श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ पटावरची प्यादी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
तिचा हात हातात धरून प्रसाद जाधव तलावाकिनारी बसला होता. त्यांचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा झाला होता आणि आज शनिवारी संध्याकाळी निवांतपणे फिरण्यासाठी ते दोघं तलावावर आले होते. त्यांचं arranged marriage होतं. त्यामुळे या अशा भेटीतूनच एकमेकांच्या विषयीची छापील बायोडाटामध्ये न छापलेली माहिती एकमेकांना होत होती.
मावळत्या सूर्यनारायणाकडे बघत तिने त्याला विचारलं, “शहरातले तुम्ही, मग या जंगलांचे वेड तुम्हाला कसं काय लागलं? “
खरंच होतं ते. त्याच्या अनेक मित्रांना हाच प्रश्न पडला होता. जन्मापासूनच तो अस्सल पुणेरी. पण त्याला आवड होती ती जंगलांची. त्याने वनशास्त्र (forestry) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. आजही तो एका पर्यावरण विषयक सामाजिक कार्य करणाऱ्या नॉन-गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन (NGO) मध्ये कार्यरत होता.
तिच्या प्रश्नावर तो नुसताच हसला, त्याने काहीच उत्तर दिलं नाही.
“असे कधी झालं का हो, ” तिनं अजून विषयाचा पिच्छा सोडला नव्हता, “की तुम्हाला वाटलं, की आपलं चुकलंच. आपण या असल्या विषयात यायलाच नको होतं. ”
हा प्रश्न तसा अनपेक्षित होता, पण या प्रश्नाने कुठेतरी त्याच्या मनाची तार आर्तपणे छेडली गेली. इतका वेळ मोकळाचाकळा बसलेला तो, आता अचानक सावरून बसला. इतका वेळ त्याच्या ओठावरती अलगद विलसत असलेलं स्मितहास्य गायब झालं, कपाळावर आठ्या पडल्या आणि तो म्हणाला, “मी तुला एक गोष्ट सांगतो. एक आटपाट जंगल होतं”, आटपाट नगर होतं या चालीवर त्याने गोष्टीला सुरुवात केली,
“खूप मोठ्ठं जंगल! आणि या जंगलात वाघोबा सापडतात का हे बघण्यासाठी आमच्या NGO तर्फे, वनखात्याची रीतसर परवानगी वगैरे घेऊन, मी आणि माझे सहकारी गेलो होतो. जर वाघोबा सापडले असते, तर हे जंगल व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित झालं असतं.
वाघ शोधण्यासाठी आम्ही जंगलात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. या कॅमेरांचं वैशिष्ट्य असं असतं, की त्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात हालचाल झाली की आपोआप तिथे फोटो काढला जातो. रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला श्वापदं बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या हालचालीने हे कॅमेरा ऍक्टिव्हेट होतात आणि फोटो काढले जातात.
आमचं कामच हे होतं की रोज सकाळी जंगलात जिथे जिथे कॅमेरे लावले आहेत तिथे जायचं, तिथल्या मेमरी कार्डमध्ये काही फोटो निघाले आहेत का, त्याच्यात वाघ दिसतोय का हे बघायचं, ते मेमरी कार्ड काढून घ्यायचं, नवीन रिकामं मेमरी कार्ड कॅमेरामध्ये ठेवायचं आणि मुक्कामी परत येऊन लॅपटॉपवरती तो डेटा कॉपी करून घ्यायचा, त्याची नोंद करायची.
एका दिवशी आम्ही चौघेजण नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेला जंगलात फिरत होतो. आमचं सकाळचं काम संपलं, सोबत आणलेले डबे खाल्ले आणि दुपारी एकच्या सुमारास आम्ही तिथून बाहेर पडलो. जंगलाची हद्द जिथे संपते, तिथवर आलो, मी गेट उघडलं आणि गाडी गेटमधून बाहेर आल्यावर गेट बंद करत असताना माझ्या लक्षात आलं की जंगल हद्दीच्या बाहेर, गेट समोर ३०-४० जण उभे होते. मी गेट बंद करण्याच्या नादात होतो, त्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही, पण नंतर पाहिलं, तर त्यांच्यातला एक जण येऊन आमच्या टीम लीडरशी हुज्जत घालत होता.
तिथली स्थानिक भाषा मला येत नव्हती त्यामुळे तो काय बोलत आहे हे मला सगळं नीट कळत नव्हतं पण त्याचे हातवारे, देहबोली हे बघता काहीतरी भांडण चालू होतं एवढं नक्की. बघता बघता त्या गर्दीतून दोन बायका पुढे आल्या, आमच्या लीडरला काहीतरी अद्वातद्वा बोलू लागल्या आणि एकीने तर पुढे येऊन सरळ त्यांच्या मुस्कटात भडकवली. हे काहीतरी भलतंच घडतंय हे लक्षात येऊन आम्ही सगळेचजण पुढे सरसावलो आणि त्यांच्याशी वाद घालू लागलो. अचानक त्यांच्यातले पाच सातजण आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करायलाच सुरुवात केली.
मी आमच्या जीपच्या पलीकडे होतो, त्या सगळ्यांपासून थोडासा दूर. मला ठाऊक होतं की इथून एक किलोमीटर अंतरावरती वनखात्याचं ऑफिस होतं आणि तिथेच जवळ पोलीस स्टेशन होतं. मी त्या दिशेने धावू लागलो, पण ती माणसं प्लॅनिंग करून पूर्ण तयारीतच आली होती. कोणीतरी पोलिसांकडे धावेल हे लक्षात घेऊन, त्या रस्त्यावरही दबा धरून त्यांची माणसं बसली होती.
त्यांनी मला पकडलं, आणि इतरांजवळ आणलं. आता आम्हा चौघांची साग्रसंगीत धुलाई चालू झाली होती. त्यांच्याकडे लाठ्याकाठ्या होत्या, त्याने ते आम्हाला धोपटून काढत होते. आम्ही पुरते घाबरलो होतो, कारण या जंगलामध्ये नक्षलवादीसुद्धा आहेत हे आम्हाला ठाऊक होतं, त्यामुळे आम्हाला कोण मारतंय? का मारतंय? हे मारणारे नक्षलवादी तर नाहीत ना? आणि आता आमचं पुढे काय होणार? अशी प्रश्नांची मालिकाच आमच्या डोळ्यासमोर नाचू लागली होती.
अर्धा एक तास मारहाण करून झाल्यावरती त्यांनी आम्हाला बांधलं आणि आमची वरात चालत चालत त्या पोलीस स्टेशनकडे आणली. जसे ते पोलीस स्टेशनकडे आले, तसं थोडंसं आम्हाला हायसं वाटलं, कारण हे जर नक्षलवादी असते तर ते आम्हाला पोलिसांकडे नक्कीच घेऊन आले नसते.
तिथल्या स्थानिक भाषेत त्यांनी पोलिसांकडे आमची तक्रार केली. आतापावेतो तिथे चांगलाच जमाव गोळा झाला होता. आम्हा चौघांना हाताला काढण्या बांधून गुन्हेगार म्हणून उभं केलं होतं.
त्या गावकऱ्यांची तक्रार होती की तिथल्या आदिवासी वनवासी बायका, ज्या जंगलामध्ये लाकूडफाटा गोळा करायला जात असत, त्यांची आम्ही छेड काढली, त्यांचा विनयभंग केला, त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
हे समजताच आम्ही आश्चर्यचकित झालो, हे काहीतरी भयंकर कुभांड रचून आम्हाला त्यात गोवलं जात होतं.
स्वत:ची बुद्धी आणि शक्ती नसलेली – कोणाच्यातरी कुठल्यातरी अतर्क्य खेळातील पटावरची प्यादी झाल्याचं सपशेल जाणवत होतं. आता हे गावकरी आणखी काय करणार आणि पोलीस काय करणार – सगळाच भविष्यकाळ अनिश्चित आणि अंध:कारमय होता. गावकरी पोलिसांदेखत आमच्यावर भडास काढत होते, मारहाण करत होते, बायका आमच्या नावानं बोटं मोडत होत्या.
आश्चर्य म्हणजे पोलिसांची देहबोली बघून ते बहुधा या सगळ्या आरोपांशी सहमत वाटत नव्हते, ना ते आम्हाला मारहाण करत होते, ना आमच्याविरुद्ध काही लेखी तक्रार लिहून घेत होते. मराठी हिंदी चित्रपट बघून आपल्या मनात पोलिसांबद्दल खूप वेगवेगळे समज झालेले असतात, पण इथे जे काही जाणवत होतो ते असं की पोलीस कुठेतरी आम्हा चौघांच्या बाजूने आहेत.
बहुधा गावकऱ्यांच्याही हे ध्यानात आलं असावं. त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि तो फोन पोलीस इन्स्पेक्टरकडे दिला. इन्स्पेक्टरने फोनवरचं नाव पाहिलं, कपाळाला आठ्या घातल्या आणि फोनवर बोलू लागला. त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर मात्र नाईलाजाने त्याने आमच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड, पुणे. मो 8698053215
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈