आज एकादशी त्यामुळे मला दोन तीन वर्षापूर्वी घेतलेलं विठुरायाचे दर्शन आठवले.. तोबा गर्दी मध्ये सुध्दा मिळालेलं vip दर्शन आणि त्या सभा मंडपात बसून विठुराया सोबत मारलेल्या गप्पा आठवल्या.. पांडुरंगाची ती शांत मूर्ती डोळ्यात साठवत किती तरी मनीची गुपित त्याला सांगितली होती.. आणि माझ्या प्रत्येक वाक्यावर त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव बदलत आहेत असा होणारा भास सुखावत होता..
आजही बऱ्याचदा मला ते तासभर घेतलेलं दर्शन, त्या गप्पा आणि ती मूर्ती कित्येकदा डोळ्यासमोर येते आणि नकळत डोळे पाणावतात.. मला विठ्ठल भेटला तर ? हा प्रश्नच कधी डोक्यात आला नव्हता.. कारण माझ्यापुरता तो सावळा मला रोज वेगवेगळ्या रूपात भेटतो ह्याची अगदी खात्री आहे.. कधी बागेत फुलणाऱ्या फुलांमध्ये, कधी बरसणाऱ्या सरींमध्ये, कधी वाऱ्याची मंद झुळूक बनून, तर कधी वाहणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये तो असतोच.. कधी मन उदास असेल तर, कधी आनंदाने नाचत असेल तर तो माझ्या सोबत असतोच असतो.. आमच्याकडच्या देव्हाऱ्यात तो आहेच पण त्याहून सुंदर असं रूप माझ्या मनात आहे असं मला सतत जाणवतं राहतं..
पण तो जर कधी अगदी पांडुरंग रुपात तो माझ्यासमोर उभा राहिलाच तर मात्र मी त्याला सांगणार आहे हो.. बाबा रे त्या रखुमाईला अशी एकटीच उभी नको करुस हो.. तिचा रुसवा काढून तिला मनव आणि तुझ्या सोबत तिला घे, तुझ्या बाजूलाच ती जास्त शोभून दिसते.. आणि खरं सांगू का पांडुरंगाची ती एकटी मूर्ती मला नाही पाहवत.. ती अगदीच केविलवाणी वाटते.. पण तेच रखुमाई सोबत असताना त्या विठूरायाचे मुखकमल अगदी उजळून निघालेलं असतं.. तो रखुमाईसोबत जास्त आनंदी वाटतो.. तेंव्हा जर तो सावळा मला कधी भेटलाच तर हे एक मागणं मात्र नक्की मागणार आहे मी.. कृष्ण जसा राधेशिवाय अपूर्ण वाटतो तसचं विठ्ठलासोबत रखुमाई हवीच हवी.. तिच्याशिवाय तो अपूर्णच भासतो मला..
आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन.. तर तुम्ही काहीही म्हणालात तरी मला ते दोघे सोबतच हवेत असं वाटतं.. येवढं एकच मागणं त्या पांडुरंगाकडे मागेन.. आणि त्याला ही ते पूर्ण करावंच लागेल.. स्वतः साठी किंवा अजून कोणासाठी काहीही मागायच नाहीय मला, कारण तो न मागताच बरंच काही देऊन जातो.. कधी कधी तर पात्रता नसतानाही इतकं काही देतो की माझी झोळी अपुरी पडते.. तेंव्हा ‘ हे पांडुरंगा जर कधी भेटीचा योग आलाच तर माझ्या रखुमाईला ही सोबत घेऊनच ये हो.. ‘
☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का ! ‘ उज्ज्वला घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,
`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन. ‘
आण्णांनी `ठीक आहे. ‘ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय, तो बाप-लेकीतला, किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो, गुरु-शिष्यामध्ये.
कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने, इतकेच नव्हे, तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्या उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!
आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले. स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, अशा असहाय्य, परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली, तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्या आणि वसतिगृहात राहणार्या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार, उमेद, उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.
आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी, कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस. एस. सी. ची परीक्षा झाल्यावर, तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना, कधी भावाला. असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला, कुणालाच कळलं नाही.
आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस. एस. सी. चा काय उपयोग? तू डी. एड. हो. ‘ नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी. एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं. ‘
उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच, म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा, तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.
बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची, जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘ आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली, तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.
१९७७मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहीशी झाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.
काही जणांना एक सवय असते. चित्रपट सुरु झाला.. टायटल्स संपले की मग आत.. म्हणजे थिएटर मध्ये जायचे. टायटल्स काय बघायचे असा त्यांचा समज असतो.
पण टायटल्स बघणंही बर्याच वेळा खुप इंटरेस्टिंग असतं. उदाहरणार्थ.. शोले. त्याची टायटल्स.. त्यावेळचं आरडीचं म्युझिक.. सगळंच अफलातुन होतं.
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यातुन बरीच वेगळी, रंजक माहिती आपल्याला मिळत असते. नवकेतन फिल्मस् ही देव आनंद, विजय आनंद यांची निर्मिती संस्था. त्यांच्या काही चित्रपटाच्या टायटल्स मध्ये.. उदा. गाईड.. ज्वेलथीफच्या टायटल्स मध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून नाव येते यश जोहर यांचे.
काही काळाने मग याच यश जोहर यांचे टायटल्स मध्ये नाव झळकते ते ‘निर्माता’ म्हणून. आणि तो चित्रपट असतो.. दोस्ताना.
असेच एक निर्माते.. बोनी कपुर. त्यांचा चित्रपट सुरु होण्याआधी.. टायटल्सच्याही आधी स्क्रीनवर फोटो येतो.. गीताबालीचा. बोनी कपुर, अनिल कपुर यांचे वडील म्हणजे सुरींदर कपुर. फार पुर्वी ते या क्षेत्रात नवीन असताना गीताबालीचे सेक्रेटरी म्हणून काम करत. त्यावेळी गीताबालीने त्यांना खुप मदत केली होती. त्याची जाण ठेवून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची सुरवात होते ती गीताबालीच्या प्रतिमेपासुन.
अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटातुन एकत्र कामे केली. त्यावेळी विनोद खन्नाचा आग्रह असे.. टायटल्स मध्ये अमिताभ पुर्वी त्याचे नाव यावे.. कारण तो सिनिअर होता. पण कधी त्याचे ऐकले जायचे.. कधी नाही.
संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल काम करायचे.. अगदी सुरुवातीच्या काळात. त्यावेळी टायटल्स मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या नावालाच स्वतंत्र फ्रेम मिळावी असा कल्याणजी आनंदजी यांचा आग्रह.. आणि मोठेपणाही. नावात महत्त्व मिळाल्याने उमेद मिळते.. विश्वास वाढतो असं त्यांना वाटे.
आपल्या मुलाला.. म्हणजे कुमार गौरवला लॉंच करण्यासाठी राजेंद्र कुमारने चित्रपट बनवला.. लवस्टोरी नावाचा. त्याचा दिग्दर्शक होता.. राहुल रवैल. चित्रपट पुर्ण होत असतानाच निर्माता या नात्याने.. आणि वडील याही नात्याने राजेंद्र कुमारने काही बदल सुचवले. पण राहुल रवैलनै त्याला स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरुन मग राजेंद्र कुमारने टायटल्स मधुन त्याचे नावच कट केले. ‘लवस्टोरी’ पडद्यावर झळकला.. पण दिग्दर्शकाच्या नावाविनाच.
‘नावात काय आहे?’ असं म्हणतात सगळेजणंच.. पण नावात खुप काही आहे.. किंबहुना नावातच सर्व काही आहे हेही सगळेजण जाणतात.
आणि हे जाणुन होता काशिनाथ घाणेकर. आपल्या नाटकाच्या श्रेयनामावलीत.. आणि थिएटरमध्ये होणाऱ्या अनाउंन्समेंटमध्ये आपले नाव सर्वात शेवटी यावे हा आग्रह त्याने शेवटपर्यंत ठेवला. थिएटरमधील अनाउन्समेंट मध्ये तर आपले नाव ऐकण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता.. आतुरता पहाण्यासाठी तो स्वतः आतुर असे. सर्व कलाकारांची नावे सांगुन झाल्यावर.. शेवटी मग नाव येई..
माझा मोठा मुलगा लहान असताना दोनच वर्षांनी झालेल्या त्याच्या धाकट्या बहिणीला झोका देताना हे गाणं म्हणत असे! त्याचे ते गोड, थोडेसे बोबडे शब्द ऐकताना मला खूप छान वाटत असे!
प्रत्येक लहान मुलाला झोक्याचं खूप आकर्षण असतं. अगदी छोटं असताना पाळण्यात झोपलेल्या बाळाला झोके देताना मनामध्ये उठणारे वात्सल्याचे तरंग बाईला अनुभवता येतात! झोक्याच्या तालावरती गाणं म्हणताना, अंगाई गीत गाताना आईला होणारा आनंद अवर्णनीयच असतो. हा तर मोठेपणचा अनुभव!
पण आपल्या प्रत्येकाचं बालपण हे असं झोक्याशी बांधलेलं असतं! प्रथम पाळणा, नंतर झुला, झोपाळा
यावर झुलता झुलता आपण कसं मोठं होतो कळतच नाही! माझ्या आठवणीतलं अजूनही आजोळी गेल्यावर माजघरात बांधलेला झोपाळा हे माझं आवडतं ठिकाण होतं! मामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपाळ्याचे झोके किती वर्ष घेतले असतील हे आठवलं की अजूनही वाटतं तो बालपणीचा झोपाळा आपला खरा सवंगडी आहे! सुदैवाने अजूनही वयस्कर असलेला माझा मामा आजोळी गेले की हे लाड पुरवतो!
… आपल्या मनाची स्पंदनं म्हणजे एक लयबद्ध झोका असतो. मनात उमटणारे विचार तरंग एखाद्या झोक्याप्रमाणे लयबद्धपणे मागेपुढे होत राहतात. आणि आपोआपच मूड चांगला येतो… आणि लिखाण होते. माझ्या बाल्कनीत बांधलेला झोका हा माझा खूप आवडता आहे. तिथून दिसणारे मोठे ग्राउंड, तिथे असणारी गुलमोहराची झाडे तसेच बहाव्याची आणि इतरही मोठी झाडे, त्यावर बसणारे पक्षी, वरचेवर होणारे भारद्वाजाचे दर्शन हे सर्व माझे झोक्यावरून दिसणारे साथीदार आहेत….
“खोप्यामध्ये खोपाबाई सुगरणीचा चांगला… ” या गीतात बहिणाबाई सुगरणीच्या खोप्याचं वर्णन करतात आणि तो झाडाला टांगलेला कसा असतो तो आपल्या नजरेसमोर उभा राहतो. अशी झुलणारी त्यांची घरं पाहिली की खरोखरच तो झाडाला टांगलेला बंगलाच वाटतो!
फार पूर्वी प्रत्येक घराला एक झोपाळा असेच असे. दुपारच्या वेळी घरातील एखादे आजी आजोबा त्या झोपाळ्यावर विश्रांती घेत असत, तर संध्याकाळच्या वेळी घरातील बालगोपाळांना झोक्यावर बसून परवचा, पाढे, शुभंकरोती म्हणण्यासाठी जोर येई! झोक्याच्या तालावर आणि वेगावर मोठमोठ्याने पाढे म्हणण्यात खूप मजा येत असे.. हळूहळू घरं लहान झाली आणि हा माजघरातला झोपाळा दिसेनासा झाला!
मग कुठे लहान बाळासाठी दाराला बांधलेला छोटासा झोका दिसे किंवा झोळी बांधलेली असे… हे आपलं दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं वाटे!
पूर्वीच्या काळी मोठ्या वाड्यातून पितळी कडी असलेला सागवानी झोपाळा म्हणजे घराचे वैभव असे.
घरात मोठी माणसं नसली की स्त्रिया झोपाळ्याचा आनंद घेत. एरवी झोपाळा म्हणजे घरातील मोठ्या माणसांचे विरंगुळ्याचे ठिकाण आणि ते नसतील तेव्हा लहान मुलांचे बागडायचे हक्काचं स्थान!
मनामध्ये येणाऱ्या विचारांचं वर खाली येणं हा तर मनाचा झोका! त्याची आवर्तन किती उंच जातील सांगता येत नाही. ‘आता होता भुईवर, भेटे आभाळाला’असं त्याचं अस्तित्व!
“एक झोका… एक झोका.. चुके काळजाचा ठोका, एक झोका…. “
“.. चौकट राजा” या सिनेमात स्मिता तळवलकर यांनी या झोक्याचा कथेसाठी फार सुंदर उपयोग करून घेतलेला आहे!
एखाद्या छोट्या अपघातामुळे एखाद्याचे आयुष्य कसे बदलून गेले, ही गोष्ट त्या सिनेमांमध्ये इतकी आर्ततेने दाखवली आहे की संपूर्ण चित्रपट भर ती झोक्याची आंदोलनं मनामध्ये फिरत राहतात! अजूनही आठवणीतल्या सिनेमांमध्ये हा दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर यांचा झोका रुतलेला आहे…
नागपंचमीचा झोका हा पूर्वीपासूनच मुलींच्या खेळाचे आवडते ठिकाण असे. अजूनही लहान गावातून खेड्यापाड्यातून झाडाला मोठे-मोठे झोके बांधून झोके खेळले जातात, त्यामुळे मनाला तर आनंद मिळतोच पण आपली शारीरिक क्षमता ही वाढवली जाते! नागपंचमी च्या
निमित्ताने माझा मनाचा झोका ही मस्त झोके घेऊ लागला आणि एकेका झोक्याबरोबर आठवणी ही मनात झुलू लागल्या…
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
मनातलं शब्दात..
असलेली नाती जपणं माणसं जोडणं, केव्हां कुणाची गरज लागेल सांगता येत नाही या धोरणांनी मैत्री वाढवणं, ही भावना मनांत जपणारी अशी ती पिढी होती. सहकार्याची वृत्ती असल्यामुळे आपआपसांतलं प्रेम वाढत होत. प्रिय मित्र आपल्या बरोबरीने चालत राहून, सगळ्या परिस्थितीत आपल्याला साथ देतात. तीच खरी मैत्री असते हो ना ?अशा आदर्श मैत्रीची जोडी आमच्या आईची आणि शांतामावशिची होती. खेरवाडीला चौथीपासून सुरू झालेली त्यांची मैत्री ऐंशी वर्षापर्यंत टिकली. म्हणजे सातव्या वर्षापासूनची मैत्री अतूट पणे 80 वर्षापर्यंत त्यांनी टिकवली. दोऱ्यात ओवलेलं साध मणी मंगळसूत्र आईच्या गळ्यात असायचं तर, शांतामावशी नखशिखांत सोन्याने मढलेली असायची. लष्करमधलं तिचं राजेशाही घर आमचं आकर्षण होत. ‘भरपूर चाला आणि फिट राहा ‘ हा कानमंत्र आईनानांनी आमच्या मनांत बालपणापासूनच रुजवला. बसचे दहा पैसे वाचवून लष्करला जाताना आई आमच्या हातात हरबऱ्याची गड्डी ठेवायची आणि म्हणायची, “हरबरा खात खात पायी जायचय बरं का आपल्याला.! ” लष्कर’ ह्या नावातच एक थ्रिल होतं ते ‘कॅम्प’ या शब्दाला येणार नाही. आत्ताच्या कॅम्प मध्ये जाताना अरुंद रस्ते, गर्दी, प्रदूषणामुळे होणारी गुदमर, जीव गुदमरून टाकणारा रस्ता, नक्को वाटतो. आता लोकं कायम ‘कॅम्प ‘ मध्ये खरेदी करायला दोन पायाची, दोन चाकी नाही वापरत, तर कारची चारचाकी वापरल्याशिवाय पुढे सरकत नाहीत.
तर काय सांगत होते हरबऱ्याची गड्डी घेऊन पोपटसर रंगाचे कोवळे दाणे अलगद जिभेवर ठेवून, खातांना तोंड चालायचे, दाणे सोलताना हात आणि चालताना पाय चालायचे. असा सहजसुंदर व्यायाम व्हायचा. आणि रस्ता मजेत सरसर सरायचा. जोगेश्वरी पासून सुरू झालेली आमची पावलं शिरीन टॉकीज अपोलो टॉकीजपाशी रंगीत पाट्या बघायला रेंगाळायची. पुढचं आकर्षण होतं, भोपळे चौकातल्या हेss भल्या मोठ्या लाकडी भोपळ्याचं. कवेत मावणार नाही असा भला मोठा भोपळा चौकांत कायम ठाण मांडून असायचा, ‘मेन स्ट्रीट’ वरून पळणाऱ्या चकचकीत गाड्या, मोठमोठे रस्ते आणि काउंटरवर गल्ला खुळखुळवत रुबाबात बसलेले गुलाबी, गोरे पारशी आणि त्यांच्या समोरच्या चॉकलेट, गोळ्या, क्रीमरोलने भरगच्च भरलेल्या बरण्या आमचं लक्ष वेधून घ्यायच्या. आई म्हणायची ” वेंधळ्यासारखे इकडे तिकडे बघत चालू नका. समोरून बर्फाची बैलगाडी येतीय, बैलांना द्या उरलेली हरभऱ्याची गड्डी. स्वच्छ रस्त्यावर असा कुठेही कचरा टाकायचा नसतो बरं का! . हं हे बघा! आलं आता मावशीच घर. ” … चढतांना आम्ही आरोळी ठोकायचो, “मावशी आम्ही आलो ग! “आणि मग दिलखुलास हसणारी मायसारखी माया करणारी ती माउली आम्हाला कुशीत घ्यायची. शांतामावशी आमची सख्खी मावशी नाही, आईची बालमैत्रीण आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटायचं नाही. अशी माणसं, अशी निर्मळ, कृष्ण सुदाम्यासारखी मैत्री शोधूनही सापडणार नाही. ही मावशी नवरात्रात कार मधून, नऊ दिवस नित्यनेमाने जोगेश्वरीला यायची. मारुतीच्या शेपटासारखी लांबलचक, अगदी गणपती चौकापर्यंत पोहोचलेल्या, बायकांच्या रांगेत नथीचा आकडा सांभाळत, ओटीचं ताट सावरत उभी असलेली गोरीपान शांतामावशी उन्हाने लालेलाल व्हायची, खिडकीतून डोकावणाऱ्या आईचा जीव मैत्रिणीचा चेहरा बघून कासाविस व्हायचा. माठातल्या थंडगार पाण्याचा तांब्या आणि जिभेवर विरघळणारी आलेपाक वडी आई आमच्या हातून शांतीकडे पाठवायची. गौरी गणपतीच्या वेळेला तर त्यांच्या प्रेमाला उत्साहाला भलतच ‘ ‘भरतं ‘ यायचं. आमच्याकडच्या सवाष्णीला पुरणावरणाचा स्वयंपाक करून, जेवायला घालून, आई सवाष्ण म्हणून लष्कर मध्ये जायची आईचा पदर धरून आमच शेपूट बरोबर असायचचं. तेव्हा मात्र जाताना आई टांगा करायची. टकॉक.. टकॉक घोड्याच्या टापावर चालणारा टांगा आमच्यासाठी महारथ असायचा. आईसाठी पण ‘लष्कर’ मध्ये जाणं म्हणजे आनंदाची पर्वणी होती. सगळ्यांना पोटभर जेवायला घालून शांतामावशी आईची तिला चौरंगावर बसवून घसघशीत ओटी भरून, साडी चोळी देऊन मैत्रिणीला माहेरवाशिणीचा मान द्यायची. काही वेळा सख्ख्या नात्यापेक्षाही मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात, नाही का?..
80 व्या वर्षांपर्यंत ही मैत्री अखंड चालू होती. दुर्दैवाने आमची आई आधी गेली. शांतामावशी म्हणाली, “माझी काठीच गेली आता मी कशाला जगु ? आणि खरंच भुतलावर तुटलेला धागा पुन्हा जोडण्यासाठी, मावशी पण आईच्या पाठोपाठ लगेचचं देवाघरी गेली. आणि आम्ही खऱ्या अर्थाने पोरक्या झालो. आई आम्हाला सोडून गेली, मावशी पण गेली. मनाला समजवावं लागतय, आता आई जोगेश्वरी हाच आपला आधारवड आहे. तिच्या चरणावर माथा टेकवून मी प्रार्थना करते…. “जय अंबे आई जोगेश्वरी तुझ्या मायेची पाखर सतत आम्हाला मिळू दे”.
☆ “आईची आठवण.. आणि राजा केळकर म्युझियम…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
माझी आई सौ. कमल पुरुषोत्तम कुलकर्णी ही कलाकार होती.
ती कापडाच्या बाहुल्या करत असे त्यात मणीपुरी, शेतकरीण, नववधु, भरतनाट्यम् करणारी नर्तकी असे विविध प्रकार होते. अनेक ठिकाणी प्रदर्शनात तिला बक्षीसं मिळाली होती.
ती केप्रच्या कागदाची फुले करुन त्याच्या वेण्या करत असे व तुळशीबागेतल्या दुकानात विकायला ठेवत असे. सिंधुताई जोशी यांच्या कामायनी या मतिमंद मुलांच्या शाळेत ती मुलांना अनेक वस्तू शिकवायला जात असे. आई भरतकाम आणि क्रोशाचे काम फार सुरेख करत असे. तिनी क्रोशानी फुलं विणून, त्याला कडेनी जाड लाल कापड लावून वेगळाच सुरेख पडदा केला होता. दुसरा एक पडदा होता. त्यावर तिने पॅचवर्कनी एक कोळीण केली होती. तो पण अप्रतिम होता. दोन्ही पडदे वेगळेच होते.
बरेच दिवस ते पडदे माहेरी होते. नंतर भावानी ते मला दिले.
मैत्रिणींना आल्या गेलेल्यांना ते दाखवले. नंतर ते कपाटात ठेऊन दिले. इतकी मेहनत घेऊन आईनी केलेल्या ह्या सुरेख पडद्याचे काय करावे हे समजत नव्हते.
एके दिवशी मनात विचार आला की हे म्युझियममध्ये दिले तर….
…. ते पडदे घेऊन मी राजा केळकर म्युझियमला गेले.
त्यांनी ते पाहिले.
ते म्हणाले
“आमची कमिटी असते. त्या कमिटीची मिटींग होते. ते ठरवतात की हे त्या योग्यतेचे आहेत की नाहीत. तुम्ही हे ठेऊन जा “
“हो चालेल.. “अस म्हणून पडदे त्यांना देऊन मी घरी आले.
आणि काही दिवसांनी मला त्यांचा फोन आला.
” तुमच्या आईचे पडदे आम्ही स्वीकारले आहेत. ” तसे पत्रही त्यांनी मला पाठवले.
मला फार फार आनंद झाला.
आज ते पडदे राजा केळकर. म्युझियममध्ये काचेच्या शोकेस मध्ये दिमाखात लावले आहेत.
टेक्सटाइल विभागात जाऊन तुम्ही जरुर पहा.
राजा केळकर म्युझियम खूप छान आहे. एकदा अवश्य पाहुन या.
☆ चोर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
कालच इयत्ता सातवीची परीक्षा घेतली होती. त्या मध्ये एका विद्यार्थ्याने ‘ चोर ‘ या विषयावर लिहिलेला निबंध ….
” चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे “
लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा…..
चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,
चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,
चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,
चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत, मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,
चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,
चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,
चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.
मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नवीन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,
चोर शब्दामुळे भाषेतील साहित्यकृतींमध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे.
अलीबाबा चाळीस चोर ही कथा, प्रेम कथांमध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष, चित्तचोरटी, क्रिकेट मधील चोरटी धाव व चोराची आळंदी हे गाव… यासारखे शब्दप्रयोग याची सर्वश्रुत उदाहरणं आहेत.
चोराच्या वाटा चोराला ठाऊक /चोरावर मोर /चोराच्या मनात चांदणे /चोर सोडून संन्याशाला सुळावर देणे /काडी चोर तो माडी चोर /चोराच्या उलट्या बोंबा /चोरांच्या हातची लंगोटी/ चोर तो चोर वर शिरजोर/ चोर चोरीसे जाये पर हेरा-फेरीसे न जाये…… यासारख्या अनेक म्हणी… यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.
चित्रपटसृष्टीला अर्थ, प्रसिद्धी मिळवून देणारे चोरी मेरा काम / चितचोर /चोर मचाये शोर / चोरोंकी बारात यासारखे अनेक लोकप्रिय चित्रपट… अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या “चोर” या शब्दाचं सहाय्य मिळालं आहे.
राजकीय चोरांमुळे मात्र अर्थ-व्यवस्थेला कोणताही फायदा नाही….. ते फक्त स्वतः साठीच जगत असतात.
“अरे ये इकडे ये असा! संबंध शहरात एकशे चव्वेचाळीस कलमाखाली संचारबंदी लागू केली आहे ना? तुझ्या टाळक्यात आलयं कि नाही… दुकानं, चहाच्या टपऱ्या पानपटृया, सलून, दारूची दुकानं, बीयर बार, माॅल, सगळी वाहतूक वगेरे कडकडीत बंद ठेवलं असताना… तू कोण लाॅर्ड माऊंटन लागून गेला आहेस रे? एकटाच बिनधास्तपणे रस्त्यावरून खाली मान घालून हलेडुले चालत निघालास?… काय कुठून चोरून झोकून वगैरे आलास कि काय?…. कोणी आगांतुक बाहेर दिसताच क्षणी पकडून जेलात टाकण्याची आर्डर आहे आम्हाला… आणि असं असून तू कायद्याला धतुरा दाखवून निघालास… एव्हढी तुझी हिंम्मत… बऱ्या बोलानं आता तू चौकीवर चलं… तिथे सायेबच तुला आता कायदा मोडला म्हणून चांगलाच इंगा दाखवतील…. अश्या तंग वातावरणात बाहेर पडताना आपल्या घरच्यांचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होतास… नशिब तुझं चांगलं कि बाहेर काहीच राडा वगैरे काही झाला नाही… नाही तर कुठे फायरिंग वगेरे झालं असतं आणि त्यात तू सापडला असतास तर आज तुझ्या घरच्यांवर काय आपदा आली असती… किती बिनडोक असशील तू! बघितलसं का या दांडूका कडे हाणू अंगोपांगांवर चार रटृटे.. गप्प गुमान घरात बायका पोरांच्या बरोबर बसून आजचा दिवस छान घालवयाचा सोडून हि अवदसा का आठवली तुला म्हणतो मी… चल चल बोल लवकर आता का दातखिळी बसली तुझी.. आं! “
“अहो हवालदार सायेब.. तुम्ही मला या दांडक्यानं चार रटृटे घाला मला चालेल… हवंतर चौकीत नेऊन जेलात टाका त्यालाही माझी तयारी आहे… कारण मी संचारबंदी चा कायदा मोडला हा गुन्हा मला कबूल आहे… पण पण तुम्ही नुसता पोकळ दम देऊन मला घराकडे पाठवून देऊ नका… अहो आताच तर त्या घरातल्या अवदसेच्या तावडीतून कसाबसा बाहेर निसटलोय… काय सांगू हवालदार साहेब माझी कर्म कहाणी तुम्हाला… अहो तो एकशे चव्वेचाळीस च्या कलमाखाली संचारबंदी या शहारात लागू झाली पण ती आमच्या घरात लागू झाली नाही ना… एरवी महिना महिना भांडंकुंडण करायला नवरा हाती लागत नव्हता तो नेमका या संचारबंदी मुळे आयताच घरात सापडला म्हणून बायकोने जे सकाळपासून तोंडाचा पट्टा सुरू केला तो थांबायलाच तयार नाही… आणि अख्ख्या चाळीला फुकटचा कौटुंबिक मेलोड्रामाचा स्पेशल एपिसोड बघायला भाऊगर्दी जमा झाली… मी चकार शब्द काढत नव्हतो.. हे पाहून तिच्या संतापाचा पारा आणखी वाढला आणि मग धुण्याच्या काठीने माझी धुलाई करण्यासाठी तिने पवित्रा घेतला… एक दोन तडाख्यावर निभावले आणि मी चाळी बाहेर पळत सुटलो… साहेब तुमच्या या एकशे चव्वेचाळीस च्या कलमाखाली संचारबंदीने माझ्या बायकोचं तोंडं काही बंद झालं नाही… आणि जोपर्यंत मी घरात तिच्या समोर दिसणार तोपर्यंत ती मुलूख मैदान तोफ अशी डागत राहणार.. तिच्या पासून बचाव करण्यासाठी म्हणून मी असा जाणून बुजून धोका पत्करला…. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या… आणि मला यातून सोडवा म्हणजे झालं… “
“अरे वेड्या कशाला मला लाजवतोस! … माझ्या घरी सुद्धा अगदी हाच नाट्य प्रवेश मगा घडला… आम्हा पोलिसांच्या वर्दीला कधी काळवेळ, सुट्टी नसतेच ना… आताहेच माझ्या बायकोनं देखील माझ्यावर इतकी आगपाखड केली म्हणून मगं मी रागा रागाने त्याच तिरमिरीत बंदोबस्तासाठी बाहेर आलो.. मनात चांगलाच राग खदखदत होता मनात म्हटलं आता जो कोणी रस्त्यावरून दिसेल त्याची खैर करायची नाही… आणि बायकोलाच बदडून काढतोय असं समजून त्याला चांगलचं बदडून काढायचं… मनातला सगळा राग शांत करायचा त्याशिवाय मनाला चैन लागायाची नाही… आणि नेमका तू सापडलास… आपण एकाच नावेतले दोनं प्रवासी… काही नाही रे.. या बायकाच असतात अश्या भांडकुदळ… आपला निभावच लागत नाही… कुठल्याही कलमाखालची संचारबंदी लागू करा पण ती बायकांना लागू होतच नाही… आणि अश्या नेमक्या वेळीच त्यांच्या अंगात मात्र असा काही संचार होतो म्हणून सांगतोस… त्यावेळी आपण बंदी, अगदी जायबंदी होऊनच जातो… आपण समदुखी आहोत हेच खरं… चल मित्रा त्या पुढून बंद असलेल्या चहाच्या टपरीवर मागनं जाऊन एकेक कटींग घेऊ मग तू तसाच कडे कडेनं तुझ्या चाळीच्या वळचणीला जा… आणि मी ड्युटी संपली कि माझ्या काॅलनीकडे जातो… शेवटी आपल्या घराशिवाय सुरक्षीत आधार तिथचं तुला नि मलाही मिळणार आहे गड्या…! “
☆ बालदिन!!☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
“मुले ही देवाघरची फुले ” ही काव्यपंक्ती माहीत नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही. लहान मुलांमुळेच घराला घरपण येत असते. साधारणपणे प्रत्येकाने याची अनुभूती कमीअधिक प्रमाणात नक्कीच घेतली असेल. आज बरेचसे मानसोपचार तज्ञ मनावरील ताण हलका करण्यासाठी लहान मुलांशी खेळायला सांगतात किंवा त्याच्या समवेत वेळ घालवायला सांगतात. सर्वांचा अनुभव मात्र हाच आहे की लहान मुलांशी खेळताना आपला वेळ कसा जातो ते कळत देखील नाही. त्यांच्याशी खेळता खेळता आपण सुद्धा लहान होऊन जातो आणि आपल्याला पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळतं आणि तेही अगदी अकृत्रिमपणे.
‘बालदिन’ हा फक्त लहान मुलांसाठीच असेल असं मला तरी वाटत नाही. माझ्या मते याचे दोन भाग करता येतील. एक शरीराने लहान असलेली मुले म्हणजे खरी लहान बालके. आणि दुसरे म्हणजे वयाने वाढलेली, जबाबदारीने मोठी असलेली, कर्तृत्वाने मोठी असलेली आणि तरीही आपल्या मनाच्या एका कप्यात स्वतःचे बालपण जपणारी, निरागस मन टिकवून ठेवणारी आणि उपजत असेलेली बालवृत्ती वृद्धिंगत करून जीवनाचा निखळ आनंद घेणारी.
ज्या घरात भरपूर लहान मुले असत त्या घराला गोकुळ म्हणण्याची आपल्याकडे रीत होती किंवा घराचे गोकुळ व्हावे असेही म्हटले जायचे. घराला गोकुळ म्हटले तर त्या घरासाठी भूषणावह असायचे. त्याचा घरातील कर्त्या मंडळींना सार्थ अभिमान असायचा, आनंद असायचा. गोकुळ जर आपण इंग्रजीत लिहायचे झाल्यास असेही लिहिता येईल. Go cool. जिथे जाऊन मनाला निवांतपणा मिळतो, मनःशांती लाभते, गात्र सुखावतात असे स्थान म्हणजे गोकुळ. बालकृष्णाच्या काळात गोकुळवासियांनी याची अनुभूती घेतली आहे. कृष्णलीला पाहून सारे गोकुळ आनंदात न्हाऊन निघत असे. पूर्वी सारी घरे ही गोकुळच होती. घरातील मुलांची संख्या किती आहे यावर घराचे गोकुळ होत नसते तर त्या घरातील वातावरण, परस्पर स्नेह, नात्यांमधील अकृत्रिम स्नेह, बांधिलकी, निष्ठा महत्वाची ठरते. जोपर्यंत घरात गोकुळ होते तोपर्यंत भारतात मानसिक रुग्ण, कौटुंबिक समस्या फारच कमी होत्या किंवा नव्हत्याच. हे गोकुळ जोपर्यंत कार्यान्वित राही तोपर्यंत भारतातील समाज स्वाथ्य नक्कीच टिकून राहील. अर्थात हे सर्व भारतातच शक्य आहे कारण आपल्याकडे सुदृढ आणि उबदार कुटुंब व्यवस्था आहे.
आज काळ बदलला आहे. जीवनशैली आणि एकूण समाजरचना झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकविण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. कुटुंब व्यवस्था नीट राहिली तर बालसंगोपन उत्तम रीतीने होईल आणि भावी पिढी निश्चित चांगली निपजेल आणि ‘घडेल’. कुटुंब व्यवस्थेत आईबाबांचे कर्तव्य नुसते जन्म देण्यापर्यंत सीमित नक्कीच नाही तर खरी जबाबदारी जन्म दिल्यानंतरच वाढते. सक्षम ‘आईबाबा’ घडवणे ही काळाची गरज आहे आणि हे आज असलेल्या मुलांमधूनच घडणार आहेत त्यामुळे आजच्या पालकांची जबाबदारी निश्चित वाढणार आहे.
आजच्या पिढीला अनेक आघाड्यांवर लढाई करावी लागत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांची जबाबदारी, करिअर, नोकरीचे/कामाचे वाढलेले तास, पैशाने उपलब्ध होत असलेल्या सुखसोयी आणि प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा या सर्वाचा स्वाभाविक परिणाम घरातील बालकांवर देखील होत आहे आणि भविष्यात नक्कीच होईल. खिश्यात वाढलेल्या पैशामुळे मुलांना पैशाने उपलब्ध असलेली सुखं देण्यात आजच्या काही पालकांना आपली इतिकर्तव्यता वाटते, पण मुलांच्या निकोप वाढीसाठी हे घातक आहे. पालकांनी मुलांसाठी निम्मा पैसा आणि दुप्पट वेळ खर्च करावयास हवा. सध्या मुलांसाठी ‘Value Time’ देण्याची एक नवीन संकल्पना मांडण्यात येत आहे. पण सर्वच वेळ हा quality time करता आला तर अधिक चांगले. त्यासाठीच गोकुळ! ! आणि त्यासाठीच उबदार कुटुंब! ! आणिक एक करता येईल की मुलांशी त्यांच्या इतके लहान होऊन आपण त्यांच्याशी संवाद साधला तर मुलं आपली मित्र होतील. (एका सर्वेक्षणानुसार मुलांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याचे प्रमाण खूप कमी आहे ). आणि मग मुल आपली जबाबदारी (liability) न राहता ती स्वतः जबाबदार (reliable) होतील. आपल्या कुटुंबाचे एक सदस्य बनतील.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्याकडे ‘राष्ट्रीय बालदिन’ बरीच वर्षे साजरा केला जातो. या निमित्ताने शासकीय आणि अशासकीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याला अनुसरून ‘बालके, लहान मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांचा विकास व्हावयास हवा’, अशी अनेक वक्तव्य केली जातात. बऱ्याच वेळेस अन्य शासकीय कार्यक्रमाप्रमाणे हा कार्यक्रम देखील ‘उरकला’ जातो.
हा सर्व उपक्रमातील ‘Event’ बाजूला ठेऊन आपण ‘सजग’ होऊन घरात असलेल्या चैतन्यदायी लहान पिढीला साद घालू शकलो तर मग आपल्याला कोणालाही ‘घडवावे’ लागणार नाही, सर्व काही निसर्गक्रमाने होईल. मुलं पालकांवर अकारण आणि अकृत्रिम (Unconditional) प्रेम करतात. ते आपल्या पालकांना आपले आदर्श (idol) मानतात. पालकांनी देखील आपल्यावर तसेच (Unconditional) प्रेम करावे अशी त्यांची माफक अपेक्षा निश्चित असेल. आजच्या बालदिनी हि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु केला तर त्यांच्यासाठी बालदिनाची ही सर्वात मोठी भेट असेल.
‘बाल’ असलेल्या मनाचे बालपण जपून पुढील पिढीच्या पंखांना बळ देण्याचे काम आपल्याला करता आले तर ‘बाल मनं’ कणखर होतील आणि जीवनातील कोणत्याही परिस्थितीत ‘मन’ स्थिर ठेवण्यात यशस्वी होतील.
निकोप मनातून सदृढ कुटुंब घडेल, सुदृढ कुटुंबातून समाज बलशाली होईल आणि बलशाली समाजच गौरवशाली भारत घडवेल !!