प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-२ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

डोईचा पदर आला खांद्यावरी…  

संत जनाबाईंच्या अभंगात विठ्ठलाचे वर्णन आहेच. पण त्यासोबतच स्त्री चं वागणं, जगणं, तिची अगतिकता याचं खूप छान वर्णन आहे. त्यात स्त्रीच्या मुक्तीसाठी असलेल्या रचना तर आपल्याला अंतर्मुख करून जातात.

डोईचा पदर आला खांद्यावरी ” हा अभंग हे त्यावरचं उत्तम उदाहरण आहे.

आपल्या विपुल रचनेत “नामयाची दासी जनी ” ही नाममुद्रा धारण करणारी जनाबाई सर्व वारकरी स्त्री संतांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ती महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा विशेषतः स्त्रीजीवनाचा एक भाग कायमचा बळकावून बसली आहे. विठ्ठलाने सगुणरूपाने तिच्याबरोबर दळणकांडण धुणीभांडी, झाडलोट, शेणगोठा ही ग्रामीण कष्टकरी स्त्रीची नित्य कामे करीत राहणे, तिच्या फाटक्या गोधडीत झोपणे, तिच्यासोबत ताककण्या खाणे, तिची वेणीफणी करणे या प्रकारच्या वर्णनाच्या शेकडो ओव्या आजही ग्रामीण स्त्रीच्या मुखी गुंजत आहेत. महत्वाचे म्हणजे ही वर्णने जनाबाईंच्या अभंगांतूनही आली आहेत.

“तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी

हाती घेऊनिया लोणी सेवा करी चक्रपाणी “

किंवा

“जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसणाला

हाती घेऊनी घागरी देव निघाले तातडी”

ही लोकपरंपरेतील जात्यावरची एक ओवी. इथे आशय आणि रचनेत सारखेपणा आढळतो.

गोदाकाठच्या गंगाखेड येथील दमा आणि करूंड या शूद्र भगवतभक्त दांपत्यांची जनी ही नवसाची लेक. पांडुरंगाच्या दृष्टांतानुसार ती पाच वर्षांची होताच तिला दामा शिंप्याच्या स्वाधीन केले गेले. पुढे त्यांचा लेक नामा म्हणजेच संत नामदेव महाराज जे मोठे विठ्ठल भक्त झाले. त्याची दासी म्हणवून घेत जनाई जगली. जनाईचा जन्ममृत्यू काळ याबद्दल नेमके संदर्भ उपलब्ध नाहीत. परंतु नामदेवांच्या बारशाला प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणी बाळंतविडा घेऊन आल्याचे ती वर्णन करते. म्हणजे नामदेव महाराजांपेक्षा ती खचितच पाच सात वर्षांनी तरी मोठी असावी. पुढे इ. स. १३५० मध्ये संत नामदेव महाराजांसोबतच ती पायरीच्या चिऱ्यात अंतर्धान पावली अशी लोकश्रद्धा आहे.

“पंढरी पंढरी, विठुरायाची नगरी ” म्हणून साद घालणाऱ्या ग्रामीण स्त्रीला पंढरपूर, विठ्ठल, रखुमाई, संतजन हा सर्व गोतावळा आपला जीवीचा माहेरचा जिव्हाळा वाटतो.

 ” रुक्मिणी कालविते, निरशा दुधामधी केळं

देवाला आवडतं जनाचं ताक शिळं “

अशा ओवीतून विठ्ठल आणि जनाबाई यांच्या नात्याचे सूचन होते.

 ” आषाढीला मी नाही गेले, कर्तिकीला गं जाईन

देव पंढरीचा गं विठू, विटे उभा मी पाहीन

गोपाळपूरा जाया जनाईला गं झालं ऊन

देवा या विठ्ठलानं, यानं लाविलं गं चिंचबन “

किंवा

” इठ्ठलाच्या गं देवळात मी होईन पारवा

देवाच्या नावाचा मी गं वेचीन सरवा “

अशा ओव्यांबरोबर जनाबाईच्या निमित्ताने, उपेक्षित श्रमकरी स्त्री आपल्या मानसविश्वात विठ्ठलाबरोबरच एक वेगळा प्रपंच थाटून त्यात रंगून बसली असावी असे वाटते. अनेक स्त्रियांच्या मनात घर करून राहणारी जनाई वास्तवात मात्र बेघर होती. तिचं वास्तव जीवन अत्यंत खडतर आणि उपेक्षित होतं.

दामाशेटकडे आल्यानंतर लगेचच तिचे आईबाप गेले. ही घटनाही जनाईच्या अभंगातून येते.

” माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला

मी तुझे गा लेकरू, नको मजसी अव्हेरू “

जनाईला संत नामदेव महाराजां बद्दल असलेला आदर आणि भक्तिभाव तिने परोपरीने वर्णन केलाच आहे. तेवढीच ज्ञानदेवां विषयी असलेली ओढ तिने व्यक्त केली आहे. ते तिच्या अभंगांमधून जाणवते.

दासी शब्दाविषयी बोलायचे तर जनी किंवा नागी (नामदेवांची पुतणी) तिचाही उल्लेख दासी असाच आहे. दासीचा अर्थ शिष्या असा घ्यायला हरकत नाही. कारण खुद्द ज्ञानेश्वरांनी ” म्हणे निवृत्तीदासु ” म्हणत आपले शिष्यत्व विनम्रभावे अधोरेखित केलेले आहे.

विठ्ठलाच्या लेकुरवाळेपणाचे खूप सुरेख वर्णन जनाबाई करतात.

” विठु माझा लेकुरवाळा

संगे गोपाळांचा मेळा ॥*

निवृत्ती हा खांद्यावरी

चोखा जीवा बरोबरी

बंका कडियेवरी

नामा करांगुली ही घरी ॥

 *

जनी म्हणे गोपाळा

करी भक्तांचा सोहळा ॥

जनाई संत नामदेवांच्या घरी त्यांची शिष्या म्हणून राहत असे.

” दळिता कांडिता तुज गाईन अनंता ”

म्हणणारी जनाई आपल्याला कळते.

जनाईला तिच्या प्रत्येक कार्यात विठ्ठलाने मदत केली. तोही अभंग फारच सुरेख आहे.

” माळ पदक विठ्ठल

विसरला भक्ताघरी

झाली पदकाची चोरी

आला आळ जनीवरी “

जनाईने आधीच शूद्र त्यात स्त्री म्हणून उपेक्षा होणे यात अस्वाभाविक काहीच नाही असे लिहीले आहे. पुढे संतसहवासाने तिला जो थोडाफार आधार मिळाला त्यात ती धन्यता मानते.

“स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास

साधुसंती ऐसे मज केले”

“विदुर सात्विक माझिये कुळीचा “ असा ती उल्लेख करतेच. तसेच चोखामेळा, रोहिदास यांच्या विषयी तिला अभिमान वाटतो. संत आणि देव ती एकरूप मानते. जनाईचे देवाशी एवढे एकरूपत्व आहे की,

” देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते,

देवाविण नाही रिते ॥

याचा साक्षात अनुभव ती घेते.

 जनाबाईला संतांनी आधार दिला असला तरी, जनसामान्यांनी तिच्या चारित्र्यावर आक्षेप घेतले असणारच. म्हणून अखेर निर्धाराने तिला सांगावेसे वाटते,

 ” डोईचा पदर आला खांद्यावरी

भरल्या बाजारी जाईन मी ॥

 *

हाती घेईन टाळ खांद्यावर विना

आता मज मना कोण करी ॥

पंढरीच्या वाटे मांडियले पाल

मनगटावर तेल घाला तुम्ही ॥

जनी म्हणे देवा मी झाले वेसवा

रिघाले केशवा घर तुझे ॥

अशावेळी असं म्हणणारी जनाबाई ही मीराबाईचीच सखी वाटते.

जननिंदेच्या भयापासून स्वतःला मुक्त करणारी जनाई! देहाची सुरक्षितता आणि त्यासाठी पाळावी लागणारी जनमर्यादा तिने कधीच कस्पटासमान मानली. ती जीवन्मुक्तच होती.

स्त्री ही विवाहित असली काय, अविवाहित, किंवा विधवा असली काय? देहसंबद्ध असे तिचे चारित्र्य, लोकनिर्बंध, लोकसमज, आणि लोकेच्छा हा एकूणच स्त्री जीवनाला एक मोठा अडसर होता, आहे आणि राहणार आहे. याच्या आधारे स्त्रीला समाज जीवनातून उठवू शकतो. हे लोकापवादाचे दडपण स्त्रीमनावर सतत टांगते असते. ते एक शस्त्र असते. सीता द्रौपदीसह अनेक स्त्रिया याच मापदंडाने दंडिल्या गेल्या आहेत. स्त्री संतांचेही तेच झाले. मुख्य म्हणजे त्यांचे संतत्व सिद्ध होईपर्यंतच्या वाटचालीचे काय? नंतर याच समाजाने त्यांचा उदोउदो केला. म्हणूनच जनाई म्हणते – – – –

” स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास “!!!

अतिशय परखड पण मौलिक काव्यरचना करणारी संत जनाबाई म्हणूनच मला आवडते. भारतीय संत साहित्यात ” स्त्री मुक्तीच्या साहित्याची “ भर घालणारी ही संत स्त्री, तिचे काव्य, अभंग आणि विचारधन आजच्या काळालाही लागू आहेत.

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments