मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार☆

चुनीलालजींना चालतांना कष्ट पडतात, पण आठवड्यातून कमीतकमी ३ वेळा ५०० मीटर लांब असलेल्या शंकर मंदिरात ते नियमित जात असतात. भाविक प्रवृत्तीचे आहेत. भगवान शंकराचं मंदीर आमची इस्टेट आहे, असं म्हणत ते दर्शनाला जातात. चांगली गोष्ट आहे ! 

माणूस श्रद्धावानच असावा. दगडाच्या देवावर, देवस्वरूप माणसांवर, सत् अशा कार्यांवर माणसाची श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. पशू नसल्याचं… आणि माणूस असल्याचं ते एक लक्षण आहे. 

पण देवळांतील देवावर श्रद्धा ठेवत असता, आपल्या क्षेत्रात काही अन्य सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांद्वारे, राष्ट्र चिंतन,राष्ट्र आराधन, राष्ट्र उपासना चालत असते, तिकडे चुनीलालजी ढुंकूनही वळत नाहीत. 

मोक्ष हा वैयक्तिक पुरुषार्थ आहे. देवळात जाण्याने मोक्ष मिळतो….आणि मातृभूमीच्या संवर्धनार्थ योजिलेल्या कार्यात,आयामात, प्रकल्पांत तो मिळत नाही,असं वाटणं कितपत योग्य आहे ? 

मला वाटतं, या क्षेत्रात मोक्ष तर मिळतोच… पण ‘धर्म-पुरुषार्थ’ ही घडतो. आपल्या वैयक्तिक सत्कर्मात व संस्थांच्या सेवा प्रकल्पात धर्म आहे, ऋणमोचन आहे, ऋण फेडल्याचं समाधान आहे… हे आम्ही लक्षात घ्यायला हवे की नको ?  

जय भोलेनाथ ! जय श्रीकृष्ण ! प्रभू श्री रामचंद्रकी जय ! याच सुरात व याच भाव-भक्तीने, तन्मयतेने “भारत माता की जय !” चा जयजयकार तितकाच मोक्षदायी नाही का ?

देवासमोरचं कीर्तनसुद्धा आता अध्यात्मिक कमी व राष्ट्रीय अंगाने जाणारे अधिक होते आहे…. तेव्हा मोक्ष संकल्पनेचे तात्पर्य-अर्थ  देव, देऊळ यातच सिमीत आहेत… असं मानणं उचित नाही.

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी राष्ट्र कारण केलं… संत गाडगेबाबांनी स्वच्छकारण केलं… कुणी महापुरूषांनी दलित समाजोद्धाराचं कार्य केलं… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व स्वयंसेवकांनी सेवा कार्ये पार पाडली, पाडताहेत…. मातृभूमीच्या रक्षणार्थ सैनिकांनी बलिदान केले… आजही करताहेत… या सर्वांना  ‘धर्म व मोक्ष’  हे दोन पुरूषार्थ तर प्राप्त झालेच, शिवाय अधिक काही ! 

जीवनाचा परमार्थ उलगडण्याचे  जिथे प्रामाणिक प्रयत्न होतात, तिथेही धर्म व मोक्षाचं दान पडतं, हे समजून घ्यायला हवे. 

आपल्याला काय वाटतं ?

ले : मुकुंद पुराणिक

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

(पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली ! ) इथून पुढे ——-

गडाच्या चढाला प्रारंभ केला, त्या वेळी तर अक्षरश: काळोख दाटला, आणि त्यांत सुया टोचाव्यात, तसे अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब. कसेबसे रात्री नऊ -दहाच्या सुमारास गडावर पोहोचलो, अन् शेडग्याने धर्मशाळेत गोळा करून ठेवलेले सर्पण जाळीत रात्रभर अंगे शेकीत बसून राहिलो. सहज चर्चा निघाली किल्ले बघण्याची. बाबाने बोलता बोलता म्हटले, की सिंहगड, पुरंदर, राजगड अन् तोरणा हे किल्ले मी असंख्य वेळा पाहिले आहेत ! एकूण दुर्ग किती पाहिले, ते आठवत नाही!

पुरंदर हे तर बाबाचे घरच. पुरंदरे हे नावच त्या किल्ल्यावरून पडलेले. एवढ्याने भागले नाही. या घराण्याला पर्वतीजवळची दोन चाहूर जमीन मलिकंबरने इनाम दिलेली. वतनाचे ते कागद अजून सुरक्षित आहेत. त्यानंतर मराठेशाहीत या घराण्याने तोलामोलाची स्वराज्यसेवा केलेली. पूर्वजांच्या कमरेला तलवार सदैव बांधलेली. 

पण अशा तर किती पूर्वजांच्या किती कुलदीपकांनी आपापल्या तलवारी मोडीत फुंकून टाकल्या आहेत. आपापल्या वतनांच्या कागदांनी पाणी तापवायचे बंब पेटविले आहेत. पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे एरवी मोल ते किती ? 

पण ते या बहाद्दराने सांभाळले. त्याला शिकल करून, सहाणेवर धरून ते पाजळले. त्याची लखलखीत तलवार हाती पेलली ! 

बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण अशी शब्दकळा कुणाजवळ ? बाबाचे शिवचरित्र वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे. आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली सप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला !

पण हे एवढे शिवमहाभारत लिहूनही लटके प्रौढत्व कसे ते अंगी अजिबात नाही. अंगीचे शैशव या साऱ्या उद्यमामुळे हारपले नाही. एवढा प्रचंड खटाटोप, हा नजर फाडून टाकणारा प्रवास, हे डोंगरदऱ्या भटकणे, हे सगळे करूनही मूळचा अवखळपणा लवलेश उणावला नाहीं. 

छत्रपतींच्या जीवनाचा सारा तपशील जसा मितिवार, प्रहर-घटिकानिशी मुखोद्गत, तसेच, इतर पाठांतर काही कमी नाही. गडी जरा खुलू द्या. रानांत भटकत असतां सभ्यतेचे बंध थोडे सैल होऊं द्या. मग पाहा चुटक्या – चुटक्यांचा धबधबा कसा वाहूं लागतो, ते. कुणाकुणाच्या नकला, कुणाकुणाचे स्वर, कुणाकुणाचे खाकरणे, ठसकणे, अगदी सही सही ! इतिहासाच्या पंचपक्वान्नाच्या जोडीला लावणी- फटक्यांची चटणी-लोणचेही हजर ! 

पु.लं. नी ‘तुझे आहे तुजपाशी’ मध्ये कुण्या एका मुलीविषयी लिहिले आहे, की तिने जन्मभर चालतच रहावे ! 

बाबासाहेब पुरंदरे हा मनुष्य संगतीला लाभला. की वाटते, याने जन्मभर बोलतच रहावे ! असे साभिनय बोलणें, की त्याला तुलनाच नाही ! 

नागपूरचा एक प्रसंग सांगतो. विदर्भ साहित्य संघ आणि मोरभवन अशा दोन टोलेजंग इमारती एकीसमोर एक उभ्या आहेत. मध्ये सडकच काय ती. एका अतिशय विख्यात, वक्तृत्वाबद्दल सुप्रसिद्ध, एका काळी मराठी वाचकांवर अनभिषिक्त सम्राटपद गाजविलेल्या, पिकलेल्या प्राध्यापकांची शृंगाराने सिक्त झालेली व्याख्याने मोरभवनात सुरू होती. त्याच वेळी या तरूणाची शिवचरित्रावरील व्याख्याने समोरील विदर्भ साहित्य संघात चालू झाली. शिवचरित्र हे शिवधनुष्यच आहे. भलत्याने त्याला स्पर्श करू नये. 

पण कौतुक सांगतो, की ज्या वयात शृंगार अतिशय रोचक वाटतो, अशा तरूणांचे जथेच्या जथे मोरभवनातली शृंगाररसाने आर्द्र व्याख्याने टाकून विदर्भ साहित्य संघात गर्दी करू लागले. 

अशी ही जुगुलबंदी आठ दिवस चालली होती. शेवटी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह तुडुंब भरून लोक बाहेर उभे राहून बाबांचा वाक्प्रवाह पिऊन जाऊ लागले. 

शेवटी मोरभवनांतील एका पेन्शनर श्रोत्याने कुतूहल म्हणून विचारले, 

“काय, हो ? इथे काय राज कपूर पाहायला लोक जमले आहेत काय ?” 

उत्तर मिळाले, 

“नव्हे ! इथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग सांगत आहेत !”

                                                                                                               समाप्त

लेखक  – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग ३ – देखणा दुर्ग ग्वाल्हेर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १५ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️

दरबार हॉलच्या भोजनकक्षात एकाच वेळी २०० माणसे टेबल खुर्च्यांवर बसून जेऊ शकतील अशी चांदीच्या ताटांसह सुसज्ज व्यवस्था आहे. या भल्यामोठ्या टेबलावर शाही पाहुण्यांसाठी  चांदीची छोटी रेल्वेगाडी आहे. या रेल्वेचे चार छोटे, उघडे डबे कटग्लासचे बनविले आहेत.  त्यात खानपानाचे पदार्थ भरून ती गाडी जेवणाच्या टेबलावर रुळांवरून फिरत असे. पूर्वी विशिष्ट प्रकारच्या इंधनावर चालणारी ही गाडी आता इलेक्ट्रिकवर चालते.

बिलीअर्डरूममधील भव्य टेबलावरील छतात आणि समोरासमोर बिलोरी आरसे आहेत. एका रूममध्ये १८८० सालचा इटालियन पियानो आहे . पियानोच्या स्टॅण्डवरील लंबकाचे मोठे घड्याळ अगदी आजही बरोबर वेळ दाखविते. गालिच्यावर ठेवलेल्या बिलोरी आरशात वरच्या सुंदर झुंबराचे प्रतिबिंब पाहताना स्वतःचेही प्रतिबिंब दिसते. आरशाच्या दोन्ही बाजूंना कारंज्यासारखी काचेची दोन झाडे आहेत.

इतर दिवाणखान्यात असंख्य अमूल्य वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये इटलीहून बनवून आणलेला काचेचा सुंदर पाळणा आहे. हा पाळणा दरवर्षी कृष्णजन्माष्टमीला वापरण्यात येत असे. औरंगजेब व शहाजहानने वापरलेल्या रत्नजडीत तलवारी, देशी-परदेशी राजांनी भेटीदाखल दिलेल्या मौल्यवान वस्तू,उंची फर्निचर,चिंकु राणीच्या रत्नजडित चपला, दागिने, गालिचे, तैलचित्रे सारे बघावे तेवढे थोडेच! परतंत्र भारतातील संस्थानिकांच्या  ऐश्वर्यसंपन्नतेची ही झलक पाहून डोळे दिपून जातात.

अफगाण राजपुत्र मोहमद गौस  हे सम्राट अकबराचे गुरु. यांची भव्य  कबर  एका बागेत आहे. षटकोनी आकारातील ही कबर लाल दगडात असून त्याला सहा मिनार आहेत. त्याच्या दगडी जाळीची कलाकुसर नाजूक लेससारखी दिसते. त्याच्याजवळच गानसम्राट तानसेनची साधीशी समाधी आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे तिथे हल्ली तानसेन समारोह साजरा होतो. तिथल्या चिंचेच्या झाडाची पाने खाल्ली असता आवाज सुधारतो अशी अख्यायिका आहे. आम्ही आजूबाजूला चिंचेचा वृक्ष कुठे दिसतो का ते पाहत होतो. शेवटी चिंचेचे एक खुरटलेले  झाड दिसले. त्यावरील उरलीसुरली पानेही लोक झोडपून काढीत होते. ही पाने खाऊन किती लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी तयार झाले  कुणास ठाऊक! झाड मात्र खुरटे, बोडके झाले होते.

पुढे एका फुलबागेजवळ राणी लक्ष्मीबाईंचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. तात्या टोपे यांचाही पुतळा आहे. उस्ताद हाफिज अली खॉ॑ यांच्या पुरातन वास्तूमध्ये, सुप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी गतकालातील बुजुर्ग कलावंतांची वाद्ये जतन केली आहेत. बिर्लांनी बांधलेले सूर्यमंदिर एका सुंदर बागेत आहे.

नवव्या शतकात बांधलेले ‘तेली का मंदिर’ शंभर फूट उंच व भव्य आहे. दक्षिणेतील राष्ट्रकूट राजांनी ग्वाल्हेरवर राज्य केले होते. त्या वेळचे हे बांधकाम म्हणजे उत्तर- दक्षिणेचा संगम आहे. षटकोनी आकारातील या मंदिराचा कळस गोपुरासारखी रचना असलेला आहे  आणि बाकी बांधकाम गुप्त शैलीतील आहे. सर्व बाजूंनी वरपर्यंत पिवळसर दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. ‘सास- बहू’ मंदिराचे शिल्पद्वय ( कदाचित या मंदिराचे पूर्वीचे नाव सहस्त्रबाहु असावे) १६९३ मध्ये ग्वाल्हेरचा रजपूत राजा महिपाल याने उभारले . अप्रतिम कलाकुसरीने नटलेले पिवळसर दगडातील कोरीवकाम दिलवाडा मंदिराची आठवण करून देते. दरवाजावर ब्रह्मा-विष्णु-महेश यांची शिल्पे कोरली आहेत. आतील सर्व उंच, भव्य खांब सुंदर नक्षीने नटलेले आहेत. चतुर्भुज विष्णूची मूर्ती आता तिथे नाही.

असंख्य, अज्ञात कलाकारांच्या अथक परिश्रमाने साकारलेली अशी शिल्पकाव्ये भारतभर विखुरलेली आहेत. कालौघात काही नष्ट झाली, काही असंस्कृत लोकांनी विशोभित केली तर कोणी पैशाच्या लोभाने त्यांची तस्करी केली. सोन्याहिऱ्यांच्या सुंदर कलाकृती गझनीच्या महंमदापासून इंग्रजांपर्यंत सर्वांनी मनसोक्त लुटल्या. तरीही जे शिल्लक आहे ते भारताच्या प्राचीन वैभवशाली परंपरेची साक्ष आहे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी आणि देश-विदेशातील प्रवाशांसाठी हा समृद्ध वारसा डोळ्यात तेल घालून जपला पाहिजे.

भाग ३ व ग्वाल्हेर यात्रा समाप्त.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद –भाग १ ☆ सुश्री शुभदा साने

सुश्री शुभदा साने

? आत्मसंवाद –भाग १ ☆ सुश्री शुभदा साने ?

शब्द – ए ss शुक… शुक… अग शुभदा…. शुभदा साने…जरा इकडे बघ ना!  ऐक तरी आम्ही काय म्हणतोय ते….

मी –  कोण तुम्ही ? आणि असे घोळक्याने का उभे आहात? सांगा ना!

शब्द – ओळखलं नाहीस? तुझ्यातच तर असतो आम्ही. तुझ्या मनात…. तू जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतेस, तेव्हा आमचीच तर मदत घेतेस. आम्ही म्हणजे शब्द,

मी – खरच की रे, तुम्ही माझे सवंगडी आहात. अगदी बालपणापासूनचे. तुम्हाला शब्दमित्र म्हंटलं तर, चालेल का?

शब्द – आता कसं बोललीस? तुला आवडतं आमच्याशी खेळायला. तू लहान होतीस, अगदी तेव्हापासूनच….. आठवतय का?

मी  –  आठवतय ना! मी चौथीत किंवा पाचवीत असेन, तेव्हाची गोष्ट…. एके दिवशी संध्याकाळी मला खूप कंटाळा आला होता. त्याचं काय झालं, शाळेतून घरी आले, तेव्हा आई नि दादा दोघेही घरात नव्हते. दादा म्हणजे माझे वडील.

शब्द – दादा म्हणजेच सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. ज. जोशी….

मी  – हं ! आगदीबरोबर! तर काय सांगत होते, आई नि दादा दोघेही तेव्हा घरात नव्हते. आणि नेहमी खेळायला येणारी माझी मैत्रीणही तेव्हा बाहेर गेली होती. थोडी हिरमुसून मी अंगणात आले. अगदी  कंटाळा आला होता मला आणि अचानक काही ओळी माझ्याकडे धावत आल्या.

शब्द – अग, त्या ओळीमधे आम्हीच होतो. म्हणजे तू आम्हाला बसवलं होतस. आम्हाला आठवतय ना! ‘झाला कंटाळवाणा वेळ सख्यांशी जमेना मेळ ….’ आम्हाला एकत्र करून  गुंफलेल्या त्या ओळी होत्या. नंतरच्या आठ-दहा ओळीतही तू आम्हाला असेच बसवून टाकले होतेस. तुझ्या त्यावेळच्या मन:स्थितीचे अगदी योग्य वर्णन होते.

मी – अगदी बरोबर! ती माझी पहिली कविता आणि त्यानंतर काय झालं माहीत आहे?

शब्द – काय झालं ?

मी – मला जाणवलं, अरे, हे आपल्याला जमतय बरं का? मग मला  कविता करायचा नादच लागला. कुठला तरी विषय घ्यायचा आणि त्यावर कविता करून टाकायची. मग ती कविता मी वहीत लिहून ठेवायची. अशी दोन – तीन वर्षे गेली. आणि मग एकदा – –    

शब्द – एकदा काय झालं?

मी – मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही मुंबईला मामाकडे गेलो होतो. तेव्हा दादा मला चक्क शांताबाई  शेळके यांच्याकडे घेऊन गेले. कारण तोपर्यंत मी कविता करते, हे दादांना कळलं होतं॰ जेष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्री शांताबाई यांच्याशी माझी तेव्हा ओळख झाली. त्यांनी माझ्या कविता आपुलकीने वाचल्या. काही कवितांचं कौतुक केलं. काही कवितांमधल्या चुका दाखवल्या. शांताबाईंच्या शाबासकीनं मला प्रोत्साहन मिळालं.      

शब्द – मग तुझ्या कविता मासिकातून छापून येऊ लागल्या. नाही का?

मी –  हो. आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी माझ्या ‘सावल्या’ या कवितेला ‘साधनाच्या  काव्यस्पर्धेत कुमार गटातलं पहिलं बक्षीस मिळालं.

शब्द – केव्हा मिळाला ग हा पुरस्कार तुला?

मी – मला वाटतं १९६२ साल असेल. त्यानंतर मी बालसाहित्यात गुरफटत गेले. नंतर मला शाळेत बालकवीयत्री म्हणून सगळे ओळखू लागले. लहान मुलांच्या मासिकांसाठी मी कथा-कविता पाठवाव्या, म्हणून मला पत्रे येऊ लागली. नंतरच्या…  शब्द – नंतरच्या काळात तुझे, बालकवितासंग्रह, बालकथासंग्रहप्रकाशित झाले. तुझ्या काही बालकवितासंग्रह, बालकथासंग्रह यांना पुरस्कारही मिळाले. हो ना?  

मी – हो. ‘मजेचा तास’ ह्या कथासंग्रहाला वा. गो. आपटे पुरस्कार आणि आशीर्वाद पुरस्कार आणि ललितसाहित्य पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळाले. ’गोष्टीचं झाड’ या कथासंग्रहाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला.

शब्द –  ए, हे सगळं झालं, पण तू ‘आनंदयात्री पुरस्काराबद्दल विसरलीस वाटतं?

मी – छे:! तो कसं विसरेन? छावाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘निसर्गाची भाषाया कथेला तो आनंदयात्री पुरस्कार मिळाला होता. आता आणखी एका पुरस्काराबद्दल सांगते.

शब्द – उत्कृष्ट बालकवितेबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल संगतीयस ना?

मी – हो. आता सांगायला लागले आहे, तर सगळंच सांगते. गंमतजंमतच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘मंजर बघतय टी.व्ही.’ ह्या कवितेची निवड उत्कृष्ट बालकविता म्हणून परीक्षकांनी केली.     

शब्द- याशिवाय तुला नागपूरच्या पद्मगंधा प्रकाशनचाही पुरस्कार मिळाला होता.

मी – हो.  माझ्या एकूण सगळ्याच साहित्याबद्दल तो मिळाला होता. म्हणजे बालसाहित्य आणी प्रौढांसाठी लिहिलेलं साहित्य या दोन्हीचा  विचार त्यांनी केला होता. 

शब्द – ए, जरा तुझ्या प्रौढ साहित्याबद्दलही बोलू या का?

मी – हो.sss बोलूया की….

 

©  सुश्री शुभदा साने

मो. ७४९८२०२२५१

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares