श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मी जन्माने ब्राह्मण असलो तरी कोणत्याही जातीचा कधीही द्वेष केल्याचे मला स्मरत नाही. तसेच परिस्थिती गरिबीची असूनही कधीही सरकारने आरक्षण देऊन माझी उन्नती करावी असे मला वाटले नाही. मध्यंतरी सरकारने खुल्या वर्गातील लोकांसाठी काही सवलती देऊ केल्या होत्या, त्याचाही लाभ मी घेतला नाही.

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, तसेच मी कोणत्याही जातीच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या विरोधात नाही. ज्यांना कोणाला आरक्षण हवे आहे असे वाटते त्यांनी आरक्षण मागावे आणि सनदशीर मार्गाने मिळवावे. पण त्यासाठी अमुक एका जातीच्या व्यक्तीला किंवा समाजाला शिव्या द्याव्यात याच्या मी विरोधात आहे. किंबहुना अशा अनेक घटना घडल्याचे विविध वृत्तपत्रातून वाचनात आले आहे. यातून अशा लोकांची विकृत मानसिकता कळून येते.

अमुक एका जातीच्या लोकांना होलपटण्याचा प्रयत्न म्हणा किंवा कृती म्हणा, अनेक वेळा झालेली आहे. विविध राजकीय पक्षांनी याचा उपयोग आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेला आढळतो.

समाजाने आता जागृत व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

या देशाच्या जडणघडणीत प्रत्येक जातीचा मोलाचा सहभाग आहे. ब्रिटिशांनी आपली जातीत विभागणी केली आणि आम्ही आज सुध्दा तसेच भांडत आहोत, आणि स्वतःचे नुकसान करीत आहोत, हे ज्या दिवशी हिंदू समाजाच्या लक्षात येईल, त्यादिवशी आपल्या प्रगतीला खरी सुरुवात होईल असे वाटते.

राजकीय पक्षाचे नेते भांडतात, वैर धरतात आणि नंतर एकमेकांच्या राजकीय फायद्यासाठी युती आणि आघाडी करतात आणि सामान्य माणसे राजकीय अभिनिवेष बाळगून आपल्या जवळच्या माणसांत वैर धरतात. मागील पाच वर्षात खास करून महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय भूमिका, त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कशा बदलल्या हे आपण पाहीले आहे. त्यामुळे आता जनतेने सूज्ञ होऊन (कोणत्याही अफवा, सामाजिक माध्यमे किंवा प्रलोभनांना बळी न पडता) उचित पर्याय निवडला पाहिजे. आपल्याकडे काही लोकं प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचे नुकसान होत असते. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये एकच उपाय आहे – – तो म्हणजे १००% मतदान.

आपण सर्वांनी तसा प्रयत्न करू म्हणजे महाराष्ट्र खऱ्या महा राष्ट्र होईल.

 १००% मतदान करून बहुमताचे सरकार आणू.. म्हणजे पक्षीय फोडाफोडी होणार नाही.

— —बघा, पटतंय का ?

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments