श्री सुहास सोहोनी

??

☆ पण लवकरच उजाडेल… – लेखक / कवी : श्री सुधीर फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

एकटेपणाची भिती नाही…पण

माणूस इतका, ’असहाय्य’, पूर्वी कधीच नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

कधीकाळी, वाल्याचा वाल्मिकी झाला होता…

अंगुलीमालही, बुद्धाला शरण गेला होता…

दुराचारालाही संकोच वाटावा,

इतका ‘भ्रष्टाचार’ पूर्वी कधीच नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

गर्वाचे घर कधीतरी खाली व्हायचे…

‘सम्राट’, संतापुढे, नतमस्तकही व्हायचे…

अहंगडानेही अपमानीत व्हावे,

इतका ‘उन्मत्तपणा’ पूर्वी कधी नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

चाणक्याने शेंडीला गाठ मारली होती…

सामान्यांनी जगात क्रांती केली होती…

स्वाभिमानास गहाण टाकेल,

समाज इतका ‘दीन’ पूर्वी कधी नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

माणूस माणसातला ‘माणूस’ बघत होता…

आपलं म्हणून परक्यावर प्रेम करत होता…

माणुसकीलाच तिलांजली देईल,

माणूस इतका ‘हीन’ पूर्वी कधी नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

पण लवकरच उजाडेल…

लख्ख प्रकाश पसरेल…

असहाय्यता संपेल…

समाज जागृत होईल…

दारिद्र्य, अहंकार मिटेल…

स्वाभिमानाने जगता येईल…

माणूस ‘माणूसकीला जपेल…

ह्या आशेवर मी जगणार आहे…

लेखक / कवी : श्री सुधीर फाटक 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments