सुश्री शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘ मीपणाच्या ‘ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, ‘आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? ‘
बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल. ‘
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं… बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ… ना एखादं वळण… मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.
माझ्या अंगावरच्या सहा छिद्रांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली, तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो, तशी मी बोलते. ‘ यावर गोपी निरुत्तर झाल्या.
अहंकाररहित शरीर (जीवन)…
हीच श्रीकृष्णाची बासरी होय!
ज्याने आपल्या जीवनातून अहंकार घालवला, ‘मी’पणाला आपल्यापासून दूर केलं, त्याचंच जीवन हे शांतीपूर्ण, सुखमय, आनंदमय व त्यागमय झालंय आहे. आणि तोच मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर आरूढ झाल्याशिवाय राहत नाही. तो एकनिष्ट श्रीकृष्णभक्ती मध्ये तल्लीन होऊन, नश्वर सुखाचा त्याग करून, खऱ्या सुखाचा, आनंदाचा अनुभव करतो…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈