मराठी साहित्य – विविधा ☆ मन… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ मन… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

॥श्री॥

… मन …

.. “मन करा रे प्रसन्न….

. सर्व सिद्धिचे कारण

. मोक्ष अथवा बंधन

.. सुख समाधान इच्छा ते…”

आपले जगत्गुरू तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. तुकारामांइतका सच्चा गुरू असूच शकत नाही, कारण संसारतापात होरपळून तावूनसुलाखून निघालेला त्यांच्या सारखा क्वचितच कुणी असेल. त्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येकच शब्द अनुभवाचे अमृत आहे.

या पूर्ण अभंगातून त्यांनी “मनाची” महती सांगितली आहे. ताकद ही अंगात नसते डोक्यात,

मनात असते. तुम्ही एकदा, म्हणजे तुमच्या मनाने एकदा ठरवले की, ही गोष्ट करायचीच,

तर ती पूर्णत्वाला जाते म्हणजे जाते. निश्चय मात्र मनाचा पक्का हवा. म्हणूनच दोन मल्लांमधला बारक्या मल्ल सुद्धा कुस्ती जिंकतो कारण त्याच्या मनाचे डावपेच पक्के असतात, तो ते बिलकूल विसरत नाही व संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला चीतपट करतो. कारण त्याची ताकद डोक्यात असते, तो डोक्याने कुस्ती खेळतो.

म्हणून तुकाराम म्हणतात, मनाची पूजा करा.

मन हेच सर्व सिद्धीचे कारण आहे. तुम्ही ठरवले तर ते मोक्ष देईल तुम्ही म्हणाल तर बंधनात राहील. काय करायचे ते तुम्ही ठरवा. मन सुख  देईल, समाधान देईल, तुमच्या सर्व इच्छा देखील पुरविल. फक्त काय हवे त्याची प्रतिमा मनात स्थापन करा. एकदा तुमचे ध्येय निश्चित झाले की, तुमची त्या दिशेने वाटचाल झालीच म्हणून समजा. कारण काय करायचे याची प्रतिमा तुमच्या मनात पक्की असते.

“मने मना पूजा केली.. “ वाह वा क्या बात है..

मनाने मनाची पूजा करा. मन खुश होते. आणि मग मनच तुमची इच्छा पुरविते. तुकाराम म्हणतात, अहो, मन सद् गुरू आहे. मन माऊली आहे. वाह वा… मन माऊली आहे. माऊली तर मग साऱ्या इच्छा पुरवतेच ना? मन गुरूही आहे नि शिष्यही आहे. ते आपले दास्यत्व पत्करते.

आपल्याला प्रसन्न ठेवते नि गती अथवा अधोगतीही देते. साधक, वाचक, पंडित हो ऐका.

मनासारखा दुसरा गुरू नाहीच. नाही, नाही, अहो मना सारखे दुसरे दैवत नाहीच.

पण हेच मन भगवंतासाठी आसुसलेले असतांना या मनाला वठणीवर आणायला तुकारामांना

काही कमी प्रयास पडले नाहीत? फार कष्टवले त्यांना समतोल बुद्धी येण्यासाठी. शेवटी भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, तेव्हा कुठे ते वठणीवर आले. म्हणूनच ते म्हणतात, मनाची पूजा करा. भंडाऱ्यावर त्यांना विठ्ठल पावला नि मुखातून शब्द उमटले..

“आनंदाच्या डोही आनंद तरंग

आनंदची अंग आनंदाचे….

काय सांगू झाले काहींचिया बाही…

अहो, काहीच्याकाहीच झाले हो.. मला विठाई पावली हो… अंतर्बाह्य ते आनंदात न्हाऊन निघाले.  ”पुढे चाली नाही आवडीने”..

आता मला कामच उरले नाही, मला विठाई भेटली. माझे ध्येय साध्य झाले.

एकदा तुमच्या मनाने ध्येय ठरवले की तिकडेच वाटचाल होते, मग ते कितीही कठीण असो.

म्हणूनच.. “ ऐकावे जनाचे, करावे मनाचे”

उगाच नाही सांगून गेले मोठे लोक. महत्वाचा संदेश काय आहे? मंडळी… तर मन प्रसन्न ठेवा.

कसे राहते ते? दुष्ट विचार करायचेच नाहीत ना?

जोवर तुम्ही दुसऱ्याचे वाईट चिंताल तोवर ते दुष्टच असणार? दुष्ट मनात दुष्ट विचार? मग ते कसे प्रसन्न राहील हो? हो ना? म्हणून आधी दुष्ट विचार झटकायचे? कोणाचे काय चालले आहे हे बघायचेच नाही हो! आपल्याला काय करायचे ते ठरवायचे. कुणी? आपल्या मनाने. मग ते स्वच्छ हवे ना? त्या शिवाय कसे कल्याण होणार हो? तुम्ही जो विचार करता तसेच घडते हे शास्र आहे. चांगले विचार करणाऱ्याचे कल्याणच होते.

हा माझा तर अनुभवच आहे. म्हणूनच सकारात्मक रहा असे तुकाराम सांगतात.

हो, “ निंदकाचे घर असावे शेजारी” का? त्यामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात व आपल्यात सुधारणा होतात. त्यांना खुशाल निंदा करू द्यावी, मनाला शांतच ठेवावे. उत्तरच देऊ नये.

कशाला आपली तडफड करून घ्यायची फुकटची! म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात, समतोल बुद्धिच्या माणसाला शत्रू.. मित्र, माती.. सोने सारखेच असते. ही समतोल बुद्धी येण्या साठीच मनावर ताबा मिळवता आला पाहिजे.

मग कशानेही फरक पडत नाही. आपल्याला तुकाराम होता येणार नाही मंडळी, निदान त्यांच्या पायाची धूळ होऊ या.

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

? मनमंजुषेतून ?

🍃 तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

का कळेना दाटते डोळ्यात पाणी..

मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही..

तेवढा ओल्या सरींनी घात केला…

नाहीतर तशी माझी तक्रार नाही…

— स्पृहाच्या ह्या ओळी वाचताना मनात आलं… खरंच तक्रार करण्यासारखं असतं का खरच काही??आपलं आपल्यालाही जाणवत राहतं… की ही तक्रार नक्की कशासाठी?

अगदी पेपर वेळेवर आला नाही, आजूबाजूचे नीट काम करत नाहीत, कुणी माझ्याकडे लक्षच देत नाही.. अगदी साध्या साध्या विषयात आपण तक्रारीचा सूर लावतो… कुणी ऐकलं आणि नाही ऐकलं तरीही….

अगदी घरापासून, सोसायटीपर्यंत… समाजापासून देशापर्यंत… कितीतरी बाबतीत प्रत्यक्ष कृती, प्रयत्न न करता… फक्त नाराजी व्यक्त करत राहतो… कुणीतरी हे पटकन सगळ बदलावं… ही अपेक्षा…

दूध नाही आलं.. लेमन टी चा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?

कचरा उचलला नाही तर एक दिवस आपणच वन टू करत टाकून यावा… कामात बदल हे कितीतरी तक्रारींवरचं औषध आहे… हो ना?

प्रत्येक गोष्ट कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी करावी… ती ही आपल्या मर्जी प्रमाणे… तक्रारीचा जन्म बहुतेक तिथेच होत असावा…

तक्रार.. लाडिकही असू शकते… त्याची वाट पाहून, त्याच्या भेटीसाठी तरसणारी ती… तक्रार करते… किती वाट पहायची?

त्याचीही तक्रार.. रुसवा तो कधीतरी डोकावतोच… किती केलं तरी तुझं आपलं तेच… म्हणून अबोल झालेला तो…

तक्रार… एका पिढीने दुसऱ्या पिढीबद्दल केलेली… जराही चील मारत नाहीत हे मोठे लोक…

आमच्यावेळी असं नव्हतं म्हणत… तरुण पिढीची तक्रार… करून करून गुळगुळीत झालेली….

तक्रार… सौम्य कधी कधी टोकाची… टोचणारी… वादात, भांडणात रुपांतर होणारी…

तक्रार का होते आहे, खरं मुळ शोधून त्यावर नेमका उपाय करणं केव्हाही श्रेयस्कर!!!

खरं सांगू… तक्रार असावी, थोडासा रुसवा.. क्वचित.. लोणच्याच्या खारासारखा.. नात्याला चव यावी इतकाच…

तक्रार करण्याची आणि ऐकण्याची दोन्ही सवयी… घातकच!!!!

सर्वांगानं फुलून यावं वाटत असेल… माणूस आणि नातंही… तर… मनापासून स्वीकार… आणि नो तक्रार…

गुलाब, चाफा, मोगरा 

जुई जाई शप्पथ…

तुझ्यासारखे कुणीच नाही…

आईशप्पथ…

लेखिका : सुश्री तेजस्विनी

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परतीच्या प्रवासाचा थरार…”  – लेखक – श्री संजय वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “परतीच्या प्रवासाचा थरार…”  – लेखक – श्री संजय वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

सुनीता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परतले पृथ्वीवर; कसा होता परतीच्या प्रवासाचा थरार?

भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत.

हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते.

‘ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी दोन अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.

खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती.

तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते.

सरतेशेवटी, आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.

कसा झाला परतीचा प्रवास?

खरं तर कोणतीही अंतराळ मोहिम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं.

सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या.

फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. 6 वर्षं फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन – रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहीम अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश झाला. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं.

पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3. 0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं.

दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला सोसावं लागणारं सर्वोच्च तापमान 1926. 667 सेल्शियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतकं होतं.

फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.

वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.

ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता.

WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसत होती.

ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा भाग वेगळा झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.

भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.

क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम’

अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता.

“क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम” अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.

ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असं केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही.

रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या आली.

स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं.

यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा ‘साईड हॅच’ उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.

हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.

ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं.

क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे. रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.

ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर परतेल. आणि अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जाईल आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना – मित्रमंडळींना भेटतील.

लेखक : श्री संजय वैशंपायन 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘म्हातारपण…’ – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘म्हातारपण… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

हा प्रसंग माझ्या सास-यांच्या बाबतीत मी पाहिलेला आहे. त्यांना जाऊन आता चार वर्ष होतील.

दहा वर्ष झाली, माझी मुलगी दीड दोन वर्षाची असेल. तिला आणि बायकोला आणायला मी निवळीला (रत्नागिरी) गेलो होतो. त्यांना घेऊन आम्ही तसेच पुढे गणपती पुळ्याला गेलो. परतीचा रस्ता तोच असल्यामुळे जाताना परत भेटायचं असं ठरल होतं. हॉर्न दिला की घाटात एका वळणावर ते येणार होते.

आम्ही परत आलो तर ते कोकणातल्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात, रस्त्याच्या कडेला एका दगडावर थोडी सावली धरून, हातात काठी घेऊन बसून होते. म्हटलं, “आधीच आलात का?” तर सासूबाई म्हणाल्या, दीड तास झाला येउन त्यांना.

आम्हांला यायला दोनेक तास लागणार हे माहित असूनही, चुकामूक होऊ नये म्हणून, चुकामूक झालीच तर नात परत वर्षभर दिसणार नाही या भीतीपोटी असेल, ते तिथे बसून होते.

आधीच ते कमी बोलायचे. मुलीचा पापा घेऊन त्यांनी आभाळ दाटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. “आत्ता बघतोय, पुढच्या वर्षी?” हेही त्यात होतंच. निघाल्यावर गाडीचा ठिपका होईपर्यंत ते तिथेच थांबले असणार हे मागे न बघताही जाणवत होतं. खोटं नाही सांगत पण आत्ताही ते दृश्य माझ्या डोळ्या समोर उभं आहे.

म्हातारपण वाईट.

कारण मायेचे पाश तुटत नाहीत. माणसं महिनोनमहिने दिसत नाहीत. ती त्यांच्या कारणांमुळे आणि हे वयोमानामुळे मनात आलं तरी उठून जाऊ शकत नाहीत. मग सुरु होतं ते वाट बघणं. शिक्षाच आहे ती. गणपती, होळी किंवा मे ची सुट्टी याच वेळी येणार हे माहित असतं. अचानक काहीतरी कारण निघावं आणि त्यांनी यावं अशी स्वप्न काही दिवस बघितली जातात. रोज तेच स्वप्नं कितीवेळा बघणार? मग फोनवरून चौकशा चालू होतात, “जमेल का यायला?”, एवढे तीन शब्द जिभेच्या टोकावर तयारच असणार, पण ते बाहेर पडत नाहीत.

असे न उच्चारलेले पण ऐकायला आलेले शब्द फार फार आतवर रुतून बसतात.

म्हातारपण खरच वाईट. झाडावरून आंबा पडला तर, मोगरा अमाप आला तर, काही चांगलंचुंगलं खायला केलं तर, टी. व्ही. वर एखादं छान मूल दिसलं तर, यांना नातींचे चेहरे दिसतात.

“आत्ता इथे असत्या तर?” 

आणि हे सततचं वाटणं सहन झालं नाही की मग अश्रू कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत.

म्हणूनच, रडणारी म्हातारी माणसं मला कधीच दयनीय वाटत नाहीत. ते साठवलेलं रडणं असतं. अनेक महिने थोपवलेलं असतं ते.

खूप जणांना रडू येणं हे कमीपणाच वाटतं, अश्रू थोपवण्यात कसब आहे असं कुणाला वाटत असेल तर वाटू दे. पण मोकळं होण्याचा तो साधा, सोपा, सरळ, बिनखर्चिक उपाय आहे असं मला वाटतं. वेदना झाल्या की रडू येतं आणि संवेदना जिवंत असतील तर दुस-याच्या वेदना दिसल्या, वाचल्या, अनुभवल्या तरी पण रडू येतं.

मराठीत सहानुभूती असा एक सुंदर शब्द आहे. सह+अनुभूती, दुसरा जे काही आनंद, दु:खं किंवा इतर कुठलीही भावना अनुभवतोय, ती त्याच्यासह अनुभवणे, असा खरं तर त्याचा अर्थ आहे. दुर्दैवाने आपण तो फक्त दु:ख या एकाच भावनेशी चुकीचा अर्थ लावून जोडून टाकलेला आहे.

म्हातारपण गरीब असो वा सधन, मायेचा तुटवडा फार वाईट.

लेखक : श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हिंदू वर्षातील पहिला सण.. गुढीपाडवा ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ हिंदू वर्षातील पहिला सण.. गुढीपाडवा ☆ सौ शालिनी जोशी

चैत्र प्रतिपदेपासून वसंत ऋतू सुरू होतो. त्यामुळे धार्मिक सण आणि वसंताच्या आगमनाचा आनंद म्हणजे गुढीपाडवा. वसंतही भगवंतांची विभूती, ते म्हणतात, ‘अहमृतूनां कुसुमाकरः।’ वसंतऋतूला कुसुमाकर किती सुंदर शब्द आहे नाही ? चैतन्याची अनुभूती देणाऱ्या वसंताचा हा पहिला दिवस. होळीला दुष्ट प्रवृत्तीचा नाश शिकवल्यावर सुष्ट प्रवृत्तीचे वर्धन आणि जयजयकार सांगणारा हा दिवस. रूढीच्या निमित्त्याने निसर्गाचे रक्षण आणि सत्प्रवृत्तीचे वर्धन यातून आपल्या पूर्वजांनी शिकवले.

गुढीच्या काठीवर पालथा घालतात तो धातुचा गडू हे विजयश्रीचे व सामर्थ्याचे प्रतिक. जसे राजाच्या डोक्यावर किरीट असते. या दिवशी कडुलिंबाचे विशेष महत्व. तो गुढीला बांधतात तसेच जेवणात त्याची चटणी खातात. त्याच्या अंगच्या औषधी गुणधर्मामुळे उष्णता कमी होते, पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचेचे आरोग्य सुधारते. याच्या सर्वच भागांचा औषधात उपयोग. म्हणून कडुलिंबाचे सेवन एका दिवसापुरते नसून वर्षभर व्हावे हे सुचवायचे आहे. आंब्याची डहाळी म्हणजे मांगल्य आणि चैतन्य, तर फुले म्हणते कोमलता हे गुण आपण अखंड जोपासावे. साखरेच्या गाठीची मधुरता वाणीत असावी. कोणत्याही कर्मा मागील संकल्प (विचार )म्हणजे सुपारी आणि मग सिद्धी रुपी श्रीफळाचा लाभ होतो. हळदी कुंकवासारखे सौभाग्य आणि रांगोळीचे मांगल्य प्राप्त होते. त्यासाठी मुख्य गरज पाठासारख्या स्थैर्याची आणि काठीच्या काटकपणाची. हे सर्व साधले तर विजयश्री नक्कीच प्राप्त होते. पण येथे नम्रता महत्त्वाची, जी गुडी तिरपी करून व्यक्त केली जाते. अशा प्रकारे यशासाठी आवश्यक सगळ्या गुणांचे हे प्रतीक. यशा बरोबर वैभवाची गरज सुचवितो जरीचा खण आणि गुडीची उंची म्हणजे श्रेष्ठ यशाची अपेक्षा. अशी ही गुढी वर्षारंभी पुजायची, गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे घेणाऱ्या वसंतोत्सवाचा आनंद निसर्ग रक्षणांनी घ्यायचा. हाच गुढीपाडवा.

 गुढीची पूजा केल्यावर प्रार्थना म्हटली जाते ‘ ओम् ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेsस्मिन् संवत्सरे नित्यमं मंगलमं कुरु।

नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे नव्या पंचांगाची पूजा या दिवशी करतात. पुढे येणाऱ्या रामनवमी चे नवरात्र याच दिवशी सुरू होते.

आता पाडव्याला मिरवणुका, संगीताचे कार्यक्रम असे सार्वजनिक कार्यक्रमही होतात. एकंदरीत वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी व तो आनंद वर्षभर टिकवा ही इच्छा.

💐 नूतन वर्षाभिनंदन 💐

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सेल्युलर जेल 

विहार ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर पाऊल ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाम ज्या भूमीवर गळला त्या भूमीवर आपण उभे आहोत ही भावना आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय असल्याचा अभिमान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. समोर होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा. त्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहिलं की समोर दिसतात 

देवनागरी लिपीतील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा ही अक्षरं. हे नाव वाचताना मान आणि खांदे दोन्ही अभिमानानं ताठ होतात. भारतभूमीचा हा हिस्सा कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं असावा ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण आता बदल होतोय. इथली सगळी बेटं कात टाकलीय जणू. भारतीय नावांनी ओळखली जाऊ लागली आहेत. एक फोटो इथं घेतला जातोच.

इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुपारी आम्ही समुद्रिका मरिन म्युझियम बघितलं. या ठिकाणी अंदमानच्या समुद्रात मिळणारे अनेक सागरी प्राणी ठेवले आहेत. काचेच्या पेटीतील, नैसर्गिक वातावरणात ठेवलेले हे सजीव छोटीशी समुद्र सफर करवून आणतात. निळ्या समुद्राखालच्या अनोख्या रंगीबेरंगी दुनियेत हरवून न जाल तरच नवल. शार्क माशाच्या हाडांचा मोठा सांगाडा आपलं स्वागत करतो. सावरकरांच्या भेटीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे मस्य दुनियेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवावेच लागते. पुढील भेट जास्त महत्त्वाची असते.

आज राष्ट्रीय स्मारक असलेले सेल्युलर जेल, खरंतर ब्रिटिशांनी बांधलेला तुरुंग आहे. या तुरुंगाची रचना सायकलच्या चाकासारखी आहे. (ओक्टोपस या प्राण्यासारखी) या रचनेला पॅनोप्टिकॉन म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान तत्त्वज्ञ बेंथमन यानं ही रचना सुचवली होती. इमारतीच्या मध्यभागी एक उंच टॉवर आहे ज्यावर चोवीस तास एक पहारेकरी असतो. या टॉवर वर एक घंटा आहे. ही घंटा वाजताच उठण्याची सक्ती होती. घंटा सुर्योदय होण्यापूर्वीही वाजे. दमलेल्या कैद्यांची झोप पूर्ण होण्यापूर्वीच. या टॉवरभोवती सायकलच्या स्पोक्सच्या आकारात सात इमारती. प्रत्येक विंगला तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या. जणूकाही सजीवांच्या शरीरातील पेशी. या खोल्यांची संख्या सातशे. पण रचना अशी की इतर खोल्यांमधील कैदी बिल्कुल दिसत नाहीत. आपण समाजप्रिय आहोत. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणारे इतर कैदी दृष्टीस न पडणं हे सुद्धा खूप त्रासदायक ठरत असेल. आपल्या शरीरातील पेशींमध्ये देवाणघेवाण होत असते. या जेल मधील सेल्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. कैद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी कठोर शिक्षा होत असे.

या जेल मधील प्रत्येक सेलची, लांबीरुंदी ४. ५मीटर×२. ७मीटर(१४. ८फूट×८. ९फूट) एवढीच आहे. तीन मीटरवर (९. ८फूटावर) फक्त एक खिडकी आहे. जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट. एका पसरट लोखंडसदृश्य धातूच्या भांड्यात कसलं तरी हिरवट पाणी मिळत असे. त्यात किडे अळ्या पडलेल्या असत. पिण्याचं पाणी शारीरिक स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकणार नाही इतकं घाण, गटारगंगेसारखं. वास सहन न होणारं. कैद्यांना कोलू ओढून तेल काढावं लागत असे. नारळ सोलावे लागत. साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ही कामं विश्रांती न घेता करणं फारच कठीण होतं. त्यांना जर कोणी कामचुकारपणा करतोय असं वाटलं किंवा दिवसभरात दिलेल्या प्रमाणात तेल गाळलं गेलं नाही अथवा नारळ सोलले गेले नाहीत तर कोडे मारले जात. हात वर केलेल्या अवस्थेत पाठीवर, पायावर हे कोडे पडत. तरीही काम न झाल्यास, बंडखोरी केल्यास दोन पायांत आडवी काठी ठेवली जाई. मार तर खावाच लागे पण पाय जवळ घेता येत नसत.

शिक्षा जीवघेणी तर होतीच. निकृष्ट अन्न, पाणी, यांनी आजारपण ठरलेलंच होतं. अन्नत्याग केला किंवा उपोषण केलं तर जरबीनं नाकातून नळीनं दूध घातलं जाई. या धडपडीत फुफ्फुसात दूध जाऊन काही स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टी लपवल्या जात. काहींना वेडं ठरवलं गेलं तर काही खरंच स्वतःचं भान विसरून मानसिक स्वास्थ्य हरपून बसले.

याच परिसरात फाशीघर आहे. एक म्युझियम आहे जिथं, कोलू, साखळदंड, आसूड इ. ठेवले आहे. हे बघताना मानसिक यातना न झाल्या तर नवलच. इथं भेट देणारी एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, मन भरून आलं नाही, देशाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अभिमानानं उर भरून आला नाही. या इतिहासाची साक्ष देत उभा असणारा पिंपळ सुद्धा आपल्या सगळ्यांचं दैवत बनतो. इथल्या हुतात्मा स्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. गुडघे टेकून इथली माती कपाळाला लावतो. जड पावलांनी, जड ह्रदयानं आणि त्याहून जड मनानं तिथून बाहेर पडतो…कदाचित एक मन तिथंच ठेवून…

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळी उठल्याबरोबर सौ ने ऑर्डर दिली “अहो ऐकलत का?…”

मी म्हणालो “हो तुझाच तर ऐकतोय बोल.” 

“ काही नाही खाली वाण्याच्या दुकानातून दोन नारळ घेऊन या आणि ते सोलून आणा.. तुम्हाला सोलता येत नाहीत.” 

मी.. “कशासाठी?” नको तो प्रश्न मी विचारलाच..

ती म्हणाली.. “ एक.. संध्याकाळी मारुतीला फोडा आणि एक सकाळी फोडून मी गणपती बाप्पाला नैवेद्याचे मोदक करणार आहे “ ती म्हणाली. “ सुनीता विल्यम्स परत आली. मी देवाला बोलले होते ती सुखरूप परत येऊ दे तुला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवेन.. !” 

“ तिच्यासाठी एवढा नवस बोलण्याचा काय काम?… “

“ अहो जरा काहीतरी वाटू द्या नवीन नवीन संशोधनासाठी ती बाई नऊ महिने अडकून पडली तिथे… बाई म्हणून परत आली.. हो ओढ असते ना आम्हा बायकांना घराची. तिच्याबरोबर तो बाप्या एकटा असता ना तर कधीच मरून गेला असता.. बाई होती म्हणून सगळ धीराने निभावलं.. !”

“ एवढं काही नाही हं.. ” मी म्हटलं !..

“ गप्प बसा.. बाथरूम मध्ये एकदा अडकून पडला होता तर केवढा गोंधळ केला. चार धक्के बाहेरून लागवले तेव्हा ती बाथरूमची कडी निघाली.. पंधरा मिनिटात पॅनिक झाला होता तुम्ही… नऊ महिने तिने बिचारीने एकटीनं घीराने काढले कारण तिला दिसत होत.. आपलं घर ! आठ दिवस माहेरी गेले आणि दोन दिवसात परत आले तर तुम्ही म्हणता का एवढ्या लवकर आलीस? अहो ओढ असते बाईला घरची.. माहेर वगैरे पहिले काही वर्ष.. तुम्हाला कळायची नाही आम्हा बायकांची ओढ…. ” 

“ पण मग त्याच्यासाठी गणपतीला कशाला नैवेद्य दाखवायचा अरे विज्ञानवादी तरी हो नाहीतर अध्यात्मवादी तरी हो.. ! “

“ मी कुठलाही वाद घालत नाही लक्षात ठेवा. विज्ञान हवंच ते आपल्याला प्रगतीपथावर नेणार आहे पण मनस्वास्थ.. त्याला अध्यात्मही हवं ! आम्हा बायकांची भाबडी श्रद्धा असते आणि तीच तुम्हाला कितीतरी वेळा तरुन नेते.. पहा सुनीताबाईसुद्धा आपल्याबरोबर भगवद्गीता, वेद, गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या म्हणून सुखरूप परत आल्या. मनोधैर्य वाढवणाऱ्या त्या गोष्टी होत्या त्यांना खात्री होती. आपल्याबरोबर देव आहे आणि आम्हा बायकांची श्रद्धा बरोबर काम करत असते बरं !. तुम्हाला ठाऊक आहे का त्या यानात एक तरी बाई का पाठवतात?.. ” 

“ का का? “ मी माझा अज्ञान प्रकट करत आजीजीने म्हणालो..

ती.. ” कारण बाईच्या जातीला ओढ असते घराची. अंतराळात गेलेली पहिली लायका कुत्री होती.. कुत्री.. मादी जातीची आणि बायका चिवट असतात बरं का.. कठीणातल्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन विजय मिळवण्याचं कसब परमेश्वराने बाईला दिले बाई.. अशी सहजासहजी मरत सुद्धा नाही… ती लढते निकरानं शेवटपर्यंत.. ”.. आणि अजून बरच काही ती बोलत होती…

… मी मनात म्हणालो ‘ कुठून हिला विचारलं.. मुकाट्याने नारळ आणले असते तर झालं असत ना.. खाल्ल्या की नाही शिव्या ‘.. शेवटी मी तिला शरण गेलो आणि म्हणालो “ बाई पिशवी दे आणि पैसे दे. नारळ आणतो.. अगदी सोलून आणतो पण तू मला बोलून घेऊ नकोस.. सखे तू आहेस म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालले बरं..”

अशी शरणागतीची चार वाक्य टाकून मी मोकळा झालो आणि आज जेवायला मोदक मिळणार या आनंदात सुनीता विल्यम्सचे आभार मानून दुकानाकडे चालू लागलो…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? इंद्रधनुष्य ?

☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ?…. तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.

छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.

महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या. स्वराज्यनिष्ठेला तोड नाही. अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.

अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.

१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ? मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.

लेखक : श्री अभय देवरे

सातारा

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” –  लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित  ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” –  लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आनंद न देणाऱ्या नात्यांची ओझी घेऊन जगण्यात काय अर्थ आहे ?

त्यापेक्षा तीच नाती जपावीत जी आपल्याला सुख देतात, वेळ देतात आणि आपली काळजी करतात !

जे आपल्या मनाचा विचार करतात आपणही त्यांच्या मनाचा विचार करावा !

आपलं सुखदुःख त्यालाच सांगावं ज्याला त्याची किंमत असते !

तुम्ही रडत आहात आणि समोरचा हसतोय किंवा तुम्ही हसताय आणि समोरचा रडतोय अशा व्यक्तीला काही सांगून, वेळ देऊन काय उपयोग ?

ज्याचा फोन यावा वाटतो त्याच्या जवळच मन मोकळं बोलावं,

ज्याचा मेसेज यावा वाटतो त्याच्याशीच जास्त connect रहावं !

जे आपला मेसेज वाचून साधा दोन शब्दांचा सुद्धा रिप्लाय देत नाहीत, त्यांना आपली खुशाली कळवायची तरी कशाला ?

जीव लावावा आणि लाऊन घ्यावा !

कुणीतरी माझं आहे आणि मी कुणाचा तरी आहे असं वाटणं म्हणजेच प्रेम, आदर आणि मैत्री !

 अहो छोट्या छोट्या गोष्टीतही खूप मोठा आनंद असतो तो देताही आला पाहिजे आणि घेताही आला पाहिजे !

तुझा डी. पी. छान आहे, तू आज सुंदर दिसतेस, मला तुझा ड्रेस आवडला, तुझ्या हाताला खरंच खूप मस्त चव आहे… अशा साध्या प्रतिक्रिया देण्याने सुद्धा समोरच्या व्यक्तीचं मन आनंदून जातं, सुखावतं, प्रसन्न होतं !

मनाची ही प्रसन्नताच तुमचा-आमचा बी. पी., शुगर नार्मल ठेवत असते !

खरं सांगा, असं एकमेकांशी का बोलू नये ? असं बोलायला काही पैसे लागतात का ? खूप कष्ट पडतात का ?

मुळीच नाही, तरीही माणसं या गोष्टी का करत नाहीत तेच कळत नाही ?

कुढत राहण्यापेक्षा फुलपाखरा सारखं उडत रहावं आणि जीवन गाणं मजेत गावं !

ज्या व्यक्तीशी बोलून तुम्ही सुखावता त्याच्याशी अधिक बोला ! 

ज्याला आपलं सगळं दुःख सांगता येतं त्यालाच हसत हसत जगता येतं !

मन मोकळं बोलल्यामुळे निसर्गतःच आपलं फेशियल होईल आणि तुम्ही खूप सुंदर, टवटवीत दिसायला लागाल !

गालावरची खळी आणि चेहऱ्यावरची लाली, हे मनाच्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब असतं, म्हणून जी माणसं जवळची वाटतात त्यांच्याशी भरभरून बोला !

प्रेम करताही आलं पाहिजे आणि प्रेम मिळवताही आलं पाहिजे !

आवडीच्या व्यक्ती सोबत तुम्ही जितकं जास्त Open होऊ शकता, शेअरिंग करू शकता, तितके तुम्ही जास्त आनंदी राहू शकता, सुखी राहू शकता !

या आनंदी मना मुळेच आपण सुंदर, प्रसन्न आणि हसतमुख दिसतो आणि सर्वांना हवेहवेसे वाटतो !

दुःख असलं तरी दुःखी राहू नये आणि पुन्हा पुन्हा तेच ते रडगाणं गाऊ नये !

आहे ते स्वीकारायचं आणि मजेत पुढे जायचं !

हिंडायचं, फिरायचं, चांगलं रहायचं, फोटो काढायचे, डी. पी. बदलायचा, समोरच्याला छान म्हणायचं आणि आपल्याला कुणी छान म्हणलं की त्याला हसून thank you म्हणायचं !

जगणं सोप्पं आहे

त्याला अवघड करू नका

आणि मन नावाच्या C. D. मध्ये

Sad music भरू नका !

थोडं तरी मना सारखं जगा

आयुष्यभर दुसऱ्याच्या मनासारखं जगलात म्हणून कुणीही तुमचा पुतळा उभारणार नाही !

  

लेखक : प्रा. विजय पोहनेरकर, छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद )

 94 20 92 93 89

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत जनाबाई… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत जनाबाई… भाग – २  ☆ सौ शालिनी जोशी

‘नामयाची दासी’ म्हणून बिरुद मिरवणारी जनाबाई मुक्ताबाईंचे समकालीन. जन्म अंदाजे इ. स. १२६० ते १२७०. गोदावरी तीरावरील गंगाखेडच्या दमा (वडील) आणि करुंड (आई )या भगवत् भक्त दांपत्याचे मुलगी. जातीने शूद्र पण आई-वडील पंढरीची वारी करणारे होते. लहानपणीच आई-वडील दुरावले. पाच वर्षाची अनाथ पोर जना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे राहिली. देवाची आवड आणि लाघवी स्वभाव यामुळे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाली.

नामदेवांच्या घरातील अंगण, तुळशी वृंदावन, शेणगोवऱ्या वेचण्याची जागा, कोठार, माजकर हेच त्यांचे विश्व बनले. तिथेच त्यांना परमेश्वर दिसला. त्यांचे मन एवढे विशाल झाले की दळणकांडण, धुणीभांडी सडासारवण ही त्यांची कष्टाची कामे देवाचीच झाली. काम करताना विठ्ठलाच्या नामात त्या इतक्या तल्लीन होत की देवच काम करतो हा भाव निर्माण होई. त्यामुळे त्या म्हणत,

झाडालोट करी जनी l केर भरी चक्रपाणी l

पाटी घेऊनिया शिरी l नेऊनिया टाकी दूरी l

ऐसा भक्तिसी भुलला l नीच कामे करू लागला l

जनी म्हणे विठोबाला l काय उतराई होऊ तुला l

दासीपणा आणि अलौकिकता यांचा समतोल त्यांनी साधला.

द्वैतातील काम करताना अद्वैताचा आनंद त्यांनी अनुभवला आणि अद्वैताचा आनंद द्वैतात भोगला. त्यामुळे वास्तव जीवनातले श्रम हे त्यांच्यासाठी क्रीडा झाले. म्हणून त्या म्हणतात,

दळू कांडू खेळू l सर्व पाप ताप जाळू l

सर्व जीवांमध्ये पाहू l आम्ही एक होऊनि राहू l

जनी म्हणे ब्रह्म होऊ l सर्वाघटी ब्रह्म पाहू l

कर्माला क्रीडेचे रूप मिळाले की त्यातील पाप, ताप, दाह सर्व लोपतात. सर्वत्र ब्रह्मच दिसते.

संत नामदेवामुळे ज्ञानेश्वर, विठोबा खेचर, सोपान, चोखोबा, गोरा कुंभार, अशा संत मंडळींचा सहवास जनाबाईंना लाभला. ज्ञानेश्वरांविषयी जनाबाईंना विशेष आदर होता. ‘परलोकीचे तारूl म्हणे माझा ज्ञानेश्वरु’ असे त्या म्हणत असत. नामदेवांसारख्या गुरूचा अखंड सहवास त्यांना लाभला. त्यामुळे गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची गरज भासली नाही. संत नामदेव उत्तर, दक्षिण भारतात तीर्थयात्रेसाठी गेल्यावर वारकरी संप्रदायाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. साधारण ३५० अभंग त्यांनी लिहिले. कविता, आरत्या, ओव्या, पाळणे, पौराणिक कथा यांचा समावेश त्यांच्या काव्यात आहे. चरित्रे, उपदेश, भारुडे अशा रचनाही केल्या. अध्यात्मातील योगसाधना आत्मसात करून ज्ञानोत्तर भक्तीचा स्विकार केला.

‘स्त्री जन म्हणूनि न व्हावे उदास’ असे सांगून स्त्रियांना नवीन वाट दाखवली. स्वतः अविवाहित राहिली. विठ्ठलाचे मानुषीकरण करून त्याला माय, बाप, सखा, सांगाती असे संबोधले. नि:संग, त्यागी वृत्ती, निर्भयता, सहनशिलता, वात्सल्य, समर्पण हे भाव त्यांचे ठिकाणी होते. तरीही समाजकंटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. एकदा विठोबारायाचा कंठा चोरल्याचा आळ बडव्यानी जनाबाईंवर घेतला. त्यांना सुळी देण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. सुळच विरघळला. जनी परीक्षेत उतरली.

नामदेवाच्या कुटुंबातील अन्य कुणालाही संत संबोधले गेले नाही. पण दासी असणाऱ्या जनाबाईला तो मान मिळाला. नामदेवांच्या घरी सर्वच विठ्ठल भक्त. त्यांच्याविषयी सांगताना जनाबाई म्हणतात,

नामदेवाचे घरी l चौदाजणे स्मरती हरी l

चौघे पुत्र चौघे सुना l नित्य स्मरती नारायणा l

आणिक मायबाप पाही l नामदेव राजाबाई l

आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी lपंधरावी ती दासी जनी l

विरोधी भक्तीने कधी विठ्ठलाला जनाबाईंनी शिव्याही घातल्या. उद्वेगाने त्यांनी म्हटले ‘अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या l’ तशाच त्यांनी विराण्याही रचल्या. अशा ह्या जनाबाई लोकांच्या स्तुतीनिंदेच्या पलीकडे जाऊन भक्तीचा प्रसार करणाऱ्या होत्या. दीर्घायुष्य भोगून नामदेवांच्या बरोबर विठ्ठलाच्या पायरीत अंतर्धान पावल्या. (शके १३५०).

तरीही ‘विठू माझा लेकुरवाळा’ अशी जनाबाईंची मायाळू व प्रेमळ साद आणि मातृका विठाबाईचे व तिच्या संत लेकरांचे जनाबाईने रेखाटलेले भावविश्व जनाबाईंना अमर करते.

विठु माझा लेकुरवाळा l संगे गोपाळांचा मेळा l

निवृत्ती हा खांद्यावरी l सोपानाचा हात धरी l

पुढे चाले ज्ञानेश्वर l मागे मुक्ताबाई सुंदर l

गोरा कुंभार मांडीवरी lचोखा जिवा बरोबरी l

बंका कडेवरी l नामा करांगुली धरी l

जनी म्हणे गोपाळा l करी भक्तांचा सोहळा l🙏

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares