मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहृदय— भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ सहृदय— भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(त्यांना काय हो कल्पना, की पोटचा मुलगा असा वागेल. मी मात्र एका क्षणात रस्त्यावर आले.)  इथून पुढे ——-

“तो मला वृद्धाश्रमात ठेवून निघून गेला तो गेलाच. मला  अगदी थोडे पेन्शन आहे, पण मला काय लागते हो?

याने दहा वर्षाचे पैसे भरून टाकलेत— मला आश्चर्य वाटते,हा माझाच का मुलगा? कुठे कमी पडलो आम्ही त्याच्यावर संस्कार करायला? जाऊ दे. नशिबाचे भोग म्हणायचे.” सुधाताई खिन्न होऊन म्हणाल्या– “ तुम्ही त्याच्याच वयाचे ना?

काल तुमची आई येऊन सगळ्या पेशन्टची किती मायेने चौकशी करून गेली. किती अभिमान आहे त्यांना तुमचा.

माझा मुलगा इतका विख्यात सर्जन असूनही, मी या सुखाला कायमची पारखी झाले आहे. एकदा विचारले सुद्धा,की अरे,असे का वागतोस बाबा ? काय चुकलंय आमचं? “ तर म्हणाला, “ काही नाही ग.पण आता मलाच काही इंटरेस्ट नाही, नाती उगीच जपत बसण्यात. माझा व्याप खूप वाढलाय, आणि मी  करतोय ना कर्तव्य?  मला अजिबात वेळ नाही सतत भारतात फेऱ्या मारायला. “ .. “आता यावर काय बोलणार सांगा.” डॉक्टरही अवाक् झाले हे ऐकून.

सुधाताई वृद्धाश्रमात गेल्या. एक महिन्याने चेकअप साठी आल्यावर, डॉक्टर विश्वास त्यांना म्हणाले, “ ताई, एक सुचवू का? आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही व्यवस्थापक म्हणून काम बघाल का?  वर्षाची एकटीची खूप धावपळ होते. सगळा स्टाफ सांभाळायचा, पेशन्टचे जेवणखाण, आणि इतर सगळीच  मॅनेजमेंटबघावी लागते..  खूप काम करावे लागते तिला. “

जरासा विचार करून सुधाताई म्हणाल्या, “ बरं. करुन बघते एखादा महिना.” 

दोन महिन्यांनी सुधाताईंनी काम बघायला सुरवात केली. त्यांनी हॉस्पिटलच्या किचनपासून सुरवात केली. मुळात त्या शिक्षक असल्याने त्यांना व्यवस्थापनाची उत्तम सवय होतीच ! गोड बोलून,नीट लक्ष देऊन, त्यांनी सगळा नोकरवर्ग  आपलासा केला. एका डायरीत त्यांना रोजचा खर्च, बिले,  लॉंन्ड्री ,सर्व लिहून काढायला लावले. चार महिन्यांनी वर्षाला ती डायरी दाखवली.

व्यवस्थितपणे लिहिलेली ती डायरी पाहून वर्षा थक्क झाली. सगळी उधळमाधळ थांबली होती. वेळच्यावेळी सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्या होत्या. जेवणाचा दर्जा कितीतरी सुधारला होता. जवळजवळ चाळीस हजार रुपये वाचले होते चार महिन्यात. रोज सुधाताई सकाळी ९ ला हजर असत, ते संध्याकाळी  सातला,सर्व मार्गी लावूनच जात.

डॉक्टर विश्वास आणि वर्षाने, सुधाताईना बोलावून घेतले. “अहो, काय हा चमत्कार करून दाखवलात तुम्ही !

केवढा खर्च होत होता पूर्वी ! आम्ही इतकं लक्ष देऊ शकत नव्हतो हो. केवढी बिले यायची किराण्याची, लॉन्ड्रीची. आणि स्टाफला किती सुंदर शिस्त लावलीत तुम्ही. पेशन्टही, जेवणावर खूष आहेत पूर्वीपेक्षा. सुधाताई, किती गुणी आहात तुम्ही. मी तुम्हाला ऑफर देतो, नाकारू नका. तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून रहायलाच या. आम्ही तुम्हाला अति होईल असे काम कधीच सांगणार नाही. फक्त देखरेख करायची तुम्ही. आम्ही तुम्हाला छान खोली देतो रहायला. आणि काम होईनासे झाले, तरी आम्ही तुम्हाला कायम सांभाळू— अगदी माझ्या आईसारखेच. मान्य आहे का? दरमहा तुम्हाला आम्ही पगार देऊच, तो तुमच्या बँकेत जमा होईल.”

सुधाताई थक्कच झाल्या. ही अपेक्षाच कधी केली नव्हती त्यांनी—

“ अहो डॉक्टर,मला कशाला पगार? आणि मी  राहीन की वृद्धाश्रमात. आणि तिथूनच येत जाईन ना रोज.” 

“ नको नको,ताई, तुम्ही इथेच राहा. माझ्या आईलाही तुमची छान सोबत होईल. तुम्हाला सांगू का, ही सूचना तिचीच आहे खरं तर. ती बघतेय ना तुम्ही केलेला बदल. परवा तुम्ही सिस्टरला चादरीचा हिशोब विचारला तेव्हा किती गडबडून गेली होती ती. निमूट सर्व चादरी मोजून जमा केल्या तिने. पूर्वी हे आम्हाला शक्य होत नव्हते हो.

माझ्या आईनेच हे बघितले आणि म्हणाली, ”अरे,तुम्ही सुधाताईंनाच विचारा की, त्या काम बघतील का ते.” 

सुधाताईंच्या डोळ्यात अश्रू आले.

“ जे काम माझ्या मुलाने करायला हवे, ते काम तुम्ही परकी मुले करताय, काय बोलू मी ? मी नक्की करीन हे  काम.

त्यात अवघड काय आहे ? पण डॉक्टर, एक शब्द द्या. या वयात आता पुन्हापुन्हा धक्के सहन होत नाहीत हो.

मला पुन्हा वृद्धाश्रमात नाही ना पाठवणार? नाही तर मी आहे तिकडेच बरी आहे.” 

डॉक्टर वर्षाच्या डोळ्यात पाणी आले. “ नाही हो सुधाताई,असं कसं करू आम्ही? एवढे मोठे हॉस्पिटल आहे आपले, तुम्ही आम्हाला कधीही जड होणार नाही. उलट तुमची केवढी मदतच होतेय आम्हाला. आणि आम्ही आणखी नोकर देऊ की तुमच्या मदतीला.”  सुधाताई तयार झाल्या या ऑफरला.

त्या गेल्यावर डॉक्टर विश्वासच्या आई म्हणाल्या, “ तुम्ही दोघांनी किती छान काम केलेत रे. शाबास. एका कर्तबगार बाईचा आत्मसन्मान तिला परत मिळवून दिलात. असेच कायम सहृदयतेने वागा रे पोरांनो ! विश्वास, तो अभय– मुलगा म्हणून अपात्र ठरला. पण तू आज नुसता डोळ्यांचा नाही तर मनाचाही डॉक्टर झालास बघ.” 

— विश्वास, वर्षा आणि त्यांच्या आईच्या डोळ्यातलं पाणीच खूप काही सांगून गेलं.

— समाप्त —

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहृदय— भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ सहृदय— भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

हॉस्पिटल मध्ये तुडुंब गर्दी होती. ओ पी डी तर ओसंडून वहात होती. डॉ. विश्वासने नर्सला विचारले, “ किती आहेत अजून लोक ग?”

” सर,आज तुम्हाला उशीर होणार घरी जायला.  पुन्हा उद्याची चार मोतीबिंदूची ऑपरेशन्स ठरली आहेतच.”

“ बरं, ठीक आहे. वरचं वर्षाबाईंचं काम आवरलं का. संपली का तिची ओ पी डी.? त्यांना म्हणावं एकदमच जाऊ आता “

“हो, बघते जाऊन. विचारते.”

सगळे  पेशंट तपासून झाले आणि एक बाई बसल्या होत्या, पण त्यांना मात्र घाई दिसत नव्हती. सिस्टरने त्यांना आत बोलावले. डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासले आणि म्हणाले, “ बाई, तुमचा एक मोतीबिंदू पिकलाय, त्याचे ऑपरेशन करावे लागेल. दुसरा डोळा  चांगला आहे.” 

बाई म्हणाल्या, “ हो,मला कल्पना आहे. पण डॉक्टर,खर्च किती येईल?मी वृद्धाश्रमात राहते, पण पैसे देईन मी तुमचे.  सवलत दिलीत, तर थोडे थोडे करून नक्की देईन. निम्मे आधी भरेन मी. “

डॉक्टरांनी त्यांच्याकडे बघितले.वृद्धाश्रमात राहण्याइतक्या त्या वृद्ध दिसत नव्हत्या. असतील साठीच्या आसपास.

“ बिलाचे बघूया नंतर.”डॉक्टर म्हणाले, “ पण तुमच्या बरोबर कोणी येणार आहे ना,ऑपरेशनच्या दिवशी?”

“ हो. माझी मैत्रीण येईल माझ्या बरोबर. पण तुम्ही मला ठेवून नाही ना घेणार? चार तासात सोडतात ना “ त्यांनी घाईघाईने विचारले ..

डॉक्टर हसले,आणि म्हणाले,” हो हो! तुम्ही चार तासात घरी जाल.” 

बाई अतिशय सभ्य सुसंस्कृत दिसत होत्या. डॉक्टरांनी काय तपासण्या कराव्या लागतील त्याची यादी दिली आणि  रिपोर्ट्स घेऊन बोलावले. बाई दोन दिवसात रिपोर्ट्स घेऊन आल्या. ते तपासून डॉक्टर म्हणाले, “ परवा आपण तुमचे करून  टाकू ऑपरेशन. चालेल ना?” 

“ पण सर, तुम्ही अजून पैशाचे बोललाच नाहीत. मी हे आत्ता  वीस हजारच देऊ शकते. मग दरमहा हजार देऊ शकेन. खात्री बाळगा, मी तुमचे पैसे बुडवण्याचे पाप करणार नाही.” 

“ ठीक आहे हो, चालेल. पण अजून मी तुमचे नावच विचारले नाही की.” 

बाई म्हणाल्या,” मीही सांगितले नाही. मी श्रीमती सुधा निमकर.” 

डॉक्टरांनी चमकून बघितले, “ बाई, अभय निमकर तुमचा कोण ?” 

“मुलगा !  तो इंग्लंडला मोठा सर्जन आहे.”

“काय सांगता सुधाताई? अभय तुमचा मुलगा आहे ?अहो,आम्ही एकाच कॉलेजातून डॉक्टर झालो .

माझा वर्गमित्र आहे अभय. तरीच मला तुम्हाला खूप पाहिल्यासारखे वाटत होते. मी खूप वेळा आलोय तुमच्या घरी.

जेवलोय सुद्धा तुमच्या हातचे अनेक वेळा. माफ करा हं, पण खूप वर्षे झाली ना,म्हणून ओळखले नाही तुम्हाला.” 

“अहो,ठीक आहे, कितीतरी वर्षे  झाली ना. बदल होतात हो माणसात.परिस्थिती बदलते.”

— डॉक्टरांना जास्त विचारण्याचे धैर्य झाले नाही. ठरलेल्या दिवशी बाईंची शस्त्रक्रिया छान पार पडली. डॉक्टर सुधाताईंच्या खोलीत आले…..  

” ताई, अगदी छान झाले हं ऑपरेशन. मी एक विनंती करू का? तुम्हाला मी आज आणि उद्या इथेच ठेवून घेतोय. आम्ही वरच राहतो. मी आणि माझी पत्नी वर्षा, दोघेही डॉक्टर आहोत ना. तिचे दुसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह आहे. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो. तुम्हाला जेवण वगैरे सगळे आम्हीच देऊ, आणि मग दोन दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज देऊ. चालेल ना?” 

सुधाताई संकोचल्या. म्हणाल्या,””अहो उगीच कशाला तुम्हाला त्रास ! मी अगदी छान आहे की आता. पण तुम्ही म्हणताय तर राहीन मी इथे.” बोलतांना सुधाताईंच्या डोळ्यात पाणी चमकले.

डॉक्टर राऊंड संपवून निघून गेले. रात्री वर्षाशी बोलताना डॉक्टर विश्वास म्हणाले,” नक्की काय ग झाले असेल?

इतक्या सुसंस्कृत बाई, सभ्य, पुन्हा स्वतः शिक्षिका होत्या.का बरं अशी वेळ आली असेल त्यांच्यावर–वृद्धाश्रमात राहण्याची?”

” हो रे! किती  छान आहेत त्या ! पण आपण हळूहळू विचारू त्यांना.” वर्षा म्हणाली. 

दुसऱ्या दिवशी राऊंड घेताना,डॉक्टर सुधाताईंच्या रूममध्ये आले. “ कशा आहात ताई? बरे आहे ना सगळे?” 

“अहो ,बरे काय.. अगदी छान आहे सगळे. अगदी माहेरी आल्याचे सुख घेतेय हो मी. पण उद्या मात्र सोडा बरं का.”

 — डॉक्टर त्यांच्या शेजारी बसले, आणि म्हणाले,  “ताई,असं काय घडलंय की तुम्हाला घर सोडावे लागले? अभयचे बाबा  कशाने गेले? मला काहीच कल्पना नाही हो. पण रागावू नका. मला सांगितलेत तर आपण काहीतरी मार्ग काढू शकतो यातून.”

सुधाताईंनी सुस्कारा सोडला. “ काय सांगू तुम्हाला मी ! तुम्हाला माहीतच आहे, अभय किती हुशार होता ते. पण त्याचा स्वभाव मात्र एकलकोंडा, चमत्कारिकच जरा ! आम्ही मध्यमवर्गीय माणसे हो ! अभयच्या वडिलांची सामान्य नोकरी आणि मी प्राथमिक शिक्षिका. पण अभय सगळे स्कॉलरशिप मिळवत शिकला हो. आम्हाला जराही तसदी नाही पडली त्याच्या खर्चाची. तो एम एस झाला,आणि त्याला इंग्लंडला पुढचे शिकण्याची संधी चालून आली. आम्ही त्याला जमेल तेवढे पैसे दिले, पण उरलेल्या रकमेसाठी कर्ज काढावे लागलेच. त्यासाठी आमचा लहान फ्लॅट गहाण ठेवावा लागला. कर्जाचे हप्ते त्याने भरले, कर्जही फेडले. पुढे त्याने तिकडे गोऱ्या मुलीशी लग्नही केले. आम्ही कशालाच विरोध केला नाही. पण हळूहळू तो आमच्यापासून दूरच गेला. त्याचे बाबा अचानक गेले तेव्हाही उपऱ्यासारखा पंधरा दिवस आला,आणि निघून गेला. त्या मुलीशीही त्याने घटस्फोट घेतला,असे म्हणाला.

मला म्हणाला, मला असे सारखे यायला जमणार नाही. मी हा फ्लॅट विकून टाकणार आहे. तुझी सोय वृद्धाश्रमात करतो. नशीब तरी बघा माझं, तो फ्लॅट यांनी त्याच्याच नावावर केला होता. त्यांना काय हो कल्पना, की पोटचा मुलगा असा वागेल… मी मात्र एका क्षणात रस्त्यावर आले …

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो परत आला होता? – भाग 2 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तो परत आला होता? – भाग 2 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

 (मागील भागात आपण पाहिले –  ‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी  लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो. आता इथून पुढे )

तिची आई, दरवाजाशी उभी होती. ती म्हणाली, ‘अरे तू…?’

ती माझ्याकडे नेहमीच अनुकूल दृष्टीने बघत आलीय. तिने मला मिठीत घेऊन माझ्या गालावर ओठ टेकले. मला काहीच कळलं नाही. अखेर काय झालय काय? मग मला कळलं, आत्ता आत्ताच एड्रियाना आई बनलीय. त्यामुळे सगळे अतिशय खूश आणि उत्तेजित झाले होते. माझ्या विजयी प्रतीद्वंद्वीचा हात हातात हात घेऊन त्याचे अभिनंदन करण्याशिवाय मी काय करू शकत होतो?

मला काळत नव्हतं की मी ही गोष्ट त्यांना विचारू की गप्प बसू? मग मला या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मी खोट्या औदासिन्याने म्हंटलं, ’मी घंटा न वाजवताच आत आलो कारण मी एक घाणेरडी मोठीशी झोळी घेतलेल्या भिकार्‍याला आपल्या घरात गुपचुप येताना पहिलं आणि मला वाटलं, चोरी करण्याच्या उद्देशाने तो आत आलाय.’

ते सगळे माझ्याकडे हैराण होऊन बघू लागले. ‘भिकारी? झोळी? चोरी करण्यासाठी?  त्यांना कळतंच नव्हतं. किती तरी  वेळापासून ते इथे बैठकीच्या खोलीतच आहेत आणि त्यांना तसा कुणी भिकारी दिसला नव्हता.

‘मग माझ्याकडून नक्कीच काही तरी चूक झालेली असणार.’ मी म्हंटलं. मग ते मला एड्रियाना आणि नवजात शिशु असलेल्या खोलीत घेऊन गेले. आशा स्थितीत मला काय बोलावं हे कळेना. मी तिला शुभेच्छा दिल्या आणि बाळाकडे नीट पाहिलं. मी विचारलं, ‘बाळाचं नाव काय ठेवणार?’ त्यांनी सांगितलं, त्याच्या वडलांच्या नावावरून गुस्तावो ठेवण्याचं नक्की केलय. त्याचं नाव फर्नांडो ठेवलं असतं, तर मला जास्त बरं वाटलं असतं. पण मी गप्प बसलो.

घरी आल्यावर मला निश्चितपणे वाटू लागलं की हा तोच भिकारी आहे, ज्याला म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोने धक्का देऊन मारलं होतं. तो बदला घेण्यासाठी नाही, तर एड्रियानाच्या मुलाच्या रूपात जन्म घेण्यासाठी परतला होता. पण दोन –तीन  दिवसानंतर मला माझी कल्पना हास्यास्पद वाटू लागली आणि हळूहळू मी ती गोष्ट जवळ जवळ विसरूनच गेलो.  ती घटना मी पूर्णपणे विसरून गेलो असतो. पण….

१९७९ मध्ये एक अशी घटना घडली, की त्यामुळे. १९६९ मध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली.

दहा वर्षं होऊन गेली. काळ पुढे पुढे जात होता. मी खोलीतल्या खिडकीजवळ बसून एक पुस्तक चाळत होतो. थोड्या वेळाने मी सवयीनुसार खिडकीतून बाहेर इकडे-तिकडे पाहिले. एड्रियानाचा मुलगा गुस्तावो आपल्या घराच्या गच्चीवर खेळत होता. तो जे खेळत होता, ते त्याच्या वयाच्या दृष्टीने अगदी पोरकट असे  होते. मला वाटलं, आपल्या वडलांकडून त्याने वारशात मंदबुद्धी प्राप्त केलीय. तो जर माझा मुलगा असता, तर यापेक्षा निश्चितपणे चांगला खेळ निवडून खेळला असता आणि आपले मनोरंजन केले असते.

गुस्तावोने दोन्ही घरांच्या मध्ये जी कॉमन भिंत होती, त्यावर काही रिकामे डबे ठेवले होते. आपल्या गच्चीवर उभा राहून दगड मारून तो ते पडण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे डबे आणि दगड, त्यांचे शेजारी डॉन सिज़ेरियो यांच्या बागेत पडत होते. मला वाटलं, म्हातारा डॉन सिज़ेरियो याने आपली फुले आणि फुलझाडे या दगडांमुळे नष्ट झालेली पाहिली, तर त्या नक्कीच हार्ट अ‍ॅटॅक येईल.

अगदी याच वेळी डॉन सिज़ेरियो आपल्या घरातून बाहेर पडला. तो चांगलाच म्हातारा झाला होता. अतिशय लडखडत चालत होता. अगदी सावधपणे एक पाय मग दूसरा पाय खाली ठेवत तो चालत होता. घाबरत घाबरत तो लोखंडी दरवाजापर्यंत पोचला. दरवाजा उघडून तो हळूहळू त्याच्या पुढच्या दगडी पायर्‍या उतरू लागला

म्हातारा बागेत आला. अगदी त्याच वेळी गुस्तावोने शेवटचा डबा दगड मारून खाली पाडला. म्हातारा पायर्‍या उतरत होता. गुस्तावोने त्याला पाहिले नव्हते. डबा जोराचा आवाज करत म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोच्या बागेत पडला. डब्याच्या जोरदार आवाजाने तो एकदम चमकला. मागे वळून बघण्याचा प्रयत्न कारताना तो घसरला आणि पहिल्या दगडी पायरीवर त्याचं डोकं आदळलं आणि फुटलं.

मी हे सारं बघितलं पण म्हातार्‍याने मुलाला बघितलं नव्हतं की मुलाने म्हातार्‍याला. एव्हाना काही कारणाने मुलाचं मन खेळावरून उडालं आणि तो तिथून निघून गेला. काही क्षणात खूपसे लोक म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोच्या प्रेताभोवती जमा झाले. चुकून पाय घसरल्याने म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोचा मृत्यू झाला, असं जाहीर झालं.

दुसर्‍या दिवशी मी पहाटेच उठलो आणि खिडकीजवळच्या खुर्चीवर  स्थानापन्न झालो.  डॉन सिज़ेरियो च्या पंचकोनी घरामध्ये रात्रभर आणि सकाळी लोक बसून घरच्या लोकांचं सांत्वन करत होते. अजूनही बरेचसे लोक त्या घराच्या बाहेर उभं राहून सिगरेट पीत होते व आपापसात बोलत होते.

एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरातून, तोच चिंध्या लपेटलेला म्हातारा भिकारी बाहेर पडला. त्याच्या अंगावर एक फाटलेला ओव्हरकोट होता. त्याने कडब्याने बनवलेली एक मोडकी-तुटकी टोपी घातली होती आणि हातात एक मोठीशी घाणेरडी झोळी होती. लोक घृणा आणि भीती यामुळे बाजूला सरकले. तो बायका पुरुषांची गर्दी चिरत पुढे निघाला. ज्या बाजूने तो आधी दोन वेळा आला होता, त्याच दिशेला हळू हळू चालत तो दूर जाऊन अदृश्य झाला.

दुपारी मला कळलं गुस्तावो सकाळपासून आपल्या बिछान्यात नाहीये. हे ऐकून मला वाईट वाटलं, पण फारसं आश्चर्य वाटलं नाही. बर्नेस्कोनी परिवाराने गुस्तावोला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा शोध आशेच्या जिद्दीवर अजूनही चालू आहे. मला मात्र त्यांनी शोध थांबवावा, असा सांगण्याची हिंमत कधीच झाली नाही.

— समाप्त —

मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो

हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी  अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो परत आला होता? – भाग 1 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तो परत आला होता? – भाग 1 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

१९६५ मधे मी २३ वर्षाचा होतो. भाषा आणि साहित्य या विषयाचा शिक्षक होण्यासाठी मी शिकत होतो. त्या वर्षी, वसंताचा गंध सप्टेंबरमध्येच हवेत दरवळू लागला होता. एका सकाळी, खरं तर पहाटेच म्हंटलं पाहिजे,  मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. आमची बहुमजली इमारत होती आणि मी सहाव्या मजल्यावर रहात होतो. मी थोडासा आळसावलो होतो आणि थोड्या थोड्या वेळाने खिडकीतून बाहेर बघत होतो. तिथून मला आमची गल्ली दिसत होती. आणि रस्त्यावरच्या फूटपाथच्या बगलेत मला म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोचा बगीचा दिसत होता. त्यात भरपूर खत घातलेलं होतं. त्याचं घर गल्लीच्या कोपर्‍यावर तिरकं असं होतं. त्यामुळे त्याचं घर कसल्या तरी अनियमित आकाराचं पंचकोनी असं काही तरी दिसत होतं.

डॉन सिज़ेरियोच्या घराच्या बगलेत बर्नेस्कोनी परिवाराचं सुंदर घर होतं. ते सगळे अतिशय चांगले, उदार, हवेहवेसे वाटणारे लोक होते. त्याला तीन मुली होत्या आणि मी, त्यांची सगळ्यात मोठी मुलगी एड्रियाना हिच्यावर प्रेम करत होतो. अधून मधून मी त्याच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याकडे बघत होतो. अर्थात इतक्या सकाळी सकाळी एड्रियाना दिसण्याची शक्यता नव्हतीच.

गल्लीत आता कोणीच नव्हतं त्यामुळे माझं लक्ष आपोआप त्या माणसाकडे गेलं. घरांच्या पुढच्या रस्त्यावर तो दिसत होता. तो आमच्या सोसायटीकडेच येत होता. हा रस्ता डॉन सिज़ेरियो आणि बर्नेस्कोनीच्या घराच्या समोरून जात होता. माझं त्याच्याकडे आपसूकच लक्ष गेलं. तो कुणीतरी भिकारी किंवा भटक्या असावा. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या चिंध्यात तो लपेटलेला होता.

तो दाढीवाला माणूस अतिशय अशक्त आणि दुबळा दिसत होता. त्याने एक मोडकी तोडकी कडब्याची टोपी घातली होती. उकडत असतांनाही त्याने धूसर रंगाचा एक फाटका ओव्हरकोट घातला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे एक घाणेरडी झोळी होती. माझा अंदाज होता, की त्या झोळीत भीक म्हणून मिळालेल्या गोष्टी किंवा इकडे तिकडे मिळालेल्या खाण्याच्या वस्तू तो ठेवत असणार. 

मी त्याच्याकडे बघत होतो. तो भिकारी डॉन सिज़ेरियोच्या घराच्या समोर थांबला आणि लोखंडी कुंपणातून त्याने घरमालकाला काही तरी भीक देण्याचा आग्रह केला. म्हातारा डॉन सिज़ेरियो एक कंजूष माणूस होता. त्याचे एकूणच व्यक्तिमत्व अप्रीय, तिरस्कार निर्माण करणारं होतं. भिकार्‍याकडे न बघता , त्यांनी हातानेच त्याला निघून जाण्याची खूण केली.  भिकारी मंद आवाजात त्याला सतत काही तरी देण्याविषयी आर्जव करत होता. इतक्यात मी त्या म्हातार्‍या माणसाच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकला,

‘मला त्रास देऊ नको. चालता हो इथून…’

तरीही तो भिकारी सारखा आग्रह करत राहिला. तो दगडाच्या तीन पायर्‍या चढला आणि ते लोखंडी फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला. डॉन सिज़ेरियोच्या सहनशक्तीचा आता अंत झाला. ते पुढे झाले आणि त्यांनी त्या भिकार्‍याला जोरात धक्का दिला. भिकारी ओल्या पायरीवरून घसरला. त्याने फटकाची लोखंडी सळी पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर धडाम असा जोरदार आवाज आला. तो फरशीवर उताणा पडला. त्याचे पाय आकाशाकडे उठलेले मला दिसले. त्या क्षणार्धात दगडाच्या पहिल्या पायरीला धडकून, त्याचं डोकं फुटलल्याचा आवाज मी ऐकला. डॉन सिज़ेरियो पळत पळत बाहेर आला. जमिनीवर पडलेल्या भिकार्‍यावर तो झुकला. त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा त्याने प्रयत्न केला. ती त्याला ऐकू आली नाही. मग डॉन सिज़ेरियो घाबरला. त्याने हाताच्या पंजाने त्या भिकार्‍याला पकडून दुसर्‍या टोकाला दगडांजवळ ओढत नेले.  मग घरात जाऊन घराचे दार लावून टाकले. त्याच्या अनैतिक अपराधाचा कोणी साक्षी नाही, यबद्दल तो आश्वस्त होता. पण साक्षीदार मी होतो. लवकरच त्या बाजूने जाणारा एक माणूस त्या शवाजवळ थांबला. मग हळू हळू अनेक लोक तिथे जमा झाले. आणि तोपर्यंत पोलीसही तिथे पोचले. त्या मृत भिकार्‍याला अ‍ॅम्ब्युलंसमध्ये घालून घेऊन गेले. ही गोष्ट इथेच संपली आणि यावर नंतर कुणीही काहीही बोलले नाही.

माझ्याबद्दल बोलायचं झालं, तर या घटनेबद्दल मी अतिशय सावध होतो आणि मी माझं तोंड कधीही उघडलं नाही. कदाचीत माझं वागणं चुकीचं असू शकेल पण त्या म्हातार्‍यावर दोषारोप ठेवून मला काय मिळणार होतं? त्याने माझं कधीच काही बिघडवलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा इरादा त्या भिकार्‍याला जीवे मारण्याचा मुळीच नव्हता. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी त्याला कोर्टात चकरा मारायला लागण्याचे कष्ट पडावेत, हे मला उचित वाटलं नाही. मला वाटलं, त्याला त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत एकटंच सोडावं.

हळू हळू ती घटना मी विसरून गेलो.  पण जेव्हा जेव्हा मी डॉन सिज़ेरियोला बघतो, तेव्हा तेव्हा मला अजब अशी अनुभूती येते. त्याला ही गोष्ट माहीत नाही, की या सार्‍या दुनियेत मी असा एकमेव माणूस आहे, की जो त्याचं भयानक रहस्य जाणून आहे. तेव्हापासून का कुणास ठाऊक, मी त्याच्यापासून दूर राहायला लागलो आणि त्याच्याशी बोलण्याची मी कधीच हिंमत केली नाही.

                   *** *** *** *** *** ***

हळू हळू मी ही घटना विसरत चाललो, पण जेव्हा जेव्हा डॉन सिज़ेरियो मला दिसतो, तेव्हा तेव्हा, मला एक अजब अशी अनुभूती होते की सार्‍या दुनियेत, मी असा एकमात्र माणूस आहे, जो त्याचं भयानक असं रहस्य जाणून आहे

                 *** *** *** *** *** ***

१९६९मधे मी २६ वर्षाचा झालो. मी एव्हाना स्पॅनिश भाषा आणि साहित्य यात डिग्री मिळवली होती. एड्रियाना बर्नेस्कोनीने माझ्याशी नाही, अन्य कुणाशी विवाह केला होता. ती व्यक्ती तिच्या योग्य होती की नाही, मी प्रेम करत होतो, तेवढंच प्रेम तीही व्यक्ती तिच्यावर करत होती की नाही, कुणास ठाऊक? त्या वेळी एड्रियाना गर्भवती होती आणि तिने केव्हाही बाळाला जन्म दिला असता. ती आताही पहिल्यासारखी त्याच सुंदर घरात रहात होती आणि दररोज, पाहिल्यापेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. सकाळी लवकर मी काही मुलांना व्याकरण शिकवून येणार्‍या परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेत होतो. सवयीनुसार मी रस्त्याच्या पलिकडे एक उदास दृष्टिक्षेप टाकत असायचो.

त्या दिवशी अचानक माझं काळीज जोरजोराने धडधडू लागलं. मला वाटलं, मला दृष्टिभ्रम झालाय. तीन-चार वर्षापूर्वीचा तो भिकारी, ज्याला डॉन सिज़ेरियो ने धक्का देऊन मारून टाकलं होतं, तो त्याच रस्त्यावरून चालत येत होता. त्याच चिंध्यात लपेटलेला. एक फटका ओव्हरकोट त्याच्या अंगावर होता. कडब्याने बनवलेली एक मोडकी –तुटकी टोपी त्याच्या डोक्यावर होती आणि त्याच्या हातात एक घाणेरडी झोळी होती. 

आपल्या विद्यार्थ्यांना विसरून मी खिडकीशी पोचलो. त्याची गती मंद झाली. तो आपल्या अपेक्षित इमारतीशी पोचणारच होता.

‘अरे, तो मृत भिकारी पुन्हा जिवंत झाला—‘ मी विचार करू लागलो. ‘डॉन सिज़ेरियोचा बदला घेण्यासाठी आला की काय?’ पण तो डॉन सिज़ेरियोच्या फटकापासून पुढे गेला. मग तो, एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरासमोरच्या फटकाशी थांबला. मग तो फाटक उघडून आत गेला. 

‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी  लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो.

क्रमश: भाग १

मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो

हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी  अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांजवेळ ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆

? जीवनरंग ❤️

☆ सांजवेळ ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆ 

हि बाई सतत फोनवर काय बोलते,..?आपल्या पेक्षा बरीच मोठी आहे,… इतका जर नातेवाईकांशी सम्पर्क दांडगा असेल तर इथे कशाला आली ह्या वृद्धाश्रमात,..?असे अनेक प्रश्न आशाबाईच्या उदासमनात दहा दिवसांपूर्वी आलेल्या नवीन रूम पार्टनर विषयी सुरू होते,..आज संध्याकाळी विचारूच तिला असं त्यांनी ठरवलं,..

तिन्ही सांजेला त्या छोट्याश्या रुममधल्या देवळीत दिवा लागला,..मंद धुपाने खोली दरवळली,.. खिडकीतुन नजरे आड होणारा सूर्य आणि पसरत जाणारा काळोख,..दोघींच्या खुर्च्या खिडकीजवळ होत्या,..आशाबाई म्हणल्याच आजींना,”आजी एक विचारू का खरंतर माझ्या आणि तुमच्या वयात असेल 30 एक वर्षाच अंतर मी 60 तुम्ही,..ती अंदाज लावते हे बघत आजीच हसुन म्हणल्या,मला 85 सुरू आहे ग,..आजीच्या उत्तराचा धागा पकडत आशा म्हणाली,”इतकं वय आहे मग असे राहिलेच किती दिवस म्हणुन इथे येऊन पडल्या आणि फोनवर इतक्या बोलत असता म्हणजे सगळ्यांशी तर सम्पर्क चांगला दिसतो,…कुणीही सांभाळलं असत ना,..?”

आजी हसत म्हणाल्या,”का माझी पार्टनरशीप आवडत नाही ए का तुला,..?”

तशी आशा चपापुन म्हणाली,”तसं नाही उलट मी स्वतःला तपासून बघायला लागले तुमच्याकडे बघुन,.. मला इथं आणुन सोडलं म्हणून मी रुसले, रागावले नातेवाईकांवर कोणाशी बोलत नाही फोन घेतच नाही,..पण तुम्ही तर सारख्या खुशाली विचारता,.. आशीर्वादाची फुले देता,.. म्हणून म्हंटल आज विचारावंच इथे येणं काय हौशीने का,..?”

आजी म्हणाल्या,”कसं असतं ना आशा जो पर्यंत सहज स्वीकार करायला आपण शिकत नाही तो पर्यंत आपण कशातूनच आनंद घेऊ शकत नाही,..प्रत्येकाच आयुष्य असतं ग आपण आपलं जगुन घेतो आणि पुढच्या पिढीचं जगणं आपल्या काळाशी जोडत बसतो,..खरंतर त्यांनाही समजुन स्वीकारलं तर छान पळू शकते हि नात्यांची गाडी पण जुन्या नव्याची तुलना ह्यातच निर्माण होतात दुरावे,.. अहंकारांच्या वेली फोफावत राहतात कारण आपण सोडून दयायला शिकत नाही,..मोह ग खरंतर आपला संसार सुन आली कि सम्पला हे आधी स्वीकारता आलं पाहिजे ना,..तिची सुरवात आणि आपला शेवट ह्याची सांगड घालता आली नाही कि हे वादविवाद मग त्या पिढीने कधी जगायचं,..अग जबाबदाऱ्या समजतात त्यांनाही,..आणि चुकून शिकण्यासाठी तुम्हाला आधी सोडावं लागत ना पण तुम्हीच घट्ट धरून बसता मग नाईलाजास्तव इथे येणारे वाढतात,..तू हि अश्याच वादातून आली हे कळलं आहे मला,..”

आशा आजीच्या बोलण्याने आत्मचिंतनात हरवली,..ह्या सहा महिन्यांपूर्वीच सगळं डोळ्यासमोर आलं,..दोन वर्षापूर्वी आलेली सुन आणि मग चहा पासुन ते स्वयंपाकापर्यंत आपण सतत आपलंच चालवलेलं अहं भाषण,..खरंतर नोकरी करून सगळं करत होती शिकत होती पण आपल्याला सत्ता सुटत नव्हती मग विकोपाला गेलेले वाद,..चढलेले स्वर,..सगळं मुलाच्या आवाक्या बाहेर आणि मग झालेला हा निर्णय,.. खरंच आजी म्हणते तसं स्वीकारता आलं असतं ना,..आपण आधार बनायला हवं होतं पण आपल्या सहजतेने न स्वीकारणाऱ्या स्वभावाने आपण इथे येऊन पडलो,..पण आजी ती तर स्वीकारते मग ती का इथे..?”

“आजी तू का इथे,..?” आशाचा प्रश्न ऐकून आजी म्हणाली,”मी नातसुनापर्यंत बदल स्वीकारले,..त्यामुळे आनंद घेत होते जगण्याचा पण आता शरीर साथ देत नाही,..आपल्या कडून त्यांना काही अपेक्षा नाहीत तरी आपल्याला आता तिथे त्रास होतो,..त्यांच्याकडून नाही आपलाच त्यांना,..आपलं रात्री बेरात्री होणारं जागरण,लघवीचे त्रास,..तरी सकाळी उठून आपण आरामात घरी आणि ते बिचारे जाणार नोकरीवर मग मीच हट्ट केला,..इथे चोवीस तास सेवा आहे मैत्रिणी आहे,..करमणूक,जेवण सगळं मिळतं थोडी त्यांनाही मोकळीक मिळते आपल्यापासून,..आपण जन्म दिला म्हणजे स्वतःच्या आनंदाच्या सीमा हरवून सतत आपल्याच उश्या पायथ्याशी लेकरांनी बसावं अशी मानसिकताच होऊ दिली नाही मी त्यामुळे हे इथे येणं स्वतःहून स्वीकारल कुठलेही राग,लोभ मनात न आणता,.. आपल्या मुळे कोणाचे जगणे कंटाळवाणे व्हावे असं मला मुळीच वाटत नाही उलट आपली आठवण ह्या धुपाच्या सुगंधा सारखी दरवळत राहणारी असावी ,..राख होऊन पडली आहे ग पण दरवळ मनाला आनंद देणारी,..हो ना..”

आशाने बंद करून ठेवलेला फोन सुरू केला,..”सुनबाई आलीस का ऑफिसातून,..?मी इकडे आनंदात आहे,..रोज फोन करत जाईल ठेवते फोन,…”

आजीने आशाचा हात हळुवार दाबला,..दोघी डोळ्यातून हसल्या आणि एकच श्लोक उच्चरला

“ठेविले अनंते  तैसेची राहावे

चित्ती असू द्यावे समाधान…”

धुपाची दरवळ आणि खिडकीतुन  रेंगाळत दिसणारा संधीप्रकाश बरंच काही सांगुन गेला.

© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)

औरंगाबाद 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पुन्हा एकदा अश्रुंची फुले झालीत…” – लेखक – डाॅ. संजय ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “पुन्हा एकदा अश्रुंची फुले झालीत…” – लेखक – डाॅ. संजय ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

“अजय, इकडे ये, माझ्या समोर येऊन सरळ उभा रहा, ही वेळ आहे का शाळेत यायची..? तूच सांग आता कुठली शिक्षा करु मी तुला, ह्या पूर्वीही छड्या मारुन झाल्या, कान पिळून झालेत, बाकावर उभं करुन झालं, वर्गाच्या बाहेर काढून झालं, काही फरकच कसा नाही तुझ्यात, सगळ्या शिक्षा आपल्या हू की चू न करता रोज चुपचाप सहन करतो, दिसतोस तर हडकुळा पण कुठल्या हाडा मासाचा बनला आहेस मला तर काही कळत नाही, काहीच फरक कसा नाही पडत रे तुझ्यात..?

लक्षात ठेव तु अजय, आता एकदाच शेवटचं सांगते, पुन्हा जर तू वर्गात वेळेवर नाही आलास ना तर एकदिवस मीच शाळा सुरू होण्यापूर्वी तुझ्या घरी येऊन तुझ्या पालकांचा समाचार घेईन, विचारीन त्यांना, कुठे लक्ष असतं तुमचं, तुमचा मुलगा केव्हा येतो शाळेत, बाहेर काय उद्योग करतो, शाळेच्या नावाखाली कुठे जातो, मुलाची काही फिकीर आहे की नाही तुम्हाला ..? अन्  घेऊन येईन त्यांच्यासमोर तुला ओढत वेळेवर शाळेत, कळू दे एकदा तुझ्या पालकांना तूझे खरे गुण ..! “

अजय वर्गातला खरतर एक गोड, निर्मळ, सोज्वळ, शांत चेहऱ्याचा, नीटनेटका मुलगा होता, वर्गात कधी दंगा न करणारा,  अतिशय हुशार, नियमित होमवर्क करुन येणारा, आणि शाळेत आल्यावर वर्गात नीट लक्ष देऊन शिकणारा, नेहमी पहिल्या पाचात येणारा गुणी मुलगा पण इतक्यांदा सांगूनही कधीच तो वर्गात वेळेवर येत नसे, कधी अर्धा तर कधी चांगला तासभर उशीर करायचा यायला, एवढा हुशार असून का हा असं वागतो ह्याचं त्याच्या ह्या मॅडम ला कोडं होतं, घरच्यांना ठाऊक नसतांना हा बाहेर काही वाईट कामं तर करुन येत नसेल अशी भीती त्यांच्या मनात होती..!

आईवडिलांना त्यांनी कितीदा निरोप पाठवले, डायरीत शेरे मारुन दिले पण हा दाखवतच नाही डायरी त्यांना ..!

काल एवढं बजावून देखील आज उलट  हा अजून तासभर उशिराच आला आणि  शांतपणे मॅडम समोर आपला उजवा हात पुढे करून छड्या खाऊन घेतल्या ..!

कालच्या सांगण्याचा जराही उपयोग न झाल्याने व आज उलट जास्तीच उशिरा आल्याने मॅडम रागातच होत्या, त्यांनी त्याच्याकडे न बघता रागानेच त्याच्या कोमल हातांवर रोजच्या पेक्षा तीन छड्या जास्ती मारल्या, हात लाल होऊन गेला होता, डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू न देता निमूटपणे सहन करुन तो आपल्या जागेवर जाऊन बसला ..!

मॅडमचं आज शिकवण्यात लक्ष नव्हतं, त्याचेच विचार त्यांच्या डोक्यात येत होते, का हा असं करतो..? एवढा हुशार मुलगा असून रोज का आपला मार खातो ह्याचं त्यांना वाईटही वाटत होतं, तो लिहीत असतांना अधून मधून चोरून त्या त्याच्याकडे बघत होत्या, शांत, निर्वीकार तो नेहमी असतो तसाच होता, आज त्यांनी मनात पक्क ठरवलं उद्या कुठल्याही परिस्थितीत शाळा सुरू व्हायच्या आधी अजयच्या घरी जाऊन यायचं, दुसऱ्या दिवशी ठरवल्या प्रमाणे शाळेच्या अर्धातास आधी घरातून निघून त्यांनी  स्कूटी अजयच्या घराकडे वळवली, अजयच्या घरासमोर थोड दूरच त्या थांबल्या अजय शाळेच्या वेळेस कुठे जातो ते बघायला म्हणून.!

शाळेची वेळ झाली होती, अजय लगबगीने घरातून बाहेर पडला पण स्कूल bag न घेताच, शाळेच्या वेळेत हा बाहेर राहून नक्कीच काहीतरी वाईट कामं करतो हा मॅडम चा समज दृढ होत नाही तेवढ्यात  चालतच तो साधारण एक फर्लांग भर दूर असलेल्या सरकारी हॉस्पिटल मधे गेला, मॅडम त्याच्या मागे गेल्या, स्कूटी स्टँडवर लावून जाणारच होत्या त्या आत तोवर त्यांना अजयच व्हील चेअर वर बहुतेक त्याचे वडील असावेत,  त्यांना बसवून लगबगीने बाहेर येत असलेला दिसला, आजूबाजूला त्याचं लक्ष नव्हत, काळजीपूर्वक वडीलांना त्याने घरात नेऊन सोडलं, मॅडम पुन्हा दूरच थांबल्या होत्या, थोड्याच वेळात पुन्हा अजय गडबडीत व्हील चेअर वर बहुतेक आता आई असावी, तिला घेऊन बाहेर पडला, पुन्हा हॉस्पिटल, पुन्हा थोड्या वेळात तिला घेऊन घरी आला व मोकळी व्हील चेअर हॉस्पिटल मधे परत देऊन आला, घरी येऊन लगेच पुन्हा बाहेर पडला, आता मात्र स्कुलबॅग खांद्यावर होती, साधारण पाऊण एक तास मॅडम हे सगळं बघत होत्या ..!

अजय शाळेत गेल्यावर त्या अजय च्या घरी गेल्या त्याच्या आईवडिलांना भेटायला पण माहित नाही का आपण अजय च्या मॅडम आहोत हे त्यांनी सांगितलं नाही त्यांना, अर्धा पाऊण तास काय बोलणं झालं असेल त्यांचं तेवढंच, बाहेर पडल्या तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते..!

अजय च्या आईवडिलांना त्यांच्या मधुमेहा साठी दिवसातून दोनदा इन्सुलिन injection घ्यावं लागतं, औषधं महाग असल्याने विकत आणून घरात घेणं त्यांच्या परिस्थिती मुळे त्यांना परवडत नाही, सरकारी हॉस्पिटल मधे free होत असल्याने दोघांना ते दिवसातून दोनदा तिथे नेऊन देऊन आणायची जबाबदारी अजय च्या खांद्यांवर ह्या लहान वयात येऊन पडली आहे जी तो त्याची शाळा आणि अभ्यास सांभाळून आज तीन वर्ष झाले एकही दिवस न चुकता पार पाडतो आहे ..!

शाळेत जायचा आता मॅडमचा मूड नव्हता म्हणून त्या पुन्हा घरी गेल्या, बोलून आल्यापासून थोड्या अस्वस्थ होत्या बहुतेक त्या ..!

दुसऱ्या दिवशीपण शाळेत त्या गुमसुम होत्या, शिकवण्यात लक्ष लागत नव्हतं त्यांचं म्हणून मुलांना त्यांनी एक विषय देऊन निबंध लिहिण्यात गुंतवले नीटनेटका अजय नेहमी प्रमाणे आजही लेट आला, स्कूल bag जागेवर ठेऊन खाली बसणार इतक्यात मॅडम ने बोलावले …

“अजय इकडे ये “

अजय खाली मान घालून मॅडम समोर येऊन उभा राहिला, त्यांनी न सांगताच त्याने उजवा हात पुढे केला त्यांना आज खरतर त्याच्याकडे बघायची पण हिम्मत होत नव्हती तरी बसल्या बसल्या त्यांनी छडी उचलली अन् अचानक अजय च्या हातात छडी देऊन स्वतः चा उजवा हात त्याच्या समोर केला ..

” मार अजय मार, आज तू मला शिक्षा करणार आहेस, मी नाही, मार आज तुला किती छड्या मारायच्या आहेत मला त्या मार “

हे काय चाललंय अजय ला काही कळेना, कावरा बावरा झाला तो ..

” नाही मॅडम मी चुकलो, मीच नेहमी चुकतो “

रोज मार खाऊन देखील मॅडम विषयी प्रचंड आदर होता त्याच्या मनात रोज आपण चुकतोय म्हणून मॅडम नाराज होऊन असं म्हणताएत असं वाटलं त्याला, त्याने छडी टेबल वर ठेवली मॅडम उठल्या, त्याला जवळ घेतलं अन् घट्ट उराशी धरलं आणि मिटलेल्या डोळ्यातून अश्रूंना वाट करुन दिली ..!

त्यालाही रडू कोसळले गुरुशिष्यांचे अश्रू टपाटप पायावर पडून पुन्हा एकदा त्यांची फुले झालीत..!

🏵️🌹🏵️

लेखक – डॉ संजय 

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अप्पर हाफ – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर  ☆

? जीवनरंग ❤️

 अप्पर हाफलेखक – श्री रविकिरण संत संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

मी नुकताच NTC च्या एका काॅटन मिलमधे ‘सुपरवायझर’ ह्या पोझीशनवर लागलो होतो. गेटच्या आत कंपाऊंडमधे एका व्यक्तीचा अर्धपुतळा लावलेला होता.

खूप दिवसांनी मिलमधे माझ्यासारखा पंचविशीतला इंजिनीअर आला असावा. कारण बहूतेक जण अर्ध्या वयाचे दिसत होते. पहिल्याच दिवशी लंच अवरला मला तेथील सिनीअर्स कडून असे सांगण्यात आले की कामाचे टेन्शन घ्यायचे नाही. ही सरकारी कापड गिरणी आहे. इथे वेळेवर येवून पोहचणे हेच मुख्य काम. ‘ब्राइट करियर’ वगैरे गोड कल्पना तुझ्या डोक्यात असतील तर ही मिल तुझ्यासाठी नाही. आम्ही इथे जेवण झाल्यावर रोज तासभर डोळे मिटून आराम करतो.

मग त्यातील एक सिनीअर  उत्साहाने सांगू लागले, ” तो गेट जवळचा पुतळा पाहिलास ना, ते काशीराम बंकाजी आहेत. त्यांचा मृत्यू १९४८ साली वयाच्या ५९ व्या वर्षी झाला. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला आम्ही कामगारांनी पैसे गोळा करून सुप्रसिद्ध शिल्पकार व्ही.पी.करमरकर यांच्याकडून त्यांचा अर्धपुतळा त्यावेळी चाळीस हजार रुपयात बनवून घेतला आणि समारंभपूर्वक तो सिनेकलाकार अशोककुमार यांच्या हस्ते स्थापन केला.”

” पुतळ्यासाठी कामगारांनी पैसे ऊभे केले म्हणता, म्हणजे कामगारांसाठी त्यांनी खूप काही केले असणार!” मी म्हणालो.

” खूपच केले. माझे वय आज ५७ आहे. मी १९४१ साली मॅट्रिक होवून वयाच्या १८ व्या वर्षी इथे सुपरवायझर पोस्टवर नोकरीला लागलो. त्यावेळी ही कंपनी ‘बंका काॅटन मिल्स’ या नावाने प्रसिद्ध होती. मिलमधे २१०० कामगार होते. मालक काशीराम बंका ‘काॅटन किंग’ म्हणून हिंदुस्थानात प्रसिद्धी पावले होते.”

” सन १९०० च्या पहिल्या दशकात राजस्थानातून मुंबईत आले तेव्हा बंकाजी फक्त १६ वर्षांचे होते. ते अतिशय मेहनती, हुशार आणि मुत्सद्दी होते. त्यावेळी सर्व महत्वाचे व्यवसाय ब्रिटीश कंपन्यांच्या हातात होते. बंकाजींनी मुंबईत काॅटन ट्रेडिंगचा व्यवसाय सूरू केला. पुढच्या पाच वर्षांत त्यांच्या ‘काशीराम बंका काॅटन ट्रेडर्स’ कंपनीला ब्रिटीश सरकारच्या काॅटन काॅन्ट्रॅक्ट बोर्डाची मेंबरशीप मिळाली जो बोर्ड पुढे East India cotton association चा मेंबर झाला.”

” बंकाजी एवढ्यावर थांबले नाहीत. ते भपकेबाज रोल्स राॅइस गाडी वापरीत. पुढे ते Indian merchant’s chamber चे अध्यक्ष झाले. १९३५ साली त्यांना New York cotton exchange ची प्रेस्टीजीअस मेंबरशीप मिळाली, जी भारतीय माणसाला अपवादानेच मिळायची. ती त्यांच्या मृत्युपर्यंत कायम होती. मुंबईच्या स्टाॅक एक्सचेंजचे ते फाउंडर मेंबर होते. त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिकेत काॅपर, शुगर, व्हीट एक्स्चेंजेस होती. त्या सर्व ठिकाणी बंकाजींनी आपल्या प्रेझन्सने दबदबा निर्माण केला.”

“बंकाजी हयात असेपर्यंत आमच्या मिलच्या लायब्ररीत New York Times येत असे. त्यात वाचलेल्या आर्टीकल्समधे त्यांच्या बिझनेस प्रोजेक्शन्सकडे पाश्चिमात्य पत्रकार भितीयुक्त आदराने पाहात  असल्याचे जाणवायचे. ते कोणते शेअर्स विकत घेतात किंवा विकतात यावरून मार्केटमधे चलबिचल व्हायची.”

“१९२० साली बंकाजींनी टेक्स्टाईल मिल काढण्यासाठी ही तीनशे एकराची प्रशस्त जागा घेतली. मिलचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण झाले. त्यातील चाळीस एकरात निवासासाठी चाळी, शिक्षणासाठी शाळा आणि एक हाॅस्पिटल बांधण्यात आले. ह्या तिन्ही गोष्टी कामगारांसाठी विनामूल्य होत्या. मग ब्रिटनहून मशिनरी मागवण्यात आली आणि १९२५ साली ही मिल सूरू झाली.”

” फक्त आमचीच मिल तेव्हा वर्षांतून दोनदा बोनस द्यायची. एक दिवाळीत तर दूसरा जूनच्या १ तारखेला.”

“१ जूनच का?”

” कारण १३ जूनच्या आसपास शाळा सूरू व्हायच्या. तेव्हा मुलांची पुस्तके, वह्या, युनिफॉर्म, बूट, दप्तरे, छत्र्या ह्यासाठीच्या खर्चाची ती सोय असे. बंकाजी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप आग्रही होते. मॅट्रिक झालेल्या प्रत्येक मुलाला त्यांच्याकडे नोकरीची ऑफर असे. तसेच हवी असल्यास उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळे.”

” बंकाजी खरोखर देवमाणूस होते.” मी भारावून म्हणालो.

” …आणि हा देवमाणूस अतिशय प्रामाणिक होता. त्यावेळचे श्रीमंत  लोक गांजा, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या सहाय्याने आपले शौक पूर्ण करायचे. पण बंकाजींना त्यांच्या आईने सोळाव्या वर्षी मुंबईला पाठवताना ‘गांजा आणि मदिरेपासून तू दूर रहाशील’ अशी शपथ घातली होती. मग त्या देवतूल्य आईच्या शपथेनुसार बंकाजी आयुष्यभर तसेच वागले.

मिलचा चार एकर भाग त्यांनी उंच भिंत घालून वेगळा केला. त्यात एक टूमदार हवेली बांधली. तळमजल्यावर पार्टी हाॅल, किचन व पहिल्या मजल्यावर चार प्रशस्त बेडरूम्स बनवल्या. हवेली समोर दोन एकरात छोटा कृत्रीम तलाव बांधला. त्यात खास काश्मीरहून आणलेला शिकारा ठेवला. दूपारी ते मिलच्या ऑफिसातून हवेलीत जेवायला जात. आवडीची भरीत- भाकरी खाल्ल्यावर ते शिकार्यात वामकुक्षी घेत. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन युरोपीयन मुली नावेत असत.

” उंच भिंती पलिकडचे हे कसे काय तूम्हाला दिसायसे?” माझा प्रश्न.

“आमच्या स्पिनिंग डिपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरच्या एका खिडकीतून आम्ही हे चोरून बघत असू. त्यातली एक मुलगी त्यांचे पाय चेपत असायची तर दुसरी नाव वल्हवत असे. दर शनिवार, रविवार हवेलीवर संध्याकाळी पार्टी असे. त्यांत मी त्या काळातल्या सर्व नटनट्यांना भेटलो.”

” ते कसे काय?” मला आश्चर्याचे धक्के बसत होते.

” त्याची गंमतच झाली. मी नाशिकच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ मधून १९४१ ला मॅट्रिक झालो ज्याचे  १९४३ ला पुढे नाव बदलून ‘जे.एस. रूंगठा’ हायस्कूल झाले. आठवी ते अकरावी आम्हाला इंग्रजी विषय शिकवायला थॉमस लेन नावाचे ब्रिटीश शिक्षक होते. ते अतिशय सुंदर शिकवत. तिथल्या चार वर्षांच्या अध्यापनानंतर सर्व मुले छान इंग्रजी बोलत असत.”

“त्यावेळेस बंका काॅटन मिल्स मधे केलेल्या नोकरीच्या अर्जात उत्तम बोलता येणार्या भाषेंत मी इंग्रजी, मराठी आणि हिंदी असा उल्लेख केला होता. म्हणून माझा इंटरव्हू घ्यायचे काम जेम्स स्टूअर्ट नावाच्या ब्रिटीश स्पिनिंग मास्तरना दिले गेले. त्यांनी मला नाशिकला कुणाकडे, किती वर्षे इंग्रजी शिकलो असे विचारले. तसेच इथे मुंबईत कुणाकडे राहिला आहेस असे विचारले.

मी सर्व प्रश्नांची उत्तरे सफाईदार इंग्रजीत दिली. त्यानंतर मला बंकाजींच्या केबिनमधे पाठवण्यात आले.

बंकाजी म्हणाले,” तुला मिलमधे सुपरवायझरची नोकरी देतो पण दर शनिवार आणि रविवार तुझी हवेलीत ड्यूटी असेल.

” सर तिथे मी काय करायचे?”

मी नम्रपणे विचारले.

” त्या दोन्ही दिवशी बर्याच  विदेशी पाहुण्यांचा राबता असतो. त्यांना काय हवे नको ते बघायचे.”

अशा रितीने माझा हवेलीत प्रवेश झाला.

हवेलीतल्या पार्ट्यांना कधी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या नटनट्या यायच्या तर कधी ब्रिटीश पदाधिकारी! त्यांत गांजा, चरस, मदिरा, तर्‍हेतर्‍हेचे मांसाहार ह्यांची रेलचेल असे. बंकाजी स्वतः ह्यातील कशालाही स्पर्श करत नसत. कारण त्यांच्या आईच्या शपथेने त्यांना बांधलेले होते.

मात्र पार्टी पुर्ण भरात आल्यावर  हळूच एखाद्या नटीबरोबर ते पहिल्या मजल्यावरच्या खोलीत काही काळासाठी गडप होत!  राजस्थानच्या छोट्या गावात आयुष्य काढलेल्या त्यांच्या माऊलीला मदिराक्षी हा प्रकार ठाऊक नसावा, म्हणून तिच्या शपथेत हा एक मुद्दा राहून गेला!

मला ती १९४२ सालची बंकाजींची बर्थ डे पार्टी अजून आठवतेय. एकीकडे भारतात गांधीजींचे “छोडो भारत” अभियान गाजत होते तर दुसरीकडे बंकाजींचे “आवो भारत” अभियान!

” दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान जगातल्या चित्रपट उद्योगावर मंदीचे सावट आले होते. बंकाजींनी त्यांच्या वाढदिवसाला हाॅलिवूडच्या ‘मर्ले ओबराॅन’ या नटीला आमंत्रित केले होते.”

” ही तिच का जी ‘द डार्क एन्जल’ या गाजलेल्या चित्रपटातील जबरदस्त भूमिकेबद्दल अकॅडेमी अवाॅर्डसाठी नाॅमिनेट झाली होती?”

मी विचारले.

” तिच ती! ती इथे चार दिवस होती. एके दिवशी पार्टी चालू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास ‘प्लीज अलाऊ मी टू गेट फ्रेशन अप’ असे बंकाजींना सांगून ती वरच्या मजल्याचा जीना चढू लागली. मला तिने मागून येण्याची खूण केली. मी मागोमाग तिच्या बेडरूमच्या दारापर्यंत गेलो.

” प्लीज गेट मी अ पॅक ऑफ कंडोम !” तिने मला विनंती केली.

मी काहीच न उमगुन तिच्याकडे पहात राहिलो.

तिने तेच वाक्य परत एकदा म्हटले, तरी माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. हा शब्द ना कधी लेन सरांनी सांगितला होता ना डिक्शनरीत पाहिला होता! मी तसाच बावळटासारखा उभा राहिलो.

” नो वंडर यू पिपल हॅव सो मेनी चिल्ड्रेन.” असे म्हणून तिने धाड्कन दरवाजा बंद केला.

“मग जिना उतरत असताना मला थोडाफार अंदाज आला की हे असे काहीतरी उपकरण असावे जे मुले रोखून धरते. पण ते भारतात मिळत नसणार ह्याची मला खात्री वाटली. असे वाटण्याचे कारण बंकाजींच्या सतत बदलत्या युरोपियन सेविका! जेव्हा एखाद्या सेविकेचे पोट थोडे वाढे तेव्हा तिची रवानगी मायदेशात होई!”

बंकाजींचा असा सर्व कामेतिहास त्यांच्याकडून ऐकल्यावर मला काय रिॲक्ट व्हावे हे सुचेना.

” मग अशा माणसाचा पुतळा गेटवर लावून कसली प्रेरणा मिळणार ?” मी थोडे चिडून विचारले.

” ह्या माणसाने डोके वापरून कसा जगात दबदबा निर्माण केला, डोळ्यांनी कसे कामगारांचे दैन्य पाहिले, कान वापरून कशी त्यांची गाऱ्हाणी ऐकली आणि मग दोन्ही हातांनी कसे भरभरून दान दिले हे आम्ही पाहिले. कामगारांच्या ह्रदयात त्यांनी कायमचे स्थान मिळवले त्या प्रीत्यर्थ त्यांचा हा अर्धपुतळा बसवला गेला. त्यांचा कमरेखालचा हिस्सा आमच्या खिजगणतीतच नाही. समर्थांनी म्हटलेच आहे,

जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे l

जनी वंद्य ते सर्व भावे करावे ll

मग मीही मनोमन त्यांना हात जोडले.

 – समाप्त –

लेखक – श्री रविकिरण संत

साल १९७९

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली. आता इथून पुढे )

विनायक हा असाच भरकटलेला गुन्हेगारी वृत्तीचा युवक होता. दिशाहीन. कलंदर. पण नाग्याने त्यालाही सामावून घेतले.  त्याचे विनायक हे नामकरणही नाग्यानेच केले.

तिच्यावर बलात्कार झाला होता. ती उध्वस्त झाली होती. भयाण अंधार तिच्या आयुष्यात पसरला होता.  समुद्राच्या पाण्यात ती आत आत  चालत होती.  जीवनाकडे  तिने पाठ फिरवली होती.  नाग्याने तिला हात दिला. पाण्यातून बाहेर काढले.  ती रडली. नाग्याच्या छातीवर उद्रेकाने तिने बुक्के मारले.  तिला जगायचंच नव्हतं.

तिला पाहून नाग्याला इंदू ची आठवण झाली. तो मुकाट तिला घेऊन मठात आला. सर्वांना त्याने  तिची काळजी घ्यायला सांगितली.

तीच झाली नाग्याची प्रमुख शिष्या.  प्रभावती.  त्यानंतर तिचे नाव, गाव, ओळख सारेच बदलून गेले.

इंदूने ज्याला नालायक, भडवा म्हणून संबोधले होते तो नाग्या आता लोकांचा देव बनला होता.  आता पाऊले पूर्ण रुतली होती.  मागे वळण्याचा रस्ता नव्हता. लटकी का असेना पण त्याची एक प्रतिमा तयार झाली होती. आणि मुखवट्याच्या आत नागू कोंडला गेला. नागूही या स्थितीत समाधानी होता. 

असं त्याच्याजवळ काय होतं? तसं रूप होतं. त्याच्या आईचं रूप. तो गौरवर्णी, उंचापुरा भारदस्त होताच. त्याच्याजवळ वाणी आणि वक्तृत्व होतं.  ज्ञान नव्हतं पण शब्द भांडार होतं. आणि अभिनय ,नाट्य त्याच्या वृत्तीतच असावं. 

“हेचि दान देगा देवा । तुझा विसर न पडो।।”   तो अशा काही चालीत म्हणायचा की, लोक तल्लीन होऊन नाचायचे. कधी जयघोष ,कधी नाचणं, कधी हसणं तर कधी मोकळेपणानं रडणंही ….मनात येईल ते बोला…असे सगळे प्रयोग त्यांनी लोकांवर केले.  आणि काय आश्चर्य लोक त्यात गुंतून गेले. लोकांना हाच भक्तीमार्ग वाटला.

गू पाहत राहिला. अनुभवत राहिला.

महाराजांच्या वेशात गाडल्या गेलेल्या नागूच्या अस्तित्वाचे कण विरघळत गेले.  देश-विदेशात त्याची कीर्ती पसरली.  पैसा प्रसिद्धी आणि प्रसार झपाट्याने होत गेला.  त्याच्या नावाची पुस्तके ही प्रकाशित झाली. त्याचा प्रचंड खप होऊ लागला.

तसे विरोधी वारेही वाहत होते.  अनेक वेळा आयकर वाल्यांनी धाड टाकली.  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लोकांनी तर सळो की पळो केले होते.  महाराजांची बुवाबाजी,  स्त्रियांबरोबर असलेली लफडी, मठात चाललेले अनैतिक  व्यवहार,  खोटेपणा यावरही मीडियाचे रकाने भरत होते.

एका महिलेची मुलाखत टींव्ही. चॅनलवर दाखवली गेली होती. तिचा चेहरा अस्पष्ट धूसर केला होता.

ती सांगत होती…सांगताना रडत होती. “मला महाराजाने फसवले. मीही त्यांच्या कहाण्या ऐकून पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या मठात जात असे. एक दिवस त्यांनी मंत्र देण्याच्या निमीत्ताने मला एका अंधार्‍या खोलीत नेले आणि… माझा पैसा, अब्रु ,स्रीत्व सगळं लुटलं…” चॅनलवर ती खूप करवादत होती.  पण लोकांच्या मनातला विश्वास, श्रद्धा भक्ती यावर याचा अंशत:च  परिणाम होत होता.  लोक ऐकत होते. साशंकही होत होते पण तरीही पुन्हा पुन्हा जातच राहिले.

पण  कधीतरी एकांती महाराजाचा मुखवटा त्यांच्याच मनात गळायचा . 

आपण लोकांच्या हळुवार धार्मिक भावनांशी खेळ मांडलाय याचं अपराधीपण जाणवायचं. आपण संत नाही. संतत्वाच्या जवळपासही नाही. आपल्याला पैसा प्रसिद्धी याचा लोभ आहे! लोक भाबडेपणाने आपल्या नादी लागत असल्याचं आत कुठेतरी समाधान वाटायचं. श्रेष्ठत्वाची भावना आपल्याला चिकटलेली आहे . पण हा पत्त्याचा बंगला कधीतरी कोसळेल  आणि मग आपली काय दशा होईल याचं भयही मनात वाटायचं.  पण कुठेतरी असंही वाटायचं की याच लोकांनी आपल्याला हे रूप दिले ना?  त्यांनीच आपल्या अस्तित्वाचं हे बुजगावणं बनवलं ना? आणि तसे म्हटले तर या आभासी, खोट्या, लटक्या दुनियेत अनेक प्रकारची  लोकांची  दुःख समस्या विरघळत चालल्याचा भास तर त्यांनाही होतोच आहे ना? नव्हे त्यांच्यासाठी तो भास नसून सत्यच आहे…

लोक वेडे आहेत.  ते नादी लागतात. ताब्यात जातात. कच्च्या मनाची मडकी आपण फक्त फुंकतो. मग त्यात वाईट काय? चुकीचं काय! त्यांनाही लाभ. आपलाही फायदा. भावनांचा हाही एक व्यवहार. धंदा.

कधीकधी नागूला मनोमन हसूही यायचं. लोकांची कीवही वाटायची.  इतके उच्च शिक्षित,पदवीधारक, काही तर सुवर्णपदक विजेते, यशस्वी उद्योजक .इथे येतात. प्रचंड नैराश्य घेऊन येतात. का भरकटतात ही माणसं… 

करमरकर मास्तरांनी एकदा सहज म्हटलं होतं ते चांगलंच लक्षात आहे .

“सुखाचा शोध न घेणं म्हणजेच दुःखाचा शेवट होणं..”

आपण सारेच भरकटलेले आहोत. मार्ग हरवलेले  आहोत. खोटे आहोत. फसवतो. फसवले जातो.

महाराज विचारात पार डुबून गेले होते.  एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. मरगळ आली होती. बुरखा काढून टाकावासा वाटत होता. मुखवटा फेकून द्यावासा वाटत होता…बस् झालं…!!

इंदुचे शब्द कानांत घुमत होते. “नालायक..भडव्या..विश्वासघातकी..”ः

प्रभावती महाराजांना विचारत होती,

” काय झालं गुरुवर्य? आज इतके चिंतेत का?”

महाराज गप्प होते.  शांत होते. 

” उद्या मठात कृष्ण जन्माचा सोहळा आहे. मोठा भक्तगण जमणार आहे. भरपूर पावत्या फाडल्यात. देणग्याही खूप आल्यात.  या उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रात, टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध होत आहेत . उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मठात सारे या उत्सवाची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. जवळजवळ सारी तयारी झालेली आहे. एकदा आपण नजर फिरवावी. काही कमी जास्त असल्यास मार्गदर्शन करावे.”

महाराज नुसतेच “हो” म्हणाले.

पुन्हा प्रभावतीने विचारलं, 

“काय झालं?”

” हे बघ प्रभावती! उद्या सर्व भक्तगणांसमोर मी एक सत्य मांडणार आहे.”

” कोणते सत्य गुरुवर्य ?”

“एक कबुली.”

” कबुली?”

” होय प्रभावती…”

” काय सांगणार तुम्ही त्यांना?”

” उद्या त्या युगंधराची शपथ घेऊन मी खरे बोलणार आहे.  मी नागूची  कहाणी सांगणार आहे..”

प्रभावती गोंधळली  होती. आश्चर्याचा पूर तिच्या चेहऱ्यावर उसळला होता.  पण महाराज शांत होते.

‘ गोपाल कृष्ण! राधे कृष्ण! गोपाल कृष्ण! राधे कृष्ण!…’

एक मुखवटा गळून पडण्याच्या कल्पनेत महाराज मुक्त होत होते.  परिणामाची त्यांना कल्पना होती. पण पर्वा नव्हती. पत्त्याचा बंगला अखेर कोसळणार होता…

नव्हे! ते स्वत:च तो मोडणार होते…

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सभागृह माणसांनी गच्चं भरलेलं होतं. मध्यमवयीन, प्रौढ, वृद्ध तरुण सर्व प्रकारच्या वयांचा एकत्रित समूह तेथे जमला होता. निरनिराळ्या जातीचे, धर्माचे लोक तिथे उपस्थित होते.  इतकी माणसं असूनही एक थंडगार शांती सभागृहात  होती.  कोपऱ्यात उंच पितळेच्या समया तेवत होत्या.  वातावरणात उदबत्यांचे, कापराचे सुगंध दरवळत होते. मोगऱ्याच्या फुलांच्या माळा चहू बाजूला सोडलेल्या होत्या.  त्याचाही दरवळ मनाला प्रसन्न करणारा होता.

थोड्याच वेळात नागू महाराज येतील. त्यांचं हस्तीदंती आसन छान सजवलं होतं. आजूबाजूला सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. फुलांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. आसनाभोवती अत्याधुनिक साऊंड सिस्टिम होती. 

प्रत्येकाच्या प्रश्नाला नागू महाराज उत्तरे देणार होते. सभागृहातले सारेच त्यांच्या दर्शनास आतुरले होते. शिष्य प्रभावती आणि शिष्य विनायक दोघेही व्यासपीठावर आले. त्यांनी श्रोत्यांना वाकून वंदन केले. धुपारत्या उजळल्या. मधुर असा घंटा नाद घुमला. आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेले नागू महाराज सभामंडपात अवतरले. केसांचा नीट विंचरलेला जटाभार.  गळ्यात लाल पांढऱ्या मण्यांच्या माळा आणि मुद्रेवर कमालीची शांतता. नजर तीक्ष्ण. विशाल नयन. त्यांनी सभागृहात एक शांत पण धारदार नजर फिरवली. सारे श्रोते  नकळतच उभे राहिले. त्यांचे हात जोडलेले होते. महाराजांनी दोन्ही हात उंचावले आणि त्यांना बसण्याची खूण केली. क्षणात कुजबुजीचा नाद थांबला. आणि पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. महाराज ही आसनस्थ झाले.

एकेका भक्ताकडून येत असलेला भोग शिष्य विनायक स्वीकारत होता. आणि महाराजांच्या चरणाशी ठेवत होता.  त्यात फळे होती,  मिठाया होत्या, नाण्यांचे, नोटांचे बटवे होते. वस्त्रे होती. दागिने होते. दानपेट्याही  भरत होत्या. महाराजांच्या चरणी भक्ती भावाने वाहिलेल्या भेटींची रास वाढत होती. पुन्हा सारे आसनस्थ झाले.

महाराजांनी डोळे मिटले. ओंकाराचा नाद वातावरणात उमटला. सर्व भक्तांनी त्यांचे अनुकरण केले.  सभागृह ओंकारमय झाले.  आणि मग महाराज बोलू लागले,

“आपण सारी परमेश्वराची लेकरे. या धरतीवर जन्माला आलो ते एक दिवस जाण्यासाठीच. मृत्यू हा अटळ आहे. सत्य आहे.  आपण फक्त कर्म करायचे.  नको फळाची अपेक्षा. दया क्षमा शांती हे आपल्या जीवनाचे तीन खांब ढासळू द्यायचे नाही.  सुख आहे तिथे दुःख आहे. दुःखाचा अनुभव घेतला तर सुखाचा आनंद मिळेल. त्या शक्तीवर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी जीवनाला यशस्वी करी. बोला जय श्री कृष्णा… जय शिवशंकर ..पांडुरंग विठ्ठल.. राम कृष्ण की जय !!गोपाल कृष्ण राधे कृष्ण… गोपाल कृष्ण राधे कृष्ण…”      

सर्व सभागृहात एक धीर गंभीर जयघोष झाला.एव्हाना सारा भक्तगण महाराजांना वश झाला होता. जणूं प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याशी बोलतोय, याचा भास भाविकांना होत असावा. 

मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. अनंत समस्या. अनंत अडचणी. नाना प्रकारची दुःखे, निराशा. अपयश, स्पर्धा, शत्रुत्व, तक्रारी, हव्यास अनंत… शेवटच नसणाऱ्या… कुणाला नोकरी हवी तर कुणाला बढती. कुणाला संतान नाही तर कोणाची मुलं म्हातारपणी सांभाळत नाहीत.. कुणाला धंद्यात खोट आली.. तर कुणाचे वादळात घरदार वाहून गेले.. वर्षानुवर्षाच्या व्याधी.. परंपरागत चालत आलेले खटले.. प्रत्येकाच्या पोतडीत भरभरून समस्या. सगळ्यांना यश हवं.  सुख हवं.  एक एक जण आपली एक एक पोतडी महाराजांसमोर ओतत होता. आता महाराजांसमोर जीवनातला सारा चिखल पसरला होता. एक गढुळ समुद्र..

महाराजांच्या इशार्‍यानुसार शिष्य प्रभावती आणि विनायक कुणाला भस्म, कुणाला फळं, कुणाला गंडे, नाणे ताईत कसले कसले मंत्र वाटत होते. भाविक सश्रद्ध मनाने स्वीकारत होते.  क्षणभर का होईना त्यांच्या मनावर आशेची पांघरूणं पसरत होती.  महाराज आहेत ना मग कसली भीती नाही, असा विश्वास वाटून ते अधिकाधिक गुंतत चालले होते. 

सभागृह रिकामे  झाले. त्याची दारे बंद झाली. आणि शिष्यांनी आलेल्या भेटींचा पसारा आवरण्यास सुरुवात केली.  अन्नधान्य, फळे, वस्त्रे, मिठाया, ठिक ठिकाणी वाटण्याची व्यवस्था ठरलेलीच होती. आणि नाण्यांनी नोटांनी भरलेल्या दानपेठ्या मठाच्या तिजोरीत  सांभाळून ठेवल्या गेल्या.  त्या तिघांनी त्या भरगच्च तिजोरीवर नजर फिरवली. आणि एकमेकांकडे बघून हलकेच स्मित केले.

प्रभावतीने महाराजांना वस्त्रे उतरवण्यास मदत केली.

“खूप दमलात तुम्ही! आता थोडा आराम करा.”

विनायकाने एका ग्लासात कसलेसे पेय आणले आणि महाराजांना दिले.

ते पिता पिता च महाराजांची तंद्री लागली.

प्रभावती आणि विनायक पुढच्या मीटिंगच्या तयारीला लागले. हे दोघे खास असले तरी महाराजांचा शिष्य गण खूप मोठा होता. प्रत्येक जण आपापले काम चोख करत होता. त्यांच्यात भांडणे,  वाद होते. मात्र महाराजांकडून मिळणारी बिदागीही  कमी नव्हती त्यामुळेच सारे या समूहाला चिकटून होते. 

महाराजांनी डोळे मिटले.

 एक लहानसं घर. तो. नागेश नाग्या ..आणि त्याची बहीण.रागीट बाप. घर चालण्यापुरतं पैसे देणारा. आजारी आई .आणि अधून मधून विचारपूस करण्यासाठी खाऊ घेऊन येणारी मावशी. खरं म्हणजे घरात कधी राहावं असं वाटलंच नाही. कसलाच आनंद नव्हता. संवाद नव्हता. प्रचंड तुटलेपण होतं एक प्रकारचं..

नाग्याची  शिक्षणात गती नव्हतीच. वाचनालयात जाऊन पुस्तकं मात्र वाचायला आवडायची. पण दहावी बारावी गुणांकन ,भविष्य, महत्त्वाकांक्षा हे काही जमलं नाही. शाळेतली प्रगती पाहून बापाने अनेक वेळा चाबकाचे फटके मारले. बहिण हुशार होती. पण आईच्या आजारपणामुळे आणि बापाच्या धाकापायी घरकामातच तिची हुशारी सडली. एक दिवस कोणा मुस्लिम तरुणाचा हात धरून ती पळून गेली आणि नंतर कधीही दिसली नाही. आधीच वासे नसलेलं घर पूर्ण कोसळलं. त्यातच एक दिवस एका काळोख्या रात्री बापाला मावशीच्या खोलीत जाताना नाग्याने पाहिलं. आई प्रचंड खोकत होती. पाणी मागत होती. म्हणून नागेश उठला होता. आणि घरातलं ते अकल्पित दृश्य पाहून नागेश पुरा भेलकांडला. बापाच्या मस्तकात त्या क्षणी त्याला गोळी घालावीशी वाटली होती.

आईने अखेर शेवटचा श्वास घेतला.

तिचे अंत्य कर्म आवरले आणि तेराव्या दिवशीच बापाने मावशीला घरात आणले. रीतसर लग्न करून.

नागेश ने घर सोडले.

अंधारात तो चालत होता. मार्ग माहित नव्हता. कुठली वाट आपली, तेही कळत नव्हते.  कुठलेच नाते उरले नव्हते. पाश नव्हते. बंध नव्हते. जगण्यासारखं काही शिल्लकही नव्हतं. पण मरायचंही नव्हतं. नाही म्हणायला एक ओला कोपरा होता.   इंदू !

ठसठशीत,  गोल बांध्याची,  गोरी, गुबगुबीत हसरी इंदू! 

एकदा तळ्याच्या काठी असलेल्या निंबाच्या झाडाखाली तिला घट्ट मिठीत पकडले होते. ओठावर ओठ टेकले होते. तिच्या गोल देहाशी  झोंबी केली होती. पण तिने ओरबाडले. किंचाळत ती म्हणाली होती,

‘नालायक! भडव्या! शरम नाही वाटत?’ अंगावर थुंकून  ती पळून गेली होती.

धागे तुटले ते तुटलेच. आपल्याला काहीच जमणार नाही आयुष्यात. प्रचंड दु:खाला सोबत घेऊन सुखाचा शोध घेण्यासाठी कितीतरी दिवस तो चालत होता. कसलीही शुद्ध त्याला नव्हती. अंगावरची वस्त्रेही फाटली होती. पिंपळाच्या पारावर तो बसून होता.. झाडावरची गळलेली पाने जणू त्याची लज्जा राखत असावीत. कोणी दयाळू बेवारशी म्हणून त्याला काही बाही खायला देत. मिळालं तर अन्न नाहीतर ऊपासमार.

दाढी वाढली. केसांच्या अस्ताव्यस्त जटा झाल्या.

एक दिवस त्याच्याजवळ आलेल्या एका वृद्धेला तो सहजच म्हणाला, ” जय राम कृष्ण हरी!! कुणी कुणाचे नसते.  पाशात बंधात अडकू नकोस. तू स्वतःच वृक्ष हो! या पिंपळासारखा. सावली दे.”

वृद्धेला वाटले माझे दुःख याला कसे कळले? हा कोणी योगी वाटतो. सिद्ध पुरुष असावा.

आणि मग गावात धूळ उडाली. आपल्या गावात बाबा आला. सुखदुःख जाणणारा. उपाय सांगणारा. चांगभलं करणारा.

नागू महाराज की जय!!

नाग्या पुढे लोकांच्या रांगा लागू लागल्या. लोकं रडू लागली.  आक्रंदू लागली. त्यांच्या चरणी लागू लागली. नाग्या थोडा भांबावला. पण मग त्याला हेही जाणवलं की जग खूप दुःखी आहे. आपल्याच सारखं.  त्यांचं दुःख हे आपलं भांडवल. 

सुरुवातीला तो प्रत्येकाच्या डोक्यावर नुसते हात ठेवायचा. वाचनालयात केलेलं वाचनही थोडसं उपयोगी पडत होतं.  लोकांना वाटायचं बाबांच्या हातात जादू आहे. शब्दात शक्ती आहे. वाणीत दैवत आहे. 

पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली.

क्रमश: – 1

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

(मागील भागात आपण पहिले– ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता. आता इथून पुढे)

त्याचं काम मला आवडू लागलं होतं. बाहेरचं काम त्याने दोन दिवसात उरकलं, तेंव्हा मला वाटलं, की घराच्या आत सुद्धा कित्येक वर्षात रंग रंगोटी, सफाई केलेलीच नाहिये. भिंतींचा रंग जाऊन त्यावरची चमक तर कधीचीच गेलेली होती आणि आता तर कुठे कुठे वरचं प्लॅस्टर आणि रंगांचे तुकडे पडून आतली बिनरंगी भिंत दिसू लागली होती. तेंव्हा हेही काम करून घ्यावं. तो जेंव्हा काम उरकून निघाला, तेंव्हा त्याचे आजच्या कामाचे पैसे देऊन मी त्याला घरातल्या रंग-रंगोटी बद्दल बोलले. त्याने एका नजरेत घराकडे बघून  पक्का अंदाज केला, की हे घर तीन बेडरुमचं आहे. घराच्या बाहेरच्या आकाराकडे बघून आतल्या लांबी-रुंदीचा बरोबर अंदाज घेता येत होता त्याला.

त्यानं ते काम करायचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी येताना रंगाचे डबे, ब्रश, रोलर हे सगळं सामान घेऊन येण्यासाठी त्याला 500 डॉलर दिले. त्याने ते पैसे त्याच्या खिशात ठेवल्याक्षणी मला वाटायला लागलं, की आता काही हा परत येणार नाही! एकटं रहाणाऱ्या बाईला लुटायची आयती संधीच दिली होती मी त्याला! लीवीवर, त्याच्या कामावर विश्वास बसल्यानंतरही मनात अशी गोष्ट यावी, याचं माझं मलाच आश्चर्य वाटत राहिलं. अशा चेह-यांवर तर सगळं जगच संशय घेतं आणि मी पण या जगातलीच होते ना? मी आपल्याच मनाला समजावत राहिले, की जर तो आलाच नाही तरी काही हरकत नाही, पाचशे डॉलर देऊन मला थोडी अक्कल तरी येईल!

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच त्याची वाट बघायला लागले होते मी! नऊ वाजायला अजून एक तास होता आणि माझ्या मनात धाकधूक सुरु झाली होती. मनाची बेचैनी दूर करावी म्हणून विचार केला, की गल्लीच्या टोकापर्यंत एक चक्कर टाकून यावी. वेळही जाईल आणि मन तो विचार सोडून जरा दुसरीकडे वळेल. चालत जात असताना लक्षात आलं, की रोजच्यासारखी गल्ली साफ दिसत नाहिये. इकडे तिकडे कागदाचे तुकडे, झाडांची पाने आणि खाद्यपदार्थ विखरून पडलेले आहेत. दोन तीन टीम हॉर्टन्सचे कॉफीचे कप पण लवंडलेले दिसत होते. कचऱ्याचे डबे खच्चून भरलेले होते आणि त्यामुळे त्याची झाकणं बंद न झाल्याने घाण वास सगळीकडे सुटलेला होता. आसपास पडलेली सिगारेटची थोटकं न विझवताच फेकलेली दिसत होती. ते बघून माझे पाय एक क्षण तिथेच थांबले. त्या थोटकांमधे मला कधी लीवीचा तर कधी माझा चेहरा दिसत होता. एक काळा आणि एक सावळा, ज्यांना चिरडणाऱ्या पायांना कधी ही जाणीव पण होत नसेल, की आपण एखाद्या माणसाला चिरडतोय, की सिगारेटच्या थोटकाला!

जवळपास अर्धा तास भटकून मी परत आले. चहा नाश्ता घेऊन घड्याळाकडे लक्ष जायच्या आतच बाहेरून काही आवाज आले. खिडकीतून बघितलं, तर लीवीची गाडी येऊन थांबलेली होती. गाडी जागेवर लाऊन त्याच्याबरोबर त्याच्या सारखीच दिसणारी आणखी तीन माणसं दरवाजाकडे येताना दिसली. आत्तापर्यंत तर मी एकट्या लीविलाच घाबरत होते, आणि आता आणखी तीन जण! त्याने बेल वाजवली आणि म्हणाला, की इथलं काम आम्हाला एका दिवसात उरकायचं आहे, म्हणून सगळी टीमच घेऊन आलोय.

ते धडाधड घरात घुसले, तेंव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. ते चौघं आणि मी एकटी! आता तर मी मुंगी एवढी सुद्धा राहिली नव्हते त्यांच्यासमोर! चौघांनी मिळून एक फुंकर मारली असती, तरी मी उडून कुठल्या कुठे जाऊन पडले असते. बाहेरच्या खोलीपासून काम सुरु केलं त्यांनी. मी विनाकारणच स्वयंपाकघरातून आत बाहेर करत होते. तिरक्या नजरेने, ते लोक काय करतायत याच्यावर नजर टाकत होते. कोणी भिंती घासत होता, तर कोणी खाली कपडा अंथरत होता, तर कोणी डब्यातून रंग काढत होता. ना त्यांनी काही सामान हलवण्यासाठी मला बोलावलं, आणि माझी कशासाठी मदतही घेतली नाही. एकामागून एक रंगांचे डबे रिकामे होत गेले आणि ते लोक एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात राहिले.

मला आश्चर्यच वाटत होतं. इतक्या वेगानं इतकं चांगलं काम होत होतं! खोल्या नवीन रंगामुळे चमकत होत्या. सामानही बरोबर आधीच्याच जागेवर ठेवलं जात होतं. मधे मधे मी त्यांना कोक किंवा चहा कॉफी पाहिजे आहे का, हे विचारत होते. ते लोक खूश दिसत होते. खूप गप्पा मारत होते, जोरजोरात हसत होते. मधे मधे मला पण आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेत होते. त्यांची स्पष्टवक्तेपणानी बोलायची लकब पाहून मला आपोआपच हसू येत होतं. जेवणाची वेळ झाली तेंव्हा ते अर्ध्या तासासाठी बाहेर गेले. परत आले, तर माझ्यासाठी पिझ्झाची एक स्लाईस घेऊन आले.

मी विचारलं, “मला कशाला?”

लीवी म्हणाला, “कारण, तुम्ही फार चांगल्या आहात.”

ते ऐकून माझी मलाच लाज वाटली. माझ्या अंतर्मनातलं ते सत्य उघड उघड दिसून येत नव्हतं का? की माझा या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता!

पिझ्झा मला पण आवडतो, पण का कोणजाणे, ही पिझ्झाची स्लाईस मला खावीशी वाटत नव्हती. लीविच्या चांगुलपणाचा आदर वाटला, म्हणून मी ती फ्रीजमधे ठेवून दिली, नंतर फेकता येईल असा विचार करत.

काम खूपच वेगानं चाललं होतं.  मधे दोन वेळा त्यानं आणखी लागणाऱ्या रंगासाठी पैसे मागून घेतले. दर वेळी त्याला पैसे देताना मनात तीच भीति असायची. दर वेळी वाटायचं, की आता काही तो परत येत नाही! तो रंग आणायला गेला, की त्याचे सहकारी बाहेर गवतावर बसून आराम करायचे. काही वेळातच तो हसत हसत परत यायचा. त्याचं ते पांढरे शुभ्र दात दाखवत हसणं मला फार आवडून जायचं आणि माझा त्याच्यावरचा विश्वासही वाढायचा.

त्याचं काम संपता संपता संध्याकाळचे सात वाजले. दोन दिवसांचं काम एका दिवसात संपवून आता ते जाण्याची तयारी करत होते. रंग देऊन झाल्यावर झालेला कचरा, घाण साफ करून हात पाय धूत होते. मी लीविला त्याचे पैसे दिले आणि त्या चौघांना चांगलं जेवण घेता येईल अशी टीपही दिली. काम करणाऱ्याचं आणि करून घेणाऱ्याचं नातं आता सोपं झालं होतं. दिवसभर घर त्या चार जणांच्या हसण्याने दुमदुमून गेलं होतं. मला पण खूप हसवलं होतं त्यांनी. घरातली प्रत्येकच वस्तू लीविसकट चारी जणांनी बघितली होती, पण आता मला तशी काही भीति वाटत नव्हती. का कोण जाणे, पण मला सारखं असं वाटत होतं, की लीवी मला आधी भेटायला पाहिजे होता. कित्येक वेळा अशी छोटी मोठी कामं करवून घेताना मला फार कटकट झालेली होती.

जाताना बाहेरच्या लॉनवर त्याला सिगारेट ओढताना बघितलं, तेंव्हा माझ्या मनात आलंच, की आता तो सिगरेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडतोय की नाही, ते बघायला हवं! त्यानं तो सिगरेटचा तुकडा विझेपर्यंत हातात धरून ठेवला आणि मग जवळच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून गाडी सुरु करून निघून गेला.

त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणताही राग नाही, हे बघून मी आनंदाचा निःश्वास सोडला. मी माझ्या मनातली ती गोष्ट लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. मी फ्रीजमधून त्याने आणलेला पिझ्झा काढला आणि तो गरम करून खायला घेतला. जसा काही या खोलीत लीवी हजर आहे, आणि त्याने कौतुकाने माझ्यासाठी आणलेल्या खाण्याचा आदर मी ठेवतेय, हे बघतोय.  आता माझ्या समोर फक्त त्याचे पांढरे शुभ्र दातच नाही, त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व होतं, जे शुभ्र धवल किरणांपेक्षाही शुभ्र होतं.

मूळ हिंदी कथा : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares