प्रा. सुनंदा पाटील
विविधा
☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
संत साहित्य हा भक्तिमार्गीयांचा शाब्द आविष्कार आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक फार मोठा कालखंड भक्तिमार्गाने दुमदुमला होता. या काळात विविध धर्मपंथ, संप्रदाय होते एवढेच नाही तर उपास्यदेवताही विविध होत्या आणि उपासना मार्गही विविध होते. परंतु त्यांचे प्राणतत्व एकच होते. ते म्हणजे भक्तिभाव!
या परंपरेत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम भारताचा विचार केला तरी महाराष्ट्रात स्थापित असलेला वारकरी संप्रदाय हा खूप महत्वाचा ठरतो. इथल्या संतांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सर्व भक्तिसंप्रदायांच्या या पसाऱ्यात महाराष्ट्राचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र हा भारताच्या मध्यावर आहे. भाषिकदृष्ट्या आर्यभाषिक प्रदेशांच्या सीमा आणि द्रविड भाषिक प्रदेशांच्या सीमा असलेले शेजारी चारही बाजुंनी आहेत. त्यामुळे उत्तर – दक्षिण, आर्य – द्रविड सर्वांना सामावून घेण्याचे सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र प्राचीन काळापासून करीत आला आहे. व्यापक अर्थाने महाराष्ट्र हे भारतीय संस्कृतीचे संगमतीर्थ आहे असे म्हणावेसे वाटते..
स्थूलमानाने इसवी सनाचे बारावे ते सतरावे शतक हा पाच ते सहा शतकांचा काळ भक्तिमार्गाचा कालखंड मानता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात काही साहित्यप्रकारांनी जो “आवाज” दिला, तेच काम भक्तीचळवळिंनी मध्ययुगातच केले. समाजातल्या प्रस्थापितांनी धर्मक्षेत्रात जे मापदंड निर्माण केले होते ते भक्तीमार्ग यांनी झुगारून दिले. कृत्रिमता, पाखंड उघडे पाडले. न्यूनगंडातून उपेक्षितांची मुक्ती केली, त्यांचा आत्मविश्वास जागवला. आत्मप्रतिष्ठेचा मार्ग प्रशस्त केला.
वरील हेतू सिद्धीस नेण्यासाठी संत साहित्य निर्माण करावे लागले नाही, तर ते निर्माण झाले. अखिल भारतात काश्मिर ते कन्याकुमारी आणि बंगाल ते आसाम इथपर्यंत अनेक संत झाले. त्यातही स्त्रीसंतांनी सुद्धा साहित्यात खूपच मोलाची भर घातली आहे. विस्तार भयास्तव इथे सगळी नावे घेता येणार नाहीत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर जात, पात, धर्म, स्त्री, पुरुष हा भेदभाव न करता ” आम्ही आनंदे नाचू गाऊ ” म्हणणाऱ्या संतांमधे स्त्री संत अनेक झाल्या.
मुक्ताई! ज्या कुलकर्णी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून यज्ञोपवित संस्कार करण्यास नकार दिला. निवृत्तीनाथ त्यावेळी दहा वर्षांचे तर मुक्ताई फक्त चार वर्षांची. दादाच तिचे पालक आणि गुरू झाले. त्यात मुक्ताई, तिचा विवाह हे तर दूरदूरपर्यंत शक्य नव्हतं.
पण त्यामुळे मुक्ताईचे साहित्य, तिचे अभंग कम अस्सल ठरत नाहीत. त्यांची काव्यरचना ही अतिशय मौलिक आहे. त्यातही “ज्ञानदेव तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासात जी वारकरी संत मंडळी आहे, त्या स्त्री संतांमधे संत मुक्ताई, संत जनाबाईचे नाव महत्वाचे आहे. निर्मळा, नागी, कान्होपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई, लिंबाई, विठाबाई अशा आणखी अनेक स्त्रीसंत आहेत.
मुक्ताबाईंना अतिशय अल्प आयुष्य मिळालं. संन्याशाची मुलं म्हणून आतिशय विचित्र आयुष्य या चारही भावंडांच्या वाट्याला आलं. त्यात मुक्ताई सर्वात धाकटी असूनही सर्वांची आई झाली. समाजातली मिळणारी वागणूक बघून एक दिवस ज्ञानेश्वर महाराज अतिशय दुःखी झाले, आणि झोपडीची ताटी (दरवाजा) बंद करून घेतली. सर्व भावंडांनी त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र मुक्ताईने आपल्या अभंगांमधून त्यांचे मन वळवले. तेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले.
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥
शब्दशस्त्रे व्हावे क्लेष । संती मानावा उपदेश ॥
विश्वपट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
*
संत तोची जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ॥
लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥
मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
चिमुकल्या बहिणीने केलेली ही विनवणी माऊलींना टाळता आली नाही, आणि ते बाहेर आले. संत कसा असावा याचं अतिशय सुंदर विवेचन यात आहे.
याशिवायही मुक्ताईच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत.
तशीच कान्होपात्रा. ती कोण होती? काय? यावर विवेचन नको. ती फक्त विठ्ठलभक्त होती. स्त्रीसंत होती.
*
नको देवराया अंत अता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ॥
*
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा ॥
*
मोकलोनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात “
*
हा तिचा अभंग सर्वश्रृत आहे.
संत बहिणाबाई. सांसारिक सुख तिला फारसं लाभलं नाही. जरठ नवऱ्याशी संसार करावा लागला. त्यांचाही अभंग बघा.
विरक्तीचे मूळ । प्रपंचाचा त्याग
पाहताचि एक । गृह शैल ॥
स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे ही आजवरची धारणा आहे पण घर हा परमार्थ मार्गातला स्त्रीच्या दृष्टिने फार मोठा असल्याचे ती बोलून दाखवते. अशा अनेक स्त्री संत आहेत. त्यांचं साहित्यही विपुल आहे. मात्र त्यात संत जनाबाई यांचं स्थान वेगळं आणि मोठं आहे.
ते पुढील भागात बघूया!!
क्रमशः…
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈