कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “या भारताचं काय करायचं?” – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ स्वैर मराठी अनुवाद – कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

…. हा अखिल जगाला पडलेला एक गहन प्रश्न आहे.

कारण, आपण त्यांच्या कुठल्याच साच्यात बसत नाही.

 मुख्य म्हणजे, आपण गोऱ्या कातडीचे नाही… एकेश्वरवादी नाही… आपण कधीच साम्राज्यवादी नव्हतो.

एकेकाळच्या सम्राटांना मुजरे करणारे हुजरेही आपण नाही.

त्यांना आपला थांगच लागत नाही.

आपण एकाचवेळी बहुरंगी, विविधढंगी आणि बहुआयामी आहोत…

– प्राचीन आहोत, पण प्रगतदेखील आहोत,

– भावनाप्रधान असूनही तर्कनिष्ठ आहोत,

– देवाचा वेणू आणि निसर्गातले अणु-रेणू, या दोहोंवर आपला विश्वास आहे,

– कर्माचा सिद्धांत आपण मानतो पण भौतिकशास्त्राचे नियमही आपल्याला मान्य आहेत,

थोडक्यात, आपण एक अजब रसायन आहोत, जे कसे कुणास ठाऊक, पण अखंड प्रवाही आहे.

हीच त्यांची डोकेदुखी आहे… कारण, त्यांच्या मते आपण कधीही यशस्वी होणं अशक्यच आहे.

आपण सगळे एकसुरात कधीच बोलत नाही. वादविवाद आणि कोलाहल हा आपला स्थायीभाव आहे.

आणि तरीही आपलं गाडं चालतं. युगानुयुगे, अनेक भल्याबुऱ्या काळात आपण नुसते टिकलो नाही तर पुढे चालतच राहिलो आहोत.

आपला आलेख उंचावतो तशा त्यांच्या भुवया उंचावतात.

आपण जेंव्हा काही कमावतो तेंव्हा ते त्यांच्या डोळ्यावरचा विश्वास गमावतात.

कारण, वर्षानुवर्षांपासून त्यांनी आपल्याकडे ज्या भिंगातून पाहिलं तसंच ते आजही पाहू इच्छितात…

“भारत म्हणजे निर्धन, निर्बुद्ध, अशिक्षित, धर्म-जातपात यांमध्ये विखुरलेल्या लोकांचा भविष्यहीन देश! ” 

पण, कोलाहलातूनही कार्यसिद्धीची किमया करणारा हा देश आहे, हे त्यांच्या पचनीच पडत नाही.

आणि कार्यसिद्धीसाठी या १४० कोटी लोकांना, कुठल्यातरी एकाच, नेमून दिलेल्या संहितेप्रमाणे बोलावं-वागावं लागत नाही, ते कसं काय? .. हेच त्यांना जाम कळत नाही!

आपल्या यशामुळे ते धास्तावतात. कारण ते यश त्यांच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे न वागता, त्यांच्या अनुमतीविना, आणि मदतीशिवाय आपण मिळवलेलं असतं!

आजवर अनेकांनी आपल्यावर राज्य केलं, पण आपल्याला कुणीच जिंकून घेऊ शकलं नाही.

आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं, त्यांच्याकडून घेण्यासारखं सगळं आत्मसातही केलं.

आपण त्यापैकी कुणाचंही अनुकरण केलं नाही, आणि जुनं सगळं विसरलोही नाही.

आपण बदललो, पण आपलं अस्तित्व अबाधित ठेवलं.

आपल्यातल्या सर्व विरोधाभासांना झुगारून नव्हे, तर योग्यप्रकारे वापरून, आपण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर, संकटांना टक्कर देत उभे राहिलो.

– – आणि नेमकं तेच त्यांना अस्वस्थ करतं!

आपलं यश साजरं करणं त्यांना जमत नाही, जमणारही नाही. कारण त्यांच्या दृष्टीने ते अघटित आहे!

असो.

मूळ इंग्रजी लेखक – अज्ञात

स्वैर मराठी अनुवाद – कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments