डॉ गोपाळकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – ३  ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

(२) समाधानाचे यशप्राप्ती मधील महत्व – (मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान शोधणे सध्या लहानपणापासून होणाऱ्या संस्काराच्या एकदम विरुद्ध आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार सर्वांनाच जरा अवघड जातो.)—- इथून पुढे 

आपण अतिशय चतुरपणे यश आणि यशाचा आनंद मिळवण्याचे समर्थन करत राहतो. पण यशाच्या मागे धावल्याने कर्म मार्गात भय, चिंता, ताणाचे काटे आणि शेवटी अपयश पदरी पडणार असेल तर अशा समर्थनात कसलीही चतुराई नाही. मिळणाऱ्या यशापयशाचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केल्यास मनुष्यास हळूहळू त्याची उपरती होऊ लागते. मग यशप्राप्तीसाठी तुकाराम महाराजांच्या बोलांची महती पटू लागते. परमेश्वराकडून मिळालेल्या गोष्टीतून आयुष्यात समाधानाचा संतोष इतका यावा की त्यानंतर यशाच्या आनंदाची गरज पडू नये. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंती तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान.”

३) समाधानाचा शोध – 

घडून गेलेल्या गोष्टीत समाधान दडलेले असतेच. फक्त ते आपल्याला दिसत नाही. असे समाधान आपल्याला शोधावे लागते. मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदींमध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. मनुष्याने त्या पैकी वाईट बाजू पाहिल्या तर आपल्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी खराब आहेत असे त्यास वाटू लागते. अशा खराब गोष्टी स्वीकारायला मनुष्याचे मन तयार होत नाही. त्यातून असमाधानाची भावना निर्माण होते. याउलट मनुष्याने आपल्या वाट्याला आलेल्या या सर्व गोष्टीमधील केवळ चांगली बाजू पाहिली तर आपल्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी उत्तम आहेत असे त्यास वाटू लागते. अशा चांगल्या गोष्टी स्वीकारायला मनुष्याचे मन सहज तयार होत नाही. त्यातून समाधानाची भावना निर्माण होते. मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदींमध्ये चांगल्या आणि वाईट पैकी कुठली बाजू पाहायची याचे संपूर्ण स्वातंत्र्य मनुष्यास असते. गरज असते ती जागरुकतेची. आयुष्यातील नकारात्मकता पाहणे हा अपयशाकडे घेऊन जाणारा निर्बुद्धपणा आहे. या बाबत जागरूकता निर्माण झाल्यावर मनुष्य यशाकडे घेऊन जाणाऱ्या सकारात्मकतेचा कास धरतो.

परिणामांमध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधता येते. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टीमध्ये खात्रीपूर्वक चांगले आणि वाईट परिणाम शोधता येतात. जी गोष्ट अजून घडलेलीच नाही त्यात चांगले वाईट परिणाम शोधणे अवघड असते. कुणी तसा प्रयत्न केला तरी सर्व गणिते जर तर मध्ये असल्याने त्याचा सुख दुःखावर फारसा परिणाम होत नाही. भविष्यात घडू शकणाऱ्या चांगली गोष्टींचा कुणी विचार करत बसले तरी अशा शेख चिल्ली विचारामधील फोलपणा बुद्धीला लगेच जाणवतो.

त्यामुळे सत्ता, संपत्ती, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध या बाबतीत जे यश आधीच मिळालेले आहे त्यामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधता येते. पण जी सत्ता, संपत्ती, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीतील जे यश अजून मिळालेच नाही त्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधणे कठीण आहे.

सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा मनावर होणारा परिणाम – 

मनुष्याच्या मनाची आनंदी किंवा दुःखी अवस्था हा केवळ त्याच्या विचारांचा खेळ आहे. प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला काही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था आणि यश येते. यापैकी काहीही परिपूर्ण नसते. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. शोधले तर अगदी रामाच्या चरित्रात सुद्धा नकारात्मक गोष्टी सापडतात. शोधले तर रावणाच्या चरित्रात सुद्धा काही सकारात्मक गोष्टी सापडतात. सामान्य मनुष्याचे चरित्र तर सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचे मिश्रण असते. विचार मनुष्याला आनंदी किंवा दुःखी कसे करतात हे एका नवरा बायकोच्या उदाहरणातून समजून घेऊ. जर एका बायकोने आपल्या नवऱ्यातील सर्व सद् गुण पाहायचे ठरवले तर थोड्या वेळातच तिला असे जाणवेल की तिला अगदी देवासारखा नवरा मिळालेला आहे. ज्या स्त्रीला असे मनापासून वाटेल की आपल्याला खूप चांगला नवरा मिळालेला आहे ती श्री आनंदी होईल. देवासारखा चांगला नवरा मिळाला. आता याच्यापेक्षा आणखी चांगले काय मिळणार? या विचाराने ती स्त्री समाधानी होईल. नवऱ्यातील सकारात्मक गोष्टी पाहिल्याने म्हणजे सकारात्मक विचार केल्याने तिचे मन आनंदी आणि समाधानी झाले. अशाच प्रकारे आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनुष्याचे मन आनंदी आणि समाधानी होते. आता त्या स्त्रीने त्याच नवऱ्यातले सगळे दुर्गुण पाहायला सुरुवात केली. नवऱ्याचे सगळे दुर्गुण समोर आल्यावर काही काळातच तिला जाणवले की आपल्याला अतिशय खराब नवरा मिळालेला आहे. अशी स्त्री दुःखी आणि असमाधानी होणार. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनुष्याचे मन दुखी आणि असमाधानी होते.

प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. यातले काय पाहायचे आहे याचा पर्यायही मनुष्यासमोर उपलब्ध असतो. तुकाराम महाराज म्हणतात की परमेश्वराने आपल्याला दिलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहून स्वतःला आतून इतके आनंदी आणि समाधानी करा की बाहेरच्या जगातून भय, चिंता, ताण आणि एकाग्रतेचा नाश करणाऱ्या अपेक्षा निर्माणच होणार नाहीत. मग अशा समाधानातून उत्पन्न होणाऱ्या तीव्र एकाग्रतेतून उच्च दर्जाचे काम वेगाने आणि सातत्याने होऊ लागेल. अशा कामाच्या संचयातून असाधारण यश मिळते.

यश संकलनाच्या अपेक्षा नष्ट झाल्या तर मनुष्याची कर्म प्रेरणा संपून तो आळशी आणि निष्क्रिय होईल अशी भीती काही लोकांना वाटते. पण याच्या अगदी उलटे घडते. संकलनाच्या अपेक्षेच्या नशासोबत भय-चिंतेचा नाश होतो. भय-चिंतेच्या नाशासोबत मनुष्याला तीव्र एकाग्रता प्राप्त होते. तीव्र एकाग्रतेतून उत्तम दर्जाचे काम वेगात घडू लागले की सर्व वेळापत्रक वेळेआधी पूर्ण होऊ लागतात. त्यातून येते, जमतंय, होते अशी भावना वाढीला लागते. ही भावना अतिशय उत्साहवर्धक असते. अशा उत्साहामुळे कामात सहज सातत्य निर्माण होते. याउलट यशाच्या अपेक्षा ठेऊन काम करत असताना अपयश मिळण्याच्या शक्यता समोर दिसू लागल्यास मनुष्य हातोत्साही होतो. त्यातून कामातील सातत्य आपोआप नष्ट होते. अशा प्रकारे यश संकलनाच्या अपेक्षा ठेवल्यास कामात सातत्य निर्माण होण्याऐवजी कामातील सातत्य नष्ट होते. या उलट यश संकलनाच्या अपेक्षा नष्ट झाल्यास कामातील सातत्य नष्ट होण्याऐवजी कामात सातत्य निर्माण होते.

आयुष्यातील सकारात्मक गोष्टी पाहून मनुष्याने मन प्रसन्न केले की त्याला बाहेरच्या जगातून यशाचा आनंद शोधायची आवश्यकता भासत नाही. तोच मनुष्य त्याच्या यशाच्या आनंदाच्या अपेक्षेवर नियंत्रण ठेऊ शकतो. त्याचीच भीती चिंता कमी राहते. तोच तीव्र एकाग्रतेने सातत्याने काम करू शकतो. त्यालाच असाधारण यशाची प्राप्ती होते. एखाद्या मनुष्याला असाधारण यश वारंवार मिळू लागल्यास सामान्य लोक अशा मनुष्यास असाधारण सिद्ध व्यक्ती समजू लागतात.

म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या आणखी एका अभंगात म्हणतात “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.” 

काही उथळ विचार करणाऱ्या लोकांना हा अभंग अतिशय नकारात्मक आणि प्रगतीच्या आड येणारा आहे असे वाटते. पण तुकाराम महाराजांनी या अभंगातून असाधारण यश मिळवण्याचा साधा सोपा मार्ग सांगितला आहे.

मनुष्य योनीत भानावर नसलेल्या मनुष्याची विकसित बुद्धीच त्याची सर्वात मोठी शत्रू ठरू शकते. मनुष्य सोडून इतर जीवांमध्ये बुद्धीचा फारसा विकास झालेला नसल्याने त्यांच्यात फारसे यश संकलन पण होत नाही आणि यश संकलनातून निर्माण होणारे अहंकारशुद्ध निर्माण होत नाहीत. ते केवळ शरीर हा एकमेव अहंकार घेऊन जगत असतात. जीवात्मा मनुष्येतर प्राण्याच्या रुपाने जन्माला येतो, शरीरात आत्मभाव ठेवून आयुष्यभर शरीर संगोपन आणि प्रजननाच्या कामात स्वतःला जुंपून घेतो आणि अशा अज्ञानी अवस्तेतच एक दिवस शरीर सोडून पुढील प्रवासाला निघून जातो. पण अशा योनीत बुद्धीच्या अभावामुळे त्यांना शरीराच्या पलीकडे असलेल्या आपल्या खऱ्या अस्तित्वाचे म्हणजे अनादी अनंत आत्म्याचे भान निर्माण होणे केवळ अशक्य असते. उत्क्रांतीच्या काळात संकलनाच्या गरजेपोटी विकसित झालेल्या मनुष्य बुद्धीमुळेच जीवात्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख करून घेणे शक्य असते. मनुष्याला आपल्या अस्तित्वाचे यथार्थ स्वरूप समजले आणि त्याच्या बुद्धीने ते स्वीकारून त्याप्रमाणे आचरण सुरू केले की जीवात्म्याच्या मुक्तीचा मार्ग खुला होतो. असा मनुष्य तीव्र एकाग्रतेच्या जोरावर भौतिक जीवनात सुद्धा असाधारण यश मिळवतो. म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ समजला जातो.

वहिल्या उद्वेग दुःखची केवळ। 

भोगणे ते फळ संचिताचे।।

मनुष्य प्रयत्नपूर्वक प्रकृती दत्त शरीर संगोपन आणि बुद्धी दत्त यश संकलन कर्म करतो. त्याची चांगले वाईट फळे जमा होत जाते. ज्याप्रमाणे एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय त्या गुन्ह्याचा दोष नष्ट होत नाही त्याप्रमाणे संचितकर्माची चांगले वाईट फळे भोगल्याशिवाय ते संचित कर्म नष्ट होत नाही. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती ही आपल्याच कर्माचे फळ असते. मनुष्य तितक्या लवकर तिचा स्वीकार करेल तितक्या लवकर ते कर्मफळ भोगून कर्म नष्ट करता येते.

मनुष्याच्या वाट्याला येणाऱ्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, आदी गोष्टी या त्याच्या पूर्व आयुष्यातील संचित कर्माचे फळ असतात. मनुष्याला ही संचित कर्मांची फळे भोगूनच ती करणे नष्ट करावी लागतात. आपल्याच कर्माचे फळ आहे याचा विचार करून मनुष्याला आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, आदी सोबत निभावून न्यावे लागते. अशा वेळी प्राप्त परिस्थितीतील फक्त नकारात्मक गोष्टीबद्दल विचार करून उद्वेग निर्माण करून घेतल्यास केवळ दुःख पदरी पडते. त्यापेक्षा प्रकृती आणि बुद्धीच्या प्रभावामुळे घडलेल्या आपल्याच संचित कर्माचे प्राप्त परिस्थिती रुपी फळ भोगून नष्ट करणे अपरिहार्यता आहे हा विचार सुज्ञपणाचा ठरतो. तुकाराम महाराज सांगतात की अशा विचारामुळे प्राप्त परिस्थिती स्वीकारणे सोपे जाते. मनातील उद्वेग आणि दुःख कमी होतात.

तुका म्हणे घालू तयावर भार। 

वाहू हा संसार देवापायी।।

कुठलीही प्रजाती ही परमेश्वराच्या शक्तीचे सृजन आहे. परमेश्वरी शक्ती आपल्या सृजनाचे काही काळ तरी संवर्धन करू इच्छिते. ही परमेश्वरी शक्ती कुठल्याही प्रजातीच्या संवर्धनाचे कार्य त्या प्रजातीतील जीवां कडूनच करून घेते. परमेश्वरी शक्तीच्या प्रेरणेतून प्रत्येक जीवामध्ये शरीर संगोपन आणि प्रजनन करणारी प्रकृती स्थापित केली गेलेली असते. प्रजातीच्या संवर्धनासाठी ही प्रत्येक जीवाची प्रकृती त्या जिवा मार्फत शरीरसंगोपण आणि प्रजननाचे काम करून घेते. इतर प्राण्यांच्या विपरीत मनुष्यामध्ये निर्माण झालेली बुद्धी ही याच प्रकृतीचे काम सोपे व्हावे म्हणून सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध रुपी यशा संकलनाचे कार्य करत असते. म्हणजे मनुष्य बुद्धीच्या आदेशाने काम करतो, बुद्धी प्रकृतीसाठी काम करते आणि प्रकृती परमेश्वराच्या शक्तीसाठी काम करते. याचा अर्थ असा होतो की मनुष्य ईश्वरी शक्तीच्या प्रेरणेने काम करतो. मनुष्याच्या प्रकृतीदत्त वा बुद्धीदत्त संसार कार्यामागे तो स्वतः नाहीच. सृजन संवर्धनाच्या एका मोठ्या योजनेचा तो एक छोटासा भाग आहे. परमेश्वरी शक्तीने तिचे सृजन संवर्धित करण्यासाठी केलेला खटाटोप आहे. मग यश किंवा अपयश याचा भार कुणी मनुष्यावर कसा असू शकेल? मनुष्याने स्वतः तरी या यशापयशाला जबाबदार का धरावे? सुज्ञ मनुष्याने देवासाठी चाललेल्या आपल्या संसारकार्याच्या यशापयशाचा पूर्ण भार देवावर टाकून निर्भय आणि निश्चिंत व्हावे. या निर्भय आणि निश्चिंत अवस्थेतून निर्माण होणाऱ्या एकाग्रतेचा उपयोग करून आपले दैनंदिन काम समर्थपणे पूर्ण करावे. उगाच स्वतःकडे मोठेपणा घेत कामाच्या यशा अपयशाची जबाबदारी स्वीकारू नये. यशाची जबाबदारी स्वीकारली तर त्यातून निर्माण होणारी भय-चिंता ही एकाग्रतेचा नाश करून मनुष्याचे प्रकृतीदत्त व बुद्धिदत्त काम खराबच करणार आहे. हा एक प्रकारे दैवी योजनेच्या विरुद्ध अपयशाकडे घेऊन जाणारा आत्मघातच ठरेल.

– समाप्त –

© डॉ गोपाळकृष्ण गावडे

(वंध्यत्वनिवारण आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ)

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments