मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कितीदा नव्याने तुला आठवावे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कितीदा नव्याने तुला आठवावे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

भूरभूर …भूरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन 

“येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणत नाचायला लागली.

पाऊस वाढला. मुलं आत गेली.बराच वेळ पाऊस पडला. अंगणात पाणी  साठलं  होतं .थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं आता काय करतील? कदाचित पावसाच्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडतील..

“पाऊस आला धो धो

पाणी व्हायलं सो सो सो

पाण्यात बोट सोडली सोडली

हातभर जाऊन बुडली बुडली”

बोट बुडणार हे माहीत असलं तरी बोट सोडायचा मोह होतोच…

माझं मन माझ्या लहानपणात गेलं. त्या मुलांवरून आठवले शाळेचे दिवस.. नवीन रेनकोट घेतलेला. नेमका शाळेत जायच्या आणि यायच्या वेळी पाऊस पडायचाच नाही. कोरडा रेनकोट दप्तरातून न्यायचा आणि परत आणायचा. कंटाळून एके दिवशी रेनकोट घरीच ठेवला .त्या दिवशी शाळा सुटायच्या वेळी धुवांधार पाऊस सुरू झाला. भिजत घरी यायला आवडायचं पण त्यापेक्षा आपण आज नेमका रेनकोट घरी ठेवला याचं दुःख वाटत होतं. तेवढ्यात  शाळेच्या गेटपाशी हातात रेनकोट घेतलेली आई दिसली .. रेनकोट घालून मिरवत घरी येता आलं..

किती  किती आनंद झाला होता..

शाळेतला मराठीचा तास. त्यादिवशी पाऊस खूप जोरात येत होता बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या

“आज आपण फक्त कविता म्हणू” तासभर कवितांनी वर्ग चिंब भिजला. दिवस सुगीचे सुरू झाले, उघड पावसा ऊन पडू दे, ने मजसी ने परत मातृभूमीला ,ऐल तटावर पैल  तटावर एकामागोमागे कविता म्हटल्या….  शेवटी बाईंनी “बाई या पावसान…” हे गाणं म्हटलं .बाईंचा आवाज किती गोड आहे हे तेव्हा कळलं. बाईंचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं .त्या गाण्यातील ..”जीवलग कोठे बाई पडे अडकून नच पडे चैन “..ही ओळ आठवली.. त्यावेळी बाईंनी ते गाणं का म्हटलं.. ते आज  इतक्या वर्षानंतर समजलं.

शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर वेगळीच दुनिया समोर आली. त्यात पहिल्या ट्रीपचा अनुभव तर  कितीतरी आठवणी देऊन गेला.. लोणावळा ते खंडाळा पायी जायची ट्रीप .वर्गातल्या तरुण मुलांबरोबर बाहेर पडायची आयुष्यातली पहिली वेळ.. गप्पा ,गाणी ,खोड्या आणि वरून पाऊस ..

हळूच कोणीतरी दोघे मागे रेंगाळायचे. हातात हात घालून झाडाखाली उभे राहायचे .खुळ्यासारखा कोणाचा तरी कुणावर जीव जडायचा.. कॉलेज पुरती नाती ..अशा हळव्या पावसात ट्रीपला जी मजा येते ती आयुष्यात परत कधी येत नाही. हुरहुरती मनं घेऊन   ट्रिपहून  परत यायचं असतं… खरं म्हणजे तसं फारसं काही घडलेलं नसतं …पण म्हटलं तर खूप घडलेले  असतं..

कॉलेजच्या त्या रमणीय  जगातून बाहेर यावं लागतं. कॉलेजातले मित्र तेवढ्यापुरतेच असतात . एखाद दुसरा जवळचा होतो इतकंच..

नवरा मात्र दुसराच कोणीतरी होतो. तोही खूप आवडतो .लग्नानंतर वेगळे जग सुरू होतं .हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात काळेमणी आले की गृहिणी  दिसायला होतं.. अल्लडपणा हरवतो.  मंगळवारी मंगळागौरीचा मोठा थाट आईने मांडलेला असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. पूजेला  आठ मुली येणार आहेत. अस आई घोकत असते .त्याच दिवशी धुवांधार पाऊस येतो. मुली  येतात की नाही? पूजा होते की नाही? अशी आईला काळजी असते. पण भर पावसात मुली येतात आईचा जीव भांड्यात पडतो.

“जय देवी मंगळागौरी ” ही आरती म्हणताना आईचा तो नथ घेतलेला सात्विक चेहरा कृतकृत्य झालेला असतो. पाऊस म्हटलं की आईचा तो चेहरा आठवतो…

संसारचक्र पुढे जात राहते. बाकी काही असलं तरी नवऱ्याबरोबर पावसाची मजा मात्र  लुटता येत नाही. तो  बिचारा कर्तव्य तत्पर जबाबदार माणूस असतो. दोघे बाहेर फिरायला जातात. अचानक आभाळ भरून येते. वारा सुटतो.. पाऊस येणार ..असं वाटतं आता पावसात दोघांनी हातात हात घेऊन मस्त भिजत घरी यावं वगैरे रोमँटिक कल्पना आपल्याला सुचायला लागतात .आपलं लक्ष जमिनीवर नसतच …तेवढ्यात नवरा चटकन रिक्षा नाहीतर टॅक्सी थांबवतो .आपण काही न बोलता चढून बसतो.. शाहण्या बाईसारख्या..

बाहेर धो धो पाऊस सुरू असतो अंग जरा ही ओलं न होता भर पावसात आपण कोरडे घरी येतो. पण त्यातही आनंद वाटायला लागतो .कारण आता संसारात मनापासून रमायला झालेलं असतं.

बाहेर पाऊस कोसळायला लागल्यावर नवरा मुलं घराच्या चार भिंतीत सुरक्षित असले की हायसं वाटतं .त्या क्षणी बाहेर पाऊस बघायला जायला वेळ नसतो. सगळ्यांसाठी  खायला काहीतरी  गरम करून देण्यात आनंद असतो. आता आईची जागा आपण घेतलेली असते . 

घराच्या गॅलरीत खुर्चीवर अनेक  पावसाळे पाहिलेले दोन जीव सासू-सासरे बसलेले असतात .गतजीवनाच्या  कितीतरी आठवणी त्यांच्यासोबत असतात. त्यांचीच त्यांना साथ असते.

कधी कधी ते दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत.  नुसते पावसाकडे बघत बसतात…

पावसाकडे बघतात का अजून काही बघतात कळत नाही…

एक खुर्ची रिकामी झाल्यावर सासूबाईंचा एकटा जीव निःशब्द होऊन जातो. त्यांच्याकडे बघता बघता आपल्या डोळ्यात पाऊस उतरतो.

” पुढचा पावसाळा मी पाहीन असं वाटत नाही “असं म्हणत पावसाकडे बघत बसलेल्या त्या आठवतात.. खरंच पुढच्या पावसाळ्यात दुसरी खुर्ची ही रिकामी होते. गॅलरी उदास सुनी सुनी होऊन जाते..

मनात विचार येतो.. आपलेही बरेच पावसाळे पाहून झाले .अजून किती आहेत कोण जाणे ?

पावसाचे हे असंच आहे .त्याच्याकडे बघताना आठवणींच्या सरी धावून यायला लागतात… भावनांनी भिजवून टाकतात ..डोळे ओलावतात..

पावसाळ्यात कधीतरी असा एखादा दिवस येतो.. खिडकीतून ,गच्चीतून, गॅलरीतून ,दारातून कुठूनही आपण पाऊस बघत असतो. अशावेळी आपण एकटे असलो तर  कुठली तरी आठवण मनात येतेच…

डोळे भरून येतात. मन कातर होतं वेडबागडं होतं .. भूतकाळाचे दरवाजे उघडतात …आणि अनाकलनीय अशा आठवणीत आपण हरवून जातो जरा वेळाने आपणच आपल्याला सावरतो.

म्हणूनच पावसाळ्यात एकदा तरी मनाला असं जरा वेळ भटकू द्यावं..स्वैर सोडावं  आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा..

काहीही म्हणा पण हिवाळे,उन्हाळे येतात आणि जातात….. हा पावसाळा मात्र आर्त करून जातो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

??

☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.) – इथून पुढे — 

आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवरात उभे होते. माझ्या बायकोला हें काही पसंत नव्हते.ती झाड उभ करताना तिकडे फिरकली ही नव्हती.

आता झाड जगवणे हें महत्वाचे होते, आमच्या घरी कामाला येणारी शांता कडे मी या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी सोपवली.

दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती, सायंकाळी घरी आल्यावर पाहिले, शांता ने पाणी घातले होते पण झाडें मलुल दिसत होती. मी रात्री उठून झाडाकडे गेलो, पाने आणि देठ पिवळे होतं होते. सकाळी पाहिले काही पाने गळून पडली होती, बरीच पाने पिवळी झाली होती. मी कॉलेजच्या वर्देसरांना फोन लावला, त्याचे म्हणणे, जुनी पाने गळून पडत असावीत, त्याची काळजी करू नका, नवीन कोंब येतात का पहा.

मी सकाळ दुपारी सायंकाळी मध्यरात्री झाडाकडे पहात होतो. पाणी शेणखत घालत होतो, पण काहीच प्रगती नव्हती.

मी निराश झालो. बायको म्हणत होते ते खरेच उगाचच रस्त्यावरचे झाड घरी आणले होते. मग आजूबाजूच्या लोकांचे सल्ले ऐकले, कोणी म्हणाले “असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते, या दिवसात जगणे कठीण,’.दुसऱ्याचे म्हणणे “रोज पाणी घालू नका, त्यामुळे मुळे कुजतात ‘.

एकांदरीत सर्व मला हसत होते, चेष्ठा करत होते.

मी दुःखी होतं होतो. एवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो, त्या करिता किती पैसे गेले होते? माझी किती मेहनत? आणि सर्वांनी माझी चेष्ठा करावी? बायकोने जाता येता टोमणे मारावे?

आज सहा दिवस झाले, जांभळीच्या झाडावरील सर्व पाने झडून गेली होती. त्यावर कोठेही नवीन कोंब येत नव्हते. माझा पराभव झाला होता, आता बायको काय बोलेल ते ऐकून घ्यावे लागणार होते. आजूबाजूची लोक, शेजारी यांना फुकटची करमणूक झाली होती.

माझे कशातच लक्ष नव्हते. अजूनही शांता पाणी घालतंच होती.

एका मलुल संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्दे सरांकडे गेलो. सरांकडे माझा पराभव मान्य केला. सरांनी शिवाजी विदयापीठतील biology चे प्रमुख डॉ सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांचेशी बोलायला सांगितले.    

मी रात्री डॉ सामंत यांना फोन लाऊन सर्व हकीगत सांगितली. सामंत यांनी सर्व व्यवस्थित ऐकून घेतले, मग ते बोलू लागले 

डॉ सामंत -वकीलसाहेब, तुमच म्हणणं मी ऐकलं, तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले जांभळीचे झाड उपटून काढलंत आणि तुमच्या घराच्या आवारात लावलत.

पण तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील? तुम्हाला जर तुमच्या घरातून ओढून बाहेर काढलं आणि दुसऱ्या घरात नेलं, तर तुम्हाला राग नाही का येणार?

मी -येणार सर, निश्चित येणार, पण मी माणूस आहे आणि ते तर झाड..

डॉ सामंत -इथेच आपली गफलत होते. तुम्हाला काय वाटते, झाडाला संवेदना नाहीत? राग नाही? दुःख नाही? आनंद नाही? झाडांना सहवास, प्रेम नको असत?

मी -सर, मला काहीच माहित नाही याबद्दल..

डॉ सामंत -तुम्ही कोकणात राहता, तुमच्या घरा शेजारी एक नारळीच झाड बागेतील झाडापेक्षा पाचपट उत्पन्न देत, बरोबर..

मी विचार केला, डॉ बरोबर आहे. आमच्या घरच्या बाथरूम चे पाणी घरा शेजारील माडा ला जाते त्याला बागेतील झाडापेक्षा कितीतरी जास्त नारळ धरतात.

मी -हो डॉ साहेब, बरोबर.

डॉ सामंत -याचे कारण घराशेजारील झाडाला तुमच्या घरचंचा सहवास मिळतो.

भारतीय शस्त्रज्ञ् डॉ जगदीश्चंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे, वनस्पतीना सुद्धा राग, दुःख, वेदना, आनंद असतो. त्याना सहवास हवा असतो.

मी -मग डॉ माझे काही चुकलं का?

डॉ सामंत -खूपच चुकलं. रस्त्यावर एवढी वर्षे वाढलेलंय झाडाला उपटून काढतांना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती का?

मी -नाही.. नाही.. मला याची काही कल्पना नव्हती.

डॉ सामंत,-ते झाड दुःखी झालाय. तुम्ही त्या झाडाची क्षमा मांगा. त्याला जाता येता गोंजारा. त्याच्या बुंध्यवर डोकं टेकवा, सतत त्याच्या सानिध्यात राहा आणि एक महिन्या नंतर मला फोन करा.

डॉ नी फोन ठेवला.

मी हडबडलो. मला वनस्पतीच्या  सवेंदना, भावना या विषयी काही कल्पनाच नव्हती, शाळेत असताना जगदीशचंद्र बोस यांच विषयी धडा होता पण तो पाच मार्कचा एव्हडाच इंटरेस्ट.

मी घरामागे आलो, चांदण्यात जांभळीचे झाड निश्चिल उभे होते. त्याचावर नाही फादी नाही पान. मी त्याच्या बुंध्यावर डोकं टेकले आणि रडू लागलो “क्षमा कर मला, क्षमा कर, तुला न विचारता तुला उपटून काढलं मी. दुष्ठ माणूस आहे मी. माझ चुकलं… कितीतरी वेळ मी रडत होतो.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे गेलो, आज मी स्वतः विहिरीतील पाणी काढून मुळाभोवती शिंपले. अर्धातास मी झाडासोबत होतो.मग मी कोर्टात गेलो, रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यसमोर ते जांभळीचे झाड होते. रात्री घरी आलो, हातपाय धुतले आणि झाडाकडे गेलो. परत परत त्याची क्षमा मागितली. झाडाला गोंजारले, त्याचाशी गप्पा मारल्या.

माझ्या बायकोने माझ्याशी बोलणे सोडल होते. माझे जे काय चाळे चालले होते, त्याची मनातल्या मनात ती चेष्ठा करत असणार.

शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती, परत एकदा पाणी घालत होती.

दहा दिवस झाले असतील, मी सकाळी उठून झाडाला पाणी देत होतो, एव्हड्यात शांता आली आल्या आल्या ती झाडाकडे आली, आणि मोठ्याने ओरडली “भाऊंनू, ह्या बघा, झाडाक कोंब येता.. हेकाच पुढे फादी येतली आणि पाना पण येतली ‘.

मी धावलो, खरंच झाडाला दोन कोंब फुटत होते.

मी झाडाच्या बुंध्यवर डोकं टेकले आणि रडू लागलो. शांता चे ओरडणे ऐकून बायको बाहेर आली, तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि ती प्रथमच हसली.

माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे, झाडाशी गप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते.

ते दोन कोंब हळूहळू मोठे होतं गेले. आणखी कोंब आले, आणखी कोंब आले… लालचुतुक पाने आली..

पाने जून झाली.. फाद्या मोठया झाल्या.. संपूर्ण जांभळाचे झाड पानांनी भरून गेले.

— समाप्त — 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभळीचे झाड – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

??

☆ जांभळीचे झाड – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

मी गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातो आहे. शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरवातीला चालत, मग सायकलवरुन आणि हल्ली काही वर्षे स्कुटर वरुन किंवा गाडीतून.

शाळेत असताना मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दिढ किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घयायचो.रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची, रतांब्याची, फणसाची झाडें होती, या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते. माझे मित्र मोठया आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे पण मी मात्र या जांभळी खाली थांबायचो. त्या झाडाच्या सावलीखली दोन मिनिटे थांबून आम्ही पुन्हा चालू लागायचो किंवा सायकलवर पुन्हा बसायचो.

जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे का कोण जाणे पण माझे लक्ष असायचेच. जानेवारी महिना आला की झाडाला पालवी फुटायची, हिरवीचुटुक पालवी, मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबळी होतं, जासजस उन्हाळा वाढू लागला की तांबडी जांभळे काळी होतं.

या झाडाला घोसाने जांभळे लागत. जांभळे पिकली की काळिभोर जांभळे टपटप खाली पडत, मग खाली भटकी कुत्री जमत आणि जांभळे खात आणि मे अखेर पर्यत धस्थपूष्ठ होतं.

आम्ही मित्र पण जांभळी खाली जमायचो, आमच्यातील माझ्यासकट सर्व झाडावर चढायचे.पिशवीभर जांभळे काढायचो आणि घरी नेऊन घरच्याना दयायचो. जांभळीचे झाड अत्यन्त कोरम असते, त्याच्या फानदी वरुन आम्ही कधी ना कधी पडून हात, ढोपरे मोडून घेतली आहेत.

मी वकिली शिक्षण मुंबईमध्ये घेतले आणि पुन्हा आमच्याच या तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो. पुन्हा घरून याच रस्त्यावरून जाऊ येऊ लागलो जातायेता या झाडावर माझे लक्ष असेच.

गाव वाढले, वस्ती वाढली, लोकांनी लांब घरे घेतली. त्या झाडाखाली आता भाजीवाली, फळवली बायका बसू लागल्या.मी मुद्दाम जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी, कधी शेंगा, कधी आंबे घेऊ लागलो. माझ्या बरोबर कधी कधी बायको असायची ती पण भाजीवल्या मावशीच्या ओळखीची झाली.

एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो, तशी भाजीवाली मावशी मला सांगायला लागली 

“भाऊंनू, आमका आता दुसरी जागा बघूची लकतली ‘

“कशाक?

“ह्या जागेची मोजणी सुरु आसा दोन दिवस, रस्त्याच्या रुंदीकरण सुरु होतला. ही झाडा पण तोडतले म्हणतात ‘.

“काय, झाडा तोडतले? म्हणजे ही जांभळी पण..

“होय तर, ह्या जांभळीवर पट्टे मारलेत ते काय, सरकारचे म्हणून ‘.

मला एकदम टेन्शन आले, गेली कित्येक वर्षे या इथे जांभळीला पहायची सवय, ते झाड तोडणार? मग या झाडावरची जांभळे खाणाऱ्या पक्षी, कावळे, कुत्री, आम्ही माणसे यांनी काय करावे? या झाडा पासून मिळणारी सावली, आमच्यापासून हिरावून नेणार?

मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली. तेथल्या अधिकाऱ्याने मला तेंच उत्तर दिले

“वाहने खुप वाढली आहेत, सध्याचा रस्ता पुरा पडत नाही, रुंदीकरण करायला हवे, असे सरकारचे म्हणणे, मोजणी झाली आहे. पुढील महिन्यात काम सुरु होईल, त्यामुळे झाडें तोंडावीच लागतील,’.

मी दोन दिवसांनी जिल्हा कलेक्टरना भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या हवाली केले. कलेक्टरसाहेबांचे तेंच म्हणणे. त्या भागात आता वस्ती वाढली आहे. याच  रस्त्यावरून हायवे कडे जाता येते, त्यामुळे रुंदीकरण करावेच लागेल.’.

कोणीच दिलासा देत नाही हें पाहून मी कोर्टात सरकार विरुद्ध दावा ठोकला. मी स्वतः वकील होतोच.कोर्टाचा निकाल लागेपर्यत रुंदीकरण थांबले.

शेवटी कोर्टात केस उभी राहिली. सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्या नंतर मी कोर्टाला म्हणालो “रस्ता रुंदीकरण करणे आवश्यकच असेल तर करा पण झाडें का तोडता?

माननीय कोर्टाने मला विचारले “वाटेल आलेली झाडें तोडल्याशिवाय रुंदीकरण करणे शक्य आहे काय? तुम्हाला झाडें तोडू नये असे वाटतं असेल तर झाडें उचलून दुसरीकडे लावा’.

“हें कसे शक्य आहे? मी विचारले.

कोर्ट म्हणाले “शक्य आहे. काही देशात झाडें कुपळून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात, तुम्ही हवे असल्यास माहिती घ्या ‘.

मी विचार केला आणि कोर्टाला विचारले “मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो, त्याची परवानगी द्यावी ‘.

कोर्टाने मला जांभळीचे झाड न तोडता दुसरीकडे लावायची परवानगी दिली.

 मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेज मधील biology चे प्रोफेसर वर्दे यांना भेटायला गेलो.

वर्दे यांना विचारले “असे झाड जमिनीतून कुपळून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणे शक्य होते काय?

“होय, हल्ली परदेशात मोठमोठे वृक्ष कुपळून ते दुसऱयाठिकाणी लावली गेली आणि ती जगली, अशी उदाहरणे आहेत.’

वर्देनी मला या संबधी माहिती असलेली पुस्तके दिली.

मी घरी आलो आणि बायकोला मी जांभळीचे झाड रस्त्यावरून काढून आपल्या आवारात लावतो आहे, असे सांगितले.

बायको माझ्यावर चिडली. असले नको ते धंदे का करता, अशी झाडें कधी जगत नाहीत ‘असे सांगून माझा हिरेमोड करू लागली. मी तिला सांगितले “लहानपणा पासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना, त्याला जांभळे लागताना, त्या झाडाची जांभळे खाताना मी पाहिले आहे. ते झाड तोडून त्याचे सरपण करावे, हें मला पाहवणार नाही.

माझा हा कदाचित वेडेपणा असेल कदाचित पण माणसाने कधीतरी वेडेपणा करायला हवा. मी तो करणार आहे. तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण मला या वेडापासून दूर नेऊ नकोस ‘

माझा स्वभाव माहित असल्याने बायकोने बडबड केली आणि ती गप्प बसली.

मग मी कामाला लागलो. माझ्या ओळखीच्या शिवा लमाणीला बोलावले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली. त्याच्या माणसानी जागा साफ केली आणि चार बाय चार खड्डा खणला. त्यात जुना पालापाचोळा, शेणखत आणि मुंगीची पावडर टाकली. सतत दोन दिवस पाणी त्या खड्ड्यात ओतले आणि माती भुसभूशीत केली. 

मग आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला. कुदली फवडीने झाडाभोवती खणत आणि कमीत कमी पाळे तोडून दहा कामगारांनी झाड बाहेर काढले आणि ट्रॉली मध्ये ठेवले.मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली.

घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.

– क्रमशः : भाग पहिला

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची शक्ती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “मनाची शक्ती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज तुम्हाला एक सत्य कथा सांगणार आहे ऐका…. 

ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती .येता जाता बोलून सगळ्यांशी तीची  मैत्री झाली. काही दिवसातच कळलं की ती तथाकथीत सुधारणावादी  मताची आहे. अध्यात्म, पूजा मंत्र, स्तोत्र काही  न.. करणारी …सडेतोड बोलणारी आहे.

तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या. हळदी कुंकवाला बोलावलं तर साडी नेसून येऊन जायची पण नंतर तिच्या कॉमेंट्स सुरूच असायच्या….   “तुम्हाला कंटाळा  कसा येत नाही  हे सगळं करत बसायला? तासंतास कस ग बसता त्या पोथ्या परत परत  वाचायला? तीच तीच स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला ?…नवीन काहीतरी जरा वाचा….”

आईने दिलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तिने डब्यात ठेवून दिली होती. हे तिनेच आम्हाला सांगितले.

पहिले काही दिवस यावरून गरमागरम चर्चा व्हायची. ती त्याला ठामपणे उत्तर द्यायची. काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये …मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर बोलायचं नाही. मैत्रीण म्हणून ती छान आहे ना मग झालं …..

असू दे …आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्याप्रमाणे तो वागत असतो.अस सुरू होत.. बरीच वर्षे झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली..

नंतर  एके दिवशी तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला.. 

ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं .नवऱ्याने प्रकरण गंभीर आहे हे ओळखलं .ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता .अगदी माइल्ड होता.. आणि लगेचच ऍडमिट केल्याने फार फायदा झाला.

हळूहळू सुधारणा होईल डॉक्टरांनी सांगितले .तरी बरेच दिवस ती दवाखान्यात होती . 

नंतर बरी झाली पण उच्चार इतके स्पष्ट येत नव्हते.

तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी डॉक्टरांनी औषधं कशी घ्यायची खबरदारी काय घ्यायची हे नीट समजावले .आणि सहज म्हणाले..

“अजून एक तुम्हाला सांगू का ?घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो .

प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त  झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम…”

डॉक्टरांचे ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. डॉक्टर असं काही सांगतील असे तिला वाटलेच नव्हते. 

“हो हो” असं त्यांना म्हणाली .

घरी आल्यानंतर चार दिवसांनी तिच्या  मनात  काय आले कोण जाणे? डॉक्टरांनी स्वतः  सांगितले आहे तर हा उपाय पण करावा असे तिला वाटले. फोन करून तिने मला हे सांगितले.

“तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं…”

 तिला म्हटलं  “अग तुला बरं व्हायचं आहे. आता बाकी काही  बोलु नकोस. माझ्याकडे सज्जनगडावर रामदासीबुवांनी  म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे. ती तुला पाठवते. ती तू ऐक .कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचे पुस्तक अगदी पाच दहा रुपयात मिळेल. ते आणून घे आणि बघून  म्हण….”

 तिचा गळा दाटून आला होता…. “नीता”.. एवढेच ती म्हणाली 

” राहू दे उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस.मात्र शांतपणे ,श्रद्धेने, मनोभावे म्हणत रहा.  तुझा विश्वास नाही हे माहित आहे. तरी बरं होण्यासाठी तरी कर..  हा फिजीओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज …  थोडे दिवस करून तर बघ मग  आपण निवांत बोलू “तिला म्हणाले.

काही दिवसांनी तिने मला भेटायला बोलावले . 

“हे बघ”  ती म्हणाली 

बघितले तर चक्क… छोट्याशा देवघरात बाळकृष्ण अन्नपूर्णा ठेवले होते. शेजारी समई मंद तेवत होती .समोर दोन निरांजन तबकात होती. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फुलं वाहिली होती. शेजारीच रामाचा फोटो होता .त्याला मोगऱ्याचा गजरा घातला होता. मी बघतच राहिले.

ती म्हणाली

“काय झालं माहित नाही… पण ऑनलाइन हे सगळं मागवलं अंतरंगातूनच काहीतरी वाटलं असं करावं ..खरंच ग… खूप शांत समाधानी वाटतं आहे .तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं. इथे समोर बसून   रामरक्षा म्हणताना काही तरी भारल्यासारखं  वेगळच वाटत होतं .मला ते तुला शब्दात सांगता येणार नाही.”

” राहू दे गं …तु ते अनुभवलसं बरी झालीस हे महत्त्वाचं. आता तू पण हा आनंद घे.”

तिला पसायदान ,मनाचे श्लोक आणि हरीपाठ अशी पुस्तकं दिली .

तिचे डोळे भरून वाहयलाच लागले होते ……असु दे होत कधी असंही…

ती पूर्ण बरी झाली याच श्रेय डॉक्टरांनाच आहे.  मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने  मानसिक आधार दिला …पूजा  ,जप ,स्तोत्र पठण यासाठी तर करायचे असतात. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात .पण त्याचा हात हातात असू द्यायचा. तो सांभाळतो.. कोणीतरी एका अदृश्य शक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेवायचा . 

जमेल तशी साधना करायची . श्रद्धेने भक्ती करायची.त्याने मन खंबीर बनतं.दोघांचा मेळ जमला की  मग शरीरही बरं होण्यासाठी  साथ देतं .

डॉक्टर तर तिला  म्हणाले होते .. “काहीही येत नसेल तर नुसती बाराखडी तरी म्हणा.”

नाहीतरी श्रीकृष्णांनी तेच तर  सांगितले आहे .

अगा बावन्न वर्णा परता

कोण मंत्रु आहे पांडूसुता

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– ‘‘पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा’’— लेखक – श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा’’— लेखक – श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा…

(पु. ल. स्मृती)

गेले काही दिवस पुलंविषयी  बरंच काही छापून आलं, बोललं गेलं, दूरदर्शनवरही दाखवलं गेलं. आज मी आपणास ‘पुलं आणि माझे वैयक्तिक संबंध याविषयी चार शब्द सांगणार आहे.

प्रत्यक्ष मुद्यावर येण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

पुलंचे आजोबा, श्री. वामन मंगेश दुभाषी यांच्या कुटुंबियांची कारवारला एक चाळ होती. त्यात आम्ही लहानपणापासून भाडेकरू म्हणून रहात होतो. १९४० साली मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मी व माझी थोरली बहीण मुक्ता, दोघे प्रथम मुंबईला आलो. त्यावेळी कारवारला मॅट्रिकचे सेंटर नव्हते. आल्या आल्या, वडिलांच्या सांगण्यावरून वामनरावांना भेटण्यासाठी आम्ही दोघे पार्ल्याला त्यांच्या राहत्या घरी गेलो असताना त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ची त्यांनी, मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाची एक प्रत आम्हाला बहाल केली. वामनराव खरोखर विद्वान असून, संस्कृत पंडित होते. तसेच उत्तम चित्रकारही होते. त्यांनी घरातल्या भिंतींवर रामायण, महाभारतातील काही प्रसंग उत्तम तर्‍हेने चितारले होते. त्यावेळी मी अवघा १७ वर्षाचा होतो व पुलं माझ्याहून फक्त दोन वर्षानी मोठे. तरीही तोवेळपर्यंत माझा व पुलंचा परिचय मुळीच नव्हता.

पुढे १९४२ मध्ये मी वांद्र्याला राहायला गेलो. तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला आणि मी सेवादल सैनिक म्हणून सेवादलात दाखल झालो. इथंच प्रथम पुलंची ओळख झाली व हळूहळू स्नेहात रूपांतर झालं.

१९४२ च्या चळवळीत सेवादलातर्फे, जनजागृतीसाठी म्हणून त्यावेळी पुलंनी ‘पुढारी पाहिजे’ नावाचा वग लिहिला. सुदैवाने त्यात काम करण्याची संधी मला मिळाली. तमाशाच्या तालमी पुलंच्या राहत्या घरी पार्ल्याला होत असत. ते राष्ट्रप्रेमाने भारावलेले दिवस होते. रात्रौ १२-१२ वाजेपर्यंत तालमी चालत. पुलंच्या दिग्दर्शनाखाली आमची चांगलीच तयारी झाली व लवकरच आम्ही सेवादलातर्फे महाराष्ट्राचा दौरा यशस्वी केला. त्यातील एका शेतक-याचा रोल माझ्या वाट्याला आला होता. माझ्या नावावरून ‘पुलं’नी त्यात एक गाणे रचले होते. त्याची सुरुवात अशी होती,

“शंकरभटा, लवकर उठा,

जागा झाला शेतकरी,”

वगैरे… हा तमाशा साऱ्या महाराष्ट्रात अत्यंत गाजला.

त्याच सुमारास, नामवंत समाजवादी पुढारी ना. ग. गोरे, S.M. ऊर्फ अण्णा जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्यासारख्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांचा पुलंना आशीर्वाद लाभला व त्यातूनच अशा थोर मंडळींची ओळख होण्याचे सद्भाग्य आम्हालाही लाभले.

पुढे १९४९ च्या जून महिन्यामध्ये मी माहीमला ‘सारस्वत कॉलनीत’ राहायला आलो. योगायोगानं पुलंची थोरली बहीण वत्सला पंडित सारस्वत कॉलनीत राहायला आल्या. मी ४ थ्या मजल्यावर व पंडित कुटुंब ५व्या मजल्यावर. पुलंचं अधूनमधून बहिणीकडे येणंजाणं असायचं व अशावेळी आम्ही पुलंना आमच्याकडेही बोलवत असू. माझी धाकटी मुलगी पद्मजा त्यावेळी ४-५ वर्षाची होती. तिचा आवाज चांगला असल्यामुळे वत्सलाताई तिच्याकडून गाणी म्हणून घेत असत व तिचे कौतुक करीत. जा पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई मुलीकडे आल्या म्हणजे आमच्याकडे आल्याशिवाय राहत नसत. त्याही पद्मजाकडून गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. तसंच माझी थोरली मुलगी उषा हिला मी वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहून दिलेले, “आम्ही विद्यार्थी म्हणजे समाजाचे आरसे” वगैरेंसारखे विविध विषयावरचे लेख, पुलंच्या आई, “मी भाईला हे वाचून दाखवते”, असे म्हणून कौतुकाने घरी घेऊन जात. आणि दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक घेऊन येणाऱ्या उषाला बक्षिसानिमित्त भरपूर पुस्तके देऊन कोडकौतुक करीत. दुसऱ्याचे मनापासून कौतुक करण्याचा हा वारसा पुलंना आईकडूनच मिळाला असावा.

पुढे १९७४ मध्ये मी माहीमच्याच ‘अव्हॉन अपार्टमेंट्स मध्ये राहायला आलो. इथे आल्यावर माझ्या नव्या घरी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनीही आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. त्यावेळी ते एन.सी.पी.ए.’चे डायरेक्टर इनचार्ज होते. त्यांचे जवळचे नातेवाईक अत्यंत सिरीयस असल्याने अर्ध्या तासाहून अधिक वेळ ते आम्हाला देऊ शकणार नाहीत या पूर्वअटीवर ते आले. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बजावलं की, “अर्धा तास झाल्याबरोबर बोलवायला यावं. अर्धा तास होताच ड्रायव्हर आला. पण पुलं पूर्णपणे रमले होते. त्यांनी त्याला अजून एका तासाने यायला सांगितलं, पद्मजाकडून २ गाणी म्हणून घेतली. पंडित अभिषेकींचं, ‘शब्दावाचून कळले सारे’ आणि आणखी एक गीत तिने गायलं. ही ऐकून पुलं खूप खूष झाले. ते म्हणाले, “ही मुलगी पुढे मोठ्ठी गायिका होईल.” पंचवीस वर्षापूर्वीचे भाईंचे हे भाकीत किती खरे झाले हे पाहून पुलं हे एक उत्तम द्रष्टे होते असे म्हणता येईल. तिचं गाणं ऐकून त्यांनी लगेच फर्माईश केली, “पेटी काढा’. पेटीवर मस्तपैकी बालगंधर्वांची दोन नाट्यगीते व दोन राग वाजवून त्यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बोटातील जादू अवर्णनीय अशी होती.

हॉस्पिटलमधून निरोप आल्याने आता मात्र जाणे भाग होते. तब्बल दीड तास कसा निघून गेला कळलंच नाही. पुढे त्यांनी रागदारी संगीत पेश करण्यासाठी NCPA वर पद्मजाला संधी दिली. प्रयोग छानच रंगला.

कालांतराने पुलं पुण्याला स्थाईक झाले आणि माझा फारसा संपर्क राहिला नाही. तरीदेखील पद्मजा ज्या ज्या वेळी पुण्याला जात असे तेव्हा पुलंना भेटल्याशिवाय रहात नसे. तेव्हाही ते आणि सुनीताबाई तिच्याकडून दोन-चार गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. माझ्या कुटुंबाचीही चौकशी करीत. त्यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांच्या मातोश्रींप्रमाणे ते सुद्धा आम्हां सर्वांशी कारवारी कोकणीत बोलत.

असा हा- विनोद सम्राट, हास्य रसाचे गिरसप्पा, कवी, लेखक, गायक, नट, चित्रपट निर्माता, दानशूर, बहुरुपी आनंदयात्री आम्हाला कायमचा सोडून गेला आहे. मागे उरली आहे अपेक्षा- समस्त मराठी आठ कोटी बांधवांची त्यांच्याच कवितेच्या ओळी उद्धृत करून मी म्हणतो –

“पाखरा, जा त्यजुनिया, प्रेमळ शीतल छाया,

भेटूनि ये गगनाला,

बघुनि ये देव लोक सारा

विश्व अपार, हृदयी संचित घेऊनि

परतूनी ये घरा

परतूनी ये घरा…”

हे पुरुषोत्तमा, पुन्हा जन्म घेऊन येशील ना?…

लेखक : श्री. शंकर फेणाणी 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवणाचा डबा… लेखिका : नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ शिवणाचा डबा… लेखिका : नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

परवा मी काहीतरी उसवलेलं शिवत होते.

सुईदोरा पाहिला आणि नात(वय वर्षे ८ ) म्हणाली ,”आजी काय करतेस ?”

मी म्हटलं, “अगं आजोबांच्या पॅंटचा काठ उसवलाय  तो शिवतेय.”

मग तिचे प्रश्न काय संपतायत ?

उसवलं म्हणजे काय ? काठ म्हणजे काय ?

मग सगळं शिस्तवार समजावून सांगणं आलं. पण त्याचा एक फायदा झाला. 

ती म्हणाली,” मला शिकव ना.”आणि लगेच एक कापडाचा तुकडा घेऊन आली . 

चला हे ही नसे थोडके म्हणून मी पण लगेच सुई ओवण्यापासून सगळं शिकवलं आणि माझं गुणी बाळ पण लक्ष देऊन पहात होतं.

मग तिला हेम म्हणजे काय? धावदोरा म्हणजे काय? उत्साहाने सगळं सांगितलं आणि खरंच तिने सांगितल्याप्रमाणे इतका छान प्रयत्न केला ना .. हेम,  धावदोरा घालायचा… मला तर भरुनच आलं. 

शाळेला सुट्टी त्याचा एवढा फायदा झाला याचाच मला आनंद . आता त्याचा प्रत्यक्ष उपयोग कधी होईल देवास ठाऊक .कारण हल्ली ब्रॅंडेड कपडे उसवतही नाहीत आणि फाटतही नाहीत.  वाढत्या वयामुळे लवकर लहान मात्र होतात . 

पण आपल्या लहानपणी शिवणकाम शिकताना जगण्याचे संस्कार होत होते , मुलामुलींच्या मनावर. 

कारण शाळेत ५वी ते ७ वी शाळेत शिवण विषय असायचा. धावदोरा, हेम घालणं, काजं करणं, बटण लावणं (तेव्हा हूक नव्हते.) या प्राथमिक गोष्टी शाळेतच शिकायला मिळाल्या . आणि वार्षिक परिक्षेत त्याचे % टक्क्यांमध्ये भरघोस मार्क वाढायचे हा आनंद जास्त!

फार पूर्वी तर घरी हातानेच कपडे शिवायची पद्धत होती . मला आठवतय माझी आजी पांढरी चोळी (त्यावेळेस बायका पोलके किंवा ब्लाऊज म्हणत नसत. )घालायची आणि ती स्वत : शिवायची हाताने! आणि ती चोळी ८ तुकड्यांची असायची. वितीने माप घेऊन कसं तिला बरोबर साधायचं…. आता खरच कमाल वाटते . .. पण अडून राहणच नाही हा मला वाटतं पहिला संस्कार असावा बाईवर .कुंची, लंगोट, दुपटी, झबली (आता ही नावंसुद्धा वापरातून बाद होतील बहुतेक. ) घरीच शिवायची . आजीमुळे हे शिकायला मिळालं . 

शिवणाच्या डब्यात बारिक जाड सुया, खाकी पॅंटची आणि इतर मोठी बटणं, प्रेस बटणं, रिळं याचा संग्रह असायचा .माझ्या डब्यात आता गरजेप्रमाणे इलॅस्टिक, वेलक्रो अश्या गोष्टीही सामावल्यात .  

अजूनही या सुई दो-याने शिवण्याचा, सिनेमात फक्त हिरो हिरॉईनचा रोमान्स दाखवताना, हिरोच्या जवळ उभं राहून त्याच्या  अंगातल्याच शर्टाला बटण लावायचा सीन हमखास दाखवला जातो . जो प्रत्यक्षात कधी नसतोच . नवरा एकतर पटकन शर्ट काढून देईल किंवा दुसरा शर्ट घालेल. 

आताच्या मुली असा डबा ठेवत असतील का ?आणि किती जणींना याचं ज्ञान असेल ? अपवाद असतीलच . 

त्यामुळे या ज्ञानातून जे आज्यांकडून (मौलिक ?)विचार ऐकायला मिळायचे ते संपलेच … 

१. अगं एक टाका वेळेवर घातला तर पुढचे १० टाके घालायचे वाचतात . 

२. अगं थोडी चूण घालावी गं कपड्यासारखी मनाला . 

३ अगं कपड्यासारखी अलगदपणे माणसं जोडता आली पाहिजेत गं बाळा.

४ .धागा उसवला म्हणून कुणी कपडा टाकून देतं का ? तसंच नात्याचं आहे बयो, टाका घालून जोडता आलं    पाहिजे गं .

५ .बाईच्या जातीला शिवण टिपण आलं पाहिजे गं बाई, तिलाच तर सारं जोडायचं आणि बांधून ठेवायचं  असतं संसारात . 

.. .. असे संवाद संपलेच की आता . दुपारच्या वेळी माजघरात शिवण टिपण करत बायका एकमेकींशी सुखदुखाच्या गोष्टी  बोलतायत, हे दृश्य फक्त सिनेमात किंवा  फोटोत दिसेल आता. आता वेळ कुणाला आहे जोडाजोडी करायला ? आणि लागतंच नाही असं काही करायला . सगळं रेडीमेड मिळतच की, 

.. .. आणि माणसांचं म्हणाल तर ते फारसं  महत्वाचं नाही. कुणी आलं बरोबर तर ठीक आहे ..   त्याच्यासह,…  नाहीतर ठीक आहे , त्याच्याशिवाय . फक्त धावायचं असतं प्रत्येकाला . 

पण अजूनही निरागस मनाची नातवंडं आजूबाजूला असतील  ना तर नक्की आजीने टाके घालून जोडायचं कौशल्य शिकवत राहावं. कुणी सांगावं काळ फिरुन येईल  आणि काळाची गरज म्हणून  ( कपडे आणि नाती जोडायला )  परत या गोष्टी करायला शिकवेल. तेव्हा आपली आठवण निघेल.

— तोपर्यंत आपण आपला शिवणाचा डबा त्यातील सर्व सामानासकट जपून ठेवू या. आपण एवढं तर करूच शकतो . 

लेखिका :   सौ . नीलिमा लेले

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गोष्टी शाळेतल्या प्रवेशाच्या…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गोष्टी शाळेतल्या प्रवेशाच्या…” ☆ सुश्री शीला पतकी 

जून महिना सुरू झाला की शालेय प्रवेशाची लगबग चालू होते माझ्या सेवा सदन प्रशालेत संस्थेला वसतिगृह असल्याने आसपासच्या ग्रामीण भागातून बऱ्याच ऍडमिशन येत असत अर्थात वस्तीगृहालाही संख्येची मर्यादा होतीच…. 64 सालापासून वसतिगृह चालू आहे त्याला एक चांगली परंपरा आहे नाव आहे मुलींच्या सुरक्षिततेची हमी आहे त्यामुळे पालकांचा ओढा सेवासदन मध्ये प्रवेश घेण्यासाठी नक्कीच असतो त्याप्रमाणे एक पालक त्यांचे वडील आणि मुलगी असे तिघे प्रवेशाला आले वसतीगृहा मध्ये त्यांना सांगण्यात आलं की शाळेत ऍडमिशन असेल तरच आम्ही वस्तीगृहात प्रवेश देऊ त्यामुळे ते शाळेच्या ऑफिसमध्ये गेले इयत्ता सहावी मध्ये ऍडमिशन हवी म्हटल्यानंतर क्लार्कने सांगितले की मधल्या वर्गांमधून ऍडमिशन नसतात आमच्या मूळ पाचवीतून येणाऱ्या मुलींमुळे  संख्या भरलेल्या असल्यामुळे आम्ही तिथे ऍडमिशन देऊ शकत नाही …..ते गृहस्थ थोडे नाराज झाले ते म्हणाले मुख्याध्यापकांना भेटू का..? क्लार्क म्हणाले  भेटा हरकत काहीच नाही पण अवघड आहे. त्यानंतर ते माझी वाट पाहत थांबले मी अकरा वाजता ऑफिसमध्ये आले कारण सुट्टीचे दिवस होते सुट्टीत आकारात एक ऑफिस असे आल्याबरोबर ते आत मध्ये आले म्हणाले माझ्या मुलीला ऍडमिशन हवी आहे आणि इयत्ता सहावी मध्ये असल्यामुळे तुमचे क्लार्क नाही असे म्हणतात आणि वस्तीगृहात प्रवेश शाळेत ऍडमिशन झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे तिथे ऍडमिशन होत नाहीये मी म्हणलं अगदी बरोबर आहे पाचवी आणि आठवी मध्ये फक्त ऍडमिशन चालू आहेत अन्य वर्ग भरलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला ऍडमिशन देऊ शकत नाही ते म्हणाले नाही बाई बघा ना एखादी विद्यार्थिनी करून घ्या असा त्यानी आग्रह धरला मी म्हणाले.. बसायलाच जागा नाहीये वर्गामध्ये पन्नास संख्येचा वर्ग आहे आमची शाळा जुनी आहे तिथे आम्ही 65 विद्यार्थ्यांनी बसवतोय आता यापेक्षा किती जास्त मुली बसवणार…? त्यांच्याबरोबर आलेल्या आजोबांनी मला गळ घातली ताई असं करू नका बघा आम्ही ग्रामीण भागातन आलोय मी म्हणलं आजोबा खरोखर जागा नाही हो ते मला म्हणाले नाही आम्ही शेतकरी माणसं पोरीला शिकवावं म्हणत्यात म्हणून शिकायला आणलं इथं तुमची शाळा चांगली आहे पोरगी हुशार आहे बघा जरा काहीतरी.. मी त्यांच्यापुढे ऍडमिशनचा तक्ता टाकला आणि म्हणाले हे पहा याच्यामध्ये एवढ्या संख्या आहेत मी कुठे बसवणार आता मात्र ते समोरचे पालक थोडे रागावले उठून उभे राहिले ते जरा एका पायाने लंगडत होते ते खुर्चीला घरून बाजूने माझ्या खुर्चीच्या बाजूला येऊन उभा राहिले आणि म्हणाले बाई मी सैनिक आहे पायामध्ये माझ्या गोळी घुसलेली त्यामुळे निवृत्त करण्यात आलेले आहे बॉर्डरवर माझ्या पायात गोळी लागली मी जायबंद झालो आज ही माझ्या पायात गोळी तशीच आहे मला असंख्य वेदना होत आहेत पेन्शन मला मिळते पण आता मी वडिलांबरोबर शेती करतो. मी वडिलांच्या बरोबर जाण्याच्या ऐवजी वडील माझ्याबरोबर येतात हे दुर्दैव आहे आम्ही या देशासाठी सीमेवर गोळ्या झेलतो तुम्ही आमच्या एका मुलीला ऍडमिशन देऊ शकत नाही फक्त 7 डिसेंबर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तुम्हाला आमची आठवण येते का?.. मी त्यांचं बोलणं मुकाट्याने ऐकून घेत होते ते व्यथीत होऊन खुर्चीत येऊन बसले मी त्यांना पाण्याचा ग्लास दिला फोन करून ऑफिस मधल्या क्लार्क ला बोलून घेतलेम्हणाले ऍडमिशन फॉर्म घेऊन ये क्लार्क कडून त्या मुलीचा ऍडमिशन फॉर्म भरून घेतला वस्तीगृहाकडे निरोप दिला अमुक अमुक मुलीची ऍडमिशन झालेली आहे तुम्ही तिला वसती गृहा मध्ये प्रवेश द्या… मी त्यांच्यासाठी चहा मागवला आमच्या क्लार्क ला काही कळेना की एवढी गर्दी असूनही बाईंनी ऍडमिशन कशी काय केली मी माझ्या पर्स मघून 125 रुपये काढले आणि क्लार्क बरोबर फॉर्म पाठवून दिला त्याला म्हटलं पावती करून आणून द्या आता ते आजोबा थोडेसे वरमले त्यांनाच वाईट वाटलं ते उठून हात जोडून म्हणाले ताई माझा मुलगा काही बोलला तर ते मनात धरू नका अहो त्याला अजून देशाची खूप सेवा करायची होती पण पायात गोळी गेल्यामुळे तो जखमी म्हणून परत आला आणि मग त्याची अशी चिडचिड होते त्याच्या वतीने मी माफी मागतो मी पटकन त्यांचा हात धरला म्हणला नाही आजोबा त्यांनी आज आमच्या डोळ्यात अंजन घातलाय मी त्यांची ऋणी आहे ते काय चुकीचं बोलले अगदी खरं आहे ते… जीवावर उदार होऊन माणसं तिथे लढताहेत म्हणून आम्ही इथे शांतपणे काम करतोय आणि त्यांचा अगदी खरयं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 6 डिसेंबर हे साजरे केले की आम्ही आमची जबाबदारी संपली असं समजतो पण देशाप्रती इतकं राबणाऱ्या माणसाला आपण थोडं प्रेमाने विचारलं पाहिजे ना..? त्याची मदत करायला हवी मी हा विचारच केला नाही माझं चुकलं आता यानंतर मी माझ्या प्रत्येक वर्गात सैनिकाच्या मुलीसाठी एक जागा नक्की ठेवेन आणि हा बदल तुमच्यामुळे झाला आहे हे माझ्या कायम लक्षात राहील नंतर त्या सैनिकांना  खूप वाईट वाटलं ते म्हणाले मॅडम माफ करा मी आपल्याला खरं तर हे बोलायला नको होतं पण मी बोललो पण केवळ माझ्या मुलीला तुमच्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा हीच भावना होती आपण राग मनात धरू नका.. मी म्हणाले छे छे मी मुळीच रागावले नाही आपण निष्काळजी रहा, मी या मुलीचा इथला स्थानिक पालक असते आपण याची कोणतीही काळजी करू नका त्या तिघांनाही मनःपूर्वक आनंद झाला मुलगी हुशारच होती त्यामुळे काही प्रश्न नव्हता… प्रत्येक जून महिन्यात मला.या प्रसंगाची आठवण येते आणि पायात गोळी असलेला तो सैनिक मला आठवतो ते उठले आणि प्रवेशासाठी संस्थेच्या ऑफिसमध्ये गेले जाताना मी त्यांना ऑफिसच्या दारापर्यंत पोहोचवायला गेले आणि खरोखर मी मनात त्या माणसाला सॅल्यूट ठोकला इतकं तर मला करायलाच पाहिजे होतं ना……..!

त्यानंतर माझे क्लार्क मला म्हणाले बाई सहावी तले प्रवेश संपलेत ना मग तुम्ही कसा दिला मी म्हणलं अनंता नियमापेक्षा जगात खूप गोष्टी मोठ्या असतात आणि नियम आपण बनवलेले असतात ते लक्षात ठेव तोही असं म्हणाला बाई तुम्ही ही ग्रेट आहात मी म्हणाले नाही आता लक्षात ठेव यापुढे प्रत्येक वर्गात एक जागा सैनिकांच्या मुलीसाठी ठेवायची आणि त्याने हसून मान हलवली

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कै. सुहास विनायक सहस्त्रबुद्धे, माझे पती, एक डॉक्टर म्हणून सेवाव्रती, अतिशय मृदू स्वभावाचे, 11 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाले आणि माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली!

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर ती जोडी अवतरते, तसे आम्ही दोघे संसारात बांधले गेलो. आमची दोन्ही घरे मध्यम परिस्थितीतील, शिक्षणाला महत्त्व देणारी, त्यामुळे माझ्या एम्.ए.पर्यतच्या शिक्षणानंतर स्वाभाविकच लग्नाचा विषय निघाला आणि डॉक्टर सुहास सहस्त्रबुद्धे ( एम बी बी एस्) हे स्थळ आल्यानंतर लवकरच आमचे लग्न झाले!

ह्यांच्याविषयी सांगायचे तर त्यांना मेडिकलला जाण्याची प्रथमपासूनच इच्छा होती. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करून त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवली. त्याचवेळी त्यांची इतर भावंडेही इंजीनियरिंगला, कॉमर्सला, अशी शिकत होती. माझ्या सासऱ्यांची सरकारी नोकरी होती. एकट्याच्या उत्पन्नात एवढ्या मुलांची शिक्षणे करणे खरोखरच अवघड होते. तरीही कै. मामा आणि कै.आई यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केली..

M.B.B.S. झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीचा विचार करता यांनी सर्व्हिस करायचे ठरवले आणि मेडिकल ऑफिसर म्हणून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ते रुजू झाले. तो काळ आणीबाणीचा होता. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करताना खूपच त्रास सहन करावा लागत होता. नवीन नोकरी असल्यामुळे रजा, सुट्टी मिळत नसे, पण चिकाटीने ह्यांचे काम चालू होते.  आणीबाणीतील आठ दिवसांच्या रजेत 20 फेब्रुवारी 1976 रोजी आमचे लग्न पार पडले!

पुढे तीन महिन्यानंतर म्हणजे मे महिन्यात आमचे  पाटण येथे बिऱ्हाड झाले.  संसाराची खरी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ह्यांची ओळख झाली.

ते नेहमी दवाखान्यात व्यस्त असत..तरी त्यातूनही सब सेंटर असलेल्या चाफळ, कोयना नगर या ठिकाणी दवाखान्याची व्हिजिट असली किंवा सातारला महिन्याची मीटिंग असली की जीपने आम्ही जात असू आणि तेवढीच ट्रीप करून येत असू. यथावकाश या संसारात मी ही रमले!

19 ऑक्टोबर 1977 रोजी  केदारचा जन्म झाला. आम्ही दोघेही त्याच्या बाललीलात रमून गेलो. ह्यांना लहान मुलांची खूप आवड, त्यामुळे केदार खूप लाडका !

पुढे शिरपूरला बदली झाली.नोव्हेंबर 1979 च्या दरम्यान कन्या- प्राचीचा जन्म झाला आणि आमच्या चौकोनाचे चारी कोन पूर्ण झाले!

1981 मध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ह्यांची मेडिकल ऑफिसर म्हणून बदली झाली. तेथे गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लॉटवर आम्ही घर बांधले व दवाखानाही सुरू केला. त्याच प्लॉटवर माझे धाकटे दीर – प्रकाश सहस्रबुद्धे यांचेही घर, दुकान होते. दोन्ही घरातील संबंध खूप छान होते. आता आमची दोन मुले, दिरांच्या दोन मुली, सासुबाई आणि आम्ही चौघे असे गोकुळासारखे नांदते घर झाले!

सिव्हिल हॉस्पिटल ला मेडिकल ऑफिसर म्हणून यांनी रक्तपेढीमध्ये असताना  खूप काम केले. रक्तदान शिबिरे आयोजित करणे, नियमितपणे  कॅंप घेऊन रक्त गोळा करणे , चाकोरी बाहेर जाऊन ही काही रुग्णोपयोगी कामे करणे हे  चालू असे. सिव्हिल हॉस्पिटल मध्येच ब्लड बँकेवर मेडिकल ऑफिसर, CMO, RMO अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम केले.हे काम करत असताना योग्य वेळी योग्य ते निर्णय घेणे त्यांना जमत असे.सर्वांशी मिळून मिसळून तसेच आपल्या पदाचा मान राखून ते काम करत असत.शांत स्वभावामुळे लोकांना त्यांचा आधार वाटत असे.याच काळात ओगलेवाडी, कवठेमहांकाळ,नांद्रे याठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून  त्यांनी चांगले काम केले.

सतत तीन वर्षे त्यांना शासनाचा उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळाला. हे सर्व करत असतानाच त्यांचे सोशल वर्क ही चालू होते. एड्स जागृतीच्या काळात अनेक संस्थांमध्ये व्याख्याने, शिबिरे वारंवार घेत असतच. कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी तेथे काम करत असलेल्या श्री. अडसूळ सर यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट केला. शंभर मुलींची निवड करून त्यांना वर्षभर योग्य आहार, टॉनिकच्या गोळ्या तसेच दर महिन्याला वैद्यकीय तपासणी अशा तऱ्हेने मदत करून त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये वाढ करता येते हे या प्रकल्पाने दाखवून दिले. तसेच एकल पालक असलेल्या, लांबून येणाऱ्या मुली निवडून त्यांना येणारा बसखर्च देणे व कॉलेजमध्ये येण्याविषयी प्रवृत्त करणे यासाठी दहा मुलींवर दरमहा लागणारा खर्च  स्वतः करून साधारणपणे पाच हजार रुपयांची मदत त्याकाळी त्यांनी केली.

नोकरीची बत्तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर  नातवंडांसाठी पुणे आणि दुबई असे वास्तव्य केले. लहान मुलांची आवड त्यामुळे  त्यांनी अत्यन्त आनंदाने  जमेल तेवढी मुलांना मदत केली. आमचे स्नेही, बापट सर तर त्यांना कौतुकाने “बालमित्र” म्हणत!कोणत्याही लहान मुलाला रमवण्याची कला त्यांना अवगत होती.. “आता उरलो उपकारापुरता” म्हणत म्हणत  2015 पासून ह्यांनी ” स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर” ला अगदी कमी मानधन घेऊन रोज तीन चार तास काम सुरू ठेवले होते.

कोरोनाच्या काळात तेथील काम बंद झाले होते. तसेच नकळत ह्यांना वयाची चाहूल जाणवू लागली होती..

गेल्या एक-दीड वर्षात घरातील काही दुःखद घटनांमुळे त्यांचे मन अधिकच हळवे झाले होते. त्या गोष्टीचा ह्यांच्या मनावर नकळत खोल आघात झाला..

तब्येत थोडीशी खालावली. तरीही ते आपला आहार, व्यायाम याबाबत खूप जागरूक होते.स्वत: मितभाषी होते पण सहवासात गप्पिष्ट माणसे लागत.त्यांना नातेवाईक आणि मित्रमंडळी त गप्पा ऐकायला आवडत असे.आणि एखादंच मार्मिक वाक्य बोलून ते वातावरण हलके फुलके ठेवत.

माझ्या साठी त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.. एक म्हणजे मला प्रवासाची आवड म्हणून यूरोप ट्रीप ला पाठवले! दुसरं त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या लेखनाला प्रोत्साहन देऊन माझी दोन पुस्तके प्रकाशित केली! दुसऱ्या साठी करणे हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा होता.

प्रथमपासूनच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अतिशय साध्या होत्या. शिळी भाकरी, दाण्याची चटणी आणि साईचं दही हा आवडता नाश्ता होता. जेवणामध्ये आमटीचे प्रेम फार होते. गोड पदार्थ जवळपास सगळेच आवडत असत पण “शिरा” हा त्यात अत्यंत आवडीचा! देवाची पूजा करणे हे आवडीचे काम होते. मन लावून देवपूजा करत असत, म्हणूनच की काय परमेश्वराने त्यांना जास्त त्रास होऊ न देता आपल्याकडे नेले. आमच्या घरात गोंदवलेकर महाराजांची भक्ती, सेवा केली जात असे. “श्रीराम” हा तारक मंत्र नेहमीच जपला जाई.

माझ्या संसारातील प्रत्येक आठवणीचा क्षण हा त्यांच्याशी गुंफलेला होता. आता क्षणोक्षणी ही आठवणींची माला माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि जन्मोजन्मी आमची साथ अशीच राहू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मला मंडईत जायला फार आवडते. हिरव्यागार ताज्या भाज्यांचे ढीग बघताना मनाला प्रसन्न वाटते. 

भाजी विकणारे ओळखीचे झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा आनंदही असतो. बरं हा नुसता आनंद नाही तर त्यांच्याकडून शिकायला पण  मिळते.

 

एक काका फक्त पालेभाज्या विकतात. त्या दिवशी गेले तर काका खुर्चीवर बसले होते. शेजारी एक टेबल मांडले होते आणि त्यावर पालेभाज्या निवडून प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवल्या होत्या .मला सांगायला लागले

 

“मुलांनी  हे सुरू केले आहे .पुढची पिढी आहे ..नवीन काही करायचं म्हणते करू दे. आता आपण जरा मागे राहूया असं ठरवलं आहे बघा..”

 

मुलगा उत्साहात सांगायला लागला “काकू तुम्हाला काही हवं असेल तर मला व्हाट्सअप करा. घरपोच निवडलेली भाजी आम्ही पुरवतो. माझे तीन मित्र मिळून आम्ही हे चालू केलेले आहे.”

 भाजीचं काम मुलाच्या हाती सोपवलं तरी त्याला मदत करत काका बसले होते. त्यांच्या या निर्णयाच मला अप्रूप  वाटलं. त्यांनी मला एक छान धडा दिला.

 

ऊन ,वारा ,पाऊस  झेलत ..एक आजी गेले कित्येक वर्ष विड्याची पानं विकत आहेत.  हळूहळू म्हाताऱ्या होत जाताना मी त्यांना पाहते आहे .मांडी घालून त्या बसलेल्या असतात. टोपलीत पानं सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेली असतात .देताना हळुवारपणे  हाताळतात. सैलसर बांधून देतात. मुक्तपणे खळखळून नेहमी हसत असतात.

कस जमत आजींना हे…..अस नेहमी माझ्या मनात येत.

 

एक कानडी भाजीवाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत .आपल्या मुलीच पुढे धंदा चालवणार आहेत हे त्यांनी ओळखले आहे.

त्यांच्या सावळ्या, तरतरीत ,हसतमुख अशा दोन मुली त्यांना मदत करतात. बारा वाजता त्यांची शाळा असते .पण सकाळी दोन तास त्या वडिलांच्या हाताखाली काम करतात. आनंदाने शांतपणे त्या भाजी वजन करून देत असतात .

मला त्या मुलींचे फार कौतुक वाटते. आत्तापासूनच त्या शिकत आहेत पुढे त्या निश्चितच यशस्वी होतील.

 

एक बाई स्वतःच्या शेतातली  भाजी घेऊन बसलेल्या असतात. बाकीच्या भाज्यांची पोती  नवरा होलसेल मध्ये विकतो. तोपर्यंत त्या भाजी विकतात.

भाजी विकून झाली की तिथेच मिळणार शेव, फरसाण ,गाठी ,चुरमुरे, फळं घेऊन ठेवतात.

” पोरा बाळांना आवडतं ना म्हणून घेऊन जायचं .

मला सांगत होत्या.

 

सगळ्यात शेवटी फुलं घ्यायला सरू कडे जाते .ती गेल्या गेल्या”या काकु”म्हणते.

तिथे एक माणूस चहा विकतो. अगदी दोन-तीन घोट मावतील असा त्याचा छोटासा कप आहे. तो चहा ती आग्रहानी पाजते. आज फुलं दिल्यानंतर तिने टपोरा गुलाब त्यात घातला .

“हा तुमच्या बाप्पाला …आणि त्याला सांगा सरूच्या नवऱ्याला जरा अक्कल दे..”

“हो ग केव्हाच सांगितलं आहे”

मग काय म्हणाला तुमचा बाप्पा……..

तो म्हणाला 

सरू   शहाणी ,समंजस सोशीक आहे. संसारासाठी कष्ट करतीय. असं म्हणून तुझं कौतुक करत होता.”

 

” नेहमीसारखं गोड गोड बोलून लावा मला वाटेला “….

असं हसत  ती म्हणाली. मी पण हसून घेतलं …

बाप्पाच्या हातात काही नाही हे तिला पण माहित आहे आणि मला पण…..

 

या सगळ्याजणी पहाटे उठतात.  मार्केट यार्डला जातात. तिथे फुलं,भाज्या घेतात .टेम्पोत बसून इथे येतात. रस्त्यावर बसून विकतात. किती कष्ट करतात. हा विचार केला की मी त्यांच्याकडून शिकते.

मग उगीच छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करत नाही .

 

मनात खूप संमिश्र भावनांची मंडई भरलेली असते ….

आजकाल ती फार  जाणवायला लागलेली आहे…

जीवन आनंदाने कसं जगावं हे शिकवणारे  माझे हे गुरु …

आसपास वावरत आहेत….

शिकत राहते त्यांच्याकडून…

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले मग आपण कोण?

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर

राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन याची परवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितली.

त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, दूर लांबवर नजर आणि डोळ्यात आशेची चमक. 

त्याने खाली लिहिले होते,” वियप्पु थुनियित्ता कुप्पयम. “… म्हणजे माझा शर्ट माझ्या घामाने विणला आहे.

त्याला म्हणायचे होते, ‘ मी जो इथवर पल्ला गाठलाय तो केवळ कष्टाने, घामाने.आणि अजून खूप पुढे जायचे आहे.’ 

आयुष्यात पुढे यायचे असेल तर कष्ट आलेच. गीतेत कृष्णही हेच सांगतो, 

“उद्धरेत आत्मना आत्मानम् ।”….. स्वतःच स्वतःचा विकास करत रहा. 

विकासाचा रस्ता कायम अंडर कंस्ट्रक्शन असतो. अडचणींचे दगड, धोंडे ओलांडावे लागणार

…  रफाल नडाल, २२ वेळा ग्रॅन्ड स्लाम जिंकला. उत्तम टेनिसपटू. तरीही अपूर्णतेची हुरहुर. 

मनात जिद्द…. दोन,तीन महिन्यापूर्वी बेडरिडन होता. त्याची हिप सर्जरी झाली होती. त्याला स्वतःला तो टेनिस खेळू शकेल की नाही याची खात्री नव्हती. पण मनात दुर्दम्य इच्छा.मे महिन्यात पॅरीसमधे फ्रेन्च ओपन खेळण्याची. आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरीसमधे खेळला.

कृष्ण गीतेत सांगतो ….. 

आत्मनः म्हणजे मन बलवान करा. 

मन याचा अर्थ अंतर्मन….  सबकाॅन्शस माईंड. 

या मनात चांगले विचार, सकारात्मक विचार पेरत रहा. 

या अंतर्मनाची शक्ती इतकी अफाट आहे की ते विचार सत्यात उतरतील.Thoughts will turn into things.

जाॅर्ज वाॅशिंग्टन गरीब होता. एका शाळेत शिपायाची नोकरी करीत होता.शाळा सुटायच्या वेळी घंटा वाजविण्याचे काम त्याचे होते. घंटा वाजवताना तो मस्करीत म्हणायचा,

“टण,टण,अमेरिकेचा प्रेसिडेंट वाॅशिंग्टन. ” .. हे रोज म्हणता म्हणता तो विचार त्याच्या अंतर्मनात 

आपोआप झिरपत गेला.तो झपाटून गेला. त्याच्या कामाची व्याप्ती वाढली व तो खरोखर अमेरिकेचा अध्यक्ष झाला.

जसा समुद्रावरचा वारा जहाजाला कुठल्याही दिशेने भरकटवू शकतो तसेच मनही भरकटते.

पण जहाजाचे शीड जहाजाची दिशा ठरवते तसेच उत्तम विचार हे मनाच्या तारूची दिशा ठरवतात. 

कृष्ण नंतर हे ही सांगतो, “ न आत्मानम्अवसादयेत् l “ 

… स्वतःची अधोगती करू नका…… स्वतःला कमी लेखू नका….. न्यूनतेची भावना नको. 

… आपल्यातल्या उणिवा ओळखून त्या दुरुस्त करा.

थोडक्यात उन्नती साधायची असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. थोडी रिस्क घ्यावी लागते.

परवा आय.पी.एल. मॅचमधे विराट कोहली इतका तगडा बॅट्समन असूनही त्याला जाणवलं की स्पिनर्स- -समोर त्याचा स्ट्राईक रेट कमी होतो आहे. ही त्याची उणीव भरून काढण्यासाठी त्याने पंजाबसमोर खेळताना रिस्क घेतली. त्याने स्लाॅग स्वीपचा सरावही केला नव्हता. तरीही त्याने तो शाॅट मनात इमॅजिन करून मारला व सिक्सर्स घेतल्या.

थोडक्यात  परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाच्यात बसवता आले पाहिजे.

स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे……. 

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares