☆ माझा साक्षात्कारी हृदयरोग – लेखक- डॉ. अभय बंग ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
पुस्तक – माझा साक्षात्कारी हृदयरोग
लेखक – डॉ. अभय बंग
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
एकूण पृष्ठे-१७३
किंमत-१२५₹
एखादे यंत्र बंद पडत नाही किंवा चालायचे बंद होत नाही तोवर आपण तिकडं लक्ष देत नाही मात्र यंत्र कुरकुर करू लागले, बंद पडले की आपण त्याची दुरुस्ती, तेल पाणी करतो. त्याचे सांधे फारच खिळखिळे झाले असतील, झिजले असतील तर ते दुरुस्त होत नाही मग पर्यायी अवयव जोडून मशीन चालू करतो;अगदी तसेच आपल्या शरीराचे देखील नाही काय? शरीररुपी गाडी चालते, पळते तोवर आपण ती चालवतो, पळवतो अगदी थकेपर्यंत मग गाडीला घुणा लागतो न गाडी थांबते, अर्थात एखादा आजार बळावतो न मग आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो, आरोग्याबाबत सजग होतो. आजार छोटा असेल तर जगण्याची संधी मिळते, अवयव प्रत्यारोपण होऊन नवजीवन मिळते, अन्यथा आपल्या निष्काळजीपणाने आपलं आयुष्य संपते आणि जगायचं राहूनच जातं.
‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’हे पुस्तक हेच तर सांगतं. डॉ. अभय बंगाबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यांचे आदिवासी कुपोषित बालकांसाठी केलेले काम आणि अजूनही समाजसेवेत व्यग्र असणारे डॉ. अभय बंग याना हृदय विकार झाल्यावर आलेल्या अनुभवांचे हे यथार्थ चित्रण आहे.
एक दिवस सकाळी चालता चालता त्यांना एकदम छातीत दुखू लागलं न पुढं लगेच हृदयविकाराचा झटका आला. उपचार व दवाखान्यातील वास्तव्य या दरम्यान त्यांनी स्वतःला का झटका आला असावा याचे केलेले आत्मपरीक्षण आणि अवलोकन म्हणजे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग. ‘साक्षात्कारी अशा साठी की आत्मपरीक्षण आणि उपचारादरम्यान त्यांना ज्या गोष्टींचा उलगडा झाला, तो म्हणजे साक्षात्कार. गांधीजींनी जसे सत्याचे प्रयोग स्वतःवर केले तसेच डॉ. नी सुद्धा. झटका, त्यानंतर झालेल्या गुंतागुंतीच्या समस्या आणि दृढ झालेली ईश्वरावरील श्रद्धा याचा लेखाजोखा म्हणजे त्यांचे हे छोटेसे पुस्तक आहे.
आपल्याला का बरं झटका आला असावा? असा ते स्वतःशीच प्रश्न करतात. कारण त्यांची प्रकृती अतिशय कृश होती त्यामुळं तेही भ्रमात होते की आपल्याला असे काही होणार नाही. पण भ्रम फुटला, दैव बलवत्तर म्हणून दोनदा या जीवघेण्या संकटातून ते वाचले, शस्त्रक्रिये दरम्यान गुंतागुंत झाली.
दवाखान्यात ऍडमिट असताना ते स्वतःचा, त्यांच्या आरोग्याचा आणि दररोजच्या जीवनशैलीचा मागोवा घेताना आपण आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले लक्षात आले. याचबरोबर स्वप्नांचा पाठपुरावा करताना स्वप्न पूर्ण करताना होणारी दमछाक, पुरेशी झोप न घेणे आणि व्यायामाचा अभाव या गोष्टी निदर्शनास आल्या. त्याचबरोबर चुकीची आहारपद्धती सुद्धा हृदयविकार होण्यास कारणीभूत असलेली समजली. म्हणजेच या तीनही गोष्टी हातात हात घालून हृदयविकार होण्याकडे वाटचाल करतात. झटका येण्यागोदरची सुद्धा काही प्राथमिक लक्षणे डॉ नी दुर्लक्षित केलेली, या सर्वांचा परिपाक म्हणजे तीव्र झटका आणि शस्त्रक्रिया.
स्वतःवर ओढवलेल्या या प्रसंगातून वाचण्यासाठी आणि इतरांनाही काही गोष्टी माहीत होण्यासाठी डॉक्टरांनी सखोल माहिती घेऊन हृदयविकाराबद्दल आपल्या मित्रपरिवारात जागृती केली. त्यांचे हे मार्गदर्शनपर लेख दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले आणि पुढं ते पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले.
निरोगी राहण्यासाठी, हृदयविकार होण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शन बहुमोल आहे. सर्वच स्तरातील व्यक्तींना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. अगदी छोटेसे पुस्तक आहे पण त्यातील अनुभव आणि मार्गदर्शनाचा उपयोग आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनात केला तर हृदयरोगापासून आपण दूर राहू. प्रत्येकाने संग्रही ठेऊन वारंवार उजळणी करण्यासारखेच हे पुस्तक आहे.
परिचय :सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आउटलिव्ह” – इंग्रजी लेखक : डॉ. पीटर अटिया / बिल गिफोर्ड – मराठी अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर – परिचय : डॉ. मीरा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आउटलिव्ह (दीर्घायुष्यामागची कला आणि विज्ञान)
लेखक : डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर
पृष्ठे : ३७६
मूल्य: ४००₹
‘‘म्हतारी व्हय, हिंडती फिरती ऱ्हाय, हसती खेयती ऱ्हायजो. ’’ असा लांब आशीर्वाद मला मिळायचा, जेव्हा जेव्हा माझ्या विदर्भातल्या बहिणाआत्याला मी नमस्कार करत असे. लहानपणी मला वाटायचं की ही आत्या ‘‘म्हातारी हो’’ असं का म्हणते? मोठं झाल्यावर ‘म्हातारं होणं’ यातला गर्भितार्थ कळला. या आशीर्वादाचा अन्वयार्थ मात्र डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड यांनी लिहिलेलं ‘आउटलिव्ह द सायन्स अँड आर्ट ऑफ लाँजेविटी’ हे पुस्तक वाचताना उमजला.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक दीर्घायुषी माणसं पाहतो. पण त्यांच्या वयाच्या शेवटच्या दशकात त्यांना स्वत:चं स्वत: उठता येत नाही. ते बाथरूमपर्यंत एकटे जाऊ शकत नाहीत. तर कधी तोल जाऊन बाथरूममध्ये पडतात, पायाचं हाड मोडतं, बिछान्याला जवळ करावं लागतं. हे परावलंबित्व खूप क्लेशकारक असतं. त्या माणसासाठी आणि त्या घरासाठीही. असं दीर्घायुष्य डॉ. अटियांना अभिप्रेत नाही. माझ्या आत्यालाही नव्हतं. यासाठी लेखक इथे दोन संकल्पनांचा ऊहापोह करतात. ‘लाइफ स्पॅन’ म्हणजे जगण्याची लांबी, ‘हेल्थ स्पॅन’ म्हणजे आपल्या आयुष्यातला कुठलाही आजार नसलेला काळ किंवा जगण्याची गुणवत्ता. शरीराच्या आणि आकलनाच्या क्षमता कमी झाल्या की गुणवत्ता घसरते. संपूर्ण पुस्तकभर लेखक ही गुणवत्ता जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याबद्दल विस्ताराने सांगतात त्यामुळे जगण्याची लांबीही आपोआपच वाढेल असं त्यांना वाटतं.
जगभरातले ८० टक्के मृत्यू साधारण चार प्रकारच्या आजारांमुळे होतात. रक्तवाहिन्यांच्या काठिण्यामुळे होणारे आजार (स्ट्रोक, हार्ट अटॅक), चेतासंस्थेचे आजार (स्मृतिभ्रंश), चयापचयाचे आजार (टाइप टू डायबेटिस) आणि कर्करोग. लेखक या आजारांना चार घोडेस्वार म्हणतात. हे घोडेस्वार जेव्हा चाल करून येतात तेव्हा ती पुढे येणाऱ्या महाभयंकर संकटाची नांदी असते.
या चारही प्रकारच्या आजारांना ते एका सामायिक सूत्रात गुंफून त्यांच्या मागचे विज्ञान आपल्यासमोर रंजकतेने मांडतात. वरवर पाहता हे वेगवेगळ्या अवयवांचे आजार दिसत असले तरी यांच्या मुळाशी चयापचयाचे अनारोग्य असते. बिघडलेल्या चयापचयाचे दृश्य स्वरूप म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाइप टू मधुमेह. एकदा का या दोघांनी आपल्या शरीरात पाया घातला की उरलेले आजार त्यावर आपले इमले भराभर चढवतात. लेखक पुस्तकात जागोजागी आपल्याला सांगतात- ‘सावध ऐका पुढल्या हाका’.
जगण्याची गुणवत्ता कायम ठेवत आयुर्मर्यादा वाढवायची तर आपल्याला वर उल्लेखलेल्या आजारांपासून स्वत:ला जास्त काळ दूर ठेवावे लागेल. यासाठी सध्याची आरोग्य व्यवस्था फारशी कामाची नाही, असं त्यांचं मत आहे. आजार झाल्यावर काय करायचं यात ती निष्णात आहे. ती आयुर्मर्यादा वाढवते पण उरलेलं आयुष्य ते आजार आपल्या सोबत राहतात आणि असंख्य प्रकारच्या गोळ्या घेत अप्रत्यक्षपणे फार्मा कंपन्यांचा फायदा करून देत आपण जगतो. आपलं ध्येय जर आजाराविना जास्त काळ जगण्याचं असेल तर आपल्याला यासाठी दूरदृष्टी ठेवून या आजारांनी नेहमीच्या तपासण्यांच्या आरशात आपला चेहरा दाखवण्यापूर्वीच स्वयंप्रेरणेने बरीच वर्षं आधीच उपाय सुरू करावे लागतील.
याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा, वेगळा आणि आधी आपल्याला कोणीही न विचारलेला प्रश्न लेखक या पुस्तकातून विचारतात. अशी कोणती दहा दैनंदिन शारीरिक कामं आहेत जी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकातदेखील करता यावीत असं वाटतं. जसं की कुणाच्याही मदतीशिवाय खालून उठणं, उकीडवं बसणं, नातवंडाला उचलणं, दोन जिने न थांबता चढणं, सामान आणणं, छोटी सुटकेस उंचावरच्या कप्प्यात ठेवणं, सीलबंद जार हाताने फिरवून उघडणं वगैरे. ही यादी प्रत्येकाची वेगळी असेल. या १० कृतींना लेखक ‘सेंटेरियन डेकॅथलॉन’ असं म्हणतात. ऑलिम्पिक खेळांमध्ये दहा वेगवेगळे खेळ एकत्रितपणे खेळण्याला ‘डेकॅथलॉन’ म्हटलं जातं. आयुष्यातही टिकून खेळणं महत्त्वाचं. म्हणून ही दहा कामांची यादी आवश्यक. आपण विचारच केलेला नसतो की आयुष्याच्या शेवटच्या दशकात माझा फिटनेस कसा असेल. कुठल्यातरी दीर्घकालीन आजाराने ग्रस्त राहून थकत जाऊ असाच विचार आपण करतो. पण डॉक्टर अटिया आपल्याला हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात. हे या पुस्तकाचं महत्वाचं फलित. या १० गोष्टींची यादी आयुष्याच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी, जगण्याच्या गुणवत्तेसाठी एक ठोस ध्येय ठरवायला प्रेरित करते. पानोपानी या प्रवासासाठी उपयुक्त सूचना देत, हे पुस्तक तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला एक चालण्याजोगा मार्ग सांगतं.
दर वर्षागणिक आपली स्नायूंची शक्ती कमी होत जाणार हे कटू सत्य ध्यानात ठेवून वयाच्या ऐंशीच्या दशकात जर मला स्वत:च स्वत: उठायचं आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाला विरोध करून स्वत:च्या शरीराचं वजन उचलायचं आहे, वर नमूद केलेल्या कृती करायच्या आहेत तर मग त्यासाठी आपण आज काय करायला हवं याविषयी हे पुस्तक सांगू पाहतं. आयुष्यात हा ‘आज’ महत्त्वाचा आहे, मग तुम्ही कितीही वयाचे असलात तरी.
‘‘तुम्ही असंच करा, तुम्ही १०० वर्षं जगाल’’ किंवा ‘‘हेच खा मग फिट राहाल’’ असं कुठलंही पोकळ आश्वासन हे पुस्तक देत नाही. तुमचं उद्दिष्ट आणि तुमचेच प्रयत्न यावर भर देतं. कारण आपण प्रत्येकजण आपली आनुवंशिकता, सवयी, सध्याची स्थिती यात पूर्णपणे वेगळे आहोत. मला एक जुनी कविता आठवली. चित्रकला शिकवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांबद्दलची….
काही शिक्षक म्हणतात मी काढलेलं गिरव.
काही सांगतात मी रंग वापरलेत तसेच वापर
खरा शिक्षक मात्र कोराच कॅन्व्हास हातात देतो.
बाजूला नुसता राहतो उभा,
तुमच्या कल्पनेला पूर्ण मुभा,
चुकल्या वळणावर करतो खूण,
तुमच्या प्रयत्नांना पूर्ण गुण…
अशी सोबत हे पुस्तक करतं. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरण आखायचं आणि धोरण अमलात आणण्यासाठी साधे उपाय सुरू करायचे अशी तरुण वयापासूनच सातत्याने चालण्याची एक वाट लेखक आपल्या दृष्टिक्षेपात आणून देतात. हे धोरण ठरवण्यामागे विज्ञान आहे आणि ते अमलात आणणं हे कौशल्य. म्हणून या पुस्तकाच्या नावात आहे ‘सायन्स’ अँड ‘आर्ट’ ऑफ लाँजेव्हिटी.
दीर्घायुष्याचा खेळ आरोग्यपूर्ण मार्गाने खेळायचा असेल तर हुकमाचे चार पत्ते डॉक्टर आपल्या हातात देऊ इच्छितात. व्यायाम, झोप, आहार काही औषधं. या गोष्टी काही नवीन नाहीत. पण या चारही बाबतीत हे पुस्तक जे मुद्दे मांडतं त्यांचा समावेश आपल्या डॉक्टरांच्या नेहमीच्या सल्ल्यात सहसा नसतो.
व्यायाम हा हुकमाचा एक्का. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने व्यायाम का करायचा हे ते पहिल्यांदा सांगतात. एखाद्या गोष्टीमागचं ‘का’ समजलं तर ती गोष्ट आपण नेटाने करतो. व्यायाम ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्याला हृदयाचं, स्नायूंचं, मनाचं, चयापचयाचं असं साऱ्या प्रकारचं आरोग्य सहज बहाल करू शकते. पेशींच्या पातळीवर व्यायाम आपलं पॉवर हाऊस जास्त पॉवरफुल बनवतं. आपलं शरीर चालायला लागणारी शक्ती प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या मायटोकाँड्रिया नावाच्या पॉवरहाऊसमध्ये तयार होते. व्यायामामुळे सक्षम मायटोकाँड्रिया निर्माण होतात जे ग्लुकोज आणि चरबी दोन्हीपासून ऊर्जा तयार करतात, ज्यामुळे आपली मेटॅबॉलिक हेल्थ चांगली राखली जाते आणि अर्थातच उरलेले आजार फारसे जवळ येत नाहीत. शरीरात जुन्या पेशी मोडीत काढून प्रथिनांची नीट सफाई व्हावी लागते नाहीतर त्यांचे गोळे बनतात. जे पार्किन्सन्स, अल्झायमरसाठी कारणीभूत ठरतात. ही सफाई व्यायामामुळे वेगाने होते.
साधारण तीन प्रकारचे व्यायाम गरजेचे असतात. हृदयाच्या क्षमतेसाठी, स्नायूंच्या शक्तीसाठी, स्थिरता अबाधित ठेवण्यासाठी. पहिल्या प्रकारात चालणं, सायकलिंग, पळणं, पोहणं असे व्यायाम येतात. ते किती तीव्रतेने करायचे याला लेखक फार महत्त्व देतात. ‘‘डॉक्टर म्हणतात म्हणून फिरतो थोडं मी. मग परत येताना कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये नाश्ता पण करून येतो. ’’ असं फिरणं काही कामाचं नाही. व्यायामाची तीव्रता काही झोन्समध्ये विभागली जाते. झोन टूमध्ये आठवड्यातले काही तास तरी व्यायाम करायला हवा. आपण झोन टूमध्ये आहोत का हे सांगणारी एक सोपी पद्धत म्हणजे टॉक टेस्ट. म्हणजे तुम्ही व्यायाम इतक्या तीव्रतेने करायला हवा की तो करताना तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकता पण ते सहज नसतं. आणि तुम्ही असं बोलणं शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करता. जर तुम्हाला कुणाचा फोन आला तर तुम्ही उत्तर दिल्यावर पलीकडच्या व्यक्तीला कळायला हवं की तुम्ही व्यायाम करता आहात.
स्नायूंची शक्ती आणि वजन हे म्हातारपणासाठी बँकेत ठेवलेल्या पुंजीइतकं महत्त्वाचं आहे. म्हणून वजनं उचलण्याचे व्यायाम ज्याला ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ म्हणतात ते करायलाच हवेत. ‘‘मी ६० वर्षांची झालेय, मग मी काय उचलणार वजनं? आता कशी माझ्या स्नायूंची शक्ती वाढणार?’’ हा गैरसमज हे पुस्तक दूर करतं. लेखकाचं म्हणणं की तुम्ही कोणत्याही वयात व्यायाम सुरू करा, त्याचा फायदाच होईल आणि जितका जास्त कराल तितका जास्त फायदा होईल.
आहार आणि झोप यावरची पुस्तकातली प्रकरणं प्रत्यक्ष वाचायला हवीत. कमी खा आणि जास्त जगा हे महत्त्वाचं तत्त्व मांडतं, स्नायूंच्या शक्तीसाठी महत्त्वाची असलेली प्रथिनं किती आणि केव्हा खावीत हे सांगतात. नैसर्गिक झोप सात तासांपेक्षा कमी घेतली तर शरीरात काय काय घडतं हे वाचल्यावर तर आपण खडबडून ‘जागे’ होतो. लेखक शेवटी त्यांच्या भावनिक आरोग्याबद्दल बोलतात. तीव्र भावनांमुळे बिघडलेल्या नात्यांबद्दल सांगतात. हे वाचताना मला डॅनियल गोल्डमन आठवले. त्यांनी पहिल्यांदाच भावनिक बुद्धिमत्तेवर सविस्तर लिहिलं होतं. काय असते भावनिक बुद्धिमत्ता? स्वत:च्या उणिवांचा आणि क्षमतांचा सहजपणे केलेला स्वीकार, आपल्या भावनांचं नियमन आणि इतरांच्या भावना समजून घेणं असतं. स्वत:शी आणि इतरांशी असलेलं नातं ज्यामुळे सुखद राहू शकतं. अनेकांना वाटेल तरुणपणापासून आहारावर, झोपेवर निर्बंध कशासाठी घालायचे. परवाच कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या इंजेक्शनची जाहिरात होती, लठ्ठपणा कमी करणाऱ्या गोळ्या आहेतच. आयुर्मर्यादा वाढवणाऱ्या काही गोळ्यांवर संशोधन सुरू आहे. मग काय एकेका गोष्टीसाठी एक एक गोळी घ्यायची, आणि फिट राहायचं. नजीकच्या भविष्यकाळात कदाचित हे होईलही.
आपण फीट राहूही, पण सुखी राहू का? कारण एकमेकांशी चांगले संबंध असण्याची गोळी नाही. वागण्यात आस्था निर्माण करणारी गोळी नाही. स्वत:चं स्वत:शी आणि इतरांशी असलेलं नातं टवटवीत ठेवण्याची गोळी नाही. दीर्घायुष्याच्या समीकरणात शेवटी प्रश्न उरतो की कशासाठी आणि कुणासाठी जगायचं? आपले नातेसंबंध चांगले नसतील, आपल्याला जगण्यासाठी काही उर्मी नसेल तर दीर्घायुष्याचा काहीच अर्थ नाही. श्रेयस महत्त्वाचं आहे लांब जगण्यासाठी… ‘आउटलिव्ह’ने दाखवलेल्या या वाटेवर आपण किती लांब चालत जाऊ माहीत नाही. अंतर किती कापलं यापेक्षा आरोग्याच्या किती गुणवत्तेसोबत कापलं हे महत्त्वाचं. माझ्या बहिणाआत्याच्या आशीर्वादातला अर्धा भाग हेच तर सांगतो.
पुस्तकातील सर्व माहिती विज्ञानाधारित असली तर सर्वांना समजेल अश्या सोप्या प्रकारे सांगितली आहे.
हे पुस्तक आरोग्याची काळजी असणाऱ्या प्रत्येकाने स्वतः वाचावे व आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून भेट द्यावे असे आहे.
परिचय : डॉ. मीरा कुलकर्णी
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “संभाजी” – लेखक – श्री विश्वास पाटील – परिचय – श्री आदित्य पाटील ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : संभाजी
लेखक : श्री विश्वास पाटील
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
पृष्ठ: ८६८
मूल्य: ७९५ ₹
स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी राजे ह्यांचं आयुष्य एकूणच वादळ होतं. एका युगपुरुषांच्या पोटी जन्म घेऊन, जिजाऊमातासारख्या एका युगस्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलयं फिरत राहिली. राज्यकारभारयांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप, गृहकलह, फंदफितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारख्या वावरत होत्या. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचा मृत्यू, कोणत्या वयात बोट भरून चालला शिकवणाऱ्या आजीचा मृत्यू ह्यांसारखी असंख्य संकट पार करत शंभूराजांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलं.
विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी खऱ्या अर्थाने संभाजीराजांच्या आयुष्याची सर्वांगांनी ओळख करून देते. अनेक इतिहासकार संभाजी राजांचे चरित्र मलीन करण्यात व्यस्त होते, अनेक लेखक यांना बदफैली ठरवत असताना अनेक सुजाण लेखक, इतिहासकारांनी संभाजी राजांच्या चरित्राला न्याय दिला. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ही कादंबरी. शिवरायांच्या घरातील अंतर्गत वाद ते संभाजीराजांनी रणांगणी चौखूर नाचवलेला घोडा सगळंच वर्णन अगदी ओघवत्या आणि रसाळ भाषेत लेखक विश्वास पाटील यांनी केलं आहे.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबाला संभाजीराजांनी एक किल्ला लढवण्यासाठी सहा ते सात वर्ष झुंज दिली. जंजिर्याच्या सिद्दीला धाकात ठेवलं, पोर्तुगीजांना पुरतं नेस्तनाबूत केलं. पण मराठ्यांच्या फंद फितुरीमुळे वैरयाने डाव साधला आणि संभाजी राजे इतिहासात अमर झाले.
एकूणच कादंबरी मोठी आहे परंतु वाचनाची आणि मनाची पकड इतिहास सहज घेते की अवघ्या पंधरा दिवसात मी कादंबरीचा फडशा पाडला. मात्र शेवटची शंभर-दीडशे पानं माझी नेत्रकडा कोरडी ठेवू शकली नाहीत.
सरतेशेवटी इतकेच सांगू इच्छितो – बदनामी बदफैलीच्या काळ्याकुट्ट ढगांनी कितीही झाकोळण्याचा प्रयत्न केला तरीही सुर्यरूपी शंभू चरित्र कायमच जनमानसांत प्रेरणारुपी प्रकाश देत राहील.
सर्व शिव शंभू भक्त आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ही कादंबरी वाचायला हवी.
परिचय : आदित्य पाटील
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आणखी एक सिद्धार्थ (अनुवादित कथासंग्रह)”– मूळ हिन्दी लेखिका : सुश्री प्रतिमा वर्मा – अनुवादिका : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक : आणखी एक सिद्धार्थ – ( अनुवादित कथासंग्रह )
मूळ लेखिका : प्रतिमा वर्मा
अनुवाद : उज्ज्वला केळकर.
प्रकाशक : महाकवी एंटरप्राईजेस.
पृष्ठे:२०८
किंमत :४२०/—
२०२२ साली नव्याने प्रकाशित झालेला, मूळ लेखिका प्रतिमा वर्मा यांचा अनुवादित कथासंग्रह”आणखी एक सिद्धार्थ” नुकताच माझ्या वाचनात आला. या कथासंग्रहाचा अनुवाद सुप्रसिद्ध लेखिका आणि कवियत्री माननीय सौ. उज्वला केळकर यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारक रीतीने केलेला आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक हिंदी कथासंग्रह व इतर साहित्याचं अनुवादित लेखन मी वाचलेले आहे आणि मला ते आवडलेलं आहे. त्यापैकीच”आणखी एक सिद्धार्थ” हे पुस्तक.
सौ. उज्ज्वला केळकर
मा. उज्वला ताई त्यांच्या इतर भाषेतील साहित्याचा अनुवाद करण्याच्या भूमिकेबद्दल मनोगतात म्हणतात,
”अनुवादरूपाने का होईना इतर भाषेतील दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता येतो. त्या त्या समाजाच्या धारणा, वर्तन प्रणाली, संस्कृती याचाही अनुभव घेता येतो.”
साध्यर्म आणि वैधर्म जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांना आवडलेल्या विशेष करून आशय – विषय मांडणीच्या अनुषंगाने जवळच्या वाटलेल्या हिंदी कथांचा मराठी अनुवाद करून ते साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस खरोखरच स्तुत्य आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” या प्रतिमा वर्मा यांच्या कथासंग्रहात आठ दीर्घकथा आहेत. प्रतिमा वर्मा या मूळच्या पाटणा बिहार इथल्या रहिवासी. १९७० पासून त्यांनी स्वतंत्र लेखनाला सुरुवात केली आणि अनेक साहित्यप्रकार विविध माध्यमातून प्रकाशित केले. प्रतिमा वर्मांच्या बहुतेक कथा या स्त्री केंद्रीत आहेत. मात्र त्यातील स्त्री दर्शन हे विविधरंगी आहे. त्यांच्या कथेतल्या स्त्रिया मुक्त असल्या तरी विचारी आणि खंबीर आहेत. मानसिक आणि भावनिक पातळीवर आधार मिळण्याचे सामर्थ्य त्यांच्याच आहे. प्रतिमा वर्मा यांचे लेखन तरल आणि संवेदनशील आहे. त्यात नुसतीच कल्पनारम्यता नसून वास्तवतेचे रेखाटन आहे आणि या कथांचा अनुवाद करताना उज्वला ताईंनी लेखनाचा गाभा, आशय त्याच प्रभावीपणे जपण्याचे भान आणि समतोल दोन्हीही राखलं आहे. उज्ज्वलाताईंचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व लक्षवेधी आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” या कथासंग्रहातील आठही कथा वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत. वास्तविक कथानकं ही नेहमीच्याच सामाजिक, कौटुंबिक अथवा भावभावनांचं विश्व उलगडवणारं असलं तरी या सर्वच कथा वाचकाला जगत असणाऱ्या नेहमीच्या जीवनापलीकडचं जीवन, वेगळं भावविश्व अनुभवायला भाग पाडतात. एका वेगळ्याच स्तरावरचं सुंदर, सूत्रबद्ध लेखन वाचल्याचा आनंद मिळतो. सुरुवात मध्य आणि शेवट अशा नियमबद्ध साच्यातल्या या कथा नसून त्या वाचल्यानंतर मनात काही प्रश्न ठेवून जातात. जिथे कथा संपते तिथूनच ती पुन्हा सुरू झाल्यासारखे वाटते हे या कथांचं वैशिष्ट्य आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” ही कथा एका श्रीमंत बापाच्या शाळकरी मुलाची मनोविश्लेषणात्मक कथा आहे. चांगल्या शिक्षण प्राप्तीसाठी भरपूर पैसा असलेल्या अनुपम नावाच्या मुलाच्या पैसेवाल्या, प्रसिद्ध वकील बापाने त्याला महागड्या रेसिडेन्सी स्कूल मध्ये ठेवलेले असते पण तिथे आलेल्या अत्यंत वाईट अनुभवामुळे त्याच्या बालमनावर परिणाम होतो. या वाईट अनुभवात शाळेतल्या गुंड मुलांनी त्याच्या मित्राची निर्घुण हत्या केलेली असते आणि या विरुद्ध लढण्या ऐवजी शाळेचे व्यवस्थापन केवळ पैशाच्या लोभाने प्रकरण दाबून टाकतात. दुसरा वाईट अनुभव म्हणजे शिक्षकाकडून.. ज्याची प्रतिमा खरोखरच चांगला शिक्षक अशी असते आणि त्याच्याकडून अनुपमचे लैंगिक शोषण होते. परिणामी अनुपम सारखा मूळचा हुशार विद्यार्थी मनोरुग्ण होतो. या घटनेचा त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊन तीन वेळा नापास झाल्यामुळे शाळेतून त्याला डी बार केले जाते. याच दरम्यान त्याला त्याचे वडील जे आदर्श वकील वाटत असतात तेही गुन्हेगारांना सोडवण्याच्या धंदा करून अमाप पैसा मिळवत आहेत हे कळल्यावर त्याच्या मनाचा उद्रेक होतो आणि अखेर एक नापास केडरचा मुलगा असला तरी वाईट कर्मांची साथ देणाऱ्या त्याच्या डॅडी समोर तो ताठपणे उभा राहून त्यांना”तुम्हाला शरम वाटली पाहिजे.” असे तो म्हणू शकतो आणि त्याचवेळी कोमेजलेलं त्याचं मन मुक्त होतं. स्वप्नात भयभीत होणारा हा मुलगा क्षणात भयमुक्त होतो. आणि मग तो काहीतरी स्वतःशीच ठरवून घराबाहेर पडतो. पिंजरा तोडून बाहेर येतो. मुक्त होतो. अशी अतिशय सुंदर संवेदनशील बालमनाची ही एक प्रौढ कथा आहे.
दूरस्थ या कथेतल्या या ओळी मला फार आवडल्या.”इतक्या वेळानंतर मला वाटू लागलं की मी घराचा मालक आहे. माझ्याविना काही जरुरीची कामं खोळंबून राहू शकतात. प्रेम किंवा रोमान्सने पूर्णपणे झाकून टाकता येईल इतका जीवनाचा फलक लहान नाहीच मुळी. जीवनाचे अनेक पैलू आहेत,”
ही कथा दोन व्यक्तींची आहे. एक स्त्री आणि एक पुरुष. त्यांचे एकमेकांशी लग्न झालेलं आहे पण मुळातच हे लग्न दुसऱ्यांची मनं सांभाळण्यासाठी झालेलं आहे. एका वेगळ्याच नात्याची कथा वाचताना मन थकून जाते. या कथेतल्या स्त्री पात्राची सक्षमता मनाला समाधान देते.
तिचं हसू ही एका कुरूप उपेक्षित आणि प्रत्यक्ष आईकडूनच अवहेलना सहन करत जगणाऱ्या स्त्रीची हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. या कथेतल्या पात्रांचे विविध प्रकारचे भावनिक स्तर वाचताना मानवी जीवनाचे अनेक पैलू वाचकांसमोर येतात. ही सुद्धा एक अतिशय सुंदर कथा आहे.
राख ही पती-पत्नीच्या विस्कटलेल्या नात्याची कथा आहे. या कथेतले भावबंध वाचताना मन घायाळ होते. पुरुषाचं मन आणि स्त्रीचं मन याचे वास्तव रूप या कथेत अनुभवायला मिळतं. असहाय्यता, प्रेम, पर्याय नसणारी स्थिती आणि त्यातूनच निर्माण होणारी घृणा, तिरस्कार, हतबलता आणि तटस्थता याचे सुरेख मिश्रण म्हणजे ही कथा. वाचायलाच हवी अशी.
दिलासा या कथेत एका लष्करातल्या बेपत्ता जवानाच्या बापाच्या मनाची घालमेल आणि त्याच वेळी गावातल्या एका शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी जमलेलल्या जनसमुदायाचे वर्णन आहे आणि त्या अनुषंगाने समाज, सरकार, आजची तरुण पिढी यांची सीमेवर लढणाऱ्या सैनिकाविषयीची जी भावना, जी मानसिक गुंतवणूक अनुभवायला मिळावी अशी अपेक्षा असताना नेमके त्या उलट सामाजिक चित्र दिसावं याची खंत आणि केंद्रस्थानी सीमेवर बेपत्ता अथवा युद्धकैद्यांच्या यादीत नाव असणाऱ्या जवानाच्या वृद्ध बापाची प्रचंड मानसिक यातायात अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. ही कथा वाचताना वाचकालाही सूक्ष्मपणे अपराधाची जाणीव पोचत राहते. या तुटलेल्या बापाला निदान देशासाठी लढणाऱ्या त्याच्या मुलाची दिलासा देणारी एखादी खबर मिळावी असे वाटत राहते.
काळा त्रिकोण या कथेचं शीर्षक वाचल्यावरच या कथेतला विषय कळतो. ही एक प्रेमकथाच आहे आणि या प्रेमकथेतही त्रिकोण आहे. तीन व्यक्तींभोवती ही प्रेम कथा गुंफली आहे वरवर हा विषय नेहमीचाच वाटत असला तरीही या कथेत टिपलेली मनामनाची वादळे हही विलक्षण वाटतात. या प्रेमात कुठलीही स्पर्धा, द्वेष, मत्सर चढाओढ अथवा फसवणूक नाही. एका वेगळ्याच उंचीवरची कथा ही आहे. या कथेच्या शीर्षकाबद्दल मी काही सांगण्यापेक्षा कथा वाचून वाचकाने त्यातला गर्भितार्थ शोधावा एवढीच अपेक्षा.
एकंदरीत विचारांचं आणि समर्थ भाषेचं सौंदर्य प्रत्येक कथेत जाणवतं. कधी विधानातून तर कधी संवादातून.
दूरस्थ या कथेत तो तिला विचारतो,”तुला पुरुषाची गरज वाटत नाही का?”
तेव्हा ती उत्तर देते,
“वाटते की. पण जिला मन मारायची सवय लागली आहे तिच्या बाबतीत हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. प्रेम हे असं गीत आहे की जे प्रत्येक वाद्यावर गाता येत नाही. मी दुसऱ्या प्रकारचं वाद्य आहे असं समजा.”
राख या कथेतील नायिका तिच्या जीवनात हरलेल्या पतीला ठामपणे सांगते,”तुम्ही गरीब यासाठी नाही की तीन चारशे रुपयात तुमचं भागत नाही. तुम्ही गरीब यासाठी आहात की आपल्या इच्छा, आपली स्वप्नं, आपलं व्यक्तिमत्व तुम्ही हरवत चालला आहात. संतपणाचा अभिमान बाळगताना अकिंचन असल्याचा जाणीवेतून तुम्ही सुटू शकत नाही.
“प्रेतावर एक मण लाकडाचे ओझं काय नि नऊ मण काय.. काय फरक पडतो. तुमचे जितक्या मर्यादेपर्यंत पतन झाले त्याच्या खाली कोणतीच पातळी नाही. मृत्यूची सुद्धा नाही.”
सांजवात या कथेत जयंतीच्या मनातले विचार किती सुंदर आणि परिणामकारक शब्दात लिहिले आहे ते बघा.”आत्मीयतेच्या ओलाव्याने भरलेला गोपू तेल वातीने ओथंबलेल्या दिव्यासारखा आहे. त्याच्या स्वप्नांची वात चेतवायला हवी. चिरा गेलेल्या दिव्यात मनोबलाची स्नेहधारा भरायला हवी.”
असाच एक आणखी सुंदर वास्तविक विचार.
“आपण जळू लागलात तर प्रथम काय फेकाल? शरीराची कातडी की परिधान केलेले नैतिकतेचे कपडे?”
“क्षणाच्या छोट्याशा अंगठीतून अनुभूतीचं पुरच्या पुरं ठाणंच खेचून निघतं. ढाक्याची मलमल तरी इतकी बारीक असेल?”
“तू भेटल्यानंतर माझ्या लक्षात आले की मला एक परिपूर्ण स्त्री हवी आहे जिच्याजवळ हृदय, बुद्धी, समज, शक्ती आहे केवळ चेहरा नाही.”
अशा अनेक सुंदर विचारांची शाब्दिक रोपटी, फुलं या कथासंग्रहात जागोजागी फुललेली आहेत. अर्थपूर्ण संवाद, चपखल उपमा ही सौंदर्यस्थळे यात अनुभवता येतात. वाचताना मन कधी व्यथित होतं, कधी उद्युक्त होतं, प्रोत्साहित होतं, आनंदी समाधानी होतं. कथासंग्रह वाचताना वेगवेगळ्या मानसिक पातळ्यांवरचा सुरेख आणि उद्बोधक प्रवास घडतो.
या पुस्तकाचं मुखपृष्ठही खूप बोलकं आहे. कृष्णधवल रंगातलं हे चित्र परिणामकारक आहे. शीर्षक कथेशी संबंध दर्शविणारं आहे. मुठीतून दिसणारी खिडकी, खिडकीच्या बाहेरचं जग पाहणारा एक किशोरवयीन मुलगा आणि उडत जाणारा मुक्त पक्षी. कुणाच्यातरी मनमानी मुठीत अडकलेल्या त्या मुलाच्या भविष्याला खिडकीच्या बाहेरच्या जगात स्वतंत्र जगण्याची वाट मिळाल्यावर तो अथांग आभाळात विहरणार्या पक्ष्यासारखा मुक्त होतो. अतिशय अर्थपूर्ण, आकर्षक मुखपृष्ठ भरत यादव यांनी रेखाटलं आहे. जे या संपूर्ण कथासंग्रहासाठी समर्पक आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन.
शेवटी इतकेच म्हणेन”मानसिक पातळ्यांवरचा सुरेख आणि उद्बोधक प्रवास घडविणार्या या कथा आहेत.” थोडक्यात प्रत्येकाने एक सुंदर पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. विशेष म्हणजे हिंदी साहित्यातले सौंदर्य वाचकांपर्यंत तंतोतंत पोहोचवणाऱ्या मा. उज्वलाताई यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. त्यांच्या या साहित्य वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा !
☆ मृत्युजिज्ञासा… लेखक – स्वामी विज्ञानानंद ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक – मृत्युजिज्ञासा
लेखक – स्वामी विज्ञानानंद
प्रकाशक – मनशक्ती प्रकाशन
मुल्य – ६०रु.
गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या व्यक्तींचे झालेले मृत्यू पाहिले तेव्हापासून मृत्यू या विषयाबाबत माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. कारण मृत्यूबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. तुमच्यापैकी अनेकांनादेखील त्या गोष्टी माहित असतीलच. अमुक एक प्रकारे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे कदाचित अनेकदा आपल्याला धक्कादायक असतं. एखाद्या व्यक्तीचा विशेषतः प्रिय व्यक्तीचा विरह नेमका मृत्यू काळ समीप असताना होणं. व्यक्ति मृत झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार, विधी यामध्ये काही विघ्न निर्माण होणं किंवा जवळच्यांना उपस्थित न राहता येणं किंवा अगदी एखाद्या व्यक्तीनं अपरिचित लोकांमध्येच आपला देह त्यागणं अशा अनेक गोष्टींनी मृत्यूबद्दल एक प्रकारचं गुढत्व माझ्या मनात निर्माण झालं. आणि त्यामुळेच या विषयाबाबतची जिज्ञासा निर्माण झाली. थोडक्यात हे जाणवलं की मृत्यू ही गोष्ट साधी सरळ नाही. मृत्यू ही गोष्टसुद्धा काहीशी चमत्कारिक आहे. आणि मग या जिज्ञासेतूनच ‘पुनर्जन्म’ डॉक्टर वर्तक यांचे पुस्तक मी सुरुवातीला वाचलं. (त्याबद्दलचा सविस्तर लेख मी यापूर्वीच फेसबुकवर लिहिला होता. ) त्यानंतर ‘मृत्यू एक अटळ सत्य’ या सद्गुरूंनी लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बघितला. त्यामध्ये प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत केलेलं उत्तम आणि रसाळ विवेचन ऐकलं.
तसंच नुकतंच ‘मृत्युजिज्ञासा’ हे स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेलं मनशक्तीने प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. या पुस्तकाच्या वाचनातून, विचारातून काही गोष्टी नव्याने कळल्या. काही गोष्टींची पुर्न उजळणी झाली, तर काही गोष्टींबाबत अधिक जिज्ञासा निर्माण झाली. आणि जे जाणवलं ते या लेखात लिहिण्याचा प्रयत्न करते आहे.
जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही आहेच. मुळातच काहीतरी निर्माण होत आहे याचा अर्थ आधी ते विशिष्ट स्वरूपात अस्तित्वात नव्हतं असंच आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे खरं. परंतु आपल्या समाजामध्ये ज्या प्रकारे जन्माचं कौतुक केलं जातं, सोहळा केला जातो, स्वागत केलं जातं त्या प्रकारे मृत्यूचं स्वागत केलं जात नाही. किंबहुना त्याबद्दलचा विचार करणंदेखील आपण निषिद्ध मानतो. पण असं असलं तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे जे आपल्या मानण्या अथवा न मानण्यावर अवलंबून नाही. मग असं असताना आपण त्याचा स्वीकार करून आपला मृत्यू हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसा होईल हे बघणं ही आपली एक वैयक्तिक जबाबदारी आहे असं मला या पुस्तकाच्या वाचनानंतर वाटू लागलं.
पुस्तकात सुरुवातीलाच नचिकेताची गोष्ट येते. यमाकडून मृत्यूचं खरंखुरं स्वरूप जाणून घेण्याची त्याची जिद्द आणि ज्ञानलालसा ही अचंबित करणारी अशीच म्हणावी लागेल. नचिकेतासारख्या तरुण व्यक्तीने ही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता दाखवणं इथेच आपल्या पहिल्या मृत्यूच्या कल्पनेला तडा जातो. कारण मृत्यूचा संबंध आपण वयाशी जोडतो. ठराविक एका काळानंतर वृद्धत्व येणार आणि त्यानंतर मृत्यू येणार हे पारंपारिकरित्या चालत आलेलं गणित आपण गृहीत धरतो. पण मृत्यूचं असं वयानुसार काही गणित नसतं. ते सारं काही कर्मावर आणि व्यक्तीच्या मृत्यू विषयक कल्पनेवर आधारित असतं असं म्हणायला हरकत नाही. कारण या पुस्तकात सांगितल्यानुसार माणूस कधी मरतो तर जेव्हा त्याला मृत्यू हवासा वाटतो तेव्हाच. ‘नातलग कोणाच्या इच्छेने मरतो’ आणि ‘डॉक्टरांच्या मतानेही मृत्यू स्वतःच्या इच्छेने’ या दोन प्रकरणांत याबद्दल सविस्तर उहापोह केलेला आहे. या निष्कर्षातून मृत्यूबद्दलच्या अपरिहार्यतेच्या आणि त्याला शरणागत जाण्याच्या दीनवाण्या भूमिकेला निश्चितच तडा जातो. त्यामुळे माणसं वयानुसार आपल्या वृद्धपकाळातील समस्यांचं तसंच आर्थिकबाबींचे नियोजन करतात तसेच त्यांनी मृत्युचंही करायला हवं. हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी निरनिराळ्या पुस्तकातील निरनिराळ्या लेखांचे, जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींनी काढलेल्या निष्कर्षाचे, संशोधनाचे दाखले दिले गेले आहेत. शिवाय स्वामी विज्ञानानंद यांनी स्वतः अनेक व्यक्तींवर केलेल्या प्रयोगातून काढलेले, निष्कर्ष सोप्या पद्धतीने लहान लहान प्रकरणांमध्ये विभागून सांगितलेले आहेत. यासाठी स्वामी विज्ञानानंद यांनी फाशी दिल्या जाणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला आहे. त्यानंतर मृत आत्म्याशीदेखील संवाद साधलेला आहे आणि मृत्यूच्या क्षणी किंवा मृत्यूबद्दल निर्माण होणाऱ्या भावना जाणून घेऊन त्याचा अभ्यासही केलेला आहे. आत्मा अमर आहे ही सर्वमान्य गोष्ट या पुस्तकात पुन्हा एकदा विज्ञानाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अतिशय छोटेखानी केवळ 70 पानांचे हे पुस्तक आणि त्यातील विषय आपल्याला अतिशय अंतर्मुख करतात. या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश किंवा जमेची बाजू म्हणूया ती म्हणजे यामधील विज्ञाननिष्ठ विचार हे आपल्याला मृत्यूबाबतची आपली असलेली एक वैचारिक चौकट जिला खरंतर पारंपारिक म्हणता येईल ती मोडायला भाग पाडतात.
यामध्ये मृत्यूचे तीन महत्त्वाचे प्रकार दिले आहेत. एक म्हणजे बायोलॉजिकल डेथ, दुसरं म्हणजे क्लिनिकल डेथ आणि तिसरा ज्याला स्वामी विज्ञानानंद सायको डेथ असं संबोधतात. या तीनही प्रकारचे मृत्यू कसे आहेत ते दिले आहे. यापैकी बायलॉजिकल डेथ हा मृत्यूचा प्रकार मनुष्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरती कसा बदलला त्यानंतर कालांतराने क्लीनिकल डेथ याला मागं टाकणारं ज्ञान विकसित झाल्यावर निर्माण होणारा सायको डेथ हा प्रकार म्हणजे नक्की काय. ते सविस्तर उलगडून सांगितलं आहे. आणि यानंतरच मृत्यूच्या तीन तऱ्हादेखील त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. मनाची शरीरापासून फारकत, मनाच्या देहमुक्त अवस्थेचा जन्म, आणि मनाचे (वासनेचे) खरेखुरे मरण मोक्ष या त्या तीन तऱ्हा आहेत.
यानंतर औत्सुक्याचा विषय म्हणजे मरणोत्तर जीवन. वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये चर्चिला जाणारा आणि अनेक समजुती गैरसमजुती प्रचलित असलेला हा विषय. त्यातील काही समजूतींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात केला आहे. त्यातील प्रकरणांची शीर्षके सांगितल्यावर साधारण त्यातील आशय काय असावा याची कल्पना येऊ शकते म्हणून शीर्षक देते आहे. मृत्यू भूत व मृत्यूनंतर सहाय्य, मरणानंतरचे काही विलक्षण प्रयोग, मृत्यूनंतरच्या अवस्था, मृत्यूनंतर भेट प्रयत्न, भूतसृष्टी संपर्क व पुरावे, मृतासाठी यज्ञ श्राद्ध की पूजा?, शांत मरणाचा हक्क असा… अशा मृत्यूबद्दलचं आकर्षण आणि गुढ कायम ठेवणाऱ्या गोष्टींबद्दल यामध्ये चांगली चर्चा झाली आहे.
याशिवाय या पुस्तकातून नवीन मांडलेल्या गोष्टी…
मला सगळ्यात लक्षवेधक वाटलेली गोष्ट म्हणजे ‘मरण पत्रिका !’ सर्वसाधारणपणे व्यक्तीची जन्मपत्रिका असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यावर आपला विश्वास असो अगर नसो पण ही गोष्ट सगळीकडे प्रचलित आहे. परंतु मृत्यू पत्रिका हा प्रकारच अतिशय नवीन आणि अद्भुत असा मला वाटला. व्यक्तीची मृत्यु पत्रिका कशी काढावी? त्यावरून मृत व्यक्तीबद्दलच्या स्थितीचं ज्ञान कसं करून घ्यावं हे सारं काही यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. एका झटक्यात वाचून समजण्याइतकं ते सोपं नाही परंतु असं काही अस्तित्वात आहे याची जाणीव मात्र या लेखामुळे निश्चितच होते. यानंतर काही प्रसिद्ध व्यक्ती भीष्म आणि ख्रिस्त यांच्या मृत्यूबद्दलचा उहापोह केला आहे.
यामध्ये सांगण्यात आलेली आणखीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे यज्ञाचा मरण दुःखाशी संबंध, यज्ञ मरण व गीतेचे आक्षेप, मृताला सामुदायिक सविता शक्ती का? आणि थोडक्यात गायत्री मंत्र त्याचे परिणाम त्याचं सामुदायिक पठण आणि सूर्य पूजा अशा सगळ्या गोष्टी यामध्ये संक्षिप्त स्वरूपात सांगितलेल्या आहेत.
आपल्यासारख्या लोकांसाठी दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या ते म्हणजे मृत्यूनंतरही तुमचे भोग संपत नाहीत. आत्म्याला वासनांच्या रूपात काही भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे मृत्यूनंतरचे भोग कमी होण्यासाठी व्यक्ती जिवंत असतानाच काही सत्कर्म करणे हे नितांत गरजेचे असते. यासाठी त्यागाचे महत्त्व त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांगितलेले आहे. आणि वासनांवरती षडरिपूंवरती विजय किती महत्त्वाचा आहे हे देखील सांगितले आहे. आपले पूर्वज आपल्याला सहाय्य करतात आणि आपल्या भौतिक जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्या शरीरातली आत्मशक्ती ही जिवंत असतानाही बाहेर जाऊन कार्य करू शकते त्यामुळे मृत झाल्यानंतरसुद्धा ती उत्तमरीत्या कार्यरत राहते हे सांगितलं आहे. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आशीर्वादाने आपली भरभराट होऊ शकते हे सांगण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नेहरू यांच्याबाबतचा दाखला दिला आहे. आणि सर्वात शेवटी मृत्यूबद्दल भय बाळगणे हा गुन्हा आहे हे सांगून मृत्यूबद्दलची एक सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला आहे.
याखेरीज या पुस्तकाचं महत्त्व म्हणजे यातील कुठलीही गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीशिवाय मांडलेली नसून काही बाबतीत अजून अधिक प्रयोग होणे आणि अधिकाधिक अचूक निष्कर्ष निघणं हे गरजेचे आहे हे देखील प्रामाणिकपणे नमूद केलेलं आहे. मला जाणवलेली या पुस्तकाची सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे पुस्तकातील विषयांचा आवाका पाहता यातील प्रकरणे फारच अल्पशब्दांत लिहिली गेली आहेत. त्यामुळे उत्सुकता निर्माण होते परंतु अधिक काही वाचायला मिळत नाही याची चुटपुटही लागते.
मात्र मृत्यू विषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी हे पुस्तक पुरेसं आहे आणि महत्त्वाचं ही हे नक्की.
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “देहभान ” – लेखक – श्री निरंजन मेढेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : देहभान
लेखक : निरंजन मेढेकर
पृष्ठ: १६८
मूल्य: २५०₹
बेंगळुरूमध्ये २०२२ मध्ये घडलेली घटना समस्त पालकवर्गाची झोप उडवायला पुरेशी आहे. परवानगी नसतानाही बरीच मुलं सोबत मोबाईल आणतात, याची कुणकुण लागल्यानं तिथल्या काही खासगी शाळांनी आठवी ते दहावीच्या मुलामुलींची दप्तरं अचानक तपासली. त्यांच्या दप्तरांमध्ये मोबाईलसोबतच निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, सिगारेट, व्हाईटनर अशा धक्कादायक गोष्टी सापडल्या. लैंगिकता शिक्षण आणि जबाबदार लैंगिक वर्तनाचे धडे हे किशोरावस्थेपासून देणं किती गरजेचं आहे, हे अशा घटनांमधून ठळक होत आहे. कारण पालकांनी आणि शिक्षकांनी ते दिलं नाही तर इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर ते एका क्लिकवर आज सर्वच वयोगटातील मुलांना उपलब्ध आहे. तरुणाईचा विचार करता सोशल मीडियावरील वाढत्या अवलंबित्वामुळेही त्यांच्याही नकळत स्क्रीनच्या, पॉर्नच्या विळख्यात ते अडकत आहेत.
लैंगिक गुन्हेगारीचा विचार करता सायबर क्राईममध्ये सेक्सटॉर्शन आणि हनीट्रॅपच्या केस झपाट्यानं वाढताहेत. पुण्यात सप्टेंबर २०२२मध्ये काही दिवसांच्या अंतरानं सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकलेल्या दोन तरुणांनी बदनामीच्या भीतीनं आत्महत्या केली. यांपैकी एक तरुण ३० वर्षांचा आयटीआय पासआऊट होता, तर दुसरा अवघा २२ वर्षांचा महाविद्यालयीन युवक होता. पण लैंगिक गुन्ह्यांच्या तसंच विकृतीच्या चक्रात होरपळणाऱ्या मुलांचं आणि मोठ्यांचं प्रमाणही झपाट्यानं वाढत असलं, तरी लैंगिक शिक्षणासाठी अजूनही ठोस म्हणावं असं कुठलंही शैक्षणिक अथवा सामाजिक धोरण नाही, ही समाज म्हणून आपली मोठीच शोकांतिका आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि ओटीटीच्या क्रांतीमुळे मानवी वर्तनात आमूलाग्र असे बदल झालेत, अजूनही होताहेत. यात मनुष्याच्या आदिम भावना आणि गरजांचा विचार करता झोपेवर जसा थेट परिणाम झालाय, तसाच तो कामभावनेवरही झालाय. थोडक्यात काम आणि लैंगिकतेसंदर्भात समाज म्हणून बहुतेक आपण सगळेच जण आज भांबावलेल्या स्थितीत आहोत. माहितीच्या विस्फोटामुळे यातलं नक्की बरोबर काय आणि चूक काय, हा विचार करायलाही कुणाकडे फुरसत नाहीये.
आपल्या समाजात बालपणी लैंगिकता शिक्षणाचा असणारा संपूर्ण अभाव हा कसा मोठेपणी लैंगिक विकृतींना, व्याधींना जन्म देतो ही बाब वेळोवेळी अधोरेखित होते. किशोरावस्थेत हस्तमैथुनाबाबत योग्य शास्त्रीय माहिती न मिळाल्यानं त्याविषयीचा न्यूनगंड तर मुलांच्या मनात वाढतोच, पण त्याचंच पर्यवसान मोठेपणी शीघ्रपतनासारख्या व्याधींमध्ये होऊ शकतं (शीघ्रपतन इतर अनेक कारणांनीही होतं). कारण हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे, ते करण्यात पाप नाहीये आणि म्हणूनच ती घाईघाईत उरकण्याची गोष्ट नाहीये, याचं मार्गदर्शनच लहानपणी कधी मिळत नाही. दुसरीकडे स्त्रियाही हस्तमैथुन करतात, याबद्दल तर कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. खुद्द स्त्रियांनाही आपल्या जननेंद्रियांविषयी, शिश्निकेसारख्या सुखसंवेदना निर्माण करणाऱ्या अवयवाची ओळख नसते. नकळत्या वयापासूनच स्वतःच्या शरीराबद्दल माहिती देताना जननेंद्रियांना केवळ संकोचामुळे वगळलं जातं. किंवा फारफार तर ते ‘गुड टच बॅड टच’पुरतं सीमित केलं जातं. पण ज्या अवयांबद्दल, ज्यांच्या कार्याबद्दल स्वतःलाही पुरेशी ओळख नाहीये, तिथे ध्यानीमनी नसताना तिहाइतानं केलेला स्पर्श हा बॅड टच असूनही सुखावह वाटू शकतो, याची माहिती किती मुलांना आणि मोठ्यांनाही असते ?
मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू…. .
आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते ?
उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं?
विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं?
सुखी संसाराचं गुपित काय?
बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते?
त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं ?
ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय?
हे आणि असे अनेक प्रश्न. . .
सर्व वयोगटाला पडणारे. . . ते कोणाला विचारायचे ?
– – – या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं हे पुस्तक.
या विषयातले वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक, स्वयंसेवी संस्थांमधले कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, संशोधनांचा अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे लैंगिकतेच्या व्यापक विषयाकडे बघण्याच्या संकुचित दृष्टिकोनाचा अडसर दूर करत मोकळेपणानं संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला तुमच्या आप्तांसोबत असा मोकळा संवाद प्रस्थापित करता यावा, ही अपेक्षा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “उलघाल ” – लेखक : प्रा. यशवंत माळी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – उलघाल
लेखक – प्रा. यशवंत माळी
प्रकाशक – साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर
पृष्ठे – १८२,
मूल्य – २५० रु.
गेल्या वर्षी मला एक पुस्तक पोस्टाने ‘सप्रेम भेट’ म्हणून आलं. ‘उलघाल’ हा कथासंग्रह. लेखक प्रा. यशवंत माळी. लेखक म्हणून प्रा. यशवंत माळी यांचं नाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. चकित होण्याचं कारण असं की माळीसर कथा लिहितात, हे मला माहीतच नव्हतं. मी त्यांची एकही कथा वाचली नव्हती, किंवा
कथालेखक म्हणून त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. विचार केला, प्रथम त्यांना फोनवरून पुस्तक मिळाल्याचं कळवावं. नंतर कथा वाचून पुन्हा फोन करावा. प्रा. यशवंत माळी माझे एम. ए. चे सहाध्यायी. आम्ही दोघेही नोकरी करत होतो. त्यामुळे रेग्युलर कॉलेजला जाणे शक्य नव्हते. बहिस्थ म्हणूनच आम्ही एम. ए. केले.
त्यावेळी बहिस्थ विद्यार्थ्यांना सांगलीचे प्रा. व्ही. एन. कुलकर्णी दर रविवारी मार्गदर्शन करत. म्हणजे नोट्स् देत. ते सांगत. आम्ही लिहून घेत असू. त्या नोट्सच्या जिवावर आम्ही बर्यापैकी मार्क मिळवून एम. ए. झालो. माळीसरांशी तशी तोंडओळख होती. नंतर आसपास होणार्या कवीसंमेलनातून, साहित्यसंमेलनातून आम्ही भेटत-बोलत राहिलो, पण त्यावेळी त्यांनी आपल्या कथालेखनाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे ‘उलघाल’ पाहून आश्चर्य वाटलं. अर्थात आनंदही झालाच. मी ‘उलघाल’ चाळलं. अतिशय देखणं पुस्तक. कागद, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ सगळंच छान. मुद्रणदोष फारसे नाहीत. पहिलंच पुस्तक हेवा वाटावा असं. म्हणजे त्यावेळी तरी मला ते त्यांचं पहिलंच पुस्तक आहे, असं वाटलं होतं.
‘उलघाल’ वाचलं. मला कथा अतिशय आवडल्या. यात एकूण १६ कथा आहेत. प्रत्येक कथा विषय –आशयाच्या दृष्टीने वेगळा. पण काही गोष्टी सर्वत्र समान आहेत. त्या म्हणजे आशयानुकूल प्रसंगनिर्मिती, ता प्रसंगातील तपाशीलांचे नानाविध मोहक रंग, त्यातून साकार झालेल्या साजिवंत वाटाव्या, अशा व्यक्ती, व्यक्तिचित्रणाला अनेक ठिकाणी दिलेली प्रतिमा-प्रतिकांची जोड, त्यातील मनोविश्लेषण, अनेक ठिकाणी
सूचकतेने घडणारे जीवन दर्शन, कथेचा परिपोष करणारी सुयोग्य भाषाशैली, अशी अनेक वैशिष्ट्ये यातील कथांमध्ये दिसतात. या कथांबद्दल मलपृष्ठावर, श्रेष्ठ लेखक आणि चिकित्सक कै. वसंत केशव पाटील यांनी लिहिले आहे, ‘ या लेखकाचे ग्रामीण आणि नागर संस्कृतिविषयक आकलन व अन्वय, अधिकतर अव्वल आणि गंभीर प्रकृतीचा आहे. त्यामुळे मानवी जीवनातील आदिम नि अपरिहार्य रीती-रिवाजाचे एक मनोहारी
प्रतिबिंब, सर्वच कथांमध्ये उतरले आहे. हा कथासंग्रह, एक अस्सल कलाकृती म्हणून जाणत्यांना नक्कीच विचारात घ्यावा लागेल. ’
कथासंग्रह वाचला आणि प्रा. यशवंत माळीसरांना तो आवडल्याचा फोन केला. फोनवर बोलताना कळलं, हा काही त्यांचा पहिला कथासंग्रह नव्हे. ‘केकत्यांचा बिंडा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. १९९२साली तो प्रकाशित झाला. त्याच्या 3 आवृत्या निघाल्या आणि त्याला ३ पुरस्कार मिळाले. त्यानंतर’ पोटगी’, ‘किराळ’, ‘परतीचा पाऊस’, ‘उलघाल’ असे कथासंग्रह निघाले. ‘वेगळी वाट’ हा कथासंग्रह फेब्रुवारी२००५ मध्ये
प्रकाशित झालाय. ‘परतीचा पाऊस’ला विविध संस्थांचे ७ पुरस्कार, तर ‘किराळ’ला १६ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांचा ‘सखी’ हा कविता संग्रह, ‘प्रतिज्ञा, आणि मिनीचे लग्न या बाल कादंबर्या आणि ‘माझी शाळा’ हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित आहे. या सार्यांनाच विविध संस्थांचे पुरस्कार आहेत. त्यांच्या एकूण पुरस्कारांची संख्या ९० होते, असं कळलं. म्हणजे माळी सरांनी पुस्तक काढावं आणि त्याला पुरस्कार मिळावा, हे ठरल्यासारखंच झालं जणू. ‘सीनातीर’ ( जामखेड – जी. अहमदनगर ) केवळ त्यांच्याच १० कथांचा २०२१ साली दिवाळी अंक काढला. ‘उलघाल’मधील ‘थायलंडची तुळस’ या कथेचा डॉ. चंद्रकांत
पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला, तर ‘किराळ’ या कथासंग्रहाचा हिंदीमध्ये अनुवाद झालाय. शब्बीरभाई बिलाल शेख यांनी तो केलाय. ‘‘केकत्यांचा बिंडा’ या कथासंग्रहाचा इंग्रजीमध्ये अनुवाद डॉ. संजय बोरूडे करताहेत. त्यांच्या काही निवडक कथांचे उडियातही अनुवाद होत आहेत.
माळी सरांची ही मिळकत ऐकून मी थक्क झाले. वाटलं, आपल्या माहितीचा परीघ किती इवलासा असतो.
‘उलघाल’ ही कथासंग्रहातील पहिलीच कथा. तिची नायिका अबोली. ती बडी माँकडे मोलकरीण आहे. एकदा बडी माँ आणि त्यांचे पती आठ दिवसांच्या टूरवर जातात. घरात तरुण मुलगा आहे. मनजीत. ती कामाला घरी यते, तेव्हा मनजीत व्यायाम करत असतो. त्याचं घामाने निथळणारं पीळदार रूप पाहून अबोलीचं मन तिकडे ओढ घेतं. मग अनेक प्रसंगातून ती त्याला निसटते –पुसटते स्पर्श करते. हे प्रसंग मुळातूनच वाचायला हवेत. मनजीतलाही तिचे आकर्षण वाटते. ती तरुण आहे. सुंदर आहे. नीट-नेटकीही आहे. तो कामाला जायला निघतो, तर त्याला गाडी चालवतानाही तीच पुढे दिसते. पण तो मनाशी निश्चय करतो, ‘तिच्या हरहुन्नरी मनाला कुठेही चुरगळू द्यायचं नाही. त्यावर कलंक लागू द्यायचा नाही. जखम होऊ
द्यायची नाही. मनात कसलीही उलघाल होऊ द्यायची नाही. ’ ओढाळ आणि आतुर मनाची अतिशय मुग्ध अशी कथा आहे ही.
‘न सुटलेले कोडे’ ही माया इनामदारची कथा. माया सुरेख आहे. सतत स्वत:ला आरशात पाहून ती स्वत:वरच खुश असते. इनामदारीचा डामडौल आता त्यांच्या वाड्याप्रमाणेच ढासळलेला आहे. आई आजारी. तिला मायाच्या लग्नाची मुळीच काळजी नाही. पुढे मायाला नोकरी लागते. कामात ती व्यवस्थित, नीट-नेटकी आहे. ती कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. पण तिच्यावर मेहेरनजर आहे, ती तिच्या
बॉसची. कारण ही अविवाहित सुंदरी आहे. तिथे येणारा प्रत्येक नवा बॉस तिच्याशी संबंध ठेवतो. या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार? आई की आपण ? याचं तिला कोडं पडतं. आता ती बरीच प्रौढ झाली आहे. केस मुळापासून पांढरे होऊ लागले आहेत. पण तरुण दिसणं, ही तिची गरज आहे.
‘थायलंडची तुळस’ म्हणजे किमी. नायक थायलंडच्या टूरवर गेला असताना तिथे ती त्यांची गाईड होती. तिला नायकाबद्दल विशेष आत्मीयता वाटते. गप्पा, जवळीक यातून ती त्याच्याशी विशेष सलगी करते. परतताना विमानातळावरून एका वेगळ्या रस्त्याने त्याला बाहेर काढते. टॅक्सीने एका जागी नेते. ती सांगते, तिचा नवरा हिजडा आहे. दोघे एकरूप होतात. ती लगेचच त्याला विमानतळावर आणून सोडते. खाऊचा पुडा म्हणून ती त्याला एक चिठ्ठीवर मेसेज पाठवते. ती म्हणते, ‘तुझ्या भेटीने माझ्या सुखाचा रंग बदलला. मी तृप्त आहे. मी लवकरच आई होईन. त्याचे नाव तुझ्या नावाचा अर्थ असलेले थायी भाषेतले नाव ठेवीन. ’ तिला नायक ‘थायलंडची तुळस’ का म्हणतो, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं.
.. ‘न सुटलेले कोडे’ आणि ‘‘थायलंडची तुळस’ या दोन्ही कथेत शरीरसंबंधाचा केवळ उल्लेख आहे. कुठेही उत्तानता नाही, हे लेखकाचे कौशल्य. वरील तिन्ही कथांचा आशय- विषय वेगळा असला, तरी यात एक अंत:सूत्र आहे, असे मला वाटते.
‘इगत’, ‘रतीब’, ‘शुटिंग’, ‘निवडणूक’ या ग्रामीण बाज असलेल्या कथा, गावरान बोली, संवादातून लोकांचे बेरकीपण व्यक्त होणारे, परिसर, प्रसंग, व्यक्ती आपण वाचत नाही, तर डोळ्यांनी बघतोय, अशी शैली. ‘इगत’ ही कथा तानाजी आणि हणम्या या दोन चुलत भावांची. भाऊ कसले वैरीच. जमिनीवरून वाद, भांडणे, मारामारी. एकदा तानाजी मारामारी केली म्हणून तालुक्याला जाऊन हाणमाविरुद्ध केस करतो. यातू बालबाल बचावण्यासाठी हाणमा कोणती ‘इगत’ साधतो, ते प्रत्यक्ष कथेतच वाचायला हवे.
तात्यानानांच्या मळ्यात ‘शुटिंग’ होणार, अशी बातमी पंचक्रोशीत पसरते. शुटिंग बघायला अख्खं गाव लोटतं. दिवसभर वाट पाहूनही तिथे कोणी येत नाही. मग कळतं, ती अफवा होती. लोक परततात. परतताना लोक तात्यानानांच्या मळ्याचा विध्वंस कसा करतात हे लेखकाने अगदी बारकाईने, तपशीलवार दिले आहे. ही अफवा कुणी आणि का उठवली, हे कथेतच वाचायला हवं.
प्रवास, सावली, दिशाहीन, पेन्शन, सत्कार, स्थलांतर, मी पुढे पुढे कथा वाचत जाते. प्रत्येक कथा वाचून झाली, की वाटतं, याचा समावेश परिचयात करायला हवा…. करायलाच हवा…. पण किती आणि काय
काय लिहिणार?
`व्यक्तिचित्रणाचा एक नमूना म्हणून बडी माँच्या बोलण्याबद्दल ( उलघाल ) त्यांनी काय लिहिले आहे, ते बघा. ‘चावी फिरवल्याबरोबर नळातून पाणी यायच्या आधी भसा-भसा वावटळासारखी हवा यावी, आणि पाण्याच्या फवार्याबरोबर नुसताच आवाज यावा, तसं बडीमाँचं बोलणं. काही कारण असू द्या की नसू द्या, त्यांचं तोंड अखंड चालू असायचं. कुणाशीही त्या रोखून बघतच बोलायच्या. बोलताना दारातल्या पायपुसण्याला खेटरं टराटरा पुसावीत, तसं डाव्या हाताच्या वाढलेल्या नखांनी साडीवरूनच डावी मांडी खरा-खरा खाजवणं मनमुराद सुरू असायचं. ’
‘न सुटलेलं कोडं’ मधील मायाच्या आजारी आईबद्दल त्यांनी लिहिलय, ‘आयुष्याच्या महावस्त्रात नकोसं
—- प्रा. माळी यांच्या व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या बाह्य रूपदर्शनाबरोबरच त्याच्या मनातील विचारही त्यांनी बारकाव्याने, तपशीलाने दिले आहेत. सर्वच कथांमधील पात्रात असे बारकाव्याने केलेले मनोविश्लेषण दिसत असले, तरी, ‘इच्छामरण’, ‘दिशाहीन’, ‘पेन्शन’, ‘प्रवास’, ‘निवडणूक’, ‘सत्कार’, ‘निर्णय’ या कथांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल.
रचना स्वामी या ‘समकालीन कथांमधील मनोविश्लेषणाचा’ प्रबंधासाठी अभ्यास करताहेत. त्यात समकालीन कथांच्या तूलनेत, प्रा. यशवंत माळी यांच्या कथेतील मनोविश्लेषणाचा प्राधान्याने अभ्यास करत आहेत.
प्रा. यशवंत माळी यांच्या कथा अधिकाधिक कसदार आणि लौकिकसंपन्न होतील याची ग्वाही ‘उलघाल’ हा कथासंग्रह निश्चितपणे देतो.
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मृत्यू… एक अटळ सत्य” – लेखक – सद्गुरु ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : मृत्यू.. एक अटळ सत्य
लेखक : सद्गुरू
पृष्ठ: ३९१
मूल्य: ३९९₹
मृत्यू किंवा मृत्यूबद्दलचा उल्लेखही अनेक समाजांमध्ये निषिद्ध मानला जातो. पण आपला हा दृष्टिकोन पूर्णपणे चूक असला तर? मृत्यूकडे एक आपत्ती म्हणून नाही, तर जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू, ज्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीच्या अनेक शक्यता दडल्या आहेत, अशा प्रकारे पाहता येईल का? अगदी पहिल्यांदाच कोणीतरी हे सांगत आहे.
या अगदी विलक्षण पुस्तकातून, सद्गुरू त्यांच्या आंतरिक अनुभवाच्या प्रगाढ सामर्थ्यातून, मृत्यूबद्दल क्वचितच बोलले जातील, अशा काही पैलूंचा उलगडा करतात. एखाद्याने त्याच्या मृत्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी, मृत्युशय्येवर असणाऱ्या कोणासाठी आपण काय करू शकतो आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी कशी मदत होऊ शकते, या सर्व गोष्टींबद्दल एका अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगतात.
सर्वांनी जरूर वाचावेच असे आहे हे पुस्तक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जर – तर ‘ च्या गोष्टी (भाग १ आणि २)” – लेखक – डॉ. बाळ फोंडके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ‘जर – तर‘ च्या गोष्टी (भाग १ आणि २)
लेखक: डॉ. बाळ फोंडके
पृष्ठे: ३३८ दोन्ही मिळून
५००₹
आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आपण त्या अनुभवतो, त्यांचा आस्वादही घेतो. पण त्यांच्याविषयी का, कसं वगैरे प्रश्न मनातही उभे करत नाही. पण अचानक तशी परिस्थितीही उद्भवते आणि आपण भांबावून जातो. मात्र त्याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यानंतर आलेल्या विपरीत परिस्थितीवर काय उपाययोजना करायची याचं थंड माथ्यानं विश्लेषण करून त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असू शकतो. त्या पायीच मग जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं मिळवण्याची निकड भासू लागते.
जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक
कोरोनानं धुमाकूळ घातला नसता तर, ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, घरपोच सामान मागवणं, अशा पर्यायांचा विचारही आपण केला असता का? पण हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं. तोपर्यंत कशाला थांबायचं? एरवीही जर कोरोनाचं संकट उभं राहणार नसेल तर? त्याला प्रतिबंध करणारी लस तयार झाली नसेल तर? प्रत्यक्ष एखादी घटना समोर येण्यापूर्वीच भविष्यवेधी अशा ‘जर-तर’च्या प्रश्नांचा विचार केला तर ज्यांची स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे अनेक पर्यायी उपाय दिसू लागतात. त्यांचा पाठपुरावा करत नवनिर्मितीला चालना मिळते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “व्योम व्यथांचे व्यापक” – (कवितासंग्रह) – कवी : श्री शरद कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : व्योम व्यथांचे व्यापक (कविता संग्रह)
कवी : शरद कुलकर्णी. मिरज
9673737044
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर.
7588586676
मूल्य : रु. 200/_
सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे “ व्योम व्यथांचे व्यापक – — जगण्याच्या स्पर्धेत धावाधाव करताना आपल्याला स्वतःकडे पहायलाही वेळ असत नाही. अशा धकाधकीच्या जीवनात अंतर्मुख होऊन, स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहून, कविमनाच्या रसिकतेला धक्का न लावता, मनातील विचारघनांतून शब्दांचा शिडकावा करत व्यथांचे व्यापक असे व्योमही सुसह्य करणा-या कविता सादर करुन कवी श्री. शरद कुलकर्णी यांनी आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडेच त्यांचा ‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या कविता पुस्तक रुपाने वाचकांसमोर आणून त्यांनी आपले मनच उघडे केले आहे. सुखदुःखाबरोबरच प्रेम, निसर्ग, आत्मचिंतन करणा-या कविता त्यांनी आपल्यासमोर आणल्या आहेत. आत्मसंवाद आणि आत्मानुभवाच्या या कविता वाचकालाही विचार करायला लावणा-या आहेत.
कलावंताला व्यक्त होण्यासाठी त्याच्या कलेचे माध्यम उपयुक्त ठरते. याठिकाणी कविने आपली कविता हेच माध्यम वापरुन आपल्या मनाचे पदर उलगडले आहेत. बहुना कवितेने कविला ‘आत्मज्ञाना’चा मार्ग दाखवला आहे असे वाटते. आयुष्यात आपल्याला नेमकं काय हवं आहे याचं ज्ञान आपल्याला व्हावं एवढच कवीचं मागणं आहे. म्हणून कवी म्हणतो,
“भूक समजावी माझी
आणि कळावी तहान
नाही आणिक मागणे
व्हावे इतुकेची ज्ञान “
…. कवितेनेही कवीचे मागणे मान्य केले आहे याचे प्रत्यंतर पुढच्या अनेक कविता वाचताना येतो.
जीवनातील सत्य काव्यात्म पद्धतीने समजावताना कवी म्हणतो,
“झाडांचे वैभव सरता
पाखरे उडून जाती
जखडून जायबंदी मी
शोधतो नव्याने नाती “
वैभव सरत असतानाही नवी नाती शोधण्याची कवीची वृत्ती जीवनावरील प्रेमाचे द्योतक आहे. त्याच वेळेला अंतीम क्षणाची जाणीव व्यक्त करताना कवी आपल्या आयुष्याकडे किती तटस्थपणे पाहू शकतो हे अनुभवायला मिळते. कवी लिहीतो आहे,
“नाही आक्रोश आकांत
नाही अश्रूंचे प्रपात
नेणिवेच्या पलीकडे
सारे अवकाश शांत “
कदाचित या तटस्थपणामुळेच कवी म्हणून शकतो की,
” सांभाळीत सर्व किनारे
मी व्रतस्थ कालसरिता
दैनंदिनीत जरी बंदिस्त
बंधमुक्त मी कविता “
अध्यात्माशी जवळीक साधल्यामुळेच अशी तटस्थ वृत्ती त्यांच्या अन्य कवितांमधूनही दिसून येते.
” कधी कधी चष्मा काढून
थोडेफार डोळेही पुसावे
तुका म्हणे उगी राहावे
एवढे तरी अध्यात्म जमावे “
किंवा
” आता प्रयोजन जगण्याचे,
आयुष्यालाच विचारावे
प्रत्येक ऋतू समजून घेत,
समजूतदार व्हावे “
या काव्यपंक्ती हेच दर्शवतात. या वृत्तीमुळेच कवी सहजपणे म्हणू शकतो,
” साफल्य, वैफल्य
दोन्हीही सापेक्ष
निरपेक्ष मन
असो द्यावे. “
तर कधी त्याला वाटते – –
” देह मानवाचा जरी व्यथा ईश्वरी भोगाव्या
डोळे संतांचे असावे, ठेवा दुःखाचा जपावा “
पण असे असले तरी कविलाही सामान्य माणसाप्रमाणे सुखदुःखे भोगावी लागतातच. मुळे त्यातून येणारे अनुभव कवितेतून शब्दबद्ध होत जातात. व्यावहारिक जगात पदोपदी येणारा खोटेपणाचा अनुभव मन उद्विग्न करुन टाकणारा असतो. त्यामुळे हे सगळं जगच खोटेपणाने भरुन राहिले आहे की काय अशी मनाची भावना होऊ लागते. सत्याचा क्वचित प्रसंगी येणारा अनुभवही असत्य वाटू लागतो. मनाला वाटते,
“स्वप्न खोटे, वास्तव खोटे
ऐहिकाचे ज्ञान खोटे
जिंकणारे वचनात अंतिम
सत्यही झूट खोटे “
पण याला पर्याय नाही हे जाणून घेऊन, जनरीतीचा आधार मदतीला घेऊन,
” तरी टेकविला माथा
केली तडजोड
सर्वत्र बिघाड
मान्य केला “
का ? तर दुसरे मन हेही बजावत असते की चुकली तरी ही माणसं आपलीच आहेत. सोसलं पाहिजे. हे भिन्न प्रवाह आपणच जोडले पाहिजेत. आपणच व्हावं,
” कधी सुजाण संयमी
कधी पूल समजूत
दोन विभिन्न मतांचा
पूल एक शांतिदूत “
…… पण ही शिकवण तरी कुठून मिळते ? डोळे उघडे ठेवून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर सहज समजते की निसर्गच आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवत असतो.
“कधी असावे तटस्थ
कधी राहून व्रतस्थ
अध्यात्म जगावे
तरुवत “
किंवा
” कधी चिमणी होऊन
घर मेणाचे बांधावे
क्षेमकुशल ठेवावे
अबाधित “
मग निसर्गही आपला वाटू लागतो. जवळचा वाटू लागतो. आपल्या मनाच्या विविध अवस्था या निसर्गाशी निगडीत आहेत असे वाटू लागते. एक पाऊसच मनाला चिंब करुन टाकत असतो आणि त्याची विविध रुपे ही जणू मनाचीच विविध रुपं असतात. कवी या पावसाशी इतका एकरुप होतो की शेवटी त्याला जाणवते की,
“पाऊस थेंब थेंबांचा पाऊस एक सरिता
निःशब्द करुन ठरली नीरव शांत कविता “
निसर्गाशी एकरूप झाल्यामुळेच कविच्या प्रेमकाव्यातही निसर्ग भरुन राहिलेला दिसतो. ‘ती’ कधी श्रावणाची बरसात होते तर कधी तिच्यात कधी तरुचा धुंद बहर दिसू लागतो. कधी ती गंधयुक्त शीतल झुळूक असते तर कधी शांत सरिता बनते. कधी ती आठवणींचा सैलाब बनते. तर कधी सुखाची सावली होऊन रिझवत असते.
या सर्व कवितांच्या अर्थ व्यापकपणे समजून घेण्यासाठी संपूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. पण याशिवाय अन्य काही कवितांचा उल्लेख करणे उचित ठरेल.
‘यार होतो मी नवा ‘ ही कविता खूप वेगळी वाटते. कारण या कवितेत कविने मराठी, हिंदी आणि उर्दू शब्दांच्या चपखलपणे केलेल्या वापरामुळे शेरोशायरी गझल आठवल्याशिवाय रहात नाही. ‘नुसतंच’ या कवितेतून कवितेच्या निर्मिती अवस्थेत कविच्या मनाची होणारी अवस्था व्यक्त झाली आहे. पावसाची विविध रुपे विविध अर्थांनी व्यक्त करणारी कविता म्हणजे ‘ आर्त पाऊस ‘
तर ‘ यश ‘ ही कविता एक उत्तम उपहासात्मक प्रेमकाव्य म्हणावे लागेल. ‘ प्रश्न ‘ हे गझलसदृश काव्य त्यातील शेरांमुळे उठावदार झाले आहे. ‘ महाकवी मी बाजारी ‘ या कवितेतून कविने काळाबरोबर होणारी फरफट योग्य शब्दात व्यक्त केली आहे. तर ‘ प्रारब्ध ‘ या कवितेतून कविने जणूकाही अपयशाची प्रामाणिक कबुलीच दिली आहे. परिस्थितीला सामोरे जाताना जी भूमिका घ्यावी लागते, मग ती आपल्याला पटो न पटो, त्याचे चित्रण ‘ लिपीत मौनाच्या ‘ या अतिशय छोट्या कवितेत केलेले दिसते.
कविचे मागणे तरी काय आहे ? ‘ येवो मरण कधीही ‘ या कवितेत कवी म्हणतो कवितेशी, शब्दांशी इमान राहो, बाकी मरणाची फिकीर नाहीच. केव्हाही येवो. आणि त्या पश्चात ओळख राहणार असेल तर कवी म्हणून ओळख रहावी. अशी ही प्राणप्रिय कविता कशी अंकुरते याचे रहस्य ‘ आतल्याआत ‘ या कवितेत कविने उलगडले आहे. ‘आतून ‘ आल्याशिवाय कविता अंकुरत नाही हे सांगताना कविने दिलेले दाखले कविमनालाच समजू शकतात.
‘ चिमणी ‘ ही आणखी एक, चिमणीसारखी छोटी कविता, पण खूप मोठा आशय घेऊन आलेली. थोड्याश्या यशाने हुरळून जाणे, भ्रमात जगणे व्यर्थ आहे हे शिकवणारी ही चिमणी. संध्याकाळ नेमकी कशी असते हे चित्रमय शब्दात रंगवणारी कविता म्हणजे ‘ संध्याकाळी ‘. कातरवेळेचे नेमके चित्र डोळ्यासमोर उभे रहावे अशी कविता ! तर भूतकाळात रमणारी ‘ भातुकली ‘ ही कविता, आठवणींचे बोट धरुन हरवलेल्या गावात जाणारी.
अशा किती कविता सांगू ? कवीची काही दैवते आहेत. त्यांच्यावरही कविने काव्य केले आहे. मी दुःखाचा कवी असे म्हणणारे कवी ग्रेस, स्वरांचे चांदणे पसरणा-या किशोरी अमोणकर , स्वतःच्या हस्तस्पर्शाने वाद्यांतून मनमोहक स्वर उमटवणारे संगीतकार मदन मोहन
आणि चंदेरी सूरांच्या तलम वस्त्राने मनाला वेढून टाकणारे तलत मेहमूद यांच्याविषयी प्रेम, आदर आणि त्यांच्यातील दिव्यत्वाचे दर्शन घडवणा-या कविता अत्यंत मोजक्या शब्दात त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून टाकतात.
‘व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शीर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश तर कधी घुसमटलेले, मेघांचे मायावी रंग, निसर्गातील प्रतीके हे सारे समवेत असले तरी हे विसरता येत नाही की व्यथाही व्यापक आहेत. अवघे आकाश व्यथांनी व्यापून टाकले आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही. अवघ्या आयुष्याकडे पहायचे म्हणजे सुख-दुःखाचा ताळेबंद मांडायचा. आणि असा हिशेब मांडतानाही
कविला, ” अव्यक्ताला व्यक्त करत, कवितेच्या वाटेवरुन नियोजित ठिकाणी पोहोचायचं आहे. ” हा प्रवास कविनेच म्हटल्याप्रमाणे शब्दांशी इमान राखून आणि आपली काव्यमुद्रा उमटवून पूर्ण करायचा आहे.
‘पथ्य ‘ सांभाळून चालू असलेल्या या ‘उपचारांना’ नक्कीच यश येईल व अशीच सशक्त कविता कवीच्या लेखणीतून पाझरत राहील याविषयी शंकाच नाही.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈