत नव्हती त्याच्या???

फॉर्म भरला गेला.काव्याला आश्वस्त करुन कैवल्य कामाला लागला..मन शांत..डोक्यावर बर्फ..पुर्ण एकाग्रतेने त्यानं काव्याच्या बाबांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली..आता काव्या जरा निश्चिंत झाली..

काव्या अतिशय बडबडी मुलगी..सगळ्यांना आपलसं करणारी..दिलखुलास बोलणं..पाच-सहा दिवसातच आख्खा दवाखाना ओळखीचा..कैवल्यही जरा हलला..मुली अशाही असतात तर..डिस्चार्ज मिळाल्यावर पुनर्तपासणीला दोनदा तीनदा तिचं येणं झाले..कैवल्यशी जुजबी बोलणं झाल्यावर समजले की तिचा दादा परदेशात असतो..आई बाबा आणि तिच भारतात फक्त..अचानक झालेल्या या प्रकाराने हादरुन गेले होते..पण सर्जरी उत्तम पार पडल्याने सुखावले देखील होते..

एक दिवस अचानक काव्याचा फोन आला..बाबा कसंतरी करतायेत..कैवल्यने कोणतेही आढेवेढे न घेता घरी येण्याची तयारी दर्शवली..काही तरी बदल घडत होता..पण काय ते नव्हते कळत त्याला..बाबांची शुगर प्रचंड वाढली होती..त्यामुळे रात्रभर तरी निरिक्षणाखाली रहावं लागणार होते..काव्याचे सोज्वळ वागणे त्याला जास्त भावले..जेष्ठांची काळजी घेणं जाम आवडलं..पहाटे शुगर नॉर्मल झाल्यावरच डॉ.कैवल्य घरी जायला निघाले..

  आजकाल डॉ.कैवल्य काव्यामय झालेले..हे त्यांच्या आईसाहेबांच्या नजरेतुन सुटले नाही..कैवल्य मात्र काहीच न झाल्यासारखा कामात मन गुंतवत असे…काव्यालाही असेच वाटते का हा प्रश्न मनात रुंजी घालू लागला..

पेशंट तपासून झाले आणि केबीनकडे वळतच होता..अचानक काव्या समोरून येताना दिसली.निरभ्र आकाशावर गुलाबी छटा यावी..तसा आकाशी ड्रेस गुलाबी ओढणी असा पेहराव घातलेली काव्या पाहून मंत्रमुग्ध झालेला कैवल्य जसा होता तसाच उभा..

निशब्दं भावनांचा कडेलोट होतो की काय अशी भिती क्षणभर कैवल्यला वाटायला लागली..क्षणात चेहऱ्यावरचे भाव कडक इस्त्री फिरवल्यासारखे सपाट!!

 एक ना एक दिवस अव्यक्त भावना व्यक्त होणारच..पण कशा?? लग्नसंस्थेवर विश्वास नसलेला कैवल्य लग्न करुन लग्न बंधनात अडकणारा नव्हता..आणि काव्याने आई बाबांच्या काळजीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता..

खरं तर लग्न हे असे नाते असते की ज्यामुळे आयुष्य जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो..एकमेकांसाठी जगणं म्हणजे  प्रेम असते !! पण त्या प्रेमाला लग्न नावाचं कोंदण तर हवंच..

 काव्या तिथून निघून गेल्यावर बराच वेळ कैवल्य ओपीडीत विचार करत बसलेला..भावनावेश उफाळून येत असला तरी त्याच्या ठायी अहंकारही होताच की..काव्याही आता त्याच्यात गुंतत चालली होती..काही ना काही कारणाने कधी मुद्दाम तर कधी अनाहूतपणे कैवल्यला भेटणे व्हायचेच..दोघात भक्कम मैत्रीचे नाते निर्माण झाले होते…एकमेकांना जाणून घेता घेता एक नातं फुलत होतं दोघांत..त्या नात्याचं नाव मात्र नव्हते सापडत दोघांना…

मैत्री की अजून काही हे  समजायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक??

काव्यालाही आता कैवल्यबद्दल विश्वास वाटायला लागला होता..तो आहे ना..मग काही टेन्शन नाही..मग ते प्रेम आहे की आणखी काही माहिती नाही?? दोघेही निशब्दं होऊन फक्त नजरेतुन एकमेकांना बरंच काही सांगून जायचे..पण अर्थ मात्र लागत नव्हता..हेच तर प्रेम नसेल??

कैवल्यने आता स्वतःला गुंतवून घ्यायचे ठरवले..काव्याही शक्यतो दवाखान्यात जायचे टाळू लागली..क्या यही प्यार है??

कधी मधे फोन व्हायचा पेशंटची(?)चौकशी करायला..

काव्याला टाळणे जरी शक्य झाले तरी मनाचे काय??

दोघांचीही मनस्थिती कैवल्यची आई जाणून होती..तिने काव्याच्या आईला फोन केला..मग काय खलबतं झाली..दोन्ही आईंची..अस्फुट भावना कुठे तरी व्यक्त झाल्या तरच त्या सुंदर अविष्कार घडवतात..नाही तर अव्यक्त..अर्धोन्मिलित कळीसारख्या तिथेच गळून जातात..

कैवल्यच्या आईने थेट विषयालाच हात घातला..कैवल्या मला आता असे वाटतेय तु लग्न करावेस..मलाही सूनमुख बघायची घाई झाली आहे..माझ्या पहाण्यात आहे एक मुलगी..तु बघ आणि ठरव..आई मला लग्न या concept वरच विश्वास नाही..प्लीज तु मला अडकवू नकोस..मी असाही खुप सुखी आहे..इती कैवल्य..

आई काहीच बोलली नाही..कैवल्य दवाखान्यात गेल्यावर काव्याला घरी बोलावुन घेतले..काव्या दुपारी पोहचली कैवल्यच्या घरी..तसे तिचे या आधी एकदा दोनदा येणं झाले होते..त्यामुळे परकेपणा कधीचा गायब झालेला..तिच्या बोलक्या स्वभावाने न बोलणाऱ्यालाही बोलायला लावणारी काव्या कैवल्यच्या आईला अतिशय आवडली..कैवल्यचे बाबाही काहीसे अबोल..आणि कैवल्यही तसाच कमी बोलणारा..ताई होती बोलकी..पण ती आता सासरी गेलेली..मग काय कमालीचे एकटेपण आलेले घरात..मै और मेरी तनहाई..बस्स्…काव्या आली आणि क्षणात घरातील माहोलच बदलून गेला..कैवल्यच्या आई जाम खूष..तिने सोबत आणलेल्या सुरळीच्या वड्या आणि पाकातल्या पुऱ्या दोघींनीही जवळजवळ फस्तच केल्या..सोबत गप्पांचाही ओघ होताच की..बोलता बोलता काकूंनी काव्याला तिचे मतही विचारले लग्नाबद्दल..हम्म..मी सध्या तरी लग्नाचा विचार नाही करणारे…आई बाबांना कोण सांभाळेल..लग्न करण्यात जोखीम आहे वगैरे बरंच काही..पण नकारात्मक विचार..इतकी आशावादी मुलगी..ह्याबाबत निराशावादी होती हेही तितकेच खरे..तरी कैवल्यच्या आई आशावादी होत्या..नातेबंध सांभाळण्यात आणि ते निभावण्यातच आनंद मानण्याऱ्या..तुला कैवल्य आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा वाटतो?? काव्या क्षणभर स्तब्धं झाली..पण निरुत्तर नाही बरं का..सलज्ज नजरेने तिने मान झुकवली..कैवल्यबद्दलच्या प्रेमाला आज जणू तिने मुक संमती दर्शवली होती…

संध्याकाळी कैवल्य घरी आल्यावर आईनं काव्या घरी येऊन गेल्याचं सांगितले…चेहऱ्यावरचा आनंद न लपवता आल्याने कशाला आली होती..किंचित ओरडलाच..अरे मीच बोलावलेले गप्पा मारण्यासाठी..आजकाल तुझे बाबाही मित्रांसोबत बाहेर फिरायला जातात..एकटेपणाचा मला कंटाळा येतो रे…मग काव्याला विचारले मी येते का गं कायमची रहायला इकडे?? काय???आईकडे आश्चर्याने पहात ओरडलाच..आईचे एकटेपण त्यालाही सतावत होते..त्याला वाटणाऱ्या काव्याबद्दलच्या अव्यक्त प्रेमाला आता व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही असे दिसत होते..पण पहले आप पहले आप असे किती दिवस??

काव्याशीच बोलायचं असं ठरवून कैवल्यने तिला फोन केला..आज ओपीडी लवकर संपेल. ऑपरेशन्स पण नाहीत आज कोणते..जवळच्या कॅफेला भेटुया…काव्याही चाट पडली..त्याचा बोलण्याचा स्वर आर्जवी वाटला..की फक्त मनाचा खेळ??

काव्याची तर द्विधा मनस्थिती.काय असेल कैवल्यच्या मनात? आपले आई बाबा काय म्हणतील?? एरव्ही बडबडी असलेली..न बोलणाऱ्यालाही बोलकं करणारी काव्या आज निशब्दं,आपल्याच विचारात गुरफटली…काय असेल कैवल्यच्या मनात?? याआधी आई बाबां व्यतिरिक्त असे कोणाबरोबर बाहेर भेटणं व्हायचे नाही असे नाही..ती आणि तिच्या मैत्रीणी भरपूर वेळा हास्य फवारे उडवत रेस्टॉरंट दणाणून टाकायच्या..पण असं खास भेटायचे म्हणजे जरा वेगळंच वाटले तिला..तिने खुप विचारांती कैवल्यला भेटायला येत असल्याचे सांगितले..

– क्रमशः भाग पहिला…

संग्राहक :  सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(तू होतास म्हणून निभावलंस रे बाबा सगळं. नाही तर कोण करतं हल्ली परक्या माणसासाठी एवढं?तेही, एका पैची अपेक्षा न ठेवता?शाबास हो तुझी ! “ दातेकाका म्हणाले… राजाच्या डोळ्यात अश्रू आले.) इथून पुढे —- 

“ काका,तुम्ही बघत होतात..  मी कोणतीही अपेक्षा न ठेवता माझे वडील मानून गोगटेबाबांचं सगळं केलं. पण आता मीच बेघर व्हायची वेळ आली हो. मला एक महिन्यात जागा खाली करायला सांगत आहेत हे लोक. आता मी कुठं जाणार आणि एवढे पैसे घालून घर तरी कुठे घेणार? अहो कानी कपाळी ओरडत होती माझी बायकामुलं. पण मी त्यांचं कधीही ऐकलं नाही. माझ्या खाजगी नोकरीत  मला काही खूप पगार नाही आणि नव्हताही. कसे फेडणार होतो मी घर घेऊन हप्ते? या आउट हाऊसच्या तीन खोल्या पुरेशा होत्या आम्हाला काका.” राजाला अश्रू अनावर झाले.

दाते काका त्याच्या जवळ बसले आणि म्हणाले, “ राजा,देव असतो पाठीशी !माझा मित्र शहाणा होता. त्याला तुझ्या आपुलकीची, निरपेक्ष कष्टाची जाणीव होती बाबा ! जा घरी तू. उद्या मी बंगल्यावर येतोय. बारावे होईपर्यंत थांबलो होतो. जा तू. होईल सगळं ठीक बाळा !” 

राजा घरी आला. झोप उडाली होती त्याची. उद्या काय होणार आणि दातेकाका तरी काय चमत्कार करणार हे त्याला समजेना.  दुसरा दिवस उजाडला. सकाळी दाते काकानी सगळ्याना फोन करून घरी थांबायला सांगितले होतेच. दाते वकील घरात आले. म्हणाले, “आता तुमचे बाबा गेले !आता तुमचा विचार काय आहे?” तिघेही म्हणाले, “आम्ही हा बंगला विकणार काका. आम्ही तर परदेशात असतो. आता इथे कधीही येणार नाही आम्ही. “ 

“ बरं बरं ! मग या राजाचं काय? त्याने इतकी वर्षे इथे काढली. तुमच्या वडिलांच्या एकाही दुखण्याखुपण्यापासून ते अगदी अंत्यसंस्कारापर्यंत तुम्ही कुणी आलासुद्धा नाहीत. सगळं राजाने निभावलं. त्याची सोय काय? “ दात्यांनी विचारलं.

“ त्याची कसली आलीय सोय काका?  त्याने बघावं घर आता आपलं.” 

काका शांतपणे उठले. ब्रीफकेसमधून मृत्युपत्र काढले. हे माझ्या मित्राने केलेले कायदेशीर रजिस्टर्ड मृत्यपत्र. यात स्पष्ट  लिहिलंय ….  या बंगल्यातल्या सम्पूर्ण खालच्या मजल्यावर राजा गेले अनेक वर्षे भाडेकरू म्हणून रहातो. या बघा गेल्या वीस वर्षाच्या भाडेपावत्या ! तर आता तुम्ही हा बंगला भाडेकरू सकट विकत असाल तर उत्तम ! राजा खालचा मजला सोडणार नाही. तो कायदेशीर भाडेकरूआहे ! “ 

राजा आणि सगळी मंडळी थक्क झाली. राजाने मनोमन गोगटे बाबांना हातच जोडले. दाते मिस्कीलपणे हसत होते. आता लवकर बोला. मला वेळ नाही. राजा उद्या तू या खालच्या मजल्यावर शिफ्ट हो. केवळ बाबा होते म्हणूनच ना तू इथे रहात नव्हतास ?” दाते डोळा बारीक करून म्हणाले. “ होय हो काका,असंच झालंय.” राजा खूण समजून म्हणाला… “ मग आता तू ते आऊट हाऊस सोडून दे आणि इथे रहायला लाग. तू कायदेशीर भाडेकरू आहेस गेली वीस वर्षे. या बघा भाडे पावत्या. गोगटे काकांची सही असलेल्या सर्व पावत्या फाईलला व्यवस्थित लावलेल्या होत्या. तिन्ही भावंडांची बोलती बंद झाली. आता कसला बंगला विकला जाणार? कोण घेईल असा पूर्ण मजला भाडेकरूकडे असलेला बंगला?..   

दाते वकील निघून गेले.संध्याकाळी राजा त्यांना भेटायला गेला. त्याने दात्यांचे पायच धरले. “ काका,ही सगळी काय भानगड आहे ? माझी मती गुंग झालीय खरंच ! “ 

“ सगळं सांगतो. बस इथं ! हे बघ.माझा मित्र गोगटे काही मूर्ख नव्हता. तिन्ही आपमतलबी मुलं त्याला काय माहित नव्हती का?  मला सगळं सांगायचा बरं गोगटे ! प्रसंगी माझा सल्लाही विचारायचा तो. ती नीता एक नंबरची स्वार्थी आणि हावरट ! जवळजवळ सगळं  दागिन्यांचं कपाट साफ केलंय तिनं. तू किती आपुलकीने प्रत्येकवेळी गोगटेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंस, त्याच्या सर्व ऑपरेशनमध्ये त्याच्याजवळ कायम होतास, हे तो कसा विसरेल? त्यानेही तुझ्यावर मुलापेक्षा जास्त माया केली आणि तुझी त्याच्यापश्चात सोयही करून ठेवली. ही मुलं तुझा उपयोग करून घेणार,आणि तुला बाहेर काढणार याची खात्रीच होती त्याला. म्हणून माझ्याच सल्ल्याने या भाडेपावत्या करून ठेवल्या आम्ही.आता तू कायदेशीर भाडेकरू ठरतोस.” 

 “ काका,मला खूप अवघड वाटेल हो असं तिथे रहायला ! नको नको,मी नाही जाणार असा तिथे ! “

“ अरे वेड्या, पुढची गम्मत काय होते ते बघत रहा. माझ्या अंदाजाने हे धूर्त लोक आता माझ्याकडे येतील. माझा सल्ला विचारतील. तुला कसे काढायचे हे विचारतील. तेव्हा मी सांगणार, ‘ तुम्हाला बंगल्याची चांगली किंमत यायला हवी असेल तर राजाला दुसरीकडे फ्लॅट घेऊन द्या. तरच तो खालचा मजला सोडेल. त्याने का म्हणून जावे दुसरीकडे?’.. अरे राजा, तुला आपोआप चांगला फ्लॅट विनासायास मिळेल बघ .ते झक्कत देणार तुला फ्लॅट ! तेव्हा मात्र उगीच दोन खोल्यांचा घेऊ नकोस. तू सगळं सगळं केलं आहेस ना  बाबांचं? मग या चोरांना सोडू नकोस. मी बघून देईन तुला चार रूम्सचा फ्लॅट ! आपण काही ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खात नाही आहोत. हे झाले की मग मीही  मित्रकर्तव्यातून मोकळा होईन. माझी भरपूर फी गोगटेने आधीच दिलीय बरं ! भला माणूस माझा मित्र.” दाते आणि राजा दोघांचेही डोळे भरून आले. 

अपेक्षेप्रमाणे तिन्ही भावंडे आलीच दाते वकिलांकडे.. ‘  निर्वेध बंगला असेल तर फार उत्तम. किंमत लगेचच येत होती. आता आम्ही काय करू आणि राजाला कसे बाहेर काढू?’ हा सल्ला विचारत होते तिघेही. दाते म्हणाले, “ तो असा कसा जाईल? आता तुम्ही जर त्याला बाहेर फ्लॅट घेऊन दिलात तर मग बघता येईल.” 

“ काका, तीस पस्तीस लाखाचा फ्लॅट द्यायचा का  या चोरालाआम्ही ?” .. तणतणत तिघेही म्हणाले.

“ नका देऊ मग. तो राहील की तिथेच. मला मूर्ख समजू नका. गोगटेच्या बंगल्याची किंमत आज चार कोटी तर आहेच. कमी येत नाहीयेत तुम्हाला बंगला विकून पैसे ! ही गोगटेची इच्छा होती, राजा बंगल्यातच रहावा. तो कुठे म्हणतोय मला फ्लॅट द्या? बघा बुवा! “ 

आठच दिवसात राजाच्या पसंतीचा फ्लॅट  तिघा भावंडांनी त्याला दाखवला. दाते वकिलांनी कायदेशीर  कागदपत्रे तयार करून फ्लॅट राजाच्या नावावर केला. राजाने आऊट हाऊस लगेचच सोडले आणि पुढच्याच महिन्यात भरपूर किमतीला बंगला विकला गेला. पैशाची वाटणी करून दोघे भाऊ अमेरिकेला निघून गेले. राजाला फार सुरेख फ्लॅट मिळाला.

राजाने  दाते  काकांना घरी जेवायला बोलावले आणि मोठी रक्कम त्यांच्या हातात ठेवली. “ काका,तुम्ही नसतात तर आज मी कुठे गेलो असतो हो ? गोगटे बाबा आणि तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर “  राजाला रडू आवरले नाही. रोहन आणि रंजना त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले, “ आम्ही चुकलो. तुमच्या निरपेक्ष सेवेचं भरघोस फळ तुम्हाला मिळालं. आम्हाला  तुम्ही माफ करा बाबा. दाते आजोबा,  किती आभार मानावे तुमचे ते कमीच आहेत खरं तर ” रोहन म्हणाला.

“ बघा ना, गोगटेआजोबा गेल्याक्षणीच त्यांची मुलं बाबांना घर सोडायला सांगत होती. आज हे मृत्युपत्र नसते आणि तुम्ही ते गोगटे काकांकडून हुशारीने करून घेतले नसते, तर मात्र आम्ही रस्त्यावर आलोच असतो “. रोहनच्याही डोळ्यात पाणी आलं. “ अरे हो बाळा, हे असंच घडलं असतं, पण सत्याचा वाली देव असतो बाबा. तुझ्या बाबांना न्याय मिळाला बस. मी मित्रकर्तव्यातून मुक्त झालो. रोहन,तू सुद्धा तुझ्या बाबांसारखाच सरळ सज्जनपणे वाग. देव आपल्याला काही कमी  पडू देत नाही.” 

…. दाते काकांचेही डोळे मित्राच्या आठवणीने भरून आले होते .

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – १  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

एवढ्या मोठया बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये  राजा  आपला संसार थाटून रहात होता.  बायको रंजू आणि मुलगा रोहन असे छोटेसे कुटुंब राजाचे ! राजाला आठवतं त्या दिवसापासून राजाची आई याच आऊट हाऊसमध्ये रहात होती आणि कायम बंगल्यातच राबण्यात जन्म गेला तिचा ! राजा चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले आणि आई आणि राजा याच आऊट हाउस मध्ये राहू लागले. आईने जिवापाड कष्ट केले आणि राजाला शाळेत घातले, शिकवणीही लावली. राजाचे वडील बंगल्यात वॉचमनचं काम करत असत,  आणि  गोगटे साहेबांचे अगदी विश्वासू उजवा हात होते ते. गोगटे साहेबांची दोन्ही मुलंही गुणी आणि हुशार होती. राजालाही ती दोघे शाळेत मदत करत आणि राजाला चांगले मार्क्स मिळत. 

राजा बीकॉम झाला आणि गोगटे साहेबांनी त्याला  एका कारखान्यात नोकरी लावून दिली.  मग तर राजाची आई कृतज्ञतेने भारावूनच गेली. दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. गोगटे साहेबांच्या पत्नी माई अचानकच निधन पावल्या. दरम्यान दोन्हीही मुलं परदेशी  निघून गेली होती आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात गोगटेसाहेब अगदी एकाकी एकटे पडले. त्यांनी राजाला अगदी कळवळून विनंती केली, “ राजा,आता तू तरी नको जाऊ घर सोडून. मला एकटे अगदी रहावत नाही रे. तू आपल्या आऊट हाऊसच्या मागच्याही दोन खोल्या नीट करून घे आणि इथेच रहा मला सोबत म्हणून !”  राजाला वाईट वाटले आणि त्याने गोगटे साहेबांची विनंती मान्य केली. मुलगे जरी परदेशी असले तरी साहेबांची  मुलगी नीता भारतातच होती. तिच्या नवऱ्याच्या आर्मीतल्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. जमेल तशी तीही आपल्या वडिलांकडे येत असे. पण वारंवार येणे तिलाही जमत नसे. 

गोगटे साहेबांचे मुलगे वर्षा दोन वर्षांनी भारतात येत, महिनाभर रहात आणि निघूनजात. गोगटेसाहेबही बऱ्याचवेळा मुलांकडे परदेशात जाऊन आले होते. पण आता त्यांना ते झेपेनासे झाले. साहेबांची तब्बेत अजूनही छान होती. रोज सकाळी वॉक ,मग आले की बाई छानसा ब्रेकफास्ट करून ठेवत. त्या मग स्वयंपाक करून ठेवूनच निघून जात. सुट्टीच्या दिवशी ते  राजाच्या कुटुंबाला घेऊन एखाद्या हॉटेलात जात आणि आनंदाने वेळ घालवत. राजाला त्यांनी कधीही नोकरासारखे वागवले नाही आणि आता तर तो स्वतःही बऱ्यापैकी नोकरीत होताच. गोगटे साहेब कितीवेळा म्हणायचे,” राजा,काय माझे ऋणानुबंध आहेत रे तुझ्याशी,सख्खी मुलं राहिली बाजूला आणि तूच किती प्रेम करतोस रे माझ्यावर.” अनेकवेळा रंजू साहेबांना जेवायला बोलवायची, सणासुदीला गोडधोड बंगल्यावर पोचवायची. नीता अधूनमधून यायची वडिलांकडे. तिला हे सगळं दिसायचं. रंजू राजा अतिशय मनापासून करतात आपल्या वडिलांचं, आणि त्यांना आपण भारतात असूनही आपली फारशी गरजही लागत नाही, याचा राग येई तिला. गोगटे साहेब हळूहळू थकत चालले. त्यांनाही आपली तिन्ही मुलं कशी आहेत ते नीट माहीत होतंच. त्यातल्या त्यात नीताचा स्वभाव फार स्वार्थी, मतलबी आणि  धूर्त होता. खरं तर तिला काय कमीहोतं ? नवऱ्याला आर्मीत चांगला पगार होता, सासरचंही चांगलं होतं सगळं. पण इथे आली की दरवेळी आईचं कपाट उघडून फक्त सांगायची – “ बाबा, मी यावेळी हे चांदीचं तांब्याभांडं नेतेय बरं का. कधी ,मी आईची ही चेन नेतेय हं ! तिकडचे भाऊ आणि त्यांच्या बायकांना काय उपयोग या सोन्याचा?” 

बाबा बिचारे गप्प बसत. आपलीच मुलगी ! काय बोलणार तिला? आणि तिच्या आक्रस्ताळ्या स्वभावाला घाबरून ते ती नेईल ते नेऊ देत तिला.  गोगटे साहेबांचे तिकडे असलेले अजय आणि अमोल हे मुलगे जरा तरी रिझनेबल होते. राजा सतत आपल्या वडिलांजवळ असल्याने त्यांना खूप हायसे वाटे. मध्यंतरी बाबांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन झाले तेव्हाही, त्यांना ऍडमिट करण्यापासून ते रात्री झोपायला जाण्यापर्यंत सगळे राजा आणि रंजूने तर निभावले, आणि म्हणून नीता किंवा त्यांना कोणालाच यावे लागले नाही. अजय अमोलला याची पूर्ण जाणीव होती. ही कृतज्ञता ते राजाला वेळोवेळी बोलूनही दाखवत. राजा म्हणायचा, “अरे काय बिघडतं मी केलं तर… माझे वडील दुर्दैवाने लवकर गेले पण मला तुमच्या बाबांनी कधी काही कमी नाही पडू दिलं. मी आज त्यांच्यामुळेच उभा आहे.”   

बाबासाहेब दिवसेंदिवस थकत चालले.   त्या दिवशी त्यांचे वकील मित्र  दाते काका आलेले दिसले आणि दुसऱ्या दिवशी गोगटेसाहेबांना गाडीतून नेलेलेही बघितले रंजूने. असेल काहीतरी काम म्हणून ती आपल्या कामाला लागली. रंजनाचा मुलगा आता मोठा झाला होता. कॉलेजला जायला लागला होता. चांगलाच  हुशार होता तो अभ्यासात ! त्याची स्वप्न ध्येयं वेगळी होती. “ आई, आपण या आऊट हाऊसमध्ये आणखी किती वर्षे रहायचं ग? मोठं आहे  हे मान्य आहे..  पण किती त्रास होतो बाबांना. सतत हाका मारत असतात गोगटे काका आणि किती  राबवतात आपल्या बाबांना. यांची मुलगी आहे ना इथे? मग कधी कशी ग त्यांच्यासाठी येत नाही? आपले बाबा आणि  तूसुध्दा किती वर्षे करणार? इथंच रहायचं का आपण कायम?”  रोहन चिडून विचारत होता… “ पटतंय बाबा तुझं सगळं मला, पण बाबांना कुठं पटतंय? आंधळी माया आहे त्यांची गोगटे साहेबांवर. मी काही  बोलायला लागले की गप्प करतात मला. अरे माई होत्या तेव्हा तर विचारू नको. हे घरगडी आणि मला स्वयंपाकीण करून टाकली होती अगदी ! “ रंजना उद्वेगाने म्हणाली. 

राजा बाहेरुन हे ऐकत होता. “ हे बघा, तुम्हाला इथं रहायचं नसेल तर तुम्ही मोकळे आहात कुठेही जायला. मी बाबांना सोडून कुठेही येणार नाही, त्यांच्या अशा उतारवयात तर नाहीच.” 

“अहो पण बाबा, त्यांना आहेत की तीनतीन मुलं. हा कसला त्याग बाबा? आम्हाला तुमची काळजी वाटते बाबा. आपल्या भविष्याचा विचार कधी करणार तुम्ही? जन्मभर इथेच रहायचं का आपण ?”  रोहनने विचारलं.

 “ हो. निदान बाबा असेपर्यंत तरी ! मग बघू पुढचं पुढं ! “ रंजना हताश होऊन आत निघून गेली.

 गोगटे आता वरचेवर आजारी पडू लागले. राजाने त्यांच्यासाठी रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी नोकर नेमले. त्याचे पैसे मात्र गोगटे काकांच्या अकाउंट मधून जात. राजाने मुलांना कळवले, “ तुम्ही येऊन जा,बाबांचं काही खरं नाही.” दोन्हींही मुलांचे फोन आले, “आम्हाला येता येत नाही. तूच बघ बाबा काय ते.” 

नीताला कळवले तर तीही येऊ शकली नाही. गोगटे काका पुढच्याच आठवड्यात झोपेतच कालवश झाले.  काकांचे अंत्यसंस्कारही राजानेच केले. मग मात्र  तीनही मुलं आली. त्यांची बायका मुलं आली नाहीतच.  राजाला अतिशय वाईट वाटले. सख्खी तीन मुलं असूनही आपल्यासारख्या परक्या मुलाकडून काकांचे अंत्यसंस्कार व्हावे, याचे फार वाईट वाटले त्याला. पण मुलं शांत होती.पंधरा दिवसांनी त्यांनी राजाला बोलावलं आणि विचारलं, “ राजा, खूप केलंस तू आमच्या बाबांचं. पण आता आम्ही कोणी इथे रहाणार नाही तर हा बंगला आम्ही विकायचं ठरवतोय….तू आमचं आउट हाऊस कधी रिकामं करून देतो आहेस ? एक महिन्यात सोडलंस तर बरं होईल. म्हणजे हा  व्यवहार करूनच आम्ही तिकडे निघून जाऊ.”

राजा हे ऐकून थक्क झाला.त्याने स्वतःच्या खिशातून काकांसाठी केलेल्या खर्चाची विचारपूस तर जाऊच दे, पण एका क्षणात हे लोक आपल्याला जा म्हणून सांगतात, याचा त्याला अत्यंत संताप आला.’ विचार करून दोन दिवसात सांगतो,’ असं म्हणून राजा घरी आला.

त्याला एकदम आठवलं, काकांचे दाते वकील काही महिन्यापूर्वी काकांकडे आले होते आणि त्यांना घेऊन बाहेर गेले होते. राजा ताडकन उठला आणि दाते वकिलांकडे गेला .. “ ये रे राजा, झालं ना गोगटेचं सगळं नीट? तू होतास म्हणून निभावलंस रे बाबा सगळं. नाही तर कोण करतं हल्ली परक्या माणसासाठी एवढं? तेही,एका पैची अपेक्षा न ठेवता? शाबास हो तुझी ! “ दातेकाका म्हणाले. राजाच्या डोळ्यात अश्रू आले… 

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहिले – मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं” … आता इथून पुढे)

प्रणव तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले

“वेडाबाई कुठली! असं रडतात का?या मोठ्या माणसांना खरं तर कसं जगावं हे माहितच नसतं, म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो त्याला ती नावं ठेवत असतात”

हर्षाला गोंधळली.तिला काही कळलं नाही.

“म्हणजे?”तिनं विचारलं

“तू लहान मुलांकडे बघितलंस?ती बघ कशी नेहमी आनंदी असतात.छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो.एखादं खेळणं,पान,फुलं,पक्षी,चित्रं,चाँकलेट बघून ती हूरळून जातात.आपलं रडणं विसरुन ती लगेच हसायला लागतात.त्यांच्याजवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात बरोबर ना?”

” हो”

” तू तशीच आहेस हर्षू.प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी.आपल्या लग्नाला दहा वर्ष झालीत पण एवढ्या वर्षात मी तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती.माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून. तू तुझ्यावरच्या  जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडोत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो.तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला. पण नाही जमलं.कदाचित वयाच्या दहाव्या वर्षी वडील वारल्यामुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खूप  लहानपणीच प्रौढ होऊन गेलो आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही.चाँकलेट खातांना किंवा कुल्फी,आईस्क्रीम खातांना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला कधी होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो.तिथलं निसर्गसौंदर्य पाहून तू हरखून गेलीस पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मुल अजून जिवंत आहे हर्षू आणि माझ्यातलं ते कधीच मेलंय. तुझ्यातलं ते लहान मुल तसंच जिवंत राहू दे.अगदी तू म्हातारी होईपर्यंत. कारण सांगू? तू मला तशीच आवडतेस .अल्लड, अवखळ. तुला पाहिलं की माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्या कुठे पळून जातात. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो”

प्रणव क्षणभर थांबला.

“आणि मला सांग. तू कामं तर मोठ्या माणसांसारखीच करतेस ना?तू स्वयंपाक उत्कृष्ट करतेस.घर छान सांभाळतेस.मुलांवर चांगले संस्कार करतेस.कंपनीत नोकरी करत असतांना तू कंपनीची बेस्ट एंप्लॉयी होतीस. तू कशातच कमी नाहीस.मात्र तुझ्यात आणि इतरांत हा फरक आहे की तू हे सगळं आनंदाने करतेस कारण तुझ्यातलं ते लहान उत्साही मुल तुला सतत सक्रीय, आनंदी ठेवतंय. खरं सांगू हर्षू,प्रत्येक माणसाने तुझ्यासारखंच असायला हवं पण मोठेपणाचा आव आणून माणसं जगतात आणि जीवनातल्या आनंदाला पारखी होतात”

त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली.मग ती अवघडली.आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरुन टोमणेच मारले होते पण तिचा धीरगंभीर,अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता.तिला कसं रिअँक्ट व्हावं ते कळेना.

तेवढ्यात बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्यापाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळला.त्या वासाने हर्षा वेडावून गेली.या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं.

“आई पाऊस पडतोय.आम्ही पावसात खेळायला जाऊ?” बाहेरुन केतकीने विचारलं.

“हो.जा”तिला उत्तर देतादेता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं.

“मी जाऊ?”

प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

“कुठे?”

“पावसात भिजायला?”

प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणतेय ते पटकन शिरलं नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला.

“काय झालं हसायला?”तिने निरागसपणे त्याला विचारलं.

तो न बोलता हसतच राहिला.

“अं?सांगा ना का हसताय?”

” काही नाही.तू जा”

हर्षा पटकन बाहेर आली.

“चला रे मुलांनो.आपण पावसात खेळू या”

प्रणव बाहेर आला.आपली बायको आणि मुलांना पावसात नाचतांना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला.का आपल्याला इतकं प्रौढत्वं यावं की या छोट्या छोट्या क्षणांचा आपल्याला आनंद घेता येवू नये याचं त्याला वैषम्य वाटू लागलं.”बाबा या ना पावसात भिजायला”

केतकी ओरडली.पण प्रणवचं संकोची,प्रौढ झालेलं मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं.तेवढ्यात हर्षा पुढे आली.प्रणवचा हात धरुन तिने त्याला अंगणात खेचलं.त्याचे दोन्ही हात धरुन ती त्याला नाचवायचा प्रयत्न करु लागली.तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करु लागला.मग कसा कुणास ठाऊक त्याला तसं भिजण्यात आणि नाचण्यात खूप आनंद वाटू लागला.

पावसाची सर आली तशी निघून गेली.पण त्या पंधरावीस मिनिटात सगळ्या सृष्टीवर चैतन्य पसरवून गेली.हर्षा मुलांना घेऊन आत गेली.तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला.

“मुलांनो बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलून घ्या”

मुलं बाथरुममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टाँवेल घेऊन आली. ओलेत्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खुप गोड दिसत होती.

“हे घ्या. डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या “त्याच्या हातात टाँवेल देत ती म्हणाली.त्याने टाँवेल घेतांना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं.

“खूप मजा आली आज हर्षू पावसात भिजून.असंच मला शिकवत रहा आयुष्याचा आनंद घ्यायला.शिकवशील ना?”

प्रत्युत्तरात ती लाजून हसली तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला.

“माझी गोड गोड बायको. मला तू खूप आवडतेस”

 – समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

— लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग राठौर ! पॅरा एस.एफ.!

नकळत काही अपराध घडल्यामुळे देवलोकातून शाप दिला जाऊन मृत्यूलोकात ढकलल्या गेलेल्या आणि शापाचा  कालावधी आणि नेमून दिलेलं कर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा देवलोकात सन्मानाने प्रवेश दिल्या गेलेल्या गंधर्वांच्या कथा आपण ऐकल्या असतीलच !

मृत्यूलोकातल्या अशाच एका आधुनिक गंधर्वाची ही रोमांचकारी कथा. त्यांचं नाव मेघ सिंग…. 

मेघ सिंग राठौर……एक पक्का राजस्थानी राजपूत लढवय्या ! जन्म मार्च १९२२, म्हणजे आजपासून शंभर वर्षांपूर्वीचा. मेघ सिंग तारुण्यात पदार्पण करताच सेनेत भरती झाले. तो काळ ब्रिटिश राजवटीचा. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या फौजेत असताना ‘गनिमी कावा’ पद्धतीने लढून जपान्यांच्या सैन्याला नाकी नऊ आणण्याचा, जखमी होण्याचा, युद्धबंदी बनून दिवस काढण्याचा मोठा अनुभव गाठीशी बांधून, पुढे स्वातंत्र्यानंतर मेघ सिंग अर्थातच भारतीय सेनेत अधिकारी बनले. कालांतराने लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावर असताना एका बटालियनचे नेतृत्व करते झाले.

लष्करी भाषेत एखादा अधिकारी एखाद्या अपराधाबद्दल चौकशीच्या फेऱ्यात अडकला की त्याला ‘to come under cloud’ असं म्हटलं जातं. साहेबांचं नाव मेघ, आणि त्यांच्या बाबतीत वापरल्या गेलेल्या इंग्लिश वाकप्रचारातील शब्द ‘क्लाऊड’ म्हणजेही मेघ (ढग) हा एक योगायोगच म्हणायचा !   

लष्करी न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावरून मेघ सिंग साहेबांचा हुद्दा मेजर असा केला…. शिक्षा म्हणून. आणि त्यांना एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीवर धाडले. वर्ष होते १९६५. 

१९६२ मध्ये चीनकडून प्रचंड फसवणूक आणि लाजीरवाणा पराभव पत्करल्याने भारतीय सैन्याचे मनोधैर्य काहीसे खचलेले होते. याचा फायदा घेऊन पाकिस्तानने, १९४७ मध्ये वेषांतर करून कश्मिरमध्ये आक्रमण केले होते, तसेच पण उघड आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले. चवताळलेल्या भारतीय सैन्याने अनेक आघाड्यांवर पाकड्यांवर कुरघोडी करत आणली होती. परंतू काही ठिकाणी ते आपल्याला वरचढ होऊ पहात होते. भारताचा सर्वथैव अविभाज्य भाग असलेलं कश्मीर हातून निसटतं की काय अशी शंका निर्माण व्हावी, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात सैन्य असं काहीही होऊ देणार नव्हतं !

पण आपण पारंपारिक पद्धतीने युद्ध करीत होतो. शत्रू आपल्या हद्दीत आला की त्याला त्याच्या सीमेत पिटाळून लावायचे. शत्रू आपल्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना त्याला त्याच्याच प्रदेशात घुसून आधीच नेस्तनाबूत करण्याची अतिप्राचीन युद्धनीती आपण बहुदा बाजूला ठेवली होती.  कश्मिरच्या मोर्चावर सेनेचे नेतृत्व करीत असलेले लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेब हे आधुनिक विचार, नवीन युद्धनीती या अपरंपरागत बाबींच्या विरोधात अजिबात नव्हते. त्यासाठी ते गरज पडली तर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊनही निर्णय घेण्याच्या पक्षात होते.

पदावनत करण्यात आलेल्या आणि अगदी सेनेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करावी अशा निर्णयाप्रत आलेल्या आपल्या ह्या कथानायकास, मेजर मेघसिंग साहेबांना, युद्धाची परिस्थिती पाहून प्रशिक्षण संस्थेतून पुन्हा युद्धभूमीवर जाण्याचे आदेश प्राप्त झाले ! एका सैनिकास आणखी काय पाहिजे असते? मेजर मेघ सिंग साहेब थेट लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना भेटले आणि आपण पाकिस्तानात घुसून, आपल्या सीमेत घुसलेल्या त्यांच्या सैन्याच्या मागे जाऊन त्यांच्यावर प्रतिआक्रमण करण्याचा विचार मांडला. आणि हे काम मी करतो, मला त्याचा पुरेसा अनुभव आहे, असे पटवून दिले…  

मेघसिंग साहेबांचा सैनिकी इतिहास ठाऊक असलेल्या हरबक्षसिंग साहेबांनी त्वरित तशी व्यवस्था केली. आणि यासाठी त्यांनी शासकीय परवानगी घेण्याची औपचारिकता विचारात घेतली नाही. तेव्हढा वेळही नव्हता. आणि आपण आक्रमण करायचे नाही, या आपल्या राष्ट्राच्या सर्वसामान्य विचारप्रणालीच्या ते विरुद्ध समजले जाण्याचीही शक्यता होतीच.   

हरबक्षसिंग साहेबांनी मेघसिंग साहेबांना सांगितलं होतं, ” यशस्वी होऊन आलात तर मी माझ्या हातांनी तुमच्या खांद्यावर तुमच्या बढतीच्या हुद्द्याचं पदक लावेन !”

अपमानाचा डाग धुऊन काढण्याची आंतरीक इच्छा असलेला सच्चा सैनिक ही संधी कशी सोडेल? मेघ सिंग साहेबांच्या अंगी आता दहा हत्तीचं बळ एकवटलं. त्यांनी भारतीय सैन्याच्या पायदळातून त्यांना हवी तशी माणसं काळजीपूर्वक निवडून घेतली, त्यांना केवळ एक दोन आठवड्याचं प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण जरी कमी कालावधीचं वाटत असलं तरी शत्रू प्रदेशात हलक्या पावलांनी घुसून प्रचंड विध्वंस घडवून आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या माणसाकडून दिले गेले होते, हे विसरता कामा नये ! 

या सैनिकांच्या जथ्याला एक अनौपचारीक नाव दिले गेले…. ‘मेघदूत फोर्स !’ मेघ सिंग साहेबांची मेघदूत सेना ! या सेनेच्या बहाद्दर जवानांनी पाकिस्तानी प्रदेशात खोलवर घुसून त्यांच्या अनेक लष्करी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून त्यांचे प्रचंड नुकसान केले. मागून अचानक आणि अगदी अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सेनेचे धाबे दणाणून गेले होते. असे एक नव्हे तर तीन यशस्वी हल्ले या ‘मेघ’दूतांनी केले. पाकिस्तानचे अवघे आकाश या मेघांनी काळवंडून टाकले होते ! 

आणि विशेष म्हणजे स्वत:चे फारसे नुकसान होऊ न देता. 

कामगिरी यशस्वी करून मेघसिंग साहेब मेघदूतांसह परतले… पण काहीसे लंगडत. त्यांच्या मांडीमध्ये शत्रूच्या सैनिकाची गोळी घुसून आरपार गेली होती. पण त्या जखमेची त्यांना तमा नव्हती….. दिलेली कामगिरी पूर्णत्वास नेल्याचं खास सैनिकी समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं ! 

पदमभूषण,वीर चक्र विजेते, जनरल ऑफिसर इन कमांड (वेस्टर्न कमांड १९६५) लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांनी आपल्या या बहादूराच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नलचं चिन्ह स्वत:च्या हातांनी लावलं….. गंधर्व पुन्हा देवलोकात परतला होता… ताठ मानेने !

मेघदूतांसारखा आपला असा अधिकृत सैन्यविभाग असावा, ही गोष्ट देशाचा सैन्य कारभार चालवणाऱ्यांच्या लक्षात आली. असा विभाग निर्माण करण्याचं उत्तरदायित्व अर्थातच लेफ्टनंट कर्नल मेघसिंग साहेबांच्याकडे आले… आणि त्यांनी ते निभावले सुद्धा ! 

१ जुलै १९६६ रोजी ‘नाईन पॅरा स्पेशल फोर्स’ हा विभाग अधिकृतरित्या भारतीय लष्कराचा एक अपार महत्त्वाचा भाग बनला. पॅरा म्हणजे पॅराट्रूपर्स अर्थात हवाई मार्गाने शत्रूप्रदेशात उतरणारे सैनिक ! या विभागात भारतीय सैन्यातील अपार शौर्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले सैनिक स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षणास येतात. या सैनिकांना नव्वद दिवसांच्या कठोरतम अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागते ! या सैनिकांचे आणि अधिका-यांचे सर्व हुद्दे काढून त्यांना प्रशिक्षणार्थींचा दर्जा दिला जातो. हे सर्व पूर्वप्रशिक्षित आणि अगदी तयार सैनिक असतात हे लक्षात घेतले पाहिजे ! परंतू यातील केवळ पंधरा ते वीस टक्के लोकच अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होतात.. यावरून पॅरा एस.एफ. च्या प्रशिक्षणाची काठिण्य पातळी ध्यानात यावी !

पहिले पस्तीस दिवस शारीरिक आणि कौशल्य प्रशिक्षण, यात तासनतासांचा शारीरिक व्यायामाचा, डोळ्यांवर पट्टी बांधून विविध प्रशिक्षणे घेण्याचा, हत्यारे चालवण्याचा, एखादे ठिकाण नष्ट करण्याचा सराव करण्याचा, अनोळखी प्रदेशातून, जंगलातून माग काढण्याचे प्रशिक्षण घेण्याचा, विषारी प्राणी हाताळण्याचे प्रशिक्षण, वैद्यकीय ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या, अन्न शिजवण्याच्या शिक्षणाचा आणि इतर कित्येक बाबींचा समावेश असतो. सलग चार दिवस पूर्ण उपाशी राहणे, तीन दिवसांत फक्त एक लिटर पाणी पिणे, आणि सलग सात दिवस अजिबात न झोपणे या गोष्टी अनिवार्य असतात. दहा किलो वजनाची वाळू भरलेली बॅग सतत शरीरावर बांधलेली असते या काळात. सर्व युद्धसाहित्य अंगावर घेऊन दहा, वीस, तीस आणि चाळीस किलोमीटर्स मार्चिंग करीत चालणे हे तर असतेच. 

विमानातून, हेलिकॉप्टरमधून दिवसा आणि रात्रीच्या वेळी किमान पन्नास वेळा अचूक उडी मारण्याचे प्रशिक्षण तर अत्यावश्यकच. युद्धाच्या साहित्यासह एकूण सत्तर किलोचे वजन घेऊन दहा किलोमीटर्स वेगाने चालणे ही असतेच. आपल्या सहकारी सैनिकास आपल्या खांद्यावर सलग कित्येक किलोमीटर्स वाहून घेऊन जाणे आहेच. सलग छत्तीस तासांची शारीरिक, मानसिक क्षमता चाचणी घेतली जाते. चाळीस ते ऐंशी किलो वजनाच्या वस्तू एका ठिकाणाहून उचलून विशिष्ट ठिकाणापर्यंत घेऊन जाव्या लागतात. पाण्यात बुडी घेऊन कित्येक मिनिटे श्वास रोखून धरावा लागतो, हात मागे बांधून पाण्याखाली खेचले जाते. यापैकी सोळा तासाच्या प्रशिक्षणात अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंबही दिला जात नाही. 

अशा स्थितीत स्मरण चाचण्या, परिसराचा शोध घेण्याच्या क्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातात ! त्यानंतर पुन्हा दहा किलोमीटर्स वेगाने चालणे आणि त्यानंतर सहा तास सलग व्यायाम ! शेवटी शत्रूवर लपून हल्ला करणे, इतरांनी लपून अचानक केलेल्या हल्ल्याला प्रतित्युत्तर देणे, छावण्या उभारणे, जखमी सैनिकांसाठी स्ट्रेचर्स तयार करणे, जखमी सैनिकांना सुखरूप हलवणे इत्यादी क्षमता तपासल्या जातात…. आणि हे कधी तर ….सैनिक गेली सलग कित्येक तास अजिबात झोपलेले नाहीत अशा स्थितीत !

अखेरच्या सत्रात दहा किलो युद्धसाहित्य, सात किलो वजनाची शस्त्रे घेऊन डोंगर, टेकड्यांतून, जंगलातून शंभर किलोमीटर्स धावणे…… याला तेरा ते पंधरा तास लागू शकतात ! या दरम्यान उंचावरच्या ठिकाणी लढण्याचे प्रशिक्षण तर असतेच असते. या सर्वांत टिकून राहिलेल्या सैनिकांना मग शेवटच्या टप्प्यात अतिरेकी विरोधी युद्धाचे अत्यंत खडतर प्रशिक्षण दिले जाते !……  नव्वद दिवस आगीच्या अंगाखांद्यावर खेळलेले हे सैनिकी सोनं शेवटी काय रूप घेऊन बाहेर येत असेल? केवळ अतुलनीय ! केवळ अवर्णनीय ! केवळ शब्दातीत ! 

असे असतात आपले पॅरा एस.एफ.चे जवान…. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षक ! कमीत कमी माणसांत जास्तीत जास्त मोठं आणि यशस्वी कामगिरी असे ध्येय बाळगणारे! आपल्या बडी वर, अर्थात सहकाऱ्यावर जीव ओवाळून टाकणारे, ‘हू केअर्स हू विन्स…’ म्हणजे कोण जिंकतंय याची तमा न बाळगता फक्त प्राणपणाने लढणारे! कुणी धर्म आणि जात विचारता, “पॅरा एस.एफ.” असं उत्तर देणारे ! या आणि अशा वीरांमुळेच भारत इतक्या आव्हानांना तोंड देऊनही सुरक्षित आहे!

हा अलौकीक सैन्यविभाग निर्माण करणाऱ्या वीरचक्र विजेत्या लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग साहेबांना मानाचा मुजरा! २०१० मध्ये हा मेघ काळाच्या आभाळात अंतर्धान पावला!

या विभागाचे पहिले प्रमुख लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना वंदन ! एक जुलै या स्थापनादिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व पॅरा युनिट्सना कडक सॅल्यूट आणि …. 

……  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले, – तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं. –  आताइथून पुढे)

” काय म्हणतात आमचे जिजू?” एकीने विचारलं

“मजेत आहेत ” हर्षा उत्तरली ” सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी.म्हणून तर मी इकडे आले.दादा ,वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय.आई घरी एकटीच होती.म्हणून म्हंटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती.म्हणून मग आले इकडे”

” तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालीशपणा आवडतो का गं?” दुसरीने टोचलं.हर्षाला जरा तिचा रागच आला पण तिला हे ही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नव्हता.वास्तविक ही जितकी चंचल,अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता.तिच्या सासुबाईंनी तिच्या बालीशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केलेला तिला आठवत नव्हता.

“काय माहीत!कधी बोलले तर नाहीत. कदाचित आवडतही असेल” ती जरा खट्याळपणेच म्हणाली.मैत्रीण चुप बसली.

हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रीणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली.तिने झटपट शिरा भजी करुन प्लेट्स भरुन बाहेर आणल्या

“करुनच ठेवलं होतं की काय?”एकीने विचारलं

“नाही गं!आता केलंय.गरमच आहे बघ”हर्षा हसत म्हणाली.

“मग इतक्या झटपट?”

हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता.कधीकधी ती वेंधळेपणा करायची पण खुपदा फक्कड जमून जायचं

” खुप छान झालीहेत भजी आणि शिराही” एकजण म्हणाली

“चला याबाबतीत तरी आपली हर्षू मँच्युअर्ड आहे म्हणायची”दुसरीने टोमणा हाणला.तशा सगळ्या हसल्या.

“हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते.अगदी पाचवीत असल्यापासून ती पोळ्या करायची.अजूनही तिचं नवीननवीन पदार्थ करण्याचं वेड संपलेलं नाही. नोकरी करत असतांनाही ती सुटीच्या दिवशी काहीतरी नवीन करुन सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची”

निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेने हर्षा अवघडली.

” कसं जमतं कुणास ठाऊक?आम्हांला तर रोजचा साधा स्वयंपाक करायचासुध्दा कंटाळा येतो”एक मैत्रीण म्हणाली

हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये.सदोदित उत्साहाने फसफसलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं.नोकरी करतांनाही ती आँफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची.दिवसभराचं काम चारपाच तासात पूर्ण करुन ती बाँसकडे जाऊन दुसरं काम मागायची नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची.तिच्या या वृत्तीमुळे ती बॉससकट सर्वांचीच लाडकी होती.म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला तेव्हा कंपनीने तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती.अर्थातच तिने नकार दिला होता. 

मैत्रिणी गेल्या तसं प्रियाला हायसं वाटलं.त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती.ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती.तिला त्याबद्दल खुप काही सांगायचं होतं पण मैत्रीणींना त्यात काडीचाही रस नव्हता.सध्या ती खुप पुस्तकं वाचत होती.त्याबद्दलही तिला बोलायचं होतं.पण मुलं,नवरा,सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रीणींना आवडत नव्हतं. 

संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली.मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं.झोक्यावरुन उतरतांना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघताहेत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली. 

तीन  दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली.दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रांसहून परतला.

उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या होत्या.शाळेतली मुलं कॉलन्या कॉलन्यात क्रिकेट खेळायची.हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरु होतं.भाजीबाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले.तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असतांना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची.ती बँटिंग आणि बाँलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टिममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची.हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावीळ झाली.

“ए मी खेळू का रे तुमच्या सोबत?”

तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली

“काकू हा लेडीज गेम नाहिये.तुम्हांला बँट तरी हातात धरता येते का?”एक मुलगा चेष्टेने म्हणाला तशी हर्षा उसळून म्हणाली

” तुम्ही सगळे बँटिंग करा.तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बँटिंग करेन.चालेल?”

पोरं आनंदाने तयार झाली.

बऱ्याच वर्षांनी बाँल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते.पोरं ती मस्त चोपत होती.पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटा लावला.सातही पोरांना आऊट करुन तिने बँटिंग करायला सुरुवात केली.चार पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने मग जोरदार फटके लगवायला सुरुवात केली.एक चेंडू तर तिने पार एका दोनमजली इमारतीवरुन भिरकावून दिला.पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली.

“काकू त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बाँल बसला.त्या बाँल देतच नाहीयेत.त्या तुम्हांला बोलवताहेत.तुम्ही जाऊन घेऊन या ना!”

हर्षा विचारात पडली.रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती.तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरुन तिला नाही नाही ते बोलणार हे नक्की होतं.

” जाऊ द्या मुलांनो.मी तुम्हांला पैसे देते तुम्ही नवा बाँल घेऊन या “मुलं खुष झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले.मुलं नवीन बाँल आणायला गेली.हर्षाने प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली.तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चांगलंच फैलावर घेतलं.तिच्या बालिशपणावरुन हर्षाला नाही नाही ते बोलली.

“अगं तुला काही लाजबिज वाटत नाही का त्या लहान पोरांमध्ये खेळायला?आता तरी सुधर.तू काही लहान नाही.दोन मुलांची आई आहे तू”अशी ताकीद देऊन गेली.ती गेल्यावर हर्षाला रडू आलं.एक प्रकारची विचित्र उदासिनता तिला वाटू लागली. 

संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसुम होती.केतकी आणि मिहिर काहीतरी खेळत बसले होते.हर्षा बेडरुममध्ये पुस्तक वाचत पडली होती.पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं.दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता.

“काय गं केतकी आज घरात इतकी शांतता का बरं?”प्रणवने विचारलं

” त्या मागच्या काँलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खुप बोलून गेल्या.म्हणून आई रडतेय”

” आईला बोलून गेल्या?पण का?”

केतकीने त्याला सगळा किस्सा त्याला सांगितला.प्रणवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.तो बेडरुममध्ये गेला.त्याला पाहून ती उठून बसली पण तिचा उदास,रडवेला चेहरा त्याच्या लक्षात आला.

“काय गं असा चेहरा पाडून काय बसलीयेस?”

“नाही. काही नाही असंच!”

” सांगितलं मला केतकीने सगळं.मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?”हर्षा रडायला लागली.रडतारडता म्हणाली

“सगळेच मला म्हणतात की तू लहान आहेस का लहान मुलांमध्ये खेळायला?आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या.माझी आई,वहिनी,माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात.आता मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं”

क्रमश: – भाग २… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या.ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.

“काय गं मुलींनो काय खेळताय?”

“बदाम सात”एकजण उत्तरली.

“मी खेळू तुमच्यासोबत?’’

एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या.पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली,

“हो.खेळा ना”

बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला,केतकीलाही तिने जवळ बसवलं.छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं.

“द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही.मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.

“ए असं नाही चालायचं हं.असा रडीचा डाव नाही खेळायचा”

तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.

“अगंबाई ,हर्षू तू इथे बसलीयेस?मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”

आईच्या हाकेने ती भानावर आली.

” हो आई.येतेच.बस फक्त एक डाव.”

“अगं तू भाजी करणार होतीस ना?की मी करु?बारा वाजून गेलेत.मुलांना भुका लागल्या असतील.”

” हो आई मला भुक लागलीये”

केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली

” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का!”

मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.

” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का?अगं दोन मुलांची आई ना तू?”

निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना.मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली,

“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले.आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?”

निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या.”खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.

“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”

” म्हणू दे काय म्हणायचं ते”

हर्षा थोडी चिडूनच म्हणाली.मग तिने भाजी करायला घेतली.पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढलं.

” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या.हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं.तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या.”अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता .तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले.आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते.

“आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला?त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं.

“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”

ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.

बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं,मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं,फुलपाखरं,रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो.जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं.आपण सहसा कुणावर रागवत नाही. रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’

तिला आपले काँलेजचे दिवस आठवले.फुलपाखरासारखी ती बागडायची.सगळ्यांशी ती हसून बोलायची.सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच.तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ.ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”

पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस,बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे.तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे.पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची.त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे.बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे.काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही.

“आई गं मी भातुकली खेळू?”

केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली

“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”

” हो.खेळू का?”

“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”

” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”

“मग ठिक आहे.जा खेळा”

“आई तू येतेस मांडून द्यायला?”

ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला.प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.

” हो.चल चल.आपण हाँलमध्येच बसू”

मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली.तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला.हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. 

चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला.तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या.हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.

“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”

एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.

“नाही गं ,या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”

हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं

“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”

एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला  काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली

“उत्तरा आपण उद्या खेळू हं”

उत्तरालाही ते पटलं.तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली.हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली.

“ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली

” हो खरंच.अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”

“तिची फिगर तर बघ.अगदी चवळीची शेंग वाटतेय.नाहीतर आपण पहा .सगळ्याजणी भोपळे झालोत”

सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.

“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून?आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची.ती बेबी अजून बेबीच दिसतेय “

परत एकदा सर्वजणी हसल्या.  

हर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.

गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत.सासू,सासरे,नणंदा,नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते.दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या.मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं.तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती.तिला संगीत आवडायचं.विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची.तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.

क्रमश: – भाग 1… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print