मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दृष्टिकोन बदला, विचार बदलेल – –” ☆ श्री जगदीश काबरे

खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट. एका छोट्याशा गावात आकाशवाणी होते, “ज्यांना स्वर्गप्राप्ती हवी असेल त्यांनी संध्याकाळी गावाच्या वेशीवर जमावे. ” संध्याकाळी जवळजवळ सारा गाव वेशीवर जमा होते. काळोख पडण्याच्या सुमारास पुन्हा आकाशवाणी होते, “आता सर्वांनी आपापल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधाव्यात आणि जंगलाच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी. ” 

त्याप्रमाणे डोळ्यांवर पट्ट्या बांधून गावकरी चालू लागतात. पडत, ठेचकाळत, तोंडाने शिव्याशाप उच्चारत काही तास वाटचाल केल्यावर पुन्हा आकाशवाणी होते, “तुमच्यापैकी तिघांनी माझी आज्ञा पाळली नाही. त्यांनी डोळ्यांवर पट्टी का बांधली नाही ह्याची कारणे सांगावीत!”

“मी व्यवसायाने वैद्य आहे”, पहिला इसम बोलला, “ह्या जंगलात बर्‍याच औषधी वेलीवनस्पती आहेत. मी त्यांचे वर्णन आणि उपयोग लिहून ठेवत आहे. तो कागद इथेच सोडणार. पुढेमागे ह्या वाटेनं जाणाऱ्या कुणाला तरी तो सापडेल आणि समाजासाठी उपयोग करेल!”

“मी चालू लागल्यावर लगेचच ठेचकाळून पडलो. ” दुसरा इसम बोलला, “मनात विचार आला की, असे बरेचजण पडत असतील म्हणून मी पट्टी काढून टाकली आणि पडणार्‍यांना आधार देऊ लागलो!”

“मी पट्टी बांधलीच नाही, ” तिसरा इसम म्हणाला, “कुणीतरी सांगतो म्हणून तसं वागायचं माझ्या स्वभावात नाही. माझा मार्ग मी निवडतो. मग खड्ड्यात पडलो तर मी मलाच दोष देईन. मजल गाठली तर ते यश माझेच असेल!”

“तुम्हा तिघांनाही आपापला स्वर्ग सापडला आहे”, पुन्हा आकाशवाणी झाली, “तुम्ही इथून परत फिरलात किंवा असेच पुढे चालत राहिलात तरी चालेल. इतरांनी मात्र आपली वाटचाल चालू ठेवावी!”

थोडक्यात काय तर, प्रत्येक माणसाचा स्वर्ग हा पृथ्वीवरच आहे आणि ह्या पृथ्वीचा स्वर्ग करायचा की नरक हे त्या माणसाच्या हातातच आहे.

उदाहरणार्थ, नदीला देवी म्हणून पुजत असतानाच नदीचे गटार करण्याचा नीचपणा आपल्याला सोडावा लागेल. स्त्रीची देवी म्हणून आरती करताना स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, असे समजणे सोडून द्यावे लागेल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आलेलीच श्रेष्ठ-कनिष्ठतेची वृत्ती सोडून द्यावी लागेल. प्रत्येक माणसाशी माणसासारखा माणुसकीने व्यवहार करावा लागेल. स्वतःच्या जबाबदारीवर जगायला शिकावे लागेल. मगच दृष्टिकोन बदलला तर विचार बदलेल आणि विचार बदलले तर पृथ्वीचा स्वर्ग होईल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “लोकनायक टंट्या भिल्ल..” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “लोकनायक टंट्या भिल्ल..☆ सुश्री शोभा जोशी ☆

‘राष्ट्रास्तव जे झिजले कण कण, तेच खरोखर यशस्वी जीवन ‘

असे यशस्वी जीवन जगलेले अनेक क्रांतीकारक आपल्या भारत देशात होऊन गेले हे आपण जाणतो. मातृभूमीला मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे अनेक शूर वीर आपल्या देशात होऊन गेले त्यात जनजातीतील लोकही अग्रेसर होते. असेच जनजातीतील एक क्रांतीकारक टंट्या भिल्ल.

टंट्या भिल्लांचा जन्म १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.

सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेले अत्याचार पाहून टंट्यांच्या मनामध्ये आगडोंब उसळे. त्यांनी गावा गावात जाऊन जनजाती युवकांची एक सेना तयार केली. ही सेना जनतेला लुटणार्‍या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरूध्द लढत होती. टंट्या या लोकांची संपत्ती लुटत आणि गोर गरीबांमध्ये वाटून टाकत. कोणाच्याही संकट काळात ते त्यांच्या मदतीला धाऊन जात. लोकांच्या सुख दुःखात समरस झाल्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि ते जनतेत मामा म्हणून संबोधले जाऊ लागले.

जमीनदार आणि सावकार हे इंग्रजांचे हस्तक असल्याने टंट्या मामांनी इंग्रजांविरूध्द संघर्षास सुरूवात केली. इंग्रजांनी त्यांना पकडून खांडवाच्या तुरूंगात डांबले. पण तुरूंगात बंदिवासात राहाणे त्यांना सहन होत नव्हते. त्यांनी तुरूंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले. ५ सप्टेंबर १८५७ ला त्यांची आणि तात्या टोपेंची भेट झाली. त्यांनी तात्या टोपेंकडून गनिमी काव्याने लढण्याचे शिक्षण घेतले आणि त्यांनी इंग्रजांशी गनिमी काव्याने लढण्यास सुरूवात केली. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जग जंग पछाडले पण ते इंग्रजांच्या हाती लागेनात.

टंट्या मामांचा एक विशेष म्हणजे त्यांना उलटे चालण्याची कला अवगत होती. जेव्हा जेव्हा इंग्रज सेना त्यांना पकडण्यासाठी येई तेव्हा तेव्हा ते उलटे चालत जात. त्यांच्या पाऊल खुणांमुळे इंग्रजांची दिशाभूल होई. इंग्रज सैन्य बरोबर विरूध्द दिशेला त्यांचा शोध घेई आणि टंट्या मामा निसटून जात. निमाड, बेतुल, होशींगाबाद या भागात त्यांचा जबरदस्त दरारा होता.

११ वर्षं त्यांनी ब्रिटिश सत्तेशी झुंज देऊन त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी १०, ५०० रू. रोख आणि पंचवीसशे एकर जमीनीचे बक्षिस जाहीर केले. ‘टंट्या पोलिस ‘नावाचे स्वतंत्र पोलिस दल निर्माण केले. गावा गावात पोलिस चौक्या वसवल्या, जमीनदार आणि सावकारांना मोफत शस्रे दिली. तरी हा वीर ११ वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊनडोंगर दर्‍यात तळपत होता.

शेवटी इंग्रजांनी षडयंत्र रचून त्यांना पकडले आणि इंदौरला आणले. तिथून त्यांना जबलपूर जेलमध्ये आणले गेले. शेवटी ४ डिसेंबर १८८९ ला त्यांना फाशी दिली. निर्घृणपणे त्यांचे शव पाताल पानी जवळ रेल्वे रूळांवर फेकून दिले. आजही तिथे त्यांचे स्मारक आहे.

आपली वीरता, अदम्य साहस आणि इंग्रजांविरूध्द बुलंद आवाज उठवणारे टंट्या भिल्ल जनजातींचे लोकनायक बनले. त्यांना जनजातींचे राॅबिनहूड म्हणूनही संबोधले जाते.

अशा या शूरवीर साहसी जननायकाच्या ४ डिसेंबर या बलिदान दिनी, जनजाती कल्याण आश्रमातर्फे त्यांना विनम्र श्रध्दांजली.

©  सुश्री शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 दिनांक १४ ते २२ डिसेंबर २०२४.

ठिकाण – फर्ग्युसन महाविद्यालय.

विशेष काय? तर पुस्तक सोहळा! 

पुण्यात कायमच काही ना काही विशेष ज्ञान, सांस्कृतिक, कला, नाट्य, संगीत याची विविध प्रकारची रेलचेल चालू असते. आम्हा पुणेकरांना आता कोठे जावे ? असा प्रश्न नेहेमीच पडतो.

एकाच वेळी बालरंगभूमी संमेलन, भीमथडी जत्रा, शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन, सवाई गंधर्व आणि विविध नाट्य गृहातील कार्यक्रम. सगळे एकाच वेळी. असे वाटले गोष्टीत जशी जादू घडते तसे पटापट एका ठीकाणहून दुसरीकडे जाता यायला हवे.

पण वाचन वेड असल्याने पुस्तक महोत्सव पाहूया असे ठरले. एक दिवस जाऊ असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर लक्षात आले, एकदाच जाऊन जमणार नव्हते. इतका खजिना आहे तर किमान २/३ वेळा तरी जावेच लागेल. आणि याची आठवण आकाशवाणी सतत करून देत होती. मुख्य आकर्षणे अशी होती, १) पुस्तक व लेखकांशी भेट २) खाद्य जत्रा ३) बाल चित्रपट महोत्सव आणि माझ्या दृष्टीने पुन्हा ज्ञान खजिन्याचा आनंद घेणे या निमित्ताने पुन्हा कॉलेजच्या आवारात जायला मिळणार होते.

जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागल्या पासूनच मामाच्या गावाला जाऊया! या धर्तीवर

पुस्तकांच्या गावा जाऊया..

पुस्तक महोत्सव पाहूया…

असेच मन घोकत होते. आणि त्या पर्वणीची आतुरतेने वाट बघत होते. आणि त्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. पुस्तकांचे दालन ( मोठे व त्यात छोटी छोटी दालने ) सर्वांसाठी खुले झाले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिथे मैत्रिणीसोबत पोहोचले. चौका चौकात मोठमोठे फ्लेक्स लागले होते. त्या रस्त्याने जाताना मागच्या वर्षीचा पुस्तक महोत्सव व तेथील अनुभव आठवत होते. त्या आठवणी व गप्पा करतच तिथे पोहोचलो. आणि ते भव्य प्रवेशद्वार दिसले. त्या दारातच इतकी गर्दी दिसली की मन धास्तावलेच! प्रवेश दारातच किमान ३/४ शाळांची मुले ओळीने बाहेर येताना दिसली. प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक आणि चेहेऱ्यावर नवल मिश्रित आनंद उतू जात होता. त्यांचे ते आनंदी चेहरे बघूनच मन प्रफुल्लित झाले. मग मीही थोडा वेळ त्यांचा आनंद बघत राहिले. नंतर आत प्रवेश केला. आत प्रवेश करताना अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करताना खुल जा सिम सिम म्हणून ते दार उघडल्यावर त्या अलीला वाटला असेल तसाच उत्सुकता मिश्रित आनंद वाटला. आत प्रवेश करताच एका झाडाला लटकलेली पुस्तके अर्थात प्रतिकृती दिसल्या. आणि भावना, विचार यांच्या बीजाला आलेली फळेच दिसली. ते बघून फारच छान वाटले. असे वाटत होते उड्या मारुन ती पुस्तकरूपी फळे घेऊन बघावित. पण मग लक्षात आले की पुढे तर हिरे, रत्ने, माणके, सोने यासम आणि न बघितलेली अनमोल रत्ने नुसतीच दिसणार नाहीत तर हाताळायला मिळणार आहेत. मग जास्त उशीर करायला नको म्हणून इकडे तिकडे बघायचे नाही असे ठरवले. पण आमचे बालमन तिथली एकूणच सजावट बघून कुठले ऐकायला. मग रमले तिथे. तिथे इतक्या सुंदर संदेश देणाऱ्या शिल्पाकृती उभारल्या होत्या की ते संदेश स्वीकारल्या शिवाय पुढे कसे जाणार? शिवाय सेल्फी काढण्याचा मोह होताच. प्रत्येक आकृती वेगळा संदेश देत होती. प्रथम दिसले एक गोंडस बाळ, जे पुस्तकांच्या ढिगाऱ्यावर बसून चेहेऱ्यावर आश्चर्य घेऊन जगाकडे बघत होते. जणू आपल्याला सांगत होते, या पुस्तक रुपी ज्ञानातून इतके ज्ञान मिळते की सर्व जगावर राज्य करु शकता. आणि प्रगतीच्या उंच जागी जाऊ शकता. तो बघे पर्यंत तिथे फोटो घेणाऱ्यांची गर्दी झाली. पुढे तर पुस्तक वाचताना गुंग असणारा माणूस असा पुतळा दिसला. त्याच्या हातातील पुस्तकावर व अंगावर अक्षरेच अक्षरे होती. मग आम्हीही त्याच्या समोर फोटो घेतला.

थोडे पुढे आल्यावर दिसले एका ठिकाणी एका शाळेचे विद्यार्थी व त्यांचे सर उभे आहेत. मग मीही त्यात सामील झाले. त्यांच्या समोर एक आकृती होती. त्यात उघडून ठेवलेले भव्य पुस्तक होते. व त्यातून एक अळी सारखा प्राणी बाहेर पडत होता आणि त्याचे तोंड मात्र भव्य ड्रॅगन प्रमाणे होते. जणू ज्ञान घेतल्यावर आपण कसे मोठे होऊ शकतो हेच दर्शवित होते.

त्यानंतर एक पुतळा असा दिसला की मी तर बघतच राहिले. त्या पुतळ्याच्या डोक्याच्या ठिकाणी पुस्तक होते आणि डोके त्याच्या हातात होते. आणि तो ते पुस्तक एकाग्रतेने वाचत होता. यातून माझ्या मनात बरेच अर्थ आले. असे वाटले आपले तन मन, मस्तिष्क एकाग्र करून सगळे विसरून पुस्तक वाचावे असा संदेश देत आहे. एकदा वाटले डोक्याच्या ठिकाणी पुस्तक ठेवून प्रथम स्वतःला वाचा आणि स्वतःचे परीक्षण करा असा संदेश देत आहे. त्या मार्गावर जागोजागी छोटे मांडव होते. त्यातूनच प्रवेश करावा लागत होता. त्या मांडवाच्या छताला पुस्तकांच्या प्रतिकृती खूप आकर्षक रीतीने टांगल्या होत्या. एका ठिकाणी तर त्यांचा आकार मराठी व इंग्रजी अक्षरांचा होता. आणि दोन्ही बाजूला महोत्सवात काय बघू शकाल याची चित्रे होती. याच मार्गावर जागोजागी पुस्तकांच्या विविध रंगाच्या, विविध आकाराच्या शिल्पाकृती दिसत होत्या. आणि बसायला पुस्तक दुमडल्यावर जसे दिसेल तशा आकाराचे अक्षरे असलेले बेंच होते.

सगळीकडे असलेले पुतळे मात्र मोठे आकर्षक आणि संदेश देणारे होते. एका ठिकाणी एका बेंचवर गावातील माणसाची पुस्तक वाचनात गुंग असलेली आकृती होती.

तेथून पुढे गेल्यावर एका मार्गावर प्रवेश केला. आणि डाव्या बाजूला दिसली खाद्य जत्रा. खूप विशेष वाटले. तिथे एक मॅडम विद्यार्थ्यांना सांगत होत्या, ज्यांना काही खायचे असेल त्यांनी खाऊन घ्या. त्यांची सूचना जरा विचित्र वाटली पण विचार केल्यावर योग्य वाटली. एकदा पुस्तके बघायला लागलो की पुन्हा भूक लागली म्हणून बाहेर यायला नको. आम्ही मात्र थेट मुख्य प्रवेश दारातच प्रवेश केला. त्या लाल कार्पेट वरून चालताना आपण वाचकही विशेष आहोत असेच वाटत होते. आत प्रवेश करताच भव्यता लक्ष वेधून घेत होती. डाव्या बाजूला सुंदर स्टेज व समोर ठेवलेल्या खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर त्या ठिकाणी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे समजले. पण या वेळी तिथे काही मुले चित्रे काढताना दिसली. आणि त्यांच्या शिक्षिका त्यांना सूचना देत होत्या. उजवीकडे उत्कृष्ट सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी आपले मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांचे कट आऊट ठेवले होते. त्यांच्या हातात समृध्द भारताचे पंचप्राण लिहिलेले प्रमाणपत्र होते. आणि ते आपल्याला देत आहेत असा फोटो काढण्याची व्यवस्था होती. तेथे आलेले सर्वच त्या ठिकाणी फोटो काढत होते. आणि त्याच्या बाजूलाच प्रत्येक मुलाला पुस्तक दिले जात होते. आता प्रत्यक्ष पुस्तकांच्या गुहेत प्रवेश करायचा होता. गर्दीचा अंदाज बाहेरच आला होता. त्यामुळे आतही गर्दी असणार हे गृहीत धरूनच आत प्रवेश केला.

– भाग पहिला 

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी केलेली ‘पु.लं.’ ची हजामत” –  लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी केलेली ‘पु.लं.’ ची हजामत” –  लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(हा लेख आहे पुलंचे केशकर्तन करणाऱ्या प्रतिभावान माणसाचा)

जगाची गंमत करणा-या अवलियाची हजामत या बहादुराने केली आहे.

पण ही हजामतही त्यांच्यासाठी एका देवपूजेपेक्षा कमी नव्हती.

या देवपूजेचे गोष्ट त्यांच्याच शब्दात…

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ ; विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार घडून आत आला.

‘तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘

त्याच्या या वाक्याने माझ्या चेह – यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.

आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 

‘ हो लगेच निघतो ‘ 

असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.

त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं ‘ चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.

‘राहू द्या हो ; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘ 

त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं ‘ बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी ‘ रुपाली ‘ मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.

‘ थोडावेळ बसा ; भाई जरा नाश्ता करतो आहे ‘ असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.

आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.

इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘ चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या.

त्यांचे लक्ष नाही असे पाहून 

‘ फार लहान करू नका,

थोडेच कापा ‘ 

पुलं माझ्या कानात कुजबुजले.

माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.

पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी ‘ का म्हणतात याचा अर्थ उमगला.

त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या.

त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

‘ चंद्रकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका ‘ त्यांनी आज्ञा केली.

मला जरा विनोद करावासा वाटला.

मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘ त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय ?’ 

मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते.

म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.

शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,

‘ एक आनंदाचं देणं ‘.

पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘

लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाईंच्या मनातलं… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी `

🌸  विविधा  🌸

☆ सावित्रीबाईंच्या मनातलं☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मी सावित्री बोलतेय गं माझ्या लेकींनो तुमच्याशी. मलाही थोडं मन मोकळं करावसं वाटतयं नं तुमच्या जवळ!

आज तुम्ही सगळ्या माझ्या कामाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करता आहात नं!खूप बरं वाटतयं मला!खरचं तेव्हा मला खूप कष्ट पडले गं मुलींनो प्रवाहा विरुद्ध पोहोतांना! सगळ्या समाजाचा विरोध होता मुलींना शिकवण्यासाठी. पण माझ्या पतीचा ज्योतीबांचा भरभक्कम हात होता माझ्या पाठीवर म्हणून मी तरून जाऊ शकले. अर्थात मलाही तेव्हढं धैर्य गोळा करावच लागलं बरं का?

का शिकवायचं नाही मुलींना याचं मुख्य कारण काय सांगायचे तेव्हाचे बुजरूक माहिती आहे का?ते म्हणायचे, मुलींना शिकवलं तर त्या आपल्या याराला पत्र लिहितील आणि त्याच्या सोबत पळून जातील. पण नंतरच्या काळात साने गुरूजींनी ठाम पणे सांगितले की खूप काळाने दाव्याला बांधलेली गाय सोडली की ती हुंदडते व आपल्या वासरासाठी घरी परतते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा खूप काळ बंधनात होती म्हणून थोडा काळ भरकटल्यासारखी दिसेल पण आपल्या पिल्लांसाठी घरट्यात परतेलच!बरोबर आहे न गं मुलींनो! आतापर्यंत तरी तुम्ही त्यांचे बोल खरे करून दाखवले. शिकून, नौकरी करून, स्वातंत्र्य घेऊनही घरटं नीट सांभाळलं. आपल्या भारतीय संस्कृतीचे पाळंमुळं घट्ट धरून ठेवलीत.

पण आजकाल थोडं थोडं चित्र बदलू लागलयं का गं?मुली वरवरचं रूपडं बघून प्रेमात पडतात आणि स्वतःचंच जीवन उद्ध्वस्त करताहेत!अगं मला माझ्या ज्योतिबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणून माझ्या हातून येव्हढं मोठं कार्य घडलं. पण मी आपल्या भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेलीच राहू दिली. कारण पाळंमुळं खोलवर रूजली होती मनात. शिकून मुलींनी उंच झेप घ्यावी. स्वतःची उन्नती करून घ्यावी. हेच चित्र होतं माझ्या डोळ्यापुढे तेव्हा. बरोबर होत ना गं ते!तुम्ही पण ते चित्र छान रंग भरून सर्वांसमोर आणलं बरं का!मला खूप अभिमान वाटतोय त्याचा.

पण एक सांगू का तुम्हाला?तुम्ही शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नती बरोबर आपल्या देशाची, संस्कृतीची शान राखावी या करताच करा हं मुलींनो. आज आपले मुलं मुली कुठल्या दिशेने धावताहेत याकडे वेळीच लक्ष द्या बरं का?दुसर्‍या संस्कृतीमधील चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली उचलू नका. अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल. अजूनही लगाम तुमच्याच हातात आहेत. ते आवरा, उधळू देऊ नका. “सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले” या शब्दांना अलगद सांभाळणं, या शब्दां बरोबरचं माझाही मान राखणं आता तुमच्याच हाती आहे बरं का!कारण मी हाती घेतलेला वसा मी तुमच्या हाती खूप विश्वासाने सोपवला आहे. माझा विश्वास सार्थ करणे तुमच्याच हाती आहे.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नवीन आणि जुन्या पिढीत वैचारिक मतभेद असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियमआहे.  काळानुसार जीवनशैली बदलत असते. शिक्षण, विज्ञान, जागतिकीकरण यातून नवीन विचार प्रवाह अस्तित्वात येत असतात. नवीन पिढी हे नवे विचार लवकर आत्मसात करते. तर जुन्या पिढीला हे स्वीकारायला वेळ लागतो. यातून संघर्ष निर्माण होतो आणि अनेकदा तो विकोपाला जाऊन एकमेकांबद्दल कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो.  याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होतो. आज कुटुंबात हा वाद आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  त्यामानाने काही अपवाद वगळता, आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या संघर्षाची तीव्रता कमी आहे.

पूर्वी एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य अथवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा केली जात असे. त्यामुळे वैचारिक देवाणघेवाण करताना एकमेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण होत.  पण आता गुगलवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या भांडारामुळे हा संवाद हरवत चालला आहे. पाठीवरच्या हातातून मिळणारं पाठबळ व स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम, हे दृक्श्राव्य माध्यमातून होणाऱ्या शाब्दिक चर्चेतून कसं मिळणार?कोविडच्या काळात तर अगदी शिशु वर्गातील मुलांना मोबाईल हातात घेऊन शिक्षण घेणं क्रमप्राप्त झालं. आई-वडील लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात गर्क आणि मुलं अभ्यास आणि नंतर मोबाईलवर गेममध्ये दंग!

पूर्वी एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर नवविवाहिता, शेजारच्या एखाद्या काकू, मावशीचा सल्ला घेत असे, माहिती घेत असे.  कालांतराने पाककृतींची पुस्तकं उपलब्ध झाली. आणि आता तर मोबाईलमुळे *कर लो दुनिया मुठ्ठी में *, त्यामुळे देशी-विदेशी कोणत्याही पाककृती काही सेकंदात तुमच्या समोर असतात आणि त्याही दृक्श्राव्य स्वरूपात! केवळ पाककृतीच नव्हे तर कोणत्याही विषयासंबंधी माहिती, मोबाईलवर क्षणात सापडते. या आभासी जगात रमताना कौटुंबिक आणि सामाजिक संवाद हरवत चालला आहे.

जागतिकीकरणामुळे कामाच्या वेळेचा आपल्या स्थानिक वेळेशी मेळ नाही. त्याचाही विपरीत परिणाम शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत आहे.

आपल्या मुलांनी दिवसभरात चार शब्द आपल्याशी बोलावे, ही घरातील वडील मंडळींची साधीशी अपेक्षा.  पण कामाच्या या विचित्र वेळेमुळे कुटुंबातील ज्येष्ठांची साधी विचारपूस करायलाही तरूण पिढीला वेळ नाही.  मग इतर अपेक्षांची काय कथा!त्यामुळे त्यांच्या परस्पर संबंधात काहीसा दुरावा निर्माण होतो आहे.  लग्न, मुंजीसारखे समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात भाग घेणं देखील, त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार, अनेकदा शक्य होत नाही. मग नातेवाईक आणि समाजातील अन्य व्यक्तींशी संबंध जुळणार तरी कसे? आपण सुखदुःखाच्या प्रसंगात कोणाकडे गेलो नाही, तर आपल्याकडे तरी कोण येणार? याचा परिणाम नवीन पिढीला एकाकीपणा बहाल करत आहे. वैफल्यग्रस्त बनवत आहे.  त्यांच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढवत आहे.

यामुळेही कौटुंबिक कलह निर्माण होऊन, भावनिक दुरावा निर्माण होत आहे.

मग या दोन पिढ्यांत समन्वय साधणार तरी कसा?कारण प्रत्येक पिढीला स्वतःचंच वागणं बरोबर वाटत असतं. त्यांची जीवनशैली व सामाजिक मूल्ये वेगवेगळी असतात. परस्पर संवाद, चर्चा आणि सामंजस्य याद्वारे हा दुरावा, अंतर नक्कीच कमी करता येईल.

जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला परंपरागत, सामाजिक व धार्मिक विचारांचे महत्त्व पटवून द्यावे, परंतु नवपिढीवर ती बंधन म्हणून लादू नये. सातच्या आत घरात, ही पूर्वीची परंपरा. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय इ. च्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नवीन पिढीला, हे कसं शक्य होईल?घरी परतायला रात्रीचे ९-१०वाजत असतील तर झोपायला १२ वाजणार, मग पहाटे लवकर उठणं कसं जमणार? आता वटपौर्णिमेला वडाची साग्रसंगीत पूजा आणि उपास केवळ परंपरा म्हणून केला पाहिजे, हे नवीन पिढी ऐकणार नाही. पण वटवृक्षाचं संगोपन, निसर्गाचा समतोल आणि आरोग्य या गोष्टींसाठी ते करावं, हे समजावून सांगितल्यावर आजच्या पिढीतील तरूण आणि तरूणी, दोघंही वृक्षारोपणाचा वसा उचलायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत.  रोज देवपूजा करणं हा जुन्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग. पण नवीन पिढीला कदाचित तो वेळेचा अपव्यय वाटू शकतो किंवा त्यांच्या कामाच्या घाईगडबडीत त्यांना ते जमवता येत नसेल.  नवपिढी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असेल, त्यांना जमेल तसं सामाजिक उन्नतीसाठी शारीरिक, आर्थिक, बौद्धिक मदत करत असेल तर, जुन्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योगाभ्यासाची आवश्यकता संयतपणे तरूण पिढीला समजावून सांगितली पाहिजे.

आजच्या शिक्षणपद्धतीत जीवनमूल्यांचा अभाव जाणवतो. जीवघेण्या स्पर्धेच्या या युगात झापड लावल्यासारखी अवस्था आहे नवीन पिढीची! जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला जुन्या जीवनमूल्यांचे महत्त्व आणि आजच्या परिस्थितीत त्यांची उपयुक्तता समजावून सांगणे आवश्यक आहे. कारण काळ कितीही बदलला तरी नेहमी खरे बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा करणे ही शाश्वत मूल्ये कधीच कालबाह्य होत नसतात.

नव्यापिढीचे स्वैर वागणे, मुला-मुलींचे एकत्र फिरणे, रात्री उशिरा घरी परतणे, त्यांची कपड्यांची फॅशन, जुन्या पिढीला आवडत नाही.  जुनी पिढी, पालक अनेकदा या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण करत नाही.  यातून मग वाद निर्माण होतो.  आपल्या वागण्याचं, गरजांचं योग्य समर्थन नवीन पिढीला करता आलं पाहिजे आणि आपल्या विरोधामागची भूमिका, जुन्या पिढीलाही नीट समजावून सांगता आली पाहिजे. अर्थात हे करताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं खूप आवश्यक आहे. अन्यथा केस कापायला आई-वडिलांनी परवानगी दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या, मित्रांबरोबर पार्टी करायला पैसे दिले नाही, म्हणून वडिलांच्या खूनाचा प्रयत्न, मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून वडील आणि भावांनी तिला जीवे मारले, यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात.

नवीन पिढीला तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापेक्षा जास्त आहे, हे वडीलधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ते अनेक कामं, अगदी चुटकीसरशी पार पाडतात. मग ते लाईट बील भरणं, औषधं मागवणं, एखाद्या कार्यक्रमाची/प्रवासाची तिकिटे आरक्षित करणं असं काहीही असेल. पण यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांची छान बचत होते. या पिढीच्या उधळपट्टीवर, अवास्तव खर्चावर टीका करणाऱ्या मंडळींनी हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या शहरात अथवा परदेशात राहणारी अनेक मुलंही वेबकॅम सारख्या उपकरणांचा उपयोग करून आपल्या पालकांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या दैनंदिन गरजा आॅनलाईन व्यवहाराद्वारे पूर्ण करताना दिसतात.

 ‘आमच्या वेळी नव्हतं हो असं ‘, हे म्हणणारी पिढी कधीच मागे पडली आहे.  आत्ताचे पन्नाशीच्या आसपासचे आई-वडील अथवा सासू-सासरे बघितले, तर ते नवीन पिढीशी बरंच जुळवून घेताना दिसतात.  मुलांची कामाची वेळ, घरून काम, त्यांचं स्वातंत्र्य यांचा विचार करून, त्यांचं वेगळं राहाणं ते समजून घेतात. शक्य असेल तिथे पालक मुलांच्या लग्नाआधीच त्यांची वेगळं राहण्यासाठी सोयही करून ठेवतात. हे परिवार वेगळ्या घरात राहात असले तरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि परस्परांना शक्य तेवढी मदतही करतात. आपल्या आचरणातून होणारे संस्कार पुढील पिढीत आपोआप झिरपत असतात. म्हणूनच परदेशात राहणारी अनेक मुलंही आपल्या परंपरा, मातृभाषा आवर्जून जपताना दिसतात.  कदाचित ते जपण्याची त्यांची पद्धत काळानुरूप थोडी वेगळी असेल.  पण हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

  प्रत्येकाने आनंदात राहावे असे वाटत असेल, तर दोन्ही पिढ्यांनीआपल्या भूमिकेची अदलाबदल करून पाहावी. म्हणजे एकमेकांना समजून घेणं सोपं होईल. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून एकमेकांबद्दल प्रेम, आदर, काळजी व्यक्त झाली पाहिजे. मानवी संवेदनशीलता हरवता कामा नये. दोन्ही पिढीतील सदस्यांनी वैचारिक भिन्नतेचा आदर राखला पाहिजे.

 सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठीही एकमेकांस समजून घेणे आवश्यक आहे.

एकमेकांच्या भावना, विचारसरणी, सामाजिक मूल्ये समजून जीवन जगले पाहिजे. तेव्हाच दोन्ही पिढ्यांमध्ये समन्वय साधला जाईल.  शिक्षण, चौफेर वाचन, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर यातून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर नक्कीच अनुकूल परिणाम दिसून येईल.  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न दोन्ही पिढ्या करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  शालेय शिक्षणात मूल्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक जागरूकता यांचा समावेश हे त्यातील एक महत्वाचं पाऊल!याशिवाय अनेक सेवाभावी संस्था आणि गट वृक्षारोपण, रक्तदान, प्लास्टिक हटाव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचं वाटप, जुनं प्लास्टिक व मोबाईल सारखा ई-कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी पाठवणे, असे उपक्रम राबवत आहेत.  या उपक्रमांमध्ये लहान-थोर सगळ्यांना सामील करून घेतलं जातं.  त्यामुळे दोन्ही – तिन्ही पिढ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क, संवाद आणि आपुलकीचं नातं निर्माण होण्यास, खूप छान मदत होत आहे.  

 © सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला..  “हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही.  आपलं वर्ष गुडीपाडव्याचं..  “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो..  “ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

“ मला रोजची तारीख माहिती..  माझं सगळं नियोजन तारखेवर… म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

“ मग पाडवा? “

“ तो ही माझा आहेच.  मी आनंदाचा प्रवासी, जिथे आनंद तिथं मी.  ‘शादी किसीकी हो, अपना दिल गाता है. ’

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड…  खरं तर प्रत्येक सकाळ ही एका नववर्षाची सुरुवात असते.  ‘ सवेरेका सूरज हमारे लिये है ‘ असं म्हणणारा कलंदर मी…..  

….  ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो.  

हर एक पलको खुशी से गले लगाते जियो 

..  हीच वृत्ती असावी.  खरं म्हणजे प्रत्येक क्षणच नवा असतो, नवा जगायचा असतो.  कोणता क्षण अंतिम असेल हे काय ठाऊक? म्हणूनच प्रत्येक क्षण साजरा करावा.  प्रत्येक दिवस साजरा करावा.  पण रोज साजरा करायला जमतंय कुठं? जमलं तर तेही करावं.  कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.  म्हणूनच – – 

..  ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग…’ असं म्हणत मित्रांनो साजरा करूया “ निखळ आनंद “….  

..  मग तो कुणाचा का असेना..  आणि कधीही का असेना !!!

….  तर चीssssssssअsssssर्सssss !! 

…  , हॅप्पी.. , न्यू.. , इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर

सरत्या वर्षाला निरोप – – –

बोलता बोलता 2024 सरल निरोप देतांना आपण या वर्षात काय मिळवलं, काय सोडलं, काय चुकलं आणि काय राहून गेलं हे मनातील विचार मंथन चालू झालं….

” माणुसकी हरवली का, ती जपली का?.  हेच प्रश्न मनाला विचारले…   

स्वतः साठी किती जगलो, समाजासाठी किती पळालो, दुसऱ्यांना किती उपयोगी आलो…

” मनातील वाईट विचार काढून चांगले विचार आत्मसात केले हे महत्वाचे…

” सकारात्मक विचाराने तर प्रगल्भ विचारांची देवाण घेवाण होते व समाज प्रबोधन होते एक सुंदर संदेश समाजास मिळतो…

” नकारात्मक विचार आनंद मिळू देत नाही, गैरसमज निर्माण करून नाती टिकू देत नाही हे लक्षात घ्यायला हवं…

आपण, समाजाचे काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेऊन कार्य केल तर निस्वार्थी समाज सेवा घडली जाते यात शंकाच नाही…

सात्विक विचार दुसऱ्याप्रति आपुलकीची भावना कळकळ हे आदर्श माणुसकीचा ठेवा आहे तो सर्वांना मिळावा थोडं तरी दुःख हलकं होईल…

” एक अशीच पोळीभाजीच कामं करणारी महिला होती, खूप गरीब आणि प्रामाणिक होती…

” बिचारीला पतीदेवांचे सुख अजिबात नव्हते सतत भांडणं तिला मारणे चालू होते…

एक दिवस तिला खूप मारलं रक्त आलं तोंडातून हिरवं निळं अंग झालं…

त्याही परिस्थितीमध्ये ती माझ्याकडे आली बॅग घेऊन म्हणाली “.  मी आता इथे राहत नाही मी माहेरी जाते… मी तिला म्हणाले तू आज इथे रहा आपण उद्या बोलू.

” तिला चार दिवस ठेऊन घेतलं, समजून सांगितलं थोडा राग शांत झाला तब्बेत सुधारली… ” तिला म्हणाले तू वेगळी रहा, इथेच कामं करतेस ते कर..  जून वाढव … पण माहेरी जाऊ नको…  

जो मान तुला इथे राहून मिळेल तो माहेरी काम करूनही मिळणार नाही ” तिला ते पटलं आणि ती रूम घेऊन राहायला लागली… 

” बऱ्याच वर्षांनी मी तिच्याकडे गेले तर चाळीतील घर जाऊन दोन माजली माडी झाली होती.  तो एक योग्य सल्ला योग्य निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आणि तीच आयुष्य सुधारलं….  

, ” माणुसकी, सकारात्मक विचार योग्य दिशा दाखवतात…

” नवीन वर्ष सुरु झाल्यावर मनाशी संकल्प करावा आणि तो वर्षात पूर्ण करावा…  

” मी, स्वतःसाठी जगेनच पण इतरांना वेळेनुसार मदत करेल… 

गरिबांना मदत करेल परिस्थिती नुसार गरीब मुलांना शिक्षण देईल…  

 ” निराधारांना आधार अनाथ मुलांना आश्रय देईल, माझ्या कुवतीनुसार मी नक्कीच प्रयत्न करेन….

” आज पैसा, यश, समृद्धी सगळीकडे आहे नाही फक्त ” वेळ “..  तो देता आला पाहिजे…  

” आई वडील वयस्कर झाले मुलं परदेशीआहेत, त्यांना सांभाळायला 50 हजार पगार देऊन केअरटेकर ठेवले सर्व सुविधा दिल्या…. तरीही आई वडील नाराज राहू लागले त्यांचं मन उदास असल्याने तब्येत बिघडू लागली…

” त्यांना हे काही नको होत, फक्त मुलांचं प्रेम आणि नातवंडाचं सुख हवं होत…  

“मुलांनी आई वडिलांच्या प्रेमाच्या मायेच्या बदल्यात काय दिल तर पैसे फेकून केअरटेकर… हे प्रेम आहे कि उपकाराची परतफेड… तसं असेलतर आई वडिलांचे उपकार कुणीच फेडू शकत नाही.

विचार आला मनात ” आपण माणुसकी जपली ना, काहीतरी कार्य केल ना… तेंव्हा मन म्हणतं हे वर्ष सुंदर गेलं, नवीन वर्षात अजून कामं करेन… 

“खूप प्रश्न भेडसावत आहेत समाजात खूप प्रश्न सोडवायचे बाकी आहेत.

“वाढते वृद्धाश्रम, बेकारी, मुलांचे लग्न हा तर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे…

“समाजात परिवर्तन घडवणं आपलं काम आहे, अपेक्षा करण्यापेक्षा आव्हानाला सामोरं जाऊन स्व कष्टाने मिळवलेलं कधीही चांगलं…  

“ज्या आईवडिलांनी घडवलं पायावर उभं केलं याची जाणीव ठेवून दोन शब्द प्रेमाने बोलून त्यांना सांभाळणं हे लक्षात ठेवले तर वृद्धाश्रमाची गरज कशाला लागेल.

“सरते शेवटी काय झालं, काय केलं, हा आनंद मनात ठेवून काय राहिलं, याचा संकल्प करून 2024 ला निरोप देऊन 2025 च स्वागत करूया…

© सौ.  वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या), नऱ्हे, पुणे

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्नेहवन… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्नेहवन… ☆ प्रा. भरत खैरकर 

श्री अशोक देशमाने.  

अशोक देशमाने हा एक साधा, पण असामान्य युवक….  तो एका शेतकरी कुटुंबात जन्मला होता.  त्याचे आईवडील शेतात काबाडकष्ट करत होते.  त्याचे घर आणि शेत कायमच आर्थिक अडचणींचा सामना करत होते.  अशोक बालपणापासूनच या कठीण परिस्थितीला सामोरा गेला होता.  त्याच्या आईवडिलांचा चेहरा कधीच आनंदाने भरलेला दिसला नाही!कारण प्रत्येक दिवसच एक नवीन संघर्षाचा होता..

गावातील शेतकरी कुटुंबांच्या दुःखाची गोष्ट सर्वांनाच माहिती होती.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याच्या कुटुंबातील अनाथ झालेले मुलं, उघड्यावर पडलेले संसार, यामुळे अशोकला तीव्र मानसिक त्रास होऊ लागला.  तो रोजच हे दृश्य पाहून हळवा होई.  त्याचं हृदय पिळवटून काहीतरी करायला हवं असा आवाज देत होतं.

अशोकने शिक्षणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला.  त्याला अशी आशा होती की, शिक्षणाचं सामर्थ्य त्याला काहीतरी बदल घडवायला मदत करेल.  त्याने खूप मेहनत घेतली, आणि आयटी क्षेत्रात नोकरी मिळवली.  त्याने आयटी इंजिनियर म्हणून उच्च पगाराची नोकरी केली.  पण नोकरी करत असताना, त्याचे मन नेहमी त्या दु:खी मुलांचा, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा आणि त्यांच्यापासून होणाऱ्या वेदनांचा विचार करत राहायचं.

एका रात्री, कामातून परत येताना अशोक विचार करत होता.  ‘काहीतरी करायला हवं…  याही मुलांना एक चांगलं भविष्य द्यायचं आहे. ‘ त्याच्या मनात एक विचार आला ‘माझ्या कुटुंबात..  समाजात..  बांधवांत.. जे दुःख होते, ते मी कसे संपवू शकेन? त्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ‘ त्याने ठरवले की खपण अनाथाश्रम सुरू करूया..

अशोकने सुरुवात केली.  दोन छोट्या रूम्स भाड्याने घेतल्या आणि सात ते आठ मुलांना त्यात आश्रय दिला.  त्या मुलांचे जीवन अत्यंत हालाखीचे होते.  ते सर्व शेतकरी कुटुंबातील होते.  शाळेतील शिक्षण आणि एक सुरक्षित आश्रय त्यांच्या जीवनातील पहिला सोनेरी क्षण होता.

अशोकने या मुलांना शाळेत दाखल करून त्यांचे सर्व काही व्यवस्थित सुरु केले.  त्यांना एक सुरक्षित आणि प्रेमळ घर दिले.  जेथे त्यांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली.  अशोक त्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देत असे.  त्याने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहित केले, आणि त्यांना जीवनातील कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले.

हे सर्व करत असताना अशोकने पाहिलं की, या छोट्या उपाययोजनांनी या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडविला होता.  ते शिकत होते, खेळत होते, आणि नवा आत्मविश्वास मिळवत होते.  अशोकने त्यांना एक लक्ष्य दिलं ‘कधीही हार मानू नका, कारण तुमच्या जीवनात तुम्हीच सर्वात मोठे हिरो आहात. ‘

जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी अशोकच्या अनाथाश्रमाची वाहवा सुरू झाली.  मुलं मोठी होऊ लागली, शाळेत उत्तम गुण मिळवू लागली.  काही मुलं तर उच्चशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी राहिली.  गावाच्या इतर मुलांसाठी अशोक एक आदर्श बनला.

अशोकच्या यशाचं गुपित त्याच्या मनाच्या दृढतेत आणि त्या मुलांच्या भविष्यावर त्याने दिलेल्या प्रेमात होतं.  त्याच्या आयटी क्षेत्रातील पगाराची नोकरी कधीच त्याच्या हृदयाचा भाग बनली नाही.  त्याचे खरे सुख त्याच्या अनाथाश्रमात पाहिलेल्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांत होतं.

अशोकने जेव्हा अनाथाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या मनात एक स्पष्ट दृष्टीकोन होता – मुलांना शिक्षण आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणणे.  त्याने त्यासाठी दोन एकर जमीन घेतली होती, जिथे त्याने एका संपूर्ण आश्रय स्थळाची उभारणी केली.  हे आश्रम एक साधे, पण अत्यंत आधुनिक आणि शिक्षणासोबतच जीवन कौशल्यांची शिकवण देणारे केंद्र बनले.

अनाथाश्रमाची इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बांधली गेली.  मुख्य इमारतीच्या छतावर सोलर सिस्टिम बसवला गेला होता.  ज्यामुळे आश्रमात पूर्णपणे स्वच्छ आणि हरित उर्जेचा वापर होत होता.  पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम स्थापित केली गेली होती.  ज्यामुळे पावसाचे पाणी साठवून शौचालय आणि उद्यानासाठी वापरता येत होतं.

आश्रयातील मुलांसाठी गोबर गॅस निर्माण करणारी यंत्रणा ठेवली होती, ज्यामुळे गॅस तयार होतो आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींसाठीही त्याचा वापर केला जातो.  इथे गोपालन देखील सुरु होतं, जिथे मुलं दूध, दही, पनीर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करायचे.. मुलचं गाईंची काळजी घेत होती.

आश्रयाची आणखी एक महत्वाची सुविधा होती ओपन लायब्ररी आणि खेळणी लायब्ररी.  ओपन लायब्ररीमध्ये विविध वाचनासाठी पुस्तकांचा खजिना होता, आणि मुलांना प्रत्येक आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा नियम लागू केला गेला होता.  यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ लागला.  खेळणी लायब्ररीमध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध खेळणी मिळत होती.

आश्रयात आणखी एक अद्वितीय सुविधा होती, इलेक्ट्रिकल वर्कशॉप, केमिस्ट्री आणि बॉयोलॉजी लॅब्स.  मुलं इथे आधुनिक शास्त्रीय प्रयोग करू शकत होती! आणि विज्ञानात रुची निर्माण करायला शिकत होती.  या सर्व कक्षांच्या माध्यमातून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक ज्ञान मिळत होतं.

म्युझिक लॅब हे एक वेगळेच आकर्षण होतं.  ह्या लॅबमध्ये सर्व प्रकारची वाद्ये होती. आणि मुलांना वादन शिकवले जात होते.  अशोकने मुलांना एक गोष्ट ठरवून दिली होती ‘प्रत्येकाने किमान एक वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. ‘ यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत होता, आणि संगीत शिकणे त्यांना मानसिक शांती आणि आनंद देत होतं.

मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी फॅशन डिझाईन आणि शिलाईयंत्र होती.  इथे मुलं कपडे डिझाइन करू शकत होती.  शिवाय पिठाची गिरणी, ग्रेव्ही मिक्सिंग मशीन, आणि पापड तयार करण्याची मशीन, चपाती मशीन अशा विविध यंत्रांद्वारे कौशल्य शिकवले जात होते.  ह्या सुविधांद्वारे मुलं व्यवसायिक कौशल्यांमध्ये पारंगत होऊन स्वतःचे जीवन सुटसुटीत बनवण्याच्या मार्गावर होते.

आश्रयाची आणखी एक महत्वाची गोष्ट होती आध्यात्मिकतेला महत्त्व देणे.  रोजचा हरिपाठ, आणि ‘राम कृष्ण हरी’ म्हणून मुलांनी एकत्र केलेला नमस्कार यामुळे वातावरणात एक आध्यात्मिक शांती होती.  मुलांच्या हृदयात धर्माची आणि संस्कृतीची शिकवण बसवण्यासाठी, ह्या प्रथांचे पालन करून घेतले जायचे.

अशोकने आश्रमाच्या शिस्तीला देखील महत्त्व दिलं.  मुलांना कॉन्व्हेंट स्कूलसारखे ड्रेस दिले.

आश्रमात वेळोवेळी विविध तज्ञ, विचारवंत, समाजसेवक, लेखक, कवी, येऊन मुलांना मार्गदर्शन करत होते.  शिक्षण, व्यवसाय, जीवन कौशल्य आणि मानसिक विकासावर भाषणं ईथे चालायची.  हे मुलं प्रेरित होऊन आत्मविश्वासाने भरलेले होते, आणि त्यांना जीवनाच्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करावा.  हे इथे शिकवले जात होते.

अशोकच्या या अनाथाश्रमाच्या माध्यमातून, मुलांना एक नवा दृष्टिकोन मिळाला.  त्यांचं जीवन आता फक्त भाकर भाजीवर अडकलेलं नव्हतं, किंवा फ्रीज, फियाट, फ्लॅट ह्यातच अडकून नव्हते तर त्यांना एक सुज्ञ, सशक्त आणि आत्मनिर्भर भविष्य मिळवायचं होतं.  स्वावलंबन आणि समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा ही त्यांच्यात अशोकने पेरली होती.

अशोकच्या मनानं एक ठरवलेलं होतं – ‘मुलं फक्त शिकली पाहिजेत असं नाही, त्यांना स्वावलंबी आणि समाजासाठी काहीतरी करणारे व्यक्तिमत्त्व बनवले पाहिजे. ‘त्याच्या याच विचारधारेवर आधारित, त्याच्या आश्रमाने नवा आदर्श निर्माण केला.  

आश्रमातील प्रत्येक मुलाने त्याच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने आपले स्वप्न साकारले होते.  त्यांची जीवनाची दिशा आता स्पष्ट होती, आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर एक नवा सूर्य उगवत होता.  अशोकने जो परिवर्तन आणले, ते यथार्थ झाले होते.

आश्रम एक नवीन जीवनाची सुरुवात बनला होता, जिथे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर यशाचा उत्सव होता.  हेच त्याचं सर्वात मोठं यश होतं – एक दिलदार माणसाने सुरू केलेलं..  पाहिलेलं छोटं स्वप्न, आज एका सशक्त आणि आत्मनिर्भर पिढीचे भविष्य उगमस्थान बनलं होतं.. जे ‘स्नेहवन’ नावाने नावारूपाला आले आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आली गाडी.. गेली गाडी..…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं  ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं  लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया  उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने  निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं  पोरीनं  पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले  दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares