सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शीला पतकी 

💐 अ भि नं द न 💐

“युवा विवेक” या पुणेस्थित संस्थेतर्फे “म्हणींच्या गोष्टी” या नावाने आयोजित केलेल्या एका वेगळ्याच प्रकारच्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री शीला पतकी यांच्या “बैल गेला नि झोपा केला” या कथेला सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे सुश्री शीला पतकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य-प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..💐

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैल गेला नि झोपा केला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

शेवटचा पेपर संपून संध्याकाळी सगळी मुले नाना आजोबांकडे आली त्यावेळेस सगळेजण समीरला चिडवत होते तो बिचारा अगदी रडकुंडीला आलेला. नानानी विचारलं, “काय रे काय झालं ?”समीर खाली मान घालून उभा” नाना आजोबा माझा पेपर बुडाला म्हणजे आज शेवटचा दिवस होता ना म्हणून सकाळी पेपर ठेवला होता आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे दुपारी आहे मी दुपारी गेलो माझ्या लक्षात नव्हते आणि त्यामुळे आता माझा पेपर बुडाला पेपर झाल्यावर मी शाळेत गेलो”. त्यावर नाना म्हणाले” अरेरे! म्हणजे तुझं असं झालं… पेपर गेला आणि समीर आला..! तुझ्यावरून आता ही नवीन म्हण पडेल “.. म्हण म्हणजे काय हो आजोबा? सगळ्या मुलांनी एक सुरात विचारले. नाना म्हणाले “अरे एखादी घटना अगदी थोडक्यात सांगण्याचे साधन म्हणजे म्हण! अशा म्हणी आम्ही खूप वापरत असू तुमच्या पिढीला हे माहिती नाही. ” पण म्हण म्हणजे काय? नाना म्हणाले म्हण म्हणजे.. नाचता येईना अंगण वाकडे… नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.. अंथरून पाहून पाय पसरावे.. इकडे आड तिकडे विहीर याला सगळ्याला म्हणी असे म्हणतात. अशाच एखाद्या गोष्टीवरून ती म्हण पडलेली असते. गोष्टीवरून म्हणल्याबरोबर मुले जोराने म्हणाली “मग आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना” आजोबा म्हणाले” हो सांगतो ना बसा बसा सगळे बसा.. पेपर कसे गेले सगळ्यांना?” छान गेले आजोबा”. तोपर्यंत आतून आजी म्हणाल्या पोरांनो तुमच्या आजोबांची गोष्ट होईपर्यंत मी मस्त भेळ तयार करते मग भेळ खाऊन जारे…! पोरं तर आनंदाने उड्याच भरायला लागले. सगळ्यांनी एकच गल्ला केला. सांगा ना आजोबा सांगा ना आजोबा अरे हो सांगतो. आजोबा सांगू लागले..

खवणी नावाचे एक गाव होते. त्या तिथे जीवाजी नावाचा शेतकरी राहत होता. भरपूर शेती होती मळा होता जिवाजी खूप कष्ट करणारा शेतकरी आपला मळा त्याने सुंदर केला होता. त्याच्याकडे सोन्या आणि तान्या अशी दोन बैलं होती त्याच्यावर जिवाजीचा फार जीव होता जिवाजी म्हातारा झाला आणि मुलगा शेती करायला लागला मुलाचं नाव होतं तानाजी तानाजीला ही शेतीतलं ज्ञान चांगलं होतं. पण थोडासा आळशी होता तेथे काम वेळेवर करावे ही पहिल्या पिढीतली शिकवण तानाजी कडे नव्हतीच त्यामुळे जिवाजीला थोडा राग पण यायचा. अरे शेतीत कामे वेळेवर केली पाहिजेत बाबा. पण तो म्हणायचा करतोय ना त्यापुढे जिवाजी काहीच बोलत नसे. जीवाजीचे दोन बैल ज्या झापेत बांधायचे तो झापा पडला होता आणि जिवाजी रोज तानाजीच्या मागे लागायचा अरे झापा नीट करून घे नवा बांध तो म्हणायचा सध्या खूप काम आहे. दुपारी तो बैलांना झाडाखाली बांधायचा आणि रात्री घराच्या पुढे आलेल्या पत्रात जवळपास वर्षभर हे चालले होते पावसाळ्यात बैलांना पाऊस लागे चिखलात उभं राहावं लागलं उन्हाळ्यात वरून ऊन मारत होतं आणि थंडीत थंडी वाजली. बैल कंटाळले होते पण तानाजीला वेळ नव्हता बैल एकदा असेच झाडाखाली एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले आपला मालक जीवाजी आपल्यावर किती प्रेम करत होता आणि हा मुलगा आपल्याला एक डोक्यावर छप्फर बांधून देत नाही किती दिवस आपण चिखलात मातीत पाण्यात उभे राहायचं बरं ?.. आपण येथून पळून जाऊ. दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही बैल दावं तोडून पळून गेले जिवाजी सकाळी पाहतो तर झाडाखाली बैलं नाहीत शेतातही कुठे दिसेना बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा आवाज सकाळी ऐकल्याशिवाय जिवाजीला चैन पडत नसे. त्याने सगळ्यांना बैल हुडकायला चारी दिशांना पिटाळलं. संध्याकाळपर्यंत बैल कोणालाही सापडले नाहीत. जिवाजींन तानाजीला सांगितलं तानाजी अरे बैलांची सुद्धा काळजी घ्यावी लागते घरातल्या माणसाप्रमाणे तू त्यांची वर्षभर अबदा केलीस.. किती सोसणार मुक जनावर बिचारे… जिवाजी खूप रागावला. तानाजीला खूप वाईट वाटलं खरंच आपण चुकलो त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून मोठे डाम रोऊन घेतले होते भोवताली पट्ट्या लावून तुराट्या बांधून घेतल्या चिखला न लिंपून घेतल्या. गवताच्या पेंढ्या लावून वरच्या बाजूला छप्पर केल जमिनीपासून वर एक फुटावर घेतल्यामुळे ते छान दिसत होत. त्यांन जिवाजीला बोलवून दाखवलं बाबा कसा गोठा चांगला झालाय बघ. बा म्हणाला, पण आता त्याचा उपयोग काय बैल गेला अन झापा केला अशी तुझी गत झाली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिवाजीच्या ओढीन बैल घराकडे परतले. त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकून जीवाची खुश झाला. जिवाजीच्या बायकोन रकमाना त्या बैलांना ओवाळलं. पाणी पाजलं. गुळ अन भाकरी खाऊ घातली आणि बैल नव्या झाप्यात जाऊन उभे राहिले. तानाजीने त्यांना बांधलं. चारा टाकला. पाण्याच्या बादल्या ठेवल्या आणि त्यांन त्या दोन्ही बैलांना अक्षरशः गळ्याला लावले त्यांच्या अंगावर हात फिरवत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नका बाचा जेवढा जीव आहे तेवढाच माझा बी जीव आहे तुमच्यावर… जिवाजी हे लांबून पाहत होता जिवाजीचे गडी तानाजीला म्हणाले मालक आता बैल गेला आणि झापा केला असं करू नका बरं आपल्या बाच जरा ऐकत चला. हो रे बाबांनो चूक झाली माझ्याकडून आता पुन्यांदा अशी चूक होणार नाही.

– – आणि या प्रसंगातून एक म्हण तयार झाली ” बैल गेला अन झापा केला. ” आता आपल्या समीरला पण एक म्हण तयार होईल ना नाना! कोणती रे? तीच ती मगाशीच तुम्ही म्हणालात ना ” पेपर झाला आणि समीर गेला “.. सगळे मोठ्यांना हसायला लागले. तोच आजीने हाक दिली ‘ चला रे भेळ खायला या आत मध्ये ‘ मुले उड्या मारत स्वयंपाक घरात गेली.. भेळेवर ताव मारायला.

© सुश्री शीला पतकी

सोलापूर 

मो. 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments