प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

… (काहीवेळा नागराजाचं दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणीमात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो

चं साम्राज्य मुक्तपणे

नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!) …

आजूबाजूला साखर कारखाने असले तरी, बरीच गुऱ्हाळ गूळ करण्यात पटाईत.

गुऱ्हाळाच्या बाजूने जाताना त्याचं एक प्रकाराचा विशिष्ट वास येत होता. त्यांचं काम सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालत होत. येणारा जाणारा उसाचा रस पिऊन तृप्त पणे ढेकर देत जातं होता. जाताना गरम गूळ व काकवी पण घेउन जातं असे. त्याला कोणताही मज्जाव नव्हताच.

तस दिस कासराभर वर सरकलेला. सुरव्या डोक्यावर आलेला. राबणारे हात पाय, मर्गळलेल्या अवस्थेत. अंगावर घामाच्या धारा, अंग काळ मेचकूट झालेलं. अंगावर अर्धी चड्डी आणि मांजरपाटाचे खोळ उर्फ बदामशर्ट कपडे पण रापलेले. कळकट झालेले.

सगळे राबणारे कष्टकरी, शेतकरीआपापल्या पाणवठ्यावर आली यथेच्छ मनसोक्त गार पाण्यात अंघोळ केली. अंग घासणीला चपटा दगड होताच. कोणी विहिरीत कोणी ओढ्यावर, कोणी शेतातील पंपावर. असं सगळे चांलेले.

अंघोळ होताच त्यांची पावलं तरतर आपापल्या पालाकडे वळली. त्यांच्या अंगात तर तरी आलेली. पोटात भूख लागलेली. केव्हा एकदा भाकर खाईन असं झालेलं.

कष्टकऱ्यांनी घरून आणलेली शिदोरी सोडलेली. काही जणांच्या बायका डोईवरून बुट्टीत जेवण बांधून आणलेलं. त्या पण आपल्या धन्यासोबत जेवण करत असतं. राबणारी गडी जेवण करून सुस्त होत. वाम कुक्षी साठी तिथंच झाडाखाली आडवे होत असतं.

काहीजण चंची सोडून सुपारीचे खांड तोंडात टाकीत, पानाचं देठ खुडून त्याला अंगठ्यानं चुना लावून तोंडाखाली दाबत असतं. त्यावर तंबाकूची चिमठ पण अलगद ओठा आड करत असतं. घटकाभर विश्रांती झाली की, परत ताजेतवाने होत अन कामाला लागतं असतं.

कोण भांगलण, कोण कोळपणी, कोण पाणी पाजण, अशी सगळी काम करत. इकडे त्यांच्या बायका पण जनावरांना चारायला सोडून घरात हातभार लावत असतं. काही बायका मळ्यातील माळवं तोडून आपली टोपली भरून घेत असतं. घरात थोडी ठेवून उरलेले माळवं बाजारात विकत असतं.

दिवस मावळत होता, तश्या सावल्या ही जरा लांबलचक पडत होत्या. दिवस मावळायला आला.

मावळतीला सप्तरंगाची उधळण चालू होतीच. हवेत गारठा जाणवू लागतं होताच.. पिवळा, नारंगी, निळा, केशरी, सूर्य एकदम मोठा लाल भडक दिसतं होता.

कातरवेळ, सांज वेळ जवळ येत होती. सूर्य मावळला. पक्ष्यांची गडबड चालू झाली. आपापल्या घराकडे परतण्यांची घाई सुरु होतीच. चित्र विचित्र आवाज असमंतात निघत होते. मध्येच पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ शिस्तबद्ध पण जरा वेगाने मावळतीकडे जातं होती. जणू शुभ्र फुलांचा हार घेउन रान देवतेला घालण्यासाठी निघाले होते. मध्येच खंड्या उच्च स्वरात निनादत होता. सुतार पक्ष्याची टकटक थांबलेली. एव्हाना सायंकाळ होऊन थंडी वाढलेली. तश्यातच कातरवेळ साधत काही तरुणाई अंधाराचा फायदा घेत, अडोश्याला गप्पा मारत दिल जमाई चालली होती. गुपचूप कारभार चालू होता.

तारांगण सजल होत. वट वाघूळ परत आडव्या तिडव्या रेषा काढत झाडात गप्प होत होती. घुबडाचा विशिष्ट आवाज भय कम्पित करत होता.

टिट्वीच्या केकटण्याने शांतता भन्ग करीत होत्या.

बरीच मंडळी आपल्या पांदीच्या रस्त्याने घर जवळ करीत होती. दोन्हीही कडच्या उंच झाडीत रातकीड्यांची सनई चालू होती. रस्त्याने जाणारी जनावरे त्यांच्या गळ्यातील वाजणारे घुंगुराचे आवाज लायबद्ध ध्वनीने रस्ता मोकळा करून देत होता. थंडीने आता धुक्याची चादर घातली होती. मोरांच्या केका परत साद देत होत्याच. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज गावची वेस आल्याचे साक्ष्य देत होता. गावात सगळीकडे दिवाबत्ती केल्याने धुसर लाल प्रकाश धुक्यात दिसतं होता. घरातील छपरातून धुराचे लोट चुली पेटल्याची खात्री होती. धूर आणि धुके यामुळे हवेत कुंद पणा जाणवत होताच.

जनावर आपापल्या जागी दावणीत गेली. मालकांनी त्यांना दोरखंडनी बांधलं.

पुढ्यात कडवळ ची वैरण टाकून दिली. काहीजण चरवीत पाणी घेउन धारा काढत बसलं. समोर पेंड ठेवली. आणि म्हसराच्या पाठीवर थाप मारून काचळ पाण्यानी धुवून घेतलं. दुधाची कासंडी भरताना चूळ चुळ आवाज घुमत होता. धारा काढून, घरी दूध ठेऊन, उरलेले दूध डेअरीत घालण्यासाठी मोर्चा वळवला. दूध घालून झाल्यावर चौकातल्या वडाच्या पारावर जोतो येऊन बसकण मारत होताच. गावातील अबाल वृद्ध आधीच येऊन बसलेली.

तस वडाचे झाड हे जणू त्यांना आधारवडच होता. वडाच झाड हे कित्येक वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या सुख दुःखाचा सोबती होता. कित्येक गावच्या डोई ह्या वडानी पाहिल्या होत्या.

बरीच मंडळी जमली होती. त्यांच्या शिळोप्याच्या गप्पा टप्पा चालू होत्या. लहान मुले पण इकडून तिकडे हुंदडत होती. वडाच्या परंब्या धरून मूलं त्याला लोम्बकाळत होती.

कष्ट करून कामानी दमलेले हात चिलीम पेटवून आस्वाद घेत होती. चिलीम एका हातातून दुसऱ्या हातात फिरत होती.

कोण चंची सोडून पान तंबाकुची देवाण घेवाण करीत होती. कोण तंबाकूंचा बार भरून अंतराळी बोलत होता. वडाच्या झाडाला ही गम्मत नवी नव्हती. त्यालापण हा विरंगुळा वाटतं होता. त्यांच्या गप्पा तो कित्येक वर्षे ऐकत होताच.

एव्हाना थंडीची लाट वाढली होती. प्रत्येकजण आपल्या मनातील दुःख ओकत होता. हे सार पुराण पुरुष वड ऐकत होता. त्यालाही त्या गोष्टीची सवय झाली होती. वेळ होईल तस प्रत्येकाने आपापली घर जवळ केली. घरात आल्यावर दरवाजे पण बंद केले.

वड एकटाच थंडीत स्तब्ध राहिला होता. धुक्याची शालं त्यांनी पण पांघरली होती. त्यालाही एकटा राहायची सवय झालेली. उन्ह पाऊस, थंडी वारा, धुके, दिवस रात्री आणि चांदणं ह्याची त्यानं कधीच तक्रार केली नव्हती. गावच्या कित्येक पिढ्या त्यांनी बघितल्या पण पुराण पुरुषाने सगळ्यांना आश्रय दिला. आश्रय देण्यात तो धन्यता मानत होता. कित्येक पक्ष्यांची घरटी त्यानं अंगा खांद्यावर खेळवली. साप माकडासारखे प्राणी अंतकरणाने जवळ केले. तो पुराण पुरुष एकमेव सर्व घटनाचा साक्षीदार होता! आहे!!  आणि राहील!!! 

 – समाप्त –

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments