डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

 

☆ आऊटसायडर … — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

सुभाष गेले पंधरा दिवस अत्यंत अस्वस्थ होता. त्याच्या मनाची सगळी शांतता ढवळून निघाली अगदी. त्याला कारणही तसंच घडलं. गेले महिनाभर त्याला सिंगापूरहून अमिताचे सतत मेल, फोन येत होते. त्याचं सुखी आयुष्य अगदी ढवळून निघालं या मेल्स आणि फोन्स ने.

मागचे दिवस आठवले सुभाषला. किती सुखात जगत होता सुभाष. मध्यमवर्गीय रहाणी, लहान कुटुंब आणि सुखी दोनच भावंडे. लहान सुभाष मोठी ताई गीता. सुभाषचे वडील जरी साध्या नोकरीत होते तरीही आईही शिक्षिका होती आणि त्या दोघांनी आपल्या गुणी मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. फाजील लाड केले नाहीत आणि अगदी डोक्यावरही बसवलं नाही मुलांना. गीता आणि सुभाष अभ्यासात चांगले होते. , गीता कॉमर्सला गेली. आपल्या इच्छेप्रमाणे तिने मास्टर्स डिग्री घेतली आणि एका चांगल्या टॅक्स कन्सल्टंटच्या फर्म मध्ये छान जॉब करायला लागली.

यथावकाश गीताने आपलं आपण लग्न ठरवलं. इतक्या चांगल्या मुलाला आईवडील का नकार देतील? घरबसल्या छान जावई चालत आला. गीताच्या आईवडिलांनी अगदी हौसेने लग्न करून दिले. गीता आनंदात सासरी नांदायला लागली.

सुभाष अत्यंत चांगले मार्क्स मिळवून इंजिनिअर झाला. त्याला एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगला जॉब मिळाला.

आई म्हणाली ”सुभाष, आता तुझं लग्नाचं बघायला लागू या ना? छान पगार मिळतोय तुला. नुकताच फ्लॅटही बुक केला आहेस. आता नाव नोंदवायचं का? तुझी तू कोणी बघितली आहेस का ? मोकळेपणाने सांग हो. ”

सुभाष म्हणाला, ”नाही ग आई. माझी काही हरकत नाही मुली बघायला. तुम्हाला योग्य वाटतील त्या मुली मी बघेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. ”

मोठ्या उत्साहाने मीनाताईंनी सुभाषचं नाव विवाहमंडळात नोंदवलं. चांगल्या मुली सांगून येऊ लागल्या सुद्धा. त्या दिवशी मीनाची बहीण मधुरा सहज भेटायला आली.

“काय ग मीना, काय म्हणते मोहीम सुभाषची?” हसून तिनं विचारलं.

“चालू आहे, बघतोय मुली. ”

“ बघतेस का एक मुलगी? छान आहे दिसायला. नवीनच आलेत आमच्या बिल्डिंगमध्ये. मला फारशी माहिती नाहीये हं. बघ तू सगळं नीट. ” पत्ता फोन देऊन मधुरा निघून गेली.

पुढच्या आठवड्यात मीना आणि सुभाष मुलगी बघायला गेले. सुरेखच होती पल्लवी दिसायला. छान नोकरी होती, बोलायला चांगली वाटली. सुभाषला आवडली पल्लवी.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी साठ्यांची अमिता त्याला भेटली. हेही स्थळ विवाह मंडळातूनच आलं होतं. अमिता अतिशयच स्मार्ट, मॉडर्न आणि पहिल्याच भेटीत इम्प्रेशन पडेल अशीच होती.

सुभाष म्हणाला, ”आई मला फार आवडली अमिता. ती पल्लवी छान आहेच पण ही जास्त स्मार्ट आहे. आपण हिलाच होकार कळवूया. ”

मीना विचार करून म्हणाली.. “सुभाष, नीट विचार कर. मला ही ओव्हर स्मार्ट वाटतेय. अशा मुली संसाराला जरा कमी महत्व देतात असं माझं मत आहे. पल्लवी योग्य मुलगी वाटते मला तुझ्यासाठी. बघ. शेवटी संसार तुला करायचा आहे. ” सुभाष अमिताला चार वेळा भेटला. आणि त्याने तिला होकार द्यायचे ठरवले. पल्लवीच्या घरी, क्षमस्व असा नकार कळवण्यात आला.

एकुलती एक लाडात वाढलेली, कुठेही तडजोड करायला तयार नसणारी अमिता गोखल्यांच्या घरात सून म्हणून आली. सुभाष तर तिच्या रुपाला इतका भुलून गेला होता की तिचे दोष त्याला खटकेनात.

उशिरा उठायचं, तयार डबा घेऊन ऑफिसला जायचं. कामात सासूला मदत करायची असते हे ती लक्षातच घ्यायची नाही. पुन्हा आपल्या पगाराचे ती काय करते हे तिने सुभाषला कधीही सांगितलं नाही. अफाट खरेदी, सतत बाहेर खाणे, शॉपिंग हेच आयुष्य होते तिचे.

एकदा सहज म्हणून मीना तिच्या आईला भेटायला गेली. बोलता बोलता म्हणाली ”अहो, आता अमिताच्या लग्नाला सहा महिने झाले. अजूनही ती उपऱ्यासारखीच रहाते घरात. आमच्याशी तिचा संवादच नसतो. बाकी काम, भाजी काही सामान आणणे हे तर लांब राहिलं. ”

अमिताच्या आई म्हणाल्या, ” अहो, अलीकडच्या मुली या. मिळवत्या. त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं मीनाताई. आम्ही तिला लाडात वाढवली आहे. ती इथे तरी कुठे काम करायची? दमून जाते हो ऑफिस मध्ये काम करून. ”

मीना हताश होऊन घरी आली. नवऱ्याला म्हणाली, ” बघा. काय बोलल्या विहीणबाई. मलाच चार शब्द सुनावले. कठीण आहे बरं आपलं आणि सुभाषचं. जे जे होईल ते ते पहावे. ”

चार महिने असेच गेले.

एक दिवस अमिता उत्साहाने घरी आली. हे सांगतच की “ मला सिंगापूरला छान जॉब मिळालाय. मी पुढच्या महिन्यात तिकडे जॉईन होणार आहे. ” 

थक्क होऊन सुभाष आणि त्याचे आईबाबा बघतच राहिले.

“ अग पण मग तू एकटीच जाणार का तिकडे? मग सुभाषचं काय?”

बेफिकिरीने ती म्हणाली, ” मला संधी मिळतेय तर मी जाणार. सुभाषने यावं तिकडे आणि करावा प्रयत्न की. मिळेल की त्यालाही चांगला जॉब तिकडे. ”

सुभाष संतापून म्हणाला, ” मी अजिबात माझा हा उत्तम जॉब सोडून तिकडे येणार नाही. मूर्ख आहेस का? हातचं सोडून पळत्याच्या मागे धावायला मी मूर्ख नाहीये. तूही नीट विचार केला आहेस का अमिता? उगीच इथला जॉब सोडून तिकडे एकटीने जाऊ नयेस असं वाटतं मला. ”

अमिता म्हणाली, ”वाटलंच होतं मला. बस इथेच. मी जाणार. नवीन क्षितिज मला खुणावतंय तर मी ही संधी घेणारच. मी आईकडे जातेय आता. मला खूप तयारी करायचीय जायची. मग मी तिकडूनच एअरपोर्ट वर जाईन. येणार असलास तर ये भेटायला. माझ्या जायच्या डिटेल्स कळवीन तुला. ”

थक्क होऊन मीना आणि मोहन तिच्याकडे बघतच राहिले. अशुभाची पाल चुकचुकली मीनाच्या मनात. ठरल्यावेळी अमिता सिंगापूरला निघून गेली. सुभाष तिला पोचवायला एअरपोर्टवर गेला होता. अतिशय उद्विग्न होऊन तो घरी परत आला.

आयुष्यच बदललं त्या दिवसापासून सुभाषचं. लग्नाला वर्ष झालं नाही तोच हे खेळ सुरू झाले आपल्या नशिबाचे, असं मनात आलं त्याच्या. अमिताचे उत्साहाने भरलेले फोन, फोटो व्हिडिओ यायचे सुभाषला. सुरुवातीला तू ये ना इकडे म्हणणारी अमिता आता त्याला फोनही करेनाशी झाली. तिचा सिंगापूरलाच कायम रहाण्याचा निर्णय तिने माहेरी आणि सासरीही कळवला.

सुभाष संतापला. तिच्या आईवडिलांना भेटला. ते म्हणाले, “ उलट तूच तिकडे जायला हवंस सुभाष. चांगला जॉब मिळव आणि सुखात रहा तिकडे. पण तू जर तिकडे जायला तयार नसलास तर मात्र अमिता तुला घटस्फोट द्यायचा विचार करतेय. आम्हीही तिच्या पाठीशी कायम उभे रहाणार. ” 

सुभाष म्हणाला”, हो का? मग मलाही हवाय घटस्फोट तुमच्या लाडावलेल्या मूर्ख लेकीपासून. बस झालं आता. ”

तो तिरीमिरीने घरी आला आणि आईवडिलांना हे सगळं सांगितलं. मीना मोहन हताश झाले हे ऐकून. कमाल आहे हो या मुलीची.

“आई, यावर मला अजिबात चर्चा नकोय. तूही जाऊ नकोस आता तिच्या माहेरी. मला आवडणार नाही तू गेलीस तिकडे तर. ” मीना गप्प बसली. आपल्या मुलाच्या नशिबात काय आहे हेच तिला समजेनासे झाले.

अमिता भारतात आली आणि भरपूर मनस्ताप देऊन अखेर सुभाषला घटस्फोट देऊन पुन्हा सिंगापूरला निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. ऑफिस मधल्या कृपाला एक दिवस सुभाष घरी घेऊन आला.

“आई ही माझी कलिग कृपा देशमुख. मी हिला बरीच वर्षे ओळखतो. मला लग्न करायचंय हिच्याशी. ”

कृपा मीनाजवळ बसली आणि म्हणाली, “सुभाषच्या आई, मला थोडं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशी. माझे मिस्टर चार वर्षांपूर्वी अपघातात गेले. मी इथे एकटीच रहाते. माझे आईवडील औरंगाबादला असतात.

मी आणि सुभाष एकमेकांना खूप वर्षे ओळखतो. पण ते फक्त टीम लीडर आणि मी सबॉर्डीनेट स्टाफ असं आमचं नातं आहे. आम्हाला सुभाष सरांची पत्नी निघून गेली, तिने घटस्फोट घेतला हे ऐकून माहीत होतं. मागच्या महिन्यात सुभाष सरांनी मला लग्नाबद्दल विचारलं. माझा निशांतशी फक्त पाच वर्षे संसार झाला हो. अचानकच एका कार अपघातात त्याचे निधन झाले. मलाही सुभाष सरांशी लग्न करावेसे वाटते.

पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” कृपाचे डोळे पाणावले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments