मराठी साहित्य – विविधा ☆ चला कपाट आवरु या ! ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ चला कपाट आवरु या ! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

वर्षातील ५२ रविवार पैकी कुठल्याही  एका रविवारी हे वरील वाक्य एखाद्या घरात म्हणले गेले नसेल असे मला तरी वाटत नाही. रविवार अशा साठी की जरा निवांत, सुट्टीचा दिवस म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी मिळून कपाट आवरणे हा एक छान कौटुंबिक सोहळा आहे असे माझे स्पष्ट म्हणणे.

म्हणजे बघा अश्विनी ते रेवती अशी २७ नक्षत्र आहेत. पूर्वी ‘अभिजीत ‘ नावाचे पण नक्षत्र मोजत पण आता हे नक्षत्र धरत नाहीत. नक्षत्र पुस्तकात प्रत्येक नक्षत्राची माहिती देताना या नक्षत्रावर एखादी गोष्ट हरवली तर ती मिळण्याचे ठोकताळे दिलेले आहेत. अभिजित नक्षत्रावर ही माहिती अर्थातच नाही. पण पूर्वी समजा या नक्षत्राची कुठे माहिती दिली असेल त्यात या नक्षत्रावर करायच्या कामात

‘कपाट आवरणे ‘ हे नक्की असावे असे माझे मन सांगतय.

अश्विनी ते रेवती नक्षत्रावर केंव्हाही तुमची गोष्ट हरवली असेल आणि तेंव्हा अगदी याच कपाटात, इथल्या ड्राँवर मधे, कप्प्यांमधे कितीही वेळेला तुम्ही शोधली असली तरी आजच्या ‘चला कपाट आवरु या ‘ अभिजात मुहूर्तावर मात्र ही मिळण्याची खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच शक्यता असते.

मंडळी, मोकळं केलंत सगळं कपाट,  अवती भोवती मस्त पसारा जमलाय ना?  

तर अधून मधून असं कपाट आवरणं हे  जरी शास्त्र असले तरी

मागच्या वर्षी कपाट आवरताना नाही हे राहू दे, टाकू या नको  म्हणून ठेवलेल्या गोष्टी या वर्षी कपाट आवरताना कच-याच्या ढिगात टाकणे ही एक मोठी कला आहे

कपाट आवरताना हातात आलेले मित्राने दिलेले वाढदिवसाचे ग्रिटींग बघून, छान स्माईल करुन परत त्याच जागी ठेवणे हा ” मैत्री धर्म ”  आहे.

लहानपणीची ‘फोटो गँलरी’ आपलं

‘ फोटो अल्बम’ हातात आल्यावर चहाचा कप बाजूला ठेऊन शेवट पर्यतचे फोटो बघणे आणि कपाट आवरण्याच्या कार्यक्रमाला थोडा ब्रेक घेणे  ही “नैतिक जबाबदारी” आहे.

गधडे/ गधड्या  आँन लाईन क्लासला  मिळत नव्हती ना  ही वही  ? कपाटात नीट बघ म्हणलेलं, शोधली नीट?  नाही,  आत्ता कशी मग आली?  नीट बघायचंच नाही,  हे माय लेकींचे / माय लेकांचे ( बर का मित्रों, आपण अशावेळी परत एकदा फोटो अल्बम बघायला काढायचा) संवाद हे “आवश्यक कर्तव्य ” आहे.

ती वही  उघडताच आत मधे  मिळालेली १०० रुपयाची नोट घेऊन आईला देऊन संध्याकाळी भेळ/ पाणीपुरी/  शेव पुरी  ( छे असल्या गोष्टी संकष्टीलाच आठवतात नेमक्या)  रुपी ‘अर्थपूर्ण सेटलमेंट’ आहे.

मागच्या वर्षी आवश्यक वाटणारी गोष्ट पण  यावर्षी अचानक   अनावश्यक कच-यात  टाकून कपाट मस्त आवरलयं आता.  एकदिवस संगणक, मोबाईल रुपी कपाटातील पण कचरा साफ करायचा आहे असाच. विनाकारण सेव्ह केलेल्या फाईल, फोटो,  अँप सगळं साफ करायचं आहे

बघू सवड मिळाली तर याच पद्धतीने मनातील कपाटातील ही काही  अनावश्यक कप्पे,  विनाकारण सेव्ह केलेले विचार, पूर्वग्रह वेगैरे साफ करता आले तर!

प्रयत्न करायला काय हरकत आहे

( प्रयत्नवादी ) अमोल ?

वैशाख. कृष्ण ३

२९/५/२१

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किती तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात. आता इथून पुढे…..)

मेघदूत आणि त्रिवेणी

शांताबाईंच्या कवितांचा विचार त्यांच्या काव्यानुवादाच्या विचारांशीवाय अपुरा राहील. त्यांनी कालिदासाच्या ‘मेघदूता’चा आणि गुलजार यांच्या ‘त्रिवेणी’चा सुंदर अनुवाद केला आहे. अनुवाद करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातून काव्यानुवाद अधीकच दुरापस्त. केवळ आशयच नव्हे, भावाच्या सूक्ष्म छटा, त्याच्या रूपरंगपोतासहित दुसर्‍या भाषेत आणणं अवघड असतं. त्या भाषेच्या संस्कृतीशी ते समरसून जावं लागतं. शांताबाईंना हे छान जमून गेलय, याची प्रचीती मेघदूत आणि त्रिवेणी वाचताना येते.

मेघदूत

‘मेघदूत’ या खंडकाव्याची अनेकांप्रमाणे शांताबाईंना मोहिनी पडली. अनेकांनी ‘मेघदूता’चा मराठीत अनुवाद केलाय. अनेकांनी त्यावर गद्यातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या सार्‍याचं वाचन, आपण अनावर ओढीनं केलं असं शांताबाई सांगतात. तरीही ‘मेघदूता’चा अनुवाद त्यांना करून बघावासा वाटला. या अनुवाद पुस्तकाच्या प्रारंभी त्या म्हणतात, ‘अनुवाद करून बघणे, हा माझा आनंद व छंद आहे. अनुवाद करून बघणे, हा मूळ कलाकृतीचा अधीक उत्कटतेने रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे.’ अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलीय. वेगळं काही करायचं म्हणून नव्हे, कलाकृती अधिक समजून घेण्यासाठी त्यांनी हा अनुवाद केलाय. त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे अतिशय ललित, मधुर असा हा अनुवाद, वाचकाच्या मनात मूळ संस्कृत काव्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण करणारा आहे. ही उत्सुकता निर्माण झाल्यावर, वाचकाला मूळ काव्यासाठी शोधाशोध करायला नको. अनुवादाच्या वर मूळ श्लोक दिलेलाच आहे.

त्रिवेणी

गुलजार हे हिंदीतील प्रतिभावंत लेखक, कवी. त्यांनी ‘त्रिवेणी’ हा कवितेचा एक नवीन रचनाबंध निर्माण केला. यात पहिल्या दोन पंक्तींचा गंगा-यमुनाप्रमाणे संगम होतो. आणि एक संपूर्ण कविता तयार होते पण या दोन प्रवाहाखालून आणखी एक नदी वाहते आहे. तिचे नाव सरस्वती. तिसर्‍या काव्यपंक्तीतून ही सरस्वती प्रगट होते. पहिल्या दोन काव्यपंक्तीतच ती कुठे तरी लपली आहे. अंतर्भूत आहे. शांताबाईंनी या ‘त्रिवेणी’चा अतिशय अर्थवाही, यथातथ्य भाव प्रगट करणारा नेमका अनुवाद केलाय. जीवनाचे, वास्तवाचे, यथार्थ दर्शन, चिंतन त्यातून प्रगट होते. त्यांची एक रचना जीवनावर कसे भाष्य करते पहा.

‘कसला विचित्र कपडा दिलाय मला शिवायला

एकीकडून खेचून घ्यावा, तर दुसरीकडून सुटून जातो

उसवण्या-शिवण्यातच सारं आयुष्य निघून गेले’

किंवा   

‘चला ना बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही

या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात.

हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते.’

प्रियकर – प्रेयसीची नजारनजर त्यांचे एकटक बघणे आणि त्याच वेळी लोकं बघातील म्हणून तिला वाटणारा चोरटेपणा किती मनोज्ञपणे खाली व्यक्त झालाय.

‘डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकात

मोठ्या आवाजात बोलू नका ना माझ्याशी

लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित’

अशीच आणखी एक कविता-

‘सांजेला जळणारी मेणबत्ती बघत होती वाट

अजून कसा कुणी पतंग आला नाही

असेल कुणी सवत माझी जवळच कुठे जळत’

या अशा कविता. त्यांच्यावर वेगळं भाष्य नकोच. वाचायच्या अन मनोमनी उमजून घ्यायच्या. जीवन-मृत्यूच्या संदर्भातले एक प्रगल्भ चिंतन पहा.

‘मोजून – मापून कालगणना होते वाळूच्या घड्याळात

एक बाजू रीती होते, तेव्हा घड्याळ पुन्हा उलटे करतात.

हे आयुष्य संपेल तेव्हा तो नाही असाच मला उलटे करणार?’

खरोखर शांताबाईंचा अनुवाद हा केवळ अनुवाद नसतोच. अनुसृजन असते ते!

गुलजारांनी ‘त्रिवेणी’ शांताबाईंना समर्पित करताना लिहिलय –   

‘आप सरस्वती की तरह ही मिली

और सरस्वती की तरह गुम हो गई

ये ‘त्रिवेणी’

आप ही को अर्पित कर रहा हूँ।’

एका विख्यात, प्रतिभावंत कवीने शांताबाईंना ‘सरस्वती’ची उपमा दिली, ती काही केवळ सरिता- काव्यसरिता या मर्यादित अर्थाने नव्हे! नाहीच! सरस्वती विद्या कला यांची अधिष्ठात्री देवता. या सरस्वतीने आपला अंश शांताबाईंच्या जाणिवेत परावर्तित केलाय, असं वाटावं, इतकी प्रसन्न, प्रतिभासंपन्न कविता शांताबाईंची आहे. रसिक वाचकाला तिचा लळा लागतो. स्निग्ध जिव्हाळा जाणवतो.

समाप्त

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून कसा उत्कटतेने प्रगट झालाय……  आता इथून पुढे …..)

परतुनि या हो माझ्या जिवा

शांताबाईंची गीते ही त्यांच्याच कवितांचे लोभसवाणे रूप आहे. शब्दातून प्रकट होणार्‍या अनुभूतीला इथे सुरांची साथ मिळते. अनेकदा आधी तयार केलेल्या सुरावटीवर त्यांनी शब्द बांधले आहेत. पण तालासुराच्या चौकटीत त्यांनी शब्द कोंबले आहेत, ते फरफटले आहेत, विकृत झाले आहेत, असं कुठेच झालं नाही. स्वर आणि शब्द तिथे एकरूप होऊन येतात. स्वरनिरपेक्ष ती रचना जरी वाचली, तरी चांगली कविता वाचल्याचा आनंद ती देते. ‘तोच चंद्रमा’ नभात या गीतात, ‘त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा’ यातून व्यक्त झालेले वास्तव… नित्याचे झाले की ती उत्कटता लोपते, हा नेहमीचा अनुभव किती उंचीवर नेलाय कवयित्रीने. ‘हे श्यामसुंदर’ मध्ये राजासा, मनमोहना, करत त्याची केलेली विनवणी, पावरीचा सूर ऐकताच स्वत:चे हरवलेपण.. खरं तर ते आतून हवेच आहे, पण

‘पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका थरथरे बावरे मन, संगती सखी नच कुणी‘

यातून व्यक्त झालेले भय… ही द्विधावस्था या गीतात कशी नेमकेपणाने प्रकट झालीय.

‘गहन जाहल्या सांजसावल्या पाऊस ओली हवा माझ्यासांगे सौधावरती एकच जळतो दिवा. आज अचानक आठवणींचा दाटून आला थवा परतुनि या हो माझ्या जिवा’ या हळुवार लोभासतेने शांताबाईंच्या लावण्या लावण्यामयी झाल्या आहेत.

उत्कृष्ट लावण्प्रमाणेच शांताबाईंनी वेधक द्वंद्वगीते आणि अनुपम भावगीतेही लिहिली आहेत. आपल्याला आवडलेल्या हिंदी, गुजराती, बंगाली गीतांच्या चालीवर आराठीत गीतरचना करण्याचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. वृत्तबद्ध आणि छंदोबद्धकाव्याचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले आहेत. त्यातूनच त्यांची गीतरचना सहज आणि सफाईदार झाली आहे.  ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या आपल्या गीतसंकलनाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, ‘कविता आणि गीत‘ या दोहोंमागच्या प्रेरणा भिन्न असतात. तशीच त्यांची कलात्मक मागणीही भिन्न प्रकारची असते. गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवामुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असते. उलट, सोपेपणा, सहजता, नाट्यमयता, चित्रदर्शित्व, ऐकताक्षणी मनात उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते.’ शांताबाई यशस्वी गीतकार आहेतच, पण त्यापुढे जाऊन, त्यांनी आपल्या गीतांना स्वत:चे असे खास परिमाण दिले आहे. त्या म्हणतात, ‘चांगले गीत ही चांगली कविताही असते.’ शांताबाईंच्या गीतांबद्दल हे खात्रीपूर्वक म्हणता येईल. त्यांच्या मते गीत हे कवितेप्रमाणे स्वतंत्र आणि आपले अंगभूत चैतन्य घेऊन प्रगटते. त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किते तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,  ‘तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’  शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं. आता इथून पुढे…..)

‘हे सख्या निसर्गा!’

सहजता, पारदर्शकता, आत्मरतता या बरोबरच चित्रमयता हेही शांताबाईंच्या काव्याचं महत्वाचं वैशिष्ट्य. निसर्गाशी त्यांचं निकटचं नातं अनेक काव्यातून, गीतातून लक्षात येतं. निसर्गाच्या विविध विभ्रमांचं, रंगरूपाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी आपल्या कवितांधून केलय. मात्र बालकवींप्रमाणे निव्वळ, निखळ निसर्ग वर्णन त्या करत नाहीत. त्यांच्या निसर्गवर्णनाला त्यांच्या भावनेचं अस्तर असतं. त्यांच्या निसर्गवर्णनात त्यांच्या प्रीतीचे, आसक्तीचे, विरह –वेदनेचे, भक्ती-विरक्तीचे, एकाकीपणाचे जरतारी रेशीम धागे विणलेले दिसतात. ‘मूक सांत्वन’ मध्ये त्या म्हणतात, ‘हे सख्या निसर्गा! कोण तुझ्यावाचून आमची अनामिक दु:खे घे जाणून’ काळ्या राती अवसेला भयभीत झाली असताना ‘पिंपळ’ तिला धीर देतो. निसर्गातील अनेक घटक त्या ‘पिंपाळा’सारखे शांताबाईंच्या कवितेत दृश्यमान होतात. ‘आला ग वसंत’ किंवा ‘ऋतु हिरवा…. ऋतु बरवा’ या गीतातील निसर्गाचे वर्णन किती सुखद आहे. ‘दरवळत डोलू लागतात’, या कवितेतील निसर्गवर्णन कसं प्रत्यक्षदर्शी आहे पहा,

‘माळरानावरून सरकत येणार्‍या ढगांच्या सावल्या

क्षितिजाआड फिकट गुलाबी संधीप्रकाश

गवतात मलूल उन्हाची संथ फिरणारी बोटे

ओल्या गार हवेत घननीळ भास-आभास’

आपले एकाकीपण त्यांनी, ‘मावळतीला’, ‘दु:खाचे हिमकण’ अशा किती तरी कवितातून सांगितलय. ‘लोट’मध्ये गवसलेलं श्रेय हरपल्याचं वर्णन, ‘क्षणभर मिटल्या मुठीत, फिरूनी उडून गेला रावा’ या शब्दातून अतिशय हृद्यपणे केले आहे.

‘प्रकाशतार्‍यांचे संदिग्ध संदर्भ’मध्ये त्या म्हणतात,

‘अशी मी सदाची, भरतीची परतीची

काही आभाळाची, बरीचशी धरतीची

सांजेचा घनदाट प्रत्यय असा’

निसर्ग शांताबाईंच्या भावस्थितीशी असा एकरूप होऊन येतो. त्यांना जीवनातील सौंदर्याची, आनंद मिळवण्याची असोशी आहे. वृत्ती भावुक, स्वप्नाळू आहे. पण स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टी यात अंतर पडत जातं. मग मनावर औदासिन्याचं, नैराश्याचं सावट पसरतं. ‘दु:खाचे हिमकण’, ‘शेवट’, ‘रंग मातीचा आभाळाला’, ‘दिवस गतीने फिकाच पडतो’ आशा किती तरी कविता उदासीनतेची गडद छाया चित्रित करतात. याची परमावधी तमात, काळोखात होते. संध्याकाळ वेढीत जाणारा काळोख आणि या काळोखात अनुभवावं लागणारं एकटेपण, यांचे उल्लेख शांताबाईंच्या कवितेत जागोजागी येतात. ‘प्रदीर्घ’मध्ये त्या लिहितात, ‘घेरीत येतो काळा करडा संदिग्ध काळोख आणि गिळतो पायापुढला उजेड पसाभार’. ‘काळोख’ कवितेत त्या म्हणतात, तो सारे भेद, रंगरूपाचे वेगळेपण मिटवून टाकतो. तो आत्मलीन आणि आपले गाणे गाणारा असतो.

सूर्य, अरण्य, वाळवंट, आभाळ, पाणी, वारा, जमीन, पूर या प्रतिमा शांताबाईंच्या कवितांमधून पुन्हा पुन्हा येतात. त्यातून त्यांच्या मनाच्या आशा-निराशेचे हिंदोळे झुलू लागतात.

‘पाऊस कोसळत रहातो   घोंघावत येतो पूर

वाजू लागतात अज्ञात घंटा   आयुष्यापलीकडचे संदिग्ध सूर’

कोसणारा पाऊस आणि घोंघावत येणारा पूर याच्या पार्श्वभूमीवर अज्ञात घंटानाद कारूण्याची लय साकारतो. ‘हिरण्यगर्भ’सारखी कविता मात्र यापेक्षा वेगळे सूर आळवते. शिशाच्या पत्र्यासारखे काळे करडे आभाळ गच्च दाटून येत. आणि दिशा भस्म फसल्यासारख्या राखाडी होतात, पण त्यांना खात्री आहे,

‘या सार्‍यांपालीकडे खचितच असतील   

 झळाळती हिरण्यगर्भ उन्हे-

जी ढग फाडून येतील आवेगाने बाहेर      

आणि अनावर बरसतील या माळावर, या झाडावर

कुणी सांगावे? कदाचित माझ्याहीवर’

‘ढळणार सूर्य कधीतरी ’  

चिंतांनाशीलता हे शांताबाईंच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य. ‘नाती’ कवितेत त्या म्हणतात.

वाटते, तितके नसतो आपणही एकाकी निराधार

अर्थात तेवढ्याने काळोख उजळत नसला तरी’

‘कुठे तरी आपल्यासाठी कुणी तरी असते फुलत जळत’, ही जाणीव आत आत कुठे तरी आश्वस्त करते. जीवन पुढे सरकत रहाते. ‘कळते आता गेला क्षण नाही पुन्हा हाती गवसत’. असं किती आयुष्य सरलं. त्यातून हाती काय लागलं?

‘वर्षांचा ढीग इथे साठला किती?     मातीतून त्या मलाच खणत राहिले’

‘ढळणार सूर्य कधीतरी’ याची त्यांना जाणीव आहे पण त्या सूर्यास रोखणार तरी कसे? ‘तम’ तेवढाच खरा, याची खात्री पटली आहे, तोपर्यंतचे जगणे कसे?

‘कैसे जीवन हे इथे जर आम्ही मृत्यूच श्वासितो.’

भूतकाळ सरत, मिटत चाललाय. अदृश्य भविष्याच्या दिशेने होणारी वाटचालही सरत आल्याचे ‘सूर’ इथे कातर, विषण्ण करून जातात. शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून अति उत्कटतेने प्रगट झालाय. 

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! – भाग 3 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 ‌शांताई म्हणजे काव्याचा सतत वहाणारा एक झरा!

शब्द पाण्याच्या थेंबासारखे ओघळत येणारे प्रवाही! असं कुठलं गाण्यातलं क्षेत्र नव्हतं जिथे त्यांच्या शब्दांचा ओघ वाहिला नाही! भक्तीगीते, भावगीते, भजन, देशभक्तीपर गीतं सगळ्या क्षेत्रात ही गंगा वहात राहिली! स्वभावाने अतिशय नम्र तरीही हुशारी चे तेज त्यांच्या काव्य रचनेत लपत नव्हते!’ भस्म विलेपित रूप साजिरे… ‘ सारखे भक्तीगीत असो वा ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ सारखे विरहगीत ‌असो तितक्याच ताकदीने त्यातील भाव उभे करण्याचे कसब त्यांच्या गीतात होते. बाबूजींकडे त्यांनी चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिली. आणि ‘तोच चंद्रमा नभात..’ सारखे अजरामर गाणे आपल्याला मिळाले.लहानपणापासून संस्कृत श्लोक, ‘काव्य प्रकाश’ चे वाचन, मनन,  चिंतन केले होते, त्यांचा सुसंस्कार त्यांच्या गीतातून दिसून येतो. ‘शालू हिरवा, पाचू न् मरवा, वेणीत पेडी घाल आता..’  गाण्यातून दिसणारा आनंद व्यक्त होतो तर ‘रेशमाच्या तारांनी, लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा…’ हे गाणं लिहिताना त्यांचा लावणीचा बाजही तितकाच उत्कट तेथे दिसून येतो. भालजी पेंढारकर यांनी शांताबाई ना कोल्हापूर ला बोलावून घेतले आणि काव्य लिहून घेतले. अनेक संगितकारांनी शांताबाईंच्या गीतांना चाली लावून अजरामर गाणी मराठी सिनेमा ना दिली. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांनी त्यांच्या गीतांना योग्य न्याय मिळवून दिला!

शांताबाई या मागच्या पिढीतील अतिशय सुसंस्कृत, हुशार, चतुरस्त्र लेखन करणार्या कवयित्री होत्या.बहिणाबाई चौधरी, सरोजिनी बाबर, शांता शेळके या सारख्या कवयित्री नी आपल्या मराठी भाषेला जे लेणं दिलं आहे, ज्याचे मोल करता येणं अशक्यच आहे !

शांताबाईंच्या स्मृतीला मन:पूर्वक अभिवादन!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

?  विविधा ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)

आपल्या ओघवत्या भाषेचं श्रेय त्या आचार्य अत्रेंना देतात. ‘ शब्दांचा सोस असला तरी बोलण्यातील ओघ आपल्या लेखनात पाहिजे’; हे अत्रे यांचं वाक्य त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचूर भाषाशैली बदलली. जीवन अनुभव घेताना कोणताही प्रसंग, एखादे दृश्य, ऐखादं चित्रं, एखादं मनात कोरलं गेलेलं वाक्य, निसर्गाची विविध रूपं कविता सुचायला कारणीभूत झाले आहेत.

शांता शेळके यांची ‘ पैठणी ‘ ही कविता…. मनात खोलवर रुजलेली पण अजुनही मायेची उब व आधार देणारी ही कविता, ‘प्रत्येक स्त्री चा थोडा वेगळा असला तरी असाच एखादा अनुभव तिच्या मनात नक्कीच असणार———

‘पैठणी’—फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली आजीची एक ‘पैठणी’ जपून ठेवली आहे.कवयित्री लिहिते —–

कधीतरी ही पैठणी

मी धरते ऊरी कवळून

मऊ रेशमी स्पर्शामध्ये

आजी भेटते मला जवळून

त्यांची शोध ही कविता—— आजही स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी कविता आहे. हा स्वतः च्या अस्तित्वाचा शोध पूर्वीही होता आणि आजही तसाच आहे. शोध या कवितेतील या ओळी पहा….

‘माहीत नव्हते मला माझे बळ,

माझी दुर्बलता   सतत मला वेढून बसलेली

माझी  भिरुता’

आणि पुढे त्या लिहितात—-

आत आतल्या आत मी.   

आहे उलगडत

 क्षणोक्षणी विस्तार पावत.

 पोहचते आहे जाऊन—

 अंतरंगाच्या कानाकोपऱ्यात.

 मी चकीत होत आहे.

 स्तिमित होत आहे.

दुखावत आहे आणि सुखावतही’

‘असा बेभान हा वारा’, ‘ किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह —अनेक सूक्ष्म, तरल,  वेगवेगळ्या भावना, संवेदना यातून जाणवतात.

चित्रपटातील गाणी जशी लोकप्रिय तशी चित्रपटातील ‘लावणी’ ही.

मराठा तितुका मेळवावा हा  ‘चित्रपट’; या चित्रपटातील लावणी. ‘ आनंदघन’ ह्या नावाने लताबाईंचं संगीत आहे.

‘ *रेशमाच्या रेघांनी

लाल काळया धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी  काढीला        

हात नका लावू माझ्या साडीला’*

‘सोनियाची पाऊले’ पवनाकाठचा धोंडी’, ‘     ‘मंगळसूत्र’ हे लावण्यामुळे गाजलेले चित्रपट.

तसेच  चित्रपटातील त्यांची द्वंद्वगीतेही तितकीच लोकप्रिय झाली.

प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले. साहित्यातील विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

आळंदी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला.

निसर्गीची त्यांना विलक्षण ओढ होती.त्यांचे मन तासनतास तेथे रमे, हे धूळपाटी या त्यांच्या आत्मचरित्रात लक्षात येते.

म्हणून त्या म्हणतात_———

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे’

कवयित्री शांता शेळके यांची काही प्रसिद्ध पुस्तके——

१. ‘चिमुकल्यासाठी गाणी —अकुबाई बकुबाई ‘हा  बालकविता संग्रह         

२.’ जन्म जान्हवी’

३. ‘तोच

काही अनुवादित पुस्तके—–

 ६. काॅनरॅड रिझ्टर यांचे अनुवादित पुस्तक —-  ‘गवती समुद्र’

७. लुईसा हे अल्काॅट ( मूळ इंग्रजी लेखिका)

    यांच्या लिटल वुमन पुस्तकाचा अनुवाद — ‘चौघीजणी’

८. द हेलन केलर ह्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद —  ‘आंधळी’

९.  मूळ लेखक वेद मेहता यांच्या पुस्तकाचा अनुवाद — ‘आंधळ्याचे डोळे’   

१०. कविता संग्रह —

      १. ‘असा बेभान वारा’

      २. ‘किनारे मनाचे’

      ३. ‘अनोळख’

११. ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र    

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात –  मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून, ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय…. आता इथून पुढे)

‘हृदया, गात रहा नीज गीत’

सहजता हा शांताबाईंच्या काव्यलेखनाचा स्थायीभाव आहे.  जुन्या जमन्यातील अनागर सस्कृतीतील बहिणाबाई म्हणते,

अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी

तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी.

आजच्या जमानातल्या शांताबाई जुन्या जमन्यातील या बहिणाबाईचाच वारसा सांगतात जणू! ‘अंतरीचे स्व-भावे धावे बाहेरी’ या संतवचनाप्रमाणे जे जे अंतरात उचंबळलं, मनाला भावलं, ते ते काव्यरूपात बाहेर आलं. भोवतालच्या निसर्गाचा त्यांच्यावरचा प्रभाव, त्यांची प्रीतभावना, विरहावेदणा, त्यांचं एकाकीपण, चिंतन-गूढगुंजन, आत्मसंवाद सार्‍यांचंच प्रगतीकरण त्यांच्या कवितेत अगदी सहजपणे येतं॰

‘सांज काजळत आली   हाका येतात दुरून

आई ठेव ना आता    खेळ सारा आवरून’

किंवा  ‘मीच निर्मिली होती ती मायानगरी

          क्षणभर माझा जीव खुळा रमवाया

          जे जे होईल, व्हावे म्हटले होते

          त्याची केवळ करात आली छाया ‘

किंवा   होते इथे माझ्यासवे, होते सदा जे भोवती,

        आता कुठे गेले बरे, गेले कुठे ते सोबती

किती म्हणून उदाहरणे द्यावी?त्यांची प्रत्येक कविता सहजपणे साकार झाली आहे. त्यांच्या कवितेतील सहजपणाचे कारण, त्या ‘नीज गीत’ गात राहिल्या. ‘हृदया, गात रहा नीज गीत’ म्हणत राहिल्या. आपल्या हृदयाची स्पंदने व्यक्ता करत राहिल्या. ती व्यक्त करताना म्हणत राहिल्या, ‘ज्ञात जगाच्या पैलतीरावरि, असेल कोठे रसिक कुणीतरी, प्रांजळ तूझिया बोलावरती, जाडेल त्याची प्रीत’ 

‘वर्षा’ या शांताबाईंच्या पाहिल्याच काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत, शांताबाईंच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगताना रा. श्री. जोगांनी ‘सहजता आणि प्रसन्नता’यांचा उल्लेख केलाय. हीच वैशिष्ट्ये त्यांच्या पुढच्या, रूपसी, गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी इ. काव्यसंग्रहातही दिसून येतात. फक्त पुढच्या काळात त्यांची कविता त्यांची कविता सखोल, अर्थगंभीर, परिपक्व आणि विकसित होत गेली असं डॉ. प्रभा गणोरकर म्हणतात.

शांताबाईंच्या रचनेतील सहजता त्यांच्या कवितेइतकीच गीतरचनेतूनही जाणवते.किंबहुना आशा सहज, सुंदर रचनेमुळेच त्या उत्तम गीतकारही होऊ शकल्या. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे आधी बांधलेल्या चालींवर ज्या गीतरचना शांताबाईंनी केल्या, त्यातही ही सहजता उणावली नाही.

शांताबाईंचा प्रतिभा पक्षी त्याला वाटलं, तेच गात राहिला. त्याचे स्वत:चे सूर…. म्हणून ते सच्चे सूर वाटतात. त्यात कृत्रिमता, गारागिरी, उसनेपणा कुठेच नाही. शांताबाई स्वत:च म्हणतात, मी जे लिहिले, ते अगदी मनापासून लिहिले. त्यात उणिवा असतील, दोष असतील, पण अप्रामाणिकपणा यत्किंचितही नाही. एका कवितेत त्या म्हणतात,

‘नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा

एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा’

नव्या वळणाचा दृश्य प्रभाव त्यांच्यावर खूप कमी आहे. त्यांची कविता नवतेबरोबर भरकटत गेली नाही. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती याबाबत ती स्वत:शी अत्यंत प्रामाणिक राहिली’ असं डॉ. प्रभा गणोरकर आवर्जून सांगतात.

शांताबाईंची कविता आत्मारत आहे पण ती आत्मकेंद्रित नाही. कुसुमावती देशपांडे यांनी ‘रूपसी’च्या प्रस्तावनेत ती ‘आत्मलक्षी’ असल्याचा उल्लेख केलाय. त्यांच्या कवितेत ‘भेदक आत्मविश्लेषण’ आणि ‘शांत प्रामाणिकपणा’ आहे, असेही त्या म्हणतात. ती केवळ स्वत:शीच बोलत नाही. ‘ग्रेस’सारखी ती केवळ स्वत:तच मश्गुल रहात नाही. ‘ग्रेस’ची कविता वाचताना वाटतं, हा कवी एका भारलेल्या रिंगणाच्या आत उभा आहे. त्यात सहजपणे दुसर्‍याला प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी ‘तिळा उघड’ सारखा एखादा मंत्र माहीत असायला हवा. शांताबाईंचे तसे नाही. त्या स्वत:शी बोलतात. स्वत:शी बोलता बोलता त्या रसिकांशीही संवाद साधतात. केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,

‘ तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’

शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिभासंपन्न कवयित्री- शांताबाई शेळके ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ प्रतिभासंपन्न कवयित्री- शांताबाई शेळके ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

शांताबाई…. शांताबाई शेळके एक प्रतिभावंत कवयित्री.. लेखिका… संतसाहित्य, पारंपरिक गाणी.कविता यांचा एक चालता बोलता ज्ञानकोश असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अफाट वाचन करून मुखोदगत असणाऱ्या एक अभ्यासक, सच्चा रसिक.

शांताबाई चा जन्म पुण्याजवळील इंदापूर या गावी 12 ऑक्टोबर 1922 साली  झाला. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांनी शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत घेतले. त्यांच्या आईला वाचनाचे वेड असल्यामुळे शांताबाईंना लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली. आजोळी गेल्यावर पारंपारिक गाणी ओव्या त्यांच्या कानावर पडत त्यामुळे लहान वयातच कवितेची गोडी रुजत गेली. त्यांनी सर परशुरामभाऊ कॉलेजमधून बीए डिग्री संपादन केली. कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापक श्री. म. माटे, प्राध्यापक के. ना. वाटवे., प्राध्यापक रा. श्री. जोग यांच्यामुळे त्यांना अवांतर वाचनाची, कवितेची गोडी लागली. कॉलेजमधील नियतकालिकेत त्यांनी लेख लिहिला. त्याची प्रस्तावना माटे सरांनी लिहिल्यामुळे त्यांना लेखनासाठी हुरूप आला आणि त्यांच्या मनात कवितेची पाऊलवाट तयार झाली.बी.ए. झाल्यावर मुक्ता व इतर गोष्टी या नावाचा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. 1944 साली त्यांनी संस्कृत विषय घेऊन एम ए केले. या परीक्षेत त्यांनी तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी नवयुग साप्ताहिक मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. थोडे दिवस नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये व नंतर मुंबईच्या रुईया व महर्षी दयानंद कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून काम केले.

त्या निगर्वी, शांत व मितभाषी होत्या. ज्येष्ठ कलाकार म्हणून त्या कधीच  मिरवल्या नाहीत. आपण जे सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते इतरांनाही दिसावं अशी त्यांची भावना होती.या भावनेतून त्यांना “मधुसंचय”  पुस्तकाची कल्पना सुचली असावी.

“किलबिल किलबिल पक्षी बोलती” हे बालगीत लिहिताना या काव्यात’ कुणी न मोठे कुणी धाकटे’ ती ओळ फक्त त्यांनी लिहिलीच नाही तर त्या स्वतः आपल्या कृतीतून दाखवत.

देव, पूजा अर्चा यावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता पण’गणराज रंगी नाचतो किंवा गजानना श्री गणराया’ लिहिताना त्यां निस्सिम गणेश फक्त गेल्या.

‘ही चाल तुरू तुरू, उडती केस भुरुभुरु, लिहून प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली.

समुद्राची कल्पना करून,’ वादळ वार सुटल ग’ यासारखं गीत लिहिलं आणि ‘जाईन विचारत रानफुला’ लिहिताना विरहिणी झाल्या.

‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’या गीतातून वेगळा भाव वेगवेगळे तरंग आपणास दिसून येतात.

स्त्री मनाच्या भावनांचा वेध घेणारी अनेक गाणी त्यांनी लिहिली त्यापैकी काही गाणी स्त्री मनाची अवस्था व्यक्त करणारी आहेत उदाहरणार्थ’ तू न सखा मजसंगे वाटही उन्हाची’संगतीत एकाकी वेदना ही मनाची’

हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्यासंबंधी एक किस्सा वाचण्यात आला. लेखक रणजित देसाई व संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांना नाटकासाठी एक गाणं हवं होतं. शांताबाईंनी केलेले गाणे त्यांना पटेना तेव्हा तुम्हाला कसे गाणे हवे आहे? असे शांताबाईंनी विचारताच  त्यांनी एक शेर सांगितला. तो शेर शांताबाईंना भावला. त्यातून ‘काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुल ही रुतावे हा दैवयोग आहे’ हे अजरामर गीत जन्माला आले. तसेच पदराची किनार यासाठी शांताबाईंना शब्द सुचत नव्हता पण शेव खाताना’तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’ हे काव्य स्फुरले.

कविता कथा कादंबरी बालसाहित्य चित्रपट गीत समीक्षा आत्मकथन अनुवाद…. इत्यादी नानाविध साहित्यप्रकारात शांताबाईंनी लेखन केले पण त्यांचे खरे प्रेम कवितेवरच होते.

त्यांच्या प्रसिद्ध गीता पैकी काही गीते सांगता येतील “ऋतू हिरवा ऋतू बरवा, कळले तुला न काही, काटा रुते कुणाला, काय बाई सांगू, दिसते मजला सुख चित्र नवे, जय शारदे बागेश्वरी, शूर आम्ही सरदार, मराठी पाऊल पडते पुढे”. इत्यादी.

नादलयींचे नेमके भान, सुभग प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्य लेखनाचे वैशिष्टय होते. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिरांच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता त्यांच्या काव्यातून दिसून येते.

अशा या प्रतिभावान कवयित्रीने 1996 साली आळंदी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले तसेच 1996 साली त्यांना गदिमा लेखन पुरस्कार देण्यात आला. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश”या गीताला सूरसिंगार पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट चित्र गीत लेखन पुरस्कार (चित्रपट भुजंग ) आणि साहित्य योगदानासाठी 2001 साधी यशवंतराव चव्हाण पुरस्काराने  त्यांना सन्मानित केले गेले. आज शांताबाई आपल्यात नाहीत पण त्यांचे साहित्य वाचताना अजूनही त्या आपल्यात वावरतात असा भास होतो.

अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई शेळकेंचा सहा जून हा स्मृतिदिन. शांताबाईंना विनम्र प्रणाम!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कवयित्री शांताबाई शेळके स्मरण.. ☆ सुश्री सुरेखा कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

?  विविधा ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके स्मरण.. ☆ सुश्री सुरेखा कुलकर्णी 

मराठी सारस्वताच्या मुकुटात मानाचे तुरे अनेक आहेत. त्यातील एक सुंदर तुरा खोवला कवयित्री शांता शेळके यांनी! शांताबाईंनी मराठी साहित्य सोनियाच्या खाणीत विविध शब्द रत्नांची भर घातली आहे.

त्यांनी काव्याचे विविध प्रकार रसिकांपुढे मांडले आणि ते सारे रसिकांना भावले. भक्तीगीते, प्रेमगीते, विरह गीते कोळीगीते लावणी,’ ऋतू हिरवा’ सारथी निसर्ग गीते स्त्रीसुलभ भाव मांडणारी भावगीते आणि बालगीते असे विविधरंगी काव्य त्यांनी लिहिले जणूं साहित्यातील रंगतदार इंद्रधनुष्य रसिकांपुढे सुरेख मांडले हे सर्वच रंग सुंदर आहेत त्यांच्या कविता लय तालांनी सजलेल्या असल्यामुळे त्याची सुरेल गीते झाली त्यांनी रसिकांचे कान आणि मन तृप्त झाले

यातील बालगीतांचा रंग मला अधिक भावला बाल मनातील भावना अगदी त्यांच्या शब्दात या कवितांमधून व्यक्त झालेल्या दिसतात आणि म्हणूनच त्याची सुरेल बालगीते झाली अगदी मुंगीपासून बाल वयात आवडणाऱ्या

विविध विषयावर त्यांनी कविता लिहिल्या आणि त्या बालां बरोबरच सर्वांना प्रिय झाल्या. त्यापैकी एक कविता प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्यापुढे मांडत आहे हे लोकप्रिय बालगीत आहे,”किलबिल किलबिल पक्षी बोलती”! या गीतातील कल्पनेतला गाव लहानांसह सर्वांना आवडणारा आहे.यात आलेले निसर्ग वर्णन पक्ष्यांची किलबिल झुळझुळ झरे पाने-फुले व भिरभिरणारी फुलपाखरे हे वर्णन अगदी कोणालाही मोहून टाकणारे आहे यात प्रत्येक शब्द अगदी यथार्थ व परिपूर्ण आहे कवीची प्रतिभा म्हणजे शब्द जणू हात जोडून उभे आहेत.ओळी  ओळीत बाल मनातील भावना व्यक्त होत आहेत कवी कल्पना खरंच जे न देखे रवी अशाच असतात या गावात सर्व जण मुलेच असतात. कारण तिथे लहान-मोठे हा भेद नाही तसेच इथे शाळा पुस्तके असे मुलांना कंटाळवाणे वाटणारे काहीच नाही फक्त खेळावे, बागडावे असे हे गाव आहे मुलांना आवडणारी गाणी हसऱ्या प-या आणि झाडावर च  चेंडू आणि ब्याटी आहेत.

असा बहरलेला गाव लहानांसह सर्वांना आवडणारच! मग ही कविताही गीत रूपात सर्वांना आवडते.ही सारी गंमत कवीच्या शब्दांनी निर्माण केली त्यातील शब्दांचा गोडवा,भावपूर्ण मांडणी, चित्रमय वर्णन हे सारे कवीचे प्रतिभासंपन्न असे यश आहे अशा बालगीत लेखनाने शांता शेळके यांनी मराठी बालगीता ना साज चढवला आहे.

म्हणून च थोडक्यात असे म्हणावेसे वाटते,” असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे.”हेच खरे!

नवोदितांना प्रेरणा देणाऱ्या शांताबाईंच्या काव्य स्मृतीस विनम्र अभिवादन!

© सुश्री सुरेखा कुलकर्णी

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांताबाईंचे ललित विश्व ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे 

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. ज्योत्स्ना तानवडे 

?  विविधा ?

☆ शांताबाईंचे ललित विश्व ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे 

अजून माझी उत्सुक ओंजळ

अजून ताजी फुले ||

या भावनेने शेवटपर्यंत स्वत:चा आणि जगाचा शोध घेणाऱ्या  सिद्धहस्त लेखिका म्हणजे शांताबाई शेळके. साहित्यातले विविधांगी प्रकार लीलया हाताळणाऱ्या शांताबाईंची अनेक रूपे आहेत.प्राध्यापिका, पत्रकार, कवयित्री, गीतकार, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, समीक्षक, ललितलेखक, संकलक, बालसाहित्यकार जणू आरसेमहालात दिसणारी असंख्य प्रतिबिंबच. यातले प्रत्येक रूप हे अंगभूत अशा अभ्यासू वृत्ती, उत्कटता, संपन्न साहित्य दृष्टी आणि रसिकतेने ओथंबलेले. सर्वच रूपे हवीहवीशी वाटणारी.

शांताबाईंच्या साहित्याच्या वाटेवरचा खरा जडणघडणीचा काळ होता तो सर परशुराम भाऊ कॉलेजमधली सहा वर्षे. इथे काही अभ्यासू सवयी लागल्या, जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या, रसिकता डोळस झाली. त्यामुळे उदंड आशा,उल्हास आणि जीवनाबद्दल अपार आसक्ती वाटू लागली. एम.ए ची पदवी घेतल्यावर मुंबईत आचार्य अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिक आणि ‘नवयुग’ साप्ताहिकात काम सुरू केले.खुद्द अत्र्यांसारख्या प्रतिभासंपन्न, सर्जनशील साहित्यिकाच्या सहवासात त्यांना साहित्यविषयक, वृत्तपत्रीय लेखनाचे वस्तुपाठच मिळाले. अनुवादक, समीक्षक, स्तंभलेखक, मुलाखतकार या शांताबाईंच्या रूपाचा पाया इथेच घातला गेला.

शांताबाईनी नामवंत वृत्तपत्रं आणि मासिकांमधील सदर लेखनाच्या निमित्ताने विपुल असे ललित लेखन केले. उत्कट जिज्ञासा,  भरपूर व्यासंग,मनुष्य स्वभावातील विविध छटांबद्दल असणारे तीव्र कुतूहल, निसर्गप्रेम आणि तरल काव्यात्म वृत्ती यामुळे शांताबाईंच्या ललित लेखनाला खास त्यांचे असे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. विविध संदर्भांनी संपन्न झालेली शैली आणि निवेदनातील जिव्हाळा यामुळे हे ललित लेख वाचणे हा एक अत्यंत आनंददायक असा अनुभव आहे.

यामुळेच ‘मदरंगी’, ‘एक पानी’, ‘जाणता -अजाणता’  यासारखे स्तंभलेखन आणि ‘आनंदाचे झाड’, ‘ सांगावेसे वाटले म्हणून’, ‘गुलाब – काटे- कळ्या’, ‘आवड-निवड’ यासारखे त्यांचे ललित लेखन खूपच वाचकप्रिय ठरले.

‘सांगावेसे वाटले म्हणून’ मधील सामाजिक जीवनात कसे वागावे  हे सांगणारा ‘ सलगी देणे ‘ हा लेख,त्याग करणारा व त्याचा गैरफायदा घेणारा यातील सीमारेषा दाखवणारा ‘ आयुष्याचे उखाणे ‘ लेख, आईवडिलांनी मुलांना देता येईल ते द्यावे अथवा देऊ नये, पण मनाप्रमाणे जगण्याचा त्यांचा अधिकार हिरावू नये हे सांगणारा ‘ ययातीचा वारसा ‘ लेख, आनंद आणि दुःख वाटून घेण्याचे महत्त्व सांगणारा ‘  हेमाला मुलगी झाली हो ‘ हा लेख, तसेच जाणता-अजाणता मधील दुःख-संकटातही जगणे आनंदी करणारां विषयी  ‘आत्मकरूणेची चैन ‘हा लेख, यशस्वी आणि अपयशी माणसांच्या मनोवृत्ती विषयी ‘ स्वार्था तुझा रंग कसा ‘ हा लेख, सहभोजनाचे महत्त्व सांगणारा ‘ कर्माबाईची खिचडी ‘हा लेख, जनमानसातील प्रतिमा आणि स्वतःच्या मनातील प्रतिमा जपणाऱ्यां विषयी ‘ प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट,’ हा लेख असे आयुष्याशी संबंधित सर्वच गोष्टींचा सर्वंकष आढावा घेणारे लेख वाचणे म्हणजे नव्याने आयुष्याचा अभ्यास करण्यासारखेच आहे.

शांताबाईंजवळ संपन्न साहित्यदृष्टी, रसिकता आणि प्रचंड मोठा व्यासंग होता.त्यांचे सगळेच लिखाण अतिशय सुंदर,अभिरुची संपन्न आहे. यातील ललित लेखनाचे वाचन करणे हा एक आनंददायी, आपले जगणे समृद्ध करणारा अनुभव  आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print