श्री जगदीश काबरे
☆ “आधुनिक अंधश्रद्धा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
प्रत्येक समाज वा संस्कृती कित्येक पिढ्यांपासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य तितके पालन करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा–अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा, ‘त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन-अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाड्यांची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात. परंतु पूजा करण्याची मानसिकता नष्ट झाली नाही. भारतीय परंपरेने याबाबतीत तर कहर केला आहे व अजूनही आपण त्या जंजाळापासून मुक्त होऊ शकलो नाही. स्वत:ला अत्याधुनिक म्हणून घेणारे श्रीमंत व अतिविकसित राष्ट्रांतील समाजसुद्धा याला अपवाद नाहीत. विकसित देशातील प्रगत बनवणारे नागरिक बरेचदा 13 आकडा अशुभ समजतात. त्यामुळे त्यांच्या हॉटेलमध्ये 13 नंबरची खोली असत नाही. अत्याधुनिक जीवनशैलीनुसार या समाजातील शकुन-अपशकुन विमान, डॉक्टर्स, सिगारेट्स इत्यादीत शोधल्या जातात. यांतील काही नमुनेदार गोष्टी खाली दिल्या आहेत.
1) विमान: विमानप्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत येऊन त्या सीटवर बसून प्रवास करते म्हणे! ग्रेलिन नावाच्या भुतामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचा नैवेद्य दाखविला जातो.
2) अॅम्ब्युलन्स : घाईगर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास ती नजरेआड होईपर्यंत शास रोखून धरला जातो. तसे न केल्यास अम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यू अटळ आहे, असे समजतात.
3) कॅलेंडर: वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते. लीप वर्षाच्या २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या मुलीचे लग्न लवकर होते व ती आयुष्यभर निरोगी राहते.
4) खुर्ची : खुर्चीसारख्या निरुपद्रवी वस्तूभोवतीसुद्धा अंधश्रद्धा आहेत. खुर्ची खाली पडणे अशुभ समजले जाते. कुणीतरी उठून गेल्यानंतर खुर्ची पडल्यास ती व्यक्ती खोटारडी मानली जाते. दवाखान्यातील खुर्चीवर झाकून ठेवलेले कापड खाली जमीनीवर पडल्यास नवीन रुग्ण येतो. खुर्ची उलटी ठेवल्यास घरात भांडण होते, अशा समजुती खुर्चीबाबत आहेत.
5) हातरुमाल : हातरुमाल खाली पडल्यास स्वतः उचलणे अशुभ समजले जाते. घडी केलेला रुमाल सतत बाळगणे संकटांना आमंत्रण देऊ शकते. एखाद्याचा/एखादीचा रुमाल उसना घेणे म्हणजे त्याचे/तिचे दु:ख/ अश्रू मागून घेणे. रुमालाला गाठ बांधून ठेवल्यास भूतबाधा होत नाही. जर बायकोने नवऱ्याच्या हातात रुमाल दिला तर त्या नवराबायकोमध्ये हमखास भांडण होते.
6) सुईदोरा : काळा दोरा ओवलेली सुई रस्त्यावर दिसणे अशुभ समजले जाते. गरोदर स्त्रीने अशी सुई बघितल्यास तिला मुलगी होणार. दिवसाची सुरुवात सुई या शब्दाने केल्यास दिवस वाईट जाणार. मित्राला सुई देणे हे मैत्री तोडल्याचे लक्षण आहे. शिवत असताना सुई मोडल्यास तो शुभशकुन मानला जातो.
7) फोटो : भिंतीवर टांगलेली फोटोची फ्रेम अचानक पडल्यास संकट कोसळणार. एखाद्या प्राण्याबरोबर फोटो काढून घेणे हे प्राण्याच्या स्वरूपातील भुताचा फोटो काढल्यासारखे होते. तिघांचाच फोटो काढल्यास मधल्या व्यक्तीवर संकट येते. आवडत्या व्यक्तीचा फोटो स्टिअरिंग व्हीलजवळ ठेवल्यास गाडीला अपघात होत नाही.
8) साबण: एकमेकांना साबण देणे मैत्री तोडण्याचे लक्षण मानले जाते. आंघोळ करताना साबण निसटणे संकटाला आमंत्रण दिल्यासारखे असते.
9) चमचे : चमचा खाली पडल्यास घरात लहान मूल येणार. मोठा चमचा स्वयंपाकाच्या ओटयावर किंवा डायनिंग टेबलवर पडल्यास ८-१० माणसं जेवायला येणार. चमचा उलटा पडल्यास मनासारखी गोष्ट होणार नाही.
10) बंद घड्याळ : घराच्या भिंतीवर बंद घड्याळ असेल त्या घराचे नशीब थांबते आणि घराची भरभराट होणे बंद होते. म्हणून घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये, असा समज जनमानसात पसरलेला आहे.
11) मीठ देणे : जर आपण शेजाऱ्याला हाताने मीठ दिले तर आपले आपल्या शेजाऱ्यांशी भांडण होते. म्हणून कधीही मीठ हातात दिले जात नाही.
12) कावळा : घराच्या खिडकीवर बसून जर कावळा ओरडला तर पाहुणे येणार असा समज असतो.
13) मांजर : मांजर डावीकडून उजवीकडे आडवे गेले तर आपल्यावर संकट कोसळणार. मांजर जर उजवीकडून डावीकडे गेले तर आपले काम होत नाही.
14) काच : जर घरात अचानक एखादी काच तडकली तर त्या घरावर काहीतरी संकट कोसळणार, म्हणून काच तडकणे हे अशुभ समजले जाते.
15) नखं कापणे : रात्री नखे कापणे अशुभ समजले जाते.
याच प्रकारे अमावस्येच्या रात्री प्रवास करणे, बुधवारी प्रवासाला सुरुवात करणे, शनिवारी केस कापणे, हे अशुभ समजले जाते. अशा बऱ्याच अंधश्रद्धेच्या गोष्टी, शकून-अपशकूनाच्या गोष्टी आजही तुम्हाला अगदी शिक्षित घरांमध्येसुद्धा सर्रासपणे घडताना दिसतात. यावरून आपण सर्व शिक्षित तर झालो, पण सुशिक्षित मात्र झालो नाही, हे मात्र नक्की. मी माझ्या आयुष्यात वर दिलेल्या उदाहरणातील सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आलेलो आहे. पण माझ्या आयुष्यात काहीही वाईट घडले नाही. माझ्या घरात अजूनही एका भिंतीवर एक घड्याळ गेली तीन वर्षे बंद स्थितीत आहे. कारण ती वेळ माझ्या पत्नीच्या मृत्यूची होती. म्हणून त्याच वेळेला ते बंद करून ठेवलेले आहे. पण घरातील बंद घड्याळामुळे माझ्यावर कुठलेही गंडांतर आलेले नाही. एकूण हे सगळे मनाचे खेळ आहेत. तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुम्हाला असल्या चिल्लर गोष्टींची चिंता करायची गरज वाटत नाही, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊन तो सुदिन.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈