डॉ गोपाळकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – २  ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

(या भागामुळे परिस्थितीचे पूर्ण आकलन करून संकलनासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यामध्ये निर्माण झाली. या क्षमतेला बुद्धी असे म्हटले गेले. मनुष्यामध्ये बुद्धीचे मुख्य कार्य प्रकृतीदत्त कर्तव्य सोपे व्हावे म्हणून गोष्टींचे संकलन करणे आहे.) – इथून पुढे —- 

विचार करू शकणाऱ्या मेंदूच्या या नव्या भागामुळे मनुष्याला लिंबिक सिस्टिम (Lymbic system) मधून निर्माण होणाऱ्या प्रकृतीच्या मूलभूत अंतः प्रेरणा म्हणजे basic Survival instinct च्या वरती जाऊन वागण्याचे थोडे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे कुठल्याही कामाची कर्मप्रेरण ठरवण्याचा अधिकारी मनुष्याला मिळाला. अर्थात एका पॉईंट नंतर शरीर रक्षणासाठी मनुष्याला प्रकृतीदत्त कर्तव्य करावेच लागते. अन्यथा प्रकृती तहान, भूक, आदीची तीव्रता वाढवत जाते. एका पॉईंटला मनुष्य इतका व्याकुळ होतो की त्याला प्रकृतीदत्त कर्तव्य करावेच लागतात.

योगाच्या भाषेत आपण लिंबिक सिस्टिम (Lymbic system) ला आपण आज्ञाचक्र म्हटले तर या नियोकॉर्टेक्स (Neocortex) ला सहस्त्रार चक्र असे म्हणता येईल.

हळूहळू बुद्धीच्या विकासासोबत संकलित केल्या जाणाऱ्या गोष्टींचे स्वरूप बदलत गेले. अन्नाच्या संकलनापासून सुरू झालेला प्रवास आज सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध संकलनापर्यंत पोहचला आहे. या सहा गोष्टीच्या संकलनालाच आज यश असे म्हणतात. असे यश जमा झाल्यास भविष्य सुरक्षित झाल्याची सुखद भावना मनुष्यामध्ये निर्माण होते. शरीर संगोपन अथवा यशसंकलन करताना आपण अनेक भूमिका किंवा रोल स्वीकारतो.

कुठल्याही रोल (उदा डॉक्टर, नवरा, वडील, इत्यादी) च्या यशापयशानुसार त्या रोल बद्दल आपल्या मनात स्वतःचीच एक प्रतिमा तयार होते. डॉक्टर म्हणून, नवरा म्हणून किंवा बाप म्हणून मी कसा आहे? याबाबत आत्मपरीक्षण करून अशी प्रतिमा तयार होते. या प्रतिमेच्या आकाराला अहं आकार अर्थात अहंकार असे म्हणतात. जसे मनुष्याच्या आयुष्यात यश संकलित होत जाते तसे त्याचे अहंकार मोठे होऊ लागतात. नोकरी लागत नसलेला एखादा नवीन इंजिनीयर कंपनीत लागल्यावर कुठल्याही पगारावर काम करायला तयार असतो. पण हळूहळू तो काम शिकतो आणि कंपनीला त्याच्या सेवेचा फायदा होऊ लागतो. त्याच्या कामाची त्याला वरिष्ठांकडून वारंवार शाब्बासकी मिळू मिळते. मग उपयुक्त इंजिनीयर म्हणून त्याची स्वतःच्या मनातील प्रतिमा वाढू लागते. या वाढलेल्या अहंकाराच्या प्रमाणात आपल्याला पगारवाढ, बढती आणि मानसन्मान मिळावा अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. अशा प्रकारे अहंकार वाढल्यावर मनुष्याला आपल्या वाढलेल्या अहंकाराच्या प्रमाणात यश हवे असते. अशात स्पर्धाभाव हा अहंकाराचा मूळ स्वभाव असतो. आम्ही दोघे एकच वेळी नोकरीला लागलो असताना त्याला इतकी पगारवाढ आणि मला इतकीच पगारवाढ? अशी स्पर्धा लागते. स्पर्धा जिंकल्यास अहंकाराला सुखावतो. उलट स्पर्धेत अपयश पदरी आल्यास अहंकार दुखावतो. या सगळ्यात यशाच्या संकलनाचा मूळ उद्देश्य काय होता हे मनुष्य सोईस्कर रित्या विसरून जातो. आता मनुष्य केवळ स्पर्धाभावाने यश संकलन करू लागतो. अशा यश संकलनाला कुठल्याही वरच्या मर्यादा नसतात. यश संकलनाच्या मूळ उद्देश्याचे भान हरपलेल्या माणसामध्ये स्पर्धाभावातून यश संकलन आणि यश संकलनातून अहंकार वाढणे हे चक्र चालू राहते. वाढत्या अहंकारासोबत यश संकलनाच्या अपेक्षा हळूहळू वाढत जाऊन शेवटी त्या मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांना ओलांडून पुढे जातात. अशा आवाक्या बाहेरच्या यशाच्या अपेक्षांमधून अपयशाचे भय आणि कर्म सिद्धीची चिंता निर्माण होते. तणाव निर्माण करणाऱ्या या भय-चिंतेचे प्राथमिकतेने निवारण करण्यासाठी चित्त सतत तिकडेच आकर्षित होते. मनुष्याच्या दैनंदिन कामातील एकाग्रतेचा नाश होऊन कर्महानी करते. काम खराब झाल्याने मनासारखे यश मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. मनाविरुद्ध घडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मनाची जी हबलता आणि असहाय्य अवस्था निर्माण होते त्याला ताण म्हणतात. मनुष्याच्या दैनंदिन कामाचा दर्जा, वेग आणि सातत्य ढासळल्याने त्यामुळे असा मनुष्य अपयशाचा धनी होतो.

अपयश मिळाले की मनुष्य दुःखी होतो. दुःखी झालेला मनुष्य सुख समाधान शोधण्यासाठी बाहेरच्या जगाकडे पाहू लागतो. बाहेरच्या जगातून केवळ यश या संकलनातून सुख मिळते. तसे संस्कार मनुष्याच्या मनावर लहानपणापासून झालेले असतात. मनुष्याला जितके मोठे दुःख होईल मनुष्य तितके मोठ्या यशाची तो अपेक्षा करू लागतो. अनेकदा असे अपेक्षित यश तात्कालिक मानसिक आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मोठे असते. असे यश मिळण्यास आपण लायक आहोत असे दर्शवण्यासाठी अहंकारात जाणिवपूर्वक हवा भरली जाते. यातली तफावत बुद्धीला जाणवल्यावर ती अशी अवास्तव अपेक्षा स्वीकारत नाही. क्षमतांचे अंथरुण पाहून अपेक्षांचे हातपाय पसरावे असा सल्ला बुद्धी अहंकाराला देते. बुद्धीने एखादी अपेक्षा स्वीकारली नाही तर ती पूर्ण करण्यासाठी कधीही काम होत नाही. अहंकाराची अवस्था अगतिक होते. अशा अगतिक अवस्थेत अहंकार अप्रामाणिक होण्याचा निर्णय घेतात. आपले क्षमतांचे अंथरुण मोठे असल्याचा भास निर्माण करतात. बुद्धीने ऐकले नाही तर थयथयाट करून मनात ताण उत्पन्न करतात. त्याला कंटाळून एकदा बुद्धीने अहंकाराच्या मोठे यश मिळवण्याच्या अपेक्षेचे समर्थन केले की मग त्यावर काम चालू होते. पण चालू क्षमता आणि अपेक्षांमधील तफावत बुद्धीला वारंवार जाणवत राहतो. अपेक्षित मोठे यश चालू क्षमतांनी मिळणार नाही अशी परिस्थिती बुद्धीसमोर आल्यास अपयशाचे भय आणि कर्मसिद्धीची चिंता आणखी मोठी होते. त्यातून एकाग्रतेचा आणखी नाश होतो. एकाग्रता नष्ट झाल्यास कर्मनाश होऊन आणखी मोठे अपयश पदरी पडते.

अपयशातून मोठे दुःख, अशा दुःखी मनातून आनंदाची मोठी अपेक्षा, आनंदाच्या मोठ्या अपेक्षेतून क्षमतेपेक्षा मोठ्या यशाची अपेक्षा, अवास्तव यशाच्या अपेक्षांच्या समर्थनार्थ अहंकारात हवा भरली जाणे, अवास्तव अपेक्षांचे सर्मथन झाल्यावर भय-चिंता, भय-चिंतेमुळे एकाग्रतेचा नाश, एकाग्रतेच्या नाशातून कर्मनाश, कर्मनाशातून अपयश आणि अपयशातून आणखी मोठे दुःख. हे दुष्टचक्र फिरत राहून मनुष्य पूर्णपणे रसातळाला जातो.

अशा दारूण अवस्थेत मनुष्याची एकाग्रता आणि मनस्थिती इतकी खराब असते की त्याला त्याला यश संकलनाच्या मूळ उद्देशाचे भान राहणे जवळपास अशक्य असते.

हे दुष्टचक्र तोडण्याचा दोन उपाय आहेत.

१) मनुष्याने उपाय करून स्वतःला आतून इतके आनंदी करावे की बाह्य जगातून मिळणाऱ्या यशापयशाचा त्याच्या मनावर कमीत कमी काही परिणाम व्हावा. मनुष्य आतून आनंदाने इतका तृप्त व्हावा की बाहेरून यशाचा आनंद मिळवण्याची त्याला गरजच वाटू नये. मग हळूहळू अपयशाची भिती कमी होऊन मनस्थिती आणि एकाग्रता सुधारत जाते.

२) मनस्थिती जागेवर येऊ लागल्यावर आपल्या अस्तित्वाच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यावा. मग शरीर संगोपन करणारी प्रकृती आणि यश संकलन करणाऱ्या बुद्धीच्या निर्मितीचा मूळ उद्देश्य तटस्थपणे समजून घ्यावा. यश संकलनाच्या मूळ उद्देश्याचे सतत स्मरण ठेऊन स्वतःच्या यश मिळवण्याच्या अपेक्षांवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवणे.

स्वतःला आतून आनंदी कसे करावे?

तुकाराम महाराज ११९१ व्या अभंगातून त्याचे निरूपण करतात.

मनुष्याची दुःखी मनस्थिती त्याला जय वरील दुष्ट चक्रात खेचून घेत असेल तर मनुष्याची आनंदी मनस्थितीच त्याला या दुष्ट चक्रातून बाहेर काढू शकते. मनुष्याने स्वतःला आनंदी अवस्थेत कसे न्यावे हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तुकाराम महाराज देतात.

मनुष्याला दोन प्रकारचे सुख-दुःख भोगावे लागतात.

१) भविष्यात यश मिळवण्यासाठी कर्ममार्गावर चालताना वर्तमानात मिळणारे सुखदुःख – सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीत आपल्या यशाच्या अपेक्षा असतात. असे इच्छीत यश मिळवण्याच्या मार्गावर चालताना अमनुष्याला सुखदुःख मिळते. अपेक्षित यश अजून मिळालेले नसते. भविष्यात ते मिळू शकते. असे यश मिळणे केवळ प्रयत्नावर अवलंबून नसते. प्रयत्न दैव आणि काळ तिन्ही गोष्टी जुळून आल्यावर असे यश मिळते. त्यामुळे भविष्यातील यशप्राप्ती बाबत आणि म्हणून त्यातून मिळणाऱ्या सुखाबाबत अनिश्चितता असते. सीमित काळात सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचे नियोजन केले जाते. मोठ्या कार्याचे तुकडे करून रोज किती काम करायचे हे ठरवले जाते. त्यातून वेळापत्रक तयार होते. वेळापत्रक पूर्ण होत असेल तर मनुष्याला इच्छित यशप्राप्तीची खात्री वाटू लागते आणि ते आनंदी होतो. वेळापत्रक कोलमडले तर मनुष्याला इच्छित यशप्राप्तीची होणार नाही असे वाटू लागते. मग तो आनंदी होतो.

२) भूतकाळात प्राप्त झालेल्या यशप्राप्तीचे वर्तमानात होणारे सुखदुःख – सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीत आपल्या यशाच्या अपेक्षा असतात.

हे आधीच प्राप्त झालेल्या यशाचे सुख-दुःख असते. येथे प्रयत्न, दैव आणि काळ आपले काम आधीच करून बसलेले असतात. त्यामुळे येथे कसलीही अनिश्चितता नसते. प्राप्त झालेले यश अपेक्षे प्रमाणे वा त्यापेक्षा जास्त असेल तर ते सुखकारक ठरते. प्राप्त झालेले यश अपेक्षेपेक्षा कमी असेल तर ते दुःखास कारणीभूत ठरते.

दोन्ही सुख-दुःख हे त्या मनुष्याच्या अपेक्षांना सापेक्ष असतात. यापैकी भविष्यातील यशापयशाचा शक्यतेने निर्माण होणाऱ्या सुखदुःखावर मनुष्याचे फारसे नियंत्रण नसते. मनुष्याच्या प्रयत्ना सोबत दैव आणि काळ असे यश मिळण्यासाठी कारणीभूत असते. त्यामुळे त्यात एक अनिश्चितता असते. परंतु भूतकाळतील यशापयश ही घडून गेलेली घटना असते. त्यात एक निश्चितता असते.

भूतकाळात मिळालेले यशाविषयी मनुष्याची भावना आणि भविष्यकाळात मिळू घातलेले यश यात वरवर काही संबंध जाणवत नसला तरी त्यात अगदी जवळचा संबंध असतो. भूतकाळात मिळालेले यश मनुष्याच्या अपेक्षांना सापेक्ष असल्याने ते अपेक्षेपेक्षा मोठे असेल तरच बुद्धीकडून यश म्हणून स्वीकारले जाते. मिळालेल्या यशाचा बुद्धीकडून संपूर्ण स्वीकार होण्याला समाधान (सम – संपूर्ण, अधान – धरण करणे किंवा स्वीकारणे) असे म्हणतात. प्राप्त यशा बद्दल जो पर्यंत मनात समाधान निर्माण झालेले असेल तो पर्यंत आणखी यश मिळवण्याची अपेक्षा तिथे जन्म घेत नाही. अशा अवस्थेत जर यशासाठी काम ही कर्म प्रेरणा त्यागून सृजनाच्या आनंदासाठी काम किंवा परमेश्वरी योजनेसाठी काम अशा कल्याणकारी कर्म प्रेरणा शोधल्या तर मनुष्य अतिशय निर्भय आणि निश्चिंतपणे आपले काम करू शकतो. अशा अवस्थेत अपयशाचे भय आणि कर्मसिद्धीची चिंता नसल्याने मन अतिशय एकाग्रपणे सृजन करते. या एकाग्रतेतून उत्तम दर्जाचे सृजन वेगात होऊ लागते. आपले काम आपल्याला चांगले जमते आहे हा विचार मनुष्याच्या मनात कामाचा उत्साह वाढवतो. या उत्साहातून कामात सातत्य साधले जाते. उत्तम दर्जाचे काम वेगात आणि सातत्याने होऊ लागले की कामाचा डोंगर उभा राहतो. त्यातून मनुष्याला असाधारण यश मिळते. अशा प्रकारे भूतकाळात मिळालेल्या यशाबद्दल समाधान असेल तर भविष्यकाळात असाधारण यश मिळते. या उलट भूतकाळात मिळालेल्या यशाबद्दल निर्माण झालेल्या असमाधानातून मोठ्या यशाची अपेक्षा, अपयशाची भिती, कर्मसिद्धीची चिंता, चित्तविक्षेप, कर्मनाश आणि अपयश निर्माण होते.

मनुष्य आयुष्यभर आनंदाच्या मागे धावत असतो. मनुष्याला दोन प्रकारचे आनंद मिळू शकतात.

१) यशाचा आनंद – यश मिळवण्याचा बाह्य आनंद (success pleasure)

२) समाधानाचा संतोष – मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान उत्पन्न होऊन निर्माण झालेला आंतरिक आनंद. यालाच समाधानाचा संतोष किंवा Joy of contentment असे म्हणतात.

[समाधान = सम् (पूर्णपणे) + आधान (धारण करणे/स्वीकारणे)]

[संतोष = सम् (पूर्णपणे) + तुष् (तृप्त होणे)]

आता मनुष्याच्या मनात समाधान निर्माण होण्याच्या पायऱ्या आहेत. ते कसे निर्माण होते ते पाहू.

१) समाधान म्हणजे काय – 

मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदीं गोष्टी मनुष्याने जशा आहेत तशा पूर्णपणे स्वीकारल्या तर मनात जी भावना निर्माण होते तिला समाधान असे म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या पाहिरीत मनुष्याला समाधानाचे म्हणजे काय ते समजते.

२) समाधानाचे यशप्राप्ती मधील महत्व – 

यशाच्या बाह्य आनंदाच्या मागे लागल्यास ना यश मिळते ना यशाचा आनंद. कर्म मार्गात भय, चिंता आणि ताणाचे काटे पेरून ठेवलेले असतात आणि एकाग्रतेचा अभावामुळे कर्म मार्गाचा शेवट नेहमी अपयशात किंवा साधारण यशात होतो. यशाच्या मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर साधारण यश हे अपयशा समान वाटते. याउलट मनुष्य समाधानाच्या संतोष रुपी आंतरिक आनंदाच्या मागे लागल्यास त्यास समाधान, संतोष, तीव्र एकग्रता, असाधारण यश आणि अनपेक्षित असाधारण यशाचा मोठा आनंद मिळतो. मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान शोधणे सध्या लहानपणापासून होणाऱ्या संस्काराच्या एकदम विरुद्ध आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार सर्वांनाच जरा अवघड जातो.

– क्रमशः भाग दुसरा 

© डॉ गोपाळकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments