सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

(आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय.”) इथून पुढे — 

आई जितकी कडक आणि कठोर शिस्तीची होती तितकीच गंमतीदारही होती. तिला नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच बघायला मनापासून आवडायचे. त्यात ती इतकी रमायची, इतकी गुंतायची की पडद्यावर जे काय घडत आहे ते काल्पनिक आहे, अभिनय आहे हेही ती विसरून जायची.

एकदा आम्ही सारे मणीरत्नम् चा एक चित्रपट पाहायला गेलो होतो. बहुतेक “बॉम्बे” हाच असावा. त्यात एक मुसळधार पावसाचा सीन होता. तो कोसळणारा पाऊस पाहून आई चटकन उठली आणि म्हणाली “अगंबाई गच्चीत वाल वाळत घातलेत की.. ” तेव्हा माझी धाकटी बहीण आईला हसत म्हणाली, “अगं आई हा चित्रपटातला पाऊस आहे. खरा नव्हे. तुझे वाल नाही भिजणार या पावसाने. ”

खेळात तिला नेहमी जिंकायलाच हवं असायचं. हरलेलं तिला चालायचंच नाही. क्रिकेटची मॅच बघताना सुद्धा कोणाचं शतक हुकलं, कोण शून्यावर आऊट झाला, तिच्यामते कोणी धाव घेऊ शकत होता आणि तरीही त्याने ती घेतली नाही तर तिची हळहळ प्रचंड असायची. तिच्या शेजारी बसून मॅच बघताना आम्हाला खूपच गंमत यायची. तिच्या कमेंट्स ऐकायला मजा वाटायची. टेलिव्हिजन तर खूप नंतर आला पण रेडिओवर पण ती त्याच आत्मियतेने क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकत बसायची आणि भारताची हार होत आहे असं वाटलं की रेडिओ धाडकन बंद करायची.

तिला स्वतःलाही खेळायला खूप आवडायचं.

एकदा माथेरानला सहलीला गेलो असताना तिने तिथल्या कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्त्री पुरुष संयुक्तपणे आणि एकेरी खेळत होते. त्यात आईने दोन्ही विभागात विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हा तिला झालेला आनंद माझ्या आजही लक्षात आहे. एक लहान मुल तिच्यात कुठेतरी दडलेलं असावं.

आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे जायचो तेव्हा सगळे मिळून आम्ही पत्त्यातला “झब्बू” हा खेळ आवडीने खेळायचो. एका डावात आईला सतत “झब्बू” मिळत होता आणि तिच्या हातातली पानं वाढत होती. ती हरणार हे निश्चित होतं. त्यावेळी तिने चिडून हातातले पत्ते टाकून दिले आणि रागात म्हणाली, ” तुम्ही खेळा. मला नाही खेळायचं. ” 

त्या दिवशी मात्र आईने खेळात फार रडी खाल्ली होती पण आयुष्याच्या खऱ्या खेळात मात्र तिने कधीच रडी खाल्ली नाही. ती नेटाने लढत राहिली. जिंकेपर्यंत हरत राहिली पण तिने तिचा आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आमच्या घराच्या मागच्या जागेत एका नवीन वास्तूचे बांधकाम चालू होते. ज्याच्या भरवशावर पप्पा ते बांधकाम करत होते त्यानेच पप्पांना फसवले. घुसखोरी करून त्याने त्या वस्तूत मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली. अनेक वर्ष कोर्टात केस चालली. तारखांवर तारखा पडत होत्या पण विजयाची माळ काही गळ्यात पडत नव्हती. त्याच दरम्यान पप्पांचं निधन झालं आणि ध्यानीमनी नसताना आईवर फार मोठी जबाबदारी पडली पण आम्हा सर्वांच्या लक्षात राहील इतका कणखरपणा आणि खंबीरपणा आईने त्यावेळी दाखवला. तोपर्यंत तिचेही वय झाले होते आणि सतत जिजी आणि पप्पांच्या अदृश्य संरक्षक कवचातच ती राहिली होती पण यावेळेस ती आत्मविश्वासाने बाहेर पडली. कोर्टाची एक एक पायरी नेटाने चढत राहिली. त्यानंतरही कितीतरी वर्ष ही केस चालली पण अखेर ती जिंकली. त्या दिवशीचा तिचा आनंद अवर्णनीय होता. तिने हात उंचावून तो व्यक्तही केला. जणू काय तिने विश्व करंडकच जिंकला होता.

जिजी गेल्यानंतर आधारवृक्ष कोसळलेल्या वेलीसारखीच तिची अवस्था झाली असावी. शेवटच्या श्वासापर्यंत जिजीचा जीव आईच्यातच गुंतलेला होता. शेवटच्या क्षणी जिजी जे म्हणाली ते मात्र काहीसं गूढ होतं पण आईच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली होती, ” मालू सांभाळून, जपून राहा, माझ्यामागे तुला अकरा वर्ष जगायचं आहे. ”

ती अकरा वर्षं आईच्या आयुष्यातली खूप महत्त्वपूर्ण होती. त्याकाळात ती महिला मंडळात जात असे. तिथे होणाऱ्या कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये, सोहळ्यांमध्ये मनापासून भाग घेत असे. अनेक बक्षीसंही तिने मिळवली. तिच्या या गुणांचे दर्शन तसं आम्हाला खूप उशिरा घडलं कारण आम्ही नेहमी पप्पांच्याच कर्तुत्ववानतेला सलाम केला. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात तसंच काहीसं आईच्या बाबतीत झालं असेल.

याठिकाणी मला आईची एक आठवण सांगावीशी वाटते.

पपांकडे झोटींग नावाचा एक विद्यार्थी गणित शिकायला यायचा. हा झोटींग अतिशय “ढ” होता. त्याला साध्या बेरजा वजाबाक्या जमत नसत. पपा एक दिवस त्याला चिडून म्हणाले, ” अरे बाबा! तुला टांगासुद्धा हाकलता येणार नाही. ”आईला पपांचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही. झोटींग गेल्यावर आई पपांना ठामपणे म्हणाली, ”अहो सगळीच मुलं हुशार नसतात. हुशार मुलांना कुणीही शिकवेल पण झोटींगसारख्या मुलाला आत्मविश्वास मिळवून देणं ही तुमचीही कसोटी होती. त्यात तुम्ही सपशेल नापास! ”

पपा पूर्णपणे निरुत्तर होते.

नंतरच्या काळात मी एक दिवस आईला सहज विचारलं, ”आई तू हे सगळं सुरुवातीपासून का नाही केलंस? आमच्यासाठी तू फक्त खमंग कुरकुरीत चकल्या करणारी, चवदार भाजणीची ढीगभर थालीपीठं थापणारी, तेलावरच्या पातळ, मुऊसूत पुरणपोळ्या आणि तत्सम बरंच काही करणारीच का राहिलीस? आयुष्याच्या उत्तरार्धात तू तुझ्याठायी असलेल्या गुणांचं, छंदांचं जतन करतेस हेच आधी केलं असतंस तर?”

तेव्हा आई चटकन म्हणाली, ”बाळांनो! तेव्हा माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या, मला तुम्हाला घडवायचं होतं. तुमची जडणघडण तुमची भविष्यं ही महत्त्वाची नव्हती का? माझ्यासाठी तेच महत्त्वाचं होतं आणि बाकी सारं दुय्यम होतं.”

आज जेव्हा मी आजच्या काळातल्या स्त्रीचा आणि त्या काळातल्या स्त्रीचा विचार करते तेव्हा कुणाचं पारडं जड, कुणाचं हलकं याचं मोजमाप करता येत नाही पण आई म्हणजे नक्की काय याचं आकलन मात्र कुठलेही अवजड, अलंकारिक, नित्य नियमाचे, घासलेले शब्द न वापरताही मला होते.

जे तेव्हा कळलं नाही ते आता कळतं. ”हा रंग गडद आहे. हा नाही शोभणार तुला. हे फिक्या रंगाचंच कापड घे. ”

तयार होउन बाहेर पडताना ती हमखास मला हटकायची. ”हे काय केस नाही नीट विंचरलेस? नुसती झिपरट दिसतेस. जा कंगवा घेउन ये. ” तेव्हा आईचा मला प्रचंड राग यायचा. पण आता त्यापाठीमागची आईची मायेची भावना जाणवते. आपलं हे सावळं, सौंदर्यात काहीसं डावच असलेलं लेकरुही चारचौघात सुंदर दिसावं एव्हढाच तिचा भोळा भाव होता. कारण “ती आई होती म्हणोनि.. ”

अखेरच्या काळात कुठलाही गीताभ्यास न केलेली माझी आई संपूर्ण विरक्त, तटस्थ झालेली होती. ज्या वास्तूत ती राहत होती ती तिच्या वडिलांनी तिला दिलेली अनमोल भेट होती पण तोही पसारा पेलवण्याची शक्ती न उरल्यामुळे आणि आपल्याच मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि आपल्या मागे कुठल्याही प्रकारचे कलह होऊ नयेत या भावनेने आम्हा लेकी- जावयांवर विश्वास ठेवून तिने तिची अनमोल वास्तू विकण्याचाही निर्णय घेतला आणि बजावलाही. तेव्हा म्हणाली मात्र, ”आता मला घर नाही. ”थोडी गहिवरली. पण आम्ही तिला लगेच म्हणालो,” आता तुला पाच हक्काची घरं आहेत.” 

जेव्हा ती गेली तेव्हा तिने आम्हा पाचीजणींना जवळ घेतले. आमचे मुके घेतले. म्हणाली, ”मी भाग्यवान आहे. मी तृप्त आहे. माझ्या परिपूर्ण आणि सुखी जीवनासाठी मी ईश्वराची आभारी आहे. आता तुमचा निरोप घेते. सुखी रहा. एकमेकींवरची माया कायम ठेवा. आनंदाने जगा.” 

त्रिभुवनातली सारी संपत्ती जरी एकत्र केली तरी त्याची किंमत तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या दोन थेंबांच्या किंमतीपेक्षा कमीच राहील कारण ते एका मातेचे, आशीर्वाद देणारे अनमोल अश्रू होते. त्यात संस्कारांची अजोड ठेव होती. ती गेली पण आमच्या अंगणात आनंदी जीवनाचं झाड लावून गेली.

एक गूढ मागे राहिलं. ३१ डीसेंबर २००५ साली तिचं निधन झालं. जिजीच्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी.

पपा गेले, जिजी गेली, आई गेली आणि आमचं बालपण काळाच्या ओघात वाहून गेलं.

 – क्रमश: भाग ४४ / २  – भाग ४४ समाप्त..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments