श्री नंदकुमार पंडित वडेर
जीवनरंग
☆ “गुंतागुंत…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“ हे काय? अशी कशी पोलीस चौकीत आलीस तू वेडा बाई! काय तुझा अवतार झालाय हा? .. पिंजारलेले केस… काळवंडलेला चेहरा.. अंगावरच्या वस्त्राची चिंध्या चाळण झालेली.. भात्याने फुगवल्यासारखी उराची धकधक… त्राण संपल्यासारखा देह ठायी ठायी पडत झडत…. इथे कशाला आली आहेस? ‘ साहेब मला एफ. आर. नोंदवायचा आहे… माझ्यावर त्या नराधमाने…’ एवढंच बोललीस.. पुढचे बोल उमटलेच नाहीत… आणि बेशुद्ध झालीस… नेमकं काय झालयं कळल्याशिवाय आम्हाला पुढं कसं जाता येईल? … ”
– तरीही ती गप्पच..
“ अगं आधी उठ तू.. भानावर ये! आणि सविस्तर काय झालयं ते सांग! … घाबरू नकोस.! .. “
– ती जराशी सावरली. पण तिची भीती मात्र अजूनही तिला काहीही सांगण्यापासून जणू रोखून ठेवत होती. तिला कशाबद्दल तक्रार नोंदवायची आहे हे कळल्याशिवाय आम्ही पोलिस तरी तिची मदत कशी करू शकणार होतो? मग मी माझी खुर्ची तिच्याजवळ घेतली आणि तिला समजावू लागलो…….
“ हे बघ, आम्ही तुला नक्कीच तातडीने मदत करू… कारण आम्ही संवेदनशील मनाचीच माणसं आहोत.. ‘खल निग्रहणाय’ या बोध वचनाला आम्ही बांधील आहोत…” माझं बोलणं तिला कळतंय की नाही अशी शंका वाटावी असाच तिचा चेहरा दिसत होता.
“ इकडे लक्ष दे.. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या आम्ही नक्कीच मुसक्या आवळू… पण त्या आधी घडलेली घटना.. का? कशी? कधी? कोणी? …. हे सगळं तू सांगितलंस तरच ना? या अंतहीन प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत… गुन्हेगाराला पकडण्यासाठी, त्याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणि आणि भक्कम पुराव्यांची फायलींची चळत सादर करून गुन्हा करणाऱ्याला गुन्हेगार ठरवल्यावर कायद्याची आंधळी न्यायदेवता तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून कागदोपत्री न्याय तुला देऊन आश्वस्त करेल… “
आता ती जराशी भानावर आल्यासारखी वाटत होती. माझं बोलणं तिला कळतंय असं वाटल्यावर मी पुढे तिला समजावयाला लागलो – –
“ तुला न्याय मिळवून दिल्याचं समाधान जे तुला मिळेल ना तसंच ते न्यायालयाला आणि पर्यायाने आम्हालाही मिळत असते. तेव्हा एक खरी लढाई जिंकल्याचा, आमच्या कर्तव्य पूर्तीचा आनंद आम्हाला मिळतो… कारण आम्ही संवेदनशील आहोत… पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नसली.. छोटीशी वाटत असली, तितकी महत्वाची वाटत नसली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखी नसते ती. कळतंय का काही? नसलं कळत तरी सांगतो.. आता आलीयेस ना भानावर.. मग आधी नीट सावरून बस आणि मी काय सांगतोय ती ऐक. ”
ती एव्हाना पूर्ण सावरल्यासारखी दिसत होती. आणि मीही समोर जणू माझा एखादा विद्यार्थी बसलाय असं समजून तपशीलवार माहिती द्यायला लागलो… एखादी फिर्याद घेऊन आलेल्या आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हेगाराला शिक्षा करावी अशी अपेक्षा असणाऱ्या सगळ्यांनाच ही माहिती असायलाच हवी असं माझं ठाम मत होतं, आणि म्हणूनच आमची बाजू सांगण्याची संधी मी कधीच सोडायचो नाही…
“ हे बघ, कायद्याचा बीजमंत्र असा आहे.. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये… आणि यासाठीच आरोपीपेक्षा फिर्यादीवर फार मोठी जबाबदारी असते.. ती म्हणजे आरोपी हाच खरा गुन्हेगार आहे हे न्यायालयाला पटवून देणे… आणि आणि केवळ या एकाच गोष्टीसाठी फिर्यादीला न्यायालयाच्या वर्षानुवर्षे पायऱ्या झिजवाव्या लागतात… तोवर गुन्हा करूनही आरोपी मात्र सुखात जगत असतो… सुटलेल्या शंभर गुन्हेगारातील तो सुद्धा एक असतो…. दाताच्या कण्या करून कायद्याचा कीस पाडून, कंठशोष करून आपला मुद्दा तुझा वकील कोर्टाला सांगत असतो… त्याचवेळेला.. नेमके त्याच कायद्यातल्या पळवाटेचा संधीसाधूपणाने आरोपी ‘ तो मी नव्हेच ‘ असं सांगून कोर्टाची दिशाभूल करून आपली निर्दोष सुटका करून घेतो… ‘ तमाम जलि़लों के बाद ये अदालत इस ऩतीजे पे पहुंची है कि गुनेहगार निर्दोष पाया है अत: ये अदालत उसे बाइज्जत बरी करती है.. कोर्ट इज ॲडजर्न… “
.. या माझ्या बोलण्यातलं तिला नेमकं किती आणि काय कळलं ते मला कळायला मार्ग नव्हता खरं तर.. पण तिच्या चेहेऱ्यावर ऐकण्याची उत्सुकता मात्र नक्कीच जाणवत होती. मग मीही उत्साहाने सांगू लागलो..
“.. तर काही वेळेला गुन्हा शाबित झाल्याने गुन्हेगाराच्या शिक्षेचा निकाल दिला जातो… त्या तेव्हढ्याच वेळेपुरतं तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचं परिमार्जनाचं झाल्याचं आणि बराच कालापव्यय झालेला असला तरी मिळालेल्या न्यायाचं सुख नि आनंद मिळतो… क्षणैक असला तरी… आणि ते स्वाभाविक आहे. पण खरं काय आहे माहिती आहे… आपण संवेदनशील म्हणून किती फुशारक्या मारल्या ना तरी… त्या न्यायाला संवेदनेशी काहीही देणंघेणं नसतं.. फक्त नि फक्त फुल प्रुफ साक्षी, अक्षय टिकणारा पुरावा यावरच कोर्टाची भिस्त.. बाकी सगळं व्यर्थ…. मग तिथे चारचौघात कायद्याच्या नावाखाली अधिकच धिंडवडे काढले जातात… एका अन्यायाचा न्याय मिळविण्यासाठी कायद्याच्या आवरणाखाली आणखी हजारो अन्याय केले जातात… तुझ्या सोशिकतेचा अंत पाहिला जातो. न्याय मिळण्याच्या लढाईत प्रसंगी तुलाच संपवलं जातं… आणि शेवटी कोर्ट कागदावर आपली मोहर उठवतं त्याला ‘न्याय ‘ असं म्हटलं जातं… किती किती नि कसं कसं गुंतागुंतीचं होऊन बसलेलं असतं सारं… आपल्याला अखेर न्याय मिळाला हे शेवटी आपल्याच समाजात ओरडून सांगावं लागतं, कारण तो कोर्टाचा न्याय निवाड्याचा कागदच मुळी शब्द गिळून मौनात असतो… समाजमन निष्ठूर असतं. ते सहसा कुणाला आपल्यात सामावून घेत नाही.. त्यांची दृष्टि कलुषित ती कलुषितच राहते… तिकडे तो आरोपी.. कायद्याने शाबीत ठरलेला गुन्हेगार.. राजरोसपणे ताठ मानेने समाजात वावरताना दिसतो… समाजही त्याचा हारतुरे घालून जाहीर सत्कार करत असतं… एका असंवेदनशील जाणीवेची सत्ता दुसऱ्या संवेदनशील जाणीवेला देशोधडीला लावून टाकते…. ही एक अनाकलनीय न सुटणारी गुंतागुंत आहे बघ..! “
तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद करावी की नाही या संभ्रमात मला तिला पाडायचंच नव्हतं. फक्त वास्तवाची जाणीव करून दिली तर ती ठामपणे कोर्टात उभी राहून स्वतःसाठी न्याय मिळवू शकेल हे मला सांगायचं होतं … त्यासाठी पुढच्या सगळ्या गोष्टींना तिने न घाबरता.. न डगमगता तोंड द्यावं.. आम्ही तिच्या पाठीशी असू.. हे मला सांगायचं होतं.
पण.. पण माझा हा प्रयत्न कुचकामी ठरला.. नुसते शब्द ऐकूनच ती पुन्हा घाबरली असावी.. कारण मी बोलायचं थांबताच ती झर्रकन उठली आणि तिथून जवळजवळ धूम ठोकल्यासारखी चौकीतून पळून गेली.
‘मी तरी कशाला तिला इतकं सांगत बसलो ‘.. मलाच आता संभ्रम पडला होता..
– – – शंभर गुन्हेगारातला आणखी एक गुन्हेगार मी माझ्याही नकळत मोकळा सोडला होता का????
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈