मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅटरी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ बॅटरी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.) – इथून पुढे — 

कोणीतरी तिच्या गाडीवर टक टक केलं. काहीतरी धोका आहे, नाहीतर हा गाडीवाला का थांबला असेल? हे जे काही आहे, ते या रात्रीतलं आणखी एक चक्रीवादळच आहे! ती श्वास रोखून पडूनच राहिली, अजिबात न हलता.

“हॅलो! मी मदत करू शकतो, दार उघडता का?”

ती गप्पच राहिली.

“मी पाहिलं आहे तुम्हाला, तुम्ही इथे गोठून जाल. घाबरू नका.”

आता काही पर्यायच नव्हता. तिनं कसाबसा दरवाजा उघडला आणि बोलली—“माझी बॅटरी डेड झाली आहे, फोन पण डेड आहे आणि मी पण मरणारच आहे. तुम्ही जा.”

“मी तुमची गाडी जंप स्टार्ट करून देऊ शकतो.”

सोफिनी काही म्हणायच्या आत तो अगांतुक तिच्या गाडीचं बॉनेट उघडू लागला. तो थंडीने कुडकुडत होता, आणि तीच परिस्थिती सोफीची पण होती. बोलण्यासाठी तिनं फक्त तोंड उघडं ठेवलं होतं, बाकी सगळं गुरफटलेलंच होतं. बोलताना तोंडातून भरपूर वाफ बाहेर पडत होती. दोघंही थंडीमुळे थरथरत होते. सोफीची थरथर त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. थंडी आणि भीति दोन्हींचा एकत्र हल्ला झालेला होता तिच्यावर. त्याने जंप स्टार्ट करून दिली गाडी आणि म्हणाला, “आता गाडी बंद करू नका, इंजिन चालूच ठेवा. मी तुमच्या मागून गाडी चालवत रहातो.”

“तुम्ही गेलात तरी चालेल, मी ठीक आहे आता. मी फोन पण लावते चार्जला.”

“हवा फार वाईट आहे, मी तुमच्या मागेच राहीन. तुमची गाडी अर्धा तास सतत चालू राहिली नाही, तर परत बंद पडू शकते.”

तो सोफीच्या मागेच रहात होता. दोन्ही गाड्या मंदगतीने सरपटत चालल्या होत्या. थोडा जरी वेग वाढला, तरी गाडी घसरण्याचा धोका होता. शंभरच्या गतीने जाण्याजोग्या रस्त्यावर वीसच्या गतीने गाड्या चालवाव्या लागत होत्या. असा प्रवास की ज्याच्या शेवटाचा पत्ता नव्हता! याच प्रकारे जावं लागणार होतं. सोफीची भीति वाढत गेली—नक्कीच कुठल्याही क्षणी तो गाडी पुढे आणून मला थांबवेल आणि मग….!

त्यानं इतके कपडे घातले होते, स्वेटर, मफलर, टोपी, की त्यात गुंडाळलेला माणूस कोण, कसा आहे, काही कळायला मार्गच नव्हता. फक्त त्याचा आवाज येत होता. दहा मिनिटं ते असे गेले असतील, नसतील, तेवढ्यात तो परत तिच्या बाजूला आला, आणि त्यानी हॉर्न दिला, आणि गाडी थांबवण्याची खूण केली. एकटी स्त्री असण्याची भीति परत तिच्या मनात दाटून आली.  हात पाय कापू लागले. कसेबसे तिने ब्रेक दाबले. मरणाच्या भीतीपेक्षाही ही भीति जास्त विक्राळ स्वरुप घेऊन तिच्यासमोर उभी राहिली.

तो गाडीतून बाहेर आला नाही, फक्त खिडकी उघडायची खुण त्याने केली. “दहा मिनिटात एक सर्व्हिस एरिया येईल, तिथून मी गरम कॉफी घेऊन येतो, तुम्ही गाडी बंद नका करू. पार्किंग लॉटमधे थांबून रहा.”

सोफिने मान हलवली. खरंच तिचा घसा कोरडा पडला होता, कॉफी मिळेल, या सुखद जाणिवेपेक्षा त्याचं काही कट कारस्थान तर नाही ना, ही भीति मोठी होती. कोणजाणे, याच्या मनात काय आहे! संशय येत होता, की कॉफी द्यायचं निमित्त करून हा गाडीत तर घुसणार नाही? आणि कॉफीत काहीतरी मिसळलं असेल तर? आसपास बर्फाशिवाय काहीच दिसत नव्हतं. कोणाला बोलावणार मदतीला? तो जे म्हणेल, ते करण्याशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं. पण तो लगेचच कॉफी घेऊन आला. बहुतेक मशीनची कॉफी असावी. अशा थंड रात्रीत कॉफी हाऊसमधे कोण असणार होतं? तो आला आणि तिला कॉफी देऊन त्याच्या गाडीत परत गेला.

भीतिच्या सावटाखाली असल्याने कॉफीची चवच लागत नव्हती. बेचव! एकदा वाटलं, बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी घातलेलं असणार. बरंच होईल, बेशुद्ध झाल्यावर यातना तरी जाणवणार नाहीत. ती तशीच कॉफी पीत राहिली. कॉफीचा गरमपणा कणाकणानी शरीरात भरत होता. निघण्याचा इशारा मिळाल्यावर दोघं निघाले परत एकमेकांच्या मागे. तो तिच्यापेक्षा हळू गाडी चालवत होता, कारण त्याला तिच्या मागेच रहायचं होतं.

सोफीचं थंडीनं थरथरणं आता कमी झालं होतं, गाडीच्या हिटिंग सिस्टिमने थंडी काही प्रमाणात कमी केली होती. पण तिची भीति वाढतच चालली होती. सुनसान रस्त्यावर, मिट्ट अंधारात दोन्ही गाड्या चालल्या होत्या. आणि फिसफिस आवाज करत वायपर्स काचेवर साठणारा बर्फ सतत दूर करत होते.  परत दहा मिनिटं गेल्यावर त्यानं परत एकदा थांबण्याचा इशारा केला.

या वेळी तर भीतिने सोफिचे प्राणच कंठात आले! या अनोळखी माणसाचा काय इरादा होता? आता शिकार पुरती आपल्या ताब्यात आली आहे, असं तर वाटत नाहिये याला? मुलगी आता बेशुद्ध व्हायच्या बेतातच असेल? मग तिच्या लक्षात आलं, “मी तर पूर्णपणे शुद्धीवर आहे! कॉफी पिऊन तरतरी आली आहे, नशा नाही!”  काय करावं ते कळेनासं झालं होतं तिला, पण बघितलं, तर परत त्यानं तशीच तिच्या बाजूला गाडी आणत तिला ओरडून सांगितलं, “तुमच्या गाडीच्या मागच्या दिव्यांपैकी एक लागत नाहिये, अजून जरा गाडी हळू चालवा.”

आणि परत सोफीच्या गाडीच्या मागे जाऊन गाडी चालवू लागला. या वेळी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. सोफिने आरशात पाहिलं, तो अजूनही तशीच तिच्या मागे गाडी चालवत होता. मिनिटा-मिनिटांनी पुढे जाणा-या या दोन गाड्या जशा काही वर्षानुवर्षे प्रवास करत होत्या. एखाद्या नवशिक्या ड्रायव्हरप्रमाणे थरथरणारे हात कसेबसे गाडी नियंत्रित करत होते.

परत एकदा त्याची गाडी तिच्या गाडीच्या बाजुला आली. तशाच पद्धतीने गाडी थांबवून त्याने सांगितलं- “ तुमची बॅटरी आता काही त्रास देणार नाही. आता मी जातो.” आणि तो गाडी पुढे काढून, तिला बाय करून निघून गेला.

हतप्रभ झालेल्या सोफिने हात हलवून त्याला निरोप दिला, त्याने ते पाहिलं की नाही कोणजाणे! तिने मनातल्या मनातच त्याचे आभारही मानले. जातानाची त्याची गाडी एखाद्या देवदूताच्या विमानासारखी वाटली, ज्याने आकाशातून उतरून एका मुलीचा जीव वाचवला होता. आता शरीराची थरथर बंद झाली होती.

संकटांच्या एका लांबलचक रात्रिची इतिश्री झाली होती. आता पहाट फटफटायला लागण्याची लक्षणंही दिसायला लागली होती. हिमवर्षाव पण आता थकून परतेल असं वाटायला लागलं होतं. पुढे दूर अंतरावर, रस्त्यांवर मीठ टाकणाऱ्या ट्रक्सचे दिवे चमकताना दिसू लागले होते. शहराच्या जवळ आल्याच्या खुणाही दिसू लागल्या होत्या. मृत्युच्या भीतीतून सुटका झाल्याबरोबर सोफीला तहान, भूक या सगळ्याची जाणीव होऊ लागली. कित्येक तासात काहीही खाल्लेलं नव्हतं. धिम्या गतीने चालणारी गाडी एका हाताने सांभाळत तिचा दुसरा हात शेजारच्या सीटवर ठेवलेल्या खाण्याच्या वस्तू धुंडाळू लागला, जेणे करून तिची बॅटरी पण उतरणार नाही!

तिच्या डोळ्यांसमोर एका पाठोपाठ एक बॅटरीची रूपं दिसू लागली— गाडीची बॅटरी, फोनची बॅटरी, तिची स्वतःची आणि खास करून त्या अनोळखी देवदूताची, जो आपल्या मदतीच्या बॅटरीने जीवनभरासाठी एक सुखद, ऊर्जादायी जाणीव ठेवून गेला होता. आता त्याला परत एकदा भेटलं पाहिजे या जाणीवेने तिचं मन उतावळं झालं. त्याला डोळेभरून बघायला हवं या इच्छेने उचल खाल्ली आणि तिच्या पायांनी ताबडतोब गाडीची गती वाढवली 

– समाप्त – 

मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅटरी – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ बॅटरी – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

भयंकर थंडी! पारा शुन्याहून वीस डिग्री खाली. नाकातली ओल बर्फाचा खडा बनून नाकात टोचत होती. बर्फाचे शुभ्र, लहान लहान कण एकत्र जमून सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होते. डांबरी रस्त्याचा काळेपणा शिल्लक नव्हता, की छताच्या कौलांचा कुठला रंग ! बर्फाच्या या कणांनी मिळून प्रत्येक रंग पांढऱ्या रंगात बदलून टाकला आहे. झाडा झुडुपांच्या फांद्या बर्फांनी लगडून जणू स्वागतासाठी झुकल्या आहेत. एखाद दुसरा चालत जाणारा माणूस बर्फाचं गाठोडं चालत जात असल्यासारखा दिसतोय. त्यांच्या गरम कपड्यांवर आणि जाडजूड बुटांवर सफेद बर्फकण हसत बसले आहेत असं वाटतंय. जमलेल्या बर्फावरही खारी, हिरव्या गवतावर जशा उड्या मारत, बागडत होत्या, तशाच बागडताना दिसताहेत. सुनसान रस्त्यांवर कधी  कधी जंगली प्राणीही दिसून येत असत.

निसर्गाच्या या रूपाला तोंड देण्यासाठी माणसाला फार तयारी करावी लागते. कधी कधी जर माणसाच्या मेंदूची काही चूक झाली, तर “आ बैल मुझे मार” च्या चालीवर “ ये बर्फा, मला गोठवून दाखव” अशा तऱ्हेने सोफीसारखी, जाणून बुजून या बर्फाळ  हवेला आव्हान देण्याची चूक घडून येते. सोफीचा हट्ट म्हणा, की नाईलाज, ती या वेळी, अशा जीवघेण्या हवेत हायवे वर गाडी चालवते आहे. उद्या तिला कामावर हजर व्हायचे आहे. जाणं आवश्यकच आहे. सगळी विमानोड्डाणं रद्द झाल्याने तातडीने तिला हा निर्णय घेणं भाग पडलं. धाडस करणंच भाग पडलं होतं. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशात रात्रीचं गाडी चालवणं खूप सुरक्षित आणि सोपं असतं. आणि या   बर्फाळ हवेसाठी तिच्या गाडीला स्नो टायर्स पण आहेत. त्यामुळे हवा अधिक बिघडली, तरी ती सुरक्षित राहू शकते. दूरवरच्या ठिकाणी गाडी चालवत जायची क्षमता पण आहे तिच्यात. असा धोका पत्करणं रोमांचक वाटत होतं तिला. तरुण आहे ती, आत्ता नाही धाडस करायचं, तर काय पन्नाशी नंतर करायचं का? तसंही पेईंग गेस्ट म्हणूनच रहात होती ती. सामान म्हणजे, फक्त दोन सुटकेस आहेत, ज्यात तिचे कपडे आहेत. एवढ्या प्रचंड बर्फवृष्टीमधेही रोजचं आयुष्य काही थांबत नाही. टोरांटो पासून न्यूयॉर्क शहरापर्यंतचा प्रवास गाडीने करायचा उत्साह तिला खूप उर्जा देत होता. मधे एखादा स्टॉप घेतला तरी बास आहे. हॉटेलमध्ये सामान टाकून ती लगेच ऑफिसलाच जाईल. हवा कितीही खराब असली तरी सब वे रेल्वे असो किंवा रोजचं आयुष्य सगळं काही त्याच गतीने चालू रहातं.

अमेरिकेची सीमा पार केल्यावर एकाएकी जोरदार वारा आणि बर्फवृष्टीचा हल्ला होऊ लागला. बर्फाळ हवेच्या थपडा गाडीच्या काचेवर वारंवार आदळू लागल्या. अंधाराला चिरत वाऱ्याचा सों सों आवाज गुंजत होता. रस्त्यावर जमलेल्या बर्फाच्या घसरणीमुळे त्या भरभक्कम चाकांनाही धोका निर्माण होत होता. हवा आणखी बिघडू शकते, हे माहित तर होतं, पण अशी वादळी होईल याचा अंदाज नव्हता, बिघडत्या हवेची लक्षणं बघून, तिला वाटायला लागलं की आपला निर्णय चुकीचा होता. अशा प्रकारे धोका पत्करायची काही गरज नव्हती. आता ती मधेच अडकली होती, ना धड इकडे, ना तिकडे! परत जायचं म्हंटलं, तरी तेव्हढाच त्रास होणार होता. गाणी ऐकताना तिच्या लक्षात आलं, की फोन चार्जला लावायला पाहिजे. फोन जर बंद झाला, तर तिचं काही खरं नाही.

गाडीचा वेग सतत कमी होत होता. काळाकुट्ट अंधार आणि समोर सतत उडत असणारा बर्फ यामुळे निर्माण होणाऱ्या धुरकटपणामुळे समोरचं दिसायला त्रास होत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाशही कमी वाटत होता. रस्त्यावर जमा झालेला बर्फ साफ करायला या वेळी कोणी येणार नव्हतं. गाडीत हीटरची सोय असल्यामुळे बाहेर थंडीचा कहर असला तरी सोफीला त्याचा त्रास होत नव्हता. समोरच्या काचेवर पडलेला बर्फ आता घट्ट होऊन काचेवर त्याचा थर जमा होऊ लागला होता. ते साफ करण्यासाठी गाडीचे वायपर्स काहीतरी रसायन त्याच्यावर उडवत होते, पण समोरचा रस्ता काही दिसत नव्हता. तिने विचार केला, गाडी थांबवून पुढच्या-मागच्या काचा, हेडलाईट्स, बाजुच्या काचा आणि गाडीच्या चारी बाजुंना साठलेला बर्फ साफ करून घ्यावा. गाडी बंद करून तिने ब्रश काढला आणि सगळा बर्फ काढून टाकला. परत नव्याने बर्फ पडतच होता, पण तो काढून टाकण्यासाठी वायपर्स पुरेसे होते.

गाडीच्या सगळ्या बाजूंचा बर्फ काढून टाकून परत ती गाडीत येऊन बसली. पण गाडी चालू करण्याआधी हात गरम करण्याची आवश्यकता होती, सगळी बोटं आखडून गेली होती तिची. काही वेळ हातमोजे काढून हात एकमेकांवर घासायला सुरवात केली तिने. सगळं अंग पण गारठून गेलं होतं. हुडहुडी भरली होती. गाडी सुरु करून ती सुटकेचा निश्वास टाकणारच होती, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, की गाडी सुरूच झालेली नाही! “अरे! हे काय?” परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. परत तेवढाच हलकासा आवाज. इंजिन चालू होण्याचा कुठलाच आवाज नाही. परत परत ती बटण दाबत राहिली, पण गाडी एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे ओठ बंद करून जागच्या जागी थटून उभी राहिली होती. सोफी एकटक त्या मूक झालेल्या बटणाकडे पहात राहिली. अनेक शक्यता तिच्या मनात एकदम घोंघावू लागल्या. असं गाडी सुरु न होणं म्हणजे, बॅटरी बंद पडली असणार. अशा वेळी बॅटरी डेड होणं म्हणजे एक प्रकारे सोफीचंच मरण होतं. हेल्पलाईनला फोन करावा म्हणून तिने फोन हातात घेतला, तर फोन पण डेड झालेला! त्याची बॅटरी चार्जच झालेली नव्हती. आता कोणाला मदतीला बोलावणं पण शक्य नव्हतं. आता काय करायचं? शंका कुशंकांनी तिला घेरून टाकलं. सगळ्यात मोठी धोक्याची घंटा तिच्या डोक्यात घण घालत होती, ती म्हणजे, “आज या थंड रात्रीत ही गाडीच तिची कबर बनणार आहे की काय?”

मागच्या सीटवर ठेवलेलं ब्लॅन्केट तिनं अंगभर लपेटून घेतलं आणि सुन्न होऊन बसून राहिली. या थंडीत शरीर काकडून त्याची बर्फकांडी बनत जाण्याचा अनुभव नरकमय यातना देणारा असणार होता, त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने मृत्यू आला असता, तर तो ठीक असता असा विचार तिच्या मनात आला. असं वाटायला लागलं, की जणू तिने स्वतःच स्वतःला मृत्युच्या स्वाधीन केलं होतं. संपूर्ण शरीर ब्लॅन्केटमधे गुंडाळून घेतलेलं असूनही थंडीची तीव्रता वाढत होती. थोड्याच वेळात बाहेरच्या ओल्या, तीव्र, हाडं फोडणाऱ्या थंडीने गाडीचा हीटर बंद पाडला. हुडहुडी भरायला लागली होती, दात वाजायला लागले होते. हळुहळू हाताची बोटं गोठणं सुरु झालं. पायात बूट होते, त्यामुळे पाय थोडे उबेत होते. या निर्जन रस्त्यावर, या वेळी दूरवरही कुठे दुसरी कुठली गाडी येईल अशी शक्यता दिसत नव्हती.

मृत्यू पावला पावलांनी जवळ येत शरीर शिथिल करत चालला होता. आता वाचण्याची आशा सोडून देऊन ती आपल्या जवळच्या माणसांची आठवण येऊन हळवी होऊ लागली होती – “माझ्या मृत्यूची बातमी त्यांना केंव्हा कळेल, कोणजाणे! मला इथून कसं घेऊन जातील ते? की इथेच बर्फाखाली दबून, गाडलं जाईल माझं शरीर? मृत्यूची  एक मूक अशी चाहूल कानांना ऐकू येत होती. अरे! कानांना खरंच काहीतरी ऐकू येत होतं. ही चाहूल स्पष्ट होती. असा काही मृत्यूचा आवाज नसतो! पहिलाच अनुभव आहे, काय माहित, कसा असतो ते! कान आता सावध झाले. मेंदूला संदेश मिळाला—“हा तर कुठल्या तरी गाडीचा आवाज आहे”. नसानसात जीवनाशा फुरफुरू लागली. मागून आलेल्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. मनात आलं, थांबवून मदत मागावी, पण परत वाटलं, की कोणजाणे, कोण असेल? आत्ता तर नुसतं थंडीनीच मरायचं आहे, या गाडीला थांबवून आणि कुठल्या त्रासातून जाऊन मरायची वेळ येईल, कोणजाणे! मरणाची भीति तर होतीच, त्यात अजून एका संकटाच्या भीतीचं भूत मानगुटीवर येऊन बसलं. ती ब्लॅन्केटमधे अजूनच गुरफटून बसली, म्हणजे त्या येणाऱ्या गाडीतल्या माणसाला या गाडीत कोणीच नाहिये असं वाटून तो निघून जाईल. ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.

– क्रमशः भाग पहिला    

मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ती, आरसा, आणि मी…” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ती, आरसा, आणि मी” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी 

(त्या म्हणाल्या, “ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा…”) इथून पुढे 

मी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळेला मुलींना सांगितले की, “..मुलींनो समाजातले एक दुर्दैवी मूल आपण स्वीकारू शकत नसू तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार. एखाद्याला मानसिक आधार देणे, मदत करणे हे आपण करायला नको का…? बरं, तिला कुठला रोग नाहीये. तो अपघात झाला होता आणि त्यामध्ये तिच्या शरीरावर हे वैगुण्य आले आहे. हे तुमच्या बाबतीत घडले असते आणि न करो पण पुढे  तुमच्या एखाद्या मुलाच्या बाबतीत घडले, नातेवाईकाच्या बाबतीत घडले तर तुम्ही अशा वागणार आहात का? तुमच्या सहकार्यामुळे तिला मानसिक उभारी मिळणार आहे मुलींनो.. आणि मी तुमच्या विश्वासावरच तिला शाळेत प्रवेश दिला आहे. मला खात्री आहे की तुम्ही माझ्या सगळ्या मुली.. एका मुलीला समाजामध्ये शिक्षण घेण्याच्या कामी नक्कीच मदतीला उभे रहाल. पण तुम्ही तर मला निराशच केलं. मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. अगं दहावी काय, तुम्ही पास व्हाल, पण आयुष्यामध्ये ज्या अनेक परीक्षा द्यायच्यात ना, त्याच्यामध्ये सामोरे जाताना द्याव्या लागणाऱ्या अनेक परीक्षांची तयारी आहे, त्यात तुम्ही नापास होणार आहात का? मुळीच नाही. तुम्ही पतकी बाईंच्या विद्यार्थिनी आहात हे लक्षात ठेवा. संकट आणि दुःखाशी सामना करणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर उभे रहाण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे….” आणि मी बरंच बोलत राहिले.

मुली खाली मान घालून बसल्या होत्या. “तुम्हाला डबा खायचा नसेल तर उद्या मधल्या सुट्टीत मी इथे येईन  तिच्याबरोबर डबा खायला.. कारण तिला मी शाळेत घेतले आहे, ती माझी जबाबदारी आहे, तुमची नाही. आणि मी तुम्हाला याबाबत सक्ती करू शकत नाही.”

दुसऱ्या दिवशी मी माझा डबा घेऊन संस्थेत गेले. मी, मुख्याध्यापक आणि ती मुलगी असा मी डबा माझ्या खोलीत खाल्ला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत मधल्या सुट्टीत गेले त्यावेळी मात्र मला दृश्य वेगळे दिसले. माझ्या सगळ्या मुलींनी त्या मुलीला आपल्याबरोबर डब्यामध्ये बसवले होते आणि त्या आनंदाने गप्पा मारत डबा खात होत्या. ते दृश्य पाहून माझे डोळे वाहिले. त्यांच्या डब्याच्या मध्ये जाऊन मी म्हणलं.. “तुम्ही माझ्या मुली आहात हे सिद्ध केलेत गं ..खूप छान वाटलं…. दहावी होण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी शिकणं खूप गरजेचे आहे. खूप मोठ्या व्हाल. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला …!”

मुलीनाही खूप आनंद झाला. आपण चुकलो याची जाणीव झाली आणि वर्गात पुन्हा प्रश्न निर्माण झाला नाही… शाळा सुरळीत चालू झाली काहीच प्रॉब्लेम नव्हता

सुरेखाच्या डोळ्यात मला हळूहळू आत्मविश्वास दिसायला लागला. अभ्यासाला ती बरीच होती पण फार कृश होती. मी तिच्या पालकांना ‘डॉक्टरांना दाखवून एखादं टॉनिक घ्या’ असा सल्ला दिला. त्यानंतर नागपंचमीचा सण आला. म्हणजे साधारण ऑगस्ट महिना. शाळा सुरू होऊन दीड एक महिना झालेला. माझी मुलींची शाळा असल्यामुळे सेवासदनला सुट्टी होती …शाळेला सुट्टी असली की पूर्ण वेळ मी नापास मुलांच्या शाळेत थांबत असे. आमच्या नापास शाळेला सुट्ट्या अगदी कमी, म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि रविवार याखेरीज सुट्ट्या नाहीत, कारण मला नऊ महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असे. त्यामुळे या दिवशी शाळा चालू होती. 

अर्धी शाळा झाल्यानंतर मुलांना सोडून देण्यात आले आणि त्यानंतर चार वाजता मुलींसाठी फेर धरण्याचा कार्यक्रम होता. मुलींना असे कार्यक्रम फार आवडायचे‌. त्यानंतर आम्ही त्यांना खाऊही देत असू.  माझ्या त्या शाळेची रचना अशी होती की एक मोठा हॉल होता, त्याच्या बाजूला एक छोटी खोली, नंतर अगदी एंट्रन्स लाईक छोटा व्हरांडा आणि त्याच्या बाजूला माझं ऑफिस. त्यावेळी संस्था लहान जागेत कार्य करत होती. ती जागा भाड्याची होती. त्याच्या व्हरांड्यामध्ये माझ्या बंधूनी भिंतीला एक मोठा आरसा बसवून दिलेला होता, कारण सकाळी तिथे लहान मुलांची शाळा म्हणजे नर्सरी होती.. ती मुले आले की आरशात बघून मग प्रवेश करीत असत. 

त्या दिवशी मधल्या सुट्टीनंतर डबा खायला एक वेळ दिलेला होता. तेव्हा या सगळ्या मुली एकमेकींच्या हातावर मेंदी काढत होत्या. आज त्यांना काहीही करायला मुभा होती. गटागटांनी मेहंदी काढण्याचे काम चालू होते. मी सहज आत डोकावले तर ..सुरेखाच्या हातावर दोन मुली मेंदी काढत होत्या. मला खूप आनंद झाला. तिची ती दुमडलेली बोटं, तो भाजलेला हात, पण त्याच्यावर मुली आनंदाने मेंदी काढत होत्या. मला कुठेतरी मनात समाधान वाटले‌. मुलींचे आतमध्ये ड्रेसिंग चालले होते, लिपस्टिक लावत होत्या.. वेण्यांमध्ये  गजरे घालत होत्या ..कुणी फेराच्या गाण्याची प्रॅक्टिस करत होत्या.. त्यांच्या शाळेत त्यांना संधी मिळाली नव्हती. आज इथे त्यांना ते मुक्तपणे अनुभवता येणार होते …!

माझ्या ऑफिसमध्ये बसून मी समोर व्हरांड्याकडे पाहत असताना मला आरशासमोर सुरेखा दिसली. ती ही नटून आली होती. छान गुलाबी पंजाबी ड्रेस घातला होता. हाताला नुकतीच मुलींनी मेंदी लावलेली होती, आणि तिने गळ्यामध्ये एक हार घातला होता ज्याच्यावर आर्टिफिशियल खड्यांचे डिझाईन होते. तो हार ती व्यवस्थित करून आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि आनंदित होत होती. ती हार पुन्हा पुन्हा व्यवस्थित करत होती. 

मी आश्चर्यचकित झाले … मुळात सुरेखाने आरशात आपल्या स्वतःला पहावं हे धाडस होते आणि ती पुन्हा पुन्हा आपला तो गळ्यातला हार सारखा करून आपल्या छबीकडे पाहत होती. अर्थात आरशात बघायचे तिचे वयच होते, परंतु पूर्वी दुर्दैव हे की आरशातले रूप तिला आनंद देत नव्हते, पण आता मात्र तसे नव्हते. त्या सुरकुतलेल्या भाजक्या जळक्या मानेवर रुळणाऱ्या त्या हाराला ती व्यवस्थित करत होती आणि पुन्हा पुन्हा तो नीट बसलाय ना हे निरखत होती. ..कदाचित तिला आपल्या चेहऱ्यात एक नवीन सौंदर्य दिसत असावे. 

मी ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होते… मी मनात म्हणत होते हिला त्यात जळक्या कातडीवर दिसणाऱ्या त्या हारातले कोणते सौंदर्य जाणवत होते ठाऊक नाही, पण तिला जगण्यातली सुंदरता मात्र जाणवली होती. तिचं ते आरशात पाहणं मला मोहून टाकणारे होते. सुरेखाला समवयस्क मुलींनी स्वीकारणे… तिच्या कुरूपतेचा मनापासून सर्वांनी स्वीकार करणे.. तिला थोडे प्रेम देणे आणि पुन्हा वर्गात बसून शिकायची संधी मिळणे… या सर्व कृतींमुळे सुरेखाच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आला होता त्या आत्मविश्वासाचे विलोभनीय सौंदर्य मी पाहत होते. आज सुरेखाच काय, मला सगळे जग सुंदर दिसत होते.. त्या आरशासमोरची मुलगी मला सर्वात सुंदर दिसत होती… कारण तिला जगणे सापडले होते…. खूप आनंदाचा क्षण होता. कदाचित त्या आरशानंही तिला सांगितलं असेल.. “सुरेखा, आज तू खूप सुंदर दिसतेस”.. 

नंतर सुरेखा अगदी सहज रुळली, उत्तम गुणांनी पास झाली. त्यानंतर तिच्या त्वचारोपणाच्या ऑपरेशन साठी एक सामाजिक संस्था पुढे आली. त्यांनी मदत केली. पुढे सुट्टीमध्ये तिची तीन-चार ऑपरेशन झाली आणि सुरेखाचे हात छान काम करायला लागले. बोटं सरळ झाली. चेहऱ्यावरचे आणि मानेवरच्या.. गळ्यावरच्या.. सुरकुत्या कमी झाल्या ! ‘सुंदर मी होणार’ चे सेशन दोन-चार महिन्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले ..एका स्थानिक आमदाराने या कामी खूप मदत केली ..!

सुरेखा पास झाली आणि त्यानंतर तिने जवळच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती बीए झाली. बालवाडीचा कोर्स केला. एका अंगणवाडीमध्ये ती आता शिक्षक म्हणून कार्यरत आहे…!!!

आता माझे आरशात पाहण्याचे वय नाही, तरीही मी जेव्हा जेव्हा आरशात पाहते तेव्हा तेव्हा माझ्या आधी मला तिची प्रतिमा दिसते, कारण मला नेहमी जाणवत राहतं की आरशावर सुरेखाचा पहिला हक्क आहे, त्यानेच तिला सांगितलं, ‘तू खूप सुंदर दिसतेस’, आणि तिथूनच तिचा आत्मविश्वास वाढला. मुळतः आरशात बघण्याचे धाडस तिच्यात निर्माण झाले आणि आमची सुरेखा सुंदर झाली, अगदी अंतर्बाह्य…..!

– समाप्त – 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ती, आरसा, आणि मी…” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ती, आरसा, आणि मी” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी 

नापास शाळेच्या ऍडमिशन सुरू झाल्या.. पालक विद्यार्थी हितचिंतक अशा नापास मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत. कुणाकडे पैसे नाहीत, कोणी खूप गरीब आहे, दहावी मध्ये नववी मध्ये नापास होऊन शिक्षण थांबले आहे, असे खूप विद्यार्थी येतात. 

सकाळी नऊ वाजता माझे काम सुरू  झाले आणि एक रिक्षावाले गृहस्थ आले. त्यांनी आपली ओळख करून दिली आणि म्हणाले “माझी मुलगी येथील एका कन्या शाळेत होती पण शाळेने तिला काढून टाकले आहे. इयत्ता नववीमध्ये शिकत होती. तेव्हापासून ती घरीच आहे.”

मी त्यांना मध्येच थांबून विचारलं, “अहो पण शाळेतनं काढायचं कारण काय?”

त्यावर ते दोन मिनिट गप्प राहिले आणि मग त्यानी मला सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी माझी मुलगी तळत्या तेलात पडून गंभीर जखमी झाली. तिचा चेहऱ्याचा भाग, मानेचा भाग, हात, म्हणजे जवळपास अर्ध शरीर भाजून निघाले तिचे.. सात आठ महिने दवाखान्यातच गेले ..ती जगेल असे मुळीच वाटत नव्हते. पण माहित नाही आमच्या सुदैवाने की तिच्या दुर्दैवाने ती जगली. त्यानंतर तिचा चेहरा, कातडी विद्रूप झाल्यामुळे तिच्या बाई म्हणतात की त्यांच्या शाळेतील मुली तिला घाबरतात, आणि अशी विद्रूप मुलगी आम्हाला वर्गात नको ” …..हे सांगताना त्यांना अक्षरशः रडायला येत होते. त्यांनी हुंदका दिला.

मी उठून त्यांना पाण्याचा ग्लास पुढे केला.. पाठीवरती थोपटलं ..आणि म्हणलं, “काळजी नका करू, आपण करू काहीतरी. ..तुम्ही मुलीला घेऊन या !”

ते म्हणाले, “बाई ती खूप निराश झाली आहे. आता दीड दोन वर्ष झाले ती घरीच आहे. कोणाशी फार बोलत नाही, मिसळायचा तर प्रश्नच नाही. तिला कोणी मिसळूनच घेत नाही. घरातली खोली आणि ती ! बरं, लहानगा जीव, काय समजते हो 14/ 15 वर्षाच्या मुलीला. आमच्या डोळ्यासमोर तिचं सगळं भविष्य उभं रहातं.”….

मलाही थोडं आश्चर्यच वाटलं .. “भाजली आहे ना, एवढं काय काळजी करण्यासारखं, होईल बरं. हल्ली प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात.” 

ते म्हणाले, “हो, पण त्याला ठराविक कालावधी जावा लागेल…. मुलगी बऱ्यापैकी हुशार आहे. घरी बसून खूप कंटाळली आहे. तुम्ही तुमच्या शाळेत प्रवेश दिला तर फार उपकार होतील.”

मी म्हणाले, “उपकाराची भाषा करू नका. शिक्षण घेणं हा तिचा हक्क आहे. आपण तिला शिकवूयात.”

माझ्या शब्दाने त्यांना खूप धीर मिळाला. मी म्हणाले, “मुलीला घेऊन या. मी तिच्याशी बोलते आधी, आणि मग आपण ठरवू.”

ते थोडे सुखावले होते. त्यांना कुठेतरी खात्री वाटत होती की इथे माझ्या मुलीला प्रवेश मिळेल. ते तातडीने घरी गेले आणि एका तासाभराने आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले. 

तोपर्यंत काही ॲडमिशनचे इंटरव्यू चालले होते. मी मुलांशी, पालकांशी बोलत होते, त्यांचे समुपदेशन करत होते. त्यानंतर समोरचे पालक बाहेर पडले. मी खाली वाकून काही फॉर्मवरती टिपणं करत होते आणि हे  रिक्षावाले गृहस्थ पुन्हा ऑफिसमध्ये प्रवेश करते झाले. सोबत त्यांची पत्नीही होती. त्यानी सांगितले, “बाई, मुलीला घेऊन आलो आहे. आपण तिच्याशी बोला.” 

सुरुवातीला तिची आई माझ्याशी बोलली. त्या म्हणाल्या, “दिवाळीचं तळण तळत होते हो, आणि ही पोरगी धावत आली आणि त्या मोठ्या कढईत पडली.” ते सगळं ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. त्या वेदना, ते हॉस्पिटल, सगळं त्या वर्णन करून सांगत होत्या. मी म्हणलं, “एवढ्या लहान लेकराने हे कसं सोसलं असेल ना ?” 

इतक्यात ती मुलगी आत आली. सुरेखा तिचं नाव होतं आणि मीही इतर मुलांना जसा दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारते ये ये …तसं मी हिला हाक मारली “ये ये सुरेखा …”

सुरेखा आत आली. तिला पाहिलं आणि मी खुर्चीवरून नकळत उठले. समोर तिचं रूप पाहून मला काय वाटलं मी सांगू शकत नाही.. भीती, किळस.. भयानक चेहरा होता.. डोळे बाहेर आलेले, गालाची हाडं वर आलेली, त्याच्यावर जळलेलं मास थोडंसं लोंबणारे.. जागोजागी असंख्य जळकट सुरकुत्या, मानेभोवती अशाच सुरकुत्यांचे जळकट जाळे.. केस तुटके तुटके भुरे.. डोक्यावर थोड्याशा जखमा भाजलेल्या.. ओठ भाजल्याने किंचित पुढं आलेले, कानाच्या पाळ्यांची तीच अवस्था.

मी तिच्या हाताशी पाहिलं, हातावरचं मांस दिसावं तसा तांबूस रंग होता. दोन्ही हाताची बोटं आतून मुडपलेली होती आणि अगदी बारीक बारीक बोटं म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या पक्षाच्या पिलाचा जसा रंग असतो ना आणि शरीर असतं तसं ते सगळं होतं. …

मी एक क्षणभर म्हटलं हे रोज बघू शकतो का आपण…? मुळात तिच शरीर अतिशय कृश होतं. म्हणजे हाडं आणि लोंबणारी कातडी.. बाहेर आलेले डोळे.. तुटके केस ..  हे थोडक्यात वर्णन ….आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला ‘शीला पत्की, सामाजिक सेवा करायला निघाला आहात, हे सोसणार आहे का तुम्हाला ? दररोज नुसतं बघणं तरी काय भयानक होतं ते, छे छे, हे होणे नाही…!’

… पण माझ्या दुसऱ्या मनाने मला सांगितलं… ‘मग तू समाजसेवेचा खोटा आव आणतेस का? इतकं साधं तुला सोसता येत नाही.. फक्त बघायचे तर तुला एवढी किळस आली… ती कशी ते सगळं रूप घेऊन समाजात मिरवेल ना? काय सांगणार आहेस तिला तू ? ‘

… आणि मग कुठून अवसान आलं माहित नाही, आतून एक आवाज आला.. ‘नाही नाही, हीच माझी परीक्षा आहे’ ….आणि मी मलाच आजमावण्यासाठी असेल बहुदा.. तिला म्हणलं ” हाय सुरेखा….” आणि तिचा तो मांसल वेडावाकडा हात मी हातात घेतला… तो स्पर्श अगदी थंड होता. कुणीतरी पहिल्यांदा तिचा हात प्रेमाने हातात घेत होतं.. कुणीतरी तिला स्पर्श केला होता.. आणि तिच्या त्या चेहऱ्यावर ओठामधून एक छानसं हसू फुटलं. म्हणजे डब्यात ठेवलेल्या जाईच्या कळ्या उमललेल्या असाव्यात आणि एखादी तळातली कळी न उमललेली ..वरची फुलं काढल्यावर अलगद आणि पटकन उमलते ना तशी तशी ती हसली..! मला वाटतं खूप दिवसांनी ती हसली असावी….. मी माझी स्वतःची परीक्षा घेणं किंवा स्वतःला आजमावणं याच्यासाठी तो हात तिच्या हातात तसाच ठेवला आणि दोन मिनिटांनी त्या स्पर्शात काय संवेदना होती माहित नाही, मी तिच्या दुःखाशी तद्दूप झाले. क्षणभरात दिसणारे विद्रूप रूप माझ्यासमोरून नाहीस झालं आणि माझ्यासमोर दिसत होती एक छोटी मुलगी, तिला पुन्हा एकदा आपलं आयुष्य फुलवायचं आहे, माझ्या थोड्या मदतीची याचना ती करत होती. 

बस्, मी ठरवलं आणि तिला प्रवेश दिला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. बहुदा मी स्वतःला तिला सहन करू शकते का हे आजमावत होते.

तिला प्रवेश दिल्यामुळे तिचे आई-वडील दोघेही रडायला लागले‌. “बाई फार उपकार झाले. आज तुम्ही माझ्या मुलीला जवळ घेतलेत.”

मी त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला. त्यांना धीर दिला… शाळेचे नियम समजावून सांगितले आणि सुरेखाचा प्रवेश झाला ..!

पण इथे मुद्दा संपला नव्हताच. आमच्या मुख्याध्यापकांना मी तिचा विषय समजून सांगितला. त्या दोघी खूप चांगल्या होत्या. मी त्यांना सांगितले, “आपल्याला त्या मुलीला समजून घ्यायचे आहे.”

…तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मैत्रीणच होती आणि त्या माझ्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या, वयाने मोठ्या होत्या.. आई होत्या. त्यानी त्या गोष्टी समजून घेतल्या!

शाळा सुरू झाली. मुलींचा वर्ग, मुलांचा वर्ग सुरुवातीला एकत्रच असे. मग ऍडमिशन सगळ्या झाल्या की मुला मुलींचे वर्ग वेगळे करत असू…

मी तेव्हा सेवासदन मध्ये नोकरी करत होते. मी एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी शाळेमध्ये उपस्थित राहत असे. बाकी सगळे व्यवस्थापन माझा स्टाफ पाहत होता. शाळा माझी अगदी माझ्या संस्थेला लागूनच होती त्यामुळे मुख्याध्यापकांच्या परवानगीने मधल्या सुट्टीतही मी एक चक्कर टाकून जात असे. त्याप्रमाणे मी मधल्या सुट्टीत गेले. मुख्याध्यापिका म्हणाल्या, “बाई बरं झालं तुम्ही आलात. एक प्रॉब्लेम आहे…”

मी म्हणाले, “काय झालं ..?”

त्या म्हणाल्या, “ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा…”

– क्रमशः भाग पहिला

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ असंही एक माहेरपण… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

असंही एक माहेरपण… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मी एक प्रथितयश डॉक्टर आहे. आधी सरस्वतीने, विद्यादेवीनें यशाची माळ माझ्या गळ्यात घातली  होतीचं. तेव्हांच अलकाचीही माळ माझ्या गळ्यात पडली. आणि ती माझी अर्धांगिनी झाली.अलका माझी सहचारिणी ,चतुर,  हुशार,  कल्पक,चाणाक्ष बुद्धीची आहे, म्हणूनच तिने मला सुचवलं ,” तुम्ही तळमजल्यावर स्वतःच क्लिनिक काढा. वरच्या मजल्यावर राहून  तुमच्या बरोबरीने,  मी तुम्हाला हातभार   लाविन.  तिचं वाक्य मध्येच तोडत मी म्हणालो “म्हणजे माझी असिस्टंट होणार की काय  तू ?  त्यावर मानेला एक गोड हलकासा झटका देत ती म्हणाली   ” नाही हो! जातीने लक्ष घालून, पेशंटची मी   ‘ ‘पोटोबा शांती ‘  करून सेवा करीन. आश्चर्याने मी उदगारलो “अरे वा!म्हणजे नक्की काय करणार आहेस तू ? त्यावर मिस्किल  हंसत अलका म्हणाली ”  ऐका  नां , म्हणजे असं बघा तुम्ही पेशंटच्या शरीराची काळजी घ्या. मी त्यांच्या मनाची आणि पोटाची काळजी घेईन. म्हणजे त्यांना   पथ्याचं, खायला-प्यायला घालून  तृप्त करीन .मानसिक आधार देऊन त्यांच्या मनाला सांवरणारा दिलासा देणार . आणि आपल्या संसाराला, तुमच्या पिठाला माझ्या मिठाची जोड देणार. तर मंडळी अशी मला सकारात्मक उर्जा घरातून मिळाल्यावर  उशीर कशाला करायचा? शुभस्य शीघ्रम या वाक्याच्या सुमुहूर्तावर आमचं स्वप्न साकारही झालं होतं. 

काही पेशंट निराश, उदास नकारात्मक विचारांचे होते. तर काही मोकळेढाकळे, दिलखुलास दिलाचे, बिनधास्त  स्वभावाचे होते. श्रीमती नर्मदा वहिनींची गणनाही त्यात करावी लागेल. तपासणीसाठी दोन दिवस राहिलेल्या वहिनी आमच्या घराशी, क्लिनिकशी अगदी  स्टाफशी सुद्धा इतक्या एकरूप झाल्या की स्वतःच   दुखणंच विसरल्या. वहिनींच्या  तपासण्या झाल्या.आणि नको ते संकट ओढवलं.वहिनींच्या पोटात लिंबाएवढी  गांठ होती. आणि ती त्यांना अधून मधून क्लेश देत होती. त्यांना  हे गाठं प्रकरण आपण  कसं   सांगावं ?हा भलामोठा यक्षप्रश्न अलकाच्या आणि माझ्या पुढे उभा होता. लवकरच मेजर रिस्की ऑपरेशन करावं लागणार होतं. वहिनीशी, त्यांच्या हंसर्‍या खेळकर हेल्पफुल नेचर मुळे,आमचं भावनिक नातं जुळलं होतं. पण नाईलाजाने  आता त्यांना सगळी परिस्थिती सांगावीच लागणार होती. कारण पेशंटपासून, त्याची मानसिक तयारी व्हावी म्हणून ,कुठलीही गोष्ट लपवायची नाही. हे माझं ब्रीदवाक्य होतं. अखेर असें हे अवघड  ऑपरेशनचे   दुखणं सांगण्यासाठी मी निघालो. अलका बरोबर होतीच. वेळप्रसंगी वहिनींना ऑपरेशनचं ऐकल्यावर धक्का बसला तर त्यांना सांवरण्यासाठी ती सोबत आली होती. शेवटी काहीही न लपवता सारी परिस्थिती मी कथन केली.आणि प्रततिक्रियेसाठी वहिनींकडे अलकाने आणि मी बघितले. 

क्षणभर त्या गांगरल्या आणि दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून हसतच म्हणाल्या “एवढ्चं नां डॉक्टर!अहो मग काढून टाका नं ती गाठ लवकर. अहो नऊ महिने माझ्या मुलांना मी पोटात वाढवलं.तेव्हा  कुठे आज तीच सोन्यासारखी   माझी मुलं मला आधार देत आहेतं. माझी लेकरचं  आत्ता माझ्या कामास आलीत.पण ही   बिनकामाची बांडगुळासारखी वाढवून त्रास देणारी गाठ, कशाला पोटामध्ये वाढवू ?  माझी तयारी आहे डॉक्टर, सांगा कधी करायचं ऑपरेशन?  हे पोटातलं निरर्थक बांडगूळ लवकरच काढायला हवं नाही कांहो डॉक्टर? त्यांचं बोलणं ऐकून मी निशब्द झालो. काय ग्रेट बाई आहे? वास्तव  किती सहज स्वीकारलय  ह्या वहिनींनी. मी पुढे म्हणालो ” वहिनी ऑपरेशन नंतर दोन महिने तुम्हाला इथे माझ्या देखरेखीखाली रहावे लागेल,माझ्या क्लिनिकमध्ये .लगेच वहिनींकडून उत्तर आलं. “अहो अगदी आनंदाने राहीनं मी,  पण मग नंतर मात्र मला खडखडीत बरी करूनच घरी पाठवा हं! म्हणजे पुन्हा पेशंट म्हणून   इथे यायला नको. वहिनींचा मुलगा म्हणाला “ दोन महिने ? आई,अगं किती कंटाळा येईल तुला!” त्यावर वहिनींचे उत्तर तयारच होतं. “नाही रे बाळा!  कंटाळा  कशाला  येईल? उलट इथे माहेरी आल्यासारखं वाटतंय मला. वेळोवेळी उत्तम काळजी घेणारे हे डॉक्टर, माझ्या शरीराचे रोग बरे करणार आहेत. तर ह्या अलकाताई मला मानसिक आधार देऊन,सुग्रास पौष्टिक पथ्याचं जेवण देऊन, माझ्या आरोग्याची काळजीचं घेणार आहेत. ऑपरेशन नंतर मी खडखडीत   बरी होणार. आणि मग? -मग महाराणी सारखी या पलंगावर  झोपणार.आणि हो, या महाराणीची सेवा करायला या सिस्टर, मावश्या, मामा आहेतचं कीं  माझ्या दिमतीला. सगळेजण मनापासून आणि आत्तापासूनच खूप प्रेमाने काळजी घेत आहेत माझी. याच्यापेक्षा माहेरचे सुख आणखी काय वेगळे असणार? 

वहिनींच्या या आशावादी सकारात्मक बोलण्यावर सगळ्यांनी हसून खुशीची पावती दिली. आणि मी पण पुढच्या ट्रीटमेंट साठी सज्ज झालो .तर अलका पदर बांधून आनंदाश्रू पुसतं, स्वयंपाक घराकडे वळली. स्वतःशीच म्हणाली ‘ हो वहिनींना शिरा    आवडतो  नां? आजपासून या माहेरवाशिणीच्या माहेर पणाला सुरुवात करायला हवी, नाही का? असं हे आगळंवेगळं  माहेर पण आणि आजार पण  भोगून,सकारात्मक विचारांच्या बळावर बर्‍या होऊन,लवकरच वहिनी ठणठणीत  झाल्या, आणि घरी गेल्या  पण. अजूनही अधून मधून त्या आमच्या भेटीला येतात. अशी माणसं आयुष्यात येणं म्हणजे, एक थंडगार  वाऱ्याची झुळूक असते आणि हा  आनंद दायी गारवा आम्हाला वहिनीच्या सहवासात मिळाला.  तर अशा या वयाने ज्येष्ठ आणि मनाने श्रेष्ठ असलेल्या वहिनी सगळ्यांच्या आवडत्या झाल्या आहेत.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीवनसंग्राम… – भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जीवनसंग्राम… – भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी

(नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या.किर्तनकार सांगत होते – –) – इथून पुढे — 

‘गड्यांनो देवांनासुध्दा स्वतःसाठी युध्दं करावी लागली.सीतामाईला आणण्यासाठी प्रभु रामचंद्रांना स्वतःला लंकेला जाऊन युध्द करावं लागलं.दुष्ट कंसमामाला मारण्यासाठी क्रुष्णाला स्वतः कंसाशी युध्द करावं लागलं.महिषासुराला मारण्यासाठी देवीला स्वतः युध्द करावं लागलं.आपण तर शुद्र माणसं आहोत.आपल्या आयुष्यात लढाईचे,युध्दाचे प्रसंग वारंवार येतात.दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल ही अपेक्षा सोडून द्या. तो देव आपल्याला मार्ग नक्की दाखवेल पण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात ठेवा.तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील.प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण, गदा,तलवार अशी शस्त्रं आहेत.आपण सामान्य माणसं अशी शस्त्रं बाळगू शकत नाही.पण संयम,धैर्य, चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्रं आहेत.त्यांचा वापर करुन आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे “

ते ऐकून कमलाच्या अंगावर शहारे आले.आपली परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली.आशेचे किरण असे सहजासहजी दिसणार नाहीत.त्यांच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रयत्नांनी दुर करावे लागतील हे तिच्या लक्षात येवू लागलं “आपल्यालाबी आता लढलं पाहिजे.असं हातपाय गाळून कसं चालेल?”तिनं मनाला समजावलं आणि तिला थोडासा का होईना हुरुप आला.

दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकीलीण बाईकडे पोहचली.वकीलसाहेब घरीच होते.कमलाने मुलीचं प्रकरण  त्यांच्यासमोर मांडलं.दोनतीन वर्ष का होईना नियमित पैसे देणारं अशील मिळालं या कल्पनेने वकीलसाहेब खुष झाले.

“ठिक आहे.आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवू.जर तरीही त्याने नाही ऐकलं तर आपण कोर्टात केस दाखल करु.पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रितसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार करावी लागेल”

कमला गोंधळली.पोलिस, कोर्ट या शब्दांनी तिला कापरं भरलं.ती वकीलसाहेबाला म्हणाली

” साहेब ते नोटीस, पोलिस ,कोर्ट मले काय बी म्हाईत नाई.पोलिसात गेलो तर माह्या जावई आनखीनच डूख धरीन.दुसरं करता यीन का?”

” खरंच हो!ते नोटिस,पोलिसात कंप्लेंट,कोर्टकचेऱ्या यात तर अनेक वर्ष निघून जातील.आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार?दुसरं काही करता येत असेल तर सांगा बिचारीला “

बायकोच असं म्हणायला लागल्यावर वकीलसाहेबांचा चेहरा पडला.मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं.त्यांचा फोन नंबर आणि पत्ताही दिला आणि आपली जबाबदारी झटकून टाकली.दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्यावर कमला हिंमत करुन मुलीला घेऊन पोहचली.त्या तिला घेऊन पोलिस सुपरिटेडंट साहेबांकडे गेल्या.एस.पी.साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी दयाळू होते.कमलाच्या मुलीची हकिकत ऐकून त्यांना तिची दया आली.त्यांनी फोन उचलला.कमलाचा जावई ज्या गावात रहात होता तिथल्या पोलिस ठाण्याला आदेश दिले.चक्रं फिरली.एक तासात कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलिस स्टेशनला उचलून आणल्या गेलं.एस.पी.साहेबांनी दोघांना सज्जड दम भरला.पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर जेल होईल आणि जेल झाली तर आहे त्या सरकारी नोकरीला मुकावं लागेल अशी धमकी जावयाला दिली.तो थरथर कापू लागला.महिला पी.एस.आय.ने सासूला ताब्यात घेतलं.मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाई जबाबदार नसते हे तिला समजावून सांगितलं.पण म्हातारी मोठी चिकट होती.म्हणाली

“ते मले काय बी माहित नाय.मले नातू पाहिजे म्हणजे पाहिजे “

” मावशी तुम्हाला मुलं किती?”

“एक पोरगा आणि दोन पोरी “

” त्या दोन पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या?त्यांच्याऐवजी पोरांना का नाही जन्म दिला ?”

म्हातारी गडबडली.चिडून म्हणाली

“आता ते काय माह्या हातात हाये?”

” आम्हीही तेच म्हणतोय.पोरींना जन्म देणं तुमच्या हातात होतं का?आणि मला सांगा या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर?मग तिलाही फारकत देऊन तिसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर तुम्ही काय सुनाच बदलत रहाणार का?”

आता मात्र म्हातारीला हसू आलं.महिला पी,एस.आय.म्हणाली

” आणि हे बघा मावशी.तुमची सुन चांगली आहे म्हणून तिनं अजून लेखी तक्रार केलेली नाही. तिनं तशी तक्रार केली रे केली की आम्ही तुम्हांला आणि तुमच्या पोराला सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन अटक केलीच समजा “

म्हातारी घाबरली.दुसऱ्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली

“चाल वं सरले,घरला चाल”

पुन्हा मुलावरुन बायकोचा छळ करणार नाही असं आश्वासन कमलाच्या जावयाने दिलं.मग कमला दोघांना घेऊन घरी घेऊन गेली.झणझणीत मटन करुन जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं.

संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली.कमलाने सुटकेचा निश्वास सोडला.एक लढाई तिने जिंकली होती.आता पोराचा निकाल लावायचा होता.तिने सरळ मुळावर घाव घालायचं ठरवलं.

दोन दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली.त्याला कळवळून म्हणाली

“सायेब माह्याकडून आता हे भाजीचं काम होत नाही. पोरानं लई सेवा केली तुमची.आता त्याला कामधंद्याला लावून द्या “

पुढारी महाबेरकी होता.असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्यामागेमागे कोण फिरेल,आपली चमचेगिरी कोण करेल असा विचार करुन तो कमलाला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणाला

” मावशी दोन वर्ष थांबा.दोन वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत.त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवकच बनवतो.एकदा नगरसेवक बनला की मग काय पैसाच पैसा “

कमलाने पुढाऱ्याचा डाव ओळखला.ती उसळून म्हणाली

“अवो साहेब नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी हाये का?दोन मुस्काटात मारल्या तर चड्डीत मुतेल तो.तो काय नगरसेवक बनतो!आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर्च कराया लागत्यात.हायेत का त्याच्याजवळ करोडो रुपये?ते काही नाही साहेब आता म्या त्याला कामधंद्याला लावणार.ते भाजी मार्केटमधी एक दुकान हाये.ते घेऊन द्या.लई मेहरबानी होईन तुमची “

कमला काही ऐकत नाही हे पाहून पुढाऱ्याने फोन उचलला.त्या दुकानाची चौकशी केली.फोन ठेवून म्हणाला “पाच लाखाचं दुकान आहे.जमेल?”

“साहेब माझं सोनंनाणं विकून दोन लाख जमतील.तीन लाखाचं कर्ज द्या.आम्ही दोघं मिळून फेडू”

पुढारी काही बोलेना.कमलाने त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखलं.ती म्हणाली

” साहेब काही काळजी करु नका.गरज लागीन तवा पोराला बोलवा.तुमच्यासाठी त्याला कवा बी हजर करीन “

आता मात्र पुढारी हसला.कमलाचं काम झालं.

आठवडाभरात दुकान मिळालं.सुरवातीला पोरगा दुकानात बसायला तयार होईना.सारखा दुकान बंद करुन पळून जायचा.मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची.त्याला जागचं हलू द्यायची नाही.कमलाच्या नशिबाने एक चांगली गोष्ट घडली.एका खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली.तो तुरुंगात गेला.आपल्यावरही कारवाई होऊ नये या भितीने त्याचे चमचेही राजकारण सोडून कामधंद्याला लागले.कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला.तो रमला हे पाहून कमलाने परत भाजी विकायला सुरुवात केली.कामाची सवय असल्याने असंही तिला घरात करमत नव्हतंच.

भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली.बाहेरुनच तिने देवाला हात जोडले.’आपली लढाई आपणच लढायची’हे ती देवाकडून तर शिकली होती.तिच्या मनात आलं.’अजून  लई लढाया बाकी आहेत.पोराचं लग्न,येणाऱ्या सुनेशी  जमवून घेणं,सुनेची बाळंतपणं,तिचं स्वतःचं म्हातारपण,त्यासोबत येणारे आजार.हा कधीही न संपणारा जीवनसंग्राम होता.त्यात कधी चांगली माणसंं भेटतात कधी वाईट.पण युध्द करणं टळत नाही हेच खरं! 

त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही.देवा मला लढण्याची शक्ती दे रे बाबा “

कमलाने टोपली उचलली आणि ती चालू लागली.पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवनसंग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्य!

– समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी

भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली.काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता.”आज तरी चांगली कमाई व्हायला पाहीजे”अशी मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी,पालक,भोपळा भेंडी,मिरची,कोथिंबीर “असं ओरडत गल्ल्यागल्ल्यातून फिरु लागली.फिरतांना मात्र तिचं मन थाऱ्यावर नव्हतं.मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती.घटनाच तशा घडल्या होत्या.नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती.दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने त्या ओल्या बाळंतिणीला तिच्या निष्पाप पोरीसकट घरी आणून टाकलं होतं.जावयाची तिनं खुप मनधरणी केली.त्याच्या पाया पडली.जावई थोडा नरमला.बायकोमुलीला घरी घेऊन जायला तयार झाला.पण सासू महाहलकट होती.ती जावयावरच भडकली “नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला एक रुपया पण देणार नाही” अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला.शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथंच सोडून निघून गेला.आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता.एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होता हे कमलाला कळत नव्हतं.वंशाला दिवा पाहिजे म्हणे!वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते हे काय तिला माहित नव्हतं?कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय त्याचा पराक्रम.त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा,कमलाचा चोविस वर्षांचा मुलगा काहीच कामधाम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागेमागे फिरायचा.रात्री अकराबारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा.कोबडी खायला मिळते आणि दारु प्यायला मिळते म्हणून त्यानं आपलं आयुष्य असं  बरबाद करावं हे काही तिला पटत नव्हतं.पुढाऱ्याने त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.पण तो अशी स्वप्नं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरुन घेत होता हे कमलाला कळत होतं.तिनं ते पोराला अनेकवेळा समजावूनही सांगितलं होतं.पण पोरगा ऐकत नव्हता.नवरा वारल्यानंतर तीनंच मुलांना मोठं केलं होतं.तसाही नवऱ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता.रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं,रात्री दारु पिऊन तमाशे करायचे आणि कमलाने विरोध केला की तिला मारहाण करायची हेच त्याचं रोजचं काम.त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षांत कमलाने भाजीची टोपली हाती धरली होती.नवऱ्याने तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं.शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो!नवरा लिव्हर सडून मेला तेव्हा ती लोकलाजेस्तव रडली खरी पण खरं तर तिला खुप हायसं वाटलं होतं.आता मुलगा मोठा झाला की तो काहीतरी कामधाम करुन घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातान्हात, थंडीपावसात दारोदारी फिरुन भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती.ती मुलाने फोल ठरवली होती.शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय अशी कमलाला भिती वाटायला लागली होती.

 विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली तिचं तिलाच कळलं नाही.उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली.आज अजूनही बोहनी झाली नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली.अजून बंगलेवाल्यांची काँलनी बाकी आहे हे पाहून ती त्या काँलनीत शिरली.

खरं तर तिला या काँलनीत यायला आवडायचं नाही.करोडोंच्या बंगल्यात रहाणारे,लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोंची दारु पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाचदहा रुपयांसाठी घासाघीस करायचे,वाद घालायचे.बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं.उन्हाळ्यात साधं पाणीसुध्दा पाजायला त्या नखरे करायच्या.

उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्याने कुठेतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटू लागलं.एका बंगल्याच्या सावलीत ती बसली.टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली.गाडीतून एक तरुण बाई उतरली.कमलाबाईला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“काय आहे?कशासाठी रस्त्यात बसलीये?” ती जोरात कमलावर खेकसली

“ताई काही भाजी हवी अशीन तर घ्या.भोपळा आहे,भेंडी आहे,मेथी,मिरची……”

“काही नको.तू जा इथून “ती चिडून बोलली तशी

कमला उठून जायला निघणार तेवढ्यात ” अग अशी काय करतेस?” असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला”परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच. त्याला लागेल ना भाजी!मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी?”

तो सगळी भाजी घेतोय यावर  कमलाचा विश्वास बसेना तरी तिनं हिशोब लावला.तो भावात घासाघीस करेल या विचाराने तिनं भाजीचे शंभर रुपये वाढवून पाचशे रुपये सांगितले.पण त्याने काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला पाचशे रुपये दिले.गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करुन दिली.

“अरे आपण मार्केटमधून आणली असती भाजी.स्वस्त मिळाली असती.दारावर येणाऱ्या या बायका खुप महाग देतात “

त्याच्या बायकोची कटकट अजून सुरुच होती.

“जाऊ दे गं.मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस पंचवीस रुपयांकडे काय बघायचं?बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचची पायपीट करावी लागते.वीसपंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं ?”तो तिला आत नेत म्हणाला.

कमला खुश झाली.बायांपेक्षा हे बापे जास्त दिलदार असतात याचा पुन्हा एकदा तिला प्रत्यय आला.बोहनी झाली होती तीही दणदणीत पाचशे रुपयाची!आणि तीही एका फटक्यात!आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली.स्वयंपाक करुन मुलीला,नातीला जेवू घातलं.मग नातींशी खेळताखेळता झोपून गेली.

उन्हात फिरल्याने संध्याकाळी तिला सणकून ताप चढला.ती नाही नाही म्हणत असतांनाही मुलीने तिला डाँक्टरकडे नेलं.सकाळी झालेली सगळी कमाई डाँक्टरची फी आणि औषधात साफ झाली.आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेने आणि मुलांच्या काळजीने तीला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशीच काय तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही. तीन दिवसांनी तिचा ताप उतरला.तिन्ही दिवस ती घरीच होती.डाँक्टरचं बिल थकलं होतं.प्रचंड अशक्तपणा आला होता.उन्हातान्हात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहीलं नव्हतं.एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच पण तिच्याकडेच सतत पैशांची मागणी करुन तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती.सगळीकडे अंधार पसरला होता.आशेचे किरण कुठंच दिसत नव्हते.कमलाला आता खचल्यासारखं वाटू लागलं.या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेनासं झालं.कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागलं.पण कोण येणार याचं उत्तरही तिच्याकडे नव्हतं.दुसऱ्याच्या दुःखांनी खुश होणाऱ्या नातेवाईकांकडून तर ति ला काडीचीही अपेक्षा नव्हती.त्यापेक्षा छताला लटकून मरुन जावं म्हणजे या सगळ्या कटकटींतून मुक्तता तरी होईल अशीही भावना तिच्या मनात डोकावू लागली.

नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या. किर्तनकार सांगत होते

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा — (१) एका लग्नाची गोष्ट / (२) शठम् प्रति शाठयम्… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

दोन लघुकथा — (१) एका लग्नाची गोष्ट / (२) शठम् प्रति शाठयम्… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

(१) एका लग्नाची गोष्ट – माझे मन तुझे झाले…

१२ मे २०२४ – आज त्या दोघांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव. 

तो – कंपनीत टर्नर फिटरची नोकरी करणारा. ती – अकराव्वी (तेव्हाचे मॅट्रिक्युलेशन) पास. मुंबईत, बोरीवलीत दहा बाय दहाची एक पत्र्याची खोली. 

रेल्वेच्या संपामुळे जोडप्याची वरात निघालेली एका ट्रकमधून. नवीन जोडपे – ड्रायव्हर क्लिनरच्या मध्ये फ्रंट सीटवर बसलेलं. मागे ट्रकमध्ये सासरची माणसं आणि रुखवतात मिळालेली भांडीकुंडी आणि बाकीचा आहेर. ती भांडीकुंडी आणि आहेर कोणी, कुठे, कधी उतरवून नेली हे आजवर कोणालाच ठाऊक नाही.

एका ॲल्युमिनियमच्या भांड्याच्या साथीने सुरू झालेला राजा राणीचा संसार. आर्थिक ओढाताण सुरू व्हायची महिन्याच्या वीस पंचवीस तारखेलाच. पण त्याने तिची हुशारी ओळखलेली, तिला पुढे शिकायचा आग्रह धरलेला. नवऱ्यापेक्षा बायको जास्त शिकलेली नको – “नाकापेक्षा मोती जड नको” हे म्हणणाऱ्या दुनियेत, नवऱ्याचा हा विश्वास तिला हुरूप देऊन गेलेला. ती जिद्दीने शिकली. D.Ed., BA, MA, शिकतच गेली. 

आता ती शाळेत शिक्षिका झाली होती आणि त्याने स्वतःचा वर्कशॉप टाकला होता. संसार-वेलीवर दोन गोजिरवाणी फुलं. छोटा परिवार – सुखी परिवार. पण इतकं छोटंसंच विश्व नव्हतं त्या दोघांचं. 

तो कर्णाचाही अवतार आणि भोळ्या सांबाचाही – वर्कशॉपमधील कामगार, शेजारीपाजारी – अडीअडचणीला सगळेच याच्याकडे यायचे. आणि तोही पदरमोड करून – धावपळ करून – शब्द खर्ची करून सगळ्यांना मदत करायचा. यात खरंतर त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचीच संख्या जास्त. याला ते उमगायचेही, पण त्याने लोकांना मदत करणं काही सोडलं नाही. 

आणि ती तर काय ? शिक्षिकाच झालेली. ती नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, तो एक पेशा होता – पु लं च्या चितळे मास्तरांसारखा. “पोरगं हातात आलं, की त्याला ठाकूनठोकून घडवायचं आणि जगात पाठवायचं” हे जे व्रत तिनं अंगिकारलं, ते कधी सोडलंच नाही.

तिच्या कर्तुत्वाची सरकार – दरबारी दखल घेतली जाऊ लागलेली, तिला पुरस्कार मिळू लागलेले. मार्गदर्शनासाठी तिला आमंत्रणे येऊ लागलेली. आणि तिच्या यशात हाच जास्त सुखावू लागलेला.

लेकाचं लग्न झालेलं, तो नोकरीनिमित्त आखाती देशात. सून नातू आधी त्याच्या बरोबर परदेशी पण आता मुंबईतच बोरिवलीला राहायला आलेले. लेकीची इथेच नोकरी छान सुरू.

दिवस – वर्षे सरली, ती निवृत्त झाली, त्यानेही वर्कशॉप बंद केलेलं. पुण्यात घर घेतलेलं, बोरिवलीच्या जागेच्या पुनर्विकासात एक छान फ्लॅट मिळालेला. “सुख म्हणजे नक्की काय असतं” याची ते दोघं पुरेपूर अनुभूती घेत असलेले.

पण अचानक संकटाची वादळं घोंघावू लागलेली. कोविडने त्याला ग्रासलेले. ऑक्सिजन लेव्हल कमालीची खाली गेलेली, तो ICUमध्ये ऍडमिट. ती स्वामींसमोर ठाण मांडून बसलेली. आणि तो सहीसलामत बचावलेला. 

मग तिची पाळी. आयुष्यात कधी डॉक्टरचं नव्या पैश्याचं बिल न केलेली ती, एकदम कर्करोगानं गाठलेलं. साडे अठरा सेंटिमीटरची गाठ. केमो सुरू झालेली. डोक्यावरचा केशसंभार शिशिराच्या पानगळीसारखा पूर्णपणे झडलेला – पण डोक्यावरचं काळजीचं ओझं मात्र वाढलेलं. आता तो स्वामींसमोर ठाण मांडून बसलेला.

वाकड्या चालीचा कर्करोग आटोक्यात आलेला, ऑपरेशन यशस्वी झालेलं.

दोघेही स्वामी (समर्थ) भक्त. स्वामी त्यांच्या पाठीशी होतेच. 

आज लग्नाच्या सुवर्ण महोत्सवदिनी- ते दोघं – हे सगळंच पुन्हा एकदा अनुभवत होते – एखाद्या चित्रपटासारखं – झरझर डोळ्यासमोरून जाताना. 

लेकाने, लेकीने आई बाबांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवाचा एक छानसा घरगुती कार्यक्रम आयोजित केलेला. त्या दोघांनाही आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसत होते. अगदी संगीत, मंगलाष्टकं यांसमावेत पुन्हा एकदा छान लग्न लागलेलं, सुवासिनींनी ओवळलेलं, अगदी उखाणे – घास भरवणं : सगळं कसं साग्रसंगीत. घरचाच पण व्यावसायिक फोटोग्राफर सगळ्या भावमुद्रा अलवारपणे टिपून घेताना. 

आणि ती आता तिचं मनोगत व्यक्त करताना – 

“हे” आजारी असताना, मला कर्करोग झाला आहे हे कळल्यावर माझे असंख्य विद्यार्थी, आमचे अनेकानेक नातेवाईक हे सगळे सगळे एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहिले, स्वामींचे आशिर्वाद आहेतच. माझ्या कर्करोगाचे निदान कळल्यावर लेकाने क्षणभरही विचार न करता, परदेशातली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि कायमचा भारतात – घरी परतला. लेकीने नोकरी सोडून दिली, ती पूर्ण वेळ माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. 

पैशांच्या जोरावर पूर्ण वेळ सांभाळणारी नर्स हे दोघं सहज ठेऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, मायेची पाखर धरली. आणखी आयुष्यात काय हवं ?

गेल्या १२ मे ला, मी हॉस्पिटलमध्ये होते, श्वास घेतानाही जीव जात होता. पण “हे”, माझा लेक, माझी लेक, सून, नातू – सगळे आले, आम्ही केक कापला, लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आणि आज, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने, मी तुमच्या समोर उभी आहे – हा सुवर्ण सोहळा अनुभवते आहे,”

ती बोलत होती, पार्श्वभूमीला, तिच्या लाडक्या विद्यार्थ्याचा आवाजात पुरिया धनश्री दरवळत होता, सांगत होता – माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले….

… सगळा आसमंत धूसर, सांद्र झालेला, 

गळ्यात दाटलेला आवंढा, डोळ्यात दाटलेले अश्रू …

आज तो आनंद, आनंद !

एका लग्नाची सुवर्ण महोत्सवी गोष्ट ….

( २ ) शठम् प्रति शाठयम्…

शनिवार संध्याकाळ, आणि नेहमीप्रमाणे “निगडी पिझ्झा”ला ग्राहकांची तुंबळ झुंबड उडाली होती. 

निगडी प्राधिकरण – अतिशय वेगाने वाढणारे पुण्याचे एक उपनगर. तेथील एका प्रतिष्ठित खाजगी मानित विद्यापीठाच्या (deemed university) भोवतालचा विस्तीर्ण परीसर. जवळील हिंजवडी आयटी पार्क, चाकण, पिंपरी चिंचवड येथील ऑटोमोबाईल उद्योग यामुळे बहुसंख्येने येऊन स्थायिक झालेले तरुण – तरुणी आणि भरीस या विद्यापीठातील उच्चभ्रू विद्यार्थी. त्यामुळे रेस्टॉरंट, फास्ट फूड यांच्या दुकानांची नुसती रेलचेल होती या परीसरात.

शनिवार रविवार म्हणजे तर या व्यवसायांना पर्वणीच. वीक एण्ड म्हणजे ऐशआरामाचे हक्काचे दोन दिवस असं जणू अलिखित समीकरणच. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अहमहिका लागलेली. वेगवेगळ्या सवलती, कुपन्स यांचा भडीमार असायचा तेव्हा. एकावर एक बर्गर फ्री, ५०% सवलत, मोफत कोल्ड कॉफी – अशा अनेक सवलती. आणि सवलतींच्या मोहाने ग्राहकही तुटून पडायचे खाद्यपदार्थांवर. 

“निगडी पिझ्झा” या स्थानिक दुकानाचा त्या परिसरात निःसंशय दबदबा. तिथला पिझ्झा दोन पैसे महाग असायचा, पण फुल टू पैसा वसूल. आजूबाजूच्या अन्य नामांकित आणि स्थानिक पिझ्झा दुकानांचा व्यवसाय “निगडी पिझ्झा”मुळे चांगलाच मार खात असे.

आफताब बेकर्सला, या आठवड्यात नुसत्या “निगडी पिझ्झा”चेच नव्हे, तर सगळ्याच फास्ट फूडवाल्यांचे ग्राहक आपल्याकडे खेचायचे होते. त्यांच्या डोक्यात एक प्लॅन शिजत होता. त्याने स्थानिक वर्तमानपत्रांत टाकण्यासाठी एका पत्रकाची (flyer) ऑर्डर दिली. “कोणत्याही दुकानाची पंचवीस कुपन्स आणा – आमच्याकडून ४९९/- चा एक पिझ्झा फक्त ४९/- रुपयांत घेऊन जा.” 

सगळेच ग्राहक इतर दुकानांची सगळी कुपन्स घेऊन आपल्याच दुकानी येतील, या आठवड्याअखेरीसचा (weekendचा) त्यांचा सगळा धंदा पूर्ण बसेल आणि एकदा ग्राहकांना आपल्याकडे यायची सवय झाली, की मग ते इतरांकडे फिरकणार नाहीत – असा आफताबवाल्यांचा ठोकताळा. 

प्लॅन सुंदर होता, पण ज्या छापखान्यात हे पत्रक छापायला दिलं होतं त्या छापखान्याच्या मालकाला, सॅमला काही हे पटलं नाही. “निगडी पिझ्झा”वर सॅम लहानाचा मोठा झालेला, उसे उसके नमक का कर्ज अदा करना था. 

सॅमने “निगडी पिझ्झा”ला फोन लावला आणि शनिवारी वर्तमानपत्रासोबत येणाऱ्या आफताबच्या पत्रकाबद्दल सांगितले. “निगडी पिझ्झा”वाल्याने  सॅमचे आभार मानले, आणि मग पुढे त्यांच्यात काही बोलणी झाली. 

शनिवार उजाडला, वर्तमानपत्रे वाटली गेली, त्यात दोन पत्रकं होती. एक आफताब बेकरीवाल्याचं आणि दुसरं “निगडी पिझ्झा”चं. 

“निगडी पिझ्झा” या शनिवारी सर्व ग्राहकांना त्या पत्रकाद्वारे पंचवीस मोफत कुपन्स देऊ करत होते. गंमतीचा भाग म्हणजे या सर्व पंचवीस कुपन्सवर मिळून फक्त पाच रुपयांचे एक चॉकलेट मिळणार होते. 

एरवी असल्या पाच रुपयांच्या भुक्कड कुपनकडे, ते जरी अगदी “निगडी पिझ्झा”वाल्यांचं असलं, तरी कोणी ढुंकूनसुद्धा पाहिले नसते. पण आज “निगडी”च्या या पंचवीस कूपनच्या मोबदल्यात आफताबची घसघशीत ऑफर होती. आणि लोकं ४९९/- चा पिझ्झा फक्त ४९/- रुपयांत मिळवण्याची अशी सुवर्णसंधी अर्थातच सोडणार नव्हते.

ज्यांनी ज्यांनी शनिवारी सकाळी वर्तमानपत्रे उघडली, त्या सगळ्यांनीच आफताब बेकर्सकडे आपला मोर्चा वळवला. अधिक चाणाक्ष लोकांनी दोन तीन वर्तमानपत्रे घेतली, त्यातील “निगडी पिझ्झा”ची कुपन्स घेतली, आणि आफताबकडे कूच केलं. 

संपूर्ण weekend साठी आफताबने जी तयारी ठेवली होती, ती शनिवारची संध्याकाळ सुरू होण्यापूर्वीच पार संपली. आणि हा तिहेरी आतबट्ट्याचा व्यवहार झाला होता. पिझ्झा अगदी स्वस्तात – नुकसानीतच विकावा लागला होता, “निगडी पिझ्झा”वाल्याचं विशेष काहीच नुकसान झालं नव्हतं, आणि संध्याकाळी जेव्हा खरं गिऱ्हाईक आलं, तेव्हा त्यांना देण्यासाठी आफताबकडे काहीच शिल्लक नव्हतं. 

आणि म्हणूनच, आत्ता शनिवार संध्याकाळ होती, आणि नेहमीप्रमाणे “निगडी पिझ्झा”ला ग्राहकांची तुंबळ झुंबड उडाली होती. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवकाळी… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ अवकाळी…  ☆ सौ. प्रांजली लाळे

ह्या वर्षी उन्हानीही जोर धरलेला. पाण्यासाठी पाणवठे शोधत बाया बापड्या दारोदार भटकल्या. वीस रुपयाला एक बादली विकत घेतली. घरात अन्नाचा कण नसला तरी पाण्याला पैसे मोजावेच लागले. पै पै साठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाण्यासाठी तरसावं लागलं..

दिनेशच्या गावाकडल्या घरात आईबाप रहायचे त्याचे. तो मात्र शहरात रहायचा ऐटीत.. ए.सी. रुमचा आरामदायक वेल फर्निश्ड फ्लॅट.. सुंदर बायको, मुलं.. रमला होता संसारात. वर्षाकाठी गावाकडून येऊन शेतावरचे वर्षभराचे धान्य भरून द्यायचे बापू.. माई-बापूने कष्ट करून त्याला शिकवून मोठा सायब बनवलं.. पण तो परत गावाकडे फिरकला नाही. माय-बापू फोन करायचे पण हा टाळून द्यायचा गावाकडे यायचं.. इतका स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी? 

ह्या वर्षीचा दुष्काळ फारच परीक्षा घेत होता. बापू आता थकले होते.. माय माऊली बिचारी कोंड्याचा मांडा करत होती. बापूंनी फोन केला दिनेशला.. सत्य परिस्थिती सांगितली.. ” ह्या वर्षी म्या काय बी पिकवू शकलो नाय बग.. तुला ह्या वर्साला बाहेरून इकत घ्यावं लागंल सर्व ..त्वा काय आला नाय मदतीला.. म्या आता हतबल झालो बग.”

दिनेशही हे ऐकून थोडा हतबुद्ध झाला खरा, पण शहरातील वारं लागलेला शहरी नागरिक झाला होता तो.. बायकोही म्हणाली, “काय फरक पडणार आहे? घेऊ इथून शॉपिंग मॉलमधून विकत.” वर्षभराचे बजेट बिघडताना दिसत असले तरी गावाकडे जाणं मान्य नव्हते.. 

उद्या बापूंना जमीन विकण्याचा प्रस्ताव देणार होता तो.. भरघोस पैसा मिळाला की माय बापूंना शहरात घेऊन येणार.. तेवढीच बायकोला मदत !! सर्वतोपरी निर्णय बापूंचा होता अर्थातच…. आर्थिक बजेट बिघडतंय वाटायला लागलं तसं दिनेशनं गावाकडं दोन-तीन दिवस जायचं ठरवलं.. बायकोला हा स्वार्थी निर्णय पटल्याने तीही चक्क निघाली त्याच्याबरोबर..

दारासमोर गाडी उभी राहिली. बापू खाटेवर बसून होते आणि माय काय तरी निवडत बसलेली. लेकरं अचानक दारात दिसल्यावर कोण आनंद झाला तिला.. थकलेल्या हातांनी नातवंडाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना आकाश ठेंगणं झालं होतं.. बापू मात्र थंड नजरेनं शुन्यात बघत बसले होते.. शेतकऱ्याचं आयुष्य असंच असतं.. वरुणराजा कोपला आणि धरणीमाय तप्त झाली की काय बी खरं नसतं.. शेतीवर असलेलं अमाप प्रेम त्यांना अस्वस्थ करत होतं.. 

दिनेश बापूंजवळ जाऊन बसला.. मायनं तांब्याभर पाणी आणलं.. गटगटा प्यायला.. ‘तृप्त!!’ असा त्याच्या मनातला आवाज ऐकू आला स्वतःलाच.. हातपाय धुवून अंगणात चटई टाकून पहुडला. बायको, मुलं सवय नसल्याने आतमध्ये झोपले.. दिनेशला अंगणातल्या सावलीत गाढ झोप कधी लागली ते कळलंच नाही.

दिनेश झोपला तसं बापू शेजारी येऊन बसले असावेत.. की भास होता कोणास ठाऊक !! डोळे उघडले तसे बायको, मुलं सुद्धा अंगणात येऊन बसलेले दिसले.. मायनं सर्वांसाठी चहा आणला होता.. बापू वावराकडं चक्कर मारायला गेले होते. 

मायजवळ विषय काढलाच त्यानं.. “काय ठेवलंय ह्या गावात आता?? ना पाऊस ना शेती !! बापूंना म्हणावं विकून टाकूया शेती आता.. तुम्ही चला माझ्या बरोबर शहरात..”

माईच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठे पळाला.. अनपेक्षित होते सर्व.. “नाही रे बाळा, ही जमीन आपली आई आहे.. तिच्याशी प्रतारणा कशी करायची? बापू कधीही मान्य नाही करणार. बापूंनी पै पै गोळा करून ही जमीन विकत घेतली आहे.. तु विचारशील, पण जरा जपून.. बापू आणि मी इथेच राहिल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ‘आमचं भागतयं.” नजर चुकवून माय बोलली..

बापू आले संध्याकाळी.. पाहुणे आले म्हटले की गोडधोड व्हायला हवं ना.. गावातील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन आले येताना.. थोडेफार तरी लेकरांच्या हातात टेकवायला म्हणून.. हातपाय धुवून देवासमोर हात जोडून जेवायला बसले.. पिठलं भाकरी.. वरण भात वरपून खाल्ला सर्वांनी. पोरांनाही हा नवीन पदार्थ आवडला.. आजी आजोबांचे घर भारी आवडलं. शेणाने सारवलेले अंगण, ओसरी, स्वयंपाक घर आणि एक खोली.. हवेशीर, शुद्ध हवा..  बायकोही सासूच्या हातचे पदार्थ खाऊन खुश !! 

“माई हे पदार्थ आम्हाला रोज खाऊ घालायला चला नं आमच्या बरोबर..”  माईच्या डोळ्यात आसू तरळले. ती खुश होती लेकरं आली तर.. भोळी होती ती.. खरंच वाटले तिला.. ती रात्री बापूंना हा विषय बोलणार होती..

बापू बाहेर खाटेवर आकाशात पहात पहुडलेले.. माईनं सुपारी कातरुन आणून दिली.. तशी अस्वस्थता अधिक गहरी होत गेली तिच्या मनातली.. ” लेकाचा मनसुबा कळलाय नव्हं तुम्हाला??”  बापू तसे समजून चुकले होते.. त्यांनी इतके उन्हाळे पावसाळे पाहिले होते की ही गोष्ट लगेच लक्षात आली होती. पण बोलून फायदा नव्हता.. पोटाची भूकही महत्वाची होती.. निर्णय घ्यावा तर लागणार होता.. 

‘हो किंवा नाही’ ह्या मनस्थितीत रात्र न झोपता सरली.. माईला तो दिवस अजूनही आठवत होता ज्या दिवशी ती बापूंचा हात धरुन मापटं ओलांडून ह्या गावात आली. एक छोटसं खोपटं होतं बापूंचं.. रुबाबदार दिसायचे बापू.. दिलदार मनाचा रांगडा गडी.. .. माई तशी साधी, सालस. दिसायला सोज्वळ आणि सोशिक. घरात सासु सासरे, नणंद.. सर्वांचे निमूटपणे केले.. बापूही जमिनीच्या एका तुकड्यावरुन वीस एकर जमिनीवर आले.. घोर मेहनतीचे फळ !! एकमेकांच्या साथीने संसार उभा राहिला.. आणि आज अशी वेळ यावी.. दोघांचेही डोळे ओलावले..

झुंजुमुंजू झाल्या. बापू सकाळधरनं गायब झाले ते कोणाला दिसलंच नाही.. दिनेश, सुनबाई सगळेच  उठले.. माईनी डोळ्याला पदर लावला.. काही विपरीत तर घडलं नसलं ना? ” दिनेश.. अरं आपलं बापू कुठं बी न्हाय दिसत..”

दिनेश वैतागून “काय गं माई, काय झाले? असतील शेतावर..”

“नाही ना.. शेजारचा म्हादबा बी येऊन गेला आत्ता.. तो शेतावरनंच आला. तो बी हेच विचारत होता..कुठे गेले बापू म्हणून..”

दिनेशची चांगलीच तंतरली. त्याचं प्रेम होतं बापूंवर.. पण स्वार्थही होताच थोडा.. पैसा महत्त्वाचा वाटायचा त्याला.. पण जे घर, जिथं तो लहानाचा मोठा झाला.. जी जमीन, जिने त्याला महागाचे शिक्षण मिळवून दिले. तो बाप, ज्यानं त्याला घाम गाळून शिकवले.. त्यालाच तो विसरला?? माई धायमोकलून रडायला लागली.. आता मात्र दिनेश हलला.. गावभर मंदिरं, नातेवाईक, शेजारी, सारं सारं शोधलं.. दिनेश हतबल झाला..  ‘कुठे आहात तुम्ही बापू? तुमच्या विना घर कसे वाटतेय?’  सूनबाई माईजवळ बसून राहिली.. लेकरं घाबरली बिचारी.. घर पोरकं तर होणार नाही ना?? एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत होती..

अचानक पावसाची थेंबं टपटप पडायला लागली.. सगळीजणं एकमेकांना सांभाळत होती. माईंना दिलासा देत होती. तो दिवस सांत्वनाचा होता की अजून काही?? पण एकत्र राहण्याचे महत्त्व समजत होते दिनेशला.. हरवलेल्या बापूंना शोधायचेच होते.. पण माईलाही सावरायचे होते. सतत पडणाऱ्या पावसानं तप्त जमीन तृप्तं झाली होती.. पाऊस अवकाळी का होईना, धरणीमाय शांत झाली होती. बापूंसाठी प्रार्थना करत सर्वजण कधी झोपले कळलंच नाही.. 

सकाळी फटफटल्यावर दिनेशला बाहेर गडबड ऐकू आली. पोलीस दिसले चार-पाच. पोटात भितीचा गोळा आला.. ब्रम्हांडं आठवले.. बापू?? बायकोला आवाज देत बाहेर पळालाच.. पाहिले तर बापू माणसांच्या गराड्यात बसलेले मान खाली घालून.. 

पोलिसांनी जुजबी चौकशी करुन दिनेशच्या खांद्यावर थोपटले.. ” सांभाळा आपल्या वडिलांना..काल पहाटे हायवेवर मोठ्या ट्रकसमोर आले होते. पण ट्रकवाल्याने एअरब्रेकने गाडी थांबवली..” 

बापरे हायवे तर इथून एक गाव ओलांडून आहे.. कसे गेले असतील बापू?? दिनेश मनातल्या मनात बोलला. काहीच बोलत नाहीयेत.. नशीब त्यांच्या एका ओळखीच्या माणसानं ओळख पटवली. ” सांभाळा.. वडील पुन्हा मिळत नसतात कधीच..” इन्स्पेक्टर बोलले..

सर्वजण निघून गेल्यानंतर बापूंना जी मिठी मारली ना दिनेशने, ती आयुष्यात कधीच मारली नव्हती.. स्काॅलरपणाचा अहंकार बाळगत बापाच्या अडाणीपणाला तुच्छ समजत जगत होता तो.. सर्व अहंकार विरघळला होता त्या मिठीत !!! जोरदार हंबरडा फोडत म्हणाला “बापू तुम्ही मला हवे आहात “…

बापूंच्या निस्तेज डोळ्यात एक चमक दिसली.. डोळ्यातून घळघळा पाणी आलं.. ” चला बापू आपल्या घरात.. तुम्ही कुठेही नाही जायचं.. आम्हीच येणार. दर सहा महिन्याला.. तुम्हाला आणि तुमच्या धरणीमायला, दोघांनाही भेटायला…”

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर/यातनांचं गाठोडं/अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर / यातनांचं गाठोडं / अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

☆ (१) प्रेशरकुकर… ☆

खचाखच भरलेली चर्चगेट-विरार लोकल मीरा रोड स्टेशनवर थांबताच लोकांची गर्दी, कोंडलेला श्वास सोडत बाहेर पडली. जणू त्यांना एखाद्या गॅस चेंबरमधून मुक्त केलंय आणि आता ते मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. 

त्यात शांतिलालही होते. ट्रेनमधून उतरून लांब लांब टांगा टाकत शांतिलाल सरळ जाऊन रिक्षाच्या रांगेत थांबले. जवळजवळ दहा मिनिटांनी त्यांचा नंबर लागला. 

बेल वाजवली. दरवाजा उघडता उघडता पत्नी म्हणाली,” आज पुन्हा उशीर झाला?परवा माझं उद्यापन आहे. सगळं सामान आणलंय ना? की नेहमीसारखाच आजही वेळ नाही मिळाला?” 

पत्नीला बाजूला  सारून शांतिलालजी आत सोफ्यावर डोळे मिटून बसले.

काही वेळाने पत्नीला म्हणाले,” ऐक.ऑफिसात कामाचं खूप प्रेशर आहे. बॉसकडून उलटसुलट बोलणी आणि ओरडा खाण्यापेक्षा उशिरापर्यंत बसून मी आपलं काम कसंबसं पुरं करतो. टार्गेट पुरं झालं नाही, म्हणून बॉस आपली भडास स्टाफवर काढतो. तू तर दिवसभर घरातच असतेस ना? मग आवश्यक ती खरेदी आटपून घेत जा.”

“असं कसं? दोघांनी मिळून केलं,तर पूजेचं सगळं आयोजन व्यवस्थित होईल ना! लग्न करून आले,तेव्हापासूनच  तुमच्या ऑफिसचं रडगाणं ऐकते आहे. मल्टिनॅशनल कंपनीची नोकरीआणि मुंबईचं नाव ऐकून मी लग्नासाठी होकार दिला होता. आमचे बाबा सरकारी ऑफिसात साहेब होते. माझ्या आईला कधी बाजारहाट करावा लागला नाही. दुकानदार नाहीतर बाबांच्या ऑफिसातला प्यून घरी सगळं सामान आणून द्यायचे. तसंही आमच्याकडे बायका बाहेरची कामं करत नाहीत. कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न असतो तो.” 

त्याच वेळी प्रेशरकुकरची शिटी वाजली. शांतिलाल स्वतः किचनमध्ये गेले. पहिल्यांदा त्यांनी लक्षपूर्वक कुकरकडे बघितलं आणि मग ते विचार करायला लागले,’ या कुकरकडे तरी बघा . वरून प्रेशर आहे आणि खालून आग लागते आहे ,तरीही शिटी वाजवत काय मस्त काम करतो आहे! अनावश्यक वाफ बाहेर टाकायची ,हे त्याला बरोबर माहीत आहे.’ 

मग काय? पुढच्याच क्षणी ऑफिसची चिंता सोडून शिटी वाजवत ते पत्नीला सामोरे गेले. 

मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव 

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (२) यातनांचं गाठोडं ☆

हलतडुलत  बस आली आणि वृद्धाश्रमासमोर थांबली. आतापर्यंत पिकनिकच्या मूडमध्ये असणारी मुलं अचानक शांत झाली. 21 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून पिकनिक स्पॉटनंतर त्यांना या वृद्धाश्रमात स्टडीटूरसाठी आणण्यात आलं होतं. वृद्धाश्रमाचे पदाधिकारी त्यांची वाट बघत होते. वही आणि पेन सांभाळत मुलं बसमधून खाली उतरली. एकमेकांची ओळख करून देणं, थोडा खेळ, खाणंपिणं झाल्यावर पाच-पाच मुलांचा गट बनवण्यात आला आणि त्यांना वृद्धांच्या खोलीत त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवण्यात आलं. 

निकिता आपल्या गटाबरोबर ज्या खोलीत गेली, तिथे एक आजी झोपल्या होत्या. कर्मचार्‍याने सांगितलं की या आजी हल्लीच आल्या आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही,म्हणून त्या बाहेर आल्या नाहीत. त्या खोलीत शिरताच मुलांनी आजींना नमस्कार केला. त्यांची चाहूल लागताच आजी उठून बसल्या. आजीचा चेहरा बघताच निकिता सुन्न झाली.दोघींची नजरानजर झाली आणि त्यांच्या अंतःकरणातून प्रेमाचा लाव्हा फुटला. धावत जाऊन निकिता आजीला बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. आजीही तिचे पापे घेऊ लागली. समोरचं दृष्य बघून सगळे चकित झाले. रडण्याचा आवाज ऐकून टीचर आणि इतर लोकही तिथे आले.हे काय झालं अचानक? कोणालाच समजत नव्हतं. प्रयत्नपूर्वक टीचरनी दोघींना शांत केलं. 

पाणी पिऊन निकिताने सांगितलं,” टीचर, ही माझी आजी आहे. घरच्यांनी मला सांगितलं की आजी गावी गेली आहे. हा वृद्धाश्रम म्हणजे आजीचा गाव आहे,का टीचर? “

हे ऐकताच खोलीत विलक्षण शांतता पसरली. एकमेकींपासून दूर राहण्याची वेदना निकिता आणि आजी -दोघींच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. 

“टीचर,मला घरी नाही जायचं. मी आजीबरोबर इथेच राहीन आणि आजीची काळजी घेईन. जेव्हा मी आजारी पडायचे, तेव्हा आजीला दिवस-रात्र एक करताना पाहिलंय मी. मम्मी-पापा तर ऑफिसात निघून जायचे. टीचर,ही माझी फक्त आजी नाही, माझी मैत्रीणही आहे. जिथे  कुठे राहू, आम्ही दोघी एकत्र राहू .मम्मी-पापा माझ्याशी खोटं का बोलले कोणास ठाऊक! ” 

निकिताचा दबलेला ,घुसमटलेला आवाज शांततेला चिरून जात होता. बालमनाला लागलेल्या  ठेचेने सगळ्यांच्या  यातनांचं गाठोडं उघडलं गेलं होतं. 

मूळ हिंदी कथा: ‘पीडा की गठरी’

मूळ लेखक : डॉ. रमेश यादव

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (३) अहिंसावादी पार्टी ☆

जंगलात निवडणुकीचा धूमधडाका चालू होता. त्यामुळे प्राणी आणि प्राणिनेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. लहानसहान पुढारी आपली रोटी भाजून घेण्यासाठी अचानक सक्रिय होऊन मांड्या ठोकत होते. लोकांना आकर्षित करण्यासाठी हिंसक पुढार्‍यांनी अहिंसेचा जप सुरू केला होता. एकजूट करून निवडणूक लढण्याच्या इराद्याने लहान पक्षांच्या काही प्राणिनेत्यांनी जंगलाबाहेर तलावाकाठी गुपचूप भेटायचं ठरवलं होतं. कोल्हा,अस्वल,लांडगा, बोका,बगळा वगैरे पुढारी अगोदरच पोहोचले होते. दुसर्‍याची विचारपूस करता करता आपलंच घोडं पुढे दामटत होते. या सर्वपक्षीय पार्टीचा नेता कोण होणार आणि जनतेला आपल्याकडे कसं वळवायचं , यावर चर्चा चालली होती. स्वतःविषयी सांगत नेतेपदासाठी आपणच कसे पात्र आहोत,हे सांगत होते. अस्वलानंतर  लांडग्याने आपली बाजू मांडली,” मित्रांनो, आमच्या टोळीने शिकार करणं पूर्णपणे बंद केलं आहे. शिळंपाकं खाऊन आम्ही कसंबसं भागवतोय. खरं सांगायचं तर परस्परांचा आदर-सन्मान करत आपण सर्वांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे.त्यामुळे गरीब आणि असाहाय्य लोकांवर जुलूम होणार नाही. या त्यागामुळे या दलाचा नेता आमच्या समाजातीलच असला पाहिजे. ” सर्वांनी लांडग्याच्या समाजाच्या त्यागवृत्तीची प्रशंसा केली. 

हे ऐकून बोका म्हणाला,” बंधूंनो, माझ्याबरोबरच माझ्या समाजानेही शपथ घेतली आहे,की आता आम्ही उंदरांची शिकार करणार नाही. लोककल्याणासाठी एवढा त्याग तर केलाच पाहिजे. म्हणून नेता आमच्या समाजातीलच असायला हवा.”

आता बगळ्याची पाळी होती. आपलं समर्थन करताना तो बोलला,” मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. मेलेले मासे खाऊन आणि पाणी पिऊन आम्ही गुजराण करत आहोत. त्यामुळे नेतेपदाचा आम्हालाही अधिकार आहे. “

संयुक्त दलाच्या नेतेपदाविषयी एकमत होत नाही, म्हटल्यावर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि सिटांचं वाटप यावर चर्चा सुरू झाली. या मुद्द्यांवरून खूप बाचाबाची झाली; पण ते ठाम निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत. 

तेव्हा बगळाभगत म्हणाला,” मित्रांनो,तुम्ही चर्चा चालू ठेवा. मी पटकन तलावाचं ताजं पाणी पिऊन येतो.” आणि तो तलावाच्या दिशेने चालू लागला. थोडं लांब गेल्यावर त्याने मागे-पुढे बघितलं आणि एका पोहोणार्‍या माशावर पटकन आपल्या चोचीने झडप घातली. पोटपूजा झाल्यावर तो पुन्हा सभास्थानी आला. त्याच्या चेहर्‍यावरची टवटवी बघून लांडगाही पाणी प्यायला म्हणून तिथून निघाला. थोडं पुढे गेल्यावर एक कोंबडी त्याच्या नजरेस पडली. त्याने पुढचामागचा विचार न करता लगेच तिला पकडलं. मागून कोल्हा येत होता,हे बघून शिकारीचा थोडा हिस्सा त्यालाही दिला. ढेकर देत दोघेही सभास्थानी पोहोचले. बोका थोडाच मागे राहणार होता? “जरा जाऊन येतो,” म्हणून थोडा पुढे गेला, तोच त्याला शेतात काही उंदीर दिसले. सफाईदारपणे त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन उंदरांना गट्टम केलं. जेव्हा तो सभास्थानी पोहोचला,तेव्हा बघितलं तर,झाडावर तीन कावळे कावकाव करत आपल्या भाषेत ओरडत होते,” राज की बात कह दूं तो…” 

सगळ्यांना धक्का बसला.मग सर्व नेत्यांनी मिळून त्यांना आश्वासन दिलं,” बंधूंनो, काळजी करू नका. तुमच्या समाजासाठीही काही खास व्यवस्था करण्यात येईल.” 

यानंतर सर्वसंमतीने संयुक्त मोर्चाची घोषणा करण्यात आली. पार्टीचं नाव ठेवलं-अहिंसावादी पार्टी’.त्याबरोबरच सगळ्यांना सांगण्यात आलं,की सर्वोच्च नेतेपदाची निवड निवडणुकीनंतरच केली जाईल. या घोषणेनंतर प्रेस नोट जारी करण्यात आली.

मूळ हिंदी कथा: डॉ.रमेश यादव 

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares