सौ. ज्योती विलास जोशी
विविधा
☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆
अपेक्षाभंग झाला की विनोद घडतो, अपेक्षाभंग आश्चर्यही घडवतो आणि हाच अपेक्षाभंग दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा छोटीशी, खूप मोठी, किमान, वाजवी अशा अनेक प्रकारची.. किती वेगवेगळी रूप आहेत अपेक्षेची. अपेक्षांच माध्यम विचारच आहेत त्या विचारांची पोत सुधारली पाहिजे. जेणेकरून मन शांत, सुरक्षित भयरहित आणि निरोगी राहील. नाहीतर मात्र अपेक्षा ही मनशांतीच्या वाटेवरची अडसरच ठरते…..
अपेक्षा करायच्याच नाहीत का मग? लहान असताना हीच अपेक्षा रडण्याचे शस्त्र वापरून पूर्ण करून घेता येते. छोटी अपेक्षा बघता बघता विशाल रूप धारण करते…. हटवादी होऊ लागते… आणि मग त्याखाली सुखाचे क्षण, कृतज्ञता, जिव्हाळा, नाती, परिपक्वता सृजनशीलता गाडले जातात. या अपेक्षांना जेव्हा तडा जातो तेव्हा दुःख शेजारी येऊन बसतं. अपेक्षा भंगाचा डोंगर म्हणजेच हे दुःख… त्यामुळं सतत मनात येणारे नकारात्मक विचार मनावर इतके हावी व्हायला लागतात की सकारात्मक विचारांना शोधण्याचा विचारही मन करू शकत नाही. मनपाखरू खट्टू होतं, आजारी पडतं… शरीर नियंत्रित करणार्या ह्या मनातील बिघाड शरीरावर प्रतिबिंबित होतो पर्यायाने शरीरही थकतं.
हीच अपेक्षा अहंकाराचं देखील मूळ आहे. कधी एखाद्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली, कधी आपली दुसऱ्याकडून असलेली अशी ही अपेक्षा! ह्या अपेक्षांना मात्र एक मर्यादा हवी… फुग्याला त्याच्या क्षमते बाहेर फुगवलं तर तो जसा फुटतो तसा या वाजवी अपेक्षांचा फुगा फुटला तर नैराश्याची हवा आसमंत व्यापते. अपेक्षांच्या ओझ्याखाली मन दबलं जाऊ लागतं आणि प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने चिडचिड वाढते.
अपेक्षा करणं हा मनुष्य स्वभाव धर्म आहे.
आई वडिलांची मुलाकडून, सासूची सुनेकडून, गुरुची शिष्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या अपेक्षांना हक्काची एक झालर आहे. त्या गृहीत धरल्या जातात. आपण आपल्या बद्दल ठेवलेल्या अपेक्षांशी जर मैत्री केली तर नकळतच अपेक्षा आणि आपलं मन यांच्या सुसंवाद सुरू होतो आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनातल्या भावभावनांचं व्यवस्थापन करायचा जणू अपेक्षा चंग बांधते.
नात्यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, थोडी जास्त जवळीक असण्याची झालेली सवय त्यामुळे आपल्याला आपलंसं केल्याची आपली भावना सुंदर असते पण परिस्थिती नेहमी तशी राहत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा हे या नात्यातला अडसर ठरते.
आपल्या दुसऱ्यांच्या बद्दल असणाऱ्या अपेक्षांबाबत मात्र स्थितप्रज्ञ राहिलेलं बरं! जिथं आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला इथे प्रयत्न करावे लागतात तिथे दुसऱ्या बद्दलच्या अपेक्षांवर आपला अंकुश असू शकत नाही त्यामुळे याबाबतीत अलिप्ततेचे धोरण शहाणपणाचं…..
शेवटी अपेक्षाभंग हे दुःखाचे मूळच! नाही का?
© सौ ज्योती विलास जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈