सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मी वाचत जाते… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

(दि. १९ जून… जागतिक वाचन दिन… त्यानिमित्त लिहिलेला लेख)

मी वाचत जाते…

क्षणोक्षणी… काहीबाही…

मग त्यात कधी रस्ते असतात… झाडं असतात… पानं असलेली… पानं नसलेली… फुलांची… फळांची आणि मग ती झाडं उभी असलेल्या जमिनीकडेही माझं आपसूक लक्ष जातं, तिची विचारपूस सुरू होते ….

तीही सांगू लागते रस्त्याच्या गोष्टी…

हळूहळू माझं लक्ष जातंच रस्त्यावर… खूप काही घडतं तिथं. किती वाचावं आणि कसं वेचावं? धावणारी वाहनं… आजूबाजूला हा सगळा गोंधळ बघत घाबरून कशीबशी उभी राहिलेली घरं… दुकानं… आणि या सगळ्यांना अर्थपूर्णता देणारी ‘माणसं’?

… लहान-मोठी, गलेलठ्ठ-शिडशिडीत, श्रीमंत-गरीब मध्यमवर्गीय, थकलेली, बसलेली, उभी, चालणारी, बोलणारी, मोबाईलमध्ये डोकं खुपसलेली, आळस देणारी, काम करणारी, गप्पा मारणारी अशी कितीतरी माणसं… वेगवेगळ्या रंगातली, वेगवेगळ्या ढंगातली… हरवलेली, सापडलेली, हसणारी, बोलणारी, बोलता बोलता रडणारी, रडता रडता शांत होणारी… किती प्रकारची माणसं…???

… त्यांना वाचावं तरी कसं… सोपं नाही ते! फार फार कठीण. म्हणजे अगदी तिऱ्हाइत भाषेतलं पुस्तक वाचणंदेखील सोपं जावं एखादेवेळी. पण माणसं वाचणं अगदीच कठीण. किती सराव करावा. किती प्रकारे प्रयत्न करावा… किती लिपी गिरवाव्यात? पण छे! माणसं वाचण्याची लिपी काही केल्या गवसत नाहीच. पण तरीही निकरानं वाचत जावी माणसं! हळूहळू कळत जातात… एखादा कथेतल्या पात्रांसारखीच मग ती दिसू लागतात.

खरंच सतत पाहिल्यानंतर कुठल्यातरी एखाद्या पात्राशी जुळू लागते त्यांची नाळ. आणि मग वाटू लागतं ही त्या कहाणीतली अक्काच असावी… ती अक्का तशीच असेल सावरून उभी राहणारी, काहीतरी खरेदी करणारी… पैन पैचा हिशोब जपणारी, मनात मुलाबाळांचा विचार करणारी… आणि हा तो सदाशिव, नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ… घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल जरासुद्धा सोयरसुतक नसणारा… उघड्या डोळ्यांचा पण मिटल्या ओठांचा… आणि ही शेजारची बायजा फतकल मारून सुरकुत्यांचा लेणं सांभाळून बसलेली, सारखी येणाऱ्याला जाणाऱ्याला वेळ विचारणारी… हिला वेळ कसाबसा काढायचा आहे…. तर तिच्या समोरच्या दवाखान्यातला डॉक्टरला जेवायला वेळ नाही. सतत पेशंट येत आहेत. आतमध्ये जात आहेत. तो उठतो, त्यांना तपासतो, औषध देतो‌. चालूच आहे हे सत्र… त्याच्या शेजारच्याला टपरीवाल्याला या दवाखान्याच्या गर्दीची जणू लागणच झाली असावी. पोरं म्हणू नका, पोरी म्हणू नका, बापे म्हणू नका सगळी जणं चहा, कॉफीचे कप हातात धरून निवांत गप्पा मारत उभी… कुणाला बस येईपर्यंत वेळ काढायचाय… कुणाला अभ्यासाच्या नोट्सबद्दल बोलायचंय… कुणाला मित्राची वाट बघायचंय… तर कुणाचं आणखीन काही आहेच…

… तो चहावाला मात्र भर पावसात स्टोव्हच्या गर्मीने भडकलाय… वाफाळलेल्या वाफा चेहऱ्यावर घेऊन घेऊन सारखा घाम पुसतोय. शेजारच्या उभ्या असणाऱ्या पोऱ्याला पटापटा ग्लास द्यायला सांगतोय. तो ग्लास देणारा पोरगा आपल्या बापूडवाण्या नजरेने माझी दृष्टी त्याच्याकडे खेचतो आणि हळूहळू चालत जरासा दूर जातो.

… तिथं एका नव्या इमारतीला लागून एक जुना पडका वाडा, त्याचं छान निळं दार… आकाशाशी स्पर्धा करणारं, लाकडी कोरीव काम असलेलं दिसू लागतं. त्या कोरीव कामाच्या इथूनच एक पिंपळाच्या छोट्याशा रोपानं बहरायला सुरुवात केलेली असते. दार किंचित आत ढकलल्यासारखं असतं. जरा धक्का दिला तर उघडेल आणि कदाचित आतलं काही दिसेल अशी शक्यता निर्माण करत राहतं. पण तसं काहीच घडत नाही. लेखकाला इतक्यात कथा रहस्य सांगायचं नसतं बर का! मग माझं मन उगाच वळतं आतमध्ये काय असेल विचारात डुबतं…

… तेवढ्यात डावीकडून अॅम्ब्युलन्सचा सायरन वाजायला लागतो. एखादा मोठ्या प्राण्यानं आपली दमदार पावलं टाकत यावं आणि त्याच्या आवाजाने किड्यामुंग्यांनी, कीटकांनी, छोट्याछोट्या प्राण्यांनी सैरावैरा धावपळ करावी तशी माणसं आपापल्या वाहनांना, सामानाला घेऊन मिळेल त्या ठिकाणी घुसू लागतात. क्षणभर आपली सगळी कामंधामं बाजूला टाकून माना वळवून वळवून ॲम्बुलन्समध्ये कोण? हे बघण्याचा चिवट प्रयत्न करतात… मृत्यूची एक खोल जाणीव त्या क्षणी सगळ्या रस्त्याला, इमारतींना, दुकानांना एक क्षण व्यापून राहते. जणू ‘स्टॅच्यू’ असं कोणीतरी म्हणावं. तसं क्षणभर सगळेचजण आहे त्या परिस्थितीत थांबतात. आणि ॲम्बुलन्स दूर गेल्याचा आवाज आला की कुठून तरी त्यांच्या अंगात संचारत आणि पुन्हा आपल्या वेगाने धावू लागतात. काही क्षण दो क्षण रेंगाळतात पण वेगळ्या विचारात पुन्हा गुंग होतात.

… हे सगळं कुठेतरी, कधीतरी कथेत, कादंबरी आलेलं असतं. आपण यापूर्वीच अक्षररूपात ते जगलेलो असतो. पुन्हा समोर प्रत्यक्ष वास्तवात जगताना ते मनात कोरलं जातं. आणि मग पुस्तकातल्या शब्दांवरून हळुवारपणे हात फिरवत जावं आणि एकेक ओळ पूर्ण करत त्याचा अर्थ लागत जावा, ती कथा समजू लागावी तशी ही दृश्यं दिसू लागतात. जाणवू लागतात. माणसं समजू लागतात. त्यांचं जगणं समजू लागतं. आणि मग आपल्यासह प्रत्येक गोष्ट, म्हणजे अगदी वस्तू असो वास्तू असो रस्ता असो किंवा आणखीन काही आकाश, झाड, पक्षी काहीही असो त्याची एक गोष्ट असते. हे आपण समजू लागतो. आणि गंमत म्हणजे आपल्याही नकळत ती वाचू लागतो.

… असं करता करता आपण किती, कधी आणि काय वाचलं ते आपल्यात किती झिरपलं हे आपल्यालासुद्धा उमगत नाही. जोपर्यंत आपण पुन्हा एखादी कथा, कादंबरी हातात घेऊन ती वाचायला सुरुवात करत नाही.

… वाचन आणि जगणं हे असं निराळं काही नसतंच.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अ.ल. देशपांडे.उमरीकर, अमरावती.

नमस्कार, अत्यंत ओघवत्या शैलीत सरळ, सुंदर , बिनसुरकतलेला आपला वाचन प्रवास खूप आवडला. परत परत वाचावा असा.

माणसं ही वाचली पाहिजेत ती समजून देखील घ्यायला हवीत हा विचार अभिनंदनीय आहे.

शुभेच्छा शुभचिंतन

वंदेमातरम् सुप्रभातम्.

अ.ल. देशपांडे उमरीकर, अमरावती.

२६/०६/२०२५