हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 175 ⇒ स्वैच्छिक स्वीकारोक्ति… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “स्वैच्छिक स्वीकारोक्ति”।)

?अभी अभी # 175 ⇒ स्वैच्छिक स्वीकारोक्ति? श्री प्रदीप शर्मा  ?

ऐसा लग रहा है, स्वैच्छिक सेवानिवृत्ति की बात हो रही है। जी बिल्कुल सही, बिना सेवानिवृत्ति के वैसे भी कौन स्वीकारोक्ति की सोच भी पाता है। स्वीकारोक्ति स्वैच्छिक हो सकती है, लेकिन सेवानिवृत्ति इतनी आसान नहीं।

एक सेवानिवृत्ति तो स्वाभाविक होती है, ६०-६५ वर्ष तक खून पसीना एक करने के बाद जो हासिल होती है। चलो, गंगा नहा लिए ! होती है, सेवानिवृत्ति स्वैच्छिक भी होती है, हाय रे इंसान की मजबूरियां ! एक सेवानिवृत्ति अनिवार्य भी होती है, जिसे बर्खास्तगी (टर्मिनेशन) कहते हैं।

वे पहले सस्पेंड हुए, फिर टर्मिनेट। पहले सत्यानाश, फिर सवा सत्यानाश। ।

जीवन के बही खाते का, नफे नुकसान का, लाभ हानि और पाप पुण्य का मूल्यांकन सेवानिवृत्ति के पश्चात् ही संभव होता है।

सफलताओं और उपलब्धियों को गिनाया और भुनाया जाता है। असफलताओं और कमजोरियों को छुपाया जाता है। जीवन का सुख भी सत्ता के सुख से कम नहीं होता।

क्या कभी किसी के मन में सेवानिवृत्ति के पश्चात् यह भाव आया है कि, इसके पहले कि चित्रगुप्त हमारे कर्म के बही खाते की जांच हमारे वहां ऊपर जाने पर करे, एक बार हम भी तो हमारे कर्मों का लेखा जोखा जांच परख लें। अगर कुछ डिक्लेयर करना है तो क्यों न यहीं इस दुनिया में ही कर दें। सोचो, छुपाकर क्या साथ ले जाया जाएगा, सच झूठ, सब यहीं धरा रह जाएगा। ।

बड़ा दुख है स्वीकारोक्ति में ! लोग क्या कहेंगे। इस आदमी को तो हम ईमानदार समझते थे, यह तो इतना भ्रष्ट निकला, राम राम। बड़ा धर्मप्रेमी और सिद्धांतवादी बना फिरता था। डालो सब पर मिट्टी, कुछ दिनों बाद ही जीवन के अस्सी वसंत पूरे हो जाएंगे, नेकी ही साथ जाएगी, क्यों मुफ्त में बदनामी का ठीकरा फोड़, अपने ही पांव पर कुल्हाड़ी मार ली जाए।

जरा यहां आपकी अदालत तो देखिए, सबूत के अभाव में गुनहगार छूट जाता है, और झूठी गवाही के आधार पर बेचारा ईमानदार फंस जाता है।

जिसे यहां न्याय नहीं मिलता, उसे ईश्वर की अदालत का इंतजार रहता है। ।

जो समझदार होते हैं, उनका तो अक्सर यही कहना होता है, यह हमारा और ईश्वर का मामला है। उससे कुछ भी छुपा नहीं है। समाज को तो जो हमने दिया है, वही उसने लौटाया है। ईश्वर तो बड़ा दयालु है, सूरदास तो कह भी गए हैं ;

प्रभु मोरे अवगुन चित ना धरो।

समदरसि है नाम तिहारो

चाहे तो पार करो।।

किसी ने कहा भी है, एक अदालत ऊपर भी है, जब उसको ही फैसला करना है तो कहां बार बार जगह जगह फाइल दिखाते फिरें। फिर अगर एक बार भगवान से सेटिंग कर ली

तो इस नश्वर संसार से क्या डरना। कितनी अटूट आस्था होती होगी ऐसे लोगों की ईश्वर में।

और एक हम हैं, सच झूठ, पाप पुण्य, और अच्छे बुरे का ठीकरा सर पर लिए, अपराध बोध में जिए चले जा रहे हैं। तेरा क्या होगा कालिया! जिसका खुद पर ही भरोसा नहीं, वह क्या भगवान पर भरोसा करेगा। गोस्वामी जी ने कहा भी है ;

एक भरोसो एक बल

एक आस विश्वास।

स्वाति-सलिल रघुनाथ जस

चातक तुलसीदास।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

 🌸 विविधा 🌸

☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

‘प्रज्ञा ‘हा शब्द आपल्या ऐकण्यात,  बोलण्यात, वाचण्यात नेहमी येतो. पण त्याच्या अर्थाविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. भारतीय मानसशास्त्रात ‘प्रज्ञा’ही संकल्पना अतिशय सुंदर रित्या स्पष्ट केलेली आहे. प्राचीन काळात ऋषिमुनींनी निर्माण केलेले साहित्य ही आपली अशी संपत्ती आहे की त्यामुळे आज भारताचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा वापर सुरू झाला आहे. अशा भारतीय मानसशास्त्रातील एक संकल्पना’प्रज्ञा’. याविषयीचे विचार येथे व्यक्त केले आहेत.

संस्कृत मध्ये ‘प्रज्ञा’असा मूळ शब्द वापरतात. याला पूरक असे ‘प्राज्ञ’व ‘प्राज्ञा’ असेही शब्द आहेत. व्यक्तीचे शुद्ध आणि उच्च विचार युक्त शहाणपण,  बुद्धिमत्ता आणि आकलन म्हणजे ‘प्रज्ञा ‘. ही शहाणपणाची अशी पातळी आहे की तर्काने आणि निष्कर्षाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा उच्च आहे.  प्रज्ञ= प्र +ज्ञ . प्र म्हणजे परिपूर्ण आणि ज्ञ म्हणजे माहीत असणे किंवा संकल्पनेचा अत्यंतिक जवळून अभ्यास करणे.  प्रज्ञा या संकल्पनेविषयी वेद , उपनिषद व योगशास्त्रात संदर्भ सापडतात.

ऐतरेय उपनिषदात प्रज्ञेविषयी खालील श्लोक सापडतो.

तत्प्रज्ञानेत्रम प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञानं ब्रम्ह (iii. i. 3).

जे अस्तित्वात आहे ते म्हणजे शारीरिक व आध्यात्मिक ज्ञान.  या ज्ञानाचे मूळ प्रज्ञा आहे म्हणजे स्वजाणीव किंवा सुषुप्ती.  कौशितकी उपनिषदामध्ये इंद्राने मृत्यूचे वर्णन करताना प्राण आणि प्रज्ञा शरीरात एकत्र राहतात व मृत्यूचे वेळी एकत्रित निघून जातात असे म्हटले आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत.  पंचेंद्रियांची कार्येही प्रज्ञेशिवाय होऊ शकत नाहीत. तसेच प्रज्ञेशिवाय विचार यशस्वी होऊ शकत नाही.

वेदांत सार मध्ये प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

अस्य प्राज्ञात्वम स्पष्टोपाधि तया नती प्रकाशत्वात॥४४॥.  

आत्मा हा निर्गुण असतो.  ईश्वर मात्र सर्व गुणांनी युक्त असतो व चराचरावर राज्य करत असतो पण प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याच्या अज्ञानाचा एक भाग म्हणजे सदोष बुद्धिमत्ता. सुषुप्ति अवस्थेतील आत्मा जेव्हा आनंदमय विज्ञानघन असतो तेव्हा त्याची बुद्धिमत्ता ही प्रज्ञा असते.

मांडुक्योपनिषदात प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

आनंदभुक चेतोमुखःप्राज्ञः॥

प्रज्ञा म्हणजे जागृती अवस्थेत साधन लाभलेल्या(असलेल्या)आशीर्वादाचा आनंद घेणारा उपभोक्ता.

उपनिषद रहस्य या पुस्तकात प्रज्ञाचे इत्यंभूत वर्णन केले आहे. प्रज्ञा ही जगाचे चक्षु असून जगाचा आधारही आहे. प्रज्ञा प्रत्यक्ष ब्रम्ह आहे.  सर्व स्थावर जंगम, वस्तू, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी व आकाशात उडणारे सर्व पक्षी, सर्व पंचमहाभूते व देवता हे सर्व प्रज्ञेतच अंतर्भूत होतात व प्रज्ञेमुळे जिवंत राहतात असे उपनिषद्काराचे मत आहे.

पतंजली योगसूत्रामध्ये प्रज्ञेचा उल्लेख खालील श्लोकात केलेला आढळतो.  

ॠतंभरा तत्र प्रज्ञा ॥

निर्विचार समाधी विषयी स्पष्टीकरण करताना असे म्हटले आहे की,  ज्ञान हे जेव्हा निष्कर्षाच्या आणि ग्रंथांच्या पलीकडे जाते तेव्हा ते फक्त सत्यानेच भरलेले असते. मन हे शुद्ध असते अशावेळी असलेल्या स्थितीत प्रज्ञा जागृत असते.  

संस्कृतीकोष मध्ये व काही वेबसाईटवर( संदर्भामध्ये दिलेल्या आहेत) प्रज्ञा या संकल्पनेविषयी लिहिताना असे म्हटले आहे की , प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञानाचे किंवा जगण्याचे इंद्रिय स्वरूप. प्रज्ञा हे प्राचीन संस्कृत नाम असून त्याचा सखोल अर्थ शहाणपण हाच आहे . प्रज्ञा हे देवी सरस्वतीचे नाम आहे . सरस्वती ही कलेची व वादविवादाची देवता आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे आकलन, ज्ञान व संकल्पनेशी  अत्यंत जवळीक असणे असेम्हटले आहे तर महाभारतानुसार,  प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे अध्ययन, संकल्पनेचा शोध असे म्हटले आहे . शतपथ ब्राह्मण व सांख्यायन श्रोत-सूत्र यांच्या नुसार शहाणपण,  ज्ञान,  बुद्धी,  तर्क , आराखडा मांडणे,  साधन वापर या गुणधर्मांसाठी प्रज्ञा हा शब्द वापरला आहे.

बुद्ध संप्रदायानुसार प्रज्ञा किंवा पन्ना( पाली )म्हणजे शहाणपण . याचा अर्थ वास्तवातील सत्याबद्दल असलेली मर्मदृष्टी .  प्र म्हणजे जागृती, ज्ञान किंवा आकलन आणि ज्ञ म्हणजे उत्स्फूर्त ज्ञानाची उच्च, व्यापक, जन्मजात बहरलेली अवस्था होय.

प्रज्ञेचे एकूण तीन प्रकार आहेत.

  1. श्रुतमय प्रज्ञा
  2. चिंतनमय प्रज्ञा
  3. भावनामय प्रज्ञा

श्रुतमय प्रज्ञा म्हणजे असे ज्ञान की जे फक्त ऐकलेले किंवा वाचलेले आहे.  हे ऐकिवज्ञान अनुभूतीच्या स्तरावर उतरलेलं असेलच असे नाही . श्रुतमय ज्ञान प्रेरणा घेण्यासाठी गरजेचं असतं. ज्ञान ऐकल्यानंतर पुढचा टप्पा असतो ज्यात चिंतनाची आवश्यकता असते. या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात आणि चिंतन झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती घेतली जाते.  अनुभूतीनंतर जे ज्ञान होते त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतात.  भावनामय प्रज्ञा सर्वात महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती श्रुतमय प्रज्ञेचा साक्षात्कार करेलही व चिंतन ही करेल पण त्याचा अनुभव घेईलच असे नाही म्हणून प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्वानुभवाच्या बळावर जे जे काही उतरते त्याला ‘प्रज्ञा ‘असे म्हणतात.

या संकल्पनेचा एवढा विचार करणे ही सध्याच्या काळातील प्राथमिक गरज आहे. मुलांना कसे वाढवावे याविषयी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना किती सखोल मार्गदर्शन करावे याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन मिळते. प्रत्येक मुलातील ‘प्रज्ञा’जागृत झाल्याशिवाय त्याचा विकास परिपूर्ण होणार नाही व मुले आयुष्यात समाधानी होणार नाहीत म्हणून भारतीय मानसशास्त्रातील संकल्पना सर्वांनी अभ्यासल्या पाहिजेत.

संदर्भ

  1. भारतीय संस्कृती कोश -पंडित महादेव शास्त्री जोशी
  2. उपनिषद रहस्य -गुरुदेव रानडे
  3. प्रवचन सारांश -विपश्यना शिबिर
  4. द प्रिन्सिपल उपनिषद- स्वामी निखिलानंद
  5. http://www. pitrau. com”Meaning of Pradnya”
  6. www. bachpan. com”Meanimg of Pradnya”
  7. Sanskrit Dictionary(revised 2008)-Lexicon (http://www. sanskritlexicon. unikoein. de)
  1. The Golden Book of Upanishads-Kulshreshtha Mahendra

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!!) – इथून पुढे — 

भिजलेलं ते ब्लॅंकेट आणि कुजलेली ती पॅन्ट यांना मी आता मनोमन नमस्कार केला…. आणि काय जादू झाली … त्यातला दुर्गंध कुठल्या कुठे पळून गेला… !!! 

आता बाबांच्या मी शेजारी बसलो…. ! चौकशी केली आणि सुरुवातीला सांगितलेली सर्व कर्म कहाणी समजली. मी त्यांना अत्यंत नम्रपणे विचारलं, “ बाबा मी तुमच्यासाठी काय करू ? “ 

ते सुद्धा हात जोडून तितक्याच नम्रतेने म्हणाले, “ तुम्ही माझा जीव घेता का जीव ? “

“ माझं काम जीवदान द्यायचं आहे बाबा “ मी म्हणालो.

ते क्षीणपणे हसले, म्हणाले, “ घ्या हो जीव… एखादं औषध द्या आणि मारून टाका…. कंटाळलो आहे मी आता…. आडबाजूच्या फुटपाथ वर एखाद्याला असं औषध दिलं तर कोणाला कळणार आहे ??? “

बाबांचं आयुष्यातलं मन उडून गेलं होतं …गाण्यातले सूर हरवतात तेव्हा फक्त ते गाणं बेसूर होतं, पण जीवनातलं मन हरवलं की ते आयुष्य भेसुर होतं… ! 

“ बाबा तुमची बायको तुमच्याशी अशी का वागली ?” मी चाचपले…. 

“ जाऊ द्या हो डॉक्टर…  पाऊस संपला की छत्रीचं सुद्धा ओझं होतं…! “

“ म्हणजे ? “

“ अहो तिची माझी साथ तितकीच होती… “

“ तिच्या वागण्याचा त्रास नाही होत तुम्हाला ? “

“ अहो, तिने त्यावेळी जी साथ दिली ती मी प्रसाद म्हणून घेतली… प्रसादाची चिकित्सा करायची नसते… जे मिळालं ते समाधानाने ग्रहण केलं मी…. !  प्रसाद हा जीव शमवण्यासाठी असतो… भूक भागवण्यासाठी नाही… ! “

“ मला नाही कळलं बाबा… “

… “ माझ्या पडत्या काळात तिने मला खूप साथ दिली, खरं तर मी तिचा आभारी आहे डॉक्टर … 

आपण मंदिरात जातो …. गाभाऱ्यात आपण किती वेळ असतो ? दोन पाच मिनिटं …परंतु तीच दोन पाच मिनिटं पुढे कितीतरी दिवस जगायला ऊर्जा देतात… तिची माझी साथ सुद्धा अशीच दोन पाच मिनिटांची… 

गाभाऱ्यात जाऊन आपल्यासोबत कोणी देवाची मूर्ती घरी घेवून येत नाही… तिथं अर्पण करायची असते श्रद्धा आणि परतताना घेवून यायचा, “तो” सोबत असल्याचा विश्वास ! डॉक्टर माझी मूर्ती फक्त हरवली आहे… श्रद्धा आणि विश्वास नाही… ! “

माझ्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले…

“ जाऊद्या हो डॉक्टर…तुम्ही जीव घेणार आहात ना माझा ?”  विषय बदलत ते म्हणाले. 

“ होय तर… मी तुमचा जीव घेऊन, तुमचे विचार सुद्धा घेणार आहे बाबा…” माझ्या या वाक्यावर कुडकुडणारे हात एकमेकावर चोळत ते गूढ हसले. 

आता शेवटचा प्रश्न ..  “ तुम्हाला तिचा राग नाही येत ? “

ते पुन्हा क्षीणपणाने हसत म्हणाले,.. “ डॉक्टर मी तिला “बायको” नाही, “मुलगी” मानलं…  जोवर माझ्यासोबत होती, तोपर्यंत तिने माझी सेवा केली… आता ती दुसऱ्याच्या घरी गेली… मुलगी शेवटी परक्याचीच असते ना ? “

हे बोलताना त्यांनी मान दुसरीकडे का वळवली… हे मला कळलं नाही… !  मान वळवली तरी खांदयावर पडलेले अश्रू माझ्या नजरेतून सुटले नाहीत…. 

“ मी नवरा नाही होवु शकलो, पण मग मीच तिचा आता बाप झालो….”  ते हुंदका लपवुन बोलले…. ! “ मी तिला माफ केलंय तिच्या चुकीसाठी…” 

मी अवाक झालो… ! 

“ बाबा… ? अहो…. ??  तुम्ही …??? “ माझ्या तोंडून शब्द फुटेनात….“ इतक्या सहजी तुम्ही माफ केलं तिला ? नवरा होता होता, बाप झालात तीचे ??? “

“ डॉक्टर क्षमा करायला काहीतरी कारण शोधावंच लागतं ना हो ? “ ते हसत म्हणाले… 

मी पुन्हा एकदा शहारलो… ! .. एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी मुद्दामहून कारण शोधलं जातं… आणि  ते माफ करण्यासाठी कारण शोधत होते… ! 

ते पुन्हा हसले…. !  त्यांचं हे एक हसणं,.. हजार रडण्याहून भीषण आणि भेसूर होतं…! 

आता माझे शब्द संपले होते… सर्व काही असूनही मी गरीब होतो, आणि .. आणि  हातात काहीही नसलेले… रस्त्यावर पडलेले ते बाबा खरे श्रीमंत ! 

मनोमन त्यांना नमस्कार करून मी जायला उठलो. 

मला त्यादिवशी पाणी मिळालंच नाही… पण बाबांच्या अश्रूत मी चिंब भिजून गेलो…. ! 

पाणी न पिताही माझी तहान शमली होती… गाडी जवळ आलो…. गाडी गपगुमान चालू झाली… अच्छा…  म्हणजे हा सुध्दा कुणीतरी खेळलेला डाव होता तर….! 

मी घरी आलो…. डोक्यात बाबांचेच विचार…

‘ प्रेम म्हणजे क्षमा… ! ‘ .. आज प्रेमाची नवी व्याख्या समजली…. 

‘ स्वतःसाठी काहीतरी मागणं म्हणजे प्रार्थना नव्हे… जे मिळालंय, त्याबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजे प्रार्थना !’ .. आज प्रार्थनेचीही नवी व्याख्या समजली… 

‘ जे हवंसं वाटतंय ते मिळवणं म्हणजे यश… परंतु जे मिळालंय ते हवंसं वाटणं म्हणजे समाधान !!! ‘

सर्व काही हरवूनही, समाधानी राहून, वर तिलाच दुवा देणाऱ्या बाबांचा मला हेवा वाटला !!! 

जगावं तर सालं अस्स…. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही…. ! 

त्यांच्या “मनात” सुरू असलेलं युद्ध “पानावर” कधीही लिहिले जाणार नाही… 

इथं तेच दुर्योधन होते….तेच अर्जुन होते …आणि कृष्णही तेच होते…! 

…. आयुष्याच्या रणभूमीवर आजूबाजूला सर्वजण असूनही ते बाबा एकटेच होते. 

श्वास चालू असतात, तोपर्यंत एकट्यालाच चालावं लागतं…. श्वास थांबले की मगच लोक आपल्या आजूबाजूला रडत गोळा होतात… आणि आपल्या जाण्याचा हा “सोहळा” पाहायला आपणच शिल्लक नसतो…. ही खरी शोकांतिका  !!! 

आज २३ तारखेला शनिवारी सकाळी पाय आपोआप बाबांकडे वळले… 

…. त्याच ओल्या गाठोड्यात ते तसेच पडले होते… भीष्मासारखे मौन धारण  करून, थंडीनं कुडकुडत…  ! 

त्यांचे डोळे बंद होते… मी गाठोड उघडलं…. अंगावरचं भिजलेलं एक एक कापड काढून टाकलं… आता मला ते ‘ दिगंबर ‘ भासले ! .. उघड्या फुटपाथवर, नागड्या आकाशाखाली मी त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक केला… अंगावरचा मळ हाताने साफ केला….आता अजून कुठली पूजा मांडू ?? .. जखमेतले किडे काढले… दाढी कटिंग केली… पँटमध्ये केलेली मल-मुत्र-विष्ठा साफ केली…. आणि मीच खऱ्या अर्थानं सुगंधित जाहलो…. ! 

मग त्यांना लंगोट बांधला… उघड्या बंब त्या बाबांनी, माझ्या डोक्यावर मायेनं हात ठेवला आणि खऱ्या अर्थाने माझ्या स्टेथोस्कोपचा आज सन्मान झाला…! 

उघडले डोळे जेव्हा त्यांनी, गाईच्या नजरेत मला वासरू दिसले…..  

.. आणि नुकत्याच हातात आलेल्या या वृद्ध बाळामध्ये मला माझेच पिल्लू दिसले…. रस्त्यावरच मग त्याला न्हाऊ घातले….! 

इतक्यात माझ्या कानावर ढोल ताशाचा अगडबंब आवाज आला… आमच्या बाळाच्या जन्माचा सोहळा कोण साजरा करतंय, हे बघायला मी मान वळवली…. पाच दिवसाच्या गणपतीची ती विसर्जन मिरवणूक होती ! 

इकडे बाबांचंही जुनं आयुष्य आम्ही विसर्जित करत होतो…!!!  यानंतर त्यांना स्वच्छ पुसून नवीन पांढरे शुभ्र कपडे घातले. कपडे घालता घालता ते म्हणाले, “ डॉक्टर, आज पुन्हा इकडे कसे आलात ?”

आता मी हसत म्हणालो, “ अहो बाबा, तुमचा जीव घ्यायचा होता ना ? जीव घ्यायलाच आलोय…!”

यावर अत्यंत समाधानाने ते हसले….! 

बाबांना ऑपरेशनसाठी एका हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ऍडमिट केलं आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना एखादा व्यवसाय टाकून देऊ किंवा त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू… ! 

अरे हो… आता तुम्हाला सांगायला हरकत नाही… पण, बाबांच्या इच्छेनुसार शेवटी मी त्यांचा “जीव” घेतलाच आहे… ! आणि आता हा “जीव” मी माझ्या जिवात जपून ठेवला आहे…!! 

कुठवर ??? …. माझ्या जिवात जीव आहे तोवर… !!! 

— समाप्त— 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाईच्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्पमध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत, अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली.”

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिनला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते, कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधूनमधून त्याला शुद्ध यायची, पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदावचा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटांना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदावने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ प्रयत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्पपर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदावने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले. 

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे, आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षापूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला नसेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, “ नदाव बन येहुदा “ सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : श्री मनीष मोहिले

प्रस्तुती : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी फुले आणायला गेले आणि बघतच राहिले.त्या मावशींनी एक वृत्तपत्राचा कागद घेतला त्यात फुले,तुळस,बेल ठेवले आणि मोठ्या निगुतीने छान पुडी बांधली.आणि त्यावर छान दोरा गुंडाळला.त्यांची एकाग्रता बघून असे वाटले,जणू त्या खूप मौल्यवान वस्तू किंवा औषध त्यात बांधत आहेत.आणि तसे तर ते  होते.ज्या फुलांनी देवाची पूजा होणार आहे ती असामान्यच!

त्यांनी तो दोरा गुंडाळत असताना मनाने मला पण गुंडाळले ( फसवले नव्हे ).माझे भरकटत चाललेले मन जागेवर आणले.त्या फुलांच्या पुडीमुळे मी मात्र बालपणात पोहोचले.आणि आठवले कित्येक वर्षात आपण अशी कागदी पुडी पाहिलीच नाही.दुकानात जायचे आणि चकचकित प्लास्टिक मध्ये टाकून वस्तू आणायच्या.त्यातील बऱ्याच वस्तू मशीनमध्येच चकचकित कपडे घालून येतात.मग लक्षात आले,माझ्या लहानपणी सर्वच वस्तू कागदाच्या पुडी मधून यायच्या.ही आजची फूल पुडी बघून मन भूतकाळात शिरले.

मला चांगलेच आठवते प्रत्येक दुकानात वस्तू बांधून देण्याचे कागद वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले असायचे.त्या वरून दुकानदाराची पारख करता यायची.काही दुकानदार त्या कागदांची प्रतवारी करून ठेवायचे.म्हणजे प्रत्येक वस्तू साठी व वस्तूच्या वजना प्रमाणे ( वजना प्रमाणे आकारमान पण बदलायचे ) कागदाचे वेगवेगळ्या आकारात तुकडे करुन ठेवलेले असायचे.काही जण ते लहान मोठे तुकडे वेगवेगळ्या कप्प्यात ठेवायचे.अगदी इस्त्री केल्यासारखे!आणि वस्तूचे वजन करून झाल्यावर मोठ्या काळजीने कागद काढून घ्यायचे.व व्यवस्थित घडीवर घडी घालून पदार्थ त्यात ठेवायचे.त्यावेळी असे वाटायचे जणू हे त्या पदार्थला कपडेच घालत आहेत.  काही जण दुकानातच वेगवेगळ्या सुतळीत किंवा जाड दोऱ्यात सर्व कागदाच्या तुकड्यांचे कोपरे जुळवून ओवून ठेवायचे.त्यातही लहान मोठे अशी वर्गवारी असायची.आही जण मात्र वृत्तपत्राचे गठ्ठेच एका कोपऱ्यात ठेवायचे.व वस्तू मापून झाली की टरकन कागद फाडून त्यात वस्तू गुंडाळायचे.त्या वस्तू कागदात बांधताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असायच्या. 

आतील कागद बाहेरच्या कागदाला आधार देत असायचा.जणू लहानांचे महत्वच सांगत असायचा.त्या नंतर त्यावर दोरा बांधला जायचा.तो दोरा मात्र खूप ठिकाणी एकाच पद्धतीने दिसायचा.बहुतेक तराजूच्या अगदी बाजूला किंवा वरच्या बाजूला मोठे रिळ असायचे.व त्याचे एक टोक खाली लोंबत असायचे.आणि ते टोक ओढले गेल्यावर ते रिळ एकाच लयीत नाचत असायचे!दोरा संपत असेल तरी कोणाच्या तरी उपयोगी पडतो म्हणून त्यालाही आनंद होत असावा.

प्रत्येक दुकानाची पुड्या बांधायची खास शैली असायची.आणि ती बघूनच वस्तू कोणत्या दुकानातून आणली ते समजायचे.हे झाले दुकानदाराचे कौशल्य!

आमचे कौशल्य या पुड्या घरी आल्या नंतरचे!त्या कागदात काय आहे याची इतकी उत्सुकता असायची कारण कागद पारदर्शक नसल्याने आणि त्याला दोऱ्यात गुंडाळल्या मुळे आत काय आहे ते दिसायचेच नाही.ती पुडी दुसऱ्या कोणी आणली असेल तर ही उत्सुकता जरा जास्तच असायची.आणि स्वतः वस्तू आणलेली ( मोठ्यांच्या सांगण्यावरून ) असेल तर पोटात बारीक धडधड व छोटासा गोळा यायचा.कारण आणायला सांगितलेली वस्तू चांगली असेल तर कौतुक व शाबासकी,वस्तू ठीक असेल तर काही नाही पण जर वस्तू नीट नसेल तर जगबुडी झाल्या सारखी बोलणी आणि एक दोन धपाटे ठरलेले असायचे.नीट बघता आले नाही का ते काका कोणती वस्तू देतात? असा आमच्या अकलेचा उद्धार ठरलेला असायचा.आमचे कौशल्य या पुढचे.डब्यात गेलेल्या वस्तूने परिधान करुन आईच्या हाताने सोडलेला कागद घ्यायचा आणि त्यावर हात फिरवून छान सरळ करायचा.तो दोन्ही बाजूंनी वाचायचा.त्या वरची चित्रे बघायची व्यंग चित्रे असतील तर हसून घ्यायचे.सिनेमाच्या जाहिराती असतील तर मोठ्यांच्या चोरुन बघून घ्यायच्या.हो आमच्या लहानपणी तेवढेच करावे लागायचे.त्या नंतर तो कागद पलंगाच्या गादीच्या खाली राहिलेली इस्त्री करायला जायचे.त्यावेळी हे कागद फेकून दिले जात नसत.काही दिवसांनी तो कागद घरातील कोणती जागा मिळवणार आहे ते ठरायचे.म्हणजे काही कागद डब्यांच्या खाली जायचे.काही डब्यांच्या झाकणाच्या आत बसायचे.काहींच्या नशिबात चकलीचे चक्र असायचे तर काहींना तळलेली चकली मिळायची.आणि काही कागद तेलकट डबे,निरांजन पुसणे याच्या कामी यायचे.तिच व्यवस्था पुडी बरोबर आलेल्या दोऱ्याची.तो दोरा सोडल्यावर एखाद्या काडीला किंवा दोरा संपून राहिलेल्या रिकाम्या रिळाला गुंडाळून ठेवला जायचा.आणि योग्य ठिकाणी वापरला जायचा.त्या वेळी भराभर फेकून देणे हा प्रकार नव्हता.आणि हे सगळे करण्यात कोणाला कमीपणा पण वाटत नसे.तेव्हा कोणालाच प्लास्टिक चे वारे लागले नव्हते.आणि हायजीन च्या कल्पना वेगळ्या होत्या.समाजातील गरीब,श्रीमंत सगळेच एकाच दुकानातून व वृत्तपत्राच्याच कागदातून सामान आणायचे.कारण मॉल उदयाला आले नव्हते.विशेष म्हणजे रिड्यूस,रीयूज आणि रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणली जायची.

आयुष्यात किराणामाल या शिवाय अनेक पुड्या यायच्या.कित्येक घरी फूल पुडी यायची ती पानात बांधलेली असायची.भेळेच्या गाडी वरची भेळ पण खायला व बांधून कागदातच मिळायची.आणि भेळ खाण्यासाठी चमचा पण जाड कागदाचाच असायचा.या शिवाय भाजलेले शेंगदाणे,फुटाणे शंकूच्या आकारातील निमूळत्या पुडीत मिळायचे.ती पुडी फारच मोहक दिसायची आणि ती पुडी घरात कोणी आणली की बाळ गोपाळ आनंदून जायचे.देवळातील अंगाऱ्याची चपटी पुडी परीक्षेला जाताना खूप आधार देऊन जायची.त्या वेळी केळी सुद्धा कागदात बांधून यायची.यात अजून विशेष पुडे आहेतच.बघायला आलेल्या मुलीला पेढ्यांचा मोठा पुडा मिळायचा.शिवाय साखर पुड्यात पण त्या ताटांमध्ये साखरेचे पुडे इतर साध्या पुड्यांमध्ये रंगीत कागदात ऐटीत बसायचे.

आता हे वाचून जर कोणाला असे वाटले की मी पुड्या सोडत आहे.तर त्याला माझा इलाज नाही.ज्यांनी तो काळ अनुभवला आहे त्यांना यातील सत्यता नक्कीच पटेल.आणि लहानपणात तेही थोडा फेरफटका मारुन येतील.

तर माझं हे असं होतं.अशी कोणतीही वस्तू मला आठवणीत घेऊन जाते.आणि मी असे काही लिहिते.असो!तुम्ही वाचता म्हणून किती लिहायचे ना?

या पुडीच्या निमित्ताने सगळ्या पुड्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.आणि ही आठवणींची एक पुडी मी सोडून दिली आहे. आता ही पुडी तुम्हाला कोणकोणत्या पुड्यांची आठवण देते ते आठवा बरं!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

२९/९/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक होता गरुड…! नावाप्रमाणेच आकाशात उंच भरारी घेणारा… ! 

साजेशी बायको पाहून याने एका पक्षीणीशी लग्न केलं… 

हा दररोज सकाळी कामावर जायचा, संध्याकाळी घरी यायचा, दिवसभर काबाड कष्ट करायचा…  जमेल तितकं पक्षिणीला आनंदात ठेवायचा…! 

कोल्हापूर जिल्ह्यातलं याचं छोटंसं एक गाव… गरुडच तो … याने स्वप्न पाहिलं, बायकोला म्हणाला, “ मी पुण्यात जाऊन आणखी कष्ट करतो, म्हणजे आपल्याला आणखी सुखाचे दिवस येतील… !”

पुण्या मुंबईच्या आकाशात हा गरुड उंच झेप घेऊ लागला…  मिळेल तो दाणापाणी बायकोला घरी पाठवू लागला, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढला… ! 

“माझी ती पक्षीण” इतकंच त्याचं आयुष्य होतं… ! तिनं सुखी आणि आनंदी राहावं इतकंच त्याचं माफक स्वप्न होतं…. त्यासाठी तो स्वतःच्या शक्तीबाहेर काम करू लागला…. प्रकृती ढासळली… पंख थकले… आता दाणापाणी कमी मिळू लागलं …. ! हा स्वतःच्या मनाला खायचा, तरीही काम करतच होता… !  पक्षिणीला जास्तीत जास्त सुखी कसे ठेवता येईल, याचाच तो सतत विचार करायचा… ! याने आणखी चार कामे धरली आणि प्रकृती आणखी ढासळत गेली…. 

मधल्या काळात पक्षिणीला एका धष्टपुष्ट श्रीमंत “गिधाडाने” साद घातली, ती भुलली, तिला मोह झाला आणि ती त्याच्याबरोबर भूर्र उडून गेली…. ! मनापासून प्रेम करणाऱ्या गरुडाला ती सोडून गेली… ! 

गरुड असला तरी चालता बोलता जीवच तो… हा धक्का त्याला सहन झाला नाही… ! तो  पूर्ण खचला…. 

‘आता कमवायचं कोणासाठी ?’  हा विचार करून रस्त्यात वेड्यासारखा तो फिरायला लागला…. होती ती नोकरी गेली, तेव्हापासून पुण्यातल्या रस्त्यावर विमनस्क अवस्थेत तो फिरू लागला…. याला बरीच वर्षे लोटली… तरुणपण सरलं… डिप्रेशनच्या याच अवस्थेत एके दिवशी एक्सीडेंट झाला, उजव्या पायाची तीन हाडे मोडली… जिथे एक्सीडेंट झाला तिथेच पुण्यातल्या एका नामांकित रस्त्यावरच्या फुटपाथवर तो गरुड पडून राहिला… घायाळ जटायू सारखा…! 

पक्षिणीला याबद्दल माहीत असण्याचे काही कारण नव्हते…. कळवणार कोण ? आणि कळलं असतं तरी ती थोडीच येणार होती ? कारण तिच्यासाठी ते श्रीमंत “गिधाड” हेच तिचं सर्वस्व होतं… ! 

 

प्रसंग २

मी पुण्यातल्या भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो, रस्त्यावर पडलेल्या लोकांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. माझे एकूण 60 स्पॉट आहेत.  यात जवळपास पुणे पिंपरी चिंचवड असे सर्व भाग कव्हर होतात. 

मला नेहमी असं वाटतं, की मी जे काही काम करतोय ते मी करतच नाही… कोणीतरी माझ्याकडून हे करवून घेतंय, माझ्याही नकळत….. कोण ???  ते मलाही माहीत नाही !!!  मी पण शोधतोय त्याला….

तर ..

एकदा १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी मला एक फोन आला, संध्याकाळी माझा त्यांनी सत्कार ठेवला होता. त्यांनी पत्ता सांगितला, संध्याकाळी मी त्या पत्त्यावर गेलो. जाताना आजूबाजूचा परिसर पाहिला, मला हा परिसर थोडा नवीन होता. परिसर चकाचक असला तरी फुटपाथवर अनेक निराधार लोक मला दिसले. 

या नवीन ठिकाणी पुन्हा यायचं, असं मी मनाशी ठरवलं आणि २२ सप्टेंबर २०२३ म्हणजे शुक्रवारी, मी या परिसरात फेरफटका मारला. अनेक जीवाभावाचे लोक भेटले, अंध आणि अपंग…. माझ्या परीने मला जे जे शक्य होतं, ते ते मी त्यांच्यासाठी त्या दिवशी केलं आणि तिथून अत्यंत समाधानाने परत फिरलो. 

परत निघालो , पण अचानक एका ठिकाणी माझी मोटरसायकल बंद पडली. किक मारून, बटन स्टार्ट करून थकलो, गाडी काही केल्या सुरू होईना… ! पेट्रोल पण भरपूर होतं…. मग झालंय काय हिला ??? 

घामाने निथळणारा मी ….आता थंड पाण्याची बाटली कुठे मिळते का ? म्हणून शोधत फुटपाथवरून चालत, चरफडत निघालो…. 

फुटपाथ वर कुणीतरी एक भिजलेलं गाठोड टाकलं होतं… आधीच वैतागलेला मी…. वाटेत पडलेल्या त्या भिजलेल्या गाठोड्याला रागाने लाथ मारून बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला…. !  

मला वाटलं तेवढं ते गाठोड हलकं नव्हतं….माझ्या पायाने ते सरकवलं गेलं नाही …. मी रागाने त्या गाठोड्याला अजून जोराने लाथ मारली आणि मला त्याच्यातून “आयो” म्हणून किंचाळल्यासारखा आवाज आला…! .. मी दचकलो… घाबरलो … मलाही काही कळेना ! 

भिजलेल्या त्या बोचक्यातून आधी एक दाढीवाला चेहरा बाहेर आला, त्यानंतर मला एक हात दिसला, मग दुसरा हात दिसला, दोन्ही हाताने त्याने ती चादर खाली केल्यानंतर मला त्या व्यक्तीचे पोट आणि पाय दिसले…. ! 

डॉक्टर म्हणून अनेक बाळंतपण आजवर पाहिली…. पण बोचक्यातून दाढीवाले बाळ जन्माला येताना आज पहिल्यांदाच पहात होतो…. !  गर्भातून लहान बाळ जन्माला येणं हे नैसर्गिक…. परंतु बोचक्यातून दाढीवाले बाळ जन्माला येणं हे अनैसर्गिक… ! …. फेकलेल्या बोचक्यातून म्हातारे आई बाप हल्ली रस्त्यावर जन्माला येतात, ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे ! 

तर, भिजलेल्या बोचक्यातून बाहेर पडलेल्या त्या बाबांची मी पाया पडून माफी मागितली आणि त्यांची चौकशी केली आणि समजले …. हो…. हाच तो पाय तुटलेला तो गरुड !!! 

हा “गरुड” पाय तुटल्यापासून पाच महिने याच जागेवर पडून आहे. दया म्हणून कोणीतरी याला ब्लॅंकेट दिलं होतं, या ब्लँकेटमध्ये तो स्वतःला गुंडाळून घेतो… भर पावसात  हे ब्लॅंकेट भिजून आणि कुजून गेलं आहे… त्याच्या आयुष्यासारखं….! 

खूप वेळ पाण्यात बोटं भिजल्यानंतर, पाणी त्वचेच्या आत जातं, बोटं पांढरी फटक होतात, त्यावर सुरकुत्या पडतात…. ! जवळपास सर्वांना हा अनुभव कधीतरी आला असेल…. पण कपाळापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत यांचं संपूर्ण शरीर पांढरंफटक पडलं होतं….शरीरातल्या प्रत्येक भागाच्या त्वचेच्या आत पाणी गेलं होतं… पाण्यात भिजून स्पंज जसा फुलतो तसं संपूर्ण शरीर फुललं होतं… फुग्यासारखं…! जिथे पाय तुटला होता तिथल्या जखमांमध्ये किडे वळवळ करत होते…. थंडीने ते कुडकुडत होते, दात वाजत होते, हात थरथरत होते, डोळे निस्तेज पडले होते….टेबलाच्या अगदी कडेला एखादी वस्तू ठेवावी आणि ती कधी पडेल असं वाटावं, तसं डोळे खोबणीतून कधी बाहेर पडतील असं वाटत होतं…. 

एखादयाला असं पाहणं खूप त्रासदायक असतं…. ! पहिल्यांदा ती ओली घाणेरडी ब्लँकेट काढून मी फेकून दिली… आणि घाणेरड्या वासानेही शरमेनं लाजावं इतकी दुर्गंधी त्यावेळी मला जाणवली… !

” पॅन्ट नावाचं जे वस्त्र त्यांनी घातलं होतं, त्यात पाच महिन्यांची मल मूत्र विष्ठा होती…” या एका वाक्यात दुर्गंधीची कल्पना यावी ! पण ते तरी काय करणार ? पायाचे तीन तुकडे झालेला माणूस जागेवरून हलेल कसा ? 

खरं सांगू ? बाबांच्या आधी, मी या पँटचा विचार करायला लागलो….कारखान्यात जेव्हा हे कापड तयार झालं असेल, तेव्हा या कपड्याला काय वाटलं असेल… ? मी आता एका प्रतिष्ठिताच्या अंगावर सफारी म्हणून जाईन किंवा नवरदेवाचा कुर्ता होईन किंवा एखाद्या नवरीचा शालू होईन… ! मग माझ्या अंगावर सुगंधाचे फवारे उडतील आणि मला जपून ते कपाटात ठेवतील…! अहाहा….!!! 

पण झालं उलटंच…. या कपड्याची पॅन्ट शिवली गेली आणि ती नेमकी या गरुडाच्या पदरी पडली…!

तेव्हापासून हे कापड … पँट होवून, त्या गरुडाची मलमूत्रविष्ठा अंगावर घेऊन सांभाळत आहे… !

किती स्वप्नं पाहिली होती आयुष्यात, आणि आता अंगभर एखाद्याची मलमूत्रविष्ठा, तोंडावर फासून घेताना काय वाटत असेल या कपड्याला ? कुणी विचार केलाय ??

देवाच्या पायाशी पडलेल्या फुलांचे कौतुक मला नाही… त्यांना सन्मान मिळतोच ! एखाद्या चितेवर आपण फुलं उधळतो… आपल्या इच्छेसाठी…..  मनात नसूनही ती फुलं मात्र चितेवर सहज जळून खाक होतात… आपल्या आनंदासाठी…. मला त्या फुलांचं कौतुक आहे…. !!!  कुणाच्या आनंदासाठी असं सहज जळून खाक होणं… इतकं सोपं असतं का ? .. जळून खाक झालेल्या त्या फुलांपुढे मी मात्र नतमस्तक आहे… ! 

पण …. काहीतरी स्वप्नं घेऊन जन्माला आलेल्या त्या कपड्याला मात्र आज कुणाची तरी मलमूत्रविष्ठा सांभाळावी लागते… आता माझी नजर बदलते… मी त्या पॅन्टकडे कृतज्ञतेने बघू लागतो… नमस्कार करतो…. !  पॅंटीचे ते कापड मला यावेळी कानाशी येऊन म्हणतं…. , “ डॉक्टरसाहेब एकाच खाणीत अनेक दगड सापडतात…. त्यातले काही पायरी होतात …कोणी मूर्ती होतात… तर कोणी कळस होतात… 

आमच्यासारखे काही दगड मात्र  “पाया” म्हणून स्वतःला जमिनीखाली गाडून घेतात… कळस दिसतो… मूर्ती दिसते …पायरीलाही लोक नमस्कार करतात…! ते मंदिर…तो कळस… ती आरास… धान्याची ती रास… ती मूर्ती… ती आकृती… हे सगळं जमिनीखाली गाडल्या गेलेल्या आमच्यासारख्या दगडांमुळे उभं असतं साहेब…. !” 

मी शहारून जातो…. अंगावर काटा येतो ! 

काही गोष्टी अव्यक्त राहतात …. आणि म्हणूनच सारं व्यक्त होतं…. !!! 

.. आयुष्यभर जगून हे सत्य मला कधी कळलं नाही… आज मलमूत्रविष्ठा धारण केलेल्या या निर्जीव कपड्याने मला कानात येऊन मात्र हे सगळं सांगितलं… !!! तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अथर्वशीर्ष म्हणजे काय…?  ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

अथर्वशीर्ष म्हणजे काय…? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

थर्व म्हणजे  हलणारे आणि 

अथर्व म्हणजे ‘ न हलणारे ‘ शीर्षम् ‘ !!

सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेलं मस्तक…!! 

 

अथर्वशीर्षाचं पठण केलं, की बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं. 

आपल्या मनाची ताकद वाढविणं, हे आपल्याच हातात असतं. माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. 

शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण संकटांवर मात करू शकतो. 

 

तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे का ? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही.

तुम्ही श्रद्धाळू असाल, तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल,आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल, तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. 

कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग…!! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे, असे म्हटले आहे. 

हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला नक्कीच पटेल. या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे. तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणता येईल.

 

अथर्वशीर्षाचा अर्थ         

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे.  आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहू या. 

‘हे  देवहो, आम्हांला  कानांनी शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगलं पाहावयास मिळो. 

सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनात व्यतीत होवो. 

सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो. ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो. 

संकटांचा नाश करणारा गरूड आमचं कल्याण करतो. बृहस्पती आमचं कल्याण करतो.

सर्वत्र शांती नांदो…!! 

ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो.

..  तूच  ब्रह्मतत्त्व आहेस. तूच सकलांचा कर्ता(निर्माता) आहेस. तूच सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस. तूच सृष्टीचा संहार करणाराही आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस. तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. 

मी योग्य तेच बोलतो, 

मी खरं तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.

तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं, तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर.

दान  देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर. उत्पादक अशा, माझं तू रक्षण कर.

 तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर.    

 

माझं पश्चिमेकडून रक्षण कर.

माझं पूर्वेकडून रक्षण कर. 

माझं उत्तरेकडून रक्षण कर. 

माझं दक्षिणेकडून रक्षण कर.

माझं वरून रक्षण कर. 

माझे खालून रक्षण कर. 

सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू माझं रक्षण कर. 

 

तू वेदादी वाड॒.मय आहेस. 

तू चैतन्यस्वरूप आहेस. 

तू ब्रह्ममय आहेस. 

तू सत् , चित् , आनंदस्वरूप, अद्वितीय आहेस. 

तू साक्षात ब्रह्म आहेस. 

तू ज्ञानविज्ञानमय आहेस. 

 

हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर राहातं. 

हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,

हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं. 

पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.

तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस. 

 

तू सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा आहेस. 

तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलीकडचा आहेस. 

 

तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचाआहेस. 

तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस.          

 

तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस. 

योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात. 

 

तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच भूलोक, 

तूच भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि ॐ .. हे सर्व तूच आहेस. 

 

गण शब्दातील आदि ‘ ग् ‘ प्रथम उच्चारून नंतर ‘अ ‘चा उच्चार करावा. 

त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. 

तो तारक मंत्रानं ॐ कारानं युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ‘ॐगं ‘ असा होतो. 

 

हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे… 

‘ ग् ‘ हे मंत्राचे पूर्व रूप आहे. 

‘ अ ‘ हा मंत्राचा मध्य आहे.

अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.

अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. 

या गकारादी चारांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. ती ही गणेशविद्या होय. 

 

या मंत्राचे ऋषी ‘ गणक ‘ हे होत. 

‘निचृद् गायत्री ‘ हा या मंत्राचा छंद होय. 

गणपती ही देवता आहे. 

 

‘ॐ गंं ‘ ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. 

आम्ही त्या एकदंताला जाणतो. त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देवो. 

 

ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी चौथा हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे, कान सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, अंगाला लाल चंदन लावले आहे, ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,अशा गणेशाचे जो ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.

 

व्रतधारिणांच्या प्रमुखांना, व्रातपतीस नमस्कार असो. देवसमुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो,

शंकरगण समुदायाच्या अधिपतीला प्रमथपतिला  नमस्कार असो, 

लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी, शिवपुत्र, वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो.         

 

.. हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला, तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्यालाही नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणानं, आदरानं जोडले जातात…!!

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

‘ चांदण्यांचं खळं ‘  या सदरात श्रीअभिजीत साळुंखे यांनी दिलेले ग्रामीण लेखन. सीतामाईचे वनवासी जीवन हे स्त्री जीवनाच्या त्रासाचे मूळ आहे असे या महिलांना वाटते, हे या शब्दांमधून जाणवते. भाषेचा बाज पूर्ण ग्रामीण, ओवी रचनेत आहे. …. 

न्हवायिळा ग राम  बाई चैताचा गारयीवा

सीता ग मालनीचा रख रख वैशाखी जारयिवा

….. चैत्र पालवीच्या गारव्यात रामाचा जन्म झाला तर वैशाख शुद्ध नवमीला वैशाखाच्या उन्हात सीतामाईचा शेतात शोध लागला

आकाशाचा पाळणा खाली धरती मावली

 नांगराच्या ताशी सीता जई- अभिव्यक्तीनकाला गावली

राम सीतेची जोडी लोक वाङ्मयात जानपद लोक घेतात ती एकरूप झाली आणि बाया बापण्यांनी आपली संसारीक सुख दुःख या भावभावनांची बिरुदं त्यांना लावून आपल्या आयुष्याशी जोडली. 

कवसलीचा राम न्हाय शितंच्या तोलायाचा 

शिता ग हिरकणी राम हलक्या कानायाचा

सीतेला तीन सासवांचा सासुरवास होता हे सांगताना म्हणतात- 

कैकयी सुमती कवसला शितला तीन सासा

 लेक धरतीची सीता त्यांनी धाडला वनवासा

 शितला सासुरवास केला ग केशोकेशी

 सयांस्नी वाटून दिला तिने गं देशोदेशी

बायांचा जाच हा सीतेचाच वाण-वसा असं त्या मानतात. 

वनवास आला शितंसारख्या सतीला 

बारा वर्ष झाली डुई धुतली नहिला

 सासुरवासाचा फास शिते सारख्या सतीला 

घडोघडी परीक्षा बाई जन्माच्या परतीला

रावणाच्या कैदेतून सुटल्यावरही तिला चारित्र्य शुद्धतेसाठी अग्नीपरीक्षा  द्यावी लागली

सतीपणाचं सत्व  दाह आगिनं इजल 

सीता ग मालनिचं मन घडी घडी न झुंजल

गरोदर असतानाही तिच्याबरोबर कोणीही नव्हतं वार्ड चालू होती रडत होती 

आटंग्या वनामध्ये कोण रडत ऐका 

शीतंला समजावती बोरीबाभळी बायका… 

सिता सतीला वनवास असा किती करतील

 लवकुश पोटाला येतील सूड रामाचा घेतील

नंतर लवकुश्यासह सीतेचा स्वीकार केला आणि तिला आणायला लक्ष्मणाला रथ घेऊन पाठवला 

लक्ष्मणदीर रथ सांगाती घेऊन

 वहिनीला न्याया आला मुरळी होऊन 

लक्ष्मण हाका मारी वहिनी चला व घराला 

वाट बघती समधी डोळे लावून दाराला

सीता लव कुश बाळांना त्यांच्याकडे देऊन निश्चयाने म्हणते 

‘आता कशाला जोडू बाई फिरून नातीगोती ‘

वर पडलाय जीव झाली आयुष्याची माती 

वसर वसर माऊली माझे माय धरत्री 

घेई लेकीला पोटात जीव निवू दे अंतरी

…. सीतेचं मातीत सापडणं आणि नंतर कौटुंबिक सुखदुःख भोगून फिरून मातीत जाणं याचा दुवा थेट आपल्या जगण्याबरोबर जोडून या मायमालयांनी मातीच्या लेकीने तिला आपल्या लोकगीतात लोकलयीनं अजरामर केलं. 

लेखक : श्री अभिजित साळुंखे 

माहिती संकलन :   सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सुरवातीला अधिक महिना, मग श्रावण महिना,त्या नंतर गौरी गणपती हयामुळे दोन अडीच महिने नुसती भक्तगणांची धावपळ होती. पूजाअर्चा , देवदर्शन, व्रतवैकल्ये, ह्यामध्ये बहुतेक सगळे गुंतले होतें. श्रावण आणि अधिक महिन्यातील व्रतवैकल्ये आणि गणपती महालक्ष्मी उत्सव ह्यांमुळे हे सगळे दिवस प्रचंड उत्साहाचे, चैतन्याचे आणि धावपळीचे गेलेत.

ह्या सगळ्या धावपळी नंतर प्रत्येकाला आता थोडीशी विश्रांती, थोडीशी शांतता, अगदी मनापासुन हवीहवीशी वाटते, नव्हे आपलं शरीर आता आरामाची, जरा उसंतीची आतून मागणी करीत असत.आता जर पंधरा दिवस जरा शांत, स्थिर गेलेत तर पुढें नवरात्र, दिवाळी ह्यासाठी लागणारा उत्साह, शक्ती आपल्यात तयार होईल असं मनोमन वाटतं.

सहज मनात आल ज्या प्रमाणे आपलं त्याचं प्रमाणे देवाचं सुध्दा असेल. त्यांचे ही हे सगळे दिवस प्रचंड व्यस्ततेत गेले असतील. ती देवळांमध्ये होत असलेली प्रचंड गर्दी, भक्तांकडून होणारा तो दूध पाण्याचा अभिषेकाच्या निमित्याने होणारा मारा, ती कचाकचं तोडण्यात येऊन देवाला वाह्यलेली फुलं, पत्री, तो प्रसादाच्या पदार्थाचा कधी कधी अतिरेक आणि सगळ्यांत कळस म्हणजे ह्या नंतर भक्तांकडून मागण्यात येणाऱ्या गोष्टी, त्यासाठी नवसाची बोलणी, ह्या सगळ्यामुळे देऊळ वा देव्हाऱ्यातील देव सुध्धा जरा उबगलेच असतील नाही ?

अर्थातच मी संपूर्ण आस्तिक गटातीलच आहे, देवावर माझा प्रचंड विश्वास आहे, ह्या शक्तीपुढे कायम नतमस्तक रहावसच आपणहून वाटतं, फरक जर कुठे पडत असेल तर तो भक्तीत न पडता तो हे दर्शविण्याचा पद्धतीत पडतो. मला स्वतःला दिवसाची सुरवात आणि दिवसाचा शेवट हा देवाच्या दर्शनाने झाला तर मनापासुन आनंद मिळतो, सुख वाटतं. परंतु हे करतांना ती गर्दी असलेली देवळ, भरमसाठ तोडलेली फुलं, पत्री हे मनापासुन नको वाटतं वा कुणी केलेलं दिसलं ते मला अस्वस्थ करुन जात. असो

आता पंधरा दिवसाच्या ब्रेक नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी ह्यांचे वेध लागतील. तेव्हा सगळ्यांनी जरा विश्रांती घ्या आणि नव्या उत्साहाने परत सण, सोहळे ह्यांच्या स्वागताला सज्ज व्हा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

प्रिय नदीमाय, आज तुझ्या अत्यल्प वाहत्या पाण्यात मी एक कागदी नाव सोडली आहे. इतरांच्या नजरेतून लपवण्यासाठी कागदाची नाव केलेली आहे पण ती कागदी नाव नसून तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. सध्या तुझं वाहणं थांबलेलं असल्यामुळे निवांत वाच. मराठवाड्यात मान्सुन आगमनाचा पाऊस झाला नाही, परतीचा पाऊस चार दिवसांनी परतलेला असेल. पुढच्या हाहाकाराची चाहूल दिसतेय. माझ्या बालपणी तुझं खळाळतं रूप पाहिलेलं असल्यामुळे तुझी खंडमयता बेचैन करत आहे.

प्रिय नदीमाय, तुला वाटलं असेल की हे पत्र आजच का लिहिले असेल ? तर तुला सांगतो आज जागतिक नदी दिन आहे. नाही कळलं ? कळणार कसं गं तुला ?माझी भोळी माय. अगं आम्ही माणसं स्वतःचा जन्मदिवस वाढदिवस म्हणून साजरा करतो. साधुसंतांचे, महापुरूषांचे, नारीरत्नांचे, वीरगाथांचे स्मरण  म्हणून जयंती पुण्यतिथी दिन साजरे करतो. निसर्ग शक्तीची पूजा म्हणून सण उत्सव साजरा करतो. तुझेही आमच्यावर खूप उपकार आहेत, म्हणून तुझाही दिवस साजरा करावा म्हणून जागतिक स्तरावर आम्ही ‘नदी दिन‘ साजरा करतो.

आता तुला प्रश्न पडला असेल की हे जग म्हणजे  काय आहे ? ती कथा खरेच खूप मोठी आहे. पण हीच कथा तुझ्या चित्तरकथेची पटकथा आहे. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इतक्या लांबच्या वर्षाची आहे की एकवेळ ऋषीचे कुळ सापडेल, तुझेही मुळ सापडेल पण मनुष्य जन्माचा नेमका आरंभ बिंदू काळाच्या मापन चौकटीत मांडणं कठीण आहे. हवा, पाणी, जमीन हे पृथ्वीचे आरंभीचे घटक. या घटकांनीच जैविक व अजैविक उपघटकांची निर्मिती केली. नव जीव-निर्मितीचे वरदान लाभलेल्या पृथ्वीवर मानव नावाचा जीव आला. गुहेचा ,डोंगरकपारीचा आधार घेत हा माणूस सुरुवातीला जीव मुठीत घेऊन राहत असे. अन् आता मानवामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा जीव मेटाकुटीला आला आहे. पशूपालन व शेतीसाठी माणसाला स्थिर पाणवठ्याची गरज निर्माण झाली. ही गरज नदीमाईने पुरविली‌. म्हणून आरंभीच्या मानवी वसाहती नदीच्या आधारानेच उभ्या राहिल्या. स्थिर जीवनामुळे माणसाची अन्नासाठीची भटकंती थांबली व थांबवलेल्या वेळेत त्याने विकास, प्रगती नावाखाली इतक्या उचापती केल्या आहेत की त्यातून निसर्गाला अपरिमित झळ पोहोचली आहे. नदीमाय तू सुद्धा त्यातून सुटली नाहीस. तुझ्याही ते लक्षात आलेच असेल. माय म्हणून तू आम्हाला माफ करत असशील, हे मातृत्व म्हणून ठीक असलं तरी आता तुझ्या नरडीभोवती फास आवळला गेला आहे. शेवटच्या घटकेत तुझी सुटका झाली नाही तर पुढची मानवी पिढी तुझ्या कोरड्याठाक काठावर मरून पडलेली असेल.

नदीमाय, किती गं सुंदर तुझा जन्म. उंच पठारावर, डोंगरपर्वतावर, बर्फाच्या साठ्यातून तुझा जन्म. पृथ्वीच्या पृष्ठावर पावसाच्या आगमनाने ओढलेली तू एक साधी रेषा. पण अशा अनंत रेषा, अनंत प्रवाह एकत्र येत तू नदी होतेस. घनदाट जंगलातून, भयानक दरीखोऱ्यातून, धबधब्यातून ओसंडून वाहत तू विशाल रूप घेत धावत मानवी वस्तीत येतेस. केवळ शेती व पशुपालन या आमच्या प्राथमिक गरजा होत्या तोपर्यंत आपलं नातं माय नदी व पुत्र मानव असंच होतं. आमच्या घरात जन्मलेल्या मुलींना नदीची नावं आहेत. नदीचे उत्सव आहेत. चित्रपटाची गाणी, नावे यांतसुद्धा नदी आहे. नदी व मानव एकरूप आहेत. पृथ्वी हे जर एक मानवी शरीर मानलं तर नदी ही पृथ्वीची रक्ताभिसरण संस्था आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगीकरण, कारखानदारी, व्यवसाय, अर्थाचा हव्यास इत्यादी कारणांमुळे मानवाने नदीच्या नरडीला नख लावले. जमिनीवरील भूखंड माफियांची एक शाखा वाळू माफिया म्हणून उदयास आली. नदीमाय, हे वाळू माफिया कुणी परग्रहावरील एलिएन्स नसून धरतीच्या लेकरातीलच हव्यासी लोकांचा कंपू आहे, जो सातत्याने नदीमायीच्या थेट गर्भात लोखंडी खोऱ्यांचा मारा करून शेकडो वर्षांनंतर तयार होणाऱ्या वाळू कणांची भ्रुणहत्या करून चोरी करत आहे.

जंगलातील वनस्पतींच्या मुळातून, मृदागंध खडकातून तू आमच्यासाठी अमृत चवीचे पाणी आणलेस. 

पण नागरी वस्तीत येताच आम्ही तुला काय दिले- तर न विरघळणारे प्लास्टिक, किळसवाणे घाणेरडे पदार्थ, दुर्गंधीयुक्त सांडपाणी, कारखान्यातील विषारी जल, अपरिमित कचरा, किती किती म्हणून सांगावं ? असं सांगितलेलं पण काही माणसांना आवडत नाही म्हणून तर गुपचूप पत्र लिहिले आहे.

नदीच्या आश्रयाने आमची कथा लिहिली आहे, पण आम्ही मात्र तुझी चित्तरकथा केली आहे. पण काही माणसं खूप चांगली असतात. ब्रिटनचा एक नागरिक आहे ,मार्क ॲंजोलो– त्यानेच तब्बल पंचवीस वर्षे थॉम्पसन नदीवर स्वच्छता मोहीम राबविली. नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम जगाच्या नजरेत आणून दिले. 

त्याने ही समस्या व उपाय जगाच्या नजरेत आणून दिले. नदी स्वच्छतेसाठी व नैसर्गिक जलस्त्रोत मोकळे करण्यासाठी हा ‘ नदी दिन ‘ आहे.नदीच्या आयुष्याचा गोंडस पट विस्कटून टाकणाऱ्या चित्रपटाचे सर्व कलाकार मानवी वंशाचे आहेत. आमच्यातीलच काहींनी तुझी चित्तरकथा केली आहे म्हणून तर मी तुझी उपकारक कथा आमच्या बांधवांना सांगण्याचे मनावर घेतले आहे.

‘ सिंधु ‘सारखी प्रगत संस्कृती तुझी देणगी आहे. एवढेच नव्हे तर मानवी संस्कृतीचा उदय, विकास व प्रगतीचा तूच आधार आहेस. अन्नासाठी मासेमारी, पोटासाठी शेती, उद्योगासाठी वीज, निवाऱ्यासाठी वाळू, वाहत्या पाण्यामुळे वनस्पतींचा बीजप्रसार, या सर्वांचे मूळ तू आहेस. म्हणून नदीमाय तू जगले पाहिजेस.

जलस्त्रोताबाबत उपकार , जनजागृती व नदी संवर्धन करणारा एक सेवक पुत्र म्हणून मी तुझ्या कामावर असेन .हा शब्द तुला देतो  नदीमाय….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares