मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्म… ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्म… ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

स्त्री असो वा पुरुष, बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल.

महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरच्या महालात निजली होती..

तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले…. त्याला पाहून तिला रहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली..

ती म्हणाली, ” सख्या असा तर मी विचारच नव्हता केला.असं कसं झालं? ”

कृष्ण म्हणाले, “ पांचाली नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही, तर सर्वच कौरव संपले…. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता..?”

द्रौपदी म्हणाली, “ कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?”

यावर योगेश्वर म्हणतात—  “ नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.”

मग द्रौपदी विचारते, “ कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का?”

कृष्ण म्हणतात, “ नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता !”

द्रौपदी विचारते, “ कृष्णा, मी काय करू शकत होते?”

कृष्ण म्हणतो, “ तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास….  त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते…… 

आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोलली नसतीसकी …”अंधे का पुत्र अंधा ” व खिदळून हसत त्याचा ” सार्वजनिक अपमान ” केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं….. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती…… “ 

— आपले शब्दच आपले कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात.

जगात फक्त मानव हाच एक असा प्राणी आहे की त्याच्या दातात नाही, तर जिभेत विष आहे….. 

… म्हणून बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं… बेलगाम बोलण्याने, आणि लिहिण्यानेच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतं..!

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈