श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ टॉकीज – सिनेमा… लेखक – भावविभोर चंदू ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

 

 टॉकीज – सिनेमा

सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमा हा प्रसिद्धीच्या चरम सीमेवर पोचला होता. त्या काळी एकल पडदा चित्रपटगृहे होती. त्यांची क्षमता साधारण दोनशे ते सातशे आठशे प्रेक्षक बसतील एवढी असायची.

शहराच्या लोकसंख्येनुसार त्या क्षमतेची चित्रपटगृहे बनविली जात. त्या काळी चित्रपटगृहाला “टॉकीज” म्हणत असत. खरं म्हणजे सिनेमा बोलका झाला तेव्हा त्याला टॉकी (Talky) म्हणजे बोलणारा सिनेमा

म्हणू लागले आणि त्याचाच अपभ्रंश पुढे टॉकीज असा झाला. बोलताना लोक अमक्या टॉकीजला हा सिनेमा लागला, तमक्या टॉकीजला तो सिनेमा लागला असे बोलत असत. चित्रपट हा साधारण सर्वच कुटुंबांचा जिव्हाळ्याचा विषय होता. करमणुकीची इतर साधने उपलब्ध नसताना चित्रपट माध्यमाला अनन्य साधारण महत्व होते.

त्याकाळी सिनेमा बघणे हा एक उत्सव होता. आधीपासूनच त्याची तयारी करावी लागायची. मोठ्या शहरांमध्ये आगाऊ तिकीट विक्री (Advance booking) होत असे परंतु मध्यम किंवा छोट्या शहरांमध्ये ती सोय नव्हती. त्यामुळे एक दीड तास आधीच टॉकीजवर जाऊन तिकिटासाठी रांग लावावी लागायची.

त्या रांगेत चेंगराचेंगरी व्हायची, एवढं करूनही तिकीट मिळेलच याची खात्री नसायची. तिकीट मिळालं तर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. बरीचशी तिकिटे ही काळा बाजार करणाऱ्यांना आधीच दिली जायची.

मग तिकिटे संपली की हे लोकं “दो का पॉंच” “दो का पॉंच” असं हलक्या आवाजात म्हणत गर्दीत फिरायचे, त्यांना पोलिसांची भीती असे. ज्यांना ब्लॅकचे तिकीट घ्यायचे असे, त्या व्यक्तीला तो माणूस लांब आडबाजूला घेऊन जाई आणि गुपचूप तिकीट देऊन पैसे घेई. काही वेळेला पोलीस येऊन या ब्लॅक करणाऱ्यांना

पकडत असत. त्यांच्या जवळची सर्व तिकिटे काढून घेऊन तिथेच त्यांना यथेच्छ चोप देत असत. हा तमाशा बघायला प्रचंड गर्दी होत असे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याने मार खाल्लेला असे तोच दुसऱ्या दिवशी

पुन्हा तिथेच ब्लॅक करताना दिसे. टॉकीजच्या बाहेरील ही गडबड, गोंधळ, प्रचंड मोठी गर्दी, धावपळ हे वातावरण सिनेमा सुरू होण्याआधी तास दोन तास असे. एकदा सर्व लोक आत निघून गेले की, बाहेर सारं कसं शांत शांत होई.

आतला माहौल हा आणखी वेगळा असायचा. आपल्या नंबरच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो की, राजदरबाराच्या सिंहासनावर बसल्याचा “फील” यायचा. अंधार झाला की आपण आपलं अस्तित्वच विसरून जायचो. प्रत्येकजण आपली दुःख, विवंचना बाहेर सोडून आलेला असायचा, त्यामुळे पुढील तीन तास तो फक्त आनंदात डुंबत रहायचा. समोर चालू असलेल्या चित्रपटात तो इतका मग्न व्हायचा की, आपलं घर दार, नातेवाईक हे सगळं विसरून तो त्या चित्रपटाचा एक भाग बनून जायचा.

उशिरा आलेल्या प्रेक्षकांची अंधारात सीट शोधताना गडबड व्हायची. तिकीट चेकर बॅटरी मारून सीट दाखवायचा, पण तिथपर्यंत जाताना कोणाच्या पायावर पाय पडायचा, कोणाच्या डोक्यावर तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवून सीटपर्यंत जावे लागायचे. पण कोणी तक्रार करीत नसत, कारण सर्वजण एकाच वारीचे

वारकरी असत. आपल्या आवडत्या कलाकाराचा सिनेमा बघताना सर्वांचेच भान हरपून जात असे. विशेषतः गाणे चालू असताना वातावरण पूर्णपणे बदलून जात असे. कोणी मोठ्याने गाणं म्हणतंय, कोणी पडद्यावर पैसे फेकतय, काहीजण ग्रुप करून पडद्यासमोर नाचतायत. असं भारावलेलं वातावरण तयार होत असे.

याच पद्धतीने एखादा भावोत्कट प्रसंग सुरू झाला की स्त्री प्रेक्षकांना रडू येत असे, आणि मग ते बघून मुलंही रडायला सुरुवात करत. पुरुषांचे देखील डोळे भरून येत असत. इतके सर्व प्रेक्षक मानसिकरित्या त्या प्रसंगाशी एकरूप होऊन जात असत.

चित्रपटगृहा मध्ये “पिटातला प्रेक्षक” नावाचा एक समूह असे. पडद्यासमोरील पाच सहा रांगांमध्ये ही मंडळी बसत. हे लोक साधारण कमी शिकलेले, मजुरी किंवा तत्सम कामे करणारे थोडेसे असभ्य, बोलण्याचा पोच नसणारे असे असत. चित्रपट चालू असताना विविध कॉमेंट्स करणे, असभ्य भाषेत बोलणे, विनोद झाल्यास मोठ्याने खदाखदा हसणे. असे प्रकार हे लोक करत. तरी देखील हा समूह प्रेक्षकांचा अविभाज्य भाग असे. कारण आपला “सो कॉल्ड” सभ्य आणि पापभिरू प्रेक्षक मनात असूनही काही गोष्टी केवळ आपल्या संस्कारांमुळे बोलू शकत नसे, त्या गोष्टी हा पिटातला प्रेक्षक अगदी उघडपणे बोलत असे. जसे की,

हाणामारीच्या प्रसंगांमध्ये नायक खलनायकाला शोधत येई, खलनायक टेबल खाली बसलेला असे. लगेच आपला पिटातला प्रेक्षक मोठ्याने ओरडे “अरे, तो बघ टेबलाखाली बसलाय, ओढ बाहेर आणि हाण त्याला, तिच्या मायला! “.. हे ऐकल्यावर संपूर्ण प्रेक्षागृह हसत असे. एखाद्या रोमँटिक प्रसंगामध्ये नायक नायिकेला

प्रेमाने जवळ ओढू लागतो त्या बरोबर खालून दोन तीन आवाज “ए, सोड, सोड तिला सगळे बघतायत. ” पुन्हा भला मोठा हशा. अशी सगळी गंमत चाललेली असे.

मध्यंतरामध्ये भाजलेल्या शेंगा, खारे शेंगदाणे, निंबु, मसाला सोडा, चहा इ. गोष्टी थिएटरच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध असत. काही लोक घरून येतानाच खाण्या पिण्याच्या गोष्टी सोबत घेऊन येत. मध्यंतरानंतर सिनेमा सुरू झाला की, शेंगा फोडताना येणारा टरफलांचा आवाज आणि खाणाऱ्या लोकांच्या तोंडाचा आवाज, हे दोन आवाज थिएटरमधील शांततेचा भंग करीत असत.

चित्रपट संपला तरी काही वेळ प्रेक्षकांवर एक प्रकारचा कैफ चढलेला असे. थिएटरमधील सांडलेली शेंगांची टरफल तुडवीत चालताना, एखादी लढाई जिंकून आल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे. बाहेरील

उजेडात आल्यानंतर हळू हळू तो नॉर्मल होत असे.

टी व्ही आणि मोबाईलचे युग आल्यानंतर हा स्वर्गीय आनंद मिळण्याचे दिवस संपले. कारण एकल पडदा थिएटर किंवा टॉकीज हळूहळू बंद पडू लागल्या आणि मल्टिप्लेक्सचा जमाना आला. पण त्या कृत्रिम वातावरणात माझ्या पिढीचा प्रेक्षक रमला नाही. आणि हे सुख हा आनंद त्याच्या हातातून निसटून गेला. आपल्या आयुष्यातील अंधार थिएटरच्या अंधारात मिसळून दोन घटका मनाला आनंद आणि समाधान

मिळवण्याचं सुख आता मिळणार नाही.

शेवटचे एकल पडदा थिएटर धारातीर्थी पडून देखील आता अनेक वर्षे झाली. थिएटरच्या जागी आता

भल्या मोठ्या बिल्डिंग आणि मॉल तयार झालेत. काही थिएटर आजही खंडहर झालेल्या अवस्थेत शेवटच्या घटका मोजतायत. मल्टिप्लेक्स, टी व्ही आणि मोबाईलने आमच्या आख्ख्या पिढीचं सुख आणि समाधान ओरबाडून घेतलंय. आता फक्त जुन्या आठवणी जागवायच्या.

काळ बदललाय हे मान्य आहे.

पण तो जरा जास्तच बदललाय…. असं नाही का वाटत आपल्याला?

लेखक : …भावविभोर, चंदू

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments