सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
(करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!)…
५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झाली हे कळल्यानंतर त्यांनी महाकाव्याचा संकल्प केला व रोज दहा ते पंधरा कविता करण्याचे ठरविले. गुरु गोविंद सिंग यांच्यावर २०० आर्या लिहिल्या. महाकाव्याच्या लक्षणात दोन गोष्टी येतात. त्याची काव्यवस्तू व त्याची पद्यरचना! सावरकरांच्या काव्यातील भावना, कल्पना इतक्या उदात्त आहेत की त्याची अभिव्यक्ती तितक्याच सुंदर पद्य रचनेतून झाली पाहिजे. महान आत्म्याच्या वस्तीसाठी कलेवरही तसेच महान हवे नं!
प्रथम ‘सप्तर्षी ‘ या महाकव्याला सुरुवात केली. आकाशात सप्तर्षी पाहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद झाला. व तिथे जाण्याची इच्छा झाली. यातून या काव्याचा जन्म झाला. नंतर तिथे अनुष्ठूप छंदात ‘ कमला ‘ हे दीर्घ काव्य लिहिण्याची इच्छा झाली. ऐन तारुण्यात ते मायदेशाला व संसाराला पारखे झाले. बंदिवासाची आपत्ती आली. त्यामुळे या दीर्घ काव्यात ते स्वतःचे प्रतिबिंब पाहत असतील तर त्यात नवल नाही. या काव्यात तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कमलेच्या नाजूक भावभावनांचे पापुद्रे अगदी अलगद उलगडले आहेत. स्त्री मनाचे आकलन व उकल सुंदर केली आहे.
अंदमानात प्रथम सावरकर कविता
भिंतीवर काट्यांने लिहीत व ती पाठ करून ठेवत. त्यांची खोली बदलली व तिथै येणारा कैदी महाराष्ट्रीयन असेल तर तो भिंतीवरची कविता पाठ करी. पण तुरुंगाधिकाऱ्यांना ते काय लिहितात हे न कळल्याने त्यांचे हातही पायाप्रमाणे बेडीने बांधले जाऊ लागले. मग ते कविता रचून मनात पाठ करू लागले. वीस वर्षे पोर्तुगीजांशी टक्कर दिलेल्या पेशवाईच्या काळावर काव्य लिहिण्याच्या त्यांच्या संकल्पाचा परिणाम म्हणजेच ‘ गोमंतक ‘ हे दीर्घकाव्य! कोकणच्या राजकारणी घडामोडी विषद करण्याचा हा काव्य प्रयत्न! इतिहासाच्या पृष्ठभूमीवर कल्पनेच्या कुंचल्याने कवीने काढलेले एक चित्र आहे. या काव्याचा पूर्वार्ध निर्यमक रचना असल्याने बंदिवासात ती लक्षात ठेवणे, पाठ करणे अशक्य झाले त्यामुळे ती रचना, अंदमानातून बाहेर आल्यावर शेवटी रत्नागिरीच्या तुरुंगात कागद पेन्सिल मिळाल्यावर त्यांनी पूर्ण केली. या महाकाव्याचा उत्तरार्ध त्यांनी २० मात्रांच्या निर्यमक ‘वैनायक’ या नव्या स्वनिर्मित वृत्तात रचला.
तुरुंगात खितपत पडलेल्या एका वीर युवकाचे विरहोद्गार त्यांनी ‘विरहोच्छ्वास ‘ या काव्यात गुंफले. अक्रूर या वृत्तातील हे विरह शोकाचे उच्छ्वास मनाची पकड घेतात. विरहात आठवणऱ्या पूर्वस्मृती, म्हणजे प्रत्येक उच्छ्वास हे स्वतंत्र भावगीत आहे. अशा चाळीस भावगीतांची सुरेख गुंफण केली आहे.
एक करुणामय व एक क्रूर अशा दोन प्रकारच्या गूढ शक्ती जगात वावरत असतात हे सांगण्यासाठी त्यांनी, घटाघटा रक्त पिणाऱ्या पण पिलांना पाजणाऱ्या व्याघ्री वरून ‘मूर्ती दुजी ती ‘ ही काव्यरचना केली. अंदमानातील प्रसंगावर आधारलेल्या चांदोबा व सायंघंटा या कविता आहेत. चांदोबा दिसल्यावर बालपण, मामाचा वाडा, भावंडे या साऱ्या स्मृती दाटून येतात. दिवसाचे काम संपल्यावर कोठडीत बंद करण्यापूर्वी सायंकाळची घंटा वाजे, त्यावेळी एक दिवस संपला, ही जाणीव होई. ही कल्पना सायंघटा मधे आहे. तसेच एक दिवस मायभूमीची विजय घंटा वाजेल हा आशावाद आहे.
रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळी ‘आकांक्षा ‘ नावाची अतिशय उच्च दर्जाची रूपकात्मक हृद्य रचना लिहून टागोरांना पाठविली. या कवितेत एक गोष्ट आहे. गरुडाच्या जोडप्याला शापामुळे कावळ्यांच्या संगतीत रहावे लागते. पण त्यांची मुलगी एकदा गरुड व साप यांच्यामधील युद्ध पाहते, त्यात गरुड जिंकतो. तो मला हवा हा हट्ट धरते. गरुड प्राप्तीची आकांक्षा सोडत नाही. इतकी यशाची खात्री हवी.
त्यांच्या ‘बेडी’, ‘कोठडी ‘, ‘जगन्नाथाचा रथोत्सव ‘, ‘ निद्रे ‘, ‘मरणोन्मुख शय्येवर ‘ या कविता अध्यात्मिक बैठकीच्या आहेत. अंदमानातून सुटल्यावर आधी अलीपूर नंतर रत्नागिरी तुरुंग शेवटी येरवडा तुरुंगात ठेवले होते. हिंदुस्थानात आल्यावर अंदमानात रचलेल्या काव्याचे जे तुकडे तुकडे आठवतील ते गोळा केले त्यांच्या कविता व कैद्यांनी पाठ केलेल्या कविता घेऊन त्यांनी काव्यसंग्रह पूर्ण केले. कमला व गोमंतक हे १९२३ ला प्रकाशित झाले तर रानफुले हा काव्यसंग्रह १९३४ ला प्रकाशित झाला. शेवटी रत्नागिरीत स्थानबद्ध केल्यावर त्यांनी निबंध, नाटके अशा गद्य लेखनास प्रारंभ केला. नाटकातून त्यांनी काही पद्य रचना केल्या. ‘ स्वदेशी ‘, ‘हिंदू एकता ‘, ‘अस्पृश्यता निवारण ‘, ‘ हिंदुध्वज ‘, ‘सशस्त्रता ‘या काव्यातून राष्ट्र ऊध्दारासाठीची कळकळ, तळमळ लक्षात येते. याशिवाय आर्या वृत्तातील
‘गोदावकिली ‘ मोरोपंती विशेषांनी सजली आहे, ‘बालविधवा दुःस्थिती ‘, ‘टिळक स्तवन ‘ या ही आर्या वृत्तात आहेत. ‘महाराष्ट्र भाटाचे विजय गीत ‘, ‘नाशिक येथील गोदातटाकी ‘, लेडी ऑफ लेक ‘(भाषांतर) या कवितांतून निरनिराळ्या वृत्तांचा वापर केला आहे. शिवाजी महाराजांच्या आरतीत परिलिना वृत्ताचा वापर केल्यामुळे कविता रचनेच्या दृष्टीने सौंदर्य प्रधान झाली आहे. ‘ शिववीर ‘ या गीतात परिलिना ची लय थोडी शिथिल केली आहे त्यामुळे या स्त्री गीताला शोभणारी रचना निर्माण झाली आहे. ‘अनंताची आरती’ आसावरी रागातील असून ‘हिंदू नृसिंह’ मधे भूपती रागाचा सुंदर उपयोग केला आहे. ‘ अटकेवर जरी पटका ‘ हे विजय गीत असल्याने त्याच्या आवेशाला साजेल अशा फटक्याच्या हरिभागिनी वृत्तात आहे.
प्रकाशित परंतु जप्त, प्रकाशित परंतु नाटकातून विखुरलेल्या, काही विस्मृतीत गेलेल्या, अनेक झडत्यांच्या वेळी हरवलेल्या, तुकड्यांवर लिहून पडलेल्या, जप्त होतील म्हणून प्रकाशित न केलेल्या अशा अनेक सावरकर रचित कविता आहेत.
साहित्याचार्य, वेदांततीर्थ, बाळशास्त्री हरदास म्हणतात, “आधुनिक भारताच्या महान वैतालिकात (राजदरबारातील कवी) सावरकरांचे स्थान व्यासांचे आहे, शुकाचे नाही कारण दिव्यत्वाकडे जाणाऱ्या प्राकृतिक ओघाची परागतिक वंचनेपासून मुक्तता करणे तिचे स्वरूप आहे. “
सावरकर रुपातील या अलौकिक बुद्धिमत्तेस शतशः प्रणाम!!!
– समाप्त –
(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈