☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(एका इंग्लिश पोस्टवर आधारित)
एका गाढवाला झाडाला बांधले होते.
एका मूर्खाने काहीही विचार न करता ते सोडवले.
गाढव शेतात घुसले आणि जोरजोरात ओरडू लागले.
हे पाहून शेतकऱ्याच्या पत्नीने चिडून गाढवाला गोळ्या घालून ठार केले.
गाढवाचा मालक चिडला. त्याने शेतकऱ्याच्या पत्नीला गोळ्या घातल्या.
बायको मेलेली पाहून शेतकरी परत आला, त्याने जाऊन गाढवाच्या मालकाला गोळ्या घातल्या.
गाढवाच्या मालकाच्या पत्नीने आपल्या मुलांना जाऊन शेतकऱ्याचे घर जाळण्यास सांगितले.
पोरांनी संध्याकाळी उशिरा जाऊन आईची आज्ञा आनंदाने पार पाडली, त्यांना वाटले शेतकरीही घरासह जळाला असेल.
खेदाची गोष्ट म्हणजे तसे झाले नव्हते….. शेतकरी परत आला. तो एकटाच असल्याने त्याला असहाय्य वाटू लागले. त्याने आपले जाती बांधव एकत्र केले आणि त्यांना गाढवाच्या मालकाच्या जातीवरून आरोप करून चिथवले आणि त्यांनी गाढवाच्या मालकाच्या पत्नी आणि दोन मुलांना घरासह आग लावून जाळले.
मग गाढवाच्या मालकाचे जाती बांधव एकत्र झाले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जाति बांधवांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही जातींमध्ये प्रचंड धुमश्चक्री आणि राडा झाला.
त्यानंतर ठिकठिकाणी जाती-जातींमध्ये व धर्माधर्मांमध्ये उद्रेक सुरू झाले.
खूपच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दंगे सुरू झाल्याने ते शमविण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले.
सैन्यबळ देशांतर्गत यादवीमध्ये गुंतलेले पाहून शत्रूने देशावर चाल केली…..
हे सर्व पाहून व्यथित झालेल्या एका साधूने त्या मूर्ख व्यक्तीला म्हटले, ” बघ तुझ्यामुळे देशावर किती मोठे संकट ओढवले !”
तो म्हणाला, ” मी काय केले ? मी फक्त गाढवाला सोडले.”
तो साधू म्हणाला, ” हो, पण, त्यावर सर्वांनी अविचाराने चुकीची प्रतिक्रिया दिली, कुणाचे तरी ऐकून कुणाला तरी दोषी ठरवले, आणि आपल्या मनातल्या भुताला सोडले.”
आता तरी तुम्हाला कळलं का?—- कुणीही काहीही करत नाही. कुणीतरी मूर्ख तुमच्यातील अहंकाराला चालना देऊन दुष्प्रवृत्तींना जागृत करतो…..
…… त्यामुळे पुढच्या वेळी प्रत्युत्तर देण्यापूर्वी, प्रतिक्रिया देण्यापूर्वी, तक्रार करण्यापूर्वी, दटावण्यापूर्वी किंवा सूड उगवण्यापूर्वी …… थांबा आणि विचार करा. काळजी घ्या…… कारण ….
☆ “कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका”! ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते.घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत.शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या,फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची.रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे.पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !आस-पास,शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची.पण शास्त्रीबुवांची बायको-मुलं मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत.पण त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून,भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे.पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकडे ती अतीव दयनीयतेनं पहात असे.त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई.
आजचा दिवसही सणाचा,दिवाळीचा होता !
घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला.तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते .मुलं सकाळपासून उपाशी होती.आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते.
शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला,’इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला,ना कधीही आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण आज अस्वस्थ का वाटतंय ? परमेश्वर दयाळू असतो,असं म्हणतात.मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये ?आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?की परमेश्वर दयाळू आहे ही अफवाच आहे ?होय.तसंच असलं पाहिजे.तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस पहावे लागले नसते.’
विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.
पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते.त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं.तो शब्द होता ”दयाघन” !
त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.
जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता.तो त्यांनी उचलला आणि त्या ”दयाघन” शब्दावर फुली मारली !
त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती.
त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला,सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यानं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्व सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली.त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या.निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.
श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती.
इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली.शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवेकोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत,
मुलांच्या अंगावर ओरडले,
” काय रे ! कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?”
दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही,असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत,असं क्षणभर का होईना,पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,
” बाबा,इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !
आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीय !”
श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.
घरी येऊन पहातात तर काय? घरभर दिवे तेजाळत होते.सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता.एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्णालंकारांनी ती सजली होती.शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं,”एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?”
” काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला.आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला.जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय.”
शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.
” काय निरोप दिलाय ?”
श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.
” त्यानं निरोप दिलाय की..
‘शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !’…
कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?”
पत्नीनं गोंधळून विचारलं.
क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.
पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता,कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली.हळूवार उघडली.आणि पानावरच्या ”दयाघन” या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली.
भारतीय संस्कृतीत सौरमास आणि चांद्रमास असे दोन प्रकार आहेत.चांद्रमासात ३६० दिवस येतात आणि सौरमासात ३७१ दिवस येतात.दोन्हीमध्ये दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो.हा भरून निघण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो.याला धोंडामहिना असेही म्हणतात.
याला पुरूषोत्तम मास का म्हणतात?
प्रत्येक महिन्याचा एक स्वामी ठरलेला आहे.अधिक महिन्याचे स्वामी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला.त्यावेळी श्रीविष्णु यांनी यांचे दायित्व घेतले.म्हणून याला पुरूषोत्तम मास असे म्हणतात.
३३ चे महत्व काय?
आपण एकूण ३३ कोटी देव मानतो पण ते कोटी नसून कोट आहे.कोट म्हणजे प्रकार.ही गणितातील कोटी संख्या नाही.
१२ आदित्य,११रुद्र, ८ दिक्पाल /वसु,१ प्रजापती,१वषट्कार असे हे देवतांचे प्रकार आहेत.
याप्रमाणे ३३ प्रकारचे देव आहेत.
आपला गैरसमज आहे की ३३ करोड देव आहेत,पण कोट म्हणजे प्रकार.
अधिकस्य अधिकम् फलम्
या सूत्राप्रमाणे या महिन्यात केलेले जप,तप,दान, पुराण श्रवण इ. गोष्टी अधिक फल देतात.सत्पात्री दान हे Double benefit scheme सारखे असते.दान घेणारा हा विष्णूचे स्वरूप आहे असे मानले जाते अधिक महिन्यात कोणती व्रते करावीत?
आपली परिस्थिती, शारीरिक क्षमता, मदतनीस इ.गोष्टींचा विचार करून व्रतवैकल्ये, उपवास इ गोष्टी कराव्यात.
१) ३३ दम्पतीना भोजन, दक्षिणा,वस्त्र इ.देणे
२) ३३सुवासिनीना ओटी भरणे
३) ३३ गरजू अशा विद्यार्थ्यांना गणवेष,शालोपयोगी वस्तू, रेनकोट इ.देणे.
४) गरीब बाळंतिणीला ३३ डिंकाचे लाडू देणे.
५) श्री सत्यनारायण पूजा.
६) दररोज गाईला गोग्रास देणे.
७) रोज ३३ फुलवाती लावणे.
८) वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ३३ पुस्तके वाचनालय अथवा शाळेत देणे.
सन १९८९. ‘बजाज फाउंडेशन पुरस्कार’ सोहळ्यासाठी बंगलोर (आता बंगलुरू)इथला सुंदर सजवलेला भव्य हॉल , हळुवार सुरांची वातावरण प्रसन्न करणारी मंद धून, फुलांची आकर्षक सजावट केलेले भले मोठे स्टेज, उंची वस्त्रांची सळसळ आणि अनेक भाषांमधील संमिश्र स्वर! अशा अनोख्या वातावरणात देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या बरोबरीने, पांढऱ्यास्वच्छ सुती नऊवारी साडीतील मावशी म्हणजे इंदिराबाई हळबे स्टेजवर अवघडून बसल्या होत्या. थोड्यावेळाने घोषणा झाली.’आता महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील देवरुख या अत्यंत दुर्गम खेडेगावात महिला आणि बाल कल्याणाच्या कार्यातील प्रशंसनीय योगदानाबद्दल श्रीमती इंदिराबाई हळबे यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.’ सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट मावशींच्या कानावर पडत होता. पण डोळे भरून आल्याने सारे अस्पष्ट दिसत होते. मावशी जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या.
चंपावती खरे ही रत्नागिरी जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात १९१३ साली जन्मलेली मुलगी. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथीत असताना लग्न झाले. लग्नानंतर इंदिराबाई हळबे होऊन त्या मुंबईला आल्या.
१९२८ते१९३९ असा अकरा वर्षांचा संसार मावशींच्या वाट्याला आला. त्यातच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.नंतर थोड्याशा आजाराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. वेळेवर आणि योग्य औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मावशी देवरुख इथे त्यांच्या बहिणीकडे, त्यांची सर्वात धाकटी मुलगी मीनाक्षी हिला घेऊन काही महिने राहिल्या.
राजा राममोहन राय यांच्या प्रखर लढ्यामुळे ब्रिटिशांनी सतीची परंपरा रद्द केली होती. तरीही विधवांच्या शापित जीवनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता.
देवरुख येथील शांत, निसर्गरम्य वातावरणात मावशींना थोडे मानसिक स्वास्थ्य मिळाले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवरुख संपन्न होते. देवरुखला मावशींना अनेक विचारवंतांचे सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. पूज्य साने गुरुजींची भगवत गीतेवरील मार्गदर्शक व्याख्याने ऐकून त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत करण्याचा संकल्प केला.
त्यांच्या सर्व आशा आता मीनाक्षीवर केंद्रित झाल्या होत्या. मीनाक्षीच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने मावशी मुंबईला परतल्या. डॉक्टर काशीबाई साठे यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. मीनाक्षीलाही त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १३ व्या वर्षी मीनाक्षीचे अकस्मात निधन झाले.
या अंध:कारमय आयुष्याचा सामना करण्यासाठी मावशींनी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. त्यासाठी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघ, नागपूर इथे प्रवेश मिळवून खूप मेहनतीने त्यांनी नर्सिंग कोर्स पूर्ण केला. तथाकथित समाज नियमांना न मानता मावशींनी हे धाडस केले होते. या वेगळ्या वाटेवरून चालण्याचा खंबीर निर्णय मावशींनी निश्चयाने अमलात आणला. देवरुख हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. समाजाच्या जहरी टीकेला आपल्या कृतीतून उत्तर दिले.
मावशींनी जातपात, स्पृश्य- अस्पृश्य, धर्म असली कुठचीही बंधने मानली नाहीत .प्रसूतीमध्ये अडलेल्या बाईसाठी त्या उन्हापावसात, रात्री अपरात्री डोंगरवाटा तुडवीत मदतीला गेल्या. अनेक बालकांना सुखरूपपणे या जगात त्यांनी आणले. एवढेच नाही तर फसलेल्या कुमारीका, बाल विधवा यांनाही आपल्या छत्रछायेखाली घेतले. त्यांच्या मुलांचे पालकत्वही पत्करले. आजारी, अशक्त, अपंग, अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे त्यांनी उभारलेली ‘मातृमंदिर’ ही संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची चालती बोलती ओळख आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मावशींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवरुखला एका गोठ्यात, दोन खाटांच्या सहाय्याने प्रसूती केंद्राची सुरुवात केली. आज त्यांचे कार्य एक सुसज्ज हॉस्पिटल, फिरता दवाखाना, रूग्ण वाहिका, निराधार बालकांसाठी गोकुळ अनाथालय, कृषी केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, बचत गट, महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य केंद्र, बालवाड्या, पाळणाघरे असे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर समाजाला सावली आणि आधार देणारे अगणित उपक्रम त्यांनी राबविले. त्याचबरोबर अशा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या तरुणाईच्या पिढ्या घडविल्या. या तरुणाईला त्यांनी पुरोगामी विचारांचे, विज्ञान निष्ठेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे शिक्षण स्वकृतीतून दिले. अनेक सामाजिक चळवळींना हक्काचा निवारा दिला. खेड्यापाड्यातून आलेल्या, देवरुख महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक गरीब मुलांसाठी मावशींनी शेतावर मोफत होस्टेलची व्यवस्था केली. यातील अनेक मुलांना शेतावर, रुग्णालयात, मेडिकल स्टोअर, आयटीआय, पाणलोट प्रकल्प, कृषी प्रकल्प आदी विविध कार्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मनावर मूल्याधिष्ठित संस्कार केले.
१९९८ मध्ये मावशी गेल्यानंतर काही काळाने संस्थेच्या कार्याला विस्कळीतपणा आला होता .आज श्री अभिजीत हेगशेट्ये आणि त्यांचे अनेक तडफदार सहकारी यांच्यामुळे मातृमंदिर पुन्हा जोमाने कार्यरत झालेआहे. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जिवंत आहे. याचे आत्ताचे उदाहरण म्हणजे कोविड काळात मातृमंदिरने शेकडो कोविडग्रस्तांसाठी ‘ऑक्सिजन आधार प्रकल्प’ उभारला आणि अनेक रूग्णांचे प्राण वाचविले.२०२१ च्या पुरामध्ये उध्वस्त झालेल्या कोकणवासियांना मातृमंदिरने पुढाकार घेऊन अनेक प्रकारची मदत केली. स्वच्छता अभियान राबविले.
देवरुख परिसरातील ६०-७० गावातील जनतेसाठी आता मातृमंदिर संस्थेतर्फे अद्ययावत सुविधा देणारे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. अनेक दानशूर लोकांनी मातृमंदिर संस्थेला आर्थिक मदत केली आहे.
समाजाचा पाया सुदृढ व्हावा म्हणून अनेक स्त्रियांनी तत्कालीन सामाजिक रुढी, जाचक निर्बंध दूर सारून स्वतःचे आयुष्य पणाला लावले. साहजिकच त्यांची वाट काट्याकुट्याची होती. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात या स्त्रियांनी भरीव योगदान दिले. त्या पायाचा दगड बनल्या म्हणून आजची स्त्री अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभी राहू शकत आहे. अशा अनेक तेजस्वी तारकांमधील सन्माननीय हळबे मावशींना सहस्र प्रणाम 👏
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
भारत – अध्यात्माची मायभूमी – जिथे सजीव आणि निर्जीव दोन्हींमधे देव बघितला जातो। श्रध्दा हा जीवनाचा आधार – त्या पार्श्वभूमीवर अनेक देवस्थानं आणि त्यांच्या विविध परंपरा। अशीच एक सुमारे ७०० वर्षांपासून चालत आलेली उच्चस्तरीय परंपरा आहे —’आषाढ आणि कार्तिक महिन्यात होणारी पंढरीची वारी।’
विठ्ठल-रखुमाईचा जागृत वास असलेली पुण्यनगरी पंढरपूर… येथे फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर प्रांतातून आणि परदेशातूनसुध्दा भाविकगण वारी करायला मुख्यतः आषाढ महिन्यात येतात। ईश्वर कृपेने ही पायी वारी करण्याची संधी यंदा मला मिळाली।
सुरुवातीला या यात्रेबद्दल काहीच माहित नसल्यामुळे मनात अनेक प्रश्न काहूर माजले होते। बरेच प्रश्न – कुठं जाऊ, किती अंतर असणार, रस्ता कसा असेल, लोकं कोण नि कसे असतील, जेवणाचं, थांबायचं कसं नि कुठे, इत्यादि होते. पण यांची माहिती मिळवली नि माझ्या गृहनगर भोपाळ येथून देवाचं नाव घेऊन घराबाहेर पाऊल टाकलं।
पुण्यात माझी आतेबहिण नि भाची यांची भेट आमच्या दिंडीने ठरविलेल्या ठिकाणी – ‘गुप्ते मंगल कार्यालय, शनिवार पेठ पुणे‘ येथे झाली। खरं तर माझी यात्रा ताईंच्यामुळे शक्य झाली कारण त्यांनी कार्यक्रमाची महिती मला दिली नि मी त्यांच्यासोबत यात्रेची तयारी केली।
आमची यात्रा ‘संत विचार प्रबोधिनी’ या दिंडीसोबत होणार होती। त्याच्या संचालिका हभप सौ माईसाहेब गटणे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आधीच सर्वांना व्हाटस्एपच्या माध्यमातून दिली होती। त्या सूचनापत्रकाप्रमाणे पायी वारीसोहळा हा ११ जून ते ३० जून २०२३ पर्यंत चालणार होता।
११ जून :: पहिले पाऊल
गुप्ते मंगल कार्यालयात आमचे आवश्यक सामान, जे पुढे यात्रेत लागणार होते ते ठेवून, एका लहान बॅगमधे रस्त्यात लागणारे लहान-सहान सामान घेऊन आम्ही श्रीक्षेत्र आळंदीला निघालो। अद्याप आपल्या सह-वारकरी मंडळीशी आपसांत ओळखी झाल्या नव्हत्या।
माझी आळंदीला ही दुसरी यात्रा होती, पण या वेळेस उद्देश् वेगळा होता, त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती। पुणे नगरात चहूकडे वारकरी दिसत होते. त्यात शहरापेक्षा गावची मंडळी जास्त आहेत असे वाटले, पण नंतर हे दृश्य बदललं। पायी चालत तिथे ठरलेल्या ठिकाणी- विठ्ठल कृपा मंगल कार्यालयात आम्ही सुमारे चार वाजता पोहोचलो। त्याच वास्तूत अजून एक दिंडी आली असल्यामुळे थोडा गोंधळ झाला, पण लगेच आपले ठिकाण पहिल्या माळयावर आहे हे कळले।
त्या रात्री तिथेच मुक्काम असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली जागा ठरवून सामान लावून घेतले होते। येथे जुने वारकरी पूर्वओळख असल्याने एकत्र आले नि नवे पण हळूहळू त्यांच्यात मिसळू लागले। आमची एकूण संख्या १५० आहे हे कळविण्यात आले।
उन्हाळा खूप असल्याने पाण्याची गरज खूप जास्त भासत होती. तेव्हा वारंवार बाहेर जाऊन पाणी आणावे लागत होते। थोडयाच वेळात दिंडीच्या संचालिका सौ माईसाहेब आल्या नि मंचावर त्यांनी स्थान ग्रहण केले। सुरुवातीला वारीच्या फीचा हिशेब, पावती देणे ही किरकोळ कामं आटोपून नंतर संपूर्ण यात्रेची माहिती आणि वारीचे अनुशासन सांगितले। या मधेच सर्वांना या दिंडीचा १९८६ पासूनचा पूर्व इतिहास नि पूर्व वारीप्रमुख वै.ह.भ.प.डॉ रामचंद्र देखणे यांचा जीवन परिचय देण्यात आला। हे पूर्ण झाल्यावर त्यांची प्रवचन सेवा झाली जी सर्वांनी मनापासून ऐकली।
आजच्या दिवशी म्हणजे ११ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून संध्याकाळी निघणार होती अन् त्या दिवशी परंपरेप्रमाणे तिचा मुकाम तिथेच असल्यामुळे दिंडीच्या व्यवस्थे- -प्रमाणे पुण्यात स्वतःची सोय असणारे वारकरी पुण्याला परत जाऊ शकत होते। रात्री सुमारे आठ वाजता वाजत-गाजत भक्तजनांच्या गजरासोबत पालखीची यात्रा सुरू झाली। गर्दी खूप जास्त असल्याने मला दर्शन काही होऊ शकले नाही। पोलिसांना गर्दी सांभाळायला खूप मेहनत करावी लागत होती। नंतर रात्री नगर बस सेवेत बसून पुण्याला परत आलो।
१२ जून :: माऊली आलेत पुण्याला ..
दुसरे दिवशी १२ जूनला पालखीचे पुण्यात आगमन झाले अन् तिथे पालखीचा एक दिवस मुक्काम होता. त्यामुळे दिंडी पण १३ जूनला पुण्याला गुप्ते मंगल कार्यालयात थांबली। पुण्यातील स्थानीय वारकरी यांना आज इथे हजर होण्याबद्दल सूचना होती।
१४ जून :: वारी निघाली पंढरपुराला : पुणे – सासवड अंतर ३८.३४ कि.मी.
शेवटी १४ जूनला तो सूर्यादय झाला ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती। सकाळी पाच वाजल्या- -पासून सर्व वारकरी पूर्ण उत्साहात तयार झाले। तेव्हाच सूचना झाली की सर्वांनी आपले सामान लगेजच्या ट्रकवर ठेवावे। पहिला दिवस असल्यामुळे थोडी घाई गर्दी होत होती पण अखेरीस सर्वांचे सामान चढले। इथे सांगण्यात आले की जवळच एका ठिकाणी सर्वांचा चहा इत्यादि होईल नि मग पुढे वाटचाल होईल। त्या प्रमाण तिथे चहा-नाश्ता नि दिवसाकरिता खाण्याचे पैकेट वाटप सुरू झाले। चहा-कॉफी, नाश्ता घेऊन आता पाठीवर आवश्यक तेवढे सामान, मनांत प्रचंड उत्साह, उत्सुकता घेऊन आणि मुखाने जय हरि विठ्ठल घोष करीत सर्व ओळीत लागले नि ‘ ज्ञानोबा-तुकाराम माउली ‘ असा नाद करीत आमची ‘ संत विचार प्रबोधिनी ‘ची दिंडी वारीच्या मार्गाला निघाली। येथेच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महारांजाच्या पालख्या एकत्र येतात नि नंतर वेगळया मार्गावर चालू लागतात।
एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, की आता मी मंदिरात येणार नाही.
यावर पुजाऱ्याने विचारले – का?
मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते. काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिक पणे कमी करतात, आणि देखावा अधिक!
यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला – ते बरोबर आहे! पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो त्यासह तुम्ही काही करू शकता का!
बाई म्हणाल्या – तुम्ही मला सांगा. काय करावे?
पुजारी म्हणाले – एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकपण थेंब खाली पडता कामा नये.
बाई म्हणाल्या – मी हे करू शकते.
मग थोड्याच वेळात त्या बाईने तेच केले. त्यानंतर मंदिराच्या पुजारीने महिलेला 3 प्रश्न विचारले –
तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?
2. तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का?
तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?
बाई म्हणाली – नाही मी काही पाहिले नाही!
मग पुजारी म्हणाले – जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये.म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.
आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल, तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल.
आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे ? की तुम्ही स्वतः आहात ?
अरे! देव नाही ,
गृहनक्षत्र किंवा कुंडली नाही,
नशीब नाही,
नातेवाईक नाहीत,
शेजारी नाहीत,
सरकार नाही,
तुम्ही स्वतः जबाबदार आहात.
1) तुमची डोकेदुखी फालतू विचारांचा परिणाम आहे.
2) तुमची पोटदुखी , तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.
3) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.
4) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली चरबी / आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.
5) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.
6) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.
वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत , ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता.
यामध्ये कोठेही देव दोषी असत नाही.
जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्याला आढळेल की कुठेतरी आपला मूर्खपणा त्यांच्यामागे आहे.
म्हणून योग्य निर्णय घ्या आणि त्यानुसार तुमचे आयुष्य निरोगी आणि सुखी समृद्धी होवो!
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो.त्यांची रिमझिम माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात.
पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून जातो.
मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….
(आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता)… इथून पुढे.
मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले… आणि मला म्हणाला, “ इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस, चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही. तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार…
…. तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही. त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत, आणि त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे. जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार… जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्चमधला येशु तुला कधीही माफ करणार नाही … फक्त एक महिना तू या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही …. “
“पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही …. मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे.. शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही,” अशी विनंती मी त्याला केली.
आयझॅक जिद्दी होता. त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला, “ मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे.. नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर… तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत. सकाळचा नाष्टा , दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब …
तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तू का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तू जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही. मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .”
थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे…असे मी ठरवले.
दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .
प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले. वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली. त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता. ती सगळी मुले आणि मुली माझ्याभोवती जमा झाली. त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या स्वतःच्या छोट्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता…
शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी, नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोलीभोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा. मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलिमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही…
शाळेचे एक नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो …
हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती…
…. आयझॅकने दिलेली ग्रीन टाय.
अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.
सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते. मुलं देखील नवनवीन गोष्टी शिकत होती त्याचबरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील अनेक निसर्ग चित्रे मी नव्याने रेखाटू लागलो. त्या काळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .
माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले. नवा स्टुडिओ बांधला .
सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले. त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी ८० टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे …..
…. ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय.
मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तेमध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो. त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन टाय …. कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात . काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात , काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात, त्यांना मार्ग सापडत नसतो … अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो .. नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात…
ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.
जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.
….. असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा…
…. तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दूर व्हावा….
म्हणून खूप खूप शुभेच्छा !
तर अशी आहे माझी ‘ग्रीन टाय’ ची आठवण….. मला सतत प्रेरणा देणारी……..
कॉलेजमधील एका प्राध्यापकांनी एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले-
“आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे.”
असे म्हणून प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती.
कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले,
“आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत.”
मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्यांचे लिहून झाल्यावर प्राध्यापकांनी पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तरपत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली.
कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौमितीकरीत्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा वगैरे वगैरे !
सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले,
“दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेले आहात.”
सर्वजण दचकले.
मग प्राध्यापक सांगू लागले,
“सर्वांनी एकाच दिशेने विचार केला आहे. सर्वांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्याभोवती खूप मोठा ‘पांढरा’ पेपर आहे, हे मात्र कुणीच लिहिले नाही.”
आपल्या जीवनात देखील असेच होते. आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो. ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्याकडे पाहतो.
जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात.
आपण त्यावर फोकस करतो आणि ‘खूप मोठा पांढरा’ पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो.
खरेतर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लक्षित राहतो.
म्हणून यापुढे काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका!
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
खायला, रहायला, आणि अंगावर घालायला मिळालं की माणसाच्या गरजा संपत नाहीत. वरच्या गोष्टी मिळाल्यावर किंवा मिळवताना माणसाला माणूसच लागतो. माणसाला महत्वाची गरज असते ती माणसाचीच. आणि हा त्याला सतत हवा असतो.
वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, इतकंच काय पैशाने देखील माणूस मोठा होतो. पण माणसाला मोठं करण्यात सहभाग असतो तो माणसाचाच. कोणताही माणूस एकटाच, आणि आपला आपलाच मोठा होत नाही.
बरेच कार्यक्रम हे कोणाच्या तरी नावाने होतात. अशा कार्यक्रमात साधारण तीन माणसं मोठी होतात. एक ज्याच्या नावाने कार्यक्रम आहे तो. या कार्यक्रमाला ज्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आहे तो दुसरा. आणि अशा कार्यक्रमात ज्यांच कौतुक होणार आहे तो तिसरा.
यातले तिघंही आधीच मोठे असू शकतात. पण अशा कार्यक्रमामुळे त्यांचा मोठेपणा वाढतो आणि अशा प्रत्येक कार्यक्रमानंतर तो वाढत जातो. पण कार्यक्रम यशस्वी करायला गरज असते ती माणसांची.
मनातलं दुःख सांगायला माणूस नसला तरी चालतो. पण आनंद व्यक्त करायला मात्र साथ लागते ती माणसाचीच. दु:ख वाटल्याने कमी होत, आणि आनंद वाटल्याने वाढतो अस म्हणतात. पण हे कमी करणारा आणि वाढवणारा फक्त आणि फक्त माणूसच असतो.
करमणूक म्हणून माणूस रेडिओ, टि.व्ही. यांचा आधार घेत असेल. यावर सुरू असणारे कार्यक्रम तो ऐकतो, बघतो. पण मनातलं तो यांना सांगू शकत नाही. आणि मग आपलं ऐकायला लागतो तो माणूस.
एखादी आनंदाची गोष्ट घडल्यावर ती कधी आणि कशी सांगू अशी घाई माणसाला होते. पण अशी गोष्ट वस्तूंना सांगून समाधान होत नाही. ते समाधान मिळवून देणारा असतो तो माणूस.
प्रवासातल्या काही वेळात सुध्दा माणूस सहप्रवाशाशी बोलत असतो. यात बऱ्याचदा प्रवास केव्हा संपतो ते कळत सुद्धा नाही.
स्पर्धेत सुध्दा कोणीतरी हरल्यामुळे जिंकणारा मोठा होतो. जिंकण्यासाठी सुध्दा हरवावं लागतं ते माणसालाच.
अनेक जण सकाळ, संध्याकाळ ठराविक वेळी, ठराविक रस्त्याने फिरायला जातात. यावेळी काही चेहरे नियमित दिसतात. पण आपसात ओळख मात्र नसते. असा ओळख नसलेला पण नेहमीचा चेहरा दिसला नाही तर थोड वेगळ वाटतंच. कारण… नेहमी दिसणारा माणूस आज दिसत नाही. यावेळी सुध्दा नजर शोधत असते ती त्या माणसाला.
माणसाला मोठं करण्यात माणसाचाच हात असतो. यातही सगळ्यात महत्वाचा हात असतो तो शिक्षक या माणसाचा. एक शिक्षक एकावेळी अनेकांना मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. तो सुद्धा माणूसच घडवत असतो.
माणूस, भांडला तरी भांडतो माणसाशीच. यात चुकणारा, त्याला समजवणारा, आणि समेट घडवणारा असतो तो माणूसच.
आनंदाच्या वेळी मिठी मारत पाठीवर ठेवलेला, आणि संकटात खांद्यावर ठेवलेला एक हात बरंच काही सांगून जातो. तो हात असतो माणसाचा.
फक्त आपण माणूस आहे याची जाणीव ठेवायला हवी. कारण सोबत हवा असतो तो माणूस…