हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #206 ☆ एक बाल गीत – बरखा रानी बड़ी सुहानी ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है एक बाल गीत – बरखा  रानी  बड़ी  सुहानीआप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 205 ☆

☆ एक बाल गीत – बरखा  रानी  बड़ी  सुहानी ☆ श्री संतोष नेमा ☆

बरखा  रानी  बड़ी  सुहानी

छम छम बरसाती  है पानी

बरखा  रानी  बड़ी  सुहानी

*

बरसे जब आती  हरियाली

खुशी किसान झूमते माली

प्यासे  पपीहे झूम के  बोलें

आगई  अब  रुत  मस्तानी

बरखा  रानी  बड़ी  सुहानी

*

मेढक टर टर कर चिल्लायें

पशु – पक्षी   झूमें   इतराएं

गाँवों में खेलते खूब गपन्नी

नानी  सुनाती  नई  कहानी

बरखा  रानी  बड़ी  सुहानी

*

इक कागज की नाव बनाते

पानी  में  जब  उसे   बहाते

चली हवा बादल जब गरजे

पानी  में  तब  नाव  समानी

बरखा  रानी   बड़ी  सुहानी

*

कोयल  मीठे  गीत  सुनाती

पक्षी कलरव  सबको भाती

कारे  बदरा  झूम- झूम कर

बरसें   खूब  जमीं   हर्षानी

बरखा  रानी  बड़ी  सुहानी

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्री राजीव पुजारी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री राजीव पुजारी

💐अ भि नं द न 💐

प्रामुख्याने ‘अंतराळ विज्ञान‘ या विषयावर अभ्यासपूर्ण आणि विस्तृत लेखन सातत्याने करणारे आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक म्हणजे श्री. राजीव पुजारी. “अंतराळ वेध“ या नावाचे त्यांचे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. आता ‘सर्वद फौंडेशन, मुंबई यांच्यातर्फे साहित्यातील भरीव आणि प्रचंड कार्याबद्दल दिला जाणारा सन्मान्य राज्यस्तरीय स्टार साहित्य पुरस्कार“ (२०२४) श्री. पुजारी यांना दिला जात आहे.

💐ई-अभिव्यक्ती समूहातर्फे श्री. पुजारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 213 ☆ क्रांतीज्योतीची गौरवगाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 213 – विजय साहित्य ?

क्रांतीज्योतीची गौरवगाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

समाज नारी साक्षर करण्या

झटली माता साऊ रे .

क्रांतीज्योतीची गौरवगाथा

खुल्या दिलाने गाऊ रे . . . !

*

सक्षम व्हावी, अबला नारी

म्हणून झिजली साऊ रे

ज्योतिबाची समता यात्रा

पैलतीराला नेऊ रे . . . . !

*

कर्मठतेचे बंधन तोडून

शिकली माता साऊ रे

शिक्षण, समता, आणि बंधुता

मोल तयाचे जाणू रे. . . . !

*

कधी आंदोलन, कधी प्रबोधन

काव्यफुलांची गाथा रे

गृहिणी मधली तिची लेखणी

वसा क्रांतीचा घेऊ रे. . . . !

*

दीन दलितांसाठी जगली

यशवंतांची आऊ रे

दुष्काळात धावून गेली

हाती घेऊन खाऊ रे . . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(गागागागा गागागागा गागागागा)

रोजच घेते आव्हाने ती बाई असते

कारुण्याचा जी पान्हा ती आई असते

*

जाता रोजी रोटी साठी कामा कोणी

पोरांना जी वाढवते ती दाई असते

*

बघता हर नर वाटे तिजला दादा भाई

वाटो अपुली ताई वा ती माई असते

*

करते कामे सारी श्रद्धा नी सबुरीने

संघर्षाला फळ मिळते ती साई असते

*

दिनचर्या मग होते व्याघ्रा मागे घेउन

तारेवरची कसरत नी ती घाई असते

*

असती नाना ढंगी नाना रंगी रूपे

वज्रासम तर केव्हा मउ ती जाई असते

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नुकताच 4 मार्च हा दिवस सुरक्षा दिन म्हणून साजरा केला गेला. ह्या दिवसापासून एक सप्ताह हा  राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह असतो. ह्या निमित्ताने सुरक्षेचे नियम,ते पाळतांना आपण घ्यायची काळजी,ती काळजी घेतल्यामुळे आपल्याला मिळालेले फायदे ह्या बाबतचे वेगवेगळे फलक चौकाचौकात बघायला मिळतात.

खरतरं सुरक्षा पाळणे ही बाब सप्ताहाशी निगडीत नकोच.हा खरतरं वर्षभर राबविण्याचा उपक्रम. पण आपल्या कडील ही शोकांतिकाच आहे ज्या बाबी दररोज,चोवीस तास पाळल्या गेल्या पाहिजेत त्या महत्त्वाच्या गोष्टींचे सप्ताह किंवा दिवस पाळून औटघटकेचे महत्त्व आणून त्याची बोळवण केली जाते. असो.

मानवी जीवन अनमोल आहे तसेच ते क्षणभंगुर सुध्दा आहे.म्हणून आपणच आपल्या जिवीताची काळजी घेणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे.आपण स्वतः नियमांचे पालन करीत नसू,त्यांचा बेछूट पणे भंग करीत असू तर आपल्याला त्याच्या पायी आलेल्या नुकसानीस दुस-याला जबाबदार धरण्याचा काहीच हक्क नसावा आणि नुकसानभरपाई मागण्याचा पण.

वाहनाचा अनियंत्रित भन्नाट वेग, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणे हे आपण आणि आपणच टाळायला हवे. आपल्या कडील शोकांतिका म्हणजे चुका आधी आपण करायच्या, खापर दुसऱ्याच्या माथी मारायचे आणि मग सरकारला मदतीस वेठीस धरायचे. तेव्हां ह्या गोष्टीची खबरदारी आपणच सुजाण नागरिक म्हणून घ्यायलाच हवी.

जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा ही काही कालावधीसाठी न राहता ती कायमस्वरूपी पाळण्याची आपली प्रत्येकाची आपणहून मानसिकता बनेल तो दिवस खरा आपल्यासाठी आणि देशासाठी सुध्दा सुदिन ठरेल.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पडीक… भाग – 2 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ पडीक… भाग – 2 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(वाईट वाटलं ज्याच्यासोबत आयुष्य गेलं, त्याला एवढीही खंत कधी वाटू नये … विठ्ठल मात्र माझ्या जवळ तसाच आहे.. जपलेला छोटी रखुमाई पण आहे.. त्याची ट्रंकेत बसलेली..) – इथून पुढे 

*आजी परत शुन्यात गेली. त्या जागेची हि जादू होती का,..? असं मला वाटलं,.. मग मी रोजच आजीला तिथे नेत होते आजी उलगडत गेली,.. फार छोट्या अपेक्षा घेऊन ह्या बायकांनी संसार केलेले असतात रे… आणि मग त्याचे सल असे उतारवयात येत असतील मनात,.. आजीला माहेरवरून आलेला तन्मनी आजोबांच्या एका उद्योगात विकावा लागला म्हणे,.. तुला डाळिंबी पैठणी घेऊ असं नुसतंच म्हणत राहिले अशी तक्रारही होती आजीची,.. बऱ्याच गमती सांगितल्या… पण एक मात्र आजी खरं बोलली,.. “जोडी विरुद्ध होती आमची ते नास्तिक… तर मी देवभोळी ,.. त्यांचा कष्टावर विश्वास होता, पण काही उद्योग करायला गेले तर मी नामस्मरण सोडत नव्हते,.. विरुद्ध असलो, तरी संसाराला पुरक होतो म्हणुन इथपर्यंत आलो,.. आज हे वैभव पाहायला मिळालं,.. म्हणत आजी गोड हसली,… मला म्हणाली, “तुला दाखवते माझे विठ्ठल रुखमाई,… आजीने ट्रँक उघडली,.. त्यात आजीचा त्याकाळी दुसरी पास दाखला दिसला त्यावर जन्मतारीख दिसली,..*

*आजीचा एक्यांशीवा वाढदिवस… मग ठरवून टाकलं सगळी हौस करू,.. सगळ्यांशी बोलले,.. सगळे खुशीत तयार झाले,.. बाबा तर म्हणाले, “माझ्या बाबाने नाही दिलेलं गिफ्ट मीच देतो तिला… म्हणून तर तू सकाळी मागे जाऊन बघ.. मस्त छोटसं देऊळ बांधलं आहे,.. आजीला वाढदिवसाला हे मोठं सरप्राईज आहे,.. सध्या तिची खिडकी मीच बांधकाम करण्यापूर्वी बंद केली… म्हंटलं, पलीकडे नवीन इमारत होते त्याची धुळ येईल खोलीत,.. रोज म्हणतात खिडकी कधी उघडायची,.. मला तर फार छान वाटतंय आजीला आनंद देताना,..*

*सर्वेशने परत तिला जवळ घेतलं,.. मला पण अशीच बायको हवी होती माझ्या आजीपासून माणसं जपणारी,.. मी हरतालिका नव्हतो करत, पण आजी जवळची ती रुखमाई मला वाटायचीच कौतुकास्पद खांद्याला खांदा लावून उभी असलेली. मग मी ही प्रार्थना करायचो, विठ्ठलाची भक्त सांभाळणारी त्याची रखु तशी आपल्याला मिळावी आपली माणसं सांभाळणारी आणि मग तुझ्या प्रार्थना रिटर्न्सचा फॉर्म्युला चालला की ग मस्त म्हणुन तर तू आलीस जगण्यात म्हणत त्याने तिला कुशीत ओढलं तशी लाजत ती म्हणाली,..”चल मला आणखी खुप काम आहेत,..”ती पळाली.*

*सकाळपासुन जरा जास्तच गडबड जाणवली तसं आजी म्हणाली , “रेवा अग आज काही कार्यक्रम आहे का?फुलांचे सुवास येत आहेत,.. बारिक सनई वाजतीये ग,.. रेवा म्हणाली, ” हो आहे कार्यक्रम आणि त्यासाठी मी तुम्हांला माझ्या हाताने आवरून देणार,..” म्हणत डाळिंबी पैठणी तिने समोर धरली,.. आजी हरखलीच… अगदी तिला हवी तशी ती पैठणी नऊवारी,.. रेवाने सगळं छान आवरून दिलं,.. रेवाची सासु मदतीला आली,.. तन्मनी घातल्यावर तर आजी सारखी त्याला हातात घेऊन निरखत होती,.. आजी कशालाच नाही नको म्हणत नव्हती,.. आजीला हॉलमध्ये आणलं,.. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत फुलं उधळली आजीच्या डोक्यावर,.. रेवाचे सासरे म्हणाले, “आई नात सुनेने केलेला थाट आवडला का,..?”आजी अगदी भरभरून म्हणाली, “हो खुप आवडला,..”*

*सर्वेश म्हणाला, “आजी अग खर गिफ्ट तर बघ अजुन ..” म्हणत सगळे मागच्या पडीक घराकडे निघाले,… आजी हसत म्हणाली, “अग रेवा आपली चहा पिण्याची जागा सगळयांना सांगितली का? तिथेच सगळ्यांनी चहा घ्यायचा का आज,..?कशाला चाललो आपण पडीक घराकडे,..?”*

*तेवढ्यात समोरच दृश्य बघून आजी स्तब्ध झाली,.. डोळे झरझर वाहायला लागले,.. पडीक जागा हरवली होती तिथे उभं होतं टुमदार देऊळ आणि त्यात आजीचे विठू रुखमाई,.. बाजुला चकचकीत पितळी समई तिच्या ज्योतीचा प्रकाश काळ्याभोर विठूवर प्रसन्नता आणणारा अगदी तसाच जसा आता आजीच्या चेहऱ्यावर,… रेवा म्हणाली, “आजी हे तुमच्या आवडीचे मोगऱ्याचे दाट हार,.. घाला त्यांना वाढदिवस झाला खरा साजरा,.. आजी आनंदाने इतकी रडत होती, कि मध्येच सगळं धूसर होत होतं,…*

*सावळा विठू तिच्याकडे पाहून हसतोय असा तिला भास झाला,.. तिने थरथरत हार घातले,.. सर्वेशला आठवली आपल्या लग्ना आधीची पडीकआजी आणि आजची आजी अगदी ह्या विठ्ठलासारखी प्रसन्न झालेली,.. मोगऱ्याने दरवळण सुरू केलं होतं,.. जसं पडीक जागेने आणि पडीक माणसानं,.. रेवा सर्वेश जवळ येऊन म्हणाली, “नक्कीच आजी विठूला ह्या देवळाची प्रार्थना नेहमी करत असेल, म्हणून तर युनिव्हर्सने तिची प्रार्थना पूर्ण केली ,..”*

*सर्वेश म्हणाला,” मी ही प्रार्थना केली आहे तुला या क्षणी मिठी मारण्याची,..”*

*रेवा एकदम हसली. त्याला एक धक्का देत पळाली, सर्वेश तिला बघतच राहिला मनात म्हणाला,.. “तू अशीच उत्साही राहा… अगदी पडीक जागाही चैतन्यमयी करणारी,….” त्याला या विचारा क्षणी जाणवलं… विठ्ठला जवळची रुखमाई त्याला बघून हसत होती,…. मोगऱ्याची दरवळ आता जास्तच जाणवत होती…*

… *मित्रांनो, विचार करा, आपल्या घरी, आपली आजी, आई, अर्धांगिनी, आजोबा, वडील, यांची कोणती छोटी अपेक्षा आपल्याकडून नकळत राहिली आहे का? विचार करा, कृती करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य मिरवू यात, त्यांचे क्षण सुखकर करूया.*

– समाप्त – 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता 

मी खरंतर एकट्याने फिरणारा फिरस्ता. माझ्या लग्नाच्या अगोदर मी एकट्याने ६०% भारत भ्रमंती केली होती.

वपण लग्न झाल्यावर अनेकदा आम्ही म्हणजे, सौ.मधुरा व दोन्ही कन्यांसह स्वतः प्लॅन करून फिरायला जायचो. माझ्या गप्पा मारण्याच्या सवयीने अनेक लहान- मोठ्यांच्या ओळखी डोंबिवलीत होऊ लागल्या होत्या. त्यातील एक म्हणजे श्री.व सौ.दुनाखे दांपत्य. त्यांचा स्वतःचा ‘मधुचंदा ‘ नावाचा पर्यटन व्यवसाय. ते एकदा सहज गप्पांच्या ओघात म्हणाले ,’चला मनोजभै तुम्हीपण आमच्या बरोबर, सिमला-कुलू-मनालीला ! म्हटलं किती खर्च येईल? आम्ही दोघं व दोन लहान मुली. ही गोष्ट १९९७ सालची हं. तेव्हा चंद्रकांत दुनाखे म्हणाले २१००० रूपये. मी विचार केला आणि म्हणालो, ‘मी आत्ता अर्धे देईन, बाकीचे आल्यावर महिन्याभरात देईन, चालेल का ? त्यावर लगेच सौ.निलिमा दुनाखेंनी होकार दर्शवला. आणि दिल्ली-सिमला-कुलू-मनाली, असा  खऱ्या अर्थाने समूह सहलीचा आमचा प्रवास सुरु झाला. राजधानीने सकाळी दिल्लीत पोचल्यावर, श्री.दुनाखे यांनी दिल्ली स्थानकावरच आमचे स्वागत केले आणि  मग छान आरामशीर बसप्रवास सुरु झाला.

बसमध्ये मी इतका वेळ शांत कसा बसणार ? माझ्यासाठी मोठाच प्रश्न होता. म्हटलं चला आता अन् सुरू झालो. मी स्वतःची व माझ्या कुटुंबाची ओळख सांगितल्यावर प्रत्येक जण आपली ओळख सांगू लागला. ही ओळखपरेड संपली नि लगेचच जेवणाचा थांबा आला. मस्त सरसोका साग, मक्के की रोटी अन् लय भारी जम्बो लस्सी, क्या बात है! तिथल्या सरदारजी मालकाने सर्वांचे अगत्याने स्वागत करून, आग्रहाने खाऊ घातले. पाजी, की लाऊ जी? लगेच मैं बोल्या, ‘सरदार, अब मेरा पेट फाडेगा क्या? ‘,असं म्हणताच सरदारजी आणि नुकतीच ओळख झालेली मंडळी व त्यांची लहान मुलं खळखळून हसायला लागली.

आपला मित्र सर्वांच्या मनांत भरला ना राव!

असो, सुमारे नऊ तासांच्या प्रवासानंतर आम्ही  सारे, रात्री सिमल्याला पोचलो. बसमधून उतरताच प्रचंड थंडीने आमचे स्वागत केले अन् मग लगोलग मोठ्या मोठ्या खोल्या असलेल्या हॉटेलात जाऊन जेवण करून, सगळे गुडुप! सकाळी नाष्टा करून निघालो की बसने ! चक्क दोन दिवस सिमला दर्शन ! मॉल रोड, कुफरी, चाडविक फॉल्स,जाखू हिल, सिमला राज्य संग्रहालय, समर हिल अशी सर्वांग सुंदर स्थळं  पाहून पुन्हा त्याच अप्रतिम हॉटेलात रात्री मुक्काम ! तिसऱ्या दिवशी सकाळी चहा, नाष्टा करून कुलूचा प्रवास सुरु झाला. चौफेर निसर्गाचं विलोभनीय दर्शन करत करत गाने तो बनता है ना ! मध्येच सुसु ,जेवण -चहा पॉईंट इत्यादि करत-करत संध्याकाळी कुलूला पोचलो.

अप्रतिम बंगलेवजा हॉटेल, क्या बात है ! आणि हिमाचल प्रदेशातील जेवण म्हणजे लाजवाब हो !  दुनाखेंनी कुलूला पोचल्यावर दुसऱ्या दिवसांपासून ते मनाली सोडेस्तोवर मात्र आपलं बुवा हं,  म्हणजे मराठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम सोय केली होती .

तर मंडळी, बियास नदीच्या खोऱ्याच्या भागाला कुलू  म्हणतात. ताज्या भाज्या, मसाले, औषधी वनस्पती, गहू, मका, तुती, देवदार, बार्लीची शेती हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय ! इथली गरीब घरातली मुलं सुद्धा कसली गोड दिसतात हो ! आरोग्यकारक उष्मोदकाचे झरे असल्याने, विहार व विश्राम यांसाठी कुलूला प्रवासी पुष्कळ येतात. येथील प्राचीन हिंदू मंदिरांवरील शिल्प प्रेक्षणीय आहे. त्यामुळे छोटेखानी स्वर्ग असलेल्या कुलूला वेगळेच महत्व आले आहे. दोन दिवस कुलू व्हॅली भटकंती करून, पाचव्या दिवशी आम्ही सकाळी ८ वाजता मनालीकडे निघालो.

कुलू ते मनाली माझ्या अंदाजाने बसने प्रवास ५६ किमी.चा. घाटाघाटातून प्रवास करत अखेर मनालीच्या टुमदार हॉटेलात पोचलो, अन् जेवण करून मनालीतील छोटेखानी मॉलरोडवर फिरायला गेलो. मधुचंदाच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारला. श्री.व सौ.दुनाखे यांचं व्यवस्थापन एकदम चोख, मानलं राव ! सहाव्या दिवशी हिडिंबा मंदिर पहात असताना तर मला काय फोटो मिळाला! मी जाम खूष. जुन्या मनालीतील मनु मंदिर पाहून परत भोजन व आराम करून नागरगढी हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी गेलो, त्याचं किती वर्णन करू तितकं कमीच.

सातव्या दिवशी नेहरू कुंड व विविध पारंपरिक वस्तू आणि इमारतींच्या प्रतिकृती असलेले, हिमाचलचा वारसा प्रदर्शित करणारे, लहानसे संग्रहालय पाहिले आणि संध्याकाळी मस्त आराम केला. आठव्या दिवशी सकाळी – सकाळी सुप्रसिद्ध रोहतांगपास या बर्फाच्छादित रुपडं असलेल्या, प्रसिद्ध ठिकाणी पोचलो. गमबूट, कोट, हातमोजे, टोपी प्रत्येकाच्या आकाराप्रमाणे परिधान करत, चालतोय चालतोय!आलटून -पालटून दोन्ही मुलींना कडेवर घेत, कसेबसे पोचलो अन् समोर जणू काही सिनेमातील दृश्य  अवतरलेलं! आपण आपल्या डोळ्यांनी हे प्रत्यक्ष पाहतोय, यावर विश्वासच बसेना, असा कोसो-दूर पसरलेला बर्फ !आहाहा! आमच्या पैकी बरेच जण  चक्क बर्फावर आडवे झालो. नंतर अर्थातच एकमेकांवर हो हो, तीच फेका-फेकी आम्हीही केली बरं.  पण -पण काहींच्या विकेट जायला सुरवात ना, कारण गमबुटात बर्फ गेल्यामुळे बधिर पणा यायला लागला आणि मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत नुसती धमाल व रडारड की! अन् तिथून सर्वांचे पाय बसकडे वळायला लागले. किती लांब ती बस? त्याला इकडे बोलवा ना ! अखेर हुश्श हुश्श करत सगळेच एकदा भाड्याचे सामान परत देऊन कसे-बसे बसपर्यंत पोचलो. आत जाऊन कधी एकदा बसतोय असं झालं ना ! हु §हु§हु§ बसमध्ये कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, चिडीचूप! 🤗

दुपारी दोनच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो बुआ. त्यादिवशी सगळ्यांनी साडेतिनला गरम -गरम जेवणावर ताव मारला अन गुडुप! संध्याकाळी हळूहळू खोलीच्या बाहेर येऊन, चहाचे घोट घेत, कसली फाटली ना! याचीच चर्चा. पुन्हा गमती-जमती व जेवण करून गप्पांचा फड रंगला आणि हळूहळू आपल्या खोलीत रवाना. इकडे मी आमच्या खोलीत आलो आणि मधुराला कापरं भरलं. मी जाम टरकलो. लगेच सौ.दुनाखे वहिनींना बोलावलं. त्यांनी स्थानिक डॉ.ना फोनाफोनी सुरू केली, पण कोणी फोन उचलेना. कारण मनालीत त्यावेळी संध्याकाळी ७ नंतर सगळे डॉ.भेटणार नाही हं, असं म्हणायचे. मग हॉटेलची मालकीण आली, तिनं बघितलं आणि पांच मिनिटांत आख्खी ब्रँडीची बाटली आणून मधुराच्या पूर्ण शरीराला, तिने ब्रँडीने मसाज केला. एका तासानं ती शुद्धीवर आली अन् आम्ही सारे हुश्श! त्या पंजाबी मालकीणीने सांगितलं,’ ऐसा किसी किसीको होता है, जादा थंड में जाके आने के बाद ऐसा होता है! त्या पंजाबन बाईने एक पैसा घेतला नाही हा तिचा दिलदारपणा हो. ‘ये तो मेरी महमान है जी!’ सलाम त्या माउलीला.

या संपूर्ण प्रवासात सौ.मधुराला मी दम दिला होता, मी छायाचित्रकार आहे हे कोणालाही सांगायचं नाही, नाहीतर मला सहलीचा आनंदच घेता आला नसता. आणि तिने ही गुप्तता पाळली चक्क. 🤗

नवव्या दिवशी आम्ही नाष्टा करून बाप्पा मोरया करत, बसमधून परतीच्या प्रवासाला, म्हणजेच दिल्लीला निघालो. मनालीहून निघालेली बस अडीच तासात कुलू-मनालीच्या मध्येच बंद पडली. आम्ही वाट बघून खाली उतरलो, ड्रायव्हर आणि क्लीनर काय नक्की झालं ते बघत होते. कारण गेले दहा दिवस बसने कुठेही कुरकुर केली नव्हती. नेमकी बंद पडली आणि तीही रस्त्याच्या मधोमध  ना! त्यावेळेस घाटाच्या खाली कुठेही काहीही नव्हतं, फक्त रस्ता, सुंदर निसर्ग व बियास नदीच्या पाण्याचा खळाळता गोड आवाज! एका तासाने समजलं पाटा तुटला अन् बस दुरुस्त व्हायला

किमान ८/९ तास तरी लागतील, होईल हेही नक्की नाही. झालं, नुसता गोंधळ, आमचं विमान / रेल्वेचं आरक्षण आहे ते चुकणार, आता काय होणार, मुलांचं कसं होणार वगैरे वगैरे. हो, आणि ९७ साली मोबाईल नव्हते व आजूबाजूला कुठंही फोन नव्हते. नाही म्हटलं तरी सहल आयोजक पण गोंधळून गेले ना! आम्ही रस्त्यावरच कडेला उभे होतो, तितक्यात श्री.दुनाखे म्हणाले, कोणाचंही नुकसान झाल्यास मी भरपाई देईन हे नक्की! त्यांची काहीच चूक नसताना हे  सांगणं, ही खरंच हिम्मत लागते! ती त्यांनी दाखवली. मला धरमशालाला जाऊन दुसऱ्या बसची सोय करावी लागेल, आणि मगच सर्वांना घेऊन निघावं लागेल. पण यासाठी संध्याकाळ होईल. मी म्हटलं तुम्ही ट्रक वगैरे जी दिसेल त्या गाडीने निघा, मी सांभाळतो सगळ्यांना अन् ते रवाना झाले.

गोंधळ  नुसता वाढतच चाललेला! मी सर्वांना शांत करत परिस्थितीची कल्पना दिली, आता कृपया शांत रहा अन्यथा काहीही होणार नाही.

मी दोघांना घेऊन रस्त्यावर पुढे चालत निघालो. अर्ध्या तासानं छोटं मंदिर दिसलं अन् माझ्या जीवात जीव आला. तिथं पोचल्यावर आत एक माणूस होता, त्याला विचारलं, स्टो वगैरे काही आहे का? सर्व कल्पना दिल्यावर त्याने होकार दिला अन आम्ही खूष झालो. बिचारा सामान घेऊन बस थांबली तिथं आला, त्यानं आडोसा पाहून स्टो पेटवला. मग दुनाखेंचे आचारी होते त्यांनी चहा बनवला. नंतर भात व डाळ शिजायला ठेवली.

इकडे मंडळींना चहा दिल्यामुळे, सगळे शांत झाले होते. आता मी वहिनींची परवानगी घेऊन, बसचा ताबा घेतला. मी फर्मान सोडलं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गमतीदार प्रसंग सांगा, असे म्हणताच एक एक करत बोलू लागले. कोणी म्हणालं लग्न झालं, मुलगा /मुलगी जन्मले / आई बाबांची पुण्याई / माझी कॉलेज मधली मैत्रीण, नेमकी माझ्याच गळ्यात पडली / लॉटरी५० रु. ची लागली / एकजण म्हणाले तुम्हीच भेटला / आमच्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिलाच हनिमून वगैरे करता -करता चक्क ३ तास हशा-टाळ्यात कसे गेले ते समजलंच नाही. मी लगेच खाली उतरून जेवण तयार झालं ना ते बघितलं आणि सर्वांना खाली उतरवलं व सांगितलं थोडं रस्त्याखाली या, इथं थोडी बसायला जागा आहे . सर्व मंडळींचं भोजन उरकेपर्यंत दुपारचे ३ वाजले. मी हुश्श झालो, दुनाखे वहिनी तर मनोमन माझे आभार मानत होत्या. मी म्हटलं लोकं ओरडणार हो साहजिक आहे, पण किती वेळ ओरडतील? 😂

नंतर ज्यांना डुलकी घ्यायची ते बसमध्ये गुडूप, आणि मी चहा बनवण्याच्या तयारीला. संध्याकाळी तिकडे अंधार लवकर पडतो.५ वाजता चहा दिला मंडळी एकदम खूष. केव्हा येणार दुनाखे, कसे येणार, असं करता -करता, रात्री ९ ला श्री.दुनाखे दुसरी बस घेऊन आले आणि सर्व सामान भरून, आपली आपली पार्सलं बसमध्ये बसली अन् गाडी बुला रही है करत, सकाळी दिल्लीत पोचलो.

मंडळी मधुचंदा ट्रॅव्हल्स, उत्तम सोयी, भोजन आणि भरभरून देणारे दुनाखे दांपत्य, काय आणि किती  सांगू ?

आज मधुचंदा खूप मोठी झाली आहे. मुलगा चेतन व सून सौ.अनुजा दोघेही तितकीच काळजी घेतात व देशविदेशात आनंदाने व सुखरूप फिरायला घेऊन जातात.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।

नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्‌ ॥ ११ ॥

*

रणभूमीवर अपुले आसन

कुश मृगचर्म वस्त्र पसरून

अतिउच्च नाही अति नीच ना

स्थिर तयाची करावी स्थापना ॥११॥

*

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।

उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२ ॥

*

आरुढ आसनावरती व्हावे

गात्रे-चित्त क्रिया वश करावे

मनासिया एकाग्र करावे

योगाभ्यासे मन शुद्ध करावे ॥१२॥

*

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।

सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌ ॥ १३ ॥

*

स्थिराचल ठेवुनी कायामस्तकमान 

कायामने अपुल्या अचल स्थिरावुन

नासिकाग्रावरी एकाग्र दृष्टीला करुन

अन्य दिशांना मुळी  ना अवलोकुन ॥१३॥

*

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।

मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥

*

व्रत आचरता ब्रह्मचर्य असावे निर्भय शांत

मनास घालुन आवर व्हावे माझ्या ठायी चित्त ॥१४॥

*

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।

शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥

*

मनावरी संयम योग्याचा निरंतर आत्मा मज ठायी

परमानंद स्वरूपी शांती तयाला निश्चित प्राप्त होई ॥१५॥

*

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।

न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥

*

आहार जयाचा अति अथवा अनशन जो करितो 

अतिनिद्रेच्या आहारी जो वा सदैव जागृत राहतो

सिद्ध होई ना योग तयांना जाणुन घेई कौंतेया

सम्यक आचरणाचे जीवन योगा साध्य कराया ॥१६॥

*

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥

*

युक्त आहार युक्त विहार युक्त यत्न कर्मात 

युक्त निद्रा युक्त जागृति दुःखनाशक योग सिद्ध  ॥१७॥

*

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।

निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥

*

अंकित केले चित्त होता स्थिर परमात्म्यात

भोगलालसा लयास जाते तोचि योगयुक्त ॥१८॥

*

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥

*

पवन नसता वहात जैसा दीप न चंचल  

जितचित्त योगी तैसा परमात्मध्यानी अचल ॥१९॥

*

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।

यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥

*

योगाभ्यासे निरुद्ध केले चित्त होत उपरत

ध्याने  साक्षात्कारी प्रज्ञा परमात्म्यात संतुष्ट ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – बापाचं काळीज… – लेखक – श्री अक्षय भिंगारदिवे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – बापाचं काळीज… – लेखक – श्री अक्षय भिंगारदिवे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मुलगी : गुड मॉर्निंग पप्पा.

वडील : एवढ्या लवकर उठलीस?

मुलगी : हो.

वडील : सासूने कंबरेत लाथ घालून उठवलं की काय?

मुलगी : पप्पा..

वडील : अशीच लवकर उठत जा बेटा. कारण आता तू काय तूझ्या पप्पाच्या घरी नाही.

मुलगी : मारला टोमणा.

वडील : आमचे जावई उठले?

मुलगी : हो. तो सकाळीच उठून जिमला गेलाय.

वडील : लगेच अरे तुरे?

मुलगी : तुमच्याशीच तर बोलतेय.

वडील : अगं पण आजूबाजूला सासरचे लोक असतील. कुणी ऐकलं तर आमचे संस्कार निघायचे.

मुलगी : तसं काही नाही होणार.

वडील : तूझ्या बापाला मान झुकवावी लागेल, असं काही..

मुलगी : हो पप्पा..

वडील : आवडतंय ना तिकडे?

मुलगी : नाही.

वडील : का?

मुलगी : रोपटं उपटून थेट दुसऱ्याच्या अंगणात लावायचं आणि त्यालाच विचारायचं?

वडील : म्हणून तर तूझ्या सावलीवर आता फक्त त्यांचाच अधिकार.

मुलगी : नकोशी झालेली ना पप्पा मी?

वडील : बापाचं कर्तव्य असतं बेटा.

मुलगी : ज्या हाताचा पाळणा केला, त्याच हाताने पाठ थोपटून पाठवणी केली ना? 

वडील : नाईलाज होता बाळा.

मुलगी : कळतंय.

वडील : समजूतदार झालंय माझं लेकरू.

मुलगी : पप्पा, थँक यू..

वडील : का बरं?

मुलगी : जेव्हा सगळे लोक माझ्या लग्नासाठी तुमच्यावर दबाव टाकत होते आणि सतत सगळे चौकश्या करत होते, तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे होतात.

वडील : तुला शिकून स्वावलंबी बनायचं होतं. म्हणून मग समाजाचा विरोध सोसायची तयारी ठेवली.

मुलगी : मागची ४ वर्षे, तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलं.

वडील : तूझ्या आनंदात माझा आनंद.

मुलगी : खरं ना?

वडील : म्हणजे?

मुलगी : माझ्या आनंदात तुमचा आनंद?

वडील : हो.

मुलगी : कुठे आहात?

वडील : बेडरूममध्ये बसलोय.

मुलगी : समोर हिशोबाची डायरी आहे ना?

वडील : आईने सांगितलं?

मुलगी : पप्पा जन्मल्यापासून ओळखते तुम्हाला.

वडील : हो.

मुलगी : हिशोब करताय?

वडील : हो. थोडेफार पैसे देणे बाकी आहे. त्याचीच जुळवाजुळव..

मुलगी : थोडे की फार?

वडील : म्हणजे?

मुलगी : मंगल कार्यालयाचे २ लाख, केटरिंगचे दीड लाख, दागिन्यांचे सव्वा २ लाख, कपडे दीड लाख आणि..  

वडील : तुला कसं माहीत?

मुलगी : तुमच्या हातातील हिशोबाचे डायरी बघतच तर लहानाची मोठी झाले.

वडील : काहीही..

मुलगी : आठवतंय?

वडील : काय?

मुलगी : माझ्या दहावीच्या क्लासची अर्जंट फी भरायची होती.

वडील : हो.

मुलगी : तेव्हा तुम्ही सर्वांकडे पैसे मागितलेले.

वडील : हो. मात्र मार्च एंडमुळे कुणाकडेच पैसे नव्हते.

मुलगी : त्यादिवशी दुपारी तुम्ही घराबाहेर पडलात आणि मग रात्री उशिरा पैसे घेऊन घरी आलात.

वडील : मित्राने मदत केलेली.

मुलगी : खोटं बोललं होतात ना?

वडील : म्हणजे?

मुलगी : त्या दिवसानंतर तुमच्या हातात पुन्हा कधीच तुमची ती आवडती अंगठी दिसली नाही.

वडील : करावं लागतं.

मुलगी : बारावीला फी भरण्यासाठी गळ्यातली सोन्याची चेन?

वडील : तूच माझा दागिना आहे ना पोरी.

मुलगी : कॉलेजला ॲडमिशन झाल्यावर मला कॉम्प्युटर हवा होता.

वडील : तुला प्रॅक्टिस करायला.

मुलगी : तेव्हा गाडी विकून टाकलीत. 

वडील : जुनीच झाली होती.

मुलगी : पप्पा तुम्ही दरवेळी स्वतःचं मन मारून, माझ्या इच्छा पूर्ण केल्या.

वडील : यासाठी फोन केलाय का?

मुलगी : का तुम्ही एवढे समजूतदारपणाने वागलात?

वडील : माझ्या परीला खूप मोठं करून, तिचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्यासाठी.

मुलगी : पलंगावर बसलेले आहात ना?

वडील : हो.

मुलगी : डाव्या हाताच्या बाजूचा ड्रॉवर उघडा.

वडील : का बरं?

मुलगी : उघडा तर..

वडील : काय आहे या एन्वलपमध्ये?

मुलगी : साखरपुड्यानंतर तुमच्या जावयाने नवा फ्लॅट बुक केलेला.

वडील : मग?

मुलगी : तेव्हा मी त्यांना माझ्या सेव्हींगबद्दल सांगितलं.

वडील : काय?

मुलगी : मागील ३ वर्षांपासून मी माझा पगार बँक अकाऊंटमधून काढलेला नाही.

वडील : आपलं तेच ठरलं होतं.

मुलगी : हो. मात्र तुमच्या जावयाला ते मान्य नव्हतं.

वडील : म्हणजे?

मुलगी : त्यांनी लग्नाआधीचे दागिने, पैसे अनाई बाईक माहेरीच सोडून, सासरी यायला सांगितलं. 

वडील : पण..

मुलगी : मी त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने नाही ऐकलं.

वडील : मग?

मुलगी : तोच सेव्हींगच्या जमा रकमेचा १२ लाखाचा चेक आहे.

वडील : तुझी सिक्युरिटी आहे बेटा.

मुलगी : माझा नवरा म्हणतोय की..

वडील : काय?

मुलगी : तू सोबत असशील तर शून्यातून विश्व निर्माण करू.

वडील : अगं पण..

मुलगी : पप्पा आयुष्यभर एवढा समजूतदारपणा दाखवलात ना.. 

वडील : मग?

मुलगी : माझ्या शरीरातही तुमचचं रक्त धावतंय. म्हणून तर समजूतदारपणा आणि स्वाभिमान मला वारसा हक्काने मिळालाय.

वडील : मुलगी म्हणून जन्माला आलीस, मात्र..

मुलगी : मात्र काय?

वडील : कायम आई बनून जीव लावलास.

मुलगी : पप्पा..

वडील : बाळा मी माझ्या काळजावरचं ओझं हलकं करायला गेलो आणि..

मुलगी : काही ओझं वगैरे नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि मी माझं.

वडील : खूप मोठी झालीस पोरे.

मुलगी : उधारी चुकवण्यासाठी घर गहाण ठेवणार होतात ना?

वडील : नाही.

मुलगी : पुन्हा खोटं.

वडील : मी केलं असतं कसंही मॅनेज.

मुलगी : पप्पा नका करू मॅनेज.

वडील : का?

मुलगी : कारण आता तुमची लेक तुम्हाला त्रास द्यायला नाही तिथे.

वडील : गप मूर्ख.

मुलगी : रिटायरमेंटनंतर आईसोबत मस्त परदेशात फिरायला जा. खुप एन्जॉय करा आणि तब्बेतीची काळजी घ्या.

वडील : हो.

मुलगी : आणि एक लक्षात ठेवा.

वडील : काय?

मुलगी : लेक बापाच्या काळजावरचं ओझं नसतं.

वडील : मग?

मुलगी : लेक बापाचं काळीज असतं.

लेखक :  श्री अक्षय भिंगारदिवे

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈