सौ. गीता वासुदेव नलावडे
अल्प परिचय
- सेवानिवृत्त मुख्याध्यापिका.
- गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे सन्मित्र मंडळाच्या बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका.
- महापौर पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
- सध्या बोरिवली (मुंबई) व पुणे येथे वास्तव्य.
मनमंजुषेतून
☆ प्रेमाचे सिंचन… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
विक्रांत मोरे (नाव बदललेले) काल माझ्याजवळ आला, अगदी शेजारी येऊन उभा राहिला. मी शिकवण्यात दंग होते. हळूच तो माझा पदर खेचत होता.
“काय रे? काही सांगायचंय का? ” असं विचारल्यावर अगदी अस्पष्ट आवाजात म्हणाला, “बाई, मला बक्षीस मिळालं. ”
मी हसून मोठ्याने म्हणाले, “अरे वा, छान! कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं? ” माझ्या वाक्यासरशी सगळा वर्ग त्याच्याकडे बघू लागला, बाईंनी दखल घेतली याचा त्याला खूप आनंद झालेला दिसला.
विक्रांत दोन बहिणीच्या पाठीवरचा. तो अगदी लहान असतानाच आई गेली. घरची अगदी गरिबी. वडील कुठेतरी वॉचमन. मोठी बहीण १४-१५ वर्षांची, तीही नोकरी करत होती. दुसरी बहीण असेल दहा-बारा वर्षांची, परिस्थितीने अकाली गृहिणी केलं होतं बिचारीला.
वर्गात अगदी पहिलीपासून “तो अभ्यास करत नाही” अशी बाईंची तक्रार आणि घरी अभ्यास न करता बहिणींना मारतो ही बहिणींची तक्रार. मला मात्र तो कधीच आगाऊ किंवा आक्रमक वाटला नाही. काही विचारलं की खाली मान घालून जमिनीकडे बघायचा.
गेल्या वर्षी नऊ मुलं चौथीच्या वर्गात नापास झाली होती, त्यात हाही होता. सगळेच एककाच्या मार्कांचे धनी. मी हा वर्ग घ्यायचा म्हणजे ७०चा पट होणार, पण पालकांनी खूप आग्रह केला आणि यावर्षी मी चौथीचा वर्ग घेतला. सर्वप्रथम मी नापास झालेल्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. रोज मनापासून अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास व्हाल या आत्मविश्वासाचं बीज त्यांच्याते पेरलं. मला जमेल तसं त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले आणि खरं सांगू, मुलांनीही मला निराश केलं नाही. एक ऋजुता सोडता (नाव बदललेलं) सर्व मुलं अत्यंत चांगल्या मार्कांनी पास झाली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना एवढे छान मार्क मिळाले होते सगळ्यांना.
विक्रांतही खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि तेव्हापासून अबोल असणारा विक्रांत माझ्याजवळ बोलू लागला. घाबरत घाबरत बोलणाऱ्या विक्रांतच्या मनावर, आपल्यात काही चांगले नाही आपले कोणी कौतुक करणार नाही हे दडपण असावे हे माझ्या शिक्षकी नजरेने लगेच हेरले आणि मी त्याच्या छोट्या गोष्टींची खूप आत्मीयताने दखल घेऊ लागले.
“अरे वा, विक्रांत, अक्षर छान काढले आहे, ” असं म्हटल्याबरोबर त्याच्या लहान चेहऱ्यावर हास्याचे गुलाब फुलंत. कालच्या प्रसंगाने त्याला खूप आनंद झालेला दिसला.
आज कामाच्या डोंगरात मी बुडून गेले होते. १२:१५ ला ऑफिसच्या दाराशी कोण घुटमळते म्हणून पाहिलं तर विक्रांत. म्हटलं “आत ये रे. ” तो आला. त्याच्या हातात घड्याळाचा खोका होता.
“बाई, हे बघा ते बक्षीस. ” असं म्हणून त्याने खोका माझ्या हातात ठेवला. मी सर्व काम बाजूला सारून त्याचं घड्याळ सर्व शिक्षिकांना दाखवलं, म्हटलं, “बघा ग, माझ्या विक्रांतला बक्षीस मिळालं. छान आहे ना घड्याळ! ” घड्याळ सगळ्यांना दाखवून मी पुन्हा व्यवस्थित त्याच्याकडे दिलं. त्यावेळेचा त्याचा आनंदाने उजळून निघालेला चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतोय.
माझ्या या दोन वाक्यांनी त्याला दिला प्रचंड आत्मविश्वास. त्याच्यातील नकारात्मक भूमिका जाऊन सकारात्मक रोपांची वाढ सुरू झालेली दिसली. नकळत अत्यानंदाने दोन अश्रू बाहेर टपकलेच. खूप खूप आनंद झाला मला. आज माझं रोप सुकत चालले होते परंतु प्रेमाच्या खताने ते पुन्हा मूळ धरू लागले होते, चांगले तरारून वाढीला लागले होते. एका शिक्षिकेला (शिक्षिका कमी पण आईच जास्त) यापेक्षा दुसरं काय हवं?
दिवसभर हा प्रसंग माझ्याभोवती पिंगा घालत होता. आजच्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे ती प्रेमाची पण त्याचाच इतका तुटवडा आहे की विचारू नका. म्हणूनच आम्हा शिक्षकांचे काम जरा वाढलं आहे. शिकवण्याबरोबर थोडे प्रेमाचे खतही या रोपांना आवश्यक आहे, तरच ही रोपं निरोगी आणि टवटवीत होतील.
(हे प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा याची गरज आपल्या घरातील सदस्यांना देखील खूप असते. आपण आपल्या कामात मग्न असतो, गर्क असतो, खरंच वेळ नसतो. पण या नात्यांना जगवायचं, फुलवायचं, तर मनापासून घेतलेली दखल आणि प्रेमाच्या शब्दांचं सिंचन या दोन गोष्टींची नितांत गरज आहे.)
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रेमाने पाठीवर फिरवलेला हात ( कौतुक ) किती सकारात्मक परिणाम देऊ शकतो ह्याचे हे उदाहरण आहे.
एकुणच आपण ह्या बाबतीत उदासीन असतो हे ही खरे.
संवेदनशील शिक्षकाची काय भूमिका असावी हे ही लक्षात आणून देणारं हे मनमंजुषेतून बाहेर पडलेलं लेखन.
अभिनंदन, शुभचिंतन.