(पूर्वसूत्र- “माय गॉड वुईल रिइम्बर्स माय लॉस इन वन वे आॅर अदर” हे सहजपणे बोलले गेलेले माझे शब्द असे शब्दशः खरे ठरलेले होते. याच्याइतकेच ते तसे ठरणार असल्याची पूर्वकल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या सूचक स्वप्नाद्वारे मला ध्वनित होणे हेही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे, आश्चर्यकारक आणि अलौकिकही होते!!”)
हे असे अनुभव जीवनप्रवासातील माझी वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याच्या मनोमन पटणाऱ्या अंतर्ज्ञानाच्या खूणाच असत माझ्यासाठी!अशा अनुभवांच्या आठवणी नंतरच्या वाटचालीत अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत किंवा अगदी अकल्पित अशा संकटांच्या वेळीही ‘तो’ आपल्यासोबत असल्याचा दिलासाही देत असत.
जन्म-मृत्यू, पुनर्जन्म या संकल्पना आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठीतरी अनाकलनीय, गूढच राहिल्या आहेत. त्यासंबंधीच्या परंपरेने चालत आलेल्या समजुतींच्या योग्य आकलनाअभावी या संकल्पनांवर नकळत गैरसमजुतींची पुटं चढत जातात आणि परिणामत: या संकल्पनांमधलं गूढ मात्र अधिकच गहिरं होत रहातं.
नवे नातेबंध निर्माण करणारे जन्म जितके आनंददायी तितकेच आपल्या प्रिय व्यक्तींचे मृत्यू आपलं भावविश्व उध्वस्त करणारे. या दोन्हींच्या संदर्भातले मी अनुभवलेले सुखदु:खांचे क्षण त्या त्या वेळी मला खूप कांही शिकवून गेलेले आहेत. त्या सगळ्याच अनुभवांच्या एकमेकात गुंतलेल्या धाग्यांचं आकलन जेव्हा अनेक वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर मला अकल्पितपणे झालं त्या क्षणांच्या मोहरा आजही मी माझ्या मनाच्या तिजोरीत आठवणींच्या रूपात जपून ठेवलेल्या आहेत!!
संपूर्ण जगाच्या चलनवलनामागे अदृश्य रुपात कार्यरत असलेल्या सुविहित व्यवस्थेच्या अस्तित्त्वाची जाणीव मला करुन दिलेले ते सगळेच अनुभव आणि त्यातल्या परस्परांमधील ऋणानुबंधांची मला झालेली उकल ही माझ्या मनातील त्या त्या क्षणांमधल्या अतीव दु:ख न् वेदनांवर ‘त्या’ने घातलेली हळूवार फुंकरच ठरलीय माझ्यासाठी! या संदर्भात माझ्या आठवणीत घर करून राहिल्यात त्या माझ्या अगदी जवळच्या अतिशय प्रिय अशा व्यक्तींच्या त्या त्या क्षणी मला उध्वस्त करणाऱ्या मृत्यूंच्या काळसावल्या!आणि तरीही पुढे कालांतराने या सावल्यांनीही जन्म आणि मृत्यू या दोन्हीमधील अतर्क्य अशा संलग्नतेची उकल करुन माझ्या मनात प्रदीर्घकाळ रुतून बसलेल्या दु:खाचं हळूवार सांत्वनही केलेलं आहे.
२६ सप्टेंबर १९७३ची ती काळरात्र मी अजूनही विसरलेलो नाहीय. मला मुंबईत युनियन बॅंकेत जॉईन होऊन जेमतेम दीड वर्ष झालेलं होतं. माझं वास्तव्य दादरला इस्माईल बिल्डिंगमधे माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडीच होतं. त्या रात्री जेवणं आवरुन साधारण दहाच्या सुमारास माझी ताई तिच्या छोट्या बाळाला थोपटून निजवत होती. माझे मेव्हणे आणि मी सर्वांची अंथरुणं घालून झोपायची तयारी करत होतो. तेवढ्यात शेजारच्या गोगटे आजोबांचा त्यांच्या लॅंडलाईनवर फोन आला असल्याचा निरोप आला. त्या काळी घरोघरी लँडलाईन फोनही दुर्मिळच असायचे. इस्माईल बिल्डिंगमधल्या पाच-सहा मजल्यांवरील चाळकऱ्यांपैकी फक्त दोन घरांमधे फोन होते. त्यातील एक असं हे गोगटे कुटुंबीयांचं घर बहिणीच्या शेजारीच होतं आणि ते माझ्या मेव्हण्यांचे लांबचे नातेवाईकही होते. मेव्हणे फोन घ्यायला धावले. इतक्या रात्री कुणाचा फोन असावा हाच विचार इकडे आमच्या डोक्यात. फोनवर बोलून मेव्हणे लगोलग परत आले ते तो अनपेक्षित धक्कादायक निरोप घेऊनच. फोन माझ्या मोठ्या भावाचा होता. माझ्या बाबांना डॉक्टरांच्या सांगण्यावरून इस्लामपूरहून हलवून पुण्याला सिव्हिल हॉस्पिटलमधे ऍडमिट केलेलं होतं. आणि आम्ही सर्वांनी तातडीने पुण्याला हाॅस्पिटलमधे लगोलग पोचावं असा तो निरोप होता! बाबांच्या काळजीने आम्ही सगळेच अस्वस्थ झालो होतो. बाबा आजारी होते, झोपून होते हे आम्हाला माहीत होतं पण तोवर येणाऱ्या खुशालीच्या पत्रांतून असं अचानक गंभीर कांही घडेल याची पुसटशी शक्यताही कधी जाणवली नव्हती. आता कां, कसं यात अडकून न पडता तातडीने निघणं आवश्यक होतं. इतक्या रात्री तातडीने निघून पुण्याला सिव्हिल हाॅस्पिटलला लवकरात लवकर पोचणं गरजेचं होतं. त्याकाळी प्रायव्हेट बसेस नव्हत्याच. इतक्या रात्रीचं एस्टीचं वेळापत्रकही माहित नव्हतं. रिझर्व्हेशन वगैरे असं शेवटच्या क्षणी शक्यही नव्हतं. त्यात बाळाला सोबत घेऊन जायचं दडपण होतं ते वेगळंच.
“तुम्ही तुमचे मोजके कपडे आणि बाळासाठी आवश्यक ते सगळं सामान घेऊन निघायची तयारी करा लगेच. ” मेव्हणे म्हणाले. “मी तुम्हाला रात्री १२ वाजता मु़ंबई-पुणे पॅसेंजर आहे त्यात दादरला बसवून देतो. आपल्या तिघांच्याही आॅफिसमधे रजेचे अर्ज देणं आवश्यक आहे. मी उद्या ते काम करुन मिळेल त्या ट्रेन किंवा बसने पुण्याला हाॅस्पिटलमधे पोचतो. ” मेव्हणे म्हणाले. त्या मन:स्थितीत मला हे सगळं सुचलंच नव्हतं. ताईच्या डोळ्यांना तर खळ नव्हता. ते पाहून कसंबसं स्वतःला सावरत मी माझी घुसमट लपवायचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.
“हे बघ, बाळ सोबत आहे आणि प्रवास रात्रीचा आहे. तरीही आता तूच धीर धरायला हवा. कारण माझ्यापेक्षा तुम्ही दोघांनी तिथं आधी पोचणं आवश्यक आहे. म्हणून तू लहान असूनही ही जबाबदारी तुझ्यावर सोपवावी लागतीय. “
“हो. बरोबर आहे तुमचं. आम्ही जाऊ. “
“सिव्हिल हॉस्पिटल स्टेशनच्या जवळच आहे. पहाटे पोचाल तेव्हा अंधार असेल. जपून जावा. “
“हो” मी म्हणालो.
‘बाबांना अचानक काय झालं असेल, त्यांना तातडीनं तिथं इस्लामपूरला दवाखान्यात न्यायचं, डॉक्टरांशी सल्ला मसलत, पुण्याला आणायचं, त्यासाठी वाहनाची सोय, पैशांची जुळवाजुळव सगळं माझ्या मोठ्या भावानं कसं निभावलं असेल? माझ्यापेक्षा फक्त दोनच वर्षांनी तर तो मोठा. त्या तुलनेत मला या क्षणी स्वीकारावी लागणारी ही जबाबदारी म्हणजे काहीच नाही’ या विचारानेच तोवर स्वतःला खूप लहान समजत असणारा मी त्या एका क्षणात खरंच खूप मोठा होऊन गेलो !!
बाबा माझ्यासाठी फक्त वडिलच नव्हते तर ते माझ्या मनात ‘तो’ रुजवायला, त्याची प्रतिष्ठापना करायला नकळत का असेना पण निमित्त ठरलेला कधीच विसरता न येणारा एक अतिशय मोलाचा असा दुवा होते! त्यांना काही होणं हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं! बाबांइतक्याच आईच्या आठवणीने तर मी अधिकच व्याकूळ होऊन गेलो. या सगळ्या दु:खापेक्षा आपलं अशा अवस्थेत तिच्याजवळ नसणंच मला त्रास देत राहिलं.
गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती. तरीही दोघांना कशीबशी बसायला जागा मिळाली. बाळाला आलटून पालटून मांडीवर घेत ताई न् मी अगदी आमच्या लहानपणापासूनच्या बाबांच्या असंख्य आठवणींबद्दलच रात्रभर बोलत राहिलो होतो.
रात्र सरली ती याच अस्वस्थतेत. भल्या पहाटे पुणे स्टेशनला गाडी थांबताच कसेबसे उतरलो तेव्हा भोवताली अजूनही मिट्ट काळोख होता. तेवढ्यात रात्रभर शांत झोप न झालेलं बाळ किरकिरु लागलं. त्याला सावरत, चुचकारत अंधारातून वाट शोधत कसेबसे सिव्हील हाॅस्पिटलच्या कॅम्पसमधे आलो तेव्हाच नेमके भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाने भोकाड पसरुन रडायला सुरुवात केली. हॉस्पिटलचा मेन एंट्रन्स समोर बऱ्याच अंतरावर होता. नाईलाजाने मी त्या दोघांना घेऊन वाटेतच जवळच्या वडाच्या पारावर बसलो. ताईला इथं एकटीला सोडून उठण्याशिवाय पर्यायच नव्हता.
“ताई, तू याला दूध दे तोवर मी बाबांची रूम कुठे आहे ते पाहून येतो लगेच. चालेल?”
ती ‘बरं’ म्हणाली तसा मी उठलोच. तेवढ्यात मेन एंट्रन्स मधून एक नर्स लगबगीने बाहेर पडताना दिसली. मी तिच्याच दिशेने धावत जाऊन तिला थांबवलं.
“सिस्टर, एक काम होतं. प्लीज. “
मी पेशंटचं नाव, गाव, वर्णन सगळं सांगून त्यांना कालच इथं ऍडमिट केल्याचं सांगितलं. त्यांच्या रूमची कुठे चौकशी करायची ते विचारलं. आश्चर्य म्हणजे ती बाबांच्याच रूममधून नाईट ड्युटी संपवून दुसऱ्या नर्सला चार्ज देऊन आत्ताच बाहेर पडली होती.
“पेशंट खूप सिरीयस आहे. तुम्ही वेळ घालवू नका.. जा लगेच” ती म्हणाली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी मी पुढे धाव घेतली आणि… आणि
ताईची आठवण होताच थबकलो. तीही बाबांच्या ओढीने इथे आलेली होती. तिला तिथं तशी एकटीला सोडून स्वतः एकट्यानेच निघून जाणं योग्य नव्हतंच. मी तसाच मागे फिरलो. धावत तिच्याजवळ आलो. बाळाला उचलून घेतलं.
“ताई, चल लवकर. बाबांची रूम मिळालीय. आपल्याला लगेच जायला हवं.. चल.. ऊठ लवकर” म्हणत बाळाला घेऊन झपाझप चालूही लागलो.
आम्ही घाईघाईने रूम पर्यंत पोहोचणार एवढ्यांत माझा मोठा भाऊ दाराबाहेर डोकावून आमच्याच दिशेने पहात असल्याचं जाणवलं…
“तुमचीच वाट पहातोय, या लवकर… ” म्हणत तो धावत आत गेला पण…. पण… आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… !! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे… तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुध्दा…. !!
ही एका क्षणाची चुकामूक पुढे कितीतरी दिवस मला कासावीस करीत राहिली होती. दुःख बाबा गेल्याचं तर होतंच, पण ते साधी नजरभेटही न होता गेल्याचं दुःख जास्त होतं!
बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं. पण त्याबद्दल त्या दु:खात बुडून गेलेले आम्ही सर्वचजण त्याक्षणी तरी पूर्णत: अनभिज्ञच होतो एवढं खरं!!
मनीषाने घरी येऊन नववीच्या गणिताचे पुस्तक टेबलावर ठेवले व परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी बाहेर काढले. नुकत्याच कामाला लागलेल्या सुमनने गरम चहा मॅडमना आणून दिला.
“वैनी, तुम्ही गणित शिकवता?” सुमनने पुस्तकाकडे बघत विचारलं.
“हो!” मनीषाने चष्मा टेबलावर ठेवून तिनं सुमनने चहा घेतला का विचारलं व ती कामाला लागली.
“मला येत नाही गणित” – “मला जमत नाही” – मला आवडत नाही” अशी वाक्यं बोलायला तिच्या वर्गात कुणालाही परवानगी नव्हती. वर्षाच्या सुरूवातीला तिच्या वर्गातील करूणाला गणितात ५० मार्क देखील मिळत नव्हते. तिला आज ७० मार्क पडलेले बघून मनीषाचं मन अभिमानाने भरून आलं होतं. कायम नापास होणारा सदू हल्ली पास होत होता ! जीव तोडून शिकवलेलं कारणी लागतं असं वाटलं पण ती थबकली..
तिची लेक नेहा घरी आल्याचा आवाज आला.
“नेहा, कशी झाली ग गणिताची टेस्ट? किती मार्क पडले?” तिनं आतून ओरडून विचारलं.
“ शी काय हिची कटकट ! हिला व बाबांना मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलगी कधी दिसते का? बाबा ISRO मधे मोठे इंजिनीअर आणि ही गणित शिकवणारी म्हणजे मी रामानुजन असावं ही यांची अपेक्षा.. नाही येत मला गणित ! नाही मला आवडतं ! “.. वगैरे विचार बोलावेसे वाटले पण तिनं ते आतल्या आत गिळून टाकले.
“आई, खूप अवघड होता पेपर. ७० मार्क पडले !” तिनं खाली बघत उत्तर दिलं.
मनीषाचा चेहरा बदलला. “Highest कोण आहे?”
“ शीतलच की.. तिला १०० मार्क पडले. तिला नेहमी जमतं सगळं !” नेहाला आता रडायला येऊ लागलं..
मनीषा काही बोलली नाही पण मनात आलं.. खरंच पेपर कठीण असेल तर highest पण कमी मार्कांचा असतो असं झालेलं नाही.. म्हणजे..
तिनं नेहासमोर ओटमील व दूध ठेवलं व खाऊन होताच ‘ गणिताचं पुस्तक घेऊन ये ‘ म्हणाली..
“आई, तू आणि बाबा मला मी जशी आहे तशी कधी ॲक्सेप्ट कराल ग?” हे वाक्य बाहेर येऊ पहात होतं पण आईच्या चेहऱ्याकडे बघत तिने ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही..
नेहा ओटमील खाऊन नाराजीने मनीषा समोर बसली.. मनीषाने तिला पाच सहा गणितं करायला दिली.
“मी भाजी घेऊन येते खालून. येईपर्यंत ही गणितं सोडवून ठेव” ती पिशवी घेऊन बाहेर पडली.
सुमन केर काढत होती. नववीतली पोर.. कामाला लागून जेमतेम आठवडा झाला होता. रात्रीची शाळा अन दिवसा काम करून घर चालवायला आईला मदत करत होती.
“नेहा ताई, पहिलं गणित बरोबर आहे. दुसरं चुकलंय.. हे बघ मी हे असं सोडवेन “ म्हणून तिनं नेहाला ते सोडवून दाखवलं. “ आमाला हे असं सोडवायला शिकवलय.. ”
“ सुमन, किती हुशार आहेस ग !” नेहाचा चेहरा खुलला होता.
मनीषा भाजी घेऊन आत आली. आपण करुणा, सदू वगैरे सगळ्यांना गणित शिकवू शकतो पण स्वत:च्या लेकीला का नाही शिकवू शकत? कुठे कमी पडतेय मी? मनीषाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तिनं डोळे मिटून नेहाचा अभ्यासातला संघर्ष आठवला. किती प्रकारे तिला शिकवत असते पण गणितात ६५- ७०% हून पुढे ती जाऊ शकत नाही.
नेहाने बरोबर सोडवलेली गणितं बघून मनीषा थोडी शांत झाली.
“आई, सुमनने मला ही तीन गणितं कशी सोडवायची ते दाखवलं ” नेहा प्रामाणिक होती.
“सुमनने?” तिनं आश्चर्याने विचारले. सुमनने भराभर ती गणितं कशी करायची याच्या दोन पद्धती मनीषाला सांगितल्या. मनीषा थक्क झाली..
“सुमन, उद्यापासून थोडी उशीरा ये. नेहा घरी आली की तिच्याबरोबर अभ्यासाला बस. नेहाबरोबर अभ्यास करणं हेच तुझं काम उद्यापासून. केरवारे वगैरेसाठी मी दुसरी बाई शोधेन! कळलं? ”.. मनीषाचं बोलणं ऐकून सुमन एकदम खूष झाली. नेहाचा चेहरा सुद्धा उजळला..
दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हसत खेळत अभ्यास सुरू झाला. सुमन तरतरीत आहे हे मनीषाला पहिल्या दिवशीच जाणवलं होतं पण ती नेहाला हसवत, मजेशीर गोष्टी सांगत इतकं सुंदर कशी शिकवू शकते याचं तिला फार आश्चर्य वाटत होतं. नेहा पण उत्साहाने अभ्यास करत होती. अगदी बहिणींसारख्या दोघी सतत एकत्र असत.
पुढची परीक्षा झाली. नेहाला गणितात ७९ मार्क पडलेले बघून मनीषा खूष झाली.
मनीषाने आमोदशी चर्चा करून सुमनला नेहाच्या शाळेत घातले. दोघी नववीतच असल्या तरी तुकड्या वेगळ्या होत्या. दोघी छान अभ्यास करत होत्या. संध्याकाळी पळायला जात. सुमन नेहाला एक दोन पदार्थ करायला पण शिकवत असे. मनीषाची काळजी कमी झाली होती पण वार्षिक परीक्षेला नेहा परत मागे गेली तर.. वाटतच होते.
वार्षिक परीक्षेला नेहा व सुमन दोघींना उत्तम मार्क पडले होते. कशीबशी ७०% मिळवणारी नेहा यावेळी ८६% मार्क मिळवून पहिल्या दहा नंबरात आली होती आणि सुमन दुसरी आली होती.
मनीषाने दोघींना घट्ट मिठी मारली. “ सुमन, तू नक्की काय केलस म्हणून नेहाला गणित यायला लागलं?”
सुमन म्हणाली, “वैनी, नक्की सांगता येणार नाही मला.. पण तुम्हा दोघांच्या धाकात ती घाबरून जात होती. कधी कधी “शी कसला बेकार प्रॅाब्लेम “ म्हणून आम्ही कठीण गणित सोडून द्यायचो आणि दुसरं काहीतरी करायचो. असा प्रॉब्लेम देणाऱ्याचा उद्धार पण करायचो. ” नेहा खुदकन हसली..
“नंतर व्यवहारातलं गणित तिला दाखवताच तिला ते जास्त कळू लागलं.. वैनी, राग मानू नका पण प्रसिध्द गणित शिक्षिका, गोल्ड मेडॅलिस्ट मनीषा बेडेकर आणि ISRO इंजिनीअर आमोद बेडेकर यांच्या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे तिच्यावर.. तिला ते झेपत नव्हतं. ते ओझं कमी होताच तिला अभ्यास करावासा वाटू लागला.. “
“वैनी, माझे वडील पण म्युनिसिपालिटीच्या शाळेत गणित शिकवत. मी बाबांकडेच गणित शिकत असे. बाबा म्हणत, ” सुमन तू गणितात डिग्री मिळव.. तू खूप हूशार आहेस. ” ते अचानक गेले.. आई बाबांचं जाणं सहन करू शकली नाही. डोक्यावर परिणाम झाला म्हणून ती त्या दवाखान्यात आहे. त्या डॅाक्टरीण बाईंनीच मला दोन नोकऱ्या लावून दिल्या म्हणून तर तुम्ही मला भेटला वैनी !
नेहा, मनीषा आणि तेवढ्यात घरी आलेला आमोद थक्क होऊन तिचे बोलणे ऐकत होते. देवानं तिचं लहानपण काढून घेतलं होतं, पण कुशाग्र बुध्दी आणि बेडेकरांचं घर तिला मिळवून दिलं होतं.
“वैनी, सर तुम्हाला एक सांगू का? नेहाचे मराठी, इतिहास हे मार्क बघा. कायम हायेस्ट असते त्यात. तिला लिबरल आर्ट्समधे करिअर करायचं आहे.. त्या विषयात ती काही तरी उत्तम करेल बघा !” सुमन धैर्य एकवटून म्हणाली.
मनीषा व आमोद विचारात पडले…
आज बावीस वर्षांनी डॉ. नेहा बेडेकर या मानसशास्त्रातील एका विदुषीचे भाषण ऐकण्यासाठी मनीषा व आमोद सभागृहात पोचले होते.. हॅाल पूर्ण भरला होता. नेहाने पीएचडी संपताच अनेक पॅाडकास्ट तयार केले होते त्याला भरभरून प्रतिसाद येत होता. तिचं नाव झालं होतं.. कार्यक्रमाचे संचालन करत होत्या ISRO इंजिनीअर, सुमन पवार ! सुमनने माईक हातात घेतला व नेहाची ओळख करून दिली !
नेहाने बोलायला सुरुवात केली.. विषय होता,
“When will you accept me as I am?”
आई वडीलांनी मुलांना, सुना जावई यांनी सासु सासऱ्यांना, लहानांनी वृध्दांना, वृद्धांनी तरूणांना आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारले तर केवढी नकारात्मक ऊर्जा कमी होईल यावर नेहा बोलत होती..
“कसं स्वीकारायचं असतं समोरचं माणूस जसं आहे तसं? अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर न टाकता, टीका न करता, दोष न देता? कसा आदर दाखवायचा मतभेद असताना? माझ्या आई बाबांनी मला जसं ॲक्सेप्ट केलं ते कसं करायचे? दोन गणितज्ञांच्या घरात आर्ट्सकडे जाणारी व गणित न आवडणारी मुलगी भरडली गेली असती, पण तिला आर्ट्सला जाण्यासाठी त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं? घरी काम करणारी कामाची मुलगी आपल्या लेकीपेक्षा कितीतरी हुशार आहे हे कसे मान्य केले? त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीने आपले डोळे उघडले पण त्यात स्वतःचा अपमान न मानता तिला पण उत्तम शिक्षण कसे दिले…. “
नेहा अप्रतिम मुद्दे मांडत लोकांना समजावून सांगत होती ! मनाचा मोठेपणा आणि ईर्षा, स्पर्धा यावर कसे काम करायचे सांगत होती.
… मनीषा व आमोद लेकीची वाणी ऐकून धन्य होऊन गेले होते ! सुमनचे ते शतश: आभार मानत होते ! सुमनला कसलं शिकवलं आपण? अत्यंत बुध्दीमान असलेली सुमन कुठेही असती तरी चमकली असती ! पण स्वतः चमकताना इतरांना चमकण्यास जो मदत करतो तो खरा वाटाड्या असतो !
सुमन व नेहा घरी आल्या. मनीषाने तिला मिळालेले गोल्ड मेडल सुमनच्या गळ्यात घातलं आणि बाबांनी त्याला ISRO मध्ये मिळालेले मेडल नेहाच्या गळ्यात घातलं..
“ बाबा, Propulsion Module बद्दल मला तुमच्यासाठी काही बोलायचं आहे.. “ सुमन आणि बाबा चांद्रयानाबद्दल बोलण्यात गर्क होते..
आणि
“झोपडी ते ISRO” या नेहाने लिहिलेल्या पुस्तकाचा रफ ड्राफ्ट आईला दाखवण्यात नेहा गर्क होती !
आई बाबानी मुलींना त्या जशा आहेत तसे ॲक्सेप्ट केले होते.. त्यामुळे दोघीही आपापल्या क्षेत्रात आज चमकत होत्या.
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डॉक्टर केळकर खूप आजारी होते. एकेकाळचे जळगावचे नामांकित, रुग्णांशी स्नेहसंबंध ठेवणारे आणि अतिशय सचोटीने, कर्तव्यबुद्धीने वैद्यकीय पेशा सांभाळणारे कुशल, शल्यचिकित्सक ते होते. मी त्यांना कलियुगातले कर्मयोगी असेच म्हणायचे. ते असे मरणासन्न अवस्थेत असताना मी त्यांना भेटायला गेले तेव्हा मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. म्हणाले, ” ये. बैस. कशी आहेस? “
खरं म्हणजे हा प्रश्न मी त्यांना विचारणार होते ना?
त्यावेळी मनात आलं ९० व्या वर्षी महाप्रयाणाला निघालेली व्यक्ती, वेदनांच्या पलिकडे जाऊन इतकी शांत कशी असू शकते? भयमुक्त, अलिप्त, स्वीकृत. मी त्यांचा हात धरून विचारले, “कसे आहात सर ?”
“अगं! मी छान आहे, काही तक्रार नाही. ”
आम्ही छान गप्पाही मारल्या. त्यांच्या वेदना मला जाणवत होत्या पण ते मात्र त्या सर्वांना पार करून छान बोलत होते
दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि सहजपणे मला महाभारतातला तो अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण श्लोक आठवला.
अनित्यं यौवनं रूपं
जीवितं द्रव्यसंचय:।
आरोग्यं प्रियसंवासो
गृध्येत्तत्र न पंडित:॥
तारुण्य, सौंदर्य, आयुष्य, आरोग्य, प्रियजनांचा सहवास हे सारं परिवर्तनीय आहे. चिरंतन नाही, अशाश्वत आहे. पण जे सुजाण असतात ते या सर्व गोष्टींमध्ये गुंतून पडत नाहीत. ते फक्त शाश्वताचाच पाठपुरावा करतात.
जेव्हापासून माणसाचं जगणं सुरू होतं तेव्हापासून पळणं, धावणं सुरू होतं. शिक्षण, नोकरी, पैसा, पद, अधिकार, कीर्ती, चांगलं, अधिक चांगलं, त्याहून उत्तम मिळवण्यासाठी त्याची पुरी दमछाक होते. जास्तीत जास्त जमीन पादाक्रांत करण्यासाठी तो धाव धाव धावतो आणि सूर्यास्त समयी त्याला जाणवते ती फक्त एक घोट पाण्याची गरज. त्यावेळी त्याच्यासाठी शाश्वत फक्त एकच असते का? एक घोट पाणी. ? अंततः त्याला काहीच मिळत नाही. ना जमीन ना पाणी ना शांती. त्यातच त्याचा अंत होतो.
या पार्श्वभूमीवर मला डॉक्टर केळकर यांचे मृत्यूश्येवरचे “मी छान आहे” हे शब्द खूप महत्त्वाचे वाटतात. त्यात एक स्वीकृती होती. जो जन्माला येतो तो मरणाला घेऊनच. मृत्यू हेच सत्य आहे. जगणं ते मरणं हा सत्याकडून सत्याकडे जाणारा प्रवास आहे. त्या प्रवासातलं जे अपरिवर्तनीय, चिरंतन, निरंतर, कायमस्वरूपी असणारं जे काही आहे तेच शाश्वत आणि या शाश्वताची कास धरून कर्म करणारा आणि कर्मातून अलिप्त होणारा तो खरा ज्ञानी. असा माणूस मरतानाही आनंदी असतो कारण मुळातच तो देहाभिमानी नसतो. कालचक्राची स्थित्यंतरे त्यांनी मानलेली असतात, जाणलेली असतात. बाल्य, शैशव, यौवन आणि वार्धक्य या परिवर्तनीय अवस्थांचं त्याला ज्ञान असतं. त्यामुळे तो कधीही विचलित नसतो. भंगुरतेच्या पाठी तो धावत नाही. त्याची कर्मेही एका अज्ञात शक्तीला समर्पित असतात म्हणून तो मुक्त आणि आनंदी असतो आणि अशा मुक्ततेत, आनंदात शाश्वतता असते.
मी एक अत्यंत पढतमूर्ख, सामान्य व्यक्ती आहे. भल्याभल्या ग्रंथवाचनातूनही मला आत्मा— परमात्म्याचं ज्ञान झालेलंच नाही. पण डॉक्टर केळकर यांचे तीनच शब्द.. “ मी छान आहे “ मला शाश्वत काय असते याचा अर्थ सांगून गेले हे मात्र निश्चित.
☆ प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा,
शिरसाष्टांग प्रणिपात !!!
दादा, आज अनेक वर्षांनी तुला पत्र लिहीत आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर पत्रात नक्की काय लिहावे हे ठरवता येत नाही. तरीही तुला माझ्या मनातील भाव कळलेच असतील, कारण तू माझा निव्वळ दादा नाहीस तर माझा सद्गुरूही आहेस. आईबाबांच्या पाठीमागे तूच आमचा पालक झालास. त्यामुळे जसं आईला आपल्या लेकराच्या मनातील कळत, तसं तुला कळणे स्वाभाविकच आहे…..
आज अनेकजण अनेक ठिकाणी त्यांच्या मतीगतीनुसार ‘संजीवनीसमाधी’ दिन सोहळा साजरा करीत आहेत. विठूमाऊलींचा जयघोष होत आहे, हरिनामाचा जयजयकार होत आहे, नामसंकीर्तन चालू आहे, काही ठिकाणी ज्ञानेश्वरी सप्ताह सुरू आहे. हे सर्व पाहून मी आज खूप कृतार्थ आहे. तू नेमून दिलेलं कार्य काही अंशी तरी पार पाडता आले, याचे मला अतीव समाधान आहे. गुरुआज्ञेचे पालन करणे किती कठीण आहे याची जाणीव मला खचितच आहे, तरीही गुरूआज्ञा पालन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्या कृपेने यामध्ये मला प्रचंड यश लाभलं… ! ‘हरिनामाचा प्रसार’ आणि गीतेची ओळख जगाला करून देण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आणि आपल्या कृपेने हे कार्य आजही अनेकजण करीत आहेत. अरे दादा, भावार्थदीपिका ही ज्ञानेश्वरी आहेच, परंतु त्याहून जास्त ती विज्ञानेश्वरी आहे. आपणच हे आपल्या तरुण बंधू भगिनींना आज पुन्हा सांगायला हवे, म्हणून हा पत्र प्रपंच केला आहे. अर्थात, हे सर्व आपल्या कृपेचे फळ आहे.
भागवत धर्माची पताका आपण माझ्या खांद्यावर दिलीत… ! आजपर्यंत सुमारे सातशे वर्षे ही परंपरा आपल्या भगवद्भक्त भारतीयांनी, हरिदासांनी चालू ठेवली आहे. यामागे विठूमाऊलीचे आशीर्वाद आहेत. हे कार्य निरंतर चालू राहावे असा आशीर्वाद आपण मला द्यावा. मागे मागितलेले ‘पसायदान’ आपण द्यायला तत्पर असालच, परंतु ते घेण्याची पात्रता प्रत्येक *हरिदासात यावी अशी कृपा आपण करावी. ‘आई’कडे हट्ट केलेला चालतो, हट्ट करावा म्हणून हे सर्व हट्टाने मागत आहे. चि. सोपान आणि माझी मुक्ताई यांना अनेक आशीर्वाद… !
आपले विहित कर्तव्य पूर्ण झाले की स्वतःहून निजधामास जायचे असते हे सामान्य जनांना कळावे म्हणून मी आपल्या परवानगीने ‘संजीवन समाधी’ घेतली…. ! आपले शरीर पंचमहाभूतात विलीन करणे इतकाच याचा हेतू… !
दादा, आज आई बाबांची पुन्हा आठवण झाली आणि माझ्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झाल्या….. ;
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “एक कप कॉफ़ी…” ।)
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “गुम हो गया शहर…” ।)
जय प्रकाश के नवगीत # 81 ☆ गुम हो गया शहर… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆