मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-1  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

नाना-नानी यांचीआनंदी जोडी… पासष्ट वर्षाच्या संसारात परिस्थितीच्या रूपानेभोगाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा, पावसाचा भडीमार, आणि बोचरी थंडी यांचा मोठ्या हिमतीने हसत हसत सामना केलेले.. ..छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणारे हे सुखी जोडपे.नानींचं माहेर इंदूरचं… लग्न झाल्या झाल्या नानी हे टोपण नाव ऐकलं की त्यांना कससंच वाटायचं .पण नवऱ्याची लहान भावंडंच काय सगळं घरदारच त्यांना नाना म्हणायचं .म्हणून मग त्या नानी! आणि नानांची सगळ्यांशीच आदराने बोलायची सवय… त्यामुळे त्या नानीजी आणि त्यांचे ‘हे’ नानाजी!

आठवड्यापूर्वीच आपल्या नातवाकडं मुंबईत राहायला आले होते. नातू अमर आणि नातसून नताशा आग्रह कर- करून आपला नवा संसार बघायला त्यांना घेऊन आले होते आणि कमीत कमी पंधरा दिवस झाल्याशिवाय परत जायचा विषयही  काढायचा नाही, अशी त्यांना तंबीही देऊन टाकली होती.

“काहीही म्हणा हं नानीजी, सहा महिनेच झालेत लग्नाला, पण किती छान ट्यूनिंग जमलंय नाही यांचं ?फार छान वाटतंय हे पाहून ! आपल्या दोघी मुली, आणि ह्याचे आई-बाबा यु .एस. सोडायला तयार नाहीतआणि हा पठ्ठ्या अमर, सरळ मी इंडियात ‘सेटल’ होणार, तिथंच धंदा ,व्यवसाय करणार म्हणून ठासून सांगून इथे मुंबईला राहायला आलाय. शब्दाशब्दातून कौतुक भरून वाहत होतं . नानीजी तरी कौतुक करण्यात कुठल्या कमी पडायला!” ही नताशा किती गोड लाघवी मुलगी आहे नाही! आपण आलो त्याच दिवशी मला म्हणाली होती, “नानीजी सध्या तरी आपलं हे घर…म्हणजे हा वन बीएचके फ्लॅट छोटा आहे. असं करा, तुम्ही बेडरूम वापरा . आम्ही हॉलमध्ये”….” वा ग वा शहाणे!” मी म्हणाले , “आम्हालाच हा हॉल हवाय.. मोठा… ऐसपैस! किती प्रेमाने माझ्या कुशीत शिरली होती आणि मांडीवर डोकं ठेवून झोपली होती.”नानी च्या डोळ्यासमोर सारखं तेच चित्र येत होतं . अचानक आठवण झाल्यासारखं त्या म्हणाल्या,

“अरे हो, ती आज सांगून गेली आहे की त्यांचे डिनर आज बाहेर आहे आणि परत यायला पण आज उशीर होणार आहे. संध्याकाळी आपल्यासाठी जेवणाचे पार्सल येणार आहे. आठ वाजले होते नाना-नानी आपलं जेवण आवरून टीव्ही पहात बसले होते. तेवढ्यात दरवाजा धाडदिशी उघडून नताशा आत आली .हातातला मोठा बुके तिनं सेंटर टेबलवर  व्यवस्थित ठेवला. पण पायातल्या चप्पल कोपऱ्यात उडवल्या. पर्स भिरकावून दिली आणि बेडरूमचा दरवाजा पण दणकन् बंद केला.

‘अमर कुठाय… तुमचं डिनर’

 …वगैरे शब्द नानींच्या तोंडातून बाहेर पडलेच नाहीत.  “हा काय प्रकार आहे ?”त्या हळू आवाजात नानांबरोबर बोलू लागल्या. मी गेल्या आठवडाभर पाहतेय… कधी चॉकलेटचा मोठा बॉक्स, कधी लाल गुलाबाची फुलं आणि त्या शोकेस कडं बघा, केवढा मोठा टेडी त्यांनीआणून ठेवलाय… आणि आज हा प्रकार! नानींना काहीच सुचेना.

“हा फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे नां,मग बरोबर आहे”नाना सगळे कोडे उलगडल्यागत बोलले,”कळलं का काही? हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि त्यात आज चौदा तारीख!”

“म्हणजे काय हो? काल परवा कुठल्याशा मालिकेत ऐकला हा शब्द. प्रेमाचा दिवस काहीतरी असतं म्हणे व्हॅलेंटाईन म्हणजे”….इति नानी उवाच!

नानींचा भाबडेपणा पाहून आलेले हसू आवरत नाना म्हणाले ,”अहो परदेशातल्या तरुण-तरुणींचा हा खास दिवस आहे. युरोपातील एका देशात एक व्हॅलेंटाईन नावाचा संत… चर्चचा फादर म्हणा हवं तर, होऊन गेला. प्रेम करणाऱ्या युगुलांचं तो लग्न लावून द्यायचा म्हणे. कारण तिथल्या सम्राटानं ‘लोकांनी लग्नं करायची नाहीत’ असा हुकूम काढला होता. व्हॅलेंटाइनचा आणि चौदा फेब्रुवारी या दिवसाचा काहीतरी संबंध असावा. त्यामुळे चौदा फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा’दिवस व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करायची तिकडं पद्धत आहे.

क्रमशः ….

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :  ‘तुमच्या पापामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह असह्य झाला, तर मी निघून जाईन,’ हा मारुतीचा निरोप भावड्याने लोकांना सांगितला ……)

आता प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे बघायला लागला. पापाची खाण म्हणजे सावकार. त्याने लोकांना खूपच लुबाडलं होतं. पण त्याने विचार केला, ‘तसं लोकांना फसवून मी बक्कळ पैसा   कमावला. पण खरं पाप तर जगन्याने केलंय. शेजाऱ्याच्या बायकोशी चोरटे संबंध ठेवलेयत आणि राजरोस मिरवतोय सभ्य म्हणून.’  जगन्याच्या मते  ‘माझीतर एकाच बाईबरोबर भानगड आहे, पण पाटील तर…. किती बाया आल्या आणि किती गेल्या..’  पाटलाला वाटतंय……

“ऐका ss,”पुन्हा एकदा भावड्याने आरोळी मारली,”देव थकलाय आता.त्याला विश्रांती घ्यायचीय. रात्रही झालीय. तेव्हा आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा. उद्या सकाळी दहाला पूजा होईल. त्यानंतर दर्शनाला या.”

म्हातारीने दगड्यापुढे दंडवत घातला, “द्येवा, माफ कर मला. माझ्या या गुणी पोराच्या अंगावर मी वसवस करत राह्यले. त्याचं पुण्य दिसलंच नाही बघ माझ्या डोळ्याला.”

दादल्या आणि चिमीनेही नमस्कार  करुन माफी मागितली.

“वैनी, मारुतीरायाचं ताट वाढ. मी भरवतो देवाला.”

कोणाच्याही नकळत भावड्याने जेवणात औषध मिसळलं आणि तो दगड्याला प्रेमाने भरवू लागला.  डाळभाताचं ते मिळमिळीत जेवण दगड्याच्या घशाखाली उतरेना.

“हे बघ, दगड्या, देवाने काय सांगितलं, ते ऐकलंस ना? तू पुण्यवान आहेस, म्हणून मारुती तुझ्या अंगात आला. आता, मारुतीने पुढे काय सांगितलं, ते मी सगळ्यांसमोर बोललो नाही. म्हटलं, लोक गेले की तुला सांगूया.”

“काय म्हणाला मारुती?”सगळ्यांचेच कान टवकारले.

“मारुती म्हणाला, ‘दगडू पित होता, ते त्याच्याकडून अजाणतेपणे घडलं. पण यापुढे त्याने जर ती चूक केली, तो एक घोट जरी दारू प्याला, तरी माझ्या गदेने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा करुन टाकीन.’ हे मरेपर्यंत लक्षात ठेव, दगड्या. यापुढे दारूला स्पर्शही करू नकोस. नाहीतर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरेल. कळलं?”

दगड्या घाबरला. खरोखरच घाबरला. खूप खूप घाबरला. त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली, “मारुतीराया, तुझी शपथ घेऊन सांगतो, यापुढे दारूला हातही लावणार नाही.”

दुसऱ्या दिवशी दहानंतर गर्दी जमायला लागली. तेव्हा भावड्याने जाहीर केलं – ” काल मध्यरात्री मारुतीरायाने मला पुन्हा दृष्टांत दिला. मी त्याला विनंती केली,’देवा, मारुतीराया, तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या बऱ्याच जणांच्या हातून पाप घडलंय. त्याचा तुला त्रास होतोय, हे मला ठाऊक आहे. पण तू अचानक असा आमच्याकडे पाठ फिरवून जाऊ नकोस. आणखी एक-दोन दिवसतरी थांब. कोणी आतापर्यंत येऊ शकले नसतील,उद्या-परवा येतील, त्यांना दर्शन दे.मग हळूहळू अंतर्धान पाव.’ तो राजी झाला. म्हणा – जय हनुमान.”

सगळ्यांनी त्याच्या पाठोपाठ ‘जय हनुमान’चा घोष केला.

तिसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चेहऱ्यावरची सूज अर्धीअधिक कमी झाली होती.

चौथ्या दिवशी दगड्या उठला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची मारुतीसूज पूर्णपणे उतरली होती.

नंतर भावड्या मुंबईला परतला आणि दवाखान्यात कंपाउंडरच्या कामावर रुजू झाला.

दगड्याने दारू सोडली व तो व्यवस्थित कामाला लागला.

पण अजूनही त्या गावांत दगड्याच्या अंगात आलेल्या मारुतीरायाच्या कथा भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक सांगितल्या-ऐकल्या जातात.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :दगड्याच्या अंगात मारुती आला नसून ती ऍलर्जीमुळे आलेली सूज आहे, या भावड्याच्या म्हणण्याला डॉक्टरांनी दुजोरा दिला व त्यावर औषध दिलं…..)

भावड्या घरी पोचला, तेव्हा म्हादेव येऊन बसला होता. “द्येवा, मारुतीराया, तू बरोबर मार्ग दावलास. माजी म्हस मला गावली. बोल्ल्यापरमाणं नारळ फोडतो.”त्याने दोन नारळ फोडले आणि दहा रुपयेही ठेवले मारुतीसमोर. नाम्याच्या पोराला नोकरी लागली.तोही खुश होऊन आला. त्याने पेढे आणि वीस रुपये ठेवले.

आजूबाजूच्या इतर गावातलेही लोक दर्शनाला येऊ लागले. आतापर्यंत एका पैशाचीही कमाई नसलेल्या दगड्यामुळे इतके पैसे घरात यायला लागले, म्हटल्यावर घरची परिस्थिती तर सुधारली होतीच ;पण सगळे दगड्याला मानही देऊ लागले होते.

भावड्याने मोबाईलवर दगड्याचा फोटो काढला आणि डॉक्टरांना पाठवला. नंतर त्याने डॉक्टरांना फोन लावला.

“हो. आपला कयास बरोबर होता. त्याला कसलीतरी ऍलर्जीच झाली आहे. मी दिलेलं औषध दे त्याला. म्हणजे निदान वाढणार तरी नाही सूज,”डॉक्टरांनी सांगितलं.

भावड्याने मनोभावे मारुतीला नमस्कार केला. तो म्हातारीला म्हणाला,”आई, आपली पुण्याई म्हणून मारुती आपल्या घरात आला. मी एक दिवस उशिरा आलो, पण आता मात्र मी त्याची सेवा करणार. माझ्या हाताने मी त्याला भरवणार.”

भावड्याने एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा त्याला जाणवलं, की प्रकरण वाटतं, त्यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर आहे. सगळ्याच दृष्टीने.

एक म्हणजे दगड्याच्या तोंडाला आलेली सूज उतरायला हवी. त्याचं शरीर दारूने आधीच एवढं पोखरलेलं आहे, की दुसरं टॉक्सिन ते कितपत पचवू शकेल, ते सांगता येत नाही. त्यामुळेच ही ऍलर्जी झाली आहे, हे नक्की.ही ऍलर्जी कसली आहे, हेही माहीत नाही. एकूण, त्या पेशन्टबाईंवर औषधाचा जसा लवकर परिणाम झाला, तसा दगड्याच्या बाबतीत होईल की नाही, याची गॅरंटी नाही.

दुसरं म्हणजे त्याला बरं वाटलं, त्याच्या चेहऱ्यावर आलेली सूज उतरली, तर त्याचा आनंद वाटणारी व्यक्ती फक्त आपणच असणार.त्याला मिळणारे पैसे, नैवेद्य, मान वगैरेमुळे घरातल्या माणसांची इच्छा, त्याने असंच राहावं, अशी असणार. बाकीच्यांचं सोडाच; पण खुद्द दगड्याही हे देवत्व एन्जॉय करतोय.

आणि आजूबाजूच्या माणसांना कळलं, की हा मारुती-बिरुती नसून ही ह्याला झालेली ऍलर्जी आहे, तर सगळे मिळून दगड्याला तर पिटून काढतीलच, पण घरच्यांनाही सोडणार नाहीत.

यातून काय मार्ग काढावा बरं?

दगड्यासमोर डोळे मिटून, मांडी घालून बसलेला भावड्या खऱ्या मारुतीला आळवू लागला,’मारुतीराया, तुम्हीच सांगा – यातून माझ्या दगड्याची आणि घरातल्या इतरांची सुटका कशी करायची?’

आणि मारुतीने भावड्याला मार्ग दाखवला.

भावड्या उठला. दगड्याच्या पुढ्यात पण दगड्याला पाठमोरा, गर्दीकडे तोंड करुन उभा राहिला. दोन्ही हात वर करुन ओरडला, “थांबा. गप्प राहा सगळे.”

त्याबरोबर सगळेच बोलायचे थांबले आणि उत्सुकतेने त्याच्याकडे बघू लागले.

“मी आता इथे बसून मारुतीस्तोत्र म्हणत होतो, तेव्हा मारुतीने मला दृष्टांत दिला.”

हे ऐकताच लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली.

“शांत राहा. मारुती माझ्याशी काय बोलला, ते ऐकायचं असेल, तर सगळे शांत व्हा.”

त्याबरोबर आपापसातलं बोलणं थांबवून सगळे भावड्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले.

“मारुती म्हणाला, ‘मला तुमच्या गावात यावंसं वाटलं, म्हणून मी गावातल्या सगळ्यांत पुण्यवान माणसाची निवड केली. होय. हा दगडू अजाण लेकरू आहे. तो पित होता, हे खरं आहे. पण त्याच्या अजाणपणामुळे त्याच्या हातून घडलेल्या त्या चुकीला मी माफ केलंय.

हे सगळे लोक भक्तिभावाने माझ्या दर्शनाला आलेत. मी त्यांच्यावर प्रसन्न झालो आहे.

पण……… एखादा पापी माणूस माझ्यासमोर आला, की माझ्या अंगाची आग होते. जळणाऱ्या लंकेत माझ्या शरीराचा दाह होत होता, त्याचीच मला आठवण होते. तेव्हा, जर ती आग, तो दाह असह्य झाला, तर मी दगड्याचं शरीर, तुमचं हे गाव सोडून निघून जाईन. म्हणून शेवटचं सांगतोय, प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी विचार करा. आपण पाप केलंय, असा मनाचा कौल मिळाला, तर इथून निघून जा. नाहीतर मीच निघून जाईन. आजच असं नाही, उद्या, परवा, एरवा, तेरवा….. जेव्हा तुमच्या पापामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह सहन करण्यापलीकडे जाईल तेव्हा.”

एवढं बोलून भावड्या वळला. दगड्याकडे वळून हात जोडून म्हणाला, “देवा, तुझा निरोप सगळ्यांच्या कानावर घातला.”

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : रोजची प्यायची वेळ झाली, तशी दगड्याची तब्येत बिघडत चालली.  दादल्याने त्याला सांभाळलं, सावरलं…..)

आतापर्यंतच्या आयुष्यात दगड्या कोणाच्या खिसगणतीतही नव्हता. आताही काही कमवत नसल्यामुळे उठताबसता त्याचा उद्धार व्हायचा.

त्यामुळे आज अचानक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं आणि घरचे, बाहेरचे सगळे आपल्याला भाव द्यायला लागले, म्हटल्यावर दगड्याला नशाच चढली आणि ती दारूपेक्षाही कितीतरी मोठी, पॉवरबाज होती.

हळूहळू शेजारच्या गावांतही हे मारुतीचं कळलं.मग आपापल्या समस्या घेऊन तिकडचेही लोक यायला लागले.

रात्री लोक घरी गेल्यावर म्हातारीने दगड्याला जेवायला वाढलं.

उभं राहून राहून दगड्याचे पाय दुखत होते. पण त्याची रोजची वेळ झाली होती.

“मी जरा भायेर जावून येतो,”तो म्हणाला.

पण म्हातारीने अडवलं त्याला,”आरं, येडा का खुळा तू ? द्येव आंगात यिवून बसलाय आणि हा चाल्ला पियायला. मारुतीचा क्वोप झाला तं गदा हाणील त्यो डोस्क्यात.”

“व्हय भावजी. हुबं ऱ्हाऊन ऱ्हाऊन दमलायसा.गरम गरम ज्येवण ज्येवून झोपा आता निवांत. उद्या सकाळपासून लोकं येयाला लागतील. मग परत हुबं ऱ्हावं लागणार.”

चिमीला एवढं गोड बोलताना पाहून दगड्यालाच नव्हे, तर म्हातारीलाही नवल वाटलं.

जेवताजेवता म्हातारीलाआठवण झाली, “आरं दादल्या, भावड्याला कळवाया होवं. मारुतीरायाच्या पाया पडून जा, म्हणावं.”

हात- तोंड धुतल्यावर दादल्याने मुंबईला भावड्याला फोन लावला, “आरे, आपल्या घरात चमत्कार झालाय. दगड्याच्या आंगात मारुतीराया आलाय. त्याचा चेहरा बघितलास, तर दगड्या म्हणून वळखूच येईत न्हाय. द्येवच दिसतोय. तवा तू ताबडतोब निघून ये.”मग त्याने भक्तांची गर्दी वगैरे सगळं सांगितलं.

“पण मला लगेच निघायला नाय जमणार. उद्या सकाळी डॉक्टरसायबांना सांगतो, दुसऱ्या कंपाउंडरची सोय करतो आणि मग निघतो.”

रात्री पांघरायला दगड्याला घरातली स्पेशल वाकळ मिळाली.

भावड्याने फोन ठेवला, तेव्हा तो विचारात पडला,’मारुतीला यायचं होतं, तर तो दादल्याच्या अंगात आला असता. या बेवड्याच्या अंगात कशाला येईल तो?’

त्याला मध्यंतरी दवाखान्यात आलेल्या पेशंटबाईची आठवण झाली. तिच्या ओठाभोवतालचा भाग सुजला होता. ती सेम मारुतीसारखी दिसत होती. मग डॉक्टरांनी औषध देऊन तिला बरं केलं. तोंडाची सूज उतरली  आणि ती नॉर्मल झाली. आता उद्या डॉक्टरांनाच विचारूया, असं ठरवून भावड्या झोपला.

सकाळी डॉक्टर म्हणाले, “बरोबर आहे, तू म्हणतोस ते. मारुतीला अंगात यायचंच असतं, तर तो मोठ्या भावाच्या अंगात आला असता ना. या दारुड्याची निवड का केली असती त्याने?त्या बाईंसारखी यालाही ऍलर्जी झाली असणार. हे बघ. मी गोळ्या देतो त्याला. पण बरं होईपर्यंत त्याला अजिबात दारू पिऊ देऊ नकोस.दुसरं म्हणजे तुझ्या घरची माणसंपण ‘मारुती, मारुती ‘ करताहेत. त्यांना हे ऍलर्जी -बिलर्जी, गोळ्या-बिळ्या काही सांगू नकोस. तूच त्याला गुपचूप, कोणाच्या नकळत औषधं देत जा.”

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : दगड्याच्या अंगात मारुती आला, म्हणून म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्या घाबरला, म्हातारी म्येलीबिली का काय?…..)

पण तेवढ्यात म्हातारी उठून बसली आणि पुन्हा डोळे विस्फारून  दगड्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांत नेहमीसारखा राग, तिरस्कार नव्हता. तिचे डोळे भक्तीने तुडुंब भरलेले होते. आणि हात जोडलेले होते.

‘आर तिच्या! आयेबी ढोसाया लागली का काय?’ दगड्याच्या मनात आलं,’येका परीन बरंच हुईल की ते. आपल्या मागची ‘पिऊ नगस’ची कटकट तरी टळंल. पयशे मागत बसाया नको.तीच भरंल.’

म्हातारीच्या चेहऱ्यावरून भक्तीभाव तसाच वाहत होता. आणि ती हात जोडून उभी होती.

“आये, काय गं?”

“मारुतीरायाss, माज्या घरात आलास तू. क्येवढी किरपा झाली रं तुझी. तुझ्यापुढे साखर ठिवते थोडी.”

तिने मारुतीरायाला साखरेचा निवेद दाखवला.

शेजारी कळण्याचा अवकाश, बघताबघता हीs गर्दी गोळा झाली. कोणीतरी समई आणली, कोणी तेल आणलं, कोणी फुलं आणली. म्हातारीच्या घराचं देऊळ झालं.

मग प्रत्येकजण मारुतीपुढे लोटांगण घालून रुपया -दोन रुपये ठेवू लागला.. कोणी नैवेद्याला दूध आणलं. कोणी साखर आणली. कोणी केळी आणली. चिमी खुश झाली. पटापटा सगळं भांड्यात ओतून वाट्या परत करू लागली.

दगड्याला दूध आणि साखरेत रस नव्हता. तो पैसे मोजत होता. दोन -पाच -दहा…… पन्नासपर्यंत मोजले. पुढे जमेना झालं. ‘आयला, त्ये मास्तूर शिकवत होतं साळंत, तेव्हा लक्ष द्याया हवं होतं.’

दादल्याने सगळे पैसे उचलून बाजूला ठेवले.

काल संध्याकाळपासून म्हादेवाची म्हैस सापडत नव्हती. त्याने मारुतीला दंडवत घालून साकडं घातलं, “द्येवा, म्हस गावू दे. दोन नारळ फोडीन तुझ्या पायाशी.”

काय बोलावं, ते दगड्याला सुचेना. तो टकामका बघत राहिला.

गर्दीतलं कोणीतरी बोललं, “म्हादेवा, तुजा सौदा मान्ने नाय द्येवाला. दोन नारळावर पैसं बी दे.”

“बरं, बरं. दोन नारळ फोडीन, वर धा रूपे दीन.”

तेवढ्यात दगड्याला सुचलं. मग मोठ्यांदा श्वास घेत, धापा टाकत तो बोलायला लागला, “म्हस बांधतुयास, त्यो खुंट गोठ्यातून भायेर काढ. अंगणात हुबा कर. ज्या दिशेला पडंल, त्या दिशंला म्हस गेलीया.”

म्हादेवाचं समाधान झालं. तो गेला.

तेवढ्यात नाम्या आला पुढे. “मारुतीराया, माझा पोर शिकलाय थोडाफार. तुला ठाऊकच असेल. पर त्येला नोकरी लागत न्हाय.आज ग्येलाय एका ठिकाणी…..”

“लागंल,लागंल,”दगड्याने उगीचच उत्तर दिलं.

नाम्याने खुश होऊन पाच रुपये ठेवले.

दगड्याला एकदम मस्त आयडिया सुचली, ‘गावातली समदी लोकं येतायत. गुत्तंवाला म्हमद्या बी यील. त्येला सांगायचं -माज्या भक्ताला, या दगड्याला जलमभर फुकटमंदी पियायला द्ये. तुज्या धंद्यात बरकत हुईल.’

जसजसा दिवस उतरत चालला, तसं दगड्याला गरगरायला लागलं. उभा राहिला होता, तो होडीत असल्यासारखा डुलायला लागला. दादल्याच्या लक्षात आल्याबरोबर त्याने लगेचच दगड्याला धरून खाली बसवलं. “द्येवा, सकाळपासून हुबंच हायेसा, जरा खाली बसा.” मग त्याने चिमीला लिंबूसरबत बनवायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने दगड्याला पाजलं.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

दगड्या नेहमीसारखाच हलतडुलत, लटपटत, झोके खात घरी परतला. कुठे वाटेत न पडता घर आलं, म्हटल्यावर त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला.

तसा उशीर खूपच झाला असावा. सगळी गपगार झोपली होती. दगड्या आला काय, नाय आला काय, वाटेतच कुठे झिंगून पडला काय, कोणालाच सोयरसुतक नव्हतं.

अचानक दगड्याला पोटात पडलेल्या प्रचंड खड्ड्याची जाणीव झाली. भुकेचा तो खड्डा एवढा प्रचंड होता, की चुलीपर्यंतचं चार पावलांचं अंतरही त्याला चार कोसांचं वाटलं.

जेमतेम दोन मुदी भात आणि गाडग्याच्या तळाला गेलेलं कालवण….. दगड्याचं पोट अर्धंमुर्धंही भरलं नाही. म्हातारीला उठवून जेवण बनवायला लावावं आणि पोटभर जेवावं,मग तिने शिव्या घातल्या तरी चालतील, असं त्याच्या मनात आलं. पण त्याच्यात तेवढंही त्राण नव्हतं. मग रागाने शिव्या घालत तो उठला. जेमतेम हात बुचकळून म्हातारीला ढकलून तो तिच्या बाजूला पटकुरावर आदळला. म्हातारी झोपेतच जराशी  कण्हली . दादल्या, त्याची बायको चिमी चिप्प झोपली होती.

 

“ए मुडद्या, ऊठ की रं. सूर्य डोईवर आला. कामाबिमाला जायचं सोडून आयतं गिळायला जल्म घेतलाय. म्हातारीने या वयात जमत नसताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मरायचं आणि या म्हाराजानं निसतं ढोस ढोस ढोसायचं. चार मानसं काय खातील, इतकं हा एकटाच गिळतोय. दादल्या आणि चिमी तर तुला भायेर काढाया टपल्येयत. मी आणि भावड्या कसंबसं थोपवतोय त्यास्नी. आता दारू जरा कमी कर, मसन्या आणि कामाचं बघ.”

मजुरीवरून परत आलेल्या म्हातारीची तणतण ऐकून दगड्याची झोपमोड झाली. तो जाम वैतागला.

“चा हाय का तय्यार? चाचा प्येला भरला की मगच मला उठीव.”

 

फुर्रर्र फुर्रर्र चहा पिणाऱ्या दगड्याकडे लक्ष गेलं मात्र, म्हातारी एकदम दचकली.

“प्येला खाली ठ्येव. प्येला खाली ठ्येव की रं मुड…..”

पण दगड्याने पेला पुरा रिकामा झाल्यावरच खाली ठेवला. म्हातारी डोळे फाडून त्याच्याकडे बघतच राहिली.

“काय गं म्हातारे, भूत दिसल्यावाणी काय बघतीस?”

म्हातारीच्या तोंडून शब्दच फुटेना झाला. ती आपली टकाटका बघतच राहिली दगड्याकडे.

 

झालंच तर होतं तसं.त्याचे ओठ तोंडल्याच्या दुपटीने टरटरले होते. नाक फुललं होतं. गालाचा तर जाम फुगाच झाला होता.

“मारुती. व्हय. मारुतीच झालाय रं  माझा दगड्या.”

किती वर्षांनी म्हातारीने आपल्याला ‘माझा’ म्हटलं, म्हणून दगड्या फुशारून गेला.

म्हातारीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खरंच. दगड्या थेट मारुतीसारखाच दिसत होता. म्हणजे मारुती आला का काय दगड्याच्या अंगात?

म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्याने डोळे विस्फारून म्हातारीकडे पाहिलं. आये, आणि नमस्कार घालतेय आपल्याला!रात्री ढोसलेल्या दारूची नशा आता जास्तच चढली का काय!पण म्हातारी खरंच झोपली होती, त्याचे पाय धरून.मग मात्र तो घाबरला, म्येलीबिली का काय ही?

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर ☆

रोजच्यासारखीच धावपळ करत कसंबसं रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रेनचा हाॅर्न वाजला. जिवाचा आकांत करून समोरच निघण्याच्या तयारीत असलेल्या ट्रेनचा आमचा नेहमीचा डबा गाठला आणि डब्यात शिरलो. तेवढ्यातच ट्रेन सुटली. हाशहुश करत आमचा सहा मित्रांचा कंपू असतो तेथे पोहोचलो. ऑफिसची सॅक रॅकवर टाकली आणि पंख्याखाली उभा राहिलो. असंच रोज घडायचं. सकाळी 08.43 च्या कल्याण – सीएसटी डबल फास्टमध्ये मी कल्याणपासूनच बसून प्रवास केला असं क्वचितच घडायचं. पण एक मात्र बरं होतं की सुरेश, रमेश आणि प्रकाश ट्रेन प्लॅटफॉर्मवर  येण्यापुर्वीच हजर असायचे. त्यामुळे आमच्या तीन सीट्स तरी शुअर असायच्या आणि गाडी घाटकोपरला पोहोचली की उरलेले आम्ही तिघे त्यांच्या सीट्सवर अगदी हक्काने बसायचो सीएसटी येईपर्यंत. पण आज मात्र मी ठरवलं की ही स्वतःच्या जीवाची लावचड आपण थांबवायला हवी. उद्यापासून थोडं लवकर  उठून लवकर घर सोडायचंच, म्हणजे अशी धावपळ करावी लागणार नाही.

दुस-या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि भरभर आवरून स्टेशन गाठलं. ट्रेन्स थोड्या लेट असल्याने आमची ट्रेन आली नव्हती. त्यामुळे धावती ट्रेन पकडून सीट पकडायचा प्रयत्न करता येणार होता. तसा प्रयत्न केला देखील मी आणि विंडो सीट नाही आणि दुसरी सीट देखील नाही पण तिसरी सीट मिळवली मी. नंतर उरलेले तिघंही आले आणि गप्पा, चेष्टा, मस्करी करत करत आमचा प्रवास सुरू झाला.

आज एक वेगळी गोष्ट घडली. नेहमी ट्रेन कल्याण स्टेशनमध्ये शिरताना आमच्या समोरच्या सीट्स रिकाम्या असायच्या. पण आज उलट्या बाजूच्या विंडो सीटवर डाऊन करून आलेला माणूस बसला होता. बसला नव्हता. चक्क झोपला होता बसल्या बसल्या. घाटकोपर स्टेशन आलं आणि आम्ही तिघंही उभे राहिलो आणि आमच्या सीट्स आमच्या मित्रांना दिल्या. थोड्या वेळाने माझी नजर त्या उलट्या बाजूच्या विंडो सीटवर बसून आलेल्या माणसाकडे गेली. आता तो झोपला नव्हता. जागा होता. त्याच्या हातात होती एक वही आणि पेन्सिल. बाहेरच्या हवेच्या झोताने त्याच्या वहीचं पान फडफडलं आणि माझ्या नजरेला पडलं आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या सुरेशच्या स्केचकडे. त्या माणसाने ते स्केच जवळपास पुर्ण केलं होतं. त्याच वेळी त्या माणसाने ती वही बंद केली आणि ती वही आणि पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली आणि तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. सीएसटी आल्यावर आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

संध्याकाळी ऑफिस सुटण्यापुर्वीच प्रकाशचा फोन आला आणि समजले की सुरेश गेला. मी एकदम उडालोच. जेमतेम पस्तीशीचा हा सुरेश आणि त्याला एवढ्या कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक आला आणि तो गेला ! सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी आवरून घरी पोहोचायला मध्यरात्र होऊन गेली होती. दुसर्‍या दिवशी उशीराच उठलो आणि मूडच नव्हता ऑफिसला जाण्याचा. त्यामुळे ऑफिसला दांडी मारली.

असेच दिवस चालले होते. आता माझी एक सीट तरी शुअर असायचीच. विंडो सीट नाहीच मिळायची मला ! पण तरीही पुर्वीपेक्षा सुखावह प्रवास व्हायचा रोज. सुरेश जाऊन साधारण महिना झाला असावा आज. आजही आमची ट्रेन सुटली आणि सहजच लक्ष गेलं समोरच्या विंडो सीटला बसलेल्या त्या माणसाकडे, तोच माणूस, स्केच काढणारा. तो माझ्या चांगलाच लक्षात राहीला होता. नेहमीप्रमाणे घाटकोपर आल्यावर उभा राहिलो आणि कुतुहलाने त्या माणसाकडे पाहिलं. तर त्याच्या हातात होती आजही तीच वही आणि पेन्सिल सुध्दा. त्यामुळे मुद्दामच त्या वहीत डोकावून पाहिलं. तर काय ! त्या माणसाने आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या रमेशचे स्केच काढले होते. खुपच सुंदर स्केच काढले होते त्याने. वेळ चांगला जात असेल त्या माणसाचा. तेवढ्यात त्या माणसाने आपली वही बंद केली आणि वही आणि पेन्सिल पिशवीत ठेवून तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. सीएसटी आल्यावर आम्ही गाडीतून उतरलो आणि आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

त्या दिवशी दुपारीच माझा मोबाईल वाजला. प्रकाशचाच फोन होता. फोन ठेवला आणि माझ्या हातापायातील शक्तीच निघून गेली. रमेशला हार्ट अ‍ॅटॅक आला होता आणि तो गेल्याचे सांगण्यासाठीच प्रकाशने फोन केला होता. पुन्हा एकदा तीच धावपळ, तेच सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी. एका महिन्यात आम्ही दोन मित्र गमावले होते.

दुसर्‍या दिवशी सुट्टी होती. सहज कॅलेंडर पाहिलं तर काल अमावास्या होती. प्रकर्षाने आठवण झाली सुरेश आणि रमेश यांची. सहजच कॅलेंडरचं मागच्या महिन्याचं पान पाहिलं आणि लक्षात आलं की सुरेश गेला त्या दिवशी देखील अमावास्याच होती. काय योगायोग होते हे !

असेच काही दिवस गेले. आता आमची चौकडीच उरली होती. आज पिठोरी अमावास्या. वाढदिवस असतो माझा तिथीने. माझी पत्नी आठवणीने लक्षात ठेवते हा दिवस. त्यामुळे माझ्या देखील लक्षात असतो. पण मूडच नव्हता आज. सकाळी प्लॅटफॉर्मवर आलो. ट्रेन अजून यायची होती आणि त्रिकुटही आलं नव्हतं अजून. त्यामुळे मला आज चक्क विंडो सीट मिळाली आणि एकदम खुश झालो. तेवढ्यात त्रिकुट अवतरलं आणि त्यापैकी दोघांनी उरलेल्या दोन सीट्स पटकावल्या. लगेचच ट्रेन सुरू झाली आणि वा-याचा झोत अंगावर आला आणि आणखीनच खुश झालो मी. पण समोरच्या सीटवर पाहिलं आणि मला दरदरून घाम फुटला. समोर तोच माणूस बसला होता आणि त्याच्या हातात होती तीच वही आणि पेन्सिल.

क्रमशः ….

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहेले – आम्ही या वाड्याचे आश्रित होतो. तू मालक झालास. सुहासने मग घराचे नाव ठेवले, आनंदघर. आता इथून पुढे )

एक दिवस आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवताना सुहास म्हणाला,  `आई, आता तुझं लघुउद्योग केंद्र बंद.’

`म्हणजे?’

`ते पापड,  कुरडया,  पुरणाच्या पोळ्या… आणि झबली,  दुपटी,  सलवार,  कुडते…’

`अरे पण…’

`पण नाही नि बीण नाही. बंद म्हणजे बंद.’

`पण माझा वेळ कसा जायचा?’

`वेळ गेला नाही,  तर आपल्या ओळखीच्यात –नात्यात हवं असेल ते, त्यांना फुकट करून दे, पण आता पैशासाठी ही कामे तू करायचीनाहीस. मी कॉलेजमध्ये असताना तू मला आणि स्मिताला पॉकेट मनी द्यायचीस. आता दर महिन्यालामी तुला आणि आप्पांना पॉकेटमनी देत जाईन. आणि इतके दिवस तुम्ही दोघांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाहीत. केलं ते आमच्यासाठी. आता तुम्ही दोघे तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. फिरायला जा. नाटक-सिनेमला जा. प्रवचन-कीर्तनाला जा. जवळ-लांब फिरून या. असं करतो,  पुढच्या महिन्यात तुमचं चार धाम यात्रेचं बुकींग करतो.’

मग पुढची दोन वर्षे दोघेही भरपूर फिरले. किती तरी वर्षं घर एके घर आणि काम एके काम यातच सरली होती. नंतरच्या दोन-तीन वर्षात ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर ते भारतभर फिरून आले. मालतीला वाटलं, आपण आयुष्यात जे कष्ट सोसले होते,  त्यामुळे जो शिणवठा आला होता,  तो सगळा दूर झाला.

एक दिवस सुहास किरणला  घेऊन घरी आला. `आई ही तुझी सून’ तो म्हणाला. किरण त्याच्याच कंपनीत व्यवस्थापन विभागात होती. किरण सावळीच, पण चेहर्‍यावर अतिशय गोडवा. मालतीला बघताक्षणीच ती आवडली. नंतर मालतीला तिची बाकीची माहिती कळली. ती एका धनवंत गुजराथी व्यापार्‍याची मुलगी होती. श्रीमंतीत आणि लाडा-कोडात वाढलेली होती. बुद्धिमान होती. मालती सुहासला म्हणाली, `आपल्या घरच्या परिस्थितीची कल्पना दिलीस का तिला? तिच्या घरचं वातावरण वेगळं. आपल्या घरचं वेगळं. दोन्ही संस्कृतीतही फरक. नाकापेक्षा मोती जड नको व्हायला. ‘

`तसं काही होत नाही आई! आपलंही नाक मोठं झालय आता. मोती फिट्ट बसेल त्यावर. आणि तू काळजी नको करू. मी आपल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिलीय तिला. तुझ्या कष्टाचीसुद्धा. तिला घरच्या खानदानी श्रीमंतीपेक्षा, तू कष्टाने आम्हाला वाढवलंस, मोठं केलंस,  याचं महत्व जास्तवाटतंय.

किरणच्या आईने थोडी नाराजी व्यक्त केली. एक तर दुसर्‍या  समाजात मुलगी द्यायची आणि दुसरं म्हणजे संबंधी आपल्या तोला-मोलाचे नाहीत. पण केशुभाई म्हणाले, `पैसा नंतरही मिळू शकेल. बुद्धिमत्ता नाही मिळू शकणार. आपलं लग्नं झालं, तेव्हा माझी परस्थिती कशी होती? गोपाळदासांच्या दुकानात कापड दाखवायचं काम करत होतो. आता आपली तीन तीन दुकानं आहेत.’ तिलाही मग ते पटलं. गडगंज पैसा सोडला, तर जावयात नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं.

नंतर रीतसर मंगनी,  तीलक,  म्हणजे साखरपुडा झाला. थाटामाटात लग्नंही झालं. शहांची किरण सुखदा बनून सुरेशच्या घरात आणि जीवनात आली. तिचं सुखदा नाव मालतीनंच सुचवलं होतं. माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला आणि जमलेल्यांनी तिला नाव घेण्याच आग्रह केला. तशी नाव घ्यायचं म्हणजे काय, तिने विचारलं. मग सासुबार्इंनी,  मार्इंनीच नाव घेऊन दाखवलं. `मनोहर-मालतीच्या घरात,  सुहासचे हास्य सदा विलसत रहावे. सुहासच्या सुखदाने सर्वांसाठी सुखदा व्हावे. तिच्या या उखाण्याला सर्वांनी,  अगदी सुखदाच्या माहेरच्यांनीसुद्धा दाद दिली.

मालतीची सुनेकडून जशी अपेक्षा होती,  तशीच सुखदा निघाली. दुधात साखर, केशर विरघळावी, तशी त्यांच्या घरात विरघळून गेली. माई आणि आप्पांनी कष्टाने मिळवलेल्या वैभवाचा आणि आत्मसन्मानाचा तिला नेहमीच अभिमान वाटतो. पुढे मिहीर आणि मीरा झाले. सहास-सुखदाचा संसासर वाढला. आप्पा-मार्इंकडे मुलांना सोपवून दोघेही निश्चिंतपणे आपापल्या कामाला जात. माईला आताशी वाटतं, आपली मुलं कशी वाढली, कळलंच नाही. आपल्याला त्यांच्यासाठी वेळ देता आला नाही, की त्यांच्या बाललीलांचा आनंद घेता आला नाही. तेव्हा वेळच मुळी नव्हता. पण आता नातवंड मोठी होताना आपल्याला वेळच वेळआहे. परमेश्वरानं सुखाचं राहिलेलं ते मापही भरभरून आपल्या पदरात घातलय. एवढ्या वेळात मालतीचा आपल्या सगळ्या गत जीवनाचा मागोवा घेऊन झाला होता.

मिहीर आता कीर्तनाच्या समारोपाकडे आला होता. `तेव्हा श्रोते हो, वसुंधरेची कथा आपल्याला  काय सांगते? अं…’  असं म्हणत त्याने स्वर लावला, `कष्ट करी रे कष्टापोटी । समृद्धीचीफळेगोमटी।।’ शोभा, मिराने या ओळी उचलल्या. मग मिहीरने हात पसरून त्यांना थांबा अशी खूण केली. `तर अशा तर्‍हेने आपल्या आख्यानाच्या, कथानायिकेच्या,  वसूच्या संसारात आता `आनंदाचे डोही आनंद तरंग उठले.’

वसुचं आख्यान ऐकताना श्रोत्यांना डोळ्यापुढे मालतीच दिसत होती. मालतीचीच कथा-गाथा महेशने नाव-गाव बदलून आणि थोडाफार बदल करून कीर्तनात बसवली होती.

`…तर श्रोते हो, वसुंधरा आता देवाकडे एकच मागणे मागते…’ असं म्हणत त्याने मागणं मागायला सुरुवातकेली, `हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा। तुझा विसर न व्हावा । तुझा विसर न व्हावा।।

श्रोत्यांना वंदन करून मिहीरने आपले कीर्तन संपवले. श्रोते भारावून गेले होते. मिहीरने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते.

आपण सर्वांनी रुचकर कीर्तनाचा आनंद घेतलात,  आता रुचकर भोजनाचाही आनंद घ्या, अशी सुखदाने माईकवरून अनाउन्समेंट केली, तेव्हा सारे भानावर आले आणि जेवायला उठले.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं- आता या ऑर्डर्स इतक्या वाढू लागल्या,  की त्या त्या वेळी तिघी-चौघींना मदतनीस म्हणून तिला घ्यावं लागे. आता इथून पुढे )

 एक दिवस मनोहर म्हणाला, `रतिलाल विचारत होते, तुमच्या मिसेस गाऊन शिवून देतील का? ‘ रतिलालचे तयार कपड्यांचे दुकान होते. शिवाय त्याचा होलसेलही होता. ती तत्परतेने हो म्हणाली. मनोहर कापड आणून द्यायचा. ती गाऊन शिवून द्यायची. मग एकदा ती म्हणाली, `त्यांना विचारा. मी लहान मुलांचे कपडे, सलवार, कुडते वगैरेही शिवून देईन.  तेही काम तिला मिळालं. नुसतंच मिळालं नाही,  तर बघता बघता वाढलं. आता तिला शिवणासाठीही मदतनिसांची गरज भासू लागली. ती मग  त्यासाठी आपल्या क्लासमध्ये शिकलेल्या आपल्या विद्यार्थिनींनाच बोलवू लागली. ती फक्त कटिंग करून देई. तिच्या देखरेखीखाली मुली शिवत.

दुसरी मुलगी झाली,  तेव्हा तिने कुटंब नियोजनाचे ऑपरेशन करून घेतले. तिने मुलीचे नाव ठेवले स्मिता. मुलं मोठी होत गेली, वाढत गेली, तसा तिचा कामाचा व्यापही वाढत गेला. सामान आणणं, तयार वस्तू पोचवणं, जरुरीप्रमाणे मुलांना शाळेत पोचवणं-आणणं, त्यांची  देखभाल करणं,  या गोष्टी मनोहर मनापासू नकरी. मालतीला नेहमीच वाटतं,  लोक म्हणतात,  तसं कर्तृत्व आपल्या एकटीचं नव्हेच. दोघांचं आहे. मनोहरला त्या काळात कामाची योग्य दिशा सापडली नव्हती,  हेच खरे. ती नंतर मिळाली .

मुले हुशार निघाली. स्कॉलरशीपवर शिकली. मालती-मनोहर एस.एस.सी.सुद्धा नव्हते. मालतीला नेहमीच वाटायचे,  इतर मुलांच्या तूलनेत आपली मुलं मागे नको पडायला. त्यांना शिकवण्या लावू या. पण मुलंच म्हणाली, `आम्हाला शिकवणीची गरज आहे, असं वाटेल, तेव्हा आम्ही तुला सांगू.’ दहावीपर्यंत त्यांनी कुठलेही क्लास वा शिकवण्या न लावता चांगले मार्क्स  मिळवले. स्मिता बी. कॉम झाली आणि एम.बी.ए. व सेक्रेटरिअल प्रॅक्टिसचा कोर्स करून चांगल्या कंपनीत नोकरीला लागली. तिचं लग्नं तिनंच ठरवलं. मुलगा सी.ए. होता. मराठा जातीचा होता, एवढीच अडचण येईल, की काय, असं स्मिताला वाटत होतं. पण जातीचा कीस न पाडता मुलाचं कर्तृत्व बघून मनोहर-मालतीने लग्नाला संमती दिली आणि थाटात लग्न करून दिलं.

मालती देवाचे नेहमीच आभार मानते. दोन्ही मुले बुद्धिमान, कर्तृत्ववान निघाली आणि रुपाने बाबांसारखी झाली. सुहास उत्तम मार्काने दहावी उत्तीर्ण झाला. घरची परिस्थिती बघून त्याने प्रथम डिप्लोमा करायचे ठरवले. डिप्लोमाला तो केंद्रात पहिला आला. दहावीपासूनच त्याला विविध विषयातले, एकूण गुणवत्तेचे अनेक पुरस्कार मिळाले. शिवाय त्याला शैक्षणिक कर्जही मिळाले. दहावीनंतरच्या त्याच्या शिक्षणाची झळ आई-वडलांना बसली नाही. डिप्लोमा झाल्यावर त्याने डिग्रीला प्रवेश घेतला. त्याच वेळी डप्लोमाच्या मुलांच्या शिकवण्याही केल्या.

डिग्री मिळवता मिळवता त्याने कॉम्प्युटरचे काही कोर्सेसही केले. कॅंपस इंटरव्ह्यूच्या वेळी तो नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्ट झाला. मालतीला सुहास शेवटच्या वर्षाला असताना सारखं वाटायचं,  परस्थिती बरी असती,  तर मुलाला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवलं असतं. आपल्या गरिबाच्या घरात जन्म झाल्याने त्याच्या हुशारीचं व्हावं तेवढं चीज झालं नाही. तसं ती बोलूनही  दाखवायची. सुहास म्हणायचा,  `तसं काही नाही माई! बुद्धी आणि कर्तृत्व असलं, की त्याचं चीज होतंच.’ त्याचं म्हणणंही खरंच होतं, याचा मालतीलाही प्रत्यय आला. चार-सहा महिन्यातच एका नव्या प्रोजेक्टसाठी कंपनीने त्याला सहा महिने अमेरिकेला पाठवलं. त्यानंतर ज्या ज्या देशात नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे, त्या त्या देशात सुरुवातीला कंपनी त्यालाच पाठवे. प्रोजेक्टसाठी कोणती माणसं निवडायची,  त्याचे स्वातंत्र्य कंपनीने त्याला दिले. जर्मनी, इंग्लंड,  स्वित्झर्लंड,  दुबई,  कुवेत,  मलेशिया अशा किती तरी ठिकाणी गेल्या चार पाच वर्षात तो हिंडून आला.

मनोहरचे आत्या आणि आत्तोबा एव्हाना देवाघरी गेले होते. त्यांच्या शेवटच्या दिवसात आप्पा आणि मार्इंनी त्यांची खूप सेवा-शुश्रुषा केली होती. आत्या तर दोन वर्षं हांतरुणाला खिळून होत्या. शी-शूपासून त्यांचं सगळं करावं लागे. मनोहर-मालतीने दिल्या जागेच्या उपकाराला जागून  आणि एकूण कनवाळू स्वभाव म्हणूनही सगळं काही मनापासून केलं. मुलं नोकरीची. राहून राहून किती दिवस राहणार? मुलांनी आपापल्या नोकरीच्या जागी आपापल्या वास्तू उभ्या केल्या. मनोहर-मालती अजूनही आत्याच्याच वाड्यात राहत होते. सुहासने मग  आत्यांच्या मुलांना सध्याच्या चालू किमतीत वाडा विकत मागितला. मुलांनी आनंदाने दिला. आपल्या आई-वडलांचं याच दोघांनी केलय,  हे मुलंही विसरली नव्हती. वाडा ताब्यात होताच. रीतसर कागदपत्र झाल्यावर सुहास म्हणाला, वाडा पाडून बंगला बांधू या. पण मनोहर-मालतीच्या किती तरी आठवणी त्या वाड्याशी निगडित होत्या. ती दोघेही वाडा पाडायला नको म्हणाली. सुहासनेही त्यांच्या शब्दांचा मान ठेवत वाडा न पाडता त्याचे रिन्युएशन केले. वाड्यात जेवढ्या म्हणून सोयी-सुविधा करता येतील,  तेवढ्या केल्या. वाडा साजिरा-शोभिवंत झाला. मनोहर-मालतीलाखूप आनंद झाला. आम्ही या वाड्याचे आश्रित होतो. तू मालक झालास. सुहासने मग घराचे नाव ठेवले, आनंदघर.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण बघितलं – बरं का श्रोते हो,  एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा… आता इथून पुढे’)

 मालतीला वाटलं, वसूच्या कथेतून आपलाच जीवन प्रवाह वाहतो आहे. त्यावेळी मनोहर म्हणाला होता, `दुसरी सोय होईपर्यंत तरी राहू दे.’  पण मालती म्हणाली,  `नको. आता इथं राह्यलाच नको.’ इंदूतार्इंनी तिची रुखवताची भांडी तिच्यापुढे आणून आपटली. भांडी, आपले कपडे घेऊन दोघे निघाली. तेव्हा महेश तिला ‘`घरी चल’’ म्हणाला होता आणि तिने त्याला अगदी असंच उत्तर दिलं होतं.

`वसूने मग एक लहान खोली भाड्याने घेतली. भाड्याच्या बदल्यात मालकिणीची पडेल ती कामे करायचं कबूल केलं तिने. मग या श्रमलक्ष्मीचे हात घरात आणि घराबाहेर राबू लागले. खोली लहानच खरी. पण तिची कळा बदलली. ती शोभिवंत,  साजिवंत झाली. बघा… थोरा-मोठ्यांनी म्हंटलंच आहे, `यत्न तो देव जाणावा । देव तेथेचीपहावा।। ‘ खमाजमध्ये बांधलेल्या या ओळींना शोभा-मिरानं उचलून धरलं. मिहीर क्षणभर विश्रांतीसाठी थांबला.

मालतीचं मन भूतकाळात गेलं. घरातून बाहेर पडल्यावर मनोहर म्हणाला, `आत्याबार्इंकडे जाऊन पाहू या. दुसरी जागा मिळेपर्यंत तिथे राहतो,  म्हणू या. त्यांचा वाडा आहे. रहायची जागा मोठी आहे. शिवाय दोघेच तिथे असतात. दोन्ही मुलींची लग्नं झालेली आहेत. मुलांचीही लग्नं होऊन ती आपापल्या नोकरीच्या गावी आहेत.’ निदान त्यांना विचारून तरी पाहूयात, असं म्हणत दोघेही मनोहरच्या सुशीला आत्याकडे गेली. आत्याबार्इंची पासष्ठी,  तर आत्तोबांची,  भाऊसाहेबांची सत्तरी उलटलेली. आत्याबार्इंना बरंच वाटलं. सोबतही होईल, आणि गरजेला उपयोगीही पडतील. आत्याने त्यांना अडगळीची खोली रिकामी करून दिली. भाड्याऐवजी मालतीने त्यांचं स्वैपाक-पाणी करायचं काम कबूल केलं.

मालतीचं आणि आत्यांचं  गूळ-पीठ चांगलं जमलं. एकदा ती आत्यांना म्हणाली, `तुमच्या ओळखीत कुणाला शेवया,  पापड,  कुरडया,  पुरणाच्या पोळ्या हव्या असतील, तर विचारा. मी करून देईन. हळू-हळू त्याच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. तिच्या हातांना काम मिळालं. पैसेही मिळाले. ऑर्डप्रमाणे बाजारातून सामान आणणं,  तयार वस्तू पोचवणं, ही कामं मनोहर करू लागला.

एके दिवशी मनोहर म्हणाला, `तयार धोतर जोड्यांचं पिशव्यात भरून पॅकिंग करायचं काम मिळतय. शंभर नगाच्या पॅकिंगचे दहा रुपये मिळतील. करायचं? ‘

`करू या.’  मालती म्हणाली. मग मनोहर सकाळी जाऊन शंभर धोतरजोड्या व पिशव्या घेऊन येऊ लागला. रात्री सगळी कामे आवरली,  की दोघेजण मिळून पॅकिंग करू लागली. दुसर्‍या दिवशी पॅकिंग पोचवायचं आणि नवीन काम आणायचं,  असं सुरू झालं. असं मिळेल ते काम ती करत राहिली आणि पैसा पैसा जोडत राहिली.

मिहीरने फटका सुरू केला,

 `श्रमलक्ष्मीचे हात राबती, घरी-दारी,  इथे-तिथे।

कष्टावाचून जीवनी या, सौख्य कुणाला कधीमिळते?’      

 तर श्रोते हो, वसुंधराची परिस्थिती बघता बघता सुधारू लागली. ‘

मालती-मनोहरचा आता जम बसत चालला. रोजी-रोटी इतके मिळून थोडे-फार शिल्लकही पडू लागले. पण एवढंच मिळवून भागणार नव्हतं. संसार वाढणार होता. बाळाची चाहूल लागली होती. सातव्या महिन्यात महेश घरी बोलवायला आला, पण मालती म्हणाली, `बाळंतीण झाल्यावर येते.’  पोटात कळा येईपर्यंत ती काम करत राहिली. बाळंतीण झाल्यावर हॉस्पिटलमधून थेट माहेरी गेली. भाऊ-भावजयीनेही  मोठ्या मायेने तिचे बाळंतपण केलं.

मालतीने विचार केला,  मध्यंतरीच्या काळात तुटलेले सासरचे संबंध या नमित्ताने पुन्हा जोडूयात. आताशी मालतीला वाटू लागलं होतं, सासूबार्इंचं तरी काय चुकलं? कुठून त्या तिघांच्या पोटाला घालणार होत्या?  नणंदा लग्न होऊन आपापल्या घरी. दीर पोटापाण्याच्यामागे नोकरीच्या गावी. आपला संसार संभाळून देणारा उचलून तरी किती देणार?

मालतीने बारसं थाटात केलं. त्या निमित्ताने तिने दीर-जावा,  नणंदा, सासुबार्इंना बोलावलं. त्यांचे मान-पान केले. पैशाची जुळणी तिने आधीच करून ठेवली होती. सासरच्यांनीही चांगला बाळंतविडा केला. इंदूताई आता त्या दोघांना पुन्हा घरी चला, म्हणायला लागल्या. त्यावेळी आपलं चुकलं,  निराशेच्या भरात आपण काय बोलत होतो, तेच कळत नव्हतं,  असंही म्हणाल्या. सगळ्यांच्या पुढे हात जोडून माफी मागितली,  पण मालती म्हणाली, `तुम्ही हात नका जोडू. तेव्हा तुम्ही थोड्या कठोर झालात,  म्हणूनच आम्ही हात-पाय हलवायला लागलो. कुणाची लाचारी न पत्करता स्वाभिमानाने सुखाचे चार घास खाऊ लागलो.’ ती पुन्हा त्या घरात मात्र गेली नाही. सासुबार्इंना म्हणाली, `तुम्हाला जेव्हा नातवाला बघावं-भेटावंसं वाटेल,  तेव्हा तुम्हीच येत चला.’ तिने बाळाचे नाव सुहास ठेवलं. तिला वाटलं,  बाळाच्या नावाप्रमाणे त्याला बघताक्षणी सर्वांना प्रसन्न वाटू दे.

सुहास सहा महिन्याचा झाला, तेव्हा केव्हा तरी शिवण-कर्तनाच्या टिचर्स डिप्लोमाची जाहिरात मालतीच्या वाचनात आली. तिला शिवण येतच होतं. पण हा डिप्लोमा केला,  की सरकारी शिवणाचे वर्ग तिला घेता येणार होते. मनोहरने क्लासच्या वेळात बाळाला संभाळायची जबाबदारी स्वीकारली आणि ती शिवणवर्गाला जाऊ लागली. फस्र्ट क्लासमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर पुढे दोन वर्षे तिने शिवणाचे सरकारी वर्ग घेतले. तोपर्यंत दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. मग मात्र तिने ते वर्ग बंद केले. बाकी शिवण शिवून देणं,  आणि पदार्थ करून देणं,  ही तिची कामे चालूच होती. पदार्थांच्या आर्डर्स खूपच वाढू लागल्या होत्या. दिवाळीचे पदार्थही ती मागणीप्रमाणे करून द्यायची. मोदक,  पुरणपोळ्या,  सुरळीच्या वड्या,  चकल्या हे पदार्थ म्हणजे तर तिची खासियत होती. आता या ऑर्डर्स इतक्या वाढू लागल्या,  की त्या त्यावेळी तिघी-चौघींना मदतनीस म्हणून तिला घ्यावं लागे.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares