☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आमची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. तिच्या खेडोपाडी बदल्या व्हायच्या. मग माझे वडील त्या गावात जास्तीत जास्त चांगले घर भाड्याने मिळवायचे आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचे. वडिलांची जिल्हा बदली व्हायची आणि आईची गावागावात. त्यामुळे आम्ही सगळे फक्त शनिवारी रविवारी एकत्र यायचो.
ज्या गावात राहत आहोत त्या गावातल्या चांगल्या दुकानात आई किराणाचे खाते काढायची. एक दोनशे पानी वही केलेली असायची. तिला आम्ही किराणा वही असे म्हणायचो. किराणा वहीच्या सुरुवातीच्या पानावर आईचे नाव पत्ता लिहिलेला असायचा. फोन नसल्यामुळे फोन नंबरचा प्रश्नच येत नव्हता. पहिल्या पानावर ||श्री|| असे लिहून खाली क्रमवार किराणाची यादी केली जायची. महिन्याचा किराणा एकदम भरण्याची पद्धत होती. त्यानंतर एखादी गोष्ट संपली तर पुन्हा वहीत लिहून सामान आणावे लागायचे.
आणलेल्या सामानासमोर त्याची किंमत लिहून त्याखाली त्याची टोटल मारून किराणा दुकानदार सही करायचा. दर महिन्याला पगार झाला की आई त्याचे बिल चुकते करायची. घरोघरी अशा किराणा वह्या असायच्या आणि किराणा भरायची हीच पद्धत होती. दर महिन्याला किराणाच्या पिशव्या घरी आल्यानंतर आई त्या स्वच्छ जागी ठेवायची. त्याच्या भोवती पाणी फिरवून हळदीकुंकू वाहायची आणि नंतर सामान डब्यात भरले जायचे. दर महिन्याला डबे घासून सामान भरायची पद्धत होती. आम्ही भावंडे किराणा सामानातले कपड्याचे आणि अंगाचे साबण काढून त्याची गाडी गाडी खेळायचो. साबण रॅकमध्ये जाईपर्यंत हा खेळ सुरू राहायचा.
थोडक्यात किराणा आणणे हा सुखकारक सोहळा असायचा. यादी लिहिण्यापासून ते सामान डब्यात जाईपर्यंत शेंगदाणे मुरमुरे गूळ खोबरे मनसोक्त तोंडात टाकायला मिळायचे.
आई जेव्हा किराणाच्या पिशव्यांची पूजा करून हात जोडायची त्यावेळी मी सुद्धा तिच्याबरोबर हात जोडायची. आईच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव दिसायचा. कष्टाने मिळविलेल्या अन्नाचा सन्मान करणे आणि त्याला सांभाळून वापरणे हा साधासुधा संस्कार होता. बोधीच्या जन्मानंतर किराणा भरल्यावर मी पूजा करताना छोटा बोधी पण हात जोडायचा आणि डोके जमिनीवर टेकवून पिशव्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर तोही सामानातले साबण काढून गाडी-गाडी खेळायचा….
अन्न ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. अन्न मिळाल्यानंतर मनुष्याला आनंद होणे साहजिक आहे. अन्न जेव्हा कष्ट केल्यावर मिळते तेव्हा सात्विक आनंद होतो. तृप्तता मिळते. जेव्हा अन्न भ्रष्टाचाराने किंवा अयोग्य मार्गाने किंवा एखाद्याला लुटून मिळते तेव्हा ते अन्न आरोग्य आणि शांतता देऊ शकत नाही.
दुसऱ्यावर अन्याय करून किंवा भ्रष्टाचाराने मिळवलेले अन्न खाल्ल्यानंतर अन्नदोष निर्माण होतो. असे अन्न रोग आणि मानसिक त्रास निर्माण करते. कलह आणि लसलस निर्माण करते. असले अन्न खाताना संपूर्ण घरदार एकमेकाकडे चोरटेपणाने किंवा संशयितासारखे पाहत असते.
आपण अन्न तयार केल्यानंतर त्यातले चार घास दुसऱ्याला देण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते. भुकेल्याच्या मुखात चार घास दिले तर घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. म्हणून भारतीय दर्शनात अन्नदानाला फार महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान तुमच्यातली दुसऱ्याची भूक जाणण्याची क्षमता विकसित करते. तुम्हाला माणूस म्हणून जगायला मदत करते.
लॉकडाऊन च्या काळात तर लोकांना किराणा सामानाचे महत्त्व फारच पटले. त्याकाळी भीतीपोटी लोक दुप्पट किराणा भरू लागले. किराणा दुकान उघडल्याबरोबर पटकन सामान आणून ठेवू लागले. गरजूंना गावोगावी किराणाचे किट वाटले गेले. खरोखरच किराणा सामानाला आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. महिन्याचा किराणा एकदम घरात येणे हे संसारातले फार मोठे सुख आहे. दिवाणखान्यातले महागडे डेकोरेशन किंवा भारी-भारी शोभेच्या वस्तू हे घराचे सौंदर्य नसून, गहू, तांदूळ, साखर, डाळींनी भरलेले डबे हे घराचे खरे सौंदर्य आहे.
घरात शिधा भरलेला असला तरच कुठलीही बाई शांत चित्ताने राहू शकते. अन्नाची विवंचना संपल्याशिवाय कुठल्याही स्त्रीचे मन स्थिर होऊ शकत नाही. आपल्याला कोणी अन्न दिल्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आभार मानले पाहिजेत
दिलेल्या अन्नाचा कृतज्ञतेने स्वीकार करावा कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते तुमचा पिंड पोसते. अन्न फक्त रक्त धातू मांस मज्जा इतकेच निर्माण करते असे नाही तर भावना आणि विचारसुद्धा अन्नातूनच निर्माण होतात. हे अन्नाला पूर्णब्रह्म मानण्यामागचे खरे कारण आहे. म्हणूनच सात्विक अन्न खाल्ल्यानंतर मिळणारी तृप्ती आणि शांतता याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
अन्न बाह्यस्वरूपी निर्जीव दिसत असले तरी ते शरीरात गेल्यानंतर ऊर्जा निर्माण करते. अन्नामध्ये पोटेन्शिअल एनर्जीचा मोठा साठा असतो. जिवंत शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची अन्नात क्षमता असते. अन्न जेव्हा बीज रूपात असते आणि मातीत पेरले जाते त्यावेळी ते पुन्हा नवीन अन्नाची निर्मिती करण्याइतके सक्षम असते.
अन्न हे पूर्णब्रह्म हे अगदी खरे आहे
लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ओडिशात गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर ओडिशामध्ये काही ठरवलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी बाहेर पडलो. ओडिशातल्या बालेश्वर इथं एका पत्रकार मित्राकडं जेवणानंतर पायी आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघालो. आईस्क्रीम खात आम्ही एका बाकावर बोलत असताना एक व्यक्ती बाजूला क्लासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट हिंदीमधून त्या समोर बसलेल्या युवकांना सांगत होती.
त्या शिकवणाऱ्या माणसाला मला भेटायचं आहे, असं मी त्या पत्रकार मित्राला म्हणालो. तो पत्रकार मित्र आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन तो बाहेर आला आणि मला म्हणाला, ‘‘शिकवणारे आमच्या भागातलेच उपविभागीय अधिकारी आहेत. आपण क्लास सुटला की, त्यांना भेटू.’’
क्लास सुटला, आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी बोलताच क्षणी त्यांच्या लक्षात आले, मी महाराष्ट्राचा आहे असा. बोलण्यातून त्यांचा चांगला परिचय झाला. माझ्याशी बोलणारे ते अधिकारी अवघ्या २८ वर्षांचे होते. ते यूपीएससी पास होऊन ओडिशामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते.
प्रथमेश अरविंद राजेशिर्के असं या अधिकाऱ्याचं नाव. ते कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी या गावचे. आम्ही दोघेजण बोलत होतो. प्रथमेश यांचा सर्व प्रवास थक्क करणारा होता.
प्रथमेश व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. प्रथमेशही दवाखान्यामध्ये अभ्यास करत होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे घरी बसून परीक्षा देण्याशिवाय प्रथमेश यांना पर्याय नव्हता. या काळात एका मित्राच्या माध्यमातून ‘सारथी’ या पुण्यामधल्या शासकीय संस्थेची माहती मिळाली. शिक्षणासाठी मुलांचा खर्च पूर्णपणे उचलला जातो, असं प्रथमेश यांना कळालं.
प्रथमेश ‘सारथी’च्या परीक्षेला बसले. ती परीक्षा पास झाले. त्यांना ‘सारथी’मुळे तेरा हजार रुपये दर महिन्याला मिळत गेले. दिल्लीच्या क्लासची संपूर्ण फी ‘सारथी’ने भरली होती. प्रथमेश म्हणाले, ‘‘मी ‘सारथी’चे प्रमुख असलेले काकडे सर यांना भेटलो. त्यांनी दिलासा दिला. माझ्या आजारपणातही ते माझ्यासोबत होते.
माझ्या आयुष्यात ‘सारथी’चा दोन अर्थाने महत्त्वपूर्ण वाटा आहे. एक माझ्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक साह्य करून मला उभं केलं आणि दुसरं जबरदस्त असे मार्गदर्शन, मेंटॉरशिप दिली. जर त्या काळामध्ये ‘सारथी’ने मला हात दिला नसता तर मी आणि माझ्यासारखे कित्येक मित्र कदाचित घरीच राहिले असतो. ’’
मी प्रथमेशला म्हणालो, ‘‘तुम्ही ओडिशाच का निवडलं?’’
प्रथमेश म्हणाले, ‘‘मला आदिवासी बांधवांची सेवा करायची होती. इथल्या अनेक युवकांना मला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचं होतं. ते मी केलेही. मी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं, ही माझ्या वडिलांची फार इच्छा होती; पण जेव्हा माझा यूपीएससीचा निकाल लागला, तेव्हा ते सगळं बघायला वडील नव्हते. ’’ वडिलांच्या आठवणींमध्ये भावनिक झालेल्या प्रथमेश यांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला निघालो. ‘सारथी’ इतक्या मोठ्या प्रमाणात काम करते, हे मला माहिती नव्हतं.
ओडिशा इथून मला कामानिमित्त थेट पुण्याला जायचं होतं. शनिवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचलो. काही जणांना भेटण्यासाठी मी त्यांची वाट पाहत होतो. प्रवीणदादा गायकवाड, राहुल पापळ, विलास कदम, अशी सगळी मंडळी आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. बोलता बोलता मी प्रवीणदादा यांच्याकडे सारथीचा विषय काढला. प्रवीणदादाने मला सारथीच्या कामाविषयी भरभरून सांगितलं. मी वारंवार ज्या सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सरांविषयी उल्लेख करत होतो, त्या काकडे सरांविषयी प्रवीणदादा गायकवाड खूप चांगले सांगत होते. त्यांनी काकडे सरांना फोन लावून माझ्याकडे फोन दिला.
मी अत्यंत नम्रपूर्वक त्यांना माझी ओळख सांगत मला तुम्हाला भेटायचं आहे, अशी त्यांना विनंती केली. त्यांनी मला सकाळी भेटायला या असं सांगितलं.
फोन ठेवल्यावर प्रवीणदादा म्हणाले मराठा, कुणबी समाजाच्या मुलांच्या भविष्य, करिअर यासाठी सारथी सारखा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट काळाची गरज बनला होता. मराठा, कुणबी समाजामध्ये सारथीमुळे शिक्षणाचे प्रमाण खूप वाढलं. युपीएससी, एमपीएससी मध्ये सरकारी नोकरीमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली. सारथीने प्रमाणपत्र, आर्थिक मदत, मार्गदर्शन या स्वरुपात शाब्बासकी दिल्यामुळे नववी पासून मुलं अभ्यासाकडे वळली. त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. आई-वडील तिकडे वळले. मुलांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा लागली. जयंती, पुण्यतिथीच्या नावाखाली वर्गण्या मागणारे मुलं एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला जायचे असे म्हणू लागले. त्यासाठी सारथीने सर्व आर्थिक मदत केली. त्या सर्वांसोबातची आमची बैठक संपली.
मी बाणेरला गेस्ट हाऊसला गेलो. ‘सारथी’वर आलेले अनेकांचे लेख वाचून काढले. बातम्या, अनेकांनी केलेले संशोधन मी वाचलं. मराठा, कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात २०१८ मध्ये मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्यात मराठा समाजाच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी मागणी होती. या मागणीतून अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील, दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीस या अभ्यासू अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’ची सुरुवात केली. दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये दारिद्र्याच्या गाळामध्ये फसणाऱ्या मराठा, कुणबी समाजातील मुलांचे ‘सारथी’मुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागलं.
‘सारथी’चा चार तास अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, ‘सारथी’ने मागच्या चार वर्षांत चार लाखांपेक्षा अधिक तरुणाईचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं. मी या कामामुळं प्रचंड भारावून गेलो. तेवढ्या रात्री मी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, त्यांचे अभिनंदन केले. त्यांनीही मला प्रतिसाद दिला. देवेंद्र यांनी ‘सारथी’च्या माध्यमातून झालेले सामाजिक काम, भविष्यामध्ये ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाचा होणारा उद्धार त्याचे नियोजन अगदी नेमकंपणानं माझ्यासमोर ठेवलं.
सकाळी लवकर उठून ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची भेट घेण्याचं ठरवलं. काकडे सर (९८२२८०८६०८) यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बाहेर एक व्यक्ती झाडाला पाणी घालत होती. एकीकडे ते बगिचा साफ करत होते तर दुसरीकडे झाडांना पाणी घालत होते.
‘‘काकडे सरांचं घर इथंच आहे का?’’ असं मी त्यांना विचारलं, त्यांनी होकाराची मान हालवली. हातामध्ये असलेलं पाणी झाडांना घातलं. हात धुतले आणि डोक्याचा लावलेला रुमाल काढत त्यांनी हात पुसले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सकाळचे संदीप काळे का?’’ मी म्हणालो, ‘‘हो. ’’ ‘‘या आतमध्ये. मीच काकडे. ’’ मला काही क्षण आश्चर्य वाटलं. आम्ही आतमध्ये गेलो.
काकडे सर यांच्या पत्नी शरदिनी नाश्ता घेऊन आल्या. त्यांनीही मला खुशाली विचारली. मी ‘सारथी’विषयी ऐकलं होतं. जो ‘सारथी’विषयी अभ्यास केला होता, त्याच्या पलीकडे जाऊन मला काकडे सरांनी ‘सारथी’चे अनेक पैलू सांगितले. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं ‘सारथी’ सुरू झाली त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम इथं उभं राहिलंय.
काकडे सरांनी काही पत्रं माझ्यासमोर ठेवली आणि ती मला वाचायला सांगितली. ती पत्र खूप भावनिक होती. कोणाच्या आई, वडील, बहिणीचं, कुण्या यशस्वी झालेल्या युवक- युवतींची ती पत्रे होती. तुम्ही ‘सारथी’च्या माध्यमातून मदत केली नसती तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं? काम करून शिकणं एवढं सोपं नव्हतं? योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिलं. काकडे सर तुम्हीच आई-बाबा झालात, असं त्या पत्रातला मजकूर सांगत होता. ती पत्रं नव्हती, तर लाखो यशस्वी झालेल्या तरुण मनांचा हुंकार होता.
मराठा आणि कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने २०१८ ला सुरू झालेले सारथी प्रामुख्याने शेती करणाऱ्या मराठा, कुणबी समाजासाठी उपयोगाला आली. नांदेडला जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या आयएएस काकडे सर यांची मुद्दाम ‘सारथी’साठी निवड केली गेली.
एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या काकडे सर यांचे वडील वामनराव शिक्षक होते. आई सुभद्रा गृहिणी होत्या. शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी काकडे सर यांनी काहीतरी करावं, असं त्यांच्या आई-वडिलांना नेहमी वाटायचं. त्यांच्या अनेक ठिकाणच्या विशेष कामगिरीतून ते दिसलंही. पण सारथीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कित्येक मुलांना मिळालेला लाल दिवा पाहायला काकडे सर यांचे आई-वडील आज नव्हते याचे मलाही खूप वाईट वाटत होते.
मी आणि काकडे सर ‘सारथी’कडे निघालो. रस्त्याने जाताना पुन्हा काकडे सर ‘सारथी’च्या शाबासकीचा महिमा मला सांगत होते. मागच्या चार वर्षांत पाचशे एक्कावन तरुण एमपीएससी परीक्षेमध्ये अव्वल ठरले. तर या चार वर्षांमध्ये यूपीएससीमध्ये ८४ तरुणांनी जबरदस्त यश संपादन केलं. केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरवूनही मेरीटमध्ये नंबर न लागणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’ने हेरलं आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार केला. नववीपासून ते वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत ‘सारथी’ मध्ये कितीतरी प्रकारच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.
अनेक व्यक्ती, अनेक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते ‘सारथी’च्या कामांमध्ये वेळ देत आहेत. परवा लागलेल्या एमपीएससी, यूपीएससीच्या निकालामध्ये बारा मुलं आयएएस झाले, तर अठरा मुली आयपीएस झाल्यात. आता ‘सारथी’ अजून विस्तार करत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र यासाठी भर देत आहे.
काकडे सर यांच्याकडे इतक्या यशोगाथा होत्या, इतके अनुभव होते की, ते एका लेखांमध्ये मांडणे मला शक्य नव्हतं. रविवार असूनही आज ‘सारथी’ला काकडे सर यांना भेटण्यासाठी आलेली मुला-मुलींची संख्या कमी नव्हती. त्या मुला-मुलींमध्ये अनेक पालक असे होते की, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यातल्या अनेकांनी हातामध्ये काकडे सरांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हार आणले होते. काकडे सरांनी ‘सारथी’ मधून मला अनेक गरीब, शेतकरी, मजूर, वडिलांची मुलं असणाऱ्या आयपीएस, आएएस यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. त्यांचं म्हणणं एकच होतं, ‘सारथी’ने मदत केली नसती तर आमच्या आयुष्यामध्ये हा सोन्याचा क्षण आला नसता.
मी काकडे सरांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला निघालो. काकडे सरांनी निघताना मला छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र भेट म्हणून दिले. पुस्तकाच्या कव्हरवरचे शाहू महाराज पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले. त्या ‘सारथी’च्या प्रत्येक कामात मला शाहू महाराज दिसत होते.
शासनाचा एखादा उपक्रम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा कसा असू शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण माझ्यासमोर ‘सारथी’ होते. शासनाचे अनेक प्रकल्प आहेत, त्यात प्रचंड पैसा असून काय करता? केवळ उपक्रम आहे, असं म्हणून चालत नाही, तर ते राबवणारे डोके सक्षम पाहिजे. काकडे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून ती सक्षमता तिथे मला दिसत होती.
आपल्या अवतीभोवती पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारे असे अनेक उपक्रम असतील, त्या प्रकल्पाला तुम्ही-आम्ही सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे, बरोबर ना.. !
☆ “किस्से कोर्टातले…” – लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆
किस्से कोर्टातले…
“जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान…”
सध्या पितृपंधरवडा चालू आहे. आपल्या पितरांना / पूर्वजांना सद्गती मिळावी असा विश्वास असणारे पक्ष विधी करत असतात.
मात्र दरवर्षी पितृपंधरवडा सुरू झाला की एक जुनी केस आठवते..
आई – वडील गेल्यावर श्राद्ध पक्ष करा किंवा करू नका, पण ते जिवंत असताना तरी त्यांच्याशी नीट वागणे जास्त महत्वाचे आहे हे लक्षात येते.
आमच्याकडे एक केस होती. आई – वडिलांचा स्वतःचा बंगला होता आणि त्यात ते सुखाने राहत होते. मुलगा त्याच्या नोकरीसाठी त्याच्या कुटुंबाबरोबर परदेशी राहत होता.. मध्येच त्या मुलाला PhD करायची होती आणि त्याची फी खूप जास्त होती.. म्हणून त्याने आई वडीलांमागे टुमणे लावले की बंगला विकून त्याचा हिस्सा द्यावा. आई – वडिलांनी परोपरीने त्याला सांगितले की त्यांच्या मृत्यूनंतरच तुलाच ही मिळकत मिळेल, अशी भांडणे कशाला करतो आणि हा बंगला त्यांनी अत्यंत कष्टाने बांधला आहे, तिथे उत्तम बाग केली आहे, त्यांच्यानंतर तो त्यालाच मिळेल, पण व्यर्थ.. मुलाचे सल्लागार त्याची बायको आणि बायकोचे भाऊ..
मुलाने आम्हाला सल्ल्यासाठी फोन केला. मी म्हटले तुम्हाला आवडेल असा सल्ला देता येणार नाही, तर योग्य तो सल्लाच देईन आणि तो असा की आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये मुलांना काही हक्क नसतो..
मुलाने आई वडिलांशी संबंधच तोडून टाकले, ना फोन ना काही, आई-वडील वेड्या आशेने नातवंडांच्या फोनची वाट बघायचे..
नंतर सुमारे ७-८ महिन्यांनी वडील आजारी पडले आणि गेले आणि नंतर लगेचच आई पण गेली, पण एकाच्याही आजारपणाला किंवा अंत्यविधीला हे चिरंजीव ” कार्यबाहुल्यामुळे” येऊ शकले नाहीत !!
नंतर एक – दोन वर्षांनी गणपतीच्या सुमारास त्या मुलाचा मला फोन आला की, ” सर मी पितृपंधरवड्यामध्ये पुण्याला येतोय, मला तुम्हाला भेटायचे आहे.. ” त्या प्रमाणे तो आला आणि विचारले की आई वडिलांनी काही विल करून ठेवले आहे का? मी सांगितले माझ्याकडे तरी नाही.. पण मी विचारले की अहो, तुम्ही आता अचानक कसे काय आलात, आई वडील गेल्यावरही आला नाहीत ?
तो म्हणाला, ” अहो काय सांगू, You know I’m trying hard for PhD admission but not been able to get through for some or the other reason… आणि आता बंगल्याचे पण काहीतरी करायला हवे ना ? “
नंतर म्हणाला, “अजून एक कारण आहे.. खरे तर माझा या श्राद्ध पक्ष या गोष्टींवर काही विश्वास नाही.. पण अहो गेले काही महिने आमच्याकडे सतत आजारपणे, माझ्या नोकरीत भांडणे, PHD admission मध्ये अडचणी, असे प्रकार चालू आहेत. मग माझ्या बायकोने तिच्या आईच्या सांगण्यावरून कोणाला तरी ऑनलाईन पत्रिका दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितले की आई वडिलांचे श्राद्ध, पिंडदान केले तरच हे प्रकार थांबू शकतील, म्हणून आता बायकोच्या हट्टाखातर आलोय ” असे तो म्हणाल्यावर मी निःशब्द झालो..
मनात म्हटले, “Poetic Justice किंवा कर्माचा सिद्धांत म्हणतात तो हाच की काय ? आई वडील जिवंत असताना त्यांच्याशी भांडायचे, त्यांचे अंत्यदर्शन घ्यायलाही यायचे नाही आणि आता हे प्रकार करायचे. “जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान” ही म्हण आज प्रत्यक्षात बघितली.. असे किंवा त्यासारखे प्रकार कोर्टात घडताना दिसतात आणि नात्यापेक्षा पैशाला किंमत जास्त आहे असे दिसून येते.. पण असे करून सुख किंवा मानसिक शांतता लाभते का ?
मला तरी या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते… What goes around comes around हे खरे.
लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
योगिनी सकाळी लवकरच उठली. आज वर्षश्राध्द होतं ना तिचं…! चोच घासली, पंख फडफडवले आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी…
वर्षभरापुर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिनं सगळ्यांचा. तसा कारभार लवकरच आटपला होता तिचा. क्षुल्लक आजाराचं निमित्त झालं. मग एकात एक दुखणी. वर्ष-दीड वर्ष अंथरुणात… आणि एक दिवस सकाळी खेळ संपला!
अगदी भरल्या संसारातून उठावं तसं झालं. मोठी २० वर्षांची आणि धाकटी १७ वर्षांची. म्हटलं तर दोघी सज्ञानच… पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा.
मोठी जगन्मित्र… सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा. बहुधा घराबाहेरच बराचसा वेळ. अभ्यासात तशी हुशार… पण फारसं लक्ष नसायचं तिचं अभ्यास करण्यात. ‘hi mom… bye mom…’ केलं की पायात सॅन्डल्स सरकावून स्कूटीला कीक मारून पोरगी पसार!
कधी घरात सापडलीच, तर चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोय नाही… ‘मॉम्, प्लिज लेक्चर नको!’ मित्रपरिवार चांगला असला तिचा, तरी या वयात नको ती आकर्षणं काय कमी असतात का? मग योगिनी चिंता करत बसायची.
धाकटीचं तंत्र वेगळंच… ती अगदीच घुमी होती. सगळ्यात अलिप्त. तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितलं, ना कधी दु:ख… तिच्या मनात काय चालू आहे, याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही.
कधी कधी योगिनीला वाटायचं, ही आपलीच मुलगी का…? कसलाच संवाद नाही तिच्याशी! योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुधा… कारण तोही असाच अलिप्त, कोरडा. ऑफिसात पाटी टाकून घरी आला की, बराचसा वेळ टिव्ही बघण्यात, सोफ्यावर लोळण्यात जायचा त्याचा.
डोंबिवली–चर्चगेट प्रवास करून, दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची, तरी हा सोफ्यावरच…! तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही. योगिनी होती म्हणून चार माणसं जोडून होती. नातेवाईकांचं येणं-जाणं, रीतीप्रमाणं देणं-घेणं, कार्याला हजेरी, कुणाचं हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसे, मुंज, लग्न… सगळे हिनंच बघायचं.
योगिनी आता घराकडे झेपावली… मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली होती ती. जरा कानोसा घेतला किचनच्या खिडकीत बसून, पण काही हालचाल दिसेना.
‘काव… काव…’ करत, पंख सावरत, कठड्यावरून चालत योगिनी हॉलच्या खिडकीपाशी आली. फोटो दिसला तिचा भिंतीवर… हार घातलेला.
नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर… ‘अंगानं भरली ही…’ धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली. घर तसं टापटीप दिसत होतं. ती जाताना जसं होतं तसंच… तिनं लावलेल्या तुळशीनं पण चांगलाच जोम धरला होता.
खिडकीबाहेर कपडे वाळत घातले होते. अगदी एका रेषेत… सुरकुतीसुद्धा नाही! योगीनीला जरा नवलच वाटलं. इतका टापटीपपणा ना कधी नवऱ्यानं दाखवला, ना कधी मुलींनी…! श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना. योगिनी हिरमुसली.
जरासंच पुढं माहेर होतं तिचं… आई थकली असेल, वाट बघत असेल… योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली. तिची आवडती जागा होती ती. तिथं बुचाचं गच्च भरलेलं झाड होतं. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा.
आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला… हातात ताट घेवून थबकत आई कठड्यापाशी आली. नजरेनंच खूण पटली…
“घे बाई, भरपेट खा… तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेयत. केळ्याची कोशिंबीर आणि साय-भात… तुला आवडतो तस्साच. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेनं काळजी घेते. मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी… मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमानं होतायत… आणि जावईबापूसुद्धा जातीनं कुकर लावतात. अगदी बेसिक, पण थोडा स्वयंपाकही करतात…
“श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज होऊ नकोस. तुझी मोठी… तुला आवडणारा शिरा घेऊन सकाळीच गेलीये अनाथाश्रमात मुलांना वाटायला… धाकटीनं तुला आवडणारं बटमोगर्याचं रोप लावलंय आज अंगणात…
“घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची… तू होतीस म्हणून सगळे लाडावलेले होते. मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस, त्या वळणानं हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा…
“आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”
लेखिका : स्वाती नितीन ठोंबरे
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
(आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.) – इथून पुढे—
यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखेच सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत. जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.
समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.
“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”
किंवा
“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।
‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”
आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!
म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध करुन दिले आहेत. मुळात मन प्रसन्न का करायचे? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. ? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि
आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.
सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.
आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.
१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते
२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.
३. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.
४. मी आजपासून दृढनिश्चय केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.
५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.
६. सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.
समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.
अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.
आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.
एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.”
हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे.
म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’
आता पक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितरांचं स्मरण करायचं.. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.
श्राद्धपक्ष करायचं. गोडधोड करायचं. पितरांच स्मरण करून तर्पण करायचे… म्हणजे त्यांना तृप्त करायचे..
त्यासाठी आई वडील सासू सासरे …. यांच्या बद्दल लेख लिहून झाले.
मनात विचार आला … फक्त पितरंच कशाला? पितरांप्रमाणेच आपल्याला प्रेम, माया, स्नेह देऊन ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्यांची थोडीशी आठवण काढू…
म्हणून हा माढ्याच्या काकूंवर लेख लिहिला – – – –
… लग्न होऊन मी पुण्यासारख्या शहरातून सोलापूर जवळच्या माढा या छोट्याशा गावात गेले. हे तिथल्या स्टेट बँकेत नोकरीला होते. एका डॉक्टरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. डॉक्टरांच्या आईंना काकू म्हणत असत. त्यांचा मला मोठा आधार वाटायचा. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकले.
वाड्याच्या दरवाज्याच्या दारात एक मोठा आडवा कट्टा होता. संध्याकाळ झाली की त्या कट्ट्यावर काकु येऊन बसायच्या. आसपासच्या बायका गप्पा मारायला यायच्या. जाणारे येणारे थांबून बोलायचे.
गावात लायब्ररी होती. पुस्तकं बदलायला, भाजी आणायला मी संध्याकाळी बाहेर जात असे. येताना काकु म्हणायच्या … ” ये बैस थोडावेळ “
तो कट्टा म्हणजे गंमतच होती. अनुभवानी मला तर त्या कट्ट्याच वेडच लागलं. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं.
चार घर पलीकडे टाकून असलेली कमला लहान बाळाला घेऊन आली. “काकु बघा ना. हा नुसता रडतोय झोपतच नाहीये. “
” अग जरीची कुंची घातलीस टोचतीय बाळाला. “
” माझ्या आईनी शिवलीय”
” म्हणून काय झोपताना घालशील? जा साध टोपडं घेऊन ये”
काकुंनी कुंची काढली. पदरानी बाळाचा चेहरा, मान पुसली. पेपर घेऊन वारा घालायला लागल्या.. काही वेळातच बाळ गाढ झोपलं. जरा वेळाने येऊन ती बाळाला घेऊन गेली.
एक वेडसर मुलगा कधीतरी यायचा.
” ये बस ” काकुंनी म्हटलं की तो जमिनीवरच बसायचा. आत जाऊन त्याला पोळी, भाजी एखादं गोड काही असेल ते घेऊन यायच्या. मला म्हणाल्या,
” अशी माणसं देवाची असतात बघ.. देवानंच त्यांना असं घडवले. त्यांचा कधी राग राग करू नये. मनाने निर्मळ आहे ग ते लेकरू”
एक अतिशय सुंदर, शालीन बाई जरीची साडी नेसलेली डोक्यावरून पदर घेतलेली रस्त्याने जाताना काकुंना ” बऱ्या आहात का “?म्हणाली
” हो मी बरी आहे”
” जरा देवीला जाऊन येते. “
“ये हो”
मी म्हटल “किती सुंदर आहेत ह्या बाई. कोण आहेत”
“तू नवीन आहेस. तुला अजून काही माहित नाही. “
तेवढ्यात एक बाई म्हणाली.. ” खूप मोठं घर आहे तिचं… आणि हंड्या, झुंबर आहेत तिच्या घराला “
मी म्हटलं ” कधीतरी बघायला पाहिजे “
लगेच काकु कडक आवाजात मला म्हणाल्या, ” खबरदार काही बघायला जायची जरूर नाही. तिच्या घरी कधी जायचं नाही. पाटलाची रखेल आहे ती. “
… मी एक धडा घेतला.
पलीकडच्या घरातली नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. ” काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालंय. सासुबाई गावाला गेल्यात. काय करू?”
” चार बटाटे उकडून भाजीत घाल. तिखट, कूट घाल. “
” पण त्यानं वाढीव भाजी होईल.. ”
” उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घाल आणि त्याची थालीपिठं कर “
“चांगली होतील का “?
“अग करून तर बघ. आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात”
दुसरे दिवशी ती सांगत आली, ” सगळ्यांना थालपीठं फार आवडली. कोणाला काही कळलं नाही. अगदी तुला मला झालं. “
…. संसाराला सुरुवात करतानाच अन्नाचा मान राखायचा, वाया घालवायचं नाही. हा संस्कार तिला मिळाला आणि मलाही…
एके दिवशी मी खाली कट्ट्यावर गेले नव्हते. शेजारची बायडी मला बोलवायला आली.
” खाली चला काकूंनी तुम्हाला बोलावलंय. बायजा येणार आहे. “
कोण बायजा मला कळेना. खाली गेले तर कट्टा फुल भरलेला होता. खाली मातीत सुद्धा बायका बसल्या होत्या. एक साधीशी बाई डोक्यावरून पदर घेतलेली…. तीच बायजा ओटीवर बसली होती. मला फारच उत्सुकता लागली. सगळ्या जमल्या तस काकूंनी तिला सांगितलं
” हं कर सुरू “
बायजानी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग सुरेल आवाजात म्हटले. एक जण म्हणाली,
” ए ते जनीच गाणं म्हण ना, तुझं ते गाणं आम्हाला आवडत. “
मग जनाबाईची गाणी झाली. गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या बायजानी म्हणून दाखवल्या.
आज वाटतं तेव्हा त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. सगळ्या तिचे कौतुक करत होत्या.
… नंतर लक्षात आलं की तिथे एका गायिकेचा लाईव्ह कार्यक्रम सादर झाला होता. जाणारे येणारे पण ऐकत उभे होते. काकुंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला…
“देवानी आवाजाची देणगी दिली आहे तुला. भाग्यवान आहेस बघ. ” बायजानी काकूंना वाकून नमस्कार केला. बायजाच्या कलेचा छोटासा सन्मान त्यांनी केला. इतरांना त्याचा आनंद दिला… किती गोड कल्पना… एखाद्याच्या कलेला कशी दाद द्यावी हे मी शिकले.
काकूंचा मुलगा डॉक्टर होता. पण पेशंट काकुंनाच औषधं विचारायचे. घरगुती उपायांची तर त्यांच्याकडे पोतडीच होती.
गुराखी, रात्री येणारा रामोशी जाताना दिसला की त्याला जवसाची, तिळाची, दाण्याची चटणी दे. नाहीतर जे काही घरात असेल ते त्याला बोलवून त्या द्यायच्या.
माझ्या मुलाला आनंदला पहिला भात त्यांनीच भरवला. काकुंनी सांगितलं
“लहान लेकराला सारखं घरात ठेवू नये. सगळीकडे न्यावं म्हणजे लेकराला काही बाधत नाही. “
आज लक्षात येतं … मुलांची प्रतिकारशक्ती सहज कशी वाढवायची हे काकूंनी मला शिकवलं.
ही जुनी जाणती माणसं म्हणजे चालती बोलती ज्ञानाची पुस्तकं असतात. हे आज लक्षात येतं.
जगात वावरताना लागणाऱ्या अनेक गोष्टी नकळतपणे मी त्या कट्ट्यावर शिकले.
रोज काहीतरी तिथं नवं घडत असायचं. कधी तरी काकू एकट्या पण असायच्या…
सुनेला भाकरी करता येत नाही अशी तक्रार करण्याला बाईला त्या म्हणाल्या.. ” लोकाची पोर आपल्या घरी आली आहे. आता ती आपली झाली आहे. घे सांभाळून… पुरुषांच्या चार भाकरी तू कर. तिच्या तुटक्या भाकरी तुम्ही खा. हळूहळू शिकेल ती पोर… “
त्यांच इतकं सहज सोपं तत्वज्ञान होतं. प्रश्न फार पुढे जाऊ द्यायचेच नाहीत. तिथल्या तिथे उपाय सांगायच्या…
अशी निर्मळ मनं, प्रेमळ नाती अनुभवायला मिळाली आजही काकू… आणि त्यांचा तो कट्टा स्मरणात आहे.
एकदा काकू एकट्याच कट्ट्यावर होत्या. म्हटलं
“आज कोणी नाही तर तुम्हाला करमत नसेल ना ?”
तर म्हणाल्या, ” सांगू का तुला.. कोणी नसेल ना तर मी आपला ‘श्रीराम जय राम जय जय राम ‘ जप करत बसते. तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ. ”
असं खरखुरं अध्यात्म काकू जगत होत्या……
“ साधं सोपं जगणं हीच श्रीमंती आहे. ”.. हे काकूंच्या वागण्यावरून मी शिकले. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात. आणि आयुष्यभर लक्षात राहतात. ही माणसं आयुष्यात आली हे माझ भाग्यच..
… आज त्यांच्या आठवणीने गहिवरूनच आलं आहे … थांबते आता इथं….
☆ “सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?”☆ श्री संभाजी बबन गायके☆
(मारता, मारता.. मरे तो झुंजणारा कमांडो ! )
03-00-01-10… Three Overs-No Maiden-One Run-Ten Wickets.
ज्यांना क्रिकेटची भाषा समजते त्यांना वरील आकडेवारीचा अर्थ निश्चित समजेल. इतरांसाठी सांगतो… तीन षटके गोलंदाजी केली, त्यातील एकही षटक निर्धाव गेले नाही.. एक धाव दिली आणि दहा बळी घेतले! एकाच डावात सर्वच्या सर्व गडी बाद करायचे म्हणजे दहा बळी घ्यायचे, असे क्रिकेट इतिहासात आजवर केवळ तीन वेळा घडले आहे. १९९९ मध्ये अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती आणि त्याची ही कामगिरी अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
– – – पण लढाईच्या मैदानावर खरोखरच्या कसोटीत दहा बळी घेणा-या आणि त्या प्रयत्नात स्वत:ही बळी गेलेल्या एका श्रेष्ठ सैनिकाची कहाणी लोकांच्या लक्षात नाही, कारण ती कुणाला ठाऊक नाही… म्हणून हा एक अल्प प्रयत्न!
वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकीत, आरंभी साधा शिपाई म्हणून सैन्यात भरती झालेला तो नौजवान स्वयंस्फूर्तीने PARA SF म्हणजे PARACHUTE SPECIAL FORCE च्या नवव्या रेजिमेंट मध्ये २००२ मध्ये दाखल झाला आणि बघता बघता लान्स नायक पदावर पोहोचला.
स्पेशल फोर्स खरेच नावाप्रमाणे विशेष असते. यांतील निवड प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. आधी निष्णात Parachute Diver (हवाई छत्रीच्या साहाय्याने विमानातून उडी मारणारे) व्हावे लागते, नंतरच्या अधिक कठीण प्रशिक्षणात इतर भयावह कामांसह काही तासांत शंभर किलोमीटर्सचे अंतर पायी पार करायचे, त्यात खांद्यावर दहा किलो वजन आणि सात किलो वजनाचे शास्त्र वाहून न्यायचे, अशी अनेक आव्हाने असतात. थोडक्यात सांगायचे तर, ह्या गटात सामील होऊन ‘Balidaan Badge’ मिळवायला वाघाची छाती, सिंहाची हिंमत, हत्तीचे बळ, घोड्याचे चापल्य आणि पाषाणाचे काळीज लागते. हा मान मिळवण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्केच सैनिक स्पेशल ठरतात! याचाच अर्थ उत्तमातून सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. आणि यातील एक सैनिक गमावला जाणे, म्हणजे देशाची केवढी मोठी हानी होते, हे लक्षात घेतले जावे!
भारताच्या इतर सीमांच्या तुलनेत पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू काश्मीर येथील सीमेवर गेली कित्येक वर्षे काही न काही घडत असते. याच भागातून पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसतात आणि स्थानिक युवकांना हाताशी धरून, भडकावून भारत देशविरोधी कारवाया करतात. या अतिरेक्यांना रोखून धरण्याचे काम राष्ट्रीय रायफल्स सारखे सैन्य विभाग करीत असतात. PARA Special Force चे commandos सुद्धा इथे तैनात असतात. गरज पडली तर अतिरेकी सीमेत घुसण्याच्या बेतात असताना त्यांच्या सीमेत घुसून त्यांना संपवण्याचे धाडसी कामही आपले जवान पार पाडतात. हे कमांडो छोट्या छोट्या गटांनी आपली कामगिरी बजावत असतात. आजवर सुमारे आठ हजार अतिरेकी भारतीय सैन्याने यमसदनी धाडले असून सहा हजार जणांना जिवंत पकडले आहे. आणि या प्रयत्नात शेकडो भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे…. यावरून काय ते समजावे! आजही, या क्षणीही हे छुपे युद्ध सुरु आहे. आजही आपली पोरं मारत आहेत आणि मारत आहेत! याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे.
आजचे आपले कथानायक मोहन नाथ गोस्वामी उत्तराखंड मधील नैनीताल मधील लालकुंआ जवळच्या इंदिरानगर गावात ५ मे, १९८४ रोजी जन्मले. त्यांचे वडील सैन्यातच कार्यरत होते. त्यांच्यापासून स्फूर्ती घेउन मोहन नाथ सैन्यात भरती झाले. अतिशय नीडर, शूर आणि पराक्रमी असलेल्या मोहन नाथ यांना काश्मीर मधील खरोखरची लढाई खुणावत होती. अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. २००५ मध्ये त्यांनी para sf स्पेशल फोर्सेस मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिला आणि अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करून ते 9, Parachute Battalion Commando बनले. भीती नावाचा शब्द शब्दकोशात नसलेले मोहन नाथ अगदी आरंभापासून सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर असत. दहा वर्षांत ते लान्स नायक पदावर पोहोचले. 13625566W हा त्यांचा सर्विस क्रमांक होता. खरं तर सेवाज्येष्ठ असल्याने आता त्यांना सतत प्रत्येक मोहिमेवर जाण्याची गरज नव्हती. इतर कनिष्ठ सहकाऱ्यांना ते पुढे पाठवू शकत होते. त्यांचे वरिष्ठही त्यांना तसे सुचवत… पण मोहन नाथ यांना कर्तृत्व गाजवून दाखवायचे होते.. देशासाठी शत्रूला नेस्तनाबूत करण्यात त्यांना जास्त रस होता.. ते कुटुंबियांना नेहमी सांगायचे… मरुंगा तो दस बारा दुष्मनोको मार कर!
“सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ते सिनिअर अधिकारी साहेबांस मोहिमेवर पाठवा असा हट्ट धरीत… आणि म्हणत… मी करून दाखवेन, साहेब!
आणि तसा एक नव्हे तर लागोपाठ तीन प्रसंग घडले. कुपवाडा परिसरात ६, राष्ट्रीय रायफल्स तैनात होती. 9, Para SFसुद्धा इथे सक्रीय होती. अतिरेकी शोध आणि विनाश मोहीम हाती घेतली गेली २२ ऑगस्ट, २०१५ रोजी रात्री. पाकिस्तानातून काही अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. मोहन नाथ गोस्वामी आपल्या तुकडीतील इतर कमांडो साथीदारांसह अतिरेक्यांना भिडले. या धुमाश्चक्रीत आपला एक सैनिक जायबंदी झाला. भीषण गोळीबाराची तमा न बाळगता मोहन नाथ यांनी त्या साथीदाराला खांद्यावर घेतले आणि सुरक्षित जागी पोहोचवले आणि पुन्हा मोर्चा सांभाळत ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. लगेचच २६ ऑगस्ट, २०१५च्या रात्री ते पुन्हा मोहिमेत सामील झाले आणि विजयी होऊन परतले. आणखी तीन बळी मिळवले होते! यावेळी मूळ पाकिस्तानी असलेला एक कुप्रसिद्ध अतिरेकी जिवंत पकडण्यात आपल्या सैन्याला यश मिळाले. या दोन मोहिमांमध्ये सहा अतिरेकी खलास केले गेले. २ सप्टेंबर, २०१५… तिसरी मोठी मोहीम निघाली… अर्थातच मोहन नाथ गोस्वामी सर्वांत पुढे होते…. कुपवारा जिल्ह्यातील हापरुदा येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांचा एक मोठा गट घुसल्याची माहिती मिळाली…. या लबाड श्वापदांना सापळा रचून जेरबंद करण्याची योजना होती. रात्रीचे आठ सव्वा आठ झाले असतील… अचानक चार अतिरेकी टप्प्यात आले… दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. मोहन नाथ यांचे दोन सहकारी जबर जखमी झाले.. अतिरेक्यांनी त्यांना पुरते घेरले होते आणि त्या दोघांच्या जीवाला मोठा धोका होता.. मोहन नाथ आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकारी कमांडोसह आडोसा सोडून बाहेर आले… गोळीबार सुरूच होता… चार पैकी एकाला त्यांनी अचूक ठोकले… उरलेले तीन अतिरेकी गोळीबार करीत पुढे येत असतानाच… मोहन नाथ साहेबांनी त्यांच्यावर झेप घेतली… साहेबांच्या मांडीमध्ये गोळ्या घुसल्या… पण त्याची काळजी न करता ते पुढे सरकले… त्यांनी आणखी एक बळी घेतला… त्याच्या थेट काळजात गोळी घातली… दुसऱ्याला गंभीर जखमी करून त्याला मरणपंथावर ढकलला… आता मोहन नाथ यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या… त्यांनी चौथ्या अतिरेक्याच्या अंगावर वाघासारखी झेप टाकली… त्याच्या छाताडावर गन टेकवून ट्रिगर ओढला… आणि आणखी एक अतिरेकी नरकात धाडला. पण तो पर्यंत मोहन नाथ साहेबांच्या जखमांतून प्रचंड रक्तस्राव झाला होता. या मोहिमेत त्यांनी चार अतिरेकी ठार मारण्यात मोलाची कामगिरी बजावली होती आणि शिवाय आपल्या तीन साथीदारांचे प्राणही वाचवले होते.. स्वत:चे प्राण देऊन! सलग ११ दिवसांत हाती घेतलेल्या अतिरेकीविरोधी ३ मोहिमांत commando लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी १० अतिरेकी ठार मारण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता… आणि एकाला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती! “दहा शत्रू तर नक्कीच मारीन” हे त्यांचे शब्द त्यांनी खरे करूनच प्राण सोडले…. सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है? या त्यांच्या प्रश्नाला एकच उत्तर होते.. लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी साहब… आप जैसा बहादूरही इस काम को अंजाम दे सकता है!
या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी, 9, PARA SF Commando यांना मरणोत्तर अशोकचक्र (शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान) प्रदान करून गौरवले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे.
“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बसने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये… “
“हो सासूबाई.. “
“आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना. ?”
“हो पण.. परत एकदा सांगता का, चेक करून घेते.. “
“किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल… तूप घे एका डबीत.. देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि नारळ.. थोडीशी फुलं… आलं का लक्षात??”
“हो हो सासूबाई.. “
नीरा आज ऑफिस ला उशिरा जाणार होती, महत्वाची मिटिंग होती त्यात नीरा चे sugestions वापरण्यात येणार होते… पण सासूबाईंचा हट्ट…
नीरा आणि सूरज नोकरीनिमित्त फ्लॅट मध्ये रहात होते… सासर 30 किमी वर होतं… देवीची ओटी भरायची म्हणून सासूबाई गावच्या मंदिरात जाणार होत्या, सूनबाईनेही ओटी भरावी म्हणून त्यांनी तगादा लावला.. नीरा ने सासूबाईंच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांना प्राधान्य दिलं आणि तयारीनिशी ती निघाली.. धावपळ बरीच झालेली तिची…
अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..
दोघीजणी आत गेल्या… तिथे एक वृद्ध पुजारी होते… देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत.. आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..
त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..
“तुम्ही ओळखता काय एकमेकांना??”
“हो… आम्ही.. “
“ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.. “
सासूबाई तिला तोडत म्हणाल्या… सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली… नीरा गोंधळून गेली… तिला काही समजेना नक्की काय करायचं..
“आधी हळद कुंकू वाहा… अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ… एक मूठ परत घे… नारळ दे… “
नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती.. सासूबाई मधेच ओरडल्या..
“अगं ही कुठली साडी?”
“मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.. “
“अगं एक दीड हजार ची साडी आहे ती… देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी… आणि हे तुप कुठलं?”
“घरी कढवलेलं… “
“अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं… आणि ह्या बांगड्या??”
“माझ्याच… नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.. “
सासूबाई डोक्याला हात लावतात… देवीला हात जोडतात, “देवी माते… सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.. “
गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..
“देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.. “
“काय?”
“होय… तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या… देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे… पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला… हेच महत्वाचं असत… एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही… तसंच आहे हे… आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते… “
सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय.. आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.
लेखिका : संजना सरोजकुमार इंगळे
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(म्हणजे फक्त मीच आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, ना माझ्यासारखे कोणी आले आहे ना माझ्यासारखे कोणी येणार आहे. ना भूतकाळात असे काही घडले आहे, ना भविष्यात असे काही घडणार आहे!)
वरील अवतरण गान सरस्वती लता मंगेशकरवर सर्वोपरी उचित रूपाने लागू होते. लता मंगेशकरला शास्त्रीय संगीताचा वारसा महान नाट्यअभिनेता गायक तिचे पिता दीनानाथ मंगेशकर यांच्या कडून मिळाला. लहानग्या लताच्या गायनी कळा दीनानाथांनी ओळखल्या आणि तेव्हापासून तिचा जो रियाज सुरु झाला तो अविरत सुरूच राहिला. शास्त्रीय गायन करण्याची संपूर्ण क्षमता असूनही पित्याच्या अकाली निधनानंतर तिचे वडिलांकडून संगीतदीक्षा अधुरी राहिली. सिनेक्षेत्रात पदार्पण केल्यावर देखील प्रतिभावान गुणी संगीतकारांनी तिचे हे शास्त्रीय संगीतातील प्राविण्य ओळखून तिला अशा कांही संगीतरचना बहाल केल्या की पट्टीचे संगीतकार देखील अवाक झाले. बडे गुलाम अली खान आणि बेगम अख्तर सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी तिला खूप नावाजले आणि तिच्या या स्वरगंधाराची मुक्त कंठाने तारीफ केली.
मंडळी, लता मंगेशकरवर लिहिणे म्हणजे एखाद्या समुद्रातील रत्ने शोधून त्यांचे मूल्यमापन करणे सोपे, पण लताने गायलेल्या हजारो गाण्यांपैकी कांही निवडक गाण्यांवर लिहिणे त्यापेक्षा दुष्कर कार्य आहे. म्हणूनच या लेखात शास्त्रीय संगीतावर आधारित अशा माझ्या आवडत्या निव्वळ तीन गाण्यांविषयी चर्चा करीन. शास्त्रीय संगीत शिकलेले नसतांना देखील माझ्यासारखी अज्ञ व्यक्ती हे लिहायचे धाडस करीत आहे, कारण लता आमच्या हृदयात सदैव अक्षय संगीतप्रेमाचे प्रतीक अशी लतादीदी म्हणूनच अमर आहे.
पहिले गाणे आठवले ते ‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’ हे ‘हमदर्द’ (१९५३) सिनेमातले गाणे, गायले आहे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी! चार कडवी चार शास्त्रीय रागात बांधली आहेत बुजुर्ग प्रतिभावान संगीतकार अनिल बिस्वास यांनी! हे चार राग आहेत (क्रमश:) राग गौड़ सारंग (ग्रीष्म ऋतू) , राग गौड़ मल्हार (वर्ष ऋतू), जोगिया (शिशिर ऋतू ) आणि बहार (वसंत ऋतू!) एका मुलाखतीत लताने सांगितले की अनिलदा आमचे ‘मास्टरदाच’ होते. वरील गाण्याच्या रिहर्सल मन्ना डे आणि लता जवळपास दोन आठवडे करीत होते. म्हणूनच हे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेगीतांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे असे मला वाटते. एक अजून माहिती मिळाली की यातील सारंगी पं.रामनारायण यांनी वाजवली आहे. शेखर आणि निम्मी या कलावंतांवर हे गाणे चित्रित झाले. हमदर्द सिनेमा कांही खूप गाजला होता असेही नाही, पण प्रेम धवन, अनिलदा, लता आणि मन्ना डे यांनी हे गाणे अजरामर करून ठेवले. मन्ना डे यांची शास्त्रीय गाण्यांवर किती मजबूत पकड होती हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.
अनिलदांनी तिला संगीतातले खूप बारकावे समजावून सांगितले. श्वास सोडतांना माईकवर तो कसा जाणवू द्यायचा नाही, हे अनिलदांनीच शिकवले. म्हणूनच कठीण आणि दीर्घ ताना घेतांना लता मध्ये कुठे श्वास घ्यायची हे कोडेच आहे. इतके मात्र वाचले होते की बऱ्याच गाण्यात लता नेमका कुठं अन कसा श्वास घेते हे शोधण्यात बऱ्याच नवोदित गायिकांचे आयुष्य खर्ची पडले, पण दुर्दैवाने त्यांना उत्तर मिळाले नाही. आमच्यासारखे रसिक या भानगडीत पडत नाहीत, सरळ गानशारदेला नमन करायचं, अन गाणं जी भरके एन्जॉय करायचं.
दुसरे एकमेकाद्वितीय गाणे, सौतेला भाई (१९६२) मधले, यातला हाच एक सगा करिष्मा! लता किती म्हणून रियाज करत असावी याची साक्ष देणारे, शास्त्रीय गायक जे तासनतास गाऊन साध्य करत असतील किंवा नसतील ते या ३-४ मिनिटात लताने साध्य केलंय. ती शास्त्रीय गायन करत होतीच, माध्यम वेगळे होते इतकेच. ‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’ (राग सहाना बहार) हेच ते अजरामर गाणे, लताच्या रागदारीवर आधारित गाण्यांपैकी एक बेहतरीन पेशकश! पडद्यावर दोन कथक नृत्यांगना, राणीबाला अन रत्ना या दोन दुधारी तलवारीसारख्या, नृत्य काय तर टिपिकल मुजरा, त्यांच्या जीवघेण्या दिलकश अदा, अदब, तहजीब, नृत्याभिनय, इत्यादी इत्यादी तर आहेतच, त्यांच्या कात्रीत सापडलेला नायक गुरुदत्त, पण या सर्वांना पुरून उरलेला लताचा जलप्रपातासारखा अक्षरशः अंगावर कोसळणारा स्वर! स्वरानंदाच्या तुषारात चिंब भिजवणारा! दोन नृत्यांगनांसाठी लताच्या स्वराविष्काराचा वेगवेगळा लहेजा! वाह क्या बात है! तिच्या ताना ऐकून अवाक व्हायला होते. गाण्यातील जादूभरले शब्द शैलेंद्र यांचे आणि संगीत माझे प्रिय संगीतकार अनिलदा यांचेच!
तिसरे माझे अत्यंत आवडीचे गाणे म्हणजे ‘जा जा रे जा बालमवा!’ हे हिंदी सिनेमातील सर्वसामान्य पठडीतला मुजरा या शीर्षकांत मोडणारे गाणे. चित्रपट ‘बसंतबहार’ (१९५६), पडद्यावर तेव्हाचा नामी खलनायक चंद्रशेखर आणि त्याला भुलवत मुजरा सादर करणारी कुमकुम! मंडळी, मला वाटते की या कुमकुमच्या सुंदर रूपाचा अन अभिनयाचा म्हणावा तितका उपयोग फिल्म इंडस्ट्रीने केला नाही. नेहमी दुय्यम स्थानावरील सहनायिकाच राहिली ती. पण हे गाणे बघाल तेव्हां ही कसलेली अभिनेत्री होती याची आपल्याला खात्री पटेल. या गाण्यात लताचा फिरत घेणारा स्वर्गतुल्य कोमल स्वरगंधार, शैलेंद्र यांचे प्रसंगानुरूप दिलखेचक शब्द, शंकर जयकिशन यांचे राग झिंझोटीवर आधारित एक नंबरचे लाजवाब संगीत तर आहेच, पण कुमकुमचा नखरा, तिचा बोलका चेहरा, भावविभ्रम आणि जबरदस्त शास्त्रीय नृत्याची जाण या गाण्याला अस्मानात घेऊन गेली. या गाण्यातील लताच्या स्वरांचा तो अद्भुतरम्य हँगओव्हर गाणे संपल्यावरही कमी होत नाही हा माझा नेहमीचा अनुभव!
मैत्रांनो, अशी सर्वांगसुंदर गाणी यू ट्यूब वर बघायची सोय आहे हे आपले परम भाग्यच! बघा ना चित्रपट चालो अथवा न चालो, ही गाणी रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपाने विराजमान झालीत. श्वेत- श्याम रंगात असूनही या गाण्यांनी आपल्या आयुष्यात आनंदाचे किती रंग भरले त्यांची गणतीच नाही. म्हणूनच आजच्या निमित्याने या गाण्यांची चर्चा करावीशी वाटली!
२८ सप्टेंबरच्या लताच्या जन्मदिनाचे निमित्य साधत या स्वरशारदेच्या दिव्यचरणी ही भावशब्दसुमने अर्पण करते!💐
( टीप- वरील तीन गाण्यांची लिंक जोडत आहे. लिंक न उघडल्यास गाण्याचे शब्द यू ट्यूब वर टाकावेत.
☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – १☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!! चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.
अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.
आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो. दिवसभरातील प्रेम, माया, मोह, जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!
कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविकच त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.
देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.
जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा. मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !! आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.