मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली.. वाटलं काळी नागीणच सळसळ करत चालली…जसा बळीराजाच्या गळ्यात बांधलेला काळा गोफाचा गंडा…तसा गावाच्या गळसरीला चकचकीत काळ्या नागिणीचा कंडा..दोन्ही कडेच्या उभ्या पिकांनी थरथर भीतीने आपली अंग आकसून घेतली.. आणि जी पिकं, तृणपाती नागीणीला मधेच आडवी आली त्यांना आपला फणा उभारून क्षणात आडवे करून गेली… उरलेली लव्हाळी जरळी माना मोडून शरणागती पत्करून भुईसपाट झाली…आडमार्गाचा गाव आला हमरस्ताशी हातमिळवणी करायला… कधीतरी दिवसभरातून एकदा येणारी एस. टी.च्या लागल्या ना चकरा वाढायला… फटफट ती पोलीस पाटलाची नि तलाठ्याची मिजाशीत पळायची तेव्हा.. आता  घराघरातली डौलाने दुडदूडू धावत असते हिरोहोंडावरची नवयौवना…बाजारहाट आठवड्याचा तालुका भरायचा तोच आता ऑनलाईन ऑर्डर करा   माल येईल तुमच्या घरा असं सांगू लागला… शाळा कालेज शिक्षणाची वणवण संपली…घराघरात पदव्यांची प्रमाणपत्रांची तसबिरी लटकली…निशाणी डावा अंगठा निळ्या शाईत साक्षर झाला.. गावाचा विकासाचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा विसरला…जग आले जवळ किती मुठीत सामावले प्रत्येक हाती… विज्ञानाने साधली प्रगती. .. गावा गावाने आता कात टाकली…आधुनिक वैचारिकतेचे उदंड वारे चोहोबाजूंनी वाहू लागले… सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे…एकदा येणारी संधी आता दारातच ठाण मांडून बसली…यशाच्या पहिल्याच पायरीने अपयशाच्या पायरीला पायतळीच गाडली… यशा सारखे यशच त्याला नाही क्षिती कुणाची… माध्यान्हीचा सूर्य तळपता तळपता पश्चिम दिशेला झुकू लागला…

हळूहळू हळूहळू यशाची धुंदी मनामनावर गारूड करत गेली… अधिक प्रगतीचा सूर्य दुसऱ्या देशात दिसू लागला… आणि आपल्या कतृत्वाचा हिथला वावच संपला…  विमानं डोई  भरभरून उडून गेली परदेशात… ओस पडत गेले गाव आणि डोळ्यातले  दु:खाश्रु माईना  घरा घरात.. विकासाची रोपं पिवळी पडत सुकत गेली कोळपून भुईवर पडली…कधीतरी येतो आंब्याचा मोहर घेऊन वसंताचा ऋतु…अन सारा गाव लोटतो त्याला समजून घालण्यास अरं बाबा ईथं  थांबशील तरी तू… विकास झालाय पोरका तुमच्या शिवाय त्याला कोण विचारणारं तरी आहे का…आता सुखाला चटावलेली मन माघारी फिरणारी असतात का… आणि गावातलं जुनं हाडं गावाची नाळ कापून घ्यायला तयार नसते… अखेरची कुडी या मातीत मिसळून जावी हिच एक इच्छा मनात तिची असते… मागचं सारं सारं एकेक आठवतयं.. पाऊलवाटा, माळरान, मारूतीचं देऊळ, शेताचा बांध, पांदणं…नि आपुलकीची घट्ट माती… जोवर हे सगळं अबाधित होतं  तेव्हा तेव्हा   अन आता डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली तर तर… एखादा चुकार अश्रूचा टिपूस ओघळून जातो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ फूल ज़रा आहिस्ता फेको…… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ फूल ज़रा आहिस्ता फेंको… फूल बडे नाजुक होते हैं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

फुलं आणि मुलं उमलताना सुकोमल असतं… दिसताना तसचं दिसत असतं…ममतेने, प्रेमाने त्यांची काळजी घेणारे हात…मुग्धावस्थेत लालन पालन करणाऱ्यांची असते का त्यांना  साथ… पण हे सगळं प्रत्येकाच्या नशिबात कुठे असते.. भाग्याचा अभंग  खडक परिस्थितीच्या चौकात वाट पाहात असतो त्यांची… अशी दुर्भाग्य पूर्ण बालकांची नि फुलांची… अबोल भावना दोघांच्याही.. एक हाताने चौकात कुठे फुलांची माळ विकावी तेव्हा कुठे मिळणाऱ्या दमडीतून पोटाची खळगी भरावी… फुलांना तरी हट्ट करायला कुठे मिळते स्वातंत्र्य…कधी मूर्तीवर,प्रतिमेवर तर कधी पांढऱ्या शुभ्र वसनातील कलेवर…आजचं फुलणं, सुगंधाची पखरण करणं आणि आणि  संध्यासमयी कोमेजून आपलचं निर्माल्य होणं… काय तर म्हणे निसर्ग चक्र.. आजवरी यात कधी तसुभर बदल झालाय काय?  आणि होईल कसा?… बाल्यावस्थेतील मुलाची निसर्गाच्या नियमाने होत जाणारी वाढ थांबवता येते का?.. परिस्थितीतचा नकाशा मात्र व्यापक नि विस्तृत झालेला… चौकातच जिना और चौकातच मरना अपनी अपनी औकात पहचानना… फुलांच्या माळेने नाकाला सुगंध जाणवतो तो जगणं किती सुंदर असतयं याचा क्षणाचा भास दाखवतो…मला विकुन तुझं पोट भरता येईल… विकत घेणाऱ्याला सुगंधाचा आनंदही देईन माझ्या अंतापर्यंत… पण पण मला काय मिळेल.. चौकातला दगडी कटृटा निर्विकारपणे मुलाला नि फुलाला जवळ बसवून घेत असतो… सिग्नलचा लाल पिवळा हिरवा रंगाचा …थांबा पाहा पुढे जाचा खेळ मांडून बसतो…वाहनांमधले, पदपथावरले माणसांना क्षण दोन आपल्या विश्वातून भानावर या संवेदनशीलता जागरूक ठेवून सजगतेने अवतीभवतचं अवलोकन करा… कुणी गरजु असेल तर त्यास न हिचकिचता मदतीचा हात पुढे करा… हिच खरी मानवता… नाहीतर आहेच आपली कोरडी शुष्क घोषणाबाजी बसवर नि भिंतीवर रंगवलेली.. मुलं म्हणजे देवा घरची फुलं.. झाडं लावा झाडं जगावा… बालकांना शाळेत पाठवा… आणि आणि आणि बालमजुरी करायला लावणं हा समाजाचा शासनाचा नैतिक अध: पात आहे…कायदेशीर गुन्हा आहे…हिरवा सिग्नल लागताच वाहनं बसेस पळू लागतात नि त्यावरील घोषणा पोकळच ठरतात… निर्जीव भिंतीना रंग चोपडून घोषणा गोंदवून घेतात पण त्याकडे माणूस नावाचा प्राणी फक्त बघत नसतो… त्याच्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसतं… रूपायाचं चाफ्याचं  फुलं मात्र दहाच पैश्यालाच हवं असतं… महागाईला धरबंध काही उरलाच नाही हे तत्त्वज्ञान मात्र चौकात मांडायचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ तनहा तनहा यहाँ पे जीना ये कोई बात है… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ तनहा तनहा यहाँ पे जीना ये कोई बात है… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

निराशेचा काळोख चोहीकडे असला तरी स्वप्नांच्या  चमचमत्या  असंख्य चांदण्या वर नभात पसरलेल्या असतात…  अपयशाच्या काजळीने मिणमिणता एक  आशेचा कंदील पुरेसा ठरतो… अंधारातनं यशाची वाट शोधत निघायला… अपयशानं हताश होणं स्वाभाविक आहे… पण हे ही तितकचं खरं आहे …निराशेची रात्र कितीही मोठी असली तरी मावळणार आहे… आशेची  सकाळ उजाडली जाणार आहे…अनेक अडचणींचा, अडथळ्यांचा, अडसर वाटेवर पसरलेला असतो… त्यावर मात करून पुढे पुढे जाणाऱ्याला यशसिद्धी मिळते… यश ज्याला मिळते ,जो जिता वही सिकंदर चा मानमरातब मिळवतो…याच साठी केला होता अट्टाहास असं सांगताना किती यातनामय कडवा संघर्ष करावा लागला, प्रतिकुल परिस्थितीशी झुंज द्यावी लागली याचा विसर पडतो… मात्र अश्यावेळी आपल्या बाजूने कोण आले, आणि कोण नाही यांना तो कधीच विसरत नाही.. हिच तर वेळ असते आपला कोण नि परका कोण ओळखण्याची… यशाचे भोई होण्यात सगळ्यांची अहमहिका न सांगता होत असते.. नि अपशय मात्र पोरका असतो… अंधारात आपले अश्रू गाळत राहते…उत्साह, उमेद वाढवून देणारा कुणी भेटलचं तर पुन्हा उद्या उगवणारी सकाळ कडे आशेने  वाटचाल करू लागतो… अशावेळी  ..  अपयशाच्या काजळीने मिणमिणता एक  आशेचा कंदील पुरेसा ठरतो… अंधारातनं यशाची वाट शोधत निघायला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कसं असतं ना!.. जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना!.. जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं!… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं.. असा माझा हट्टही असतो ना!.. पण कसं असतं नां!!

… शब्दांच्या भोवऱ्यात मी अडकून तुम्हाला कोड्यात टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही… चित्र जरी एक अल्लड बालिकेचे तुम्हास दिसत असले… तरी मी काही आता बालिका राहिली नाही..  हि बालिका  आता याच वयाच्या बालिकेची मातेच्या रूपात आहे… आणि आणि तिला आता तिचाच भुतकाळ सतत तिची आताची बालिका सारखी सारखी नजरेसमोर आणून दाखवत असते…

आता कळतयं आपण जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा असतो… आईचं तेव्हाचं आपल्याशी एकंदरीत वागणं किती बरोबर होतं ते.. बाई गं मुलीच्या जातीला असलं वागणं शोभायचं नाही बरं.. हे तिचं सतत  उपदेश पर  चौविसतास बोलणं मनाला मुरड घालायचं… आवडायचं तर मुळीच नाही.. भांडणाची  चकमक उडाली नाही असा एक दिवस कधीही सरला नाही… चंद्र सूर्य यांच्या झांंजावादनाने दिवस रात्र सरसर सरले… आईचं बरोबर होतं हे कळले आणि पटलेही.. आणि माझं …

… आणि माझं किती किती चुकीचं आहे हे आता माझीच मुलगी जेव्हा मला सांगू लागली तेव्हा… माझ्या आईचं म्हणणं मला सतत आठवतं राहिलं..कसं असतं नां.. आणि आता पुढे माझी मुलगी जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा येईल तेव्हा मी किती बरोबर होते हे तिला कळेल…. आणि  तिचं किती…

कसं असतं नां… जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना… जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं..पण पण.. कसं असतं नां….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“माझं अडलंय खेटरं!…मीच का म्हणून सारखं सारखं करायचं ? दादाला का सांगत नाही !”इति घरातलं कन्यारत्न.

“कारट्या दिवस आसरात्र गावभर उंडगत असतोस! घरात इकडची काडी तिकडे करत नाहीस!अभ्यासाच्या नावांने कायमची बोंबाबोंब..”इति घरातले बाबा. 

“मी म्हणून या घरात टिकले ! आणखी कुणी असती तरी केव्हाच हे घर सोडून गेली असती!तेव्हा कुठे कळली असती बायकोची किंमत!…”इति घरातली आई.

“अगं सुनबाई!आज घरात चहा अजून झाला नाही काय? माझ्या बीपीच्या गोळ्या राहिल्यात अजून घ्यायच्या! चहा मागितल्याशिवाय आपणहून कधीच नाही द्यायची बापडी! आम्हा म्हातार्‍यानचं नशीबचं फुटकं हो..म्हणून असली सून मिळाली..”इती घरातले आजोबा आजी( विशेषकरून तोंडाळ आजी)

“सरोजा वहिनी!आमची किल्ली तुमच्याकडे ठेवून देते बरं.त्या कामवालील्या दुपारी एव्हढी द्याल तेव्हढी. आणि केर भांडी स्वछ करून जा म्हणावं..”इति सखी शेजारीण.

“ वसंता ! नुसता पेपर डोळ्यासमोर धरून लोळत काय पडलास  ? आज अजून आंघोळ वगेरे आटपून कचेरीला कधी निघणार?”इती नातसुनबाई आपल्या पतीदेवांना…

आणी आणि आणि …या सारखे विविध विषयावरचे अगणित संवाद घरा घरात आणि दारा दारात घडत असतात. नवीन त्यात काय! घरोघरी त्याच मातीच्या चुली हो की नाही?बरे हे संवाद आजकालचे वाटत असले तरी फार पूर्वापार चालत आलेले आहेत.. हो आमच्या वेळी असं नव्हतं हे पालुपद मात्र त्यावेळी नसावं एव्हढाच काय तो फरक… पण पण संवाद घडत होते, होत होते,चालत होते. त्याशिवाय का घरं चालणार होत! कुटुंबाची जडणघडण होत वंश परंपरा पुढे पुढे गेली असणार ? जिथं कुटुंब तिथे संवाद आणि जिथे संवाद तिथे किमान दोन व्यक्ति तरी असायलाच हव्या.अपवाद मात्र आपुलाची वादु,संवादु आपुल्याशी करणारा तुर्‍याव्यवस्थेतला विरळाच कोणी…पण तिथे देखील तो संवाद आत्माचा परत्म्याशी चालेला असतोच…असो आपला तो विषय नाही.

वसुधैव कुटुंबकम अशी श्री ज्ञानदेवांनी या अखंड विश्वगोलालाच संबोधले आणि जो जे वांच्छील तो ते लाहो असे पसायदानात मागणे केले तेव्हा देखील संवाद अपेक्षित होताच..आत्म्याचे परत्म्याशी संवादरूपी बोलणं मग ते प्रत्यक्ष असो वा मौनातलं..अगणित कुटुंबानी मिळून होणारा समाज,अनेक समाज मिळून होणारे राज्य,राष्ट्र..आणि अशी अनेक राष्ट्रमिळून बनलेलं ते वसुधैव कुटुंबकमात जेव्हा सौहार्दपूर्ण सुसंवाद घडतो तेव्हा स्वर्गीय आनंद या भूमंडलावर अवतरलेला असतो.प्रेम,माया,आपुलकी,वात्सल्य,ममता,मैत्री,नातं गोतं…सारं सारं काही तिथे उपजत असत…अर्थात संवादाशिवाय या गोष्टीना जाणवता आले असते काय ?

एकाच घराच्या छताखाली अनेक नात्यागोत्याची माणसं एकत्र राहत होती,राहत असतात आणि पुढेही राहत असणार..अविभक्त कुटुंब पद्धती अस  याला म्हणतात.. यात पणजोबा,आजोबा,आजी (हयात असे धरून बरं)आई बाबा,काका काकू,मुले सुना,नातवंड,पतवंड,चुलत,मावस,लांबच्या नात्यातले जवळीकतेने राहणारे,अशी रक्ताची आपली म्हणवणारी घरची दारची असा नात्यांचा सोहळा असणारं घर…पाळण्यातल्या नवजात शिशु पासून ते नाबाद शतकीचे ज्येष्ठ वयोवृद्धा पर्यन्तची वेगवेगळ्या वयाच्या लहानथोरांनी गजबजलेले घर…अनेक शारीरिक वैशिष्ट्याने परिलुप्त असलेले.विविध स्वभावाच्या कंगोर्‍याने बनलेले,रंग रूपाने वेगळेपण जपणारी,आणि आणि उपजत मनुष्य स्वभावाला साजेशी असणारी…घरातल्या प्रत्येकाशी कस बोलत असतील,वागत असतील,आणि याचा सर्वाचा परिपाक त्या अवाढाव्य घरातून कसा प्रत्ययाला येत असेल..संवाद आहे तिथे वाद असणारच…घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडे लागणारच..हे तर ओघानेच येणार आहे. अहो हाताची पाच बोट कुठे एक सारखी असतात…हे  विश्वमान्य सत्य आहे ते नाकारून कसे चालेल नाही का?..त्या त्या घरा घरातले पूर्वापार चालत आलेली संस्कृती,परंपरा,घराणे चालीरिती…सर्व मागुन पुढे नेण्याच काम दर पिढी करत जाते..आदरयुक्त बोलणं ही त्यातली पहिली पायरी.गोड मृदु बोलणं दुसरी पायरी.ह्या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात तिथे वादाला वावं नसतोच मुळी..अरे ला का रे भाषा आली की संवाद संपुष्टात येऊन वादाची ठिणगी पेटू लागते.हसरं खेळत्या घरातली शांती बिघडायला वेळ लागत नाही. मग अवमान, अपमान,अपमर्द,सारखे अविवेकी चरे त्या घराच्या आजवरीच्या अभेध्य भिंतीला हळूहळू चरे पाडून,घराला उधवस्त करू पाहतात..घराची शकलं  शकल होण्यास वेळ लागत नाही. मग वादाचा विषय कुठला असो त्याचा परिणाम असाच होणार असतो.मग पश्चात बुध्दिने काय मिळवले आणि काय गमावल याचा लेखाजोखा करण्यात काही मतलबही नसतो.मतलबींचे मनसुबे साध्य झाल्या सारखे वाटतीलही पण त्यासाठी त्यांनी अनमोल नात्यांची किंमत मोजलेली असते हे उशिराने लक्षात येते.तोवर परतीचे मार्ग बंद करून बसलेले असतात..केवळ सुसंवाद घडला नाही म्हणून..वयाने ज्येष्ठ असणारे अनुभवाने समृद्ध असतात.चार पावसाळे,उन्हाळे त्यांनी पचवलेले,सोसलेले असतात त्यांचा सल्ला योग्यरीत्या विचारात घेऊन पुढील वाटचाल केली तर,पुढच्यास ठेच मागचा शहाणा चा फार तर फायदाच होणार असतो.पण हे केव्हा तर त्यांच्याशी सुसंवाद असेल तर.त्यांच्या या उतार वयात त्यांची ममतेने,आपुलिकेने केलेली विचारपूस,शुश्रूषेला थोडा दिलेला वेळ या सुसंवादातून त्यांनी मनापासून दिलेले आर्शिवाद पुढील वाटचालीत मोलाचे ठरतात. जसे पेरावे तसे उगवते या न्यायाने आपले हे वर्तन आपल्या भविष्यातही सुखाचेच अनुभवाला येते.जी गोष्ट ज्येष्टांबाबत तीच वडीलधारी करत्यांबाबत असणे तितकेच गरजेचे ठरते. त्यांचे कष्ट,श्रम,अनमोल असतात.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना होणारी त्यांची न दिसणारी दमछाक नजरेआड करण्याचा करंटेपणा करू नये.शक्यतो होता होईल तो आपला भार आपणच उचलण्याची मदत केली तर त्यांना किती हुरूप येईल.सुसंवादाची गरज इथे फार असते.अत्यंत संवेदनशील विषय पैसा,मिळकत,खर्च,या केंद्राभोवती घर फिरत असते. घरातल्या प्रत्येकाची आवड निवड,मागणी इथ पुरविली जाते.अर्थात काहींची कारणपरत्वे मागे राहते..मग रूसवे फुगवे यांचे कोंब उगवतात..उणिदुणी काढली जातात..विसंगतीचा पंचनामा चव्हाट्यावर येतो…संवाद संपतो नि वाद सुरू होतो..वाटण्या कोर्टाचे दार ठोठावतात.. प्रेम आपुलकिचा गळा घोटला जातो.. स्वार्थापुढे नाती गोती ,मैत्री गाडली जाते.. विषय संवादाने सामोपचारने मिटवता आला असता पण मनातले कटुतेचे  भिनलेले विष तस करू देत नाही…

जी गोष्ट घरातली पुरुषवर्गाची ती तशीच घरातल्या स्त्री वर्गाची एक पायरीने वरचढ ठरणारी. नव्याने येणार्‍या सूनबाईला सासुरवासेचा छळवाद हाच पहिला विसंवादाचा पाया पक्का करतो.कितीही सुशिक्षित घर असो सासू सुनेतला विस्तव एनकेन प्रकारे पेटता राहतोच.धुसफूस,माजघरातले हुंदके,स्वैपाक घरातली आदळआपट बोलू लागतो तेव्हा सुसंवादाची ऐशी की तैशी होऊन जाते..घरभर फिरणारा गृहलक्ष्मीचा हात,तिचा हसतमुख असणारा वावर घराला घरपण देणारं तिचे कष्ट सुसंवादाने घरात आनंद,सुख,शांती ओतप्रोत भरून बाहात असते. पण जर का विसंवाद झालाच तर अख्या घराची उधवस्त धर्मशाळाच झाली म्हणून समजा.मग नात कुठलही असो,जाऊ,ननंद,आत्या,मावशी,काकी,आजी,सगळे एथून तिथून सारखेच..घरकामापेक्षा वाटणीचीच अपेक्षा जास्त..लेकी बोले सुने लागे असल्यावर संवादाचे धिरडे होईल नाही तर काय ?

घरातले शेतातले गडीमाणसं यांच्याशी घरातल्या सगळ्यांनी साधलेला संवाद तर खूप काही सांगुन जातो.नोकर चाकर म्हणून हीन दिन लेखून जर बोलणं केल तर त्याना तरी मालकाच्या बद्दल आणि त्याच्या घराबद्दल जिव्हाळा कोठून बरे येणार.त्यांची विचारपूस,हवं नको,वेळ प्रसंगी मदतीचा हात पुढे केला तरच जिवाला जीव देणारी आणि माया लावणारी माणस कामाची जोडली जातात..केवळ ओठावर गोड बोलण ठेवल्यान…अर्थात काही वेळा कडक परकड शब्दात बोलणं असण हेही तितकेच महत्वाचे नाही तर आपली मुखदुर्बलतेने आपलाच घात झाल्याशिवाय राहायचा नाही.

कालपरत्वे छोटे कुटुंबाची संख्या वाढीस लागली आहे. यास कारणे जरी अनेक असली तरी कुटुंब आणि संवादाचा ढाचा तसाच राहिला आहे. आजकाल शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने घरातील करत्या स्त्री पुरूषांना घडयाळ्याच्या गतीहून जास्त जोरात धावावे लागत असल्याने सूर्य उगल्याबरोबर बाहेर पडून चंद्र उगवल्यावरच घरी येण होत असल्याने घरातील स्ंवादच संकोचला गेला आहे. नेहमीचे ताण तणाव,शारीरिक दगदग,यात उत्साह गळपटून गेला आहे. मानसिक थकवा यातून चार शब्द बोलायला उसंत नसतो. तिथे संवाद कुठे घडावा. लहान मूल असतील तर त्यांची फारच कुचंबणा होते. आई जेउ घालीना बाप भीक मागू देना..मग कुठे तरी वडयाच तेल वांग्यावर निघत. अभ्यास,हट्ट हा सामायिक विषय असतो. तू तू मै मै घरात नवरा बायकोत सुरू होते आणि शेजारी पाजारी गेलाबाजार मित्र,नाते वाईक याना फुकाचा डेलीसोप बघयाला मिळतो.शेवट विसंवादाने घर मोडते…वेळीच प्रेमाने,आपुलिकेने,कळकळीने जर चार गोडीने शब्द पुसले गेले जाते तर ही वेळ टाळता का आली नसती…

देवकृपेने सर्व प्राणीमात्रा मध्ये फक्त माणसालाच देवाने तोंड दिले आहे.. भाषा माणसाने तयार केली.आणि त्या द्वारे तो दुसर्‍याशी बोलू लागला..ऐकण आणि बोलण हा संवादाचा पाया आहे. दुसर्‍याच नीट शांतपणे ऐकुन घेण हेही जास्त महत्वाच आहे. तरच आपल्या बोलण्याला काही अर्थ राहील.या दोन घटकात बोलणं कस असावं तर ऐकत राहावं अस गोड,मृदु नि हस्ता खेळता प्रवाही संवाद असावा.जेव्हढे शस्त्राने घाव घातलेले जातात ते कालांतराने भरून निघतात तरी पण शब्द असे अस्त्र आहे की याच्या घावाची जखम कधीही भरून निघत नाही.माणूस जोडणारा संवाद हवा  माणूस तोडणारा विसंवाद टाळावा. सगळ्या गोष्टीला पैशयाने विकत घेता येत नाही त्यातला सुसंवाद करायला,घडावयाला दाम मोजायची गरज नाही.

अलिकडे  रंगीत भित्तीपत्रके समुपदेशाचे डोस पाजताना मुरकत सांगतात की कुटुंब म्हणजे मायेची पाखर…कुटुंब म्हणजे विश्वासाची झालर..कुटुंब म्हणजे घर असतं… जिवाभावाच मोल असतं…तिथेच नातं समृध्द असतं…तेच खर घर असतं…कुटुंब म्हणजे आशा असते जीवनाची दिशा असते…घर जिथे एकमेंकांच्या भावभावनांचा आदर असतो..ते घर ते कुटुंब मंदिर असतं…आणि आणि या सर्वाला सुसंवादाची मात्र गरज लागते…तर  आणि तरच हे शक्य होतं…

आता वरचं दिलेलं चित्र पाहिलंत ना.. हि दगडाची केवळ एक रचना आहे.. भावनेने एकत्र आलो तर कुटुंब… नाहीतर सगळे दगडचं…

“अहो! किती वेळ अजून तो लेख लिहीत बसणार आहात ? जेवणासाठी आम्ही सगळेच खोळंबुन बसलो आहोत ना ?गारढोण जेवण झालं तर मला बोलायचं नाही ?” स्वयंपाक घरातून सौ. कडाडली आहे.. तेव्हा मंडळी आता इथेच आवरतं घेतो…पण तुम्ही तिकडे लक्षं देऊ नका…आमच्या घरी मात्र हे रोजजचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“वाचवा. !.. वाचवा.. !. कोणी हाये का तिथं?… ऐका !… ऐका. !. मी बुडतोय!… अहो कुणीतरी लवकर मला बाहेर काढा हो!… नाका तोंडात पाणी गेलयं… श्वास कोंडलाय!… लवकर धावून या!.. नका उशीर करू… आता फार वेळ दम धरवणार नाही!… कसेही करा पटकन इथे उडी मारून या आणि मला इथून बाहेर काढा… “

जिवाच्या आकांताने तो ओरडून सांगत होता बिचारा… पाण्याच्या खोल डोहात फसला होता.. गरगर फिरत होता… त्याचे स्व:ताचे सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते… तो अधिकाधिक डोहात गुरफटत गेला होता… त्याचा आरडाओरडा ऐकून बघ्यांची खूप गर्दी जमा झाली तेथे.. पण त्यांना या लाईव्ह ऑंखे देखा हालचं व्हिडिओ शुटींग करण्याचा मोह आवरला नाही.. ते बुडणाऱ्या माणसाला  म्हणाले,

” अरे थांब!लगेच असा बुडू नकोस.. दोन मिनिटे आधी शुटींग करून घेऊया मग तुला कसा यातून वाचविता येईल याची आम्ही आपआपसात चर्चा करतो… पट्टीचा पोहणारा तरी आमच्यात कुणी दिसत नाही.. एखादा मोठा दोरखंड मिळतोय का ते पहावे लागेल.. तो आणे पर्यंत तरी तुला असेच थांबणे गरजेचे आहे… आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करून झाले कि मग कुणाला तरी गावात पाठवतो.. तुझ्या घरी तसा निरोप देऊन ताबडतोब मदतीला या म्हणून सांगतो.. तू आता काळजी करू नकोस… तुझ्या जीवावर बेतलं आहे याची आम्हाला काळजी किती वाटते ते या व्हिडीओ शूटिंग व्हायरल झाले कि सगळ्यांना कळेल.. जो धाडसी आणि पट्टीचा पोहणारा असेल त्याने हा व्हिडिओ बघितला कि तो लगेच धावून आल्याशिवाय राहणार नाही… मग तू नक्की वाचशिल यात शंका नाही… तुला वाचताना पुन्हा आम्हाला शुटींग घेता येईल… एक  माणूस, सुजाण नागरिक या नात्याने आम्हाला आमचं माणुसकिचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल… तू धिराचा आहेस, .. अखेर पर्यंत तुला लढा द्यायचा आहे… हिथं थांबून आम्ही हे शुटींग करता करता तुझं माॅरल कसं वाढेल हे आम्ही पाहतो… तू थोडावेळ असाच धीर धरून रहा मदतीला कोणी येईलच इतक्यात… आणि कुणी आलं कि तुला आम्ही मोठ्याने आवाज देऊ… होईल होईल तुझी सुटका नक्की होईल… मग आमच्या सोबत एक सेल्फी घेऊ… चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकवू  काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव  तारी त्याला कोण मारी अशी सनसनाटी  हेड लाईन देऊन आम्हीच तुझ्या वतीने मुलाखत देऊ… या या व्हिडिओ शुटींगचा रिल व्हायरल झाल्याने बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवले… पण पण हे केव्हा तूला मदत मिळून बाहेर काढल्यावरं.. बघं एका रात्रीत तू हिरो होणार आहेस.. तोवर हे तुला या डोहात गटांगळ्या खाऊन का होईना जिवंत राहावे लागणार आहे… अरे टि आर. पी. किती वाढेल याची तुला काहीच कल्पना करता येणार नाही.. ते सगळं आम्ही बघून घेतो.. तू मात्र डोहात लढते रहो हम कपडा संभालके देखते है… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काल रात्री गाढ झोपेत असताना अचानक पाऊस बरसून गेला… कळलंच नाही मला… दारं खिडक्या घराची घट्ट बंद होती ना.. कुणास ठाऊक किती वेळ तरी कोसळून गेला असावा.. सकाळी जाग आली तेव्हा खिडकीची तावदाने न्हाऊन निघालेली दिसत होती… थंडीचेही दिवस असल्याने हवेतल्या गारठ्याने खिडक्यांच्या काचेवरील पावसाचे थेंब थेंब थरथर कापत  खाली ओघळून जात होते.. समोरचं आंब्याच्या झाडाने नुकतेच सचैल स्नान केल्यावर पानांपानांतुन  मंत्रोच्चाराची   सळसळ करताना प्रसन्न दिसला… मधुनच वाऱ्याची हलकी झुळूक त्याला लगटून गेलीं. जाता जाता होईल तेव्हढी पानं कोरडी करून गेली.. खिडकी उघाडण्याचं धैर्य मला होईना.. पाऊस पडून गेला असला तरी घरात शिरकाव करायचा होता गुलाबी थंडीला… एक हलकासा हात काचेवरून मी फिरवला.. हाताच्या उबदारपणा मुळे काचेवर जमा झालेल्या बाष्पानं सगळं अंग आकसून घेत काच  मला म्हणाली, “काल रात्री तुला जागं करायचा खूप प्रयत्न केला.. अगदी पावसानं गारांचा तडतड ताशा वाजवून पाहिला.. सरीवर सरी सप सप  चापट्या देत मला सांगत होत्या, अगं उठीव त्याला बघ म्हणावं ऐन दिवाळीच्या मोसमात पाऊस कसा कंदील, फटाके भिजवायला आलायं तो.. पण तू खरचं गाढ झोपेत होतास.. मग पाऊस हिरमुसला होऊन गेला.. हळूहळू थांबत गेला.. जाताना मला म्हणाला त्याला सांग रागावलोय त्याच्या वर.. आतापर्यंत बऱ्याच रात्री उशिराने घरी येत होतास, तेव्हा म माझं कारण घरात  आई, बाबा नि आजोंबाना सांगुन सुटका करून घेत होतास.. तुला तर कधीच मी भिजवलं सुध्दा नाही.. कारण तुझी माझी भेट कधीच झालेली नाही… पण आज अचानक येऊन तुला भेटायचं होतं.. तुला बघायचं होतं.. म्हणून रात्री उशिरानं आलो.. तू बेडरूममध्ये झोपलेला असताना तूला जागं करावं आणि एकदा डोळे भरून पाहावं… पण तू गाढ झोपेतून हलला सुद्धा नाही.. आता माझी कटृटी आहे कायमची असं सांग त्याला.. “. खिडकीची काच हे सारं मला सांगताना खूप हळवी झाली.. भरलेले डोळयांतली आसवं स्यंदन करत गेली…

… मी ही तिला सांगितले कि, ‘रात्री माझ्या स्वप्नात पाऊस आला होता मला भेटायला, आम्ही खूप दंगामस्ती केली.. त्यानं मला खूप खूप भिजवलं.. आम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला… बराचवेळ बोलत राहिलो, हसत राहिलो… मला म्हणाला आता त्यावेळी माझं खोटं कारणं सुटका करून घेत होतास ना.. म्हणून आज अचानक आलो तुला भेटायला नि मनसोक्त भिजवायला… ‘आणि तो  नेमकं हेच बोलून गेला.. ‘मला खूप नवल वाटलं पावसाचं.. रात्रभर झोपेत त्यालाच स्वप्नात तर पाहात होतो… आणि आता तर प्रत्यक्षात हिथं येऊन गेल्याच्या ठेवून गेलाय त्याच्या साक्षित्त्वाच्या खुणा… ज्या तू जपून ठेवल्यास मला दाखवायला… काचं आता स्वच्छ झाली होती नि मंद मंद हसत होती…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. अंगे भिजली जलौघाने सुस्नात झाली वसुंधरा. वारीचे ओहळ धावती मुक्तांगणी सैरावैरा. खळखळ नाद घुमवित जल निघाले भेटाया सागरा. कडाड चा थरार झंकारला तडितेचा… दुहितेची शलाका चमकली भेदून गेली अभंग नभाला… बावरले सारे चराचर भयकंपित तनमन झाले… कुर्निसात करती तरु लता त्या होऊनी नतमस्तक वर्षा पुढे, सांगती फक्त तुझीच सत्ता आम्ही कोण ते बापुडे… आडदांड खटयाळ दगड गोटे  पथा पथावरी येती वाट ती आडविती… असमंजास त्या वळसा घालून प्रवाह दावितो  चातुर्यगती. आले नवे नवे पाणी गाती गाणी बाकिबाबा… तृषार्त झाली धरित्री तृणपातीचा कोंब लवलवे इवला इवलासाबा. शाखा पल्लव तरू लतांचे सचैल न्हाऊन निघाले, हरित लेणीचें दीप उजळले… आज दिवाळीचे साऱ्या सृष्टीला अभ्यंगस्नान घडले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print