मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संवाद : स्वतःचा स्वतःच्या मनाशी… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

संवाद : स्वतःचा स्वतःच्या मनाशी… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

बायका इतरांशी बोलत नाहीत पण कितीतरी लाख पटीने त्या स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलत असतात. काय बरं बोलत असतील त्या ? बघू तरी….

सकाळी झोपेतून उठताना..

आत्ता पावणेसहा वाजले आहेत. सहा वाजता उठेन. पंधरा मिनिटे जरा पडून राहते नाहीतर दिवसभर तेलाच्या घाण्याला बैल जुंपली जातात तसेच दिवसभर मी कामाला जुंपलेलीच असते. तेवढीच पंधरा मिनिटे मला गादीचा सहवास मिळेल. दिवसभर दोघींनाही एकमेकांचा विरह सहन करावाच लागतोच. हा घड्याळाचा काटा कसा दमत नाही कोण जाणे… वाजले सहा.. आता मात्र मला उठावेच लागेल.

दात घासताना..

कोणती भाजी करावी. फ्रिजमध्ये तीन भाज्या असतील. कोबी मला आवडत नाही, वांगं ह्यांना आणि कारलं मुलांना.. जाऊ दे, कोबीचीच भाजी करते. असंही आपल्याला आवडीनिवडी राहिल्याच कुठे?

गॅसजवळ गेल्यावर..

मस्तपैकी चहा टाकते. गॅसजवळ किती बरं वाटत आहे या थंडीच्या दिवसांत. तेल संपत आले आहे. लवकरच त्याची पूर्तता करावी लागणार.. कढईत जरा तेल जास्त झालेल दिसतंय.. थोडं काढून ठेवते नाहीतर “भाजीत तेल खूप झालं” येईल फोन ह्यांचा.. असंही तेल कमीच पाहिजे. माझी दीदी तर फोडणीचे दाणे भिजतील एवढेच तेल वापरते!

आंघोळीला जाताना..

कोणता ड्रेस घालू? कालच पिवळा ड्रेस घातला होता. आज बांधणीचा घालते. कुठे गेली ओढणी? सापडत नाही. नेहमी असेच होते.. कितीही कपडे नीट ठेवले तरी वेळेवर सापडत नाही. पिवळा ड्रेसच अडकवते आता!

डबा भरताना..

तीन पोळ्या घेऊ का एखादी कमी करू? वजन वाढतच चालले आहे. थंडीचे दिवस आहेत, भूक खूप लागते. तीनच पोळ्या घेते. भाजी कशी झाली देव जाणो.. चटणीची वाटी राहू दे बाजूला. वेळ झाली, निघायला हवं लवकर..

कूलुप लावताना..

गॅस, गिझर, लाईट बंद केले ना मी? पुन्हा बघावे तर वेळ जाईल.. सगळे चेक केलेले असते पण कुलूप लावताना नेहमी अशीच द्विधा अवस्था होते माझी..

गाडी चालू करताना…

ये बाई तू नको नखरे करुस.. माहित आहे मला थंडी खूप आहे. तू जर वेळेत चालू झाली नाहीस तर नक्कीच लेट मार्क लागेल. गणपती बाप्पा मोरया!!! चालू हो गं बाई लवकर…

गाडी चालवताना..

श्रीराम जय राम जय जय राम 

श्रीराम जय राम जय जय राम…. खूप लोड आहे कामाचा. आजच्या आज मला करावीच लागणार आहेत..

पंचिंग करताना..

हूश्य!!!.. झालं गं बाई वेळेत पंचिंग… पडला आजचा दिवस पदरात.. लेट मार्क लागला नाही ते बरं झालं.. अजून वीस बावीस दिवस जायचे आहेत.. कधी काय अडचण येईल आणि लेट मार्क लागेल सांगता येत नाही.. वेळेतच आलेलं बरे…

जेवताना..

भाजी मस्त झाली आहे आज.. ह्यांना नक्कीच आवडेल, फोन किंवा मेसेज येईलच ह्यांचा..

चार वाजता चहा घेताना..

कधी यायचा बाई चहा.. आज मात्र चहाची खूपच गरज आहे. चहा टाळायला पाहिजे.. बसून काम आणि त्यात साखरेचे सेवन.. वजन वाढायला तेवढेच पुरेसं. कमी होताना होतं की 100 ग्रॅम 200 ग्रॅमने आणि तेही खूप खूप मेहनतीने.. किती मन मारू.. घेते बाई चहाचा आस्वाद..

संध्याकाळी स्वयंपाक करताना..

कोणती भाजी करू? कंटाळा आलाय.. करते नुसती मुगाच्या डाळीची खिचडी, कढी किंवा टोमॅटोचे सार.. नको नको.. नुसत्या खिचडीवर नाही भागायचे. करतेच सगळा स्वयंपाक..

किचन ओटा आवरताना..

पडली तेवढी भांडी धुवून टाकते.. जेवण झाल्यावर जाम कंटाळा येतो भांडी घासायला..

झोपताना..

बघते जरा थोडावेळ मोबाईल.. (स्टेटस बघत असताना) किती एन्जॉय करतात या बायका.. कसा वेळ मिळतो यांना देव जाणो. मला कुठे बाहेर जायचं म्हणलं की किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात.. त्यापेक्षा बाहेर पडायला नको असं वाटतं.. हीच्या भावाचं लग्न झालेलं दिसतंय.. गळ्यात काय सुंदर दागिना घातलाय.. बघते जरा झूम करून. ही गेलेली दिसते बाहेर कुठेतरी फिरायला. मस्त दिसते जिन्समध्ये… हीच्या घरी झालेलं दिसते हळदी कुंकू, मला नाही बोलावले… पुढचे फोटोच नको बघायला… अरे बाबा कशाला लटकतोय ट्रेनमध्ये.. जरा जाऊन बस की आत ! कशाला शायनिंग मारतोय..

झोप आली असताना..

चला झोपा लवकर आता उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचंय..

मध्यरात्री जाग आली असताना..

आत्ताशी तीन वाजले आहेत. मला वाटले सहा वाजले. अजून तीन तास झोपायला मिळेल आपल्याला…

आनंदित होऊन रग ओढून गाढ झोपून जाणारी मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया..

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वैचारिक प्रतिबद्धता – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “वैचारिक प्रतिबद्धता…” ☆ श्री जगदीश काबरे

लोकसत्तेत 2025 च्या नवीन वर्षापासून प्रख्यात विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनाच्या वाटचालीवर आधारित लेखमाला सुरू केलेली आहे. ती लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीमुळे अत्यंत वाचनीय झालेली आहे. कारण नेमक्या शब्दात डॉ सुनीलकुमार लवटे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आयुष्याची वाटचाल मांडत असतात. आज त्यांनी लिहिलेल्या ‘काशीतील उच्चशिक्षण’ या लेखातील हा महत्त्वाचा अंश आपल्याला नक्कीच माणसाने ज्ञानी होणे म्हणजे काय, शिक्षित होऊन वैचारिक प्रगल्भता अंगी आणणे कसे शक्य असते, हे स्पष्ट करेल. (संकलक JK)

प्राज्ञपाठशाळा, वाई येथील वेदाध्ययन पूर्ण करून सन १९१८ मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादनार्थ काशीस प्रयाण केले. तर्कतीर्थ पदवीसाठी न्याय, वेदांत, शाब्दबोध (व्युत्पत्तीवाद) यांचे अध्ययन आवश्यक होते. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते वेगवेगळ्या शास्त्री-पंडितांकडे जाऊन पूर्ण केले. पैकी वेदांत त्यांनी पर्वतीयशास्त्री यांच्याकडे पूर्ण केला. न्यायाचे शिक्षण वामाचरण भट्टाचार्य यांच्याकडून घेतले. नव्यन्यायाचा काही भाग ते भंडारीशास्त्रींकडून न्यायाचार्य राजेश्वरशास्त्री द्रविड यांच्याकडे नव्यन्याय पूर्ण केला. ‘तर्कतीर्थ’ पदवी मिळाल्यावर ते काशीहून परत येऊन प्राज्ञपाठशाळेत अध्यापक झाले. अध्यापक म्हणून प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थांनी नव्यन्याय, मीमांसा, व्याकरण शिकविले. ‘मीमांसान्यायप्रकाश’ ग्रंथाचे तर्कतीर्थांनी अनेकदा अध्यापन केले. पुढे वेदांताचेही अध्यापन केले. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे, पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांसारखे त्यांचे शिष्य पुढे संस्कृत पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. तर्कतीर्थ पुढच्या काळात धर्मसुधारणा, समाजसुधारणा, स्वातंत्र्य चळवळीतील प्रबोधन, संघटनकार्यात व्यस्त झाले, तसे त्यांचे अध्यापन बंद झाले. त्यांनी अध्यापक पदाचा राजीनामा दिला, तरी ते प्राज्ञपाठशाळेत अन्य कार्याने संलग्न राहिले.

तर्कतीर्थांनी नंतरच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाच्या बरोबरीने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यातून त्यांच्यातील पंडित उदारमतवादी आणि आधुनिक बनत गेला. सर्वधर्म अभ्यासाने त्यांना वैश्विक बनवले. ‘हिंदुधर्म समीक्षा’ ते ‘सर्वधर्मसमीक्षा’ असा त्यांचा लेखनप्रवास असो वा ‘आनंदमीमांसा’ आणि ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’सारखे प्रबंध लेखन असो, त्यातून तर्कतीर्थ धर्मनिरपेक्ष होत गेले! नित्य स्नान-संध्या करणारा हा धर्मपंडित जीवनाच्या एका वळणावर कर्मकांडमुक्त होतो ते ज्ञानाचे सत्य रूप गवसल्यामुळे. पत्नी सत्यवतीने एकदा ‘देव पारोसे राहतात पूजेअभावी’ असे म्हटल्यावर, तर्कतीर्थ देव्हाऱ्यातील सर्व देव, टाक आणि मूर्ती कृष्णार्पण करतात. अनेक वर्षांच्या संस्कारांतून निरीच्छपणे मुक्त होणे, हे प्रखर बुद्धिवादी विचार आणि कृतीनेच शक्य असते. नास्तिक म्हणवून घेणाऱ्यांनाही जी गोष्ट अशक्य वाटे, ती तर्कतीर्थ केवळ वैचारिक प्रतिबद्धतेमुळे (करेज ऑफ कन्व्हिक्शन) करू शकले. देव, धर्म, पूजा, इ. सर्व गोष्टी या मूलत: भाव आणि श्रद्धेचे आंतरिक विषय होत. आपण ते प्रतीक, पूजा नि कर्मकांडात अडकवलेत. ज्ञान, सत्य ही तत्त्वे उमगली की मग ती जीवनमूल्ये व जीवनशैलीची अंगे बनतात, बाकी सर्व मग शून्य ठरते.

लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे 

माहिती संग्राहक व प्रस्तुती : जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

🌸 विविधा 🌸

☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

 “आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

 विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…..

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी घरातल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव आत्यानी काहीही ठेवलं असलं तरी त्या नावाने मुलाला हाक मारली जायची नाही. प्रत्येकाला वेगळंच एखादं टोपण नाव असायचं.

तेव्हा घरात चार-पाच मुलं असायची. पहिल्या मुलाचे नाव सहसा जे कुलदैवत असेल त्याचं ठेवलं जायचं. मला वाटते की त्यानिमित्ताने देवाचं नाव घेतलं जावं असा हेतु होता.

दत्तात्रय,पांडुरंग,खंडोबा वगैरे नावं ठेवली जायची. पण त्याचे अपभ्रंश होऊन दत्या, पांड्या, खंड्या अशीच हाक मारली जायची.

माझ्या मामाचे नाव ज्ञानेश्वर होते. त्याला ज्ञाना किंवा माऊली म्हटले जायचे. ते मात्र कानाला फार गोड वाटायचे.

माझ्या मोठ्या दिरांचे नाव नरसिंह आहे. उभ्या आयुष्यात त्यांना त्या नावाने कोणीही हाक मारली नाही. त्यांना बंडू हे टोपण नाव पडले होते. तेच सगळीकडे वापरले जायचे.

बाळू हे नाव पण त्या काळी फार प्रचलित होते. नंतर बाळू नाव फार पुढे गेले नाही. कारण नंतर बाळू हा शब्द.. “जरा यडाच आहे.. ” अशा अर्थाने वापरला जायला लागला.

यांच्या एका मित्राचे नाव तर बाळ असे आहे. अगदी एक्याऐंशीव्या वर्षी सुद्धा ते बाळच आहेत… आहे की नाही गंमत..

घरात धाकटं भावंड जन्माला आलं की ते मोठ्या भावाला दादा म्हणायचं. लाडाने त्याला दाद्या.. सुद्धा म्हटलं जायचे…. अजून मुलं झाली की त्यांना तात्या, आप्पा, अण्णा,भाऊ अशा नावाने बोलवले जायचे. ते इतके सार्वजनिक व्हायचे की सगळेजण त्याच नावाने त्यांना हाक मारायचे आणि तेच नाव त्यांना आयुष्यभर लागायचे.

यांच्या एका बहिणीला पोपट असे म्हणायचे.. का ते माहित नाही… गंमत म्हणजे ते नाव त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं होतं की त्यांना त्याचं काही वाटायचं नाही.

एखादी मैना पण असायची..

” काय ग चिमणे ” असं माझ्या मैत्रिणीला कधीतरी लहानपणी म्हणे तिचे आजोबा म्हणाले होते..

आता साठीतही ती चिमणीच आहे.

एखादा बोका आणि माऊ पण असायची…

सोनुल्या,छकुल्या मोठेपणी सोनाबाई छकुताई होतात..

गोडुल्या मात्र गोडुल्याच राहतात.

ठकू,ठकी तसंच राजू आणि पप्पू पण असायचे…

राजा आणि राणी ही नावं पण बरीच वर्ष राज्य करत होती.

बंटी बबली पण त्यावेळेस जोरात होते.

यात सगळ्यात मोठा भाव खाल्ला ” बेबी “या नावाने … हे इतकं प्रसिद्ध झालं होत की प्रत्येक घरी एक तरी बेबी असायचीच.. म्हाताऱ्या झाल्या तरी त्यांना त्याच नावाने हाक मारायचे..

परवाच मी बहिणीला फोन केला तेव्हा म्हटलं,

“अगं तो बेबीचा नातू आहे.. “

त्याच्यानंतर माझी नात मला विचारत होती,

“आजी बेबीला नातु कसा काय झाला? “

मी हसायला लागले. म्हटलं, “अग बेबी सत्तर वर्षाची आहे”

तिला खूप वेळ हसू येत होत.

एका मागोमाग एक मुली झाल्या तर त्यांना आक्का, ताई असं म्हटले जायचे. मग अजून मुली झाल्या की ताईची मोठी ताई व्हायची आणि दूसरी छोटी ताई व्हायची.

नंतर इतकं मोठं म्हणायला नको म्हणून तिला सुटसुटीत छोटीच म्हणायला सुरुवात व्हायची.

परवाच आम्ही आमच्या नात्यातल्या छोटीच्या पंच्याहत्तरीला गेलो होतो.

काही वेळेस हौसेनी,कौतुकाने मोठी नावं ठेवली जायची. पण इतकं मोठं नाव कोण घेणार? 

मग सरस्वतीची सरू, निलांबरीची निला,गोदावरीची गोदा,कलावतीची कला आणि कुमुदिनीची कुमुद होऊन जायची.

अगदी तीन अक्षरी नाव असेल तर तेही पूर्ण उच्चारले जायचं नाही. मालतीचं मालु, शैलजाचं शैला, सुशीलाचं सुशी, नंदिनीचे नंदा,मिलिंदचे मिल्या, मंगेशचे मंग्या होऊन जायचं…

तसंच सुनेत्रा,सुमेधा,सुरेखा,या नावातला सु काढून टाकला जायचा.

त्यामुळेच मला वाटते नंतर हेमा, शांता, सुधा,लता, नंदा,नीता अशी सुटसुटीत नावं ठेवली गेली असावीत.

अर्थातच सीमा, मीना,गंगा, चंद्रा यांना हाक मारताना जर कोणी त्यांच्यावर रागवले असेल तर सीमे,मीने, गंगे,चंद्रे होऊन जात असे.

प्राणचा खलनायक इतका गाजला की कोणी कधी आपल्या मुलाचं नाव ” प्राण “ठेवलंच नाही.

रामायणातली “कैकयी” पण एकमेवच…

आमच्या नात्यात एकांना ओळीने पाच मुली झाल्या. मग त्यांनी म्हणे नवस केला की मुलगा झाला तर त्याचे नाव ” दगडू “ठेऊ..

नेमका मुलगा झाला. तो दगडूच राहिला… परत त्याचं काही वेगळंपण वगैरे कोणाला वाटायचं नाही. त्याला प्रेमाने सगळे दगडू म्हणायचे.

माझ्या एका मैत्रिणीचे नाव ” मनकर्णिका ” असे होते. ती या नावाला फार वैतागत असे. कारण या नावाने तिला कोणी कधीही हाक मारली नाही. तिचे मनू हेच नाव प्रचलित झाले.

लहानपणी लाडानी ” गुंड्या चांगलाच खोडकर आहे ” असं कोणी म्हटलं की त्याचं नाव “गुंड्याच” पडायचं.

काही वर्षांनी कानाला ते बरं वाटतं नसावं, मग त्याचा गुंड्याभाऊ झाला असावा…

चिंटू मात्र चिंटूच राहिला.

गंमत म्हणजे लाडाने ठेवलेल्या या टोपण नावात प्रेम, माया,आपुलकी असायची. त्यामुळे त्याचा राग कधी यायचा नाही. उलट त्यात आपलेपणा वाटायचा. म्हणूनच साठीला आलेला माझा पुतण्या प्रशांत म्हणाला की, ” अजूनही मला कोणी पशा म्हटलं की मला फार आवडतं.. लहानपण आठवतं. आता असं म्हणणारे पण खूप कमी झाले आहेत… “……

वय कितीही वाढलं तरी मनाला बालपणाची ओढ असतेच…

त्या नावातला स्नेह हवाहवासा वाटतो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे

गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. …. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.

अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे.

खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल.

देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे.

एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही? 

दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?

खरं म्हणजे माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी. निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?

खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन.

आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायलमध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर) त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते. युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.

सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !

© श्री सुनील देशपांडे 

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ?

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची.

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार.. ‘ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी.. !

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टी पॉय वरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली.

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला.

नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही. “

“मला माहितेय.. ! पण मला जायचंय आता. ” मन्या शांतपणे बोलला.

“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता. ” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”

“म्हणजे काय शंकाय का तुला?”

“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा

पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?”

नॉट सो स्ट्रेंज यार… !!

वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……

जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?

समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.

पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.

भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

खरंतर त्या कागदाबद्दल इतकं बोलण्यासारखं काहिच नव्हतं. पण एखादी गोष्ट उकरुन काढणे म्हणजे काय? याचा अनुभव परत एकदा आला. प्रत्येक काही दिवसांनी एक तिथी परत परत येते, तितक्याच सहजतेने हा उकरुन काढण्याचा अनुभव काही कालावधीनंतर परत येतोच. कधी तो येतो, तर काही वेळा आणण्यात आपणही मागे नसतो….. असो.

 लिहिलेल्या काही जुन्या कागदांना खूपच महत्त्व प्राप्त होतं. अर्थातच ते कोणी लिहिले, त्यात काय आहे, आणि कोणाच्या हाती लागले आहे यावर सुध्दा ते अवलंबून असतं. पण यांचं तसं नव्हतं…….

 माझ्या हस्ताक्षरातले असेच काही कागद घरातल्या अशा माणसाच्या हाती लागला, की त्याला महत्त्व येण्याऐवजी त्याचा विनोद झाला. आणि मग वाद……

 तुमच्या या कागदांना रद्दीत सुध्दा जागा नाही. असं म्हणत ते वाचले जात होते. अगदी तारीख आणि वर्ष यासकट.

 कागदावरच्या बऱ्याच गोष्टी सारख्याच असल्या तरी तारखेनुसार त्याच्यातलं अंतर एक वर्ष इतका मोठ्ठा काळ दाखवत होतं. म्हणजे वाढदिवस साजरा केला असता तर त्यातले काही कागद एकविस वर्षांचे सुद्धा झाले असते.

 यातही मी वर्षभरानंतर बऱ्याच गोष्टी तशाच लिहू शकतो, याच कौतुक न करता तेच तेच लिहिण्यात काय अर्थ? जे आपण करतच नाही……… असा उपहास होता. आणि अक्षराबद्दल तर एक अक्षर तोंडातून निघालं नाही. खरंतर माझ्या अक्षरावरून मी साक्षर आहे हे तिला मान्यच नाही.

 हा अक्षर, साक्षर, मधला क्ष, आणि गणितातला क्ष तेव्हापासूनच अक्षरशः माझ्या बाबतीत यक्षप्रश्न आहे.

 म्हणजे क्ष किरण यंत्राने काही गोष्टी समजतील. पण माझं लिहिलेलं समजणार नाही.

 आता एक वर्ष अंतर असणाऱ्या कागदावर काय वेगळं लिहिलेलं असणार….. नवीन वर्षात नियमितपणे करायच्या, आणि निग्रह करून सोडायच्या गोष्टी त्यात होत्या.

 यातल्या करायच्या गोष्टींचा निग्रह होत नव्हता, तर काही गोष्टी सोडल्याचा ग्रह मी करुन घेतला होता.

 ज्या गोष्टी करायच्या नाहीत ती व्यसनं आणि सवयी अर्थात वाईट सवयी आहेत असं इतरांच म्हणणं. आता हे इतर एकच असतील तरी त्यांचं म्हणणं हेच बहुमतासारखं असतं असं नाही, तर तेच बहुमत असतं यात शंका नाही……

 करायच्या काही गोष्टींमध्ये ज्या करायच्या होत्या त्याच्या विरुद्ध साहजिकच सोडायच्या होत्या. जसं सकाळी लवकर उठायचं म्हणजेच उशिरापर्यंत झोपणं सोडायचं होतं. ज्याला लोळत पडणं हा शब्द माझ्यासाठी घरात वापरला जातो.

 हळू आणि शक्यतो गोड आवाजात बोलायचं. म्हणजेच मोठ्याने बोलायचे तर नाहीच, पण बोलण्यातला ताठपणा सुद्धा सोडायचा हे ओघाने आलंच होतं. हे वाचतांना समोरचा आवाज उगाचच हुकूमशहा सारखा वाटला.

 नियमितपणे सूर्य नमस्कार घालणे. असंही त्यात होतं. नमस्कार करणे आणि घालणे यात फरक असतो. हे सुद्धा मला समजवून देण्यात आलं. आणि एक नमस्कार सुध्दा झाला. अगदी कोपरापासून. आता हा नमस्कार केला, की घातला हे मी ठरवेन…. पण नमस्कार करतेवेळी तेव्हाच तीच रुप मला सकाळच्या सूर्यासारखं तेजस्वी वाटलं……. आणि माझा चेहरा अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखा शांत वाटला……

 अन्न हे पूर्ण ब्रह्म…… उदर भरण नोहे……. याचा दाखला देत. जेवायला काय आहे? हे विचारायचं नाही. म्हणजेच जे मिळेल ते खायचं. आपल्या घरातलं चांगलच असतं. असं मीच लिहिलं होतं. पण…..

 हे वाचतांना त्यांचा रोख जिभेच्या पुरवलेल्या लाडामुळे माझ्या वाढलेल्या पोटाकडे होता.

 विकएंडला एकट्याने जायचं नाही. म्हणजेच जोडीने आणि गोडीने जायचं. हे फक्त लिहिलेलंच होत…… अंमलबजावणी व्हायची होती……

 म्हणजे वरच्या काही गोष्टी मी ठरवणार होतो, पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी करायलाच पाहिजेत हे माझी परवानगी न घेता ठरवण्यात आलं होतं. आणि तेच त्या कागदांवर माझ्याकडून लिहिलं (गेलं) होत. अशा छोट्या छोट्या पण मोठ्या वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या.

 नंतर नंतर तर कागदावर लिहिलेल्या गोष्टी वाचण्याचा वेग इतका वाढला, की काही गुंतवणुकीच्या जाहिरातीत शेवटी फक्त नियम आणि अटी लागू हेच समजतं, बाकी सगळं कानावरून जात, तसंच सगळं कानावरून गेलं. फक्त शेवटचा सोडलेला उसासा तेवढा समजला.

 असो…… आता तसाही त्या कागदांचा उपयोग नसला तरी यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तशाच, पण चांगल्या अक्षरात परत लिहून काढेन. पण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला………

 तो पर्यंत संदर्भ म्हणून गरज वाटली तर हे कागद आहेतच……….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर

कडक उन्हाळ्याचे दिवस, ऑफिसच्या कामासाठी भर उन्हात बाहेर पडावं लागलं. गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून रिक्षा केली. तासाभरात काम आटपून परत ऑफिसला निघालो दहा मिनिटं झाली तरी रिक्षा मिळेना. चार-पाच जणांनी ‘नाही’ म्हटलं. ऑनलाइन बुकिंग पण होत नव्हतं. चिडचिड वाढली. काही वेळाने एक रिक्षा थांबली. लाल रंगाचा शर्ट,जीन्स,मानेपर्यंत वाढलेले केस अशा हँकी-फिंकी तरुण ड्रायव्हरला पाहून खात्री झाली की नकार येणार पण तो चक्क तयार झाला. त्याचा विचार बदलायच्या आधी लगबगीनं रिक्षात बसलो.

“थॅंक्यु दादा,बराच वेळ थांबलो होतो. कोणी यायला तयार नव्हतं. ”

“रिक्षासाठी पॅसेंजर म्हणजे देव. त्याला नाही म्हणायचं नसतं” रिक्षावाल्याकडून अनपेक्षित उत्तर.

“तुमच्यासारखा विचार केला तर प्रॉब्लेमच नाही पण इथं प्रत्येकाला लांबचं भाडं पाहिजे. मोबाईल नाहीतर गप्पा मारत टाईमपास करतील पण कामं करणार नाही. ”

“काहीजण तर रिकामी गाडी चालवतात पण जवळचं भाडं घेत नाहीत. अशांमुळेच पब्लिक रिक्षावाल्यांना सरसकट शिव्या घालतं. ”रिक्षावाला मार्मिक बोलत होता. चांगलाच समजूतदार निघाला. गप्पांच्या नादात कधी उतरायचं ठिकाण आलं कळलचं नाही.

“एकशे तीन झालेत. ऑनलाइन पेमेंट करतो. ”मी

“साहेब,आजची भवानी तुमच्याकडूनच. कॅश असेल तर द्या. ”

“ओके” मी पाकीटात पाहिलं तर शंभरच्या तीन नोटा होत्या. एक नोट काढली पण त्याक्षणी मनात आलं की आपल्याकडची फाटकी नोट खपवावी म्हणून मधोमध फाटेलली पण चिकटपट्टी लावलेली नोट पुढे केली. रिक्षावाल्यानं आधी हँडलला मग कपाळाला लावून नमस्कार करून नोट खिशात ठेवली. त्यावेळी मी तीन रुपयांसाठी खिसे चाचपडत होतो.

“साहेब,राहू द्या ” 

“नाही असं कसं,कष्टाचे पैसे आहेत”

“पुन्हा भेटलो की द्या ” छान हसत त्यानं रिक्षा सुरू केली आणि काही क्षणातच दिसेनासा झाला.

मी एकटक पाहत राहिलो. पेहरावाच्या अगदी विरुद्ध टोकाचं रिक्षावाल्याचं आदबीचं बोलणं आणि वागणं यामुळे भारावलो. त्याच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आणि एकदम आपण केलेली घोडचूक लक्षात आली. अरे बापरे !! स्वार्थाच्या नादात काय करून बसलो. रिक्षावाला माझ्याशी चांगला वागला आणि मी काय केलं तर फाटकी नोट देऊन त्याला फसवलं. स्वतःची लाज वाटायला लागली. प्रचंड राग आला. अस्वस्थ झालो. काय करावं सुचेना दुसरी नोट देऊन चूक सुधारावी असं डोक्यात आल्यानं तिरमिरीत गाडी घेऊन निघालो.

काळ्या हुडची रिक्षा,नंबर माहिती नाही आणि लक्षात राहिलेला ड्रायव्हर, एवढ्या भांडवलावर शोधाशोध सुरू केली. चार-पाच चौक फिरलो. रस्त्यावरची प्रत्येक रिक्षा निरखून पाहत होतो. रिक्षा स्टँड,दुकानं,पान टपरीवर चौकशी केली पण उपयोग झाला नाही. खूप निराश झालो. अपराध भाव वाढला. फाटकी नोट बघितल्यावर तो भला माणूस आपल्याविषयी काय विचार करत असेल या जाणिवेनं बेचैनी वाढली. जवळच्या दोन-चार किलोमीटर परिसरातील जागांवर चकरा मारून अर्धा-पाऊण तासानं ऑफिसमध्ये आलो. चेहरा बघून सहकाऱ्यांनी “काय झालं” म्हणून विचारलं.

“काही विशेष नाही. नंतर सांगतो म्हणत बोलणं टाळलं आणि कम्प्युटर सुरू केला पण चित्त थाऱ्यावर नसल्यानं कामात लक्ष नव्हतं. वारंवार चुका व्हायला लागल्या.

“काय साहेब,तुमच्यासारख्या जंटलमनकडून ही अपेक्षा नव्हती” फाटकी नोट हातात घेऊन बोलणारा रिक्षावाला सारखा डोळ्यासमोर यायला लागला.

तब्येत ठीक नाही कारण देऊन ‘हाफ डे’ सुट्टी घेऊन घरी आलो. मला अवेळी आलेलं पाहून बायकोला आश्चर्य वाटलं पण तिनं लगेच काही विचारलं नाही. थोड्यावेळानं बायकोला घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर काहीच प्रतिक्रिया न देता ती एकटक माझ्याकडे पाहत राहिली.

“काय झालं असं का पाहतेस”

“साध्या साध्या गोष्टींचा किती त्रास करून घेतोयेस”

“तुला वाटती तितकी साधी गोष्ट नाहीये. एका चांगल्या माणसाला फसवलं”

“इट्स ओके,ठिक आहे. तुला चूक कळली. सुधारायचा प्रयत्न देखील केलास यातच सगळं आलं”

“अगं पण”

“असं होतं. ठरवून नाही परंतु एखाद्या क्षणी मोहाला भुलून जाणीवपूर्वक चुकीचं वागतो नंतर त्याचा खूप पश्चाताप होतो मग स्वतःलाच दोष देतो अशावेळी फक्त मनस्तापा शिवाय काही हाती लागत नाही. प्रत्येकाला हा अनुभव येतो ”.

“पण माहिती असूनही मी मुद्दाम वागलो याचाच जास्त त्रास होतोय. ”

“बास आता !! जे झालं ते झालं त्यावर उगीच जास्त विचार करू नकोस. आपल्याला मिळालेली फाटकी नोट दुसऱ्याच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सगळेच करतात. म्हणून म्हणते तू फार मोठा गंभीर गुन्हा केलायेस असं काही नाही आणि शंभर रुपयांसाठी इतका त्रास करून घेतलाय तो पुरेसा आहे. ”

“रिक्षावाल्याचं नुकसान झालं ना”

“मग भरून देऊ. भरपाई म्हणून डबल पैसे देऊ. ”

“हा बरोबर. असंच करू”

“चल. त्याला पैशे देऊ आणि सॉरी सुद्धा म्हणू. ” बायको उपहासानं म्हणाली.

“पण तो भेटणार कसा? हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना ” मी विचारलं.

“अरे सोन्या !!,एवढं कळतयं ना मग कशाला जीव जाळतोस. एक काम कर, त्याची मनापासून माफी माग म्हणजे बरं वाटेल आणि आता हा विषय सोडून दे. होतं असं कधी कधी….. ”

बायकोनं समजावल्यानं अपराधभाव बऱ्याच कमी झाला तरी सल कायम होती. बरोब्बर शंभर दिवस झालेत अजूनही तो रिक्षावाला भेटलेला नाही. कधी भेटेल ते माहिती नाही. मी मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. या दरम्यान अजून एक फाटकी नोट पाकिटात आली. ती मात्र घरातच ठेवलीय…..

उगीच पुन्हा…..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’नारी शक्ती दिवस…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नारी शक्ती दिवस…☆ सुश्री शोभा जोशी ☆

राणी मां गाईदन्ल्यू

“नारी शक्ती दिवस …”

हम इस देश की नारी है!

फूल नही चिंगारी है

असं गर्वाने सांगणार्‍या या पराक्रमी स्रियांचा सन्मान करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘नारी शक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आपला पराक्रम सिध्द करणार्‍या अनेक स्रिया आपल्या देशात होऊन गेल्या. अगदी देवी देवतांपासून अलिकडच्या स्रियांपर्यंत. अगदी जनजातीतील स्रिया सुध्दा याला अपवाद नाहीत.

२६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून का निवडला?जी महिला ब्रिटिशांविरूध्द लढा देताना ऐन तारूण्यात १४ वर्षं ब्रिटिशांच्या कैदेत राहिली, त्या राणी मां गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस.

पूर्वेकडील मणीपूर राज्यात, काला नागा पर्वतांची रांग आहे. तेथील लंकोवा गावामध्ये,रोंगमै जनजातीतील लोथोनाग व करोतलीन्ल्यू या दांपत्त्याच्या पोटी,२६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यूचा जन्म झाला. ७ बहिणी व १ भाऊ असा त्यांचा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखविणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीनुसार,गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या,दृढ इच्छाशक्ती असलेल्या,प्रतिभासंपन्न आणि चिंतनशील होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिश्र्चनांचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून संरक्षण करणं,रूढी परंपरा टिकवून ठेवणं,अंधश्रध्दा दूर करणं,तसंच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षांपासून उराशी बाळगलं होतं.

‘हेरका’ या धार्मिक आणि नंतर स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलेल्या आंदोलनाचा प्रणेता,गाईदन्ल्यूंचा चुलत भाऊ,हैपोऊ जादोनांगला ब्रिटिशांनी फासावर लटकावले आणि वयाच्या १६ व्या वर्षी या लढ्याचे नेतृत्व गाईदन्ल्यूंकडे आले.

इंग्रजांना टॅक्स न देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. साथीदारांच्या साथीने,गनिमी काव्याने इंग्रजांवर हल्ले केले. असे करून त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. त्यांना पकडण्यासाठी आधी २००/- रू. आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं पण त्या इंग्रजांच्या हाती लागल्या नाहीत.

१६ फेब्रु. १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. पण पोलोमी गावी आऊट पोस्ट बनवत असताना,एका बेसावध क्षणी त्या पकडल्या गेल्या. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला.

१९३७ साली पं. नेहरूंनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. त्यांचा पराक्रम पाहून, ‘ आपण तर नागांची राणी आहात ‘या शब्दात त्यांचा गौरव केला. राणी माॅं गाईदन्ल्यूची तुरूंगातून सुटका करावी,ही नेहरूंची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली. स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली.

सूर्याला तात्पुरते ग्रहण लागले म्हणून तो कायमचा निस्तेज होत नाही. तसेच तुरूंगातून सुटल्यावर राणी माॅं पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलं. १९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. १७ फेब्रु. १९९३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. त्यांचे देशासाठीचे योगदान पाहून त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले होते.

जनजातीमध्ये इतरही अनेक स्रियांनी मुघलांविरूध्द आणि इंग्रजांविरूध्द लढताना परा क्रम गाजवला आहे. वेळप्रसंगी प्राणांचे बलिदान दिले आहे. उदा.

महाराणी दुर्गावती. – ५ आॅक्टोबर १५२४ ला गोंंडवनातील कालिंजर किल्ल्यात जन्मलेली दुर्गावती पुढे गढमंगला राज्याची राणी झाली. या कुशल प्रशासक,पराक्रमी, शूर वीर राणीने अकबराच्या सैन्याचा युध्दात दोनदा पराभव केला. तिसर्‍या वेळी हार समोर दिसत असताना,ती बादशहा अकबराला शरण गेली नाही. तिने स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून मरण जवळ केले.

झलकारीबाई – 

‘दैवायत्त कुले जन्मं

मदायत्तं तु पौरूषम् ‘

माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा हे हातात नसलं तरी जन्म कसा घालवावा हे आपल्याला ठरवता येतं. ही उक्ती खरी करून दाखवली ती झलकारीबाईंनी. बुंदेल खंडातील भोजला गावामध्ये जनजातीतील एका निर्धन कोळी कुटूंबातील,खांदोबा आणि धनिया या दाम्पत्यापोटी २३ नोव्हेंबर १८३० रोजी जन्मलेल्या झलकारीबाई पुढे राणी लक्ष्मीबाईंच्या ‘दुर्गा ‘ नावाच्या सेनेच्या महिला तुकडीच्या सेनापती झाल्या. तलवारबाजी,बंदुका, तोफा चालविण्यात त्या पटाईत होत्या. झाशीच्या किल्ल्यावर इंग्रजांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी,राणी लक्ष्मीबाईंच्या जीवाला धोका आहे हे झलकारीबाईंच्या लक्षात आले. त्यांनी राणींच्या दत्तक पुत्राला घेऊन,किल्ल्यातून बाहेर पडण्याचा सल्ला राणींना दिला.

झलकारीबाई आणि राणींच्या चेहर्‍यात खूप साम्य असल्याने त्या राणींच्या वेशात इंग्रज सैन्याला सामोर्‍या गेल्या आणि राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचवले.

फुलो आणि झानो – संथाल परगण्यातील सिध्दो – कान्होंच्या या बहिणी कुर्‍हाडीने शत्रूला मारण्यात तरबेज होत्या. त्यांनी इंग्रज आणि जनतेच्या शोषणकर्त्या जमीनदारांविरूध्द सशस्र संघर्ष केला.

अंदमानची लीपा,मिझोरामची राणी रोपुईलियानी,अरूणाचलच्या सीमावर्ती भागातील नीरा आणि सेला,छत्तीसगड मधील दयावती कंवर, राजस्थानची कालीबाई,उत्तराखंडची गौरादेवी,गोंडवनाची राणी फुलकंवर इ. या निरनिराळ्या राज्यातील सर्व स्रियांनी इंग्रजांविरूध्द लढा दिला आहे. जनजातीतील अशा अजून कितीतरी स्रिया आहेत.

या अधुनिक काळातील महिलाच पराक्रमी होत्या असं नाही. तर वारसा अगदी आपल्या देवी देवतांपासून चालत आला आहे. महिषासूर मर्दिनी,काली माता,चंडिका अशा अनेक देवता ज्यांनी आपल्या शक्तीने आणि पराक्रमाने अनेक राक्षसांचा नाश केला.

इतिहासात डोकावले तर राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,राणी ताराबाई,राणी चेन्नम्मा अशा कितीतरी स्रियांची नावं समोर येतील. या झाल्या युध्दभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या स्रिया. पण बौध्दिक क्षेत्रातही स्रिया मागे नाहीत. पुराणातील गार्गी, मैत्रेयी,लोपामुद्रा इत्यादींनी आपल्या बुध्दीचातुर्याने मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांना हरवले होते. विद्वत्तेच्या बाबतीत डाॅ. आनंदीबाई जोशी,डाॅ. रखमाबाई राऊत,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले इ. स्रियांनी आपली विद्वत्ता अशा काळात सिध्द केली की, ज्या काळात स्रियांना घराबाहेर पडण्याची देखील बंदी होती.

या स्रियांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी,पराक्रमी राणी गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस ‘नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. 💐🙏

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फ्यूज उडालेले बल्ब… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

फ्यूज उडालेले बल्ब... 💡 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

फ्यूज उडालेले सगळे बल्ब एकसारखेच असतात !!

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाला सारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले.

ते सेवा निवृत्त असले तरी, स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं.

ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतानासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत.

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवा निवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे. ” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले,“सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज वुडलेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॉट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला. “

पुढे ते म्हणाले……

” मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो.

.. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत….. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.

.. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

 — – आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा, पण मला माहीत आहे.

सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत – त्यांची वॉट क्षमता काहीही असो – 0, 10, 40, 60, 100 वॉट – आता त्याने काहीही फरक पडत नाही.

.. आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

.. आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल… उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात. परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही.

….. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे. “

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात.

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो.

लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.

आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा. हवा तर समाज कार्यास वेळ द्या !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares