श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆
(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)
सगळ्यांना नमस्कार, आज मला या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी आधी सर्व संयोजकांचे आभार मानते. मला हा खूप मोठा माझा एक सन्मान वाटतोय. हा एक खूप छान योग माझ्यासाठी आहे. एकतर माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट यांचं अनेक वर्षांपूर्वी याच व्याख्यानमालेमध्ये भाषण झालं होतं. त्यामुळे ती पण एक माझ्यावरती जबाबदारी आहे. दुसरं म्हणजे या मुक्तांगणच्या खालीच मी मुक्ता इथे बोलतीये. या मुक्तांगणलासुद्धा पु ल देशपांडे यांनी देणगी दिली होती आणि माझं जे पुण्यातील मुक्तांगण आहे ते सुद्धा पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून सुरू झालं. त्यामुळे मला आजच्या या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद वाटतोय.
आज मला बोलायचं की, आजच्या काळात व्यसनमुक्तीची आव्हाने कशी वाढली आहेत त्याबद्दल. त्याविषयीच्या बातम्या टीव्हीमध्ये आपण ऐकत असतो. कोणाला तरी कसं व्यसन लागलं, त्यामुळे त्यांचं जीवन कसं बहकलं, आपल्या ओळखीत कुणी असतं. पेपरमध्ये आपण वाचत असतो की, दारू पिऊन एखाद्या माणसाच्या हातून काय कृत्य झालं. व्यसनामुळे किती प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना असते. अलीकडे असं दिसून येत की, वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी व्यसनाधीनता हा प्रश्नसुद्धा कारणीभूत असतो. असे खूप मनातील सामाजिक बोलायचे ठरवले आहे. बेरोजगारी असेल, गरिबी असेल, डोमेस्टिक व्हायलन्स, असे कितीतरी सामाजिक प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्या मनात येतील आणि त्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी कारणीभूत अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे हा व्यसनाधीनतेचा खूप मोठा एक सामाजिक प्रश्न आहे. याच्या बाबतीत आपण काही करू, असे माझी आई म्हणजे डॉ. अनिता अवचट हीला वाटत होते. ती एक मानसोपचार तज्ञ होती. तेव्हा ती पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होती. सुरुवातीला अगदी असं व्हायचं… म्हणजे अगदी 80 सालाच्याही आधी ती 70 च्या दशकामध्ये काम करायला तिने सुरुवात केली, तेव्हा ज्यांना दारूच्या व्यसनाची समस्या आहे ते पेशंट तिच्याकडे हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी यायचे. कारण मानसोपचारासाठी त्याकाळी वेगळी अशी महाराष्ट्रामध्ये कुठली सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे मग मनोरुग्णालयामध्येच अशा व्यसनाधीन रुग्णांवरती तेव्हा उपचार केले जायचे. तेव्हा साधारण 1983-84 मध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट पूर्ण जगामध्ये खूप मोठी लाट तेव्हा आली. ब्राऊन शुगर हा शब्द खरंतर तेव्हा आपण ऐकलेला होता आणि तेव्हासुद्धा सुरुवातीला असं वाटायचं की श्रीमंतांच्या अति लाडावलेल्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. आपल्या याच्याशी काय संबंध? अशीच साधारण लोकांची प्रतिक्रिया असायची.
तर असं झालं की, माझ्या आई-बाबांच्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. होस्टेलला तो राहायचा आणि त्याला हे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. या मुलाला त्याचे आई-बाबा आमच्याच घरी घेऊन आले. त्याला माझ्या आई-बाबांनी घरीच उपचार दिले आणि या मुलाशी बोलत असताना बाबांना म्हणजे डॉ. अनिल अवचट यांच्या असं लक्षात आलं की, हा प्रश्न आता खूप वाढत चाललेला आहे. मग बाबांनी असं ठरवलं की ह्याच्यावरती काहीतरी माहिती घ्यायची आधी. तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला काम करत होते याच्या बाबतीत. तिथे माझे बाबा गेले, तिथे राहिले. अनेक व्यसनाधीन लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या कुटुंबीयांना भेटले आणि ‘गर्दच्या जाळ्यात’ नावाची एक लेखमाला तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये लिहिली. मग पुढे त्याचं ‘गर्द’ नावाचे पुस्तक प्रकाशित झालं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या आई-बाबांना बोलवून घेतलं आणि ते असं म्हणाले की, “आम्ही जर का काही आर्थिक मदत देऊ केली तर तुम्ही काही याच्यावरती काम कराल का? ”
हे काम करायला पाहिजे याची गरज आई-बाबांच्या लक्षात आलीच होती. कारण ते सगळं लेख वगैरे वाचल्यानंतर खूप लोक आमच्याकडे विचारायला लागले होते की, आमच्या मुलाला व्यसन आहे, आमच्या ओळखीत कोणाला तरी व्यसनी झाला आहे, त्यांच्यावर तुम्ही उपचार करा. एकदा तर असं झालं होतं की, एक वडील एकदा आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाची कुठली तरी एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणून ते मुलांना पुण्यात घेऊन आले आणि त्या मुलाने त्यांना आत्ताच सांगितलं की, ‘मला अमुकअमुक ड्रगचं व्यसन आहे आणि आत्ता मला विड्रॉवल सिम्प्टमचा त्रास होतोय. आता मला हे ड्रग मिळाले नाही तर मी ती एंट्रन्स एक्झाम कशी देऊ? ‘ तर ते वडील आमच्या घरी आई-बाबांना असं विचारायला आले होते की, त्यांना हे ड्रग कुठे मिळेल? म्हणजे ते विकत घेतील आणि या मुलाला देतील. मग तो त्या परीक्षेला ते जाईल. हे सगळं ऐकून माझ्या आई-बाबांना धक्के बसत होते. या प्रसंगावरून त्यांनी पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी जी मदत देऊ केली त्यांच्या देणगीतूनच तेव्हा 29 ऑगस्ट 1986 या दिवशी हॉस्पिटलमधल्याच एका बिल्डिंगमध्ये मुक्तांगणाची स्थापना झाली.
उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये पु ल तेव्हा असं म्हणाले होते की, ‘आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय. तर या केंद्राची भरभराट होवो, अशा शुभेच्छा देणं योग्य होणार नाही? कारण व्यसनमुक्ती केंद्राची भरभराट होणे ही काही चांगली गोष्ट नाहीये. तर मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की, इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. मग या ठीकाणी आपण एक संस्कृतीक केंद्र निर्माण करूया. ‘ खरंच, किती मोठ्या शुभेच्छा होत्या त्या! तेव्हा खरं तर मी कॉलेजमध्ये शिकत होते. मी हा कार्यक्रम एक विद्यार्थिनी म्हणूनच अटेंड करत होते. जी नवीन टीम तयार होत होती त्या सर्वांनाच एक प्रेरणा देण्याचं काम या पू लं च्या शुभेच्छांनी तेव्हा घडत होतं. अशा तऱ्हेने मुक्तांगणची सुरुवात झाली.
मी म्हटलं तसं की तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. त्यामुळे माझ्या आई-बाबांनी तेव्हा असं ठरवलं की इथे उपचार घेण्यासाठी जे लोक येतील आपण त्यांच्याकडूनच शिकून इथली जी उपचार पद्धती आहे ती तयार करूया आणि मग तेव्हा जे रुग्ण यायला लागले त्यांच्याशी माझे आई-बाबा चर्चा करायचे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे उपचार इथे मिळाले तर तुम्हाला बरं वाटेल, तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? अशा पद्धतीने काम करत गेल्यामुळे या सगळ्याचाच एक वेगळाच फायदा झाला. त्यामुळे मुक्तांगणमध्ये आम्ही कुठल्याही बाहेरच्या देशातल्या उपचार पद्धतीचं अनुकरण केलेलं नाहीये, तर मुक्तांगण मधले जे उपचार आहेत ते पूर्णपणे आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. इथे येणाऱ्या पेशंटना आम्ही रुग्णमित्र म्हणतो. त्यामुळे इथे जे रुग्णमित्र येतात त्यांना खूप आपलेपणा वाटतो. मुक्तांगणमध्ये खूप बरं वाटतं सगळ्यांना. इथे जे उपचार केले जातात ते आम्ही कुठल्यानाकुठल्या पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित ठेवतो. सर्व धर्मांचे सण साजरे करतो, पण कुठल्याही धर्माचा बडेजाव वगैरे किंवा मूर्तिपूजा या गोष्टी मुक्तांगणामध्ये केल्या जात नाही. पण सण मात्र सर्व धर्मांचे साजरे केले जातात. त्यांची आम्ही संस्कृतीशी अशी काहीतरी सांगड घालतो की व्यसनमुक्तीचा संदेश त्यातून देता येईल. समजा दसरा असेल तर आम्ही व्यसनाच्या रावणाचे दहन करतो, वगैरे. असं काही ना काही तरी संस्कृतीशी रिलेटेड केलं जातं. अशा पद्धतीने मुक्तांगण हे जवळजवळ 38-39 वर्षांपासून कार्यरत आहे.
मुक्तांगणमध्ये साधारणपणे चार पातळ्यांवरती काम केलं जातं. सर्वात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे ज्यांना व्यसनाची समस्या आहे अशा लोकांना उपचार देण्यासाठी आम्ही 30 दिवस म्हणजे एक महिनाभर ऍडमिट करून घेतो. पूर्णपणे स्ट्रक्चरर्ड अशी एक उपचार पद्धती त्यांच्यासाठी तयार केली आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक… हो, कुटुंबालाही सहभागी करून घेतलं जातं. अशा प्रकारे ज्याला आपण होलिसस्टिक म्हणतो तसे परिपूर्ण असे उपचार त्यांच्यामध्ये दिले जातात. तीस दिवसात खरंच त्याला बरं वाटतं का? काहींना वाटतं काहींना वाटत नाही त्यांच्यासाठी तीस दिवसानंतरसुद्धा पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. काही लोकांच्या बाबतीत असं असतं की, ते कुटुंबातनं बाहेर पडलेले असतात किंवा नोकरी गेलेली असते. कोणीच त्यांना विचारत नसतं. तर असे जे आमचे रुग्णमित्र आहेत ते दीर्घकाळसुद्धा राहू शकतात. मुक्तांगणमध्ये राहून तिथे काम करतात किंवा बाहेर नोकरी बघतात आणि परत रहायला येतात. अशाप्रकारे उपचारानंतरसुद्धा ते आमच्या संपर्कात असतात. त्यासाठी महाराष्ट्रात 24 ठिकाणी मुक्तांगणांची संपर्क केंद्र आहेत, पाठपुरावा केंद्र आहेत. म्हणजे डिस्चार्ज नंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पुनर्वसनाला मदत केली जाते. पुनर्वसनानंतरचं आमचं तिसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे समाजामध्ये जनजागृती करणे. सगळ्यांनाच एक वाक्य माहिती आहे की, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ एखादा आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा सोपं आहे की तो आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. म्हणून मग वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, कारखाने अशा ठीकठिकाणी आमची एक टीमच आहे की ती तिथे जाऊन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीचं काम करते. व्यसन लागू नये म्हणून काय करायचं याबाबतीत मुलांशी संवाद साधला जातो, पालकांशी संवाद साधला जातो. चौथं महत्त्वाचं काम म्हणजे ज्यांना या विषयात काम करायचे आहे अशा लोकांना प्रशिक्षण देणं. त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रेनिंग सेंटर पण आहे. तर *उपचार, पुनर्वसन, जनजागृती आणि प्रशिक्षण या चार पातळ्यांवरती मुक्तांगणमध्ये काम केलं जातं. *
– क्रमशः भाग पहिला
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान माहिती दिली आहे