श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ पटावरची प्यादी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(इन्स्पेक्टरने फोनवरचं नाव पाहिलं, कपाळाला आठ्या घातल्या आणि फोनवर बोलू लागला. त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर मात्र नाईलाजाने त्याने आमच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली.) – इथून पुढे –
गुन्हा नोंदवला गेला तरीसुद्धा दोन-तीन तास तो सगळा तमाशा चालूच होता. शेवटी संध्याकाळच्या सुमारास एकदाचे ते गावकरी सगळे निघून गेले.
ते गेल्यानंतर मग पोलिस आम्हाला म्हणाले, “आम्हाला कल्पना आहे की तुम्ही यात विनाकारण गोवले जात आहात परंतु आमच्यावरती वरून राजकारणी लोकांचा दबाव असल्यामुळे आम्हाला नाईलाजाने तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घ्यावी लागली आहे. आत्ता जो फोन होता, तो इथल्या स्थानिक नेत्याचा होता, सरकारी पक्षाचा आहे. त्यामुळे आमचे हात बांधले जातात.
तुम्हाला कल्पना नसेल, ” तो इन्स्पेक्टर सांगत होता, “पण इथल्या स्थानिक लोकांच्या मनात NGOबद्दल राग आहे. या जंगलाच्या जवळच खनिज मिळवण्यासाठी एक खाण कार्यरत होती, त्या खाणीमध्ये या गावातल्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले अनेक गावकरी कामाला होते. परंतु त्या खाणीमुळे तिथल्या पर्यावरणाला जंगलाला नुकसान होत आहे हे काही पर्यावरणप्रेमी एनजीओनी सप्रमाण सिद्ध केलं. त्यामुळे ती खाण बंद केली गेली होती. खाण बंद झाल्यामुळे तिथल्या लोकांचा रोजगार गेला होता. हे या रागाचं एक मोठं कारण होतं.
तुम्ही या जंगलामध्ये वाघ आहेत का हे शोधत आहात. जर इथे वाघ मिळाले तर हे व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित होईल. जर असं झालं तर इथल्या सर्व गावकऱ्यांना इथून विस्थापित व्हावं लागेल. आणि ते ना गावकऱ्यांच्या पचनी पडणार आहे, ना ते येथील नक्षलवाद्यांच्या सोयीचे आहे.
आणि तुम्हाला अडकवण्याचं तात्कालिक कारण वेगळंच आहे. ” निरगाठ उकल तंत्राने तो अधिकारी सांगत होता. “काही आठवड्यांपूर्वी इथल्या एका तलावात काही गावकरी ब्लास्ट फिशिंगने (dynamite – विस्फोटकांनी) मासेमारी करत होते…. जंगलातच नव्हे, तर भारतात कुठेही, अशा पद्धतीने मासेमारी करणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. “… तर तुमच्या NGO ने त्या गावकऱ्यांना पुराव्यासकट पकडलं आणि वनखात्याच्या स्वाधीन केलं. वनखात्याने त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला.
आणि आता इथल्या स्थानिक नेत्याने या गावकऱ्यांना चिथावलं आहे, तुम्हाला अडकवयाचं आणि तुमच्या बदल्यात त्या गावकऱ्यांना सोडवायचं असा हा डाव आहे. “
आम्ही सगळे सुन्न झालो होतो. दरम्यान पोलिसांनी आम्हाला आमची ओळखपत्रे, परवानग्या दाखवायला सांगितली. आम्ही आमच्या कामासाठीच्या आमच्या एनजीओने घेतलेल्या परवानग्या, आमची ओळखपत्रे वगैरे सर्व गोष्टी त्यांना दाखवल्या. ते सर्व पाहून, इन्स्पेक्टरने हवालदारांना सूचना दिल्या आणि आरोपपत्र नोंदवले.
पोलिसांना आमच्या सच्चेपणाची खात्री पटली होती, परंतु त्यांनाही कायदेशीर प्रक्रिया पाळणे बंधनकारक होतं. त्या रात्री त्यांनी आम्हाला तिथेच पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेतलं. ते म्हणाले, आज आत्ता इथून बाहेर पडणं तुमच्यासाठी सुरक्षेचं नाही. त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकले नव्हते, परंतु रात्रभर आम्हाला पोलीस स्टेशनमध्येच राहावं लागलं. तोपर्यंत आमच्या एनजीओच्या ऑफिसला ही बातमी पोचली होती आणि मग तिथून सूत्रं हलवायला सुरुवात झाली.
कोर्टात खटला उभा राहणार होता, आमच्यातर्फे आमचे टीम लीडर हजर राहणार होते. आम्हाला सोडून देण्यात आलं. मी पुण्याला परत यायला निघालो. तालुक्याला बसस्थानकावर आलो तर तिथल्या वर्तमानपत्रात आम्हा सगळ्यांच्या फोटोंसकट आमची बातमी पहिल्याच पानावर ठळकपणे छापली होती. मी तोंड लपवत प्रवास केला.
मी घरी आलो. आई वडील अर्थातच घाबरलेले होते. वडिलांनी तर अल्टिमेटच दिला होता की ‘बास झाली तुझी समाजसेवा. अन्य चार मित्रांप्रमाणे कुठेतरी खर्डेघाशी कर पण यातून बाहेर पड. ‘
तिकडे कोर्टाच्या तारखा पडत होत्या. सुदैवाने मला स्वतःला तिथे उपस्थित राहावे लागत नव्हतं. आमच्या संस्थेचे अधिकारी आमच्यातर्फे आमच्या वतीने कोर्टात उभे राहत होते. ते क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी आमची काही ना काही काम चालूच होती.
दीड वर्षानंतर मला पोलिसांकडून रजिस्टर पोस्टाने एक पत्र आलं. त्याच्यावरती बी फॉर्म असं काहीतरी लिहिलं होतं. पोलिसांनी कोर्टाला कळवलं होतं त्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला होता आणि आमच्याविरुद्ध सकृतदर्शनी कोणतेही पुरावे नव्हते.
That was a great relief. आता आम्हा सर्वांवर कायद्याची कोणतीही लटकती तलवार नव्हती. पण त्यातलं मुख्य वाक्य मला कळलं नाही, त्या बी फॉर्ममध्ये लिहिलं होतं की “प्रकाश यादव” याच्याविरुद्ध आता कोणताही गुन्हा दाखल नाही, तो कोणत्याही प्रकारच्या गुन्हामध्ये आरोपी नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नाही.
ही मला clean chit होती, पण त्याच्यावरती नाव भलतंच होतं. माझं नाव तर प्रसाद जाधव आहे आणि ही क्लीनचीट कोणा प्रकाश यादवला दिलेली होती.
मी त्या पोलीस स्टेशनला फोन केला, त्यांना सांगितलं की मला बी फॉर्मचे पत्र आलं आहे पण त्यात वेगळंच नाव आहे. हा काय प्रकार आहे? “
तो पोलीस अधिकारी हसला आणि म्हणाला, “साहेब, खरं कोण आणि खोटं कोण याची थोडीफार तरी समज आम्हाला असते. तुमच्याविरुद्ध बनाव रचला गेला होता हे आम्हाला त्याच दिवशी कळलेलं होतं. तुमच्याप्रमाणेच आम्हीही पटावरची प्यादी होतो हे आम्हालाही ठाऊक होतं. आणि म्हणून आम्ही तुम्हा चौघांचीही नाव लिहिताना जाणून-बुजून गफलत केली होती. उद्या दुर्दैवाने तुम्ही दोषी सिद्ध जरी झाला असतात तरी कागदोपत्री प्रकाश यादवला शिक्षा झाली असती, प्रसाद जाधवच्याविरुद्ध कोणताही कागद मिळाला नसता. उद्या तुम्ही पासपोर्ट काढायला गेला असतात, अन्य कुठल्या ठिकाणी नोकरीवरती जायचं असतं तर तुमच्या (खऱ्या) नावावर कोणताही गुन्हा नोंदवलेला मिळाला नसता, एवढी खबरदारी आम्ही घेतली होती. त्यामुळे जरी तुमच्याकडे आता बी फॉर्म आला असला तरी मुळात तुमच्या “प्रसाद जाधव” नावावरती कुठला गुन्हा दाखलच झालेला नव्हता. त्यामुळे तुम्हाला असंही चिंतेच कारण नव्हतं. ती सगळी घटना तुम्ही पूर्णपणे एक दु:स्वप्न समजून विसरून जा. ” इन्स्पेक्टर मला आश्र्वस्त करत होते.
“तिथल्या स्थानिक नेत्याचं काय झालं हो? ” मी पुन्हा आयुष्यात कधीही तिथे जाणार नव्हतो पण तरी माझी उत्कंठा मला गप्प बसू देईना.
तो पोलीस अधिकारी हसला आणि म्हणाला, “साहेब, ते आता आमदार झाले आहेत आणि कदाचित पुढच्यावेळी मंत्री सुद्धा होतील. ”
माझ्या अंगावर सरसरून काटा आला. “तुला सांगतो, ” तलावाकाठी सूर्यास्त बघताना प्रसाद त्याच्या भावी वधूला सांगत होता, “त्या दिवशी, फक्त त्या दिवशी एकदाच, मला असं वाटलं होतं की उगाच आलो आपण या क्षेत्रात. पण नाही, दुसऱ्या दिवशी मी ती मरगळ झटकली आणि आजही मी आणि आमची NGO जंगल परिसर आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना जंगलांचं पर्यावरणाचे महत्त्व शिकवण्याच्या आमच्या कामावर रुजू आहे. “
मळभ दूर झालं होतं, प्रसादच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हलकं स्मितहास्य झळकू लागलं होतं. पटावराचे प्यादं आपलं निसर्ग रक्षणाचं काम इमाने इतबारे बजावत होतं.
(सत्यकथा – नाव बदलेलेले)
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड, पुणे. मो 8698053215
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈