मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ कर्ण… शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर

सुश्री शोभना आगाशे

अल्प परिचय  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एम बी बी एस व एम डी (पॅथाॅलाॅजी) या पदव्या प्राप्त. त्याच महाविद्यालयात २००७ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत. सन १९६८-६९ मधे आकाशवाणी सांगलीच्या महाविद्यालयीन कविसंमेलनात सहभाग. ‘सावळ्या’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. टागोर रचित इंग्लिश ‘गीतांजली’ चा काव्यानुवाद ‘गीतांजली जशी भावली तशी’ प्रकाशित.

☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆

         हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।

         जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।

         तुमच्या तेजाचा अंश मी सतत वागवला काळजात।

         त्या दिव्य तेजाने  दिपले लोक, पण मी जळत राहिलो अंतरात।।

         गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले।

         आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले।।

         हे भास्करा, तुम्हाला माझ्यावरचा अन्याय पाहून काय वाटले?

         परोपकार करताना मी धरणीमातेला अनावधानाने सतावलं।

         तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं।।

         हे हिरण्यगर्भा तुम्हाला हे योग्य का वाटलं?

         ‘रथहीन, शस्त्रहीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना।

         कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?।।

         भर राजसभेत द्रौपदीनं माला सूतपुत्र म्हणून हिणवलं।

         परशुरामाचा शिष्य असूनही त्यांच्या धनुष्यापासून दूर ठेवलं।।

         हे आदित्या, त्यावेळीही माझ्या मदतीला कोणी नाही धावलं।

         मला निस्तेज करण्यासाठी इंद्राने माझी कवचकुंडलं नेली।

         पुत्रप्रेमापोटी त्याने भृंग होऊन माझी जंघा पोखरली।।

         हे पुष्कराक्षा, तुम्हाला कधीच का पुत्रप्रेमाची अनुभूती नाही आली ?

         ‘ज्या मातृप्रेमासाठी  माझी कुडी होती आसुसली।

          त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली।।

      सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।

      द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ।।

      जाताना अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली।

      हे विवस्वता, त्यावेळी तुम्हालाही ती खरी का वाटली?।।   

      ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता।

      माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता?।।

      प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच।

      या प्रश्नांच्या जंजाळातून मला-माझ्या

      आत्म्याला मुक्त व्हायचं आहे।।

      ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,

      हे धरित्री, हे मधुसूदना।

      मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे।।

     आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,

     हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे।।

– सुश्री शोभना आगाशे, मो. 9850228658

☆ काव्यानंद – कर्ण….सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण ☆  श्रीमती उज्ज्वला केळकर☆

महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने अनेक साहित्यिकांना भुरळ घातली आहे. आपल्याला उमजलेले कर्णाचे व्यक्तिमत्व, त्यांनी कथा, कविता, लेख, कादंबरी यातून उलगडून दाखवले आहे. शोभना आगाशे यांनाही कर्णाच्या जीवन प्रवासाने व्यथित केले आहे. ‘कर्ण’ या कवितेत त्यांनी त्याबद्दलचे विचार, चिंतन कर्णाच्या मनोगतातून प्रगट केले आहे. कर्ण तेजस्वी. पराक्रमी. दानशूर. मृत्यूपासून दूर ठेवणारी कवच-कुंडले घेऊन जन्माला आलेला. तरीही त्याला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागतात. का? असं का? सूतपुत्र म्हणून त्याला वारंवार अपमानित व्हावं लागतं. कवितेत तो आपल्या पित्याला सूर्याला प्रश्न विचारतोय,

तो म्हणतो, ‘ हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।

जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।’ कुंतीचं मातृत्व स्वार्थी होतं. मातृप्रेमासाठी त्याचा जीव आसुसलेला होता. पण ती त्याला केव्हा भेटली? तर कौरव-पांडव युद्धाच्या वेळी. आपल्या मुलांना विशेषत: अर्जुनाला त्याच्याकडून धोका प्राप्त होऊ नये म्हणून. म्हणूनच तो तिचं मातृत्व स्वार्थी आहे, असं म्हणतो. त्याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी ती सम्राटपदाची, द्रौपदीची लालूच दाखवते. कर्ण म्हणतो, 

‘ज्या मातृप्रेमासाठी  माझी कुडी होती आसुसली

त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली.

सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।

द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ‘

‘जाता जाता ती अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली.’ कर्णाला प्रश्न पडतो,

 ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता

 माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता.?’

 इथे सूर्याची वेगवेगळी नावे प्रत्येक वेगळ्या ओळीत आली आहेत. भास्करा, हिरण्यगर्भा, आदित्या, पुष्कराक्षा, विवस्वता अशी संबोधने कवयत्रीने सूर्याबद्दल वापरली आहेत. 

 कर्ण म्हणतो, ‘गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले

 आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले.’ या ओळींमागे एक संदर्भकथा आहे. ही संदर्भकथा बहुतेकांना माहीत आहे. कर्णाला परशुरामांकडे धनुर्विद्या शिकायची होती. फक्त ब्राम्हणांनाच धनुर्विद्या देणार, हा परशुरामांचा पण. आपण ब्राम्हण आहोत, असं खोटंच सांगून कर्ण परशुरामांकडे धनुर्विद्या शिकतो. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून विश्राम करत होते. यावेळी इंद्राने भृंग होऊन कर्णाची जंघा पोखरायला सुरुवात केली. कर्णाला खूप वेदना झाल्या. मांडीतून रक्त वाहू लागले पण गुरूंच्या विश्रामात व्यत्यय नको म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही. शेवटी रक्ताचा ओघळ मानेखाली जाऊन परशुरामाला जाग आली. एखादा ब्राम्हण हे सारं सहन करू शकणार नाही, याबद्दल परशुरामाची खात्री. त्याने खोदून खोदून विचारल्यावर कर्णाला आपण सूतपुत्र असल्याचे कबूल करावे लागले. परशुराम यावेळी त्याला शाप देतो, ‘ऐन युद्धात तुला शिकवलेले मंत्र आठवणार नाहीत.’ ही कथा आठवताना मनात येतं, कर्ण खोटं बोलला हे खरे? पण का? त्या मागची त्याची ज्ञाननिष्ठा परशुरामाला का नाही जाणवली? परशुरामाला जाग येऊ नये, म्हणून त्याने सोसलेल्या वेदनांचे, त्याच्या गुरुनिष्ठेचे मोल काहीच का नव्हते?

 कर्ण पुढे म्हणतो, ‘परोपकार करताना मी धारणीमातेला अनावधानाने सतावलं

 तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं. ‘ हा संदर्भ मात्र फारसा कुणाला माहीत नाही. एकदा कर्ण आपल्या राज्यातून फिरत असताना त्याला एक मुलगी रडताना दिसली. त्याने कारण विचारलं असता ती म्हणते की तिच्याकडून मातीचं भांडं पडलं. त्यात तूप होतं. ते आईला कळलं, तर आई रागावणार, म्हणून ती रडत होती. कर्ण म्हणाला, तुला नवीन तुपाचे भांडे घेऊन देतो, पण तिने हट्ट धरला, तिला जमिनीवर पडलेले तूपच हवे आहे. कर्णाला तिची दया आली. त्याने स्वत:च्या हाताने मातीत पडलेले तूप उचलले. ती माती हातात घेऊन, पिळून त्यातून तूप काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हातातून एका बाईचा आवाज आला. ती धरणीमाता होती. ती म्हणाली, ‘या मुलीसाठी तू माझी पिळवणूक करीत आहेस.’ आणि तिने कर्णाला शाप दिला की युद्धाच्या वेळी ती त्याच्या रथाचे चाक पकडून ठेवेल आणि त्यामुळे शत्रू त्याच्यावर सहज हल्ला करू शकेल.

 या प्रसंगी कर्णाने दाखवलेली माणुसकी, परोपकाराची भावना धारणीमातेला नाही का जाणवली?

 कवयत्रीने इथे कुठेही तपशिलाचा फापटपसारा मांडला नाही. एक-दोन ओळी लिहून त्यातून घटिताचा संदर्भ सुचवला आहे. 

 कर्ण प्रश्न विचारतो, ‘रथहीन, शास्त्रीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना

कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?’

असे अनेक प्रश्न कर्णाला सतावताहेत. कर्णाच्या आत्म्याला त्या प्रश्नांच्या जंजाळातून मुक्ती हवीय. कर्ण तेजस्वी, धैर्यशील, उदार, गुणसंपन्न. तरीही आयुष्यभर त्याला अपमान, अवहेलना सहन करावी लागते. त्याचा दोष नसतानाही त्याचं आयुष्य रखरखित वाळवंट होतं. अनेक व्यथा, वेदना भोगत त्याला जगावं लागतं आणि तरीही कर्ण त्यांना क्षमा करतो. शेवटी त्या लिहितात, ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,

हे धरित्री, हे मधुसूदना

मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे.’

ब्रह्मांडाला तेज देणारा आपला पिता आपल्यासाठी काहीच का करू शकला नाही, ही खंत वागवत, अखेरीस तो त्यालाही क्षमा करून टाकतो.

आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,

हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे.’

आणि कविता एका परमोच्च बिंदूशी येऊन थांबते.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

निरोप… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे

मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे  ||ध्रु||

 

स्थावर-जंगम तेही सोडा देह नसे आपुला

क्षणभंगुर तो मिथ्या तरीही मोह उगा ठेविला

आत्म्याचे अस्तित्व चिरंतन अंतरी जाणावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे   ||१||

 

आयुष्यातिल खस्ता आणिक कष्टा ज्या भोगले

फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले

सेवा हाची धर्म जाणुनी माझे नाही म्हणावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे  ||२||

 

काय अपुले काय नसे हे अता तरी उमगावे

मोह वासना त्यात गुंतुनी घुटमळुनी का ऱ्हावे

मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारुनी द्यावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे ||३||

 

सहा रिपूंच्या फेऱ्यामध्ये सदैव भिरभिरणे

नसणे अन् नाहीसे होणे यात चिमटुनी जगणे

आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे

कधी अचानक कुणास नकळत निघूनिया जावे  ||४||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

[email protected]

☆ निरोप – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆

निरोप :  विरक्तिपर विचारांची भावमधुर कविता – अमिता कर्णिक-पाटणकर

सिद्धहस्त साहित्यिक-कवी डॉक्टर निशिकांत श्रोत्री  यांची ‘ निरोप ‘ ही कविता वाचली व प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकलीही. तेव्हापासून एका नितांतसुंदर काव्याचा आनंद अनुभवते आहे.

कवितेची सुरुवातच ” कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे,  मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे” ह्या निरोपाच्या ओळींनी होते. हा निरोप इहलोकाचा आहे हे लख्खपणे सामोरे येते आणि थोडी उदासी, थोडी विषण्णता जाणवण्याच्या अपेक्षेने आपण पुढे वाचू लागतो. कविता सहजपणे उलगडत जाते ती अशाच निवृत्तिपर शब्दांनी. या जगातून निघून जाण्याआधीची नितळ आणि निखळ मनोऽवस्था पारदर्शी दिसते.

स्थावर- जंगम संपत्ती तर सोडाच,  हा देहही आपल्या मालकीचा नाही; मग त्याचा मोह कशासाठी धरावा हा मूलभूत प्रश्नच कवी विचारतो. ” फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले ” ही ओळ तर गीतेच्या निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञानच! आयुष्य जसे समोर आले तसे जगण्याचे,  कष्ट-हालअपेष्टा सहन करण्याचे बळच ह्या मनोवृत्तीतून मिळाले असणार.  म्हणूनच ‘ इदं न मम ‘ – ” माझे ‘नाही’ म्हणावे ” असे कवी सहजगत्या म्हणतो. जीवन क्षणभंगुर आहे हे एकदा आकळले की मग त्यातील भावभावना, कामनावासना व्यर्थ वाटू लागतात. मग ” मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारून द्यावे ” अशी जणू जीवाला ओढ लागते. अंतिम चरणातही बंदिस्त आयुष्याची घुसमट कवी मांडतो पण शेवटच्या ओळीत मात्र कविता वळण घेते – “आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे ” असे म्हणत एक वेगळीच उंची गाठते.  आणि हेच या कवितेचे सार आहे.

जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांना जोडणारा पथ म्हणजे जीवन. या पथावर अनेक खाचाखळगे असतात तसेच सुखद थांबेही असतात. हे सर्व भोगत आणि उपभोगत मार्गक्रमण करायचे असते. हा मार्ग शेवटच्या मुक्कामाकडेच जातो हे अटळ सत्य सर्वांनाच पचवता येत नाही. मृत्यू हा दुःखद अंत आहे हीच भावना प्रायशः असते. इथेच डॉ. श्रोत्रींचं वेगळेपण जाणवतं. कवितेत कुठेच भय दिसत नाही, संध्याछाया ह्रदयाला भिववत नाहीत,  दुःखाचे उमाळे फुटत नाहीत.  उलट, विरागी योग्यांची अनासक्ती, तृप्तीच जाणवते. हे अजिबात सोपं नाही.  वास्तविक साधूसंतांची हीच शिकवण आहे, पण सर्वसामान्य जनांना आचरणात आणणं अवघड वाटतं. डॉ. श्रोत्रींनी मात्र हे सहज अंगीकारलं आहे असं  कवितेत ठायी ठायी दिसून येतं.

आयुष्यात सुखदुःखांना सोबत घेऊनच मार्ग चालावा लागतो. पण या मार्गावर एक एक ओझं उतरवत, विरक्त होत होत पुढे चालत राहिलं तर पैलतीर दिसू लागल्यावर आपण मुक्त,  निर्विकल्प होऊन ‘निरोपा’साठी मनोमन तयार असतो. आपला नश्वर देह मागे सोडावा लागला तरी खरा साथी ‘ आत्मा ‘ चिरंतन आहे,  अमर्त्य आहे हा दिलासा मिळाल्यावर भीतीला वावच उरत नाही. अविनाशी आत्म्याचा हा अनंताचा प्रवास निरंतर चालूच राहतो. तो संपत आल्यासारखा वाटला तरी खऱ्या अर्थाने कधी संपणार नसतोच….तो केवळ एक निरोप असतो – पुन्हा भेटण्यासाठी घेतलेला निरोप!

ऐहिक जीवनाचं वैय्यर्थ दाखवूनही सकारात्मक विचार मांडणारी ‘निरोप’ ही  कविवर्य डॉ. निशिकांत श्रोत्री  यांची कविता  म्हणूनच मला अतिशय उदात्त आणि उत्कट वाटली!

© सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर

[email protected]

९९२०४३३२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||

 

जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत

नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म

परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||

 

दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले

नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले

तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||

 

जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात

नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ

कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.

माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत  कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.

कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.

कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान  स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.

दुसऱ्या  कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती.  जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी  स्वामी समर्थाना देतात.

मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।

परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”

ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.

तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे

न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं

ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट  जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.

© श्री श्रीकांत पुंडलिक

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

अल्प परिचय 

बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले.

कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.

? काव्यानंद ?

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते.

साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते.

कवितेतील प्रेयसी जर  कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू ढाळावा एवढी माफक अपेक्षा करणारा प्रियकर कवीने काव्य रसिकांसमोर शब्दांतून उभा केला आहे .

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

 विसरलीस जर कधी जीवनी एक वचन तू देइ मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।ध्रु।।

 

प्रीत तरल ना देहवासना ही आत्म्याची साद तुला

एकरूप मी तव  हृदयाशी क्षण न साहवे द्वैत मला

पवित्र असता प्रेम चिरंतन विसरणार मी कसे तुला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।१।।

 

जगायचे ते तुला आठवत मरणही यावे तुज साठी

कधी न सुटाव्या शाश्वत अपुल्या प्रेमाच्या रेशिमगाठी

मृत्यूनंतर येउ परतुनि प्रेमपूर्तीची आंस मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।२।।

 डॉ निशिकांत श्रोत्री

निशिगंध – रसग्रहण

प्रेम विश्वात रममाण असणाऱ्या प्रियकराच्या मनात उगीच शंका येते आणि तो प्रेयसीला म्हणतो की जर कधी जीवनात तू मला विसरलीस तरी एक वचन मात्र तू मला दे .ती विसरणार नाही याची खात्री विसरलीस जर या शब्दातून व्यक्त होते. तसेच पुढे तो म्हणतो की तू विसरलीस आणि जर कधी मी तुझ्या स्मृतीत डोकावलो म्हणजे त्याचा आठव जरी तिच्या मनात आला तर एक अश्रू मात्र तू ढाळ. भला हा शब्द अश्रूशी  निगडीत करताना तिच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गैरभाव ,गैरसमज नसावा हे सूचित केले आहे. विरह किंवा वियोग जर का झाला तर तो केवळ परिस्थितीमुळे होईल त्याच्या वर्तनाने नाही असा विश्वास या कवितेतून आपल्यासमोर व्यक्त केला गेला आहे .विसरली तरी प्रेयसी कडून वचन मागणारा, कधी तरी तिच्या स्मृतीत डोकावण्याची ,झाकण्याची मनोमन खात्री बाळगणारा हा प्रियकर मनाला मोहवून जातो.

ध्रुवपदामध्ये विसरलीस जर कधी ,तरी एक वचन दे, हा विरोधाभास मनाला भावतो.तसेच अश्रूला भला हे अत्यंत वेगळे विशेषण वापरले आहे.प्रियकराच्या सात्विक प्रेमाची साक्ष पटवणारा हा समर्पक शब्द कवितेतील आशयाला पुष्टी देतो.

 पहिल्या कडव्यात तो म्हणतो माझी प्रीत ही तरल निष्कलंक आहे .त्या भावनेत देहवासना,कामवासना नाही. तर ही आत्म्याची आत्म्याला साद आहे .तो खात्रीपूर्वक म्हणतो की तो तिच्या हृदयाशी एकरूप झाला आहे. ही समरसता, हे तादात्म्य आहे ते मनोमन झालेले आहे. त्यात अंतर नाही. त्यातले बंधन अनाठायी नाही.त्यामुळे कुठलेही ,कसलेही द्वैत अगदी क्षणा पुरते ही त्याला सहन होणार नाही.त्यांच्यातले प्रेम हे पवित्र तसेच चिरंतन आहे याची ग्वाही त्याच्या मनाला आहे त्यामुळे तो तिला कधीच विसरणार नाही हे ही तो स्पष्ट करतो. आणि असे असूनही जर कधी ती विसरली तर तो तिच्याकडून एकच वचन मागतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक भला अश्रू तिने ढाळावा.

देह व आत्मा यांचा उल्लेख प्रीतिला आध्यात्मिक उंची देतो.द्वैत व अद्वैत यांचा सुस्पष्ट व सुसंस्कृत विचार प्रेमाचा अर्थपूर्ण आविष्कार घडवतो.जे पवित्र ते चिरंतन हा साक्षात्कार प्रीतीच्या भावनेला पटणारा. एकरूप व द्वैत या विरोधाभासातून प्रीतिचे खरे स्वरूप प्रकटते. तुला, मला, भला अशा यमक सिध्दीने कवितेला सुंदर गेयता लाभली आहे.त्यामुळे कवितेतील भावार्थ सहजपणे लक्षात येतो.कवितेशी वाचकांची समरसता प्रस्थापित होते.

दुसऱ्या कडव्यात  प्रेयसीच्या केवळ एका अश्रूची  माफक अपेक्षा ठेवणारा तो म्हणतो की जे जगायचं ते तिला आठवत जगायचं आणि जर मरण आलं तर तेही तिच्यासाठी यावं असं त्याला वाटतं. सर्वस्व ,आपले जीवन तिच्यावर ओवाळून टाकण्याची त्याची मानसिक तयारी आहे. त्याच वेळी शाश्वत असलेल्या प्रेमाच्या रेशीमगाठी कधी न सुटाव्यात अशी योग्य व रास्त अपेक्षा तो बाळगून आहे .त्यांच्या प्रेमावर त्याची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला खात्री आहे जर कधी मृत्यू आला तर परत येऊन म्हणजे जणू काही पुनर्जन्म घेऊन आपण या इहलोकी परतू .कारण त्याला या प्रेमपूर्तीची आस आहे.स्वतः चे प्रेयसी वरील पवित्र,शाश्वत,निरंतर प्रेम याची कल्पना,जाण तिला देता देता प्राक्तनी कदाचित येईल अशा विरहाचा विचार त्याला सर्वथैव बैचेन करतो. त्यामुळे व्यथित तो प्रेयसीच्या प्रेमाविषयी खात्री असूनही साशंकता व्यक्त करतो.पण ती व्यक्त करताना ही त्यात तिच्या शाश्वत प्रेमाचा अर्थपूर्ण उल्लेख करतो.एकमेकांच्या सान्निध्यात जगत असताना चिरंतन प्रेमभावनेची जाण असूनही शाश्वत मरणाचे भान त्याला आहे.मृत्युने वियोग घडला तरी पुनर्जन्मी पुन्हा भेट होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.तुजसाठी, रेशिमगाठी हे यमक साधले आहे.रेशिमगाठी शब्द वापरून प्रीतिची मुलायमता अधोरेखित केली आहे.

 संपूर्ण कवितेत प्रीत भावनेला सुयोग्य पणे व्यक्त करताना समर्पक व सुलभ शब्द योजना कवीने केली आहे.त्यामुळे प्रीतिचा तरल, पवित्र शाश्वत भाव मनाला स्पर्शून जातो.भावनेचा खरेपणा व त्यातली आर्तता मनाला भिडते.साहित्यिक अलंकारांचा अट्टाहास न ठेवता भावनेचा प्रांजळ पणा जपण्याचे भान कवीने ठेवले आहे. कवीची साहित्यविषयक, भाषाविषयक व काव्य विषयक सजगता यातून प्रतीत होते.साधी पण भावुकतेत न्हालेली ही कविता सर्वांना आवडेल अशीच आहे.

© सुश्री नीलिमा खरे

३-१०-२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ लिम्ब… शांता शेळके ☆

निळ्या निळ्या आकाशाची

पार्श्वभूमी चेतोहार

भव्य वृक्ष हा लिंबाचा

शोभतसे तिच्यावर

 

किती रम्य दिसे याचा

पर्णसंभार हिरवा

पाहताच तयाकडे

लाभे मनाला गारवा

 

बलशाली याचा बुंधा

फांद्या सुदीर्घ विशाला

भय दूर घालवून

स्थैर्य देतात चित्ताला

 

उग्र जरा परी गोड

गन्ध मोहरास याच्या

कटु मधुर भावना

जणु माझ्याच मनीच्या

 

टक लावून कितीदा

बघते मी याच्याकडे

सुखदुःख अंतरीचे

सर्व करीते उघडे!

 

माझ्या नयनांची भाषा

सारी कळते यालाही

मूक भाषेत आपुल्या

मज दिलासा तो देई

 

स्नेहभाव आम्हातील

नाही कुणा कळायाचे

ज्ञात आहे आम्हांलाच

मुग्ध नाते हे आमुचे !

– शांताबाई शेळके

☆ काव्यानंद – लिम्ब….शांताबाई शेळके ☆

शांताबाई शेळके यांच्या आत्मपर कवितांपैकी एक कविता–लिम्ब  (अर्थात  कडुलिम्ब!)

निसर्गाचा आणि मानवी मनाचा संबंध हा अनादी कालापासूनचा आहे.आपल्या आनंदाच्या उत्सवात माणूस निसर्गाला विसरलेला नाही आणि आपल्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी निसर्गासारखा दुसरा मित्र नाही.’आपुलाच वाद आपणाशी’ हा सुद्धा निसर्गाच्या सहवासातच होतो.त्यामुळे शांताबाईंसारख्या कवयित्रीने निसर्गाशी साधलेली जवळीक आणि संवाद समजून घेण्यासारखा आहे.

‘लिम्ब’ ही  कविता वाचल्यावर प्रथमदर्शनी ती  निसर्ग कविता वाटते.असे वाटण्याचे कारण म्हणजे कवितेचे शिर्षक आणि पहिली तीन कडवी.पहिल्या तीन कडव्यात बाईंनी  लिंबाच्या झाडाचे फक्त वर्णन केले आहे.बलशाली बुंधा असलेला,विशाल फांद्या असलेला,त्याच्या पर्णसंभारामुळे मनाला गारवा देणारा,आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला हा भव्य वृक्ष मन आकर्षित करून घेणारा असा आहे.कुठे दिसला असेल हा वृक्ष त्यांना ? एखाद्या माळावर,प्रवासात,एखाद्या खेड्यात किंवा कदाचित अगदी घराजवळही.पण त्यांनी केलेले वर्णन हे इतके बोलके आहे की तो आपल्याला मात्र पुस्तकाच्या पानातून सहज भेटून जातो.पण कविता इथे संपत नाही तर इथे सुरू होते.कारण कुठेही सहजासहजी दिसणारा हा वृक्ष कवयित्रीचा सखा बनून जातो.

पुढच्या तीन कडव्यात त्या काय म्हणतात पहा.कडुलिम्बाच्या मोहोराला येणारा गंध गोडसर उग्र असा असतो.आपल्या मनातील भावनाही अशाच नाहीत का? थोड्या गोड तर थोड्या गोड.त्यामुळेच त्यांची आणि लिंबाची  मैत्री होते.आत्ममग्न अवस्थेत एकटक त्याच्याकडे बघत असताना,नकळतपणे आपल्या मनातील सुखदुःख  त्या वृक्षासमोर उघडे करत असतात.जितक्या नकळतपणे मैत्रिणिशी बोलावे तितक्या सहजपणे त्या वृक्षाशी मनातल्या मनात बोलत असतात.या एकटक बघण्यातूनच त्या वृक्षालाही त्यांच्या डोळ्यांची भाषा समजू लागली आहे आणि तोही आपल्या मूक भाषेतून त्यांच्याशी समजुतिचा संवाद साधत आहे.निसर्गाशी एकरूप होणं याशिवाय वेगळं काय असतं ?त्यामुळे ही मैत्री इतकी घट्ट झाली आहे की त्यांच्यातले मुग्ध नाते हे शब्दांच्या पलिकडले आहे आणि म्हणूनच ते इतरांना समजण्यासारखे नाही.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे तसा तो निसर्गप्रियही आहे.आपण निसर्गाशी जितकी जवळीक साधावी तितका तो आपलासा होऊन जातो.मग तोच आपला सुखदुःखातील भागीदार बनतो.आपली विमनस्क अवस्था दूर करायला मदत करतो.कवयित्रीच्या आत्ममग्नतेमुळे रसिकांना ,साध्या सोप्या भाषेतील पण उत्तम कविता वाचायला मिळाली आहे.लिम्बासारखीच गारवा देणारी आणि मन सदैव हिरवे गार

ठेवणारी!

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मैत्रिण… कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा पाटील (मनप्रीत)

अल्प परिचय 

सीमा ह.पाटील. (मनप्रीत)

शिक्षण – M.com. D.ed.

सम्प्रति – पंधरा वर्षे हायस्कुल शिक्षिका.

सध्या प्रायव्हेट ट्युशन 10th पर्यंत आणि एकयशस्वी  उद्योजिका.

आवड-  नाटकपाहणे,भावगीतांचे, सुगम संगीताचे कार्यक्रम एन्जॉय करणे. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे.वाचन,भावलेल्या प्रसंगावर लिखाण, कथा लेखन , कविता लेखन , चारोळ्या लेखन .अनेक लेखन स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम केले आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते ‘प्रीतिसरी ‘ हा  चारोळी संग्रह  प्रकाशीत झाला आहे. थोड्याच दिवसात काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे. सभोवतालचा परिसर ‘या सदरांतर्गत महाराष्टातील अनेक किल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

 सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. विविध महिला ग्रुप मध्ये सक्रिय. तसेच  राजकीय  सक्रिय सहभाग.

अलीकडे ‘गझल’ हा लिखाणाचा अतिशय सुंदर आणि माझा आवडता प्रकार शिकत आहेत.

? काव्यानंद ?

 ☆ मैत्रिण…कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

कै. शांता शेळके

मैत्रिण – 

स्वप्नातल्या माझ्या सखी

कोणते तुझे गाव?

कसे तुझे रंगरुप

काय तुझे नाव?

 

कशी तुझी रितभात?

कोणती तुझी वाणी?

कसे तुझ्या देशामधले

जमीन, आभाळ, पाणी?

 

लव्ह्याळ्याच्या मुळांतून

झिरपताना पाणी

त्यात पावले बुडवून तू ही

गुणगुणतेस का गाणी?

 

सुगंधित झुळका चार

केसांमध्ये खोवून

तू ही बसतेस ऊन कोवळे

अंगावर घेऊन?

 

काजळकाळ्या ढगांवर

अचल लावून दृष्टी

तू ही कधी आतल्याआत

खूप होतेस कष्टी?

 

कुठेतरी खचित खचित

आहे सारे खास,

कुठेतरी आहेस तू ही

नाही नुसता भास.

  • शांता शेळके

☆ रसग्रहण ☆

आज खूप सुंदर आणि हळवे भाव व्यक्त करणारी जेष्ठ कवयित्री शांता यांची ‘मैत्रीण ‘एक अप्रतिम  कविता !सादर केली आहे.

 स्वप्नातल्या माझ्या सखी

 कोणते तुझे गाव?

 कसे तुझे रंगरुप

 काय तुझे नाव?

कवयित्री स्वप्नातल्या आपल्या सखीशी संवाद साधत असताना अगदी अनोळखीपणे विचारत आहेत, अग सखी तुझे गाव कोणते? तू दिसतेस कशी? आणि तुझे नाव काय?

म्हणजेच कधी कधी आपल्या स्वतः मधीलच काही वैशिष्ट्ये आपणास वेगळी वाटू लागतात. आणि याच वैशिष्ट्यांना आपण असे प्रश्न विचारतो म्हणजेच आपण एखादे आपले मत मांडत असू तेव्हा किंवा जेव्हा आपण एखादी भूमिका पार पाडत असतो किंवा तेव्हा त्याबद्दल आपण जर साशंक असू अशा वेळी द्विधा मनस्थिती  बद्दल आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारत आहोत असं काहीसं या ओळीतून कवयित्रीला सांगावेसे वाटते असे वाटते.

 कशी तुझी रितभात?

 कोणती तुझी वाणी?

 कसे तुझ्या देशामधले

 जमीन,आभाळ, पाणी?

 लव्ह्याळ्याच्या मुळांतून

 झिरपताना पाणी

 त्यात पावले बुडवून तू ही

 गुणगुणतेस का गाणी?

वरील कवितेतून कवयित्री आपल्या मनात लपलेल्या सखीच्या कानात हळूच प्रश्न विचारत आहे माझी जी व्यक्त होण्याची पद्धत आहे तीच तुझी स्वतःची आहे का? की काही वेगळ्या परंपरा, रूढी यांच्या प्रभावाखाली येऊन तू काही निर्णय घेत तर नाहीस ना?

तू जे काही वर्तन करतेस त्यातून तुला नक्कीच आनंद मिळत आहे ना? असं कवयित्री अगदी हळव्या भावनेसह गुणगुणतेस ना गाणी अशा सुंदर शब्दांत विचारत आहेत.

 काजळकाळ्या ढगांवर

 अचल लावून दृष्टी

 तू ही कधी आतल्याआत

 खूप होतेस कष्टी?

 कुठेतरी खचित खचित

 आहे सारे खास,

 कुठेतरी आहेस तू ही

 नाही नुसता भास.

वरील ओळी मधून कवयित्री शांता शेळके यांनी जीवन जगत असताना प्रत्येक स्त्री च्या मनाची तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतानाही भविष्यातील काही गोष्टींचा विचार करून नाईलाजाने गप्प बसावे लागते तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते तिचे अगदी भावस्पर्शी वर्णन वरील कवितेतील कडव्या मधून केले आहे त्या म्हणतात पाण्याने गच्च भरलेल्या कृष्ण ढगासारखी म्हणजेच पापणी आड सजलेल्या अश्रू ना बाहेर न येऊ देता अगदी प्रयासाने तू ते थांबवतेस ना, हो अगदी नक्की मी तुला अगदी जवळून ओळखते, कारण मी तुझी जिवलग सखी ना?

म्हणजेच प्रत्येक स्त्री च्या मनात एखाद्या दुःखी प्रसंगी लपलेल्या एका असहाय्य  भावनेची समजूत काढताना कवयित्री इथे दिसत आहेत !!

© सीमा पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिरवी कोडी… वि. म. कुलकर्णी ☆ रसास्वाद – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ हिरवी कोडी… वि. म. कुलकर्णी ☆ रसास्वाद – श्री सुहास रघुनाथ पंडित

निष्कलंक, निरागस, बालपणातील आठवणी मनाच्या कोप-यात घर करून राहिलेल्या असतात. वर्षामागून वर्षे निघून जातील पण या आठवणी तिथेच अंग चोरून बसलेल्या असतात. मनाचा कोपरा कधी तरी साफ करावासा वाटतो आणि नकळत लक्ष जातं अशा कोप-यातल्या आठवणींकडे. शांत जलाशयावर एखाद्या धक्क्याने तरंग  उठावेत तसे मनोपटलावरही तरंग उठतात आणि आठवणींच्या लाटा हळुवारपणे एका मागे एक उमटू लागतात. मनच ते. जितक पुढ धावेल तितकंच मागे मागेही जाईल. मग बालपणातल्या टवटवीत आठवणी डोळ्यासमोर जाग्या व्हायला कितीसा वेळ लागणार?

कवीवर्य  वि. म. कुलकर्णी यांच्या ‘हिरवी कोडी ‘ या कवितेत हेच भाव व्यक्त झालेत असे वाटते. स्नेह भाव  व मनाची नितळता ही त्यांच्या फक्त स्वभावातच नव्हती तर कवितेतूनही दिसून येत होती. हिरवी कोडी मध्ये त्यांनी   जे प्रसंग चित्रित केले आहेत ते किती सौम्यभाषेत रंगवलेले आहेत ते समजून घेण्यासारखे आहे. आयुष्यतील कारकिर्दीची वर्षे ही शहरात व्यतीत झाली असली तरी मनातील गावाकडील बालपणीच्या आठवणींचा झरा बुजलेला नाही. शालेय जीवनातील सवंगडी आणि एखादी बालमैत्रिण दृष्टीआड झाली तरी स्मृतीआड होत नाहीय. ते गाव, तिथला ओढा, तिचं त्या गोड पाण्यात खेळणं, अंगावर उडणारे शिंतोडे , त्यामुळे होणारी जीवाची थरथर!शिंतोडे नव्हतेच ते, तो तर होता तिचा अप्रत्यक्ष स्पर्श. त्याशिवाय का जीवाची थरथर होईल?चवळीच्या शेंगांसारखा रानचा मेवा. त्या शेंगांनी भरलेली  ओंजळ याच्यासाठी रिकामी व्हायची, केवळ मैत्रीपोटी. आणि तो झोपाळा आजही झुलवतोय मनाला. झोका द्यायचा तिचा हुकूम हा मुकाट्याने कसा काय पाळायचा?केवळ मैत्री. जणू काहीनितळ मनाचे शीतल चांदणे.

आणि आज? ओढा गेला दूर देशी. शाळा झाली नजरेआड. घर म्हणजे फक्त आठवण. धुक्यामुळे धुसर दिसावे तसे काळाच्या पडद्याआडून पुसटसे दिसते आहे, थोडेसे स्मरते आहे. मन थरथरून उठते आहे. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतात मनात फुलणारी हिरवी कोडी! हो, कोडीच.  ज्यांची उत्तरं तेव्हाही मिळाली नव्हती आणि आताही मिळत नाहीत. किंवा उत्तरं मिळू नयेत असही वाटत असेल. कोडी मात्र हिरवी आहेत. तेव्हाही आणि आताही. हिरवेपणा न संपणारी, कधीच न उलगडणारी ! तुमच्या आमच्या मनातही असतातच ना अशी काही कोडी?

वि. मं. नी ती आपल्यालासमोर मांडली. आपणही उलगडूया आपल्या मनातली कोडी, हिरवी,

मन हिरवं गार राहण्यासाठी!

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खेळाचा चक्कर भवरा… डॉ सरोजिनी बाबर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? काव्यानंद ?

 ☆ खेळाचा चक्कर भवरा… डॉ सरोजिनी बाबर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ काव्यानंद ☆

वीस एप्रिल हा डॉक्टर सरोजिनी बाबर, लेखिका, लोकसाहित्यिका, कवयित्री, बालगीतकार यांचा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने:

 खेळाचा चक्कर भवरा…

नदीच्या तासात वाळूच्या जोषात

कहार उन्हात कामाला उपस्थित

आळवावा सारंग धरा

हासर्‍या नजरेनं  खुशीच्या बोलीनं

फुलवाव्या येरझारा

गर्जू दे नभाला

नाचू दे वीजेला

सोडीत अमृतधारा

करा रे हाकारा

पिटा रे डांगोरा

खेळाचा चक्कर भवरा…

☆ रसग्रहण ☆

जुन १९७३ साली मान्यवर कवयित्री सरोजिनी बाबर यांनी लिहिलेली ही सुंदर, आशयघन, मानव आणि निसर्ग यांच्या नात्यावरची ही कविता.

ही कविता वाचताना सहज लक्षात येतं की, या कवितेत एक आळवणी आहे. पाऊस म्हणजे जीवन. या पर्जन्य धारांची सारं चराचर आतुरतेनं वाट पहात असतं.

जसं बळीराजाचं जीवन त्यावर अवलंबून असतं तसंच, जीवलोकांत अनेकांचं असतं. त्यातलाच एक सारंगधर.

एक नावाडी. खलाशी. किंवा नदीच्या पात्रांत, समुद्राच्या ऊदरात मच्छीमारी करणारा कोळी.

मग या पावसाची ही भक्तीभावाने ,हसर्‍या नजरेनं, खुशीच्या स्वरात केलेली एक आर्त अशी विनवणी या कवितेत जाणवते. पावसाच्या आगमनासाठी केलेली प्रयत्नपूर्वक, कष्टमय तयारीही आहे. मग पाऊस येणार आहे, आकाश गडगडणार आहे, वीजा चमकणार आहेत, आणि मग  अमृतमय पर्जन्यधारा कोसळणार आहेत.. हा आनंदीआनंद होत असताना, एका नादमय हर्षकल्लोळात एक चक्कर भवरा म्हणजे मन गिरक्या घेणार आहे.

कवयित्रीने अतिशय आनंदमयी शब्दांतून सारंगाशी हा स्फूर्तीदायी संवाद साधला आहे.

सारंग या शब्दाचा संगीतातील एका रागाशीही संबंध आहे.

हा एक मधुर सुरावटीचा राग असून,  त्याच्या आळवणीने, ऊष्म प्रहरात शीतलतेचाही अनुभव येतो.कवयित्री सरोजिनी ताईंनी आळवावा सारंगधरा याअर्थानेही म्हटले असावे.

आणखी एक अर्थ असाही जाणवतो. की सारंग म्हणजे शीव. शीवाची आळवणी म्हणजेही पर्जन्यदेवतेचीच आराधना.

मात्र या संपूर्ण काव्यरचनेला एक नाद आहे. लय आहे. गती आहे. वेग आहे. आणि शब्दाशब्दांत चैतन्य ठासून भरलेलं आहे. या काव्यशब्दांबरोबर संवेदनशील मन या आनंदरसात किंवा या हर्षलाटेत डुंबून जाते.. एक शीतल, ओलाव्याचा अनुभव येतो.

सारंगधरा, येरझारा, अमृतधारा, हाकारा, डांगोरा भवरा या यमकीय शब्दांमधला वेग  नाद आणि लय इतकी सुंदर आहे की ही कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते गावीशी वाटते.

मूळातच डाॅ.सरोजिनी बाबर हे एक लोकव्यक्तीमत्व होतं.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी आयुष्यभर केला. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समीतीच्या त्या अध्यक्ष होत्या. दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य

त्यांनी संकलीत केल. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या, लोकवाङमयाचा खूप मोठा संग्रह त्यांनी केला. त्यात कोळ्यांची गीते, कथा, कहाण्या, म्हणी, ऊखाणे, सण ऊत्सव, रितीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.

अर्थातच, त्यांच्या लेखनावर, काव्य रचनेवर लोकसंस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि निसर्गाचा प्रभाव जाणवतो.

ऊपरोक्त, नदीच्या तासात वाळूच्या जोषात.. ही कविताही लोकसाहित्याच्याच अनूषंगाने जाणारी आहे.

त्यातले, कहार, हाकारा, डांगोरा, चक्कर भवरा हे बोलीभाषेतले शब्द वेगळ्याच माधुर्याने लिंपलेले आहेत.

या कवितेतला सारंगधर हा कष्टकरी वर्गातला, निसर्गाशी बांधलेला प्रतिनिधी आहे. आणि सरोजिनीताई काव्यातून त्याच्या जीवनाशी सहजपणे समरस होतात. हेच या काव्याचे वैशिष्ट्य.

अडगुळं मडगुळं

सोन्याचं कडबुळं

खेळायला आलं ग

लाडाचं डबुलं

जावळात भुरभुरलं

नजरेत खुदखुदलं

सोन्याच्या ढीगाव

बाळ गं बैसलं..

हे त्यांचं बडबडगीत घराघरातली माता आपल्या तान्हुल्या साठी गाते.

त्यांच्या झोळणा, चाफेकळी या काव्य संग्रहातील कविता वेगळ्या का वाटतात? कारण ते शब्दालंकारच जीवनाला भिडणार्‍या संस्कृतीतले आहेत. त्यात अपार आपलेपणा आहे. त्यातल्या भावना नैसर्गिक आहेत. त्या चटकन् भिडतात.

‘माझ्या खुणा माझ्या मला’ .. हे आत्मचरित्रही त्यांनी लिहीलं.

दूरचित्रवाणीवर, रानजाई या कार्यक्रमातून, कवीश्रेष्ठ शांताबाई शेळके यांच्याशी केलेल्या गप्पा प्रचंड गाजल्या.

जाता जाता, सहज एक लोकभाषेतला, या कार्यक्रमातला गंमतीदार किस्सा आठवला तो सांगते.

कुणीतरी घरातल्या कारभारणीला विचारतात,

“का वं मालक हायत का घरला? “

कारभारीण उत्तरते, ” काय की हो..खुंटीवरचं मुंडासं दिसं नाय मला…”

याचा अर्थ मी ऊलगडवून सांगायला नको. त्यातली गंमत तुम्हीच अनुभवावी..

तर असं हे विलक्षण सरोजिनी बाबर नावाचं विलक्षण लोकव्यक्तीमत्व!त्यांनी पाचशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. बळीराजा, जा माझ्या माहेरा, कुलदैवत, कारागिरी,एक होता राजा या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या.

एक गोष्ट खेदपूर्वक आणि जाणीवपूर्वक नमूद करावीशी वाटते की पुस्तकांसाठी खास प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या आप्पा बळवंत चौक इथल्या एकाही दुकानात ,डाॅ. सरोजिनी बाबर यांचं साहित्य उपलब्ध नाही. त्यांचं पुनर् मुद्रण व्हावं ही अपेक्षा ठेवून या थोर व्यक्तीमत्वाला आजच्या स्मृतीदिनी मी सादर वंदन करते…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझिया माहेरा जा ! … कवी राजा बढे  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ माझिया माहेरा जा ! … कवी राजा बढे  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

माझिया माहेरा जा !

माझिया माहेरा जा,  रे पाखरा,

माझिया माहेरा जा !

 

देतें तुझ्या सोबतीला, आतुरलें माझें मन

वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण

मायेची माउली, सांजेची साउली माझा ग भाईराजा !

 

माझ्या रे भावाची ऊंच हवेली

वहिनी माझी नवीनवेली

भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा !

 

अंगणात पारिजात, तिथं घ्याहो घ्या विसावा

दरवळे बाई गंध, चोहिंकडे गावोगावा

हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची

माझ्या माय माऊलीच्या काळजाच्या कीं तोलाचीं

‘तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी’

सांगा पाखरांनो, तिचिये कानी

एवढा निरोप माझा !

 

गीत — राजा बढे

संगीत — पु. ल. देशपांडे

स्वर — ज्योत्स्ना भोळे

संकलक — ज्योत्स्ना तानवडे. पुणे

 

☆ रसग्रहण ☆ ” माझिया माहेरा जा ” कवी — राजा बढे ☆

श्री. राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्यलेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख कवी आणि गीतकार अशीच होती.

अतिशय भावमधुर, नाजूक, हळव्या भावनांची अप्रतिम भावगीते लिहिणारे ते कोमलवृत्तीचे प्रतिभासंपन्न कवी होते. संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचाही त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांची भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली होती.

चांदणे शिंपीत जाशी, हसतेस अशी का मनी, दे मला गे चंद्रिके, त्या चित्त चोरट्याला, कशी ही लाज गडे, कळीदार कपुरी पान, कशी रे तुला भेटू, जय जय महाराष्ट्र माझा, दार उघड बये आता दार उघड अशी एकाहून एक अप्रतिम गीते लिहिणाऱ्या राजा बढे यांचे असेच एक सर्वांग सुंदर गीत म्हणजे ” माझिया माहेरा जा ! “

‘माहेर’ हा समस्त स्त्री वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग स्त्रीचे भावविश्व व्यापणाऱ्या माहेर या विषयावर अतिशय संवेदनशील शब्दप्रभू राजा बढे लिहीत असतील तर काय ? एक अतिशय हळुवार, भावसंपन्न काव्य जन्माला आले, ” माझिया माहेरा जा पाखरा “

पूर्वीच्या काळी सतत माहेरी जाणे सहज शक्य व्हायचं नाही. संपर्काची तर कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. पण मन मात्र सतत माहेरच्या विचारात गुंतलेले असायचे. मग हेच विचार जात्यावरील ओव्यातून, उखाण्यातून, नाहीतर अशा एखाद्या गाण्यातून व्यक्त व्हायचे. म्हणून ते गाणाऱ्याच्या, ऐकणाराच्या दोघांच्याही अंतर्मनाला स्पर्शुन जायचे.  त्यामुळेच या गीतात एक सासुरवाशीण एका पाखराला आर्जवी स्वरात विनंती करते ती आपल्या मनाला भिडते.

आईला कुणा हाती निरोप पाठवावा हे न समजून ती पाखरापाशी आपले मन मोकळे करते. त्याच्याबरोबर निरोप पाठवायची ही कल्पनाच मनोहरी आहे. माहेरच्या विचाराने अधीर, उत्सुक बनलेले तिचे मन प्रत्येक शब्दातून प्रत्ययाला येते. आपले माहेर ओळखण्याच्या खाणाखुणा ती सांगते. सोबतीला आपले आतुरलेले मन आणि वाटाडी म्हणून आपली आठवण देते. भावाची हवेली उंच आहे. ती सापडणे अगदी सहजशक्य आहे. नवीन लग्न झालेली नवीनवेली वहिनी घरी आहे. ही वहिनी म्हणजे भोळ्या शंकराची जणू भोळी गिरिजा अशीच आहे. घराबद्दल सांगताना घरातल्यांच्या बद्दलच्या आपल्या भावना पण ती पाखराला सांगून जाते. अंगणातल्या पारिजातकाचा दरवळ म्हणजे मायेच्या माहेराची चहूकडे पसरलेली कीर्ती. माय माऊलीचे काळीज या फुलांच्या इतकेच नाजूक. किती छान उपमा आहेत ना ! ‘तुझी लेक सासरी सुखात आहे’ एवढाच निरोप आईला सांगायची तिची विनंती आहे. एवढ्या निरोपानेही दोघीजणी आपापल्या ठिकाणी बिनघोर होणार आहेत. हे अंतर्मनाचे संकेत आहेत.

‘माहेर’ या भावनेची पकड संपूर्ण गीतात कुठेच सैल होत नाही. यातूनच हे उत्तम काव्य साकार  होते. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न संगीतकाराने या गीताला अप्रतिम चालीत बद्ध केले आहे. योग्य तिथे येणारा ताल आणि गायनाचा ठेहराव शब्दांची परिणामकारकता वाढवितो. ‘हळुच उतरा खाली’ या ओळीच्या सुरावटीने अगदी पायर्‍या खाली उतरल्या सारखे वाटते. संपूर्ण गाणे एक हळुवार अप्रतिम सुंदर अनुभूती देऊन जाते.

राजा बढे यांचे भावपूर्ण शब्द, पु.ल.देशपांडे यांची भावानुकूल स्वररचना आणि मन आकर्षित करणारी ज्योत्स्ना भोळे यांची गायन शैली यांच्यामुळे हे भावगीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. या त्रिवेणी संगमा मुळे ही भावकविता आजही तितकीच मनाला जाऊन भिडते.

आज सतत माहेरी जाता येते, हाताशी संपर्काची विविध माध्यमे उपलब्ध असण्याच्या काळात या गीताची अपूर्वाई तितकी जाणवणार नाही. पण त्या काळाची कल्पना करून गीत ऐकले तर निश्चित ती अनुभूती जाणवेल.

माझे वडील हार्मोनियमवर हे गाणे वाजवत आणि आई अतिशय सुंदर ते म्हणत असे. त्यामुळे माझ्यासाठी तर ही मर्मबंधाची ठेव आहे.

कवी. राजा बढे यांच्या या सुंदर रचनेला सलाम आणि त्यांना विनम्र अभिवादन.

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सावरकरांची कविता…रसग्रहण

☆ वृषोक्ती ☆

गाडीला वृष जुंपिला धरित जो जू मानेवरी

आला ऊंच चढून घाट दमला गेला आवांका तरी

होता वाहून नेत वाहत तरी तो?! मंदचारी तया

कोणी हिंदु वदे सगर्व ह्रदये धिक्कारवाणीस या।।१।।

 

हा धिक् रे वृष,मान वाकवूनिया तू दाससा राबशी

मोठे जूं जड हे असह्य भार हा विश्रांतिही ना तशी

तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी हा तरी

वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वजन्म हा अंतरी ।।२।।

 

ऐके तू वृष शांतिने सकल हे उद्गार  त्याचे असे

दावोनि स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे.

बोले हिंदुसी त्या,अरे मज बहु निंदावचे ताडिले

दावि त्वस्थिति अल्पही न तुजला हे म्यां मनी ताडिले।।३।।

 

निंदाव्यंजक शब्द योजूनी बहु माझ्या धन्या निंदसी

कैसा वागवितो तुला तव धनी शोधूनी पाहे मनी।।४।।

 

ज्याते राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली

दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्ते ज्याला दिली

लोखंडी असताही कांचनमया केलीस यद् भू अरे

तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कधी सत्वरे।।५।।

 

किंवा तू म्हणशील की तव धनी आभार भारी वदे

राजे रावबहाद्दुरादिक तुला मोठ्या किताबांसी दे

ऐसे शुष्क किताब घेउनी तुवा स्वातंत्र्य संपत दिली।।६।।

 

दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती

तेव्हां येउनि मानवी तनुस बां तू साधिले काय ते

भूभारापरी गर्वभार अजुनु त्वचित्त का वाहते।।७।।

 

सोडी गर्व स्वदेशभार हरण्या यत्नांसी आधी करी

होई इशपदी सुलीन पुरवी सद्हेतुला श्रीहरी।।८।।…..

 

☆ रसग्रहण ☆

वृषोक्ती  ही  कविता सावरकरांनी १९०१ साली लिहीलेली आहे. एकदा जव्हार घाटातून बैलगाडीने प्रवास करत असताना त्यांना ती सुचली. या कवितेतली त्यांची कल्पकता आणि विचार दोन्हीही थक्क करणारे आहेत.

१९०१ सालचा काव्यकाळ हा वृत्तबद्ध ,

छंद काव्याचा होता.अलंकारिक भाषेचा होता.आजची मराठी आणि तेव्हांची मराठी यात खूप अंतर होते. त्यावेळची भाषा संस्कृतप्रचुर,नटलेली अवघड होती.पण अर्थातच रसाळ होती.वृषोक्ती या सावरकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना मला ते जाणवलं.शिवाय ,ने मजसी ने …किंवा जयोस्तुते ..या काव्यरचनांची संगीतबद्ध गाणी झाली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहचली पण सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत की त्यातून सावरकर एक संवेदनशील ,डोळस,कणखर व्यक्तीमत्व आपल्याला दिसतं..

वृष म्हणजे बैल आणि वृषोक्ती म्हणजे बैलाने ऊद्गारलेले…ही काव्यरचना शार्दुलविक्रीडित या वृत्तात बद्ध आहे.या वृत्तात चार चरण, १९वर्ण आणि प्रत्येक बारा वर्णानंतर यती असतो.या दृष्टीनेही ही कविता व्याकरण शुद्ध आहे.लयीत आहे म्हणून अर्थ उलगडता येतो.

या कवितेत एक काल्पनिक संवाद आहे.

बैलाचा आणि एका गर्विष्ठ माणसाचा..

तो पारतंत्र्याचा काळ होता.आणि स्वातंत्र्याचे वारे हळुहळु वाहत होते.

गाडीला जुंपलेल्या, हळुहळु घाट चढून पार दमलेल्या बैलाकडे पाहून एक स्वत:त रमलेला भारतीय माणूस त्याची  निर्भस्तना करतो.मानेवर  जू ठेवून धन्याची सेवा करणारा बैल म्हणून त्याचा धिक्कार करतो.

त्याचवेळी हा बैल मनोमन हसतो आणि त्याला एक चपखल, प्रखर उत्तर देतो.

“अरे! तू माझी आणि माझ्या धन्याची काय निंदा करतोस..तू कधी तुझा  विचार केला आहेस…आज तुझी काय स्थिती आहे हे कळलंय् का तुला..आर्यांची  तुझ्या कष्टाने उभारलेली ही  सुवर्णभूमी तू परकीयांच्या हवाली केलीस.स्वत:च्याच भूमीत तू त्यांची चाकरी करतोस. त्याचं वेतन तरी तुला कधी मिळतं का वेळेवर ? त्यांनी दिलेले राजे रावबहादुर या किताबातच तू खूष आहेस…त्यांच्या भाषेतला आभार हा बेगडी शब्द तुला भुलवतो…अरे त्या बदल्यात तुझं लाखमोलाचं स्वातंत्र्य हरण केलय् त्यांनी.. याची जाणीव आहे कां तुला..

त्यापेक्षा मी बैल बरा ..धन्याच्यात आणि माझ्यात परस्पर सांमजस्य आहे..प्रेम आहे.

तू माणसाच्या जन्माला येऊन काय मिळवलंस…? परकीयांची गुलामगिरी..

धिक्कार असो तुझा…माणूसपणाचा मला जो गर्व दाखवतोस ,तो सोड..स्वभूमीला पारतंत्र्यातून सोडव…

प्रयत्नांची पराकाष्ठा कर…या उदात्त कार्यात परमेश्वरही तुला मदत करेल…..

हा या कवितेचा सारांश! एक सुंदर रुपकात्मक संदेश देणारा…ही कविता वाचताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकर किती झपाटलेले होते हे जाणवतं.

लोकांमधे जागृती निर्माण करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.अरे परकीयांचं जोखड घेऊन जगण्यार्‍या तुझ्यापेक्षा तो बैल बरा…

अशा शब्दात ते त्याची कानउघाडणी करतात…

सावरकरांचा कणखरपणा ,विद्रोह  शब्दाशब्दात जाणवतो.ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी काव्य हे माध्यम प्रभावीपणे वापरलं.त्याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर नक्कीच झाला.

या काव्यात उद्विग्नतेबरोबर उपहासही जाणवतो…

शिवाय ही कविता, आता काळ ओलांडून गेली असेही वाटत नाही.ती कालातीत आहे.

जेव्हांजेव्हां माणसाच्या मनावर वैचारिक गंज चढतो तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलामच बनतो.आज देश स्वतंत्र असला तरीही एक बौद्धीक पांगळेपण समाजात जाणवतं. अशावेळी सावरकरांची ही वृषोक्ती नक्कीच परिणामकारक आहे..

२६फेब्रुवारी हा सावरकर   यांचा स्मृतीदिन!! त्या निमीत्ताने त्यांच्या कवितेतलं हे विचार मंथन…

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print