सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
२८ मे हा विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिन! या दिवशी कांही लिहावं असं मनात आलं. पण कशावर लिहायचं? एक कवी म्हणून की एक क्रांतिकारी? एक नाटककार की वक्ता की समाज सुधारक? कुटुंबाच्या हाल अपेष्टा बघून द्रवणारा भावनाप्रधान माणूस की अंदमानात कोणत्या परिस्थितीत कवित्व जागं ठेवलं यावर लिहायचं? कां इतर कैद्यांचं प्रबोधन केलं यावर की स्थानबद्ध तेत असतानाही स्वातंत्र्यसंग्रामाला बळ देणारा म्हणून कां एक द्रष्टा राजकारणी कां एक डावलला गेलेला महानायक? जेवढं लिहावं तेवढं थोडं आहे. मी आज फक्त त्यांच्या कवितांच्या दालना मधून एक फेरफटका मारणार आहे.
वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी ‘सवाई माधवरावांचा पोवाडा’ रचला तर १६ व्या वर्षी चाफेकर व रानडे यांच्यावरही बारा चौकी, १९२ चरणांचा मोठा पोवाडेवजा फटका लिहिला. २१ व्या वर्षी
सिंहगडाचा पोवाडा तर २३ व्या वर्षी सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा रचला. पोवाड्याचा हेतू वीर रसात्मक प्रसंग निवडून लोकांना स्फुरण देणे हा आहे. त्यामुळे काहीजण पोवाड्यांना वीर काव्य असेही म्हणतात. सावरकरांच्या पोवाड्यात वीररस आहेच परंतु विदग्ध कवीला शोभणारे अलंकार जास्त आहेत. सूर्याजी म्हणतो, ‘जाऊ इच्छिता काय, धरुनी आल्या दोराला, अहो षंढ, तो दोर मघाची लढूनिया मेला’ असे रूपक अलंकार प्रचुर काव्य त्यांच्या पोवाड्यातून आढळते. तानाजीच्या समाधी विषयी सांगताना ते म्हणतात, ‘ मग त्या गडाची भूमी ठेवी, तानाजीस उदरी, तेव्हापासूनि रत्नाकर बहु तिचा द्वेष करी’. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यांनी १८९८ मधे रचलेला ‘स्वदेशीचा फटका’ चांगलाच गाजला.
सावरकरांना टिळक व परांजपे यांच्या प्रयत्नामुळे विलायतेला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि १९०६ साली जून मध्ये त्यांनी हिंदुस्थानचा किनारा सोडला. त्या रात्री जहाजावर त्यांनी ‘ तारकास पाहून ‘ ही कल्पना रम्य कविता केली. ‘आकाशातले तारे म्हणजे नंदनवनीच्या काजव्यांचे थवे की मायेच्या सुनील शालूवरचे लकलकणारे टिकले ‘, अशा कल्पनांवरून कवीचे कोवळेपण जाणवते. या कवितेत सागर व चांदणीचे प्रेम वर्णन केले आहे. शृंगाराचे वर्णन करताना त्यात अतिव पावित्र्य राखले आहे.
विलायतेला गेल्यावर त्यांनी जव्हारवरुन संस्थानचे अधिपती श्रीमंत राजे कृष्ण शहा यांचा गौरव करणारी पत्रात्मक कविता पाठविली. विलायतेतील साडेचार वर्षांच्या वास्तव्यात अभ्यासाबरोबरच त्यांनी ग्रंथ लेखनही केले.
सावरकरांच्या कवितेत उत्कट काव्यागुणांनीं ओथंबलेली भावगीते फारशी आढळत नाहीत. कारण त्यांचे विचार तर्कशील असल्याने भावनेने रंगता रंगता ते तार्किक प्रवचनाच्या प्रांतात कधी शिरतात हे त्यांनाच कळत नाही. ‘प्रियकर हिंदुस्थान’ मध्ये कवी म्हणतो, “तुझ्या जलाही अनंत पितरा दिले तिलांजलिदान, पुण्यभूमी तू! पितृभूमी तू! तू आमुचा अभिमान! ” तसेच ‘स्वतंत्रते चे स्तोत्र ‘, ‘ हिंद सुंदरी ती ‘ अशा विषयातून देशप्रेम दाखविणारी गीते लिहिली आहेत. मुलाच्या निधनानंतर ‘ प्रभाकरास ‘ ही कविता कोमलता, वात्सल्य, असहाय्यता अशा भावभावनांनी परिपूर्ण आहे. ‘तनुवेल ‘ हे उत्कट प्रेमगीत आहे. आर्या वृत्तात लिहिलेली ‘ बालविधवा – दुःस्थिती – कथन ‘ ही कविता म्हणजे त्या स्त्रियांची वकिली थाटात मांडलेली कैफियत आहे.
दोन्ही भावांना भारतात अटक झाली हे कळल्यावर वहिनींना उद्देशून पत्रात्मक कविता ‘सांत्वन ‘ लिहिली. या कवितेत तळमळ, जिव्हाळा ओतप्रोत भरला आहे कारण ही छांदस प्रकारातील ओवीबद्ध शिथिल रचना आहे.
१९०९ साली सावरकर बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. राजद्रोह न करण्याच्या अटीवर त्यांना सनद मिळणार होती पण त्यास त्यांनी नकार दिला. लवकरच ते राजद्रोहाच्या आरोपावरून पकडले गेले व त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. ब्रिटिश कोर्टाने नंतर त्यांना हिंदुस्थानात धाडण्याचा आदेश दिला पण हिंदुस्थानात गेल्यानंतर आपल्याला अंदमानलाच धाडले जाईल ही भीती होती म्हणून त्यांनी ‘माझे मृत्युपत्र’ ही वसंततिलका वृत्तातील कविता गुप्तपणे आपल्या वहिनी कडे पाठविली. मृत्युपत्रातील त्यांची संपत्ती व तिची केलेली वाटणी आवर्जून वाचावी. भारतात येताना त्यांनी सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला पण पकडले गेले. आता भारतात गेल्यानंतर आपला अमानुष छळ होणार याची खात्री असल्याने वज्रवृत्तीचे कवच निर्माण करणाऱ्या ‘ आत्मबल ‘ या काव्यात कवी म्हणतो ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला ‘ हे असे अचलधारणा प्रकट करणारे गीत लिहिले.
हिंदुस्तानात खटला चालल्यावर त्यांना आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यावेळेसच हत्येस चिथावणी या आरोपावरून दुसरा खटला भरला गेला. त्यावेळी त्यांना खात्री होती की आता फाशी होणार. त्यावेळी ‘ पहिला हप्ता ‘ ही देशभक्तीपर कविता लिहिली. मायभूला म्हणतात, “ऋण ते फेडाया | हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा.” अंदमनातील बंदिस्त जीवनाने आयुष्याचा बराच भाग व्यापल्याने त्या अनुभवातून बऱ्याच कविता निर्माण झाल्या आहेत. ‘ पायातील बेडी ‘ हे मनःशल्य असले तरी ती एखाद्या दागिन्याप्रमाणे घासून, पुसून घालावी लागे. नाहीतर ती गंजल्याने जास्तच टोचू लागे. हा विरोधाभास पाहून ते म्हणतात, ” फोडूनि, तोडूनी जी जाळावी, तीच कशी उजळावी आपण, आपुलीची रे बेडी, हौस तुझी ही वेडी ” केंव्हाही मृत्यूच्या स्वाधीन व्हावे लागेल, अशावेळी मृत्यूचा स्वीकार सुखाने करण्याची मनाची तयारी करताना म्हणतात, ” ये मृत्यो! ये तू ये! यावयाप्रती निघालाच असशील जरी ये तरी सुखे, कोमेजुनी जावया भिवोत ही फुले, ही द्राक्षे रसरशीत सुकुनि जावया, भ्यावे ते कां म्हणूनी तुजसि परी मी? ” अशाच ‘ जा झुंज ‘, मला देवाचे दर्शन घेऊ द्या ‘ या ही भावगीताचे नमुने म्हणून सांगता येतील. पण या सर्व कवितांवर राज्य करणारी कविता किंवा भावगीत म्हणजे, ‘ सागरा प्राण तळमळला ‘! आपण आपल्या प्रतिभेचे देणे देशप्रेमाच्या आविष्कारात वेचले पाहिजे, अशी सावरकरांची तळमळ होती. करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!
क्रमशः…
(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान अभ्यासपूर्ण लेख आहे.