मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे

भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…

हे आहे भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन, येथून उतरून पायी चालत गेल्यास प्रवासी तीन मोठ्या तीन देशात पोहोचतात !

तुम्हाला माहीत आहे का, भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक कोणते आहे? हे स्थानक एकाच वेळी तीन देशांना जोडते, आणि या स्टेशनवर उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर थेट परदेशात पोहोचाल ! चला, जाणून घेऊया हे अनोखे रेल्वे स्थानक कोणते आहे.

ते आहे, भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक – सिंहाबाद स्टेशन

भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक बांगलादेशच्या सीमेलगत स्थित आहे. जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले, तेव्हा हे स्थानक जसे होते, तसेच आजही आहे.

पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू होती, परंतु सध्या प्रवासी गाड्यांसाठी हे स्थानक बंद आहे. येथे केवळ मालगाड्यांची वाहतूक केली जाते आणि काही गाड्या थेट बांगलादेशपर्यंत जातात. हे स्थानक पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर परिसरात स्थित आहे.

ब्रिटिशकालीन वारसा :

सिंहाबाद रेल्वे स्थानक ब्रिटिश काळात बांधण्यात आले होते. आजही येथे कार्डबोर्ड तिकिटे पाहायला मिळतात, जी आता इतर कोणत्याही रेल्वे स्थानकावर वापरली जात नाहीत. येथे अजूनही हाताने नियंत्रित सिग्नल गिअर्स, ब्रिटिश काळातील टेलिफोन आणि उपकरणे वापरली जातात.

या रेल्वे स्थानकावर एक छोटे कार्यालय, दोन रेल्वे क्वार्टर आणि कर्मचारी कार्यालय आहे. विशेष म्हणजे, येथे “भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक” असा एक फलक लावण्यात आला आहे,

तीन देशांना जोडणारे अनोखे स्थानक:

सिंहाबाद रेल्वे स्थानकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर तुम्ही थेट तीन देशांत प्रवेश करू शकता.

ते देश म्हणजे – – 

  1. बांगलादेश
  2. नेपाळ
  3. पाकिस्तान

ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक रेल्वे लिंक असून, आजही ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालवाहतुकीसाठी वापरली जाते.

उर्वरित भारताशी संपर्क कमी:

पूर्वी कोलकाता-ढाका रेल्वे मार्गाचा एक भाग म्हणून सिंहाबाद स्टेशनला महत्त्व होते. मात्र, सध्या येथून कोणतीही प्रवासी रेल्वे धावत नाही. त्यामुळे हे स्थानक निर्जन आणि शांत बनले आहे.

हे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, या स्थानकाने अजूनही ब्रिटिशकालीन आठवणी जपून ठेवल्या आहेत.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वास्तुपुरुषास पत्र…” – लेखिका: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “वास्तुपुरुषास पत्र…” – लेखिका: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

वास्तुपुरुषास,

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

 

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले, “वास्तू प्रसन्न आहे हं तुमची. ” आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली.

तुझी शांत करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या की तुला विसरूनच जातो रे आम्ही. मग उरतं ते फक्त घर. तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !

अगदी अपराधी वाटलं. मग काय तुझ्याशी पत्रसंवाद करण्याचं ठरवलं, म्हणून आज हे परत एकदा नव्याने पत्र !

 

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या. जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस, ते घरकूल खरंच सोडवत नाही.

घरात बसून कंटाळा येतो, म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात, पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते.

आजारपणात डॉक्टर म्हणतात, आराम पडावा म्हणून ऍडमिट करा. पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही, हेच खरं.

 

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे.

अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते, दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं,

तर उंबरा म्हणतो ‘थांब. लिंबलोण उतरू दे. ‘

बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी ! स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं! तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.

खरंच वास्तुदेवते, या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.

 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक’.

दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर’.

भिंती म्हणतात, ‘ मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस’.

छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर’.

जमीन म्हणते, ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत’.

तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं, ‘स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि आत ऊन, वारा लागणार नाही’.

 

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या अन्न साखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद दे.

 

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.

एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही. पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर?’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !

 

कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटामातीचं.

 

पण एक मात्र छान झालं, की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.

 

खरंच हा आमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.

 

वास्तू देवते, पूर्वी आई आजी सांगायच्या, “शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरूष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.

 

मग आज इतकंच म्हणते की “तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ देत. “

आणि या माझ्या मागण्याला तू “तथास्तु” असंच म्हण, हा माझा आग्रह आहे.

तथास्तु!

 

लेखिका: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा☆ सौ शालिनी जोशी

संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्या समकालीन संत महदंबा. यांचा काळ इसवी सन १२४२ ते इ.स.१३१२. या चक्रधर स्वामींच्या शिष्या  होत्या. यादवांच्या शेवटच्या काळातील मराठी संत चक्रधर आद्य – क्रांतिकारक, समाजसुधारक होते. सर्व धर्मातील व पंथातील महत्त्वाच्या गोष्टी निवडून त्यांनी महानुभाव पंथाची उभारणी केली. समानतेला महत्त्व दिले. त्यामुळे शूद्र व स्त्रिया आकर्षित झाले.मासिक धर्म,सोयरसुतक, अस्पृश्यता याला त्यांनी विरोध केला.  लोकभाषेत पंथाचा प्रसार केला.

महदंबा या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसगाव येथील वायेनायके या दशग्रंथ ब्राह्मणाची मुलगी होत्या.वायेनायके हे प्रतिष्ठित व सुस्थितीतले होते. त्यांच्यामुळे महदंबा यांना परमार्थाची गोडी लागली. त्या प्रज्ञावंत विदूषी झाल्या. एका वादात परप्रांती विद्वानाना जिंकून त्यांनी  जैतपत्र मिळवले. तेव्हा राजाने त्याना पाच गावे इमान दिली होती. महदंबा बालविधवा असल्याने  माहेरीच राहत असत. प्रथम वडिलांच्या संमतीने त्यानी दारूस नावाच्या एका साधू पुरुषाचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे धर्माचे संस्कार अधिक बळकट झाले. संत चक्रधर हे दारूचे गुरु. त्यामुळे महदंबांची व चक्रधर स्वामी यांची ओळख झाली.

संत चक्रधरांचे विचार महदंबाना पटले. त्या अभ्यासू व बुद्धिमान होत्या. त्या काळात स्त्रियांची स्थिती पशुपेक्षा केविलवाणी, त्यात विधवेचे जीवन म्हणजे शापच. पण महानुभाव पंथातील स्त्रियांना मिळणारी माणूसपणाची वागणूक आणि पुरुषांच्या बरोबरीचे स्थान यांनी महादंबेचे मन जिंकले. त्यांनी चक्रधरांकडे घेऊन वडिलांच्या मनाविरुद्ध संन्यास घेतला. सर्व संत स्त्रियात संन्याशी या एकट्याच होत्या. हिंदू धर्मातील गोत्र,जात, कुल यांना तिलांजली देऊन हिंदू विरोधी मानला गेलेल्या पंथात त्या सामील झाल्या. वैराग्य आणि मनोनिग्रह यांच्या जोरावर वेगळी वाट यशस्वीपणे चोखाळली. पंथातील अनेक स्त्रियांना साधले नाही ते करून दाखवले. पंथाचे कडक आचारधर्म, मठाचे नियम, शिस्त, भिक्षा धर्म हे सगळं त्यानी स्वीकारलं. संन्यास वेश त्यांनी धारण केला. चक्रधर स्वामींच्या पट्ट्य शिष्या झाल्या.त्या आद्य कवियत्री ठरल्या.

लग्नप्रसंगी म्हणावयाची रसाळ अशी गाणी त्यांनी रचली. त्याला धवळे किंवा धवळगीत म्हणतात.

‘कासे पितांबर l कंठी कुंदमाळा l कांतु शोभे सावळा l रुक्मिणीचा l’

अशा या रचना. त्यानी रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. त्यांच्यासाठी गुरु आणि  देव कृष्ण एकरूप झालेले. दोघांचा उल्लेख त्यांच्या काव्यात येतो. अशा प्रकारे भक्तीने  ओथंबलेल्या पण  भाबडी अनुचर नव्हत्या . तर विचारी, जिज्ञासू आणि करारी होत्या .पंथाची धुरा वाहण्यास समर्थ होत्या.लीलाचरित्र हा महानुभावांचा श्रेष्ठ ग्रंथ. महदंबांच्या प्रश्नांना उत्तरे देता देताच या ग्रंथाचा बराचसा भाग तयार झाला. ७० व्या वर्षी गुरुस्मरणात त्यांनी देह सोडला.

चित्र साभार : संत महदंबा यांची संपूर्ण माहिती मराठी – sant sahitya – charitra mahiti abhang gatha granth rachana –

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती, अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ? 

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. मी कोमेजलो नाहीच, निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य! 

… मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गेले गायचेच राहूनी ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“गेले गायचेच राहूनी !  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तो माझ्याएवढाच तेवीस चोवीस वर्षांचा. आम्हां दोघांनाही रायफल मस्त चालवता यायची… निशाणा एकदम अचूक आमचा. पण त्याला गिटार वाजवता यायची आणि तो गायचाही अतिशय सुरेख. एल्टन जॉनचं Sacrifice तर तो असा काही गायचा की बस्स! माझ्या आणि त्याच्या भेटीचा शेवट याच गाण्याने व्हायचा नेहमी… किंबहुना हे गाणं ऐकण्यासाठीच मी त्याच्याकडे जात असे. माझ्यासारखाच तोही इथं सैन्याधिकारी बनायला आला होता. त्याचे वडील बँकेत नोकरीला तर आई माझ्या आईसरखीच साधी गृहिणी होती. तो मेघालयातल्या शिलॉंग इथे जन्मलेला… शिलॉंग म्हणजे पृथ्वीवरील एक स्वर्गच जणू! इथेच मी एका शाळेत शिकलो. तो माझ्यापेक्षा केवळ शेहचाळीस दिवसांनी मोठा होता. इथल्याच एका प्रसिद्ध शाळेत शिकणारा हा गोरागोमटा गडी अंगापिंडाने मजबूत पण वागण्या-बोलण्यात एकदम मृदू. इथल्या तरुणाईच्या रमण्याच्या सगळ्या जागा आणि बागा आम्हांला ठाऊक होत्या. त्यावेळी त्याची आणि माझी अजिबात ओळख नव्हती… माझ्यासारखाच तो शहरात फिरत असेल, शाळा बुडवून सिनेमाला जात असेल… त्यालाही मित्र-मैत्रिणी असतील… त्याचीही स्वप्नं असतील माझ्यासारखीच… भारतीय सैन्याचा रुबाबदार गणवेश परिधान करावा… शौर्य गाजवावे! आणि योगायोगाने आम्ही दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेत एकाच वर्षी दाखल झालो. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नईची १९९६ची हिवाळी तुकडी. पण तो काही माझ्या कंपनी किंवा प्लाटूनमध्ये नव्हता. आमची ओळख झाली ती परेड ग्राउंडवर. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय थकवणा-या वेळापत्रकानंतर त्याला त्याच्या बराकीत भेटायला जायचं म्हणजे एक कामच होतं… पण मी ते आनंदाने करायचो.. कारण त्याला भेटल्यावर आणि विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यावर थकवा पळून जाई. आमच्या भेटीचा समारोप त्याच गाण्याने व्हायचा…. त्याने आधी कितीही वेळा ते गाणं गायलेलं असलं तरी मी त्याला एकदा.. एकदा… पुन्हा एकच वेळा… ते गाणं गा! असा त्याला आग्रह करायचो… आणि तो सुद्धा त्यादिवाशीचं त्याचं अखेरचं गाणं गाताना भान हरपून गायचा… त्याचं गाणं ऐकायला इतर बरेच प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित असायाचे. एकदा त्याने त्याच्या प्रेयासीचं नावही मला सांगून टाकले… आणि जेंव्हा जेंव्हा तिचा उल्लेख मी करयचो तेंव्हा तेंव्हा त्याचे गुबगुबीत गाल आणखी लाल व्हायचे… ते दोघं लग्न करणार होते स्थिरस्थावर झाल्यावर! त्याने त्याच्या आणि तिने तिच्या घरी अजून काही सांगितले नव्हते तसे! त्याच्या पाकिटात तिचा एक फोटो मात्र असे! दिवस पुढे सरकत होते… आमचे प्रशिक्षण जोमाने सुरु होते… आणि मी त्याचे गाणे ऐकायला जाणेही तसे रोजचेच होऊन गेले होते! 

ज्याच्यासाठी अट्टाहास केला होता तो दिवस अखेर उगवला… अंतिम पग नावाची पायरी पार करताना मनाला जे काही जाणवतं ते इतरांना कधीही समजणार नाही…. अभिमान, जबाबदारीची जाणीव, केलेल्या श्रमाचं फळ मिळाल्याची भावना… सारं कसं एकवटून येतं यावेळी. आम्ही दोघांनीही त्यादिवशी अंतिम पग पार केले आणि आम्ही भारतीय सेनेचे अधिकारी झालो! 

या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी त्याच्या बराकीत गेलो होतो… पण तो त्याच्या आई-बाबांना घ्यायला बाहेर गेला होता… त्याचा थोरला भाऊ सुद्धा यायचा होता पासिंग आऊट परेड बघायला! त्यामुळे त्यादिवशीची आमची भेट झालीच नाही. दुस-या दिवशी परेड कार्यक्रम पार पडल्यानंतरच्या गडबडीत मला तो भेटला नाही. सायंकाळी आम्हां सर्वांनाच अकादमीचा निरोप घ्यायचा होता. त्याच्या आधी काही मिनिटे मी त्याच्या बराकीत पोहोचलो… तोवर तो तिथून निघून गेला होता… आमची भेट नाही झाली! तो त्याच्या टेबलवर जिथे त्याची गिटार ठेवत असे त्या जागेकडे पाहत मी तिथून माझ्या बराकीत परतलो आणि माझ्या गावी निघालो.

जंटलमन कडेट क्लिफर्ड किशिंग नॉनगृम त्याचं पूर्ण नाव होतं. त्याला पहिलीच नेमणूक मिळाली ती रणभूमीची राणी म्हणवल्या जाणा-या 12 JAK LI (१२, जम्मू and काश्मीर लाईट इन्फंट्री) मध्ये. इथे सतत काहीतरी घडत असते! त्याला शेवटचे भेटून अठरा महिने उलटून गेले होते. त्याच दरम्यान पाकिस्तानी आपल्या हद्दीत लपून छपून घुसले आणि त्यांना तिथून हुसकावून लावणे हे एक मोठेच काम होऊन बसले. त्यावेळी मी पठाणकोट येथे नेमणुकीस होतो. आपल्या सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या चौक्या एका मागून एक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मालिकाच सुरु केली होती… पण हे काम अतिशय जीवघेणे होते! ताज्या दमाचे अधिकारी आणि सैनिक या लढाईत अगदी पुढच्या फळीमध्ये होते…. रणभूमीला ताज्या रक्ताची तहान असते असं म्हणतात! युद्धात यश तर रोजच मिळत होते पण बलिदानाच्या काळीज पिळवटून टाकणा-या बातम्याही रोजच कानी पडत होत्या! अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्यासोबत हसणारा आपला सहकारी आज शवपेटीमध्ये पाहून दु:ख आणि शत्रूविषयी प्रचंड राग अशा संमिश्र भावना मनात दाटून यायच्या! 

त्यादिवशी मी माझ्या युनिटच्या रणगाडा दुरुस्तीच्या प्रशिक्षणात अगदी रात्री उशिरापर्यंत व्यग्र होतो. युनिटमध्ये माझ्यासाठी फोन आला… कुणी इन्फंट्री ऑफिसर माझ्याशी बोलू इच्छित होते. हात पाय ऑईल-धुळीने माखलेले अशा अवस्थेत मी धावत जाऊन तो कॉल घेतला… तर पलीकडून क्लीफी अर्थात क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब बोलत होते.. क्लीफी हे मी त्याला ठेवलेलं टोपणनाव. त्याचा आवाज अगदी नेहमीसारखा… उत्साही! कारगिल लढाईमध्ये निघालो आहे! त्याने अगदी अभिमानाने सांगितले… आवाजात कुठेही भीती, काळजी नव्हती. लढाईत शौर्य गाजवण्याची संधी मिळत असलेली पाहून एका सैनिकाच्या रक्ताने उसळ्या घ्यायला सुरुवात केली होती…. भेटू युद्ध जिंकून आल्यावर… भेटीत तुझ्या आवडीचं गाणं नक्की गाईन… तेच नेहमीचं Sacrifice.. त्यागाचं गाणं! विश्वासाचं गाणं! अकादमीमधून निघताना तुझी भेट होऊ शकली नाही.. मित्रा! माफ कर!… तो म्हणत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर तो साक्षात उभा राहिलेला होता! गिटार ऐवजी आता त्याच्या हातात मला रायफल दिसत होती! 

पर्वतांच्या माथ्यांवरून शत्रू आरामात निशाणा साधत होता. बर्फाने आच्छादलेल्या पहाडांवर चढून वर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवेत घेणे. ७० अंशाची चढण चढून जाणे आणि तेही युद्ध साहित्य पाठीवर घेऊन, वरून अचूक गोळीबार सुरु असताना…. कल्पनाच धडकी भरवणारी. एक गोळी म्हणजे एक यमदूत…. अंधारात, बर्फावरून पाय निसटला म्हणजे खाली हजारो फूट दरीत कायमची विश्रांती मिळणार याची शाश्वती. शत्रू पाहतो आहे… भारताचे सिंह पहाड चढण्याच्या प्रयत्नात आहेत… त्यांना ही कामगिरी शक्यच होणार नाही हे ते ओळखून आहेत. समोरून, वरून प्रचंड गोळीबार होत असताना या मरणाच्या पावसात कोण चालेल? त्यांनी विचार केला असावा. त्यांचा गोळीबार तर थांबणार नव्हताच… त्यांची तयारी प्रचंड होती! पहाड जिंकायचा म्हणजे शत्रूच्या नरडीला हात घालावाच लागणार होता…. आणि हे करताना त्या मरणवर्षावात चिंब भिजावेच लागणार होते… तुकडीतील किमान एकाला तरी. अशावेळी हा नक्की सर्वांच्या पुढे असणार हे तर ठरलेले होते. त्याला त्याच्या जीवाची पर्वा तरी कुठे होती… सोपवलेली कामगिरी पडेल ती किंमत मोजून फत्ते करायचीच हा त्याचा निर्धार होता… धोका पत्करणे भागच होते! 

सत्तर अंश उभी चढण तो लीलया चढला…. दहा तास लागले होते त्याला पहाडाच्या टोकापर्यंत पोहोचायला…. गोळीबाराच्या गदारोळात शत्रूवर चालून गेला… शत्रूला हे असे काही कुणी करेल याची कल्पनाच नव्हती… ते वरून आरामात त्यांच्या शस्त्रांचे ट्रिगर दाबत बसले होते.. त्यांच्या टप्प्यात येणा-या भारतीय सैनिकांवर गोळीबार करीत होते. खालून आपल्या बोफोर्स तोफा आग ओकत होत्याच… पण शत्रूने जागाच अशा निवडल्या होत्या की तिथे फक्त माणूस पोहोचू शकेल! आणि तिथे कुणी माणूस पोहोचू शकेल असे शत्रूने स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते! तो एखाद्या वादळवा-यासारखा शत्रूच्या बंकरसमोर पोहोचला… बंकरमध्ये हातगोळे फेकले आणि त्याच्या हातातल्या रायफलने दुश्मनाच्या मरणाचे गीत वाजवायला आरंभ केला… जणू तो काही गिटारच्या ताराच छेडतो आहे… अचूक सूर! सहा शत्रू सैनिक त्याने त्यांच्या अंतिम यात्रेला धाडून दिले! एक धिप्पाड शत्रू सैनिक त्याच्यावर झेपावला… हातातल्या रायफली एवढ्या जवळून एकमेकांवर झाडता येत नाहीत…. अशावेळी क्लिफर्डने शाळेत असाताना गिरवलेले बॉक्सिंगचे धडे कामी आले… पाहता पाहता ते धिप्पाड धूड कायमचे खाली कोसळले… क्लिफर्ड साहेबांनी त्याने जणू त्या पहाडाला मोठे भगदाडच पाडले होते…. आपल्या नेत्याचा हा भीमपराक्रम पाहून त्याच्या मागोमाग मग त्याचे सैनिक पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रचंड वेगाने उर्वरीत कामगिरी पार पाडली…. Point 4812 आता भारताच्या ताब्यात आले होते! 

पण पावसात बाहेर पाऊल टाकले म्हणजे भिजणे आलेच… हा गडी तर खुल्या आभाळातून होणा-या वर्षावात पुढे सरसावला होता… रक्ताने भिजणे साहजिकच होते… शरीराची शत्रूने डागलेल्या गोळ्यांनी चाळण झालेली…. केवळ २४ वर्षांचा तो सुकुमार देह… आता फक्त एकाच रंगाची कहाणी सांगत होता…. I gave my today for your tomorrow! महावीर लेफ्टनंट क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब धारातीर्थी पडले! हेच तर स्वप्न असतं प्रत्येक भारतीय सैनिकाचं.. ताठ मानेने मरणाला सामोरे जायचं… राष्ट्रध्वजात गुंडाळले जाऊन घरी परतायचं… इथं या मरणाला जीवनाच्या सार्थकतेची किनार असते! 

तो लवकरच सुट्टीवर घरी येणार होता म्हणून थोरल्या भावाने आपल्या विवाहाची तारीख पुढे ढकलली होती… बाकी सर्व तयारी झालेलीच होती.. फक्त त्याची सर्वजण वाट पहात होते…. तो आला पण फुलांनी शाकारलेल्या, तिरंगा लपेटलेल्या शवपेटीत! पीटर अंकल आणि सेली आंटीच्या दु:खाला कोणतेही परिमाण लावता येणार नाही. ते त्याच्या शवपेटीवर डोकं टेकवून त्याच्या आत्म्याच्या कल्याणाची प्रार्थना पुटपुटत आहेत! त्याच्या सन्मानार्थ हवेत झाडल्या गेलेल्या गोळीबाराच्या फैरी मेघालयाच्या आभाळातल्या मेघांना भेदून वर जात आहेत… ढगांच्या मनातही मोठी खळबळ माजली आहे… ते कोणत्याही क्षणी बरसू लागतील असं वाटतं आहे७… ७ मार्च, १९७५ रोजी जन्मलेले Captain Keishing Clifford Nongrum आता पन्नास वर्षांचे असते… तुमच्या आमच्या सारखे संसारात आनंदात असते… पण देश सुखात रहावा म्हणून त्यांनी आपले तारुण्य अर्पण केले! 

माझ्या टेबलवर मी एका सैनिकाचा पुतळा ठेवलेला असतो कायम… या पुतळ्याच्या हातात गिटार मात्र नाही… रायफल आहे! माझ्या जिवलग मित्राच्या तोंडून Sacrifice अर्थात त्यागाचं गाणं एकदा शेवटचं ऐकण्याचं राहून गेलं… देवाच्या घरी भेट होईल तेंव्हा मात्र मी त्याला आग्रहाने तेच गाणं गाण्याचा आग्रह मात्र निश्चित धरणार आहे! 

– – लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत 

(Captain Keishing Clifford Nongrum साहेबांचे मित्र लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत साहेब यांनी एका फेसबुक लेखात इंग्रजी भाषेत वरील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे मी जमेल तसे मराठी भाषांतर आपल्यासाठी मला भावले त्या शैलीत केले आहे. यात काही कमीजास्त असू शकते. अहलावत साहेबांची परवानगी घेता नाही आली, क्षमस्व! सुधारणा असतील तर त्या निश्चित करेन!)

लहानपणी खेळ खेळताना हे छोटे Keishing Clifford साहेब स्वत: बनवलेली लाकडी रायफल हाती धरत. घरच्यांना अजिबात कळू न देता त्यांनी सैन्याधिकारी होण्यासाठीची परीक्षा दिली होती! अत्यंत कठीण प्रशिक्षण लीलया पूर्ण केले होते. सियाचीन ग्लेशियरवर नेमणुकीस असताना तिथे झालेल्या हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या बारा सैनिकांचे प्राण उणे ६० अंश तापमानात त्यांनी अथक प्रयत्न करून वाचवले होते. सुट्टीवर आल्यावर आपल्या शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात फिरून व्याखाने देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सैन्यात अधिकारी कसे व्हावे या विषयावर त्यांनी स्वहस्ताक्षरात सविस्तर माहिती लिहून ठेवली होती. ते देणार असलेले शेवटचे व्याख्यान त्या शाळेच्या परीक्षा सुरु असल्याने होऊ शकले नव्हते… त्यांचे मित्र संदीप अहलावत साहेबांनी नंतर त्याच शाळेत जाऊन दिले कारण हे व्याख्यान द्यायला Captain Keishing Clifford Nongrum हयात नव्हते! Captain Keishing Clifford Nongrum यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या भावाने गरीब मुलांसाठी एक फुटबॉल क्लब स्थापन केलाय. यासाठी लागणारा निधी हे विद्यार्थी स्वत: एक बेकरी चालवून त्यातून मिळणा-या पैशांतून भागवतात. साहेबांचे आई वडील कारगिलच्या त्या पहाडांवर स्वत: जाऊन आपला लाडका लेक जिथे धारातीर्थी पडला होता ती जागा बघून आले! साहेबांच्या स्मृती शिलांग मध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आपले लोक ही बलिदाने विसरून जातात याचा अनुभव साहेबांच्या कुटुंबीयांनी सुद्धा घेतला आहे… पण जेंव्हा एखादी महिला साहेबांच्या बाबतीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे दाखवायला येते, एखादा माणूस त्यांच्या दरवाजावर माथा टेकवून त्याने धरलेला उपवास सोडायला येतो… तेंव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार, ‘महावीर चक्र’ प्राप्त करणारा मेघालयातील हा पहिलाच तरुण आहे, ही बाबही त्यांना अभिमानाचे क्षण देऊन जाते! आज इतक्या वर्षांनतर साहेबांचे कोर्स मेट अर्थात OTA मधील सहाध्यायी त्यांच्या घराला भेट देतात, साहेबांना मानवंदना देतात, तेंव्हा आपण एकटे नाही आहोत… देश आपल्या मागे उभा अही, ही त्यांची भावना दुणावते. पूर्वोत्तर राज्यातही देशभक्तीची बीजे खोलवर रुजली आहेत, याचेच हे प्रत्यंतर असते. जय हिंद! 

– – – तुम भूल न जाओ इनको… इसलिये कही ये कहानी! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ – तुझ्याविना… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“तुझ्याविना…” ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

तुझ्याविना…..

जीवन पुढे खूप आहे… पण तूझ्या विना जगण्याचा यक्ष प्रश्न आहे.. रडून रडून किती दिवस रडणार… आता अश्रू ही सुकले आहेत कारण तो /ती गेली आहे पण उरल्या संसाराच्या जवाबदाऱ्या तिला /त्याला पार पाडायाच्या आहेत…

आयुष्य किती शिल्लक आहे यांची माहित नाही.. जुन्या आठवणीत रमलो /रमले तर वर्तमान कठीण आहे.. वर्तमाना अस्तित्व नष्ट करेल… अस्तित्वाची लढाई एकट्याने लढायची आहे

आयुष्यात पुढे काय ताट वाढल आहे.. काय आव्हान आहेत.. ते सर्व अनामिक आणि खडतर असणार पण जीवन गाडं दुःखच्या चिखलात रुतले तरी ते आपल्याच प्रयत्नांनी बाहेर काढायचा आहे…. काळ लोटायचा आहे…

जो वर तो / ती सोबत होती… त्याच्या संगतीचा उजेड होता तेव्हा त्या उजेडाची किमंत कळली नाही पण अचानक तो उजेड गेला आणि पायाशी अंधार दाटलाय… चाचपडत चाचपडत पुढे जात ध्येय गाठणे हेच प्रारब्ध आहे…

जोवर सोबत.. सहवास होता तो वर ती सुखसुमने होती पण त्या सुख

सुमनांची आता निर्माल्य झाली आहेत.. त्या सुख सुमनांचा गंध आता हरवला आहे…. एखादी वाऱ्या

ची झुळूक आली तरी त्या तरल.. हलक्या फुलक्या आठवणी आत आठवून कसं चालेल… आये है दुनिया में तो जीना ही पडेगा…

जोवर श्वास चालू आहे तो पर्यंत जगण्याची धडपड, इच्छा शक्ती ठेवायची आहे.. आव्हानावर मात करायची आहेत… कर्तव्य ती पार पाडायची आहेत… पण जेव्हा धडधड थांबेल तेव्हा त्या सावलीला मला अर्ध्या वाटेवर का सोडून गेलीस /गेलास हा प्रश्न विचारायला गाठायाचं आहेत… भेटायच हा शब्द मुद्दामहून टाळला आहे.. कारण त्याच्या/तिच्या नंतर जगाचा सामाना त्याला /तिला करायचा आहे…

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सिक्रेट ऑफ हॅपिनेस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 विविधा 🔆

☆ “सिक्रेट ऑफ हॅपिनेस” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

असं म्हणतात, “There is only one Happiness in this life, to love and be loved. Love is the master key that opens the gates of happiness.”

आणि या करता जरुरी आहे – स्वतः वर प्रेम करण्यापासून सुरुवात करण्याची. स्वतः वर प्रेम करणारी व्यक्तीच सभोवतालावर प्रेम करू शकते आणि आनंद निर्माण करू शकते. Love yourself first, and everything else falls into line.

* * * *

आजच्या जगात सगळं काही मिळतं, पण आनंद मिळत नाही, असं म्हणतात. कारण आनंद हा कुठल्याही भौतिक वस्तुपासून मिळवता येत नसतो, तर तो माणसांपासूनच मिळवावा लागतो.

आपल्या आसपास माणसं खूप असतात, पण म्हणावं असं किंवा जवळचं असं, आपलं कुणीच नसतं. आणि हीच जवळ जवळ सगळ्यांचीच खंत असते. जवळची माणसं का नाहीत ? तर खरं प्रेम किंवा मनापासून प्रेम हे कुणी कुणावर करतच नाही किंवा असे प्रेम करणारे फारच थोडे थोडके असतात.

नवरा बायको राहतात एका घरात, पण relations dry असतात. आई वडील – मुलं /सुना – नातवंडं राहतात एका घरात, पण relations dry असतात. शेजारी – पाजारी राहतात आसपास, पण relations dry असतात.

ह्या सगळ्यांना जवळ करण्याकरता जरुरी असते, मनापासूनचे प्रेम किंवा सच्चे दिलसे प्यार किंवा इनर लव्ह यांची.

देव आपल्या सगळ्यांना इथे पाठवतांना आपल्या मनावर प्रेमाचे कपडे घालूनच पाठवत असतो. आणि तेच प्रेमाचे कपडे आपण सगळ्यांनीच आयुष्यभर आपल्या मनावर ठेवावे आणि मिळालेलं आयुष्य आनंदात घालवावं, अशी त्याची मनापासून इच्छा असते आणि त्याचे तसे आशीर्वाद पण आपल्यामागे असतात. लहान असतांना आपल्या मनावर तेच कपडे असतात, त्यामुळे सगळ्यांचेच बालपण आनंदानी भरलेलं असतं.

आपण सगळेच थोडे मोठे झालो, कि आपल्यामधला “मी” जागा होतो. हे माझे / ते माझे आणि थोडक्यात म्हणजे सगळेच आपल्यामधल्या त्या “मी” ला पाहिजे असते. आणि मग ते मिळवण्याकरता निरनिराळे मार्ग शोधणे सुरु होते, धावपळ सुरु होते. मोह – माया – मत्सर – राग – लोभ – द्वेष हे आपले मित्र बनतात. आणि इथेच आपल्या आयुष्याचे सगळे गणितच बदलते. देवानी दिलेल्या प्रेमाच्या कपड्यांवर आपण “मी” चे कपडे चढवतो. आणि देवानी दिलेले प्रेमाचे कपडे दफन होतात. बऱ्याच वेळा खोटं किंवा नाटकी प्रेम यांना पण आपण जवळ करतो. प्रेमामधे खरं प्रेम आणि खोटं प्रेम किंवा नाटकी प्रेम असे दोन प्रकार असतात.

खरं प्रेम बघायला मिळतं, प्रेमी / प्रेमिका यांच्यामधे.

खरं प्रेम बघायला मिळतं, शाळा / कॉलेज चे मित्र – मैत्रिणी यांच्यामधे.

खरं प्रेम बघायला मिळतं, मुलं लहान असेपर्यंत आई / वडील आणि मुलं यांच्यामधे.

खरं प्रेम बघायला मिळतं, बहीण – भावंडांमध्ये ते शाळा – कॉलेज मध्ये शिकत आहेत तोपर्यंत किंवा त्यांची लग्ने होईपर्यंत.

लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल त्याला लागते. आपल्या बायकोनी काय करावं / कसं वागावं, वगैरे अशी अपेक्षांची यादी नवरेमंडळीची तयार असते. शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींना हे पसंत पडत नाही आणि पडू पण नये. आपल्या नवऱ्यानी कसे वागावे / काय करावे अशा याद्या बायकोच्या पण तयार असतात. अशा अपेक्षांची आमने- सामने बहुतेक घरांमध्ये होते. आणि मग दोघांमधे नाराजी / बेबनाव / चिडचिड अशी यादी सुरु होते आणि अशा फॅमिली लाईफला आपण संसाराचा गाडा ओढणे असे म्हणतो. आपल्या आधीच्या पिढीमध्ये मुली शिकलेल्या नसायच्या आणि पती परमेश्वर हि संकल्पना त्यांच्या मनात वडीलधाऱ्यांनी रुजवलेली असायची, त्यामुळे आपले मन मारून नवऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे बायका वागायच्या आणि संसाराचा गाडा तसा पुढे जात राहायचा.

“जो तुमको हो पसंद, वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे “, असा विचार करणारे पण नवरा-बायको असतात. “प्यार मे अपना कब्जा दिया जाता है, ना कि दुसरेका कब्जा लिया जाता है”, अशी विचारसरणी असणारे पण नवरा-बायको असतात आणि आहेत. त्यांच्यामधल्या प्रेमाला conditions apply असे लेबल नसते, हे सरळच आहे.

लग्न झाल्यानंतरची मुलं आणि त्यांचे आई वडील / लग्न झालेले भाऊभाऊ / लग्न झालेले भाऊबहीण / लग्न झालेल्या बहिणी यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल इथे पण लागलेले असते. आईवडिलांची जबाबदारी पडणे, त्यांची उपयुक्तता संपणे, आई वडिलांच्या संपत्तीचे वाटप, अशा घटना या नात्यांमध्ये वरवर दिसणाऱ्या प्रेमाचा कमकुवतपणा उजेडात आणतात आणि प्रेमामधल्या conditions apply चा अर्थ पण उघड होतो.

राधा कृष्ण, कृष्ण द्रौपदी, श्रावणबाळ, राम लक्ष्मण भरत, अशी उदाहरणे आज पण बघायला मिळतातच, पण खूप थोडी थोडकी. खरं प्रेम म्हणजे Unconditional Love. खरं प्रेम म्हणजे No Expectations. खरं प्रेम म्हणजे It Is Only Giving and Giving.

​ढाई अक्षर ‘प्रेम’ के, सारा जग जितवाये I

ढाई अक्षर ‘प्यार’ के, सबको पास खिचवाये I

ढाई अक्षर ‘लव्ह’ के, सब को गले मिलवाये I

आणि ही “ ढाई अक्षरं ” ज्यांना आचरणात उतरवता येतात,

त्यांच्याकरता see the after effect – – –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम….

जुन्या काळातल्या पुण्यात भरारी घेताना मन आधुनिक पुण्यातही झेपावतं. नुकतीच कोथरूड येथे, मयूर कॉलनीत, जोग शाळे समोर असलेल्या ‘श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, ‘ येथिल ‘जैन स्थानक भवन ‘ येथे ‘भुकेलेल्यांना पोटभर जेवण ‘ ह्या एकाच तत्वावर चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. येथे गरीब श्रीमंत एकाच पंक्तीला बसून भोजनाचा आस्वाद घेतात. ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी, फक्त 100 रुपयांत भाज्या वरणभात, पोळ्या नमकीन, रविवारी मिष्ठान्न अशा गरमागरम ताज्या सात्विक भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतात. समस्त लहान थोर मंडळींची ‘पोटोबा’ शांती करणारे हे पुण्यपुरुष नव्हे संतच म्हणावं लागेल त्यांना, भोजन तयार करणाऱ्यांचाही यात सिंहाचा वाटा आहे, त्यांनाही ” अन्नदाता सुखी भव ” हा आशीर्वाद द्यावा लागेल कारण अनेकांच्या मुखात त्यांच्यामुळे घरगुती जेवण जाते. विद्यार्थ्यांच्या आया त्यांच्यामुळेच निर्धास्त असतात. असे हे महात्मा, समाजसेवक आहेत तरी कोण ? असा प्रश्न मला पडला. आणि त्यांची नांवे कळली. आनंद देणारे, घेणारे आणि वाटणारे हे समाजसेवक आहेत, श्री. ईश्वर भटेवरा आणि श्री. प्रितेश कर्नावट. त्यांच्या नांवातच ‘ईश्वर’ आहे आणि प्रितेश म्हणजे प्रित यांच्या नावातही ‘प्रेम’ आहे. या सदगृहस्थांशी संवाद साधताना जाणीव झाली, ‘ मानव सेवा हीच देशसेवा. ‘आणि ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान ‘ही त्यांची ब्रीदवाक्ये आहेत. भोजनोत्तर तृप्त झालेल्या रुग्णांचे, वयोवृद्धांचे त्यांना भरभरून आशिर्वाद मिळतात. संस्थेतर्फे महिन्यातून सहा वेळा वारजे व किनारा हॉटेल नजिकच्या मजुरांना मोफत नाश्ता देऊन ते संतुष्ट करतात. धार्मिक कार्यात तर त्यांचं पुढचं पाऊल असतंच पण भूतदयेतही ही संस्था अग्रेसर आहे. ‘जीवदया ‘ गोशाळेला नियमितपणे चारापाणी देऊन मुक्या जनावरांचा, गोमातेचाही ते आशिर्वाद घेतात. इतर मदत करून आणि देणगी देऊन काही सज्जन त्यांना हातभार लावतात आपणही या सात्विक थाळीचा उपभोग घेण्यासाठी भोजनालयाला भेट देऊया. उत्तम आणि स्तुत्य अशा ह्या उपक्रमेला खूप खूप धन्यवाद.  

त्यांचा पत्ता– श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, जैन स्थानक भवन, योग शाळेसमोर, मयूर कॉ. पुणे संपर्क– ईश्वर भटेवरा — 83 78 88 34 45 आभार..

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘Minimalism ते Downsizing —-…’ – लेखिका : सुश्री संध्या घोलप ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘Minimalism ते Downsizing —-’ – लेखिका : सुश्री संध्या घोलप ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

साधारण २००० च्या दशकात अमेरिका वारीदरम्यान minimalism आणि downsizing या दोन नवीन संकल्पना कानावर पडल्या. कॉलेजसाठी घरातून बाहेर पडल्यावर, लहान घरात राहणारी मुलं, त्यांचं कुटुंब वाढत जाईल त्याप्रमाणे, लहान घरातून मोठ्या मोठ्या घरात जात असतात. (जे सर्वसाधारणपणे बरेच अमेरिकावासी करतात) तर माझी एक मैत्रीण, मुलं मोठी होऊन घराबाहेर पडल्यामुळे मोठ्या घरातून छोट्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाली होती. तिच्या मोठ्या घरातलं सामान छोट्या घरात हलवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिला एकटीला लागेल तेवढं आवश्यक सामान ठेऊन बाकी सगळं तिने काढून टाकलं होतं आणि सुटसुटीत संसार मांडला होता. तेव्हा मला या दोन संकल्पना समजल्या. अर्थात downsizing ची सुरुवात उद्योग धंद्यांपासून झाली. कामगार कपात, जागा कपात, उत्पादन कपात होता होता, घर आधी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि मग मोठ्यापासून छोट्यापर्यंत असा प्रवास सुरू झाला.

दोन्ही गोष्टींबद्दल वाचन केलं, व्हिडिओज पाहिले आणि मग याचं महत्व मलाही जाणवायला लागलं. ही संकल्पना अजून आपल्याकडे का आली नाही? निदान उच्च मध्य वर्गीय घरातूनही हे दिसत नाही. मी काही मुकेश अंबानीला नाही म्हणू शकत की इन मीन दहा माणसांना Antilia ची गरज काय?? पण उतारवयात आपली इमारत redevelopment ला जाणार असेल तरी आपण म्हणतो, आम्हाला एक बेडरूम जास्तीची पाहिजे! 

आपल्याकडे संसार वाढतील, ऐपत वाढेल तशी घरं वाढतात, गाड्या वाढतात, मग second home, third home केलं जातं. पण अजूनतरी downsizing केलेलं दिसत नाही. मोठ्या, वाढलेल्या संसारातून माणसे कमी होत होत, कधी एकटे दुकटे ही, मोठमोठ्या घरातून राहताना दिसतात. वयोमानाप्रमाणे घर आवरणं, सामान आवरणं कठीण होऊन बसतं. वाढत्या संसारात घेतलेली भांडी नंतर वापरलीच जात नाहीत. पण “टाकवत नसल्यामुळे” तीन चार कुकर, चार पाच कढया, मोठमोठी पातेली निवांत धूळ पांघरून पडलेली असतात.

Minimalism बद्दल मी आधीही लिहिलं आहे आणि जमेल तिथे, जमेल तेव्हा आग्रहपूर्वक सगळ्यांना सांगत असते की अंगात जोर आहे तोपर्यंत सामान कमी करा.

आम्ही मैत्रिणी ( सगळ्या ‘साठी’ ओलांडलेल्या) एकदा जेवायला बाहेर गेलो होतो. तिथून बाहेर पडल्यावर एक मैत्रीण डायरेक्ट भांड्यांच्या दुकानात शिरली आणि तिने तीन छोटी छोटी पातेली घेतली. मग सुरू झाला एक संवाद – 

मी – आता ही कशाला नवीन?

मैत्रीण – आता छोटी छोटी भांडी लागतात गं !

मग आधीची मोठी काय केली?

“पडली आहेत तशीच”

ती काढून टाक ना! पसारा का वाढवतेस? 

“जागा आहे, पैसे आहेत. काय फरक पडतो?” 

म्हणून मुलासुनेचं काम का वाढवतेस? तुझ्या पश्चात त्याला एवढ्या लांब येऊन तुझी भांडी कुंडी आवरायला वेळ तरी मिळणार आहे का?

“त्याच्याशी मला काय करायचंय? मला आत्ता हौस आहे ना, मी भागवून घेते. तो बघेल काय करायचं ते!” 

अशी कित्येक घरं सध्या वर्षानुवर्ष बंद आहेत, अगदी खुंटीवर टांगलेल्या कपड्यांसकट. (आमच्या समोर बंगल्यात राहणाऱ्या एक आजी करोना काळात गेल्या. त्यांच्या दाराबाहेर लावलेल्या दिव्याच्या माळा, मुलगा कोविड संपल्यावर आला तोपर्यंत दिवसरात्र चालू होत्या) 

एक मोठ्या फ्लॅट मध्ये राहणारे advocate. नव्वदीच्या घरातले. एकटेच आहेत. घरभर Law ची पुस्तकं आणि त्यावर धूळ. माळ्यावर पुस्तकं, कपाटात पुस्तकं, टेबल – साईड टेबल दिसेल तिथे पुस्तकं.

तुम्ही अजून प्रॅक्टीस करता?

“छे छे ! कधीच सोडली. “

मग एवढी पुस्तकं? 

“टाकून देववत नाही गं! ” 

त्यांना तर मूल बाळ पण नाही. पण स्वतः लॉयर आहेत, काहीतरी सोय केलीच असेल असा विचार करून मी गप्प! 

मी माझ्या साठी नंतर, गरज नसलेल्या वस्तू काढून टाकायला सुरुवात केली. आता तर कमीतकमी वस्तूंमध्ये घर चालवायला शिकले आहे. (तरीही मुलगा म्हणतो, आई, अजून बरंच काढायचं राहिलंय!) 

कपडे कमी केले, मुख्य म्हणजे बायकांचा जीव ज्यात अडकतो, ते सोनं सगळ्यात आधी काढलं. मग बाकी गोष्टी काढायला त्रास होत नाही.

त्याच बरोबर downsizing पण आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर, पुण्याला अथश्री मध्ये शिफ्ट झाले. आवश्यक ते जुनंच सामान आणि अगदी गरजेपुरतं ठेवायचं हे आधीच ठरवलं होतं.

खूप मोठ्ठ्या घरातून ४५० चौ फुटाच्या घरात शिफ्ट होणं सोपं नव्हतं. (आता पाहुण्यांना राहायला जागा होणार नाही हे मात्र जाणवत होतं) आवश्यक तेवढीच भांडी कुंडी, कपडे, मोजून चार खुर्च्या, असा “भातुकलीचा खेळ” मांडला आहे. उद्देश हाच की आपल्या पश्चात मुलांना आवराआवरीचा त्रास नको. आता बेडरूम मधे माझी आई असल्याने, बाहेर हॉल म्हणजे माझी बेडरूम, फॅमिली रूम, डायनिंग, किचन सगळं एकाच ठिकाणी! 

हळूहळू सवय होते आहे. आणि छान वाटतंय. एखादे दिवशी बाई आली नाही तरी झाडू पोचा करायचं दडपण येत नाही. आधी मोठ्या घरात, “बापरे, आपल्याला झेपणार नाही एवढा झाडू पोचा” या विचारानेच केला जायचा नाही.

प्रत्येकाला downsizing जमेल असं नाही. आपल्याकडे घर विकणं आणि परत हवं तसं नवीन घर घेणं प्रत्येकाला शक्य असतं असं नाही. मोठ्या घराचा मेंटेनन्स, सिक्युरिटी/सेफ्टी याचा विचार केला तर छोटं घर, निदान एकेकटे राहणाऱ्यांना उतारवयात आवश्यक ठरतं. बरेच लोक मुंबईचं घर भाड्याने देऊन, इथे अथश्री मध्ये भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यात अर्थातच सेव्हिंग होतं.

अमेरिकेत तर हल्ली minimalism खूप लहान वयापासून करतात. अगदी bagpack मध्ये मावेल एवढाच संसार घेऊन नोकरी आणि पर्यटन करत असतात. पण ते एकटे जीव…

Downsizing चा विचार मात्र मोठ्या प्रमाणावर तिथे केला जातो. रिटायर्ड लाईफ छोट्या घरात, छोट्या गावात, शांत वातावरणात घालवण्यासाठी आधीच घरं, गावं हेरून ठेवली जातात. त्यात पहिला विचार मोठ्या घराचा मेंटेनन्स वाचवणं, असेल तर कर्ज फेडून टाकणं आणि savings मध्ये चांगलं आयुष्य जगणं हा असतो.

आपणही असा विचार करायला सुरुवात करायला हवी ना? निदान या विषयावर चर्चा व्हावी, आपल्या बरोबरच पुढच्या पिढीच्या त्रासाचा विचार केला जावा असं वाटतं. इथे मी मुख्यत्वे करून मुलं परदेशात आणि आईवडील इथे, अशा कुटुंबांचा विचार केला आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या लोकांना minimalism आणि downsizing दोन्हीचा विचार करता येणार नाही याची मला निश्चितच कल्पना आहे.

लेखिका : सुश्री संध्या घोलप 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बॅंकर्स ब्रॉडकास्ट:लेजर्स… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

बॅंकर्स ब्रॉडकास्ट:लेजर्स… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

बँकेतल्या जुन्या आठवणी

झोपेत वेचत होतो

आज मी स्वप्नामध्ये

लेजर खेचत होतो…..

*

तेव्हाही करायचो आम्ही

भरपूर मरमर काम

काऊंटरसमोर असायचे

तेव्हाही कस्टमर जाम….

*

हातात असायचं तेव्हा

व्हाऊचर नाहीतर चेक

पोस्टिंग करुन फोलिओमध्ये

टॅग ठेवायचो एक….

*

डेबिट किंवा क्रेडिट

करू बेरीज वजाबाकी

गुंतलेलं डोकं वेळेत

काम संपवून टाकी….

*

वर्किंग अवर्स संपताना

काॅलिंग चेकिंग पटापट

टॅग उडवण्यासाठी

फोलिओंशी असे झटापट….

*

महिन्याच्या शेवटी नियमित

वाट्याला यायची लेजर

बॅलंसिंगमध्ये डिफरंस कधी

मायनर अथवा मेजर….

*

टॅली करायला मात्र

राहावं लागे व्यस्त

डिफरंस मिळाला की

त्याहून आनंद वाटे मस्त….

*

लेजरमध्ये असायची

रिकाम्या काॅलमची जोड

काढून प्रॉडक्ट्स सहामाही

त्यात इंटरेस्टची आकडेमोड….

*

अशा या लेजरने

दिलाय आनंद खरा

रिटायरीजनी पहावं

हळूच आठवुन जरा….

*

जुने दिवस आठवायला

मी बदाम ठेचत होतो

आज मी स्वप्नामध्ये

लेजर खेचत होतो….

क्षणभर बँकेत बसून काम करून आल्यासारखे वाटलं ! अगदी मस्त…

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares