आपल्या समुहातील कथाकार लेखक श्री दीपक तांबोळी यांचे आतापर्यंत अनेक कथासंग्रह प्रकाशित झालेले असून सर्वच कथासंग्रहांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अलिकडेच त्यांचा ‘वाटणी’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.या कथासंग्रहालाही सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
श्री.दीपक तांबोळी यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल ई-अभिव्यक्ती मराठी तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ उगवतीचे रंग – लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
परवा पेपरमध्ये ( संदर्भ – महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ‘ पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ‘ आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ‘ फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ‘ ऑरेंज’ विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ‘ लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ‘ ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. )
आता मला सांगा लॉरेन्स बाईंचे हे चुकले नाही का ? कंपनीने काम नाही दिले म्हणून काय झाले ? पूर्ण पगार तर दिला ना ! त्यातही या बाई दिव्यांग ! तरी त्यांनी असे म्हणावे ? आपल्याकडे तर काही मंडळी काम नको म्हणून दिव्यांग असल्याचा दाखला मिळवतात असेही ऐकिवात आहे. खरं म्हणजे ‘ असा दिव्यांग दाखला ‘ मिळवताना त्यांना केवढा त्रास होत असेल, संबंधितांना कदाचित काही पैसेही द्यावेही लागत असतील. पण त्या बिचाऱ्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही.
आपल्याकडील नोकरी करणाऱ्या महिलांना जर लॉरेन्सबाई भेटल्या तर काही महिला त्यांचा हेवा करतील. त्यांना म्हणतील, ‘ तुमचे मागील जन्मातील काहीतरी मोठे पुण्य असावे हो. नाहीतरी अशी नोकरी ( काम न करता पूर्ण पगार देणारी ) कोणाला मिळते का ?
योगायोगाने याच मी महिन्यात युरोप ट्रीपसाठी गेलो होतो. त्या दौऱ्यात फ्रान्सचा समावेश होता. पण मला या लॉरेन्सबाईंची ही बातमी आताच इथे आल्यावर कळली. तिथे कळली असती तर या बाईंचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला गेलो असतो. त्यांना तुम्ही चुकता आहात अशी जाणीव करून दिली असती आणि त्या कंपनीविरुद्धचा खटला मागे घ्यायला लावला असता. पण एवढे महान कार्य आमच्या हातून होणे नव्हते. मला तर या काम न देता पगार देणाऱ्या कंपनीचा जाहीर सत्कार करावा असे वाटते. अशा कंपन्या भारतात येतील तर आमची केवढी सोय होईल ! बेकारी दूर व्हायला मदत तर होईलच पण आमच्याकडील सज्जन आणि प्रामाणिक माणसे अशा कंपनीला कोर्टात अजिबात खेचणार नाहीत. उलट आमच्याकडील माणसांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल.
अरे कंपनीत काम नसले म्हणून काय झाले ? त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मनाने पुष्कळ काही करता येईल. पूर्वी महिला देवळात कीर्तन प्रवचन वगैरे ऐकायला जायच्या. त्यावेळी त्या ते प्रवचन ऐकता ऐकता वाती वळत असत असे ऐकले आहे. आता आजच्या जमान्यात वाती वगैरे वळण्याचे काम राहिलेले नाही. पण ऑफिसमध्ये बसून विणकाम करणे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शिकणे, मैत्रिणींशी फोनवर गप्पा किंवा चॅट करणे आम्ही सहज करू शकतो. त्या काळात आम्ही नवीन काही शिकू शकतो. अर्थात नवीन काही शिकलंच पाहिजे असं काही कंपनीचं बंधन असणार नाही. फक्त वेळेत येणं आणि वेळेत जाणं एवढंच आम्हाला करावं लागेल. ते आम्ही आनंदानं करू. अर्थात या सगळ्यांना गोष्टींना काही मोजके अपवाद असतीलही. त्यांना असं काम न करता पगार घेतलेला आवडणार नाही. पण आपण त्यांचा विचार कशाला करायचा ! लोकशाहीत बहुमत फार महत्वाचे !
तेव्हा तुम्हाला म्हणून सांगतोकी ही लॉरेंसबाई जर यदाकदाचित भारतात आलीच तर ते आम्हाला मुळीच आवडणार नाही. अरे, पूर्ण पगार देऊनही तक्रार करते म्हणजे काय ? शिवाय कोणतेही काम न करता. स्वातंत्र्यपूर्व काळात वसाहतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. त्यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी ‘ सायमन गो बॅक ‘ अशा घोषणा दिल्या. तसेच काहीसे या लॉरेन्सबाई भारतात आल्या तर होऊ शकेल. ‘ लॉरेन्स गो बॅक ‘ असे फलक चौकाचौकात लागतील.
मागे अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. जपानचा राजा वृद्ध झाल्याने त्याने निवृत्तीची घोषणा केली. जपानमध्ये आता राजेशाही नसली तरी राजघराण्यातील व्यक्तींना मान दिला जातो. अगदी इंग्लंडप्रमाणेच. तर त्या जपानच्या राजाने निवृत्तीची घोषणा केली. आता मला सांगा वय झाले तरी हाती असलेली सत्ता सहजासहजी सोडून कोणी असे निवृत्त होतो का ? आपल्याकडे तर निवृत्तीच्या वयात जरा जास्तच उत्साहाने कार्यरत राहणारी मंडळी पाहिली की मन कसे अभिमानाने भरून येते. त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारांना ते वेड्यात काढतात. संगीत शारदा नाटकातल्या प्रमाणे ‘ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..’ त्या काळात पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर वर्षे वय असले तरी ती व्यक्ती नवरदेव म्हणून लग्नासाठी तयार असायची. आता लग्नाचं जाऊ द्या हो पण राजकारणात तरी वयाचं ऐशीवं दशक ओलांडलं तरी सत्ता सोडण्याची आमची इच्छा नसते. तेव्हा त्या जपानच्या राजाला काय म्हणावं ? बरं, खरी गंमत पुढेच आहे. त्या राजाचा मुलगा त्याचा वारस म्हणून त्याच्या गादीवर बसला. या आनंदाप्रीत्यर्थ जपान सरकारने लोकांना चक्क दहा दिवसांची सुटी जाहीर केली होती.
आपल्याकडे तर अशा निर्णयाचं मधुकर तोरडमलांच्या भाषेत सांगायचं तर मोठं हे केलं असतं, मोठा हा केला असती आणि मोठी ही केली असती. मोठं स्वागत केलं असतं, मोठा आनंद साजरा केला असता, मोठी मजा केली असती. फटाके फोडून स्वागत झाले असते. पर्यटनस्थळे फुल्ल झाली असती. त्याला जोडून लोकांनी अजून एकदोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेतल्या असत्या. पण हे जपानी लोक सुद्धा त्या फ्रान्समधल्या लॉरेन्सबाईसारखे. त्यांना जपान सरकारचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. या दहा दिवसात करायचे काय असा वेडगळ प्रश्न त्यांना पडला. या काळात उद्योग ठप्प होतील, उत्पादन बंद पडेल, देशाचे आर्थिक नुकसान होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्या सुटीऐवजी त्यांना ज्यादा काम करून तो आनंद साजरा करायला आवडले असते असेही काही जण म्हणाले. आपल्याकडे अशा लोकांना आपण मुर्खांच्या गणतीत काढू. चांगली दहा दिवस सुटी मिळाली. मस्त फिरायला जायचे किंवा आराम करायचा. मनसोक्त खायचे प्यायचे आणि एन्जॉय करायचे. काम तर नेहमी असतेच ना !काही लोकांना असे वाटते की फ्रान्स, जपान यासारख्या देशांची प्रगती लोकांच्या अशा दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच झाली आहे. पण केवळ सुधारणा, प्रगती, देशहित यांचा सततच विचार किती करीत राहायचा ? आम्हाला आमचे काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही ? आम्ही हौसमौज तरी केव्हा आणि कशी करायची ? छे ! छे ! लॉरेन्सबाई तुमचे आणि जपानी नागरिकांचे हे चुकलेच !
सौरभ तुझं कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे. नव्हे नव्हे ते शब्दातीत आहे हेच खरं. जगाच्या भुकेला भाकरी देणाऱ्या त्या टोपी करांच्या अमेरिकन देशात शिक्षण घेऊन पुढील नोकरी व्यवसायात भक्कमपणे पाय रोवून राहिलास… आपली बुद्धिमत्ता नि कौशल्य दाखवून त्या गोऱ्या सायेबाला भारतीय काय चीज असते हे दाखवून दिलास.. जिथं शिष्टाचार चा धर्म नि घड्याळाचा पायबंद असतो अशी व्यावसायिकतेच्या मानसिकतेचा आपदधर्म मानला जातो आणि कर्तव्यापुढे बाकी सारी गोष्टी फिजूल मानल्या जातात या तत्त्वनिष्ठेची विचारसरणीचा लोकमानस..अश्या ठिकाणी तू आपल्या कर्मनिष्ठेला एका उंचीवर नेऊन ठेवलसं… हे किती प्रशंसनीय आहे.. तू भारतीय त्यात मुंबई कर असल्याने आमचा उर अधिक अभिमानाने भरून येतो… या शिवाय तुझा क्रिकेट खेळाची आवड मनापासून जपली नाहीस तर त्यासाठी वेळ देऊन सराव केलास.. जीव तोडून मेहनत घेतलीस… त्या युएसए च्या क्रिकेट संघात प्रमुख गोलंदाज म्हणून निवड झाली.. ती निवड किती सार्थ होती हे त्या ट्वेंटी२० च्या विश्वचषक 2024च्या पहिल्या प्राथमिक सामन्यात दाखवून दिलसं.. बलाढ्य नि चिवट असलेल्या पाकिस्तानी संघाला धूळ चारलीस.. भारतीय संघातले दोन दिग्गज मोठ्या फलंदाजानां पहिल्या दोन षटकातच तंबूचा रस्ता दाखविलास… तुझी हि देदीप्यमान कामगिरी पाहून आपल्या देशातील क्रिकेट नियामक मंडळाला खेळात राजकारण आणल्याने किती घोडचूक होऊन बसते याचा न दिसणारा पश्चताप जाणवून गेला…तसा तुमचा युएसए चा संघ सरमिसळ खेळाडूंचा असला तरीही त्यात जबरदस्त बाॅंन्डींग आहे हे दिसून येत होतं…युएसए मधे आजवर क्रिकेट खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर होत नसे पण तोच आता तुमच्या या संघाची विजयी घौडदौड पाहता हा खेळ लवकरच या देशाच्या मातीवर बहरणार यात शंका नको… सौरभ तुला व्यतिश: आणि तुझ्या संघाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा… तूझी खेळातली प्रगतीची कमान चढती राहो… एक मराठी माणूस केवळ आपल्याच भुमीत राहून नव्हे तर साता समुद्राच्या पलीकडे जरी गेला तरी आपल्या कर्तबगारीचा झेंडा फडकवत असतो.. हेच यातून दिसून येतं.. किती लिहू नि किती नको असं वाटून गेलयं.. आमचीच दृष्ट लागू नये म्हणून हा लेखप्रपंच इथेच थांबवतो…
जाता जाता सौरभ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला. तो म्हणजे तू ज्या ऑर्गनायझेशन मधे सेवा देत आहेस तिथल्या तुझे सगळ्या बाॅस ना माझा मानाचा मुजरा सांग बरं… त्यांनी तूझ्या खेळात यत्किंचितही आडकाठी उभी केली नाही.. उलट जसं जसे संघाची एकापाठोपाठ एक विजयी घोडदौड सुरू झाली आणि त्यांनी तुला चक्क हि स्पर्धा पूर्ण होईपर्यंत विशेष रजेची सुट दिली…तिथेच व्यवस्थापन नि एम्पाॅलई यांचं सुंदर निकोप नातं दिसून आलं.. देशाचं नावं, कंपनीचं नावं नि खेळाडूचं नावं याला त्या ऑर्गनायझेशनने प्राधान्य दिलं… नाहीतर आपल्या इकडे साहेब नावाचा खडूस नमुना कायमस्वरूपी एम्पाॅलईजच्या मानगुटीवर बसलेला दशमग्रह… साधी गरजेसाठी घ्यावी लागणारी किरकोळ रजा नामंजूर करण्यात ज्याला आसुरी आनंद घेण्यासाठीच जन्माला आलेला असतो ,तो काय खेळाच्या सरावासाठी अर्ध्या दिवसाची सवलत, सामने खेळायला विशेष रजेची मंजुरी किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, सामने असले नि आपलाच एम्पाॅलई त्यात एक खेळाडू सहभागी आहे याचं थोडंतरी कौतुक, खिलाडूवृत्ती दाखविण्याची सुतराम शक्यता नाहीच… सांगायचं इतकंच प्रगतीपथावर असलेल्या आमच्या देशाला अजून बऱ्याच गोष्टी प्रगतीशील देशाकडून शिकण्यासाठी बराच वाव आहे… बरं झालं तू युएसए मध्ये आहेस आणि त्यांच्या संघातून खेळतोस… इथं असतास तर … सौरभ नेत्रावळकर एक इंजिनियर एव्हढीच माफक पुसटशी ओळख मिळाली असती….
एका केअर सेंटरला…..म्हणजे वृद्धाश्रमाला भेट द्यायला गेले होते. त्या दिवशी तिथे दोन मुली येऊन खुर्चीवर बसून ..करायचे हातापायाचे व्यायाम शिकवणार होत्या. मी इकडे तिकडे फिरत आश्रम बघत होते.
एक सावळा हसतमुख मुलगा पायाने थोडा लंगडणारा त्याची गप्पा मारत लगबग चालू होती. तो तिथला मदतनीस असावा.
” ए आजी तुला रोज गाऊन मध्ये बघतो आज साडी नेसलीस तर छान दिसते आहेस . इतकी कशाला नटली आहेस? ….काय दाखवायचा कार्यक्रम आहे का ? “
” हो आता 75 व्या वर्षी करते परत लग्न “ती हसत हसत बोलली.
” ए आजी चल आटप… तुझे ते दोन घास राहिले आहेत ते खाऊन घे”
” अगं आजे झालं उन्हात बसून… चल आता आत ये .. चक्कर येईल नाहीतर”
ए आजी ….ए आजे…असं म्हणत तो सगळ्यांशी गप्पा मारत होता. इतक्यात एका आजींनी त्याला हाक मारली ..
” बरं बाबा तुझ्या लक्षात येतं नाही तर माझ्या बीपीचं काही खरं नव्हतं बघ….”
” चला चला आज व्यायाम शिकायचा आहे ना”..
अस म्हणून त्यानी सगळ्यांना बाहेर आणून खुर्चीवर बसवायला सुरुवात केली.
एका आजीची ओढणी त्यांच्या पायात येत होती …. “कशाला घेतलीस ती ओढणी? पायात अडकून तूच पडशील बघ.. कोण बघतय तुला ? ” .. अस म्हणून त्यानीच ती काढून आत कॉटवर नेऊन ठेवली.
सगळ्याजणी येऊन बसल्यावर त्या मुली शिकवायला लागल्या .
तो त्यांचा व्हिडिओ काढायला लागला.
” अरे सगळे इतके गंभीर का? जरा हसा की…. ओ ताई तुम्ही त्यांना हसत हसत करायला सांगा बरं…”
मग त्यानीच हात वर केले की हा.. हा.. हा …म्हणून हसायला सांगितलं.
वातावरणच बदललं .त्या मुलींना पण शिकवायला गंमत वाटायला लागली.
इतरांना हसवणाऱ्या त्या मुलाकडे मी बघत होते. त्या लेकराच्या जीवनात कसला आनंद होता? तरी तो इतरांना आनंदी ठेवत होता …
सगळ्यांचा तो लाडका होता.. ते पण आपुलकीने ,मायेने त्याच्याशी बोलत होते .आज माझे लक्ष त्याच्याकडेच होते.
“इतका वेळ बसलीस तर पाठ दुखेल तुझी “
असं म्हणून एका आजींना आधार देऊन तो रूममध्ये घेऊन जायला लागला.
मी त्याच्याकडे बघत होते .सहजपणे आपुलकीने तो वागत होता.तो तिथेच रहात होता…ह्या वयस्कर लोकांची सेवा करत होता.
आजकाल अस कोणाला बघीतलं की डोळे आपोआप भरून येतात. शिकत राहते त्यांच्याकडून….
… माझ्याही जीवनात अमलात आणायचा प्रयत्न करते..
त्या दोन मुली शिकवत होत्या .
अर्ध्या तासानी जेवायची वेळ होणार होती. तो सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन जगमध्ये पाणी भरायला लागला होता.
…. प्रत्यक्ष पांडुरंग एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनुन पाणी भरत होता…….
त्याचीच आठवण आली…
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .
सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं नसलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात …..
आपल्याच आसपास….. नीट बघितलं की दिसतात…
एक विनवणी करते रे ……
आता त्यांच्यातच तुला बघायची दृष्टी दे रे पांडुरंगा…
☆ वाचलेली आणि वेचलेली माणसे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
मी अनेक गावं फिरलो. माणसं वाचली आणि मनात वेचलीत सुद्धा. कधी डोक्याला ताप झाला तर कधी गुरुही भेटले.
भीमाशंकर जवळ असल्याने तिथल्या निसर्ग सौंदर्यात मी आकंठ बुडालो आणि जास्तीत जास्त दिवसांकरता चाकणला बुड टेकवलं. तिथेच डॉक्टर सोनवणेंशी माझी ओळख झाली. आमची इतकी मैत्री वाढली की माझा संध्याकाळी कायम मुक्काम त्यांच्या दवाखान्यातच असायचा.
चाकणचे शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते वृत्तीने धार्मिक आणि भाविक होते. डॉ. सोनवणे म्हणजे त्यांच्यासाठी दैवतच होतं म्हणा नां ! नाही तरी डॉक्टर म्हणजे प्रति परमेश्वरच असतात नाही का?
त्या दिवशी दवाखान्यात खूप गर्दी होती. रिसेप्शनिस्ट रुग्णांना नंबर वारी आत सोडताना मेटाकुटीला आली होती. कारण नुकतंच तिचं एका तिरपांगड्या, रांगड्या पैलवानाशी भांडण झालं होतं.
मी तिला मदत करीत असतांना तो पैलवान गुरगुरत आम्हाला म्हणाला, “माझा नंबर लवकर का नाही लावत ?” गरम डोक्याच्या त्या महाशयांनी शिव्यांचा भडीमार पण सुरू केला.
गडबड ऐकून डॉक्टर बाहेर आले. त्यांनी खूप समजावलं त्याला, पण हा बाबा आपला इरेलाच पेटलेला.! शेवटी “बघून घेईन मी डॉक्टर तुम्हाला.! “असं म्हणून तो जमदग्नी तणतणतच बाहेर पडला. मुर्खपणाचा कळस म्हणजे रस्त्यावर जाऊन त्याचं शिव्या देणं चालूच होतं. डॉक्टरांना वाईट वाटलं.
‘अशी माणसं आपल्या आयुष्यात येऊ शकतात का ?’ ह्या विचाराने मीच अस्वस्थ झालो होतो. मात्र प्रसंग सावरत हसत डॉ. म्हणाले, “चला हा ही एक अनुभव.! पाऊस पडताना बघतो आपण. पण असेही अनुभवाचे पावसाळे आपल्या आयुष्यात येतातच. हं, पुढचे पेशंट आत पाठवा”असे म्हणून डॉक्टर आत मध्ये गेले. जरा वेळानी ते पैलवानी वादळ पाय आपटीत निघून गेलं .
इतर पेशंटकडे माझं लक्ष गेलं. वार्धक्यानी वाकलेलं एक जोडपं केव्हापासून कोपऱ्यात अवघडून बसलं होतं. त्यांचे उठता बसतांनाचे हाल बघून मी दोनदा त्यांना म्हणालो होतो, “आधी नंबर लावून आत सोडू का तुम्हाला? बसवत नाहीये का तुम्हाला? काही त्रास होतोय का?”
तेव्हा सरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य उमललं आणि ते म्हणाले, “नाही रे बाळा, तरास काय बी नाय. आता नंबरावरी जाऊदे बाबा, इतर आजारी पेशंटना.नाय तर मगा सारका एकादा आग्या वेताळ त्या देव माणसाच्या डोक्याला ताप द्यायचा. आमची तब्येत मस् चांगली झालीया. पर एक डाव डागदरला भेटायचयं आमाला.”
मला नवलचं वाटलं त्यांच्या बोलण्याचं. ‘त्रास काही नाही, पण डॉक्टरांना नुसतं भेटायचंय’ म्हणजे काय?
इतक्यात डॉक्टरच बाहेर आले आणि त्या जोडीला बघून आश्चर्याने म्हणाले, “हे काय माऊली! एवढ्या उन्हाचं आलात? अजून बरं वाटत नाही का तुम्हाला?”
कापऱ्या आवाजात कमरेत वाकलेली ती माऊली म्हणाली, “डागदरा, तुझ्या गोळीने ठणठणीत बरी झाले म्या. आता काय बी तरास नाही बघ. तुला एकदा डोळं भरून बघायचं हेच काम होतं. ‘बरे झालो’ ह्येचं सांगाया आलोय आमी. आता फकस्त देवाच्या पाया पडाया आलोया.”
हसत डॉ. म्हणाले, “अहो मग विठोबा मंदिर शेजारी आहे. इकडे कसे काय वळलात?”
यावर दोघजण डॉक्टरांच्या पायाशी वाकले आणि म्हणाले, “डागदरा, अरे तूच आमचा ईठोबा हाईस. मला मरणाच्या दारातून ओढून काढलंस आणि आता फकस्त हे सांगाया आलोया, की तुझ्या गोळीनं उतारा झाला आणि लई बरं वाटतंय आता आमाला. देव तुला सुखात ठेवो.”
आता मात्र चकित होण्याची पाळी आमची होती. डॉक्टर हात जोडून म्हणाले, “गुरुमाऊली माझाच तुम्हाला कोपरापासून शिरसाष्ठांग नमस्कार. गुरुपौर्णिमेलाच गुरु पूजा करावी असं थोडंच आहे ? आज मला साक्षात गुरुदेव दत्त भेटले.”
एव्हाना बाहेरच्या हॉलमधली लोकं आत आली होती. त्यांच्याकडे वळून डॉक्टर म्हणाले, “शाळेच्या प्रांगणात भेटलेले गुरु, हे गुरुच असतात. पण अनुभवाच्या शाळेत हे असेही गुरु भेटतात..आणि आपल्याला नवीन धडा शिकवून जातात. माझ्याकडे अनेक व्याधीग्रस्त पेशंट येतात, पण बरं वाटल्यावर पुन्हा या दवाखान्याची पायरी ‘चढणं नको रे बाबा’ असं म्हणत, दवाखान्याकडे आणि माझ्याकडेही पाठ फिरवून जातात. पण आता आम्हाला बरं वाटतंय हे सांगायला येणारी ही पहिलीच जोडी आहे.”
हा सगळा प्रकार बघून मी भारावलो, खरंच ‘बरं वाटत नाही’ हे सांगायला पेशंट येतात. पण ‘आम्हाला आता बरं वाटतंय’ हे एवढं एकच वाक्य उन्हातून चालत येऊन सांगणारी ही वृद्ध जोडी खरंच महान आहे, गुरुस्थानी आहे. डिग्री वाल्यांनाही हे सुचलं नसतं.
डॉक्टर आपला रोग मानपाठ एक करून, मानसिक क्लेश सहन करून बरा करतात. मग त्यांची परतफेड म्हणून शब्दांची फुंकर घालून आयुष्याचं गणित सोडवणारं हे जोडपं खरंच खूप खूप श्रेष्ठ आहे.
पेशंट मध्ये काही वारकरीही होते. तेही पुढे धावले आणि “विठू माऊली! विठू माऊली!” म्हणून या विठोबा रखुमाईच्या पाया पडले. जणू काही शेजारच्या मंदिरातले विठ्ठल रखुमाई त्यांच्यापुढे उभे होते.
डॉक्टर म्हणजे साक्षात ‘देव असतो’ असं सगळे म्हणतात, पण या दैवत्वालाही शिकवण देणारा गुरु कुठेतरी कधीतरी भेटतोच.
या प्रसंगावरून मला एक किस्सा आठवला. त्याचं असं झालं, गुलबर्ग्याचे डॉक्टर श्रीनाथ औरादकर यांचेशी व्हाट्सॲप द्वारे माझी ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्या लहानपणीचा एक मजेशीर, मनोरंजक किस्सा सांगितला.
ते बेळगाव हुबळी प्रवास करीत होते. प्रवासात घाटातून गाडी जात असताना मध्येच एक गृहस्थ उठले, ड्रायव्हरशी आणि कंडक्टर शी काहीतरी बोलले. त्या तिघात काय खलबत् झाली कोण जाणे! ड्रायव्हरने हसून गाडीचा वेग कमी केला. कंडक्टरनी ‘नामी शक्कल’ असं म्हणून दिलखुलास दाद दिली.
शबनम वाल्या गृहस्थांनी मुठभरून खजिना बाहेर काढला. प्रत्येकाला तो खजिना मुठी मुठी ने देताना ते सांगत होते “या पेरू, जांभूळ, करवंद, सिताफळ, चिक्कु इत्यादीच्या बिया आहेत. आपण प्रत्येकाने या बिया घाटात टाकायच्यात.”
डॉ श्रीनाथ त्यावेळी वयाने लहान होते. त्यांच्या डोळ्यात कुतूहल मावत नव्हतं. हा काय प्रकार आहे? सगळे संभ्रमावस्थेत होते.
ते कुतूहल न्याहाळताना हसतच शबनम वाले म्हणाले, “आता पाऊस पडेल. या बिया जमिनीत रुजतील, कोंबं फुटतील, रोपं तरारून डोलतील आणि खट्याळ वाऱ्याशी खेळत जोमाने वाढतील. त्यांची काही वर्षांनी वृक्षं होतील. निसर्गाचं दान आपण त्याचं त्यालाच परत करतोय, हो ना? ही धरणी त्यांना उत्तम प्रकारे जोपासेल. आणि मग फळा फुलांना काय तोटा हो !
आपल्याला नाही त्या फळांचा आस्वाद घेता येणार! पण म्हणून काय झालं! वाटेचा वाटसरू येईल विसाव्यासाठी, झाडाखाली विसावेल आणि फळांचा रसास्वाद घेऊन अगदी प्रसन्न तृप्त होउन पुढे जाईल, खरंय कीं नाही? त्याबरोबर पक्षी, खारुताई, वानर सेना येऊन पोटोबा शांत करतील ते वेगळंच. काय मग, पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं?”
आणि मग काय! सगळे प्रवासी पुढे सरसावले. दऱ्या खोऱ्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत शंभर मुठीतल्या, लाखो, करोडो बिया धरणीच्या कुशीत विसावल्या. आणि मग साध्या सामान्य वेशातले ते शब्नम वाले, सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झाले.’
डॉक्टरांनी मला हा साधा पण मोठ्या आशयाचा किस्सा सांगितला. तेव्हा माझ्या मनात आलं, काही वर्षानी मोठे झाल्यावर डॉक्टर त्या घाटातून जाताना ती वाढलेली निसर्ग दत्त देणगी बघून मनात म्हणाले असतील, “किती साधा माणूस, पण केवढा मोठा आशय तो देऊन गेला आपल्या सगळ्यांना, ‘वेष असावा बावळा, परी अंतरी असाव्या नाना कळा’ ही उक्ती आठवली असेल त्यांना. पण काही म्हणा, तो सामान्य माणूस सगळ्यांचाच गुरु झाला होता. आयुष्याच्या शाळेत मार्ग दाखवून, योग्य दिशेने नेणाऱ्या त्या परोपकारी सेवाभावी पर्यावरण प्रेमी सज्जनाला गुरुचीच उपमा योग्य आहे असं मला वाटतंय.अशा सामान्य पण असामान्यत्व प्राप्त झालेल्या गुरूंकडे बघून म्हणावसं वाटतंय.. ‘तस्मै श्री गुरवे नमः’
☆ इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !… – लेखक : विद्याधर गणेश आठवले ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आमच्या स्क्वाड्रनला पुन्हा हलवण्याचा निर्णय झाला. आम्ही सगळा मांडलेला पसारा आवरून जामनगरला आलो. अजूनही आमच्याकडे तीच जुनीपुराणी हंटर विमानं होती आणि नवीन विमानं मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्यामुळे आम्ही याचा पार्ट त्याला, त्याचा पार्ट याला करत करत शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी झटत होतो !
जामनगरला पठाणकोट सारखंच प्रचंड मोठं एअर फोर्स स्टेशन होतं. खूप मोठा टेक्निकल एरिया, खूप मोठा डोमेस्टिक एरिया, सिनेमा थिएटर, स्विमिंग पूल, रिक्रिएशन सेंटर, डार्क रूमसह सर्व सुविधा युक्त हौशी फोटो क्लब, अशा नागरी सुविधा होत्या! सुकाॅय ७, मिग २१ आणि मि ८ हेलिकॉप्टर तसंच बेल हेलिकॉप्टरच्या स्क्वाॅड्रन होत्या. त्यात आता आमच्या हंटरची भर पडली !
सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातील वाॅर हिरो, किलर ब्रदर्स पैकी, ग्रुप कॅप्टन डी किलर जामनगरला आमचे स्टेशन कमांडर होते ! साक्षात किलर सरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो ! किलर सर, जठार सर हे म्हणजे साक्षात ‘काळ ‘ असं बरंच काही ऐकलेलं असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती!
किलर सरांनी आणि जठार सरांनी युद्धांमधे पाकिस्तानी एअर फोर्सच्या धावपट्या उखडून, चहूबाजूंनी गोळ्या लागून चाळण झालेली, पेटती विमानं आणून आपल्या रनवेवर उतरवली होती! या असामान्य कामगिरी बद्दल त्याना शौर्य पदकं मिळाली होती! कोणत्या मटेरियलचं काळीज बनवलं असेल परमेश्वराने या माणसांचं ! !
विमानाला गोळ्या लागून आग लागलेली असताना, आपला जीव वाचविण्यासाठी, विमान सोडून ‘बेल आऊट’ न करता, त्या विमानाचे काही ना काही पार्टस् वापरता येतील आणि आपल्या देशाचं काही फाॅरेन एक्सचेंज वाचेल या उदात्त हेतूने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते विमान आणून आपल्या विमानतळावर उतरवण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावणारे योद्धे ज्या देशाकडे असतील त्यांना जगातलं कोणतंही आणि कितीही शक्तिमान राष्ट्र पराभूत करू शकणार नाही, प्रत्यक्षात किलर सरांना पाहिल्यावर माझा भलताच भ्रमनिरास झाला! नावच किलर असलेला माणूस भयंकर उग्र व्यक्तिमत्वाचा असणार अशी माझी कल्पना होती!
हा लाल गोरा अँग्लो इंडियन माणूस अतिशय प्रसन्न आणि गोड चेहर्याचा होता! अत्यंत प्रेमळ स्वभाव! सगळ्यांना सांभाळून घेण्याची कामाची आश्वासक पद्धत! सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज मधे उत्साहाने सहभागी व्हायची हौस! उतरंडीतल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून, त्याची समस्या स्वतः समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची धडपड! देवाने हे एक वेगळंच रसायन घडवलं होतं!
आकाशात जीवघेण्या भराऱ्या मारणाऱ्या, या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाकडून मी जमिनीवर रहाणं किती महत्वाचं असतं ते शिकून घेतलं! ‘तुमच्या सहकार्यांच्या कोंदणात तुम्ही किती घट्ट बसला आहात त्यावर तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा किती अधिकाधिक उजळून निघणार हे अवलंबून असतं ‘ हा एक खूप महत्वाचा धडा, किलर सरांचं प्रशासकीय कौशल्य जवळून निरखताना आपोआप मिळाला, ज्याचा मी पुढे उच्च पदावर काम करताना मला खूप फायदा झाला! यशाची गुरुकिल्लीच किलर सरांनी नकळत माझ्या हाती सोपविली!
एका रोमहर्षक प्रसंगात ‘किलर’ म्हणजे काय ते प्रत्यक्षच पहायला मिळालं ! एका मिग- २१ चं टेस्ट फ्लाईंग करण्यासाठी किलर सरांनी टेक ऑफ घेतला. आकाशात झेपावल्या क्षणीच, विमानाची कॅनाॅपी (फायटर विमानात पायलटला बाहेरचं पहाता यावं म्हणून ठेवलेलं फायबरचं पारदर्शक कवच) उडून गेली ! हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा अपघात होता! आता कल्पना करा की, डोळ्यावर शील्ड नसली तर ऐंशी किलो मीटर वेगाने मोटर सायकल सुद्धा चालवता येत नाही! हा माणूस बाराशे नॉटिकल माईल्स वेगाने टेक ऑफ घेत असताना याच्या डोळ्यासमोरची विंड शिल्ड नाहीशी झाली! काय करावं या माणसाने?
विमान सोडून तात्काळ इजेक्ट करायला हवं होतं! नियंत्रण कक्षातून तशा सूचनाही दिल्या होत्या, पण नवं कोरं विमान सोडून देणाऱ्या माणसाचं नांव किलर असूच शकत नाही! त्यांनी नियंत्रण कक्षाला उलट सांगितलं, “क्रॅश लँडिंगची तयारी करा! मी विमान उतरवतोय!”
क्षणात अनेक सिग्नल्सची देवाण घेवाण झाली. किलर सरांच्या वरिष्ठांनी कळकळीची विनंती केली, ” ‘किलर’ या देशासाठी विमानापेक्षा किंमती आहे! विमान सोड!” किलर सरांनी बहुदा सांगितलं असावं, “Don’t worry Sir, you will have both!”
रनवेवर क्रॅश लँडिंगची तयारी झाली. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करण्यासाठी सज्ज झालेला होता आणि मनात, “देवा, किलर सरांना वाचव.” अशी तळमळीने प्रार्थना करत होता. डोळ्यांना काहीही दिसत नसताना, केवळ इच्छाशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर सर्किट मधे फिरून त्यांनी फ्युएल संपवलं आणि आपण लँडिंग करत असल्याची सूचना दिली! नियंत्रण कक्षाकडून आपण परफेक्ट लँडिंग लाईनवर आहोत याची खात्री करून घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाकडे सरकायला सुरुवात झाली. प्रत्येक जण श्वास रोखून, काळजावर दगड ठेवून, आता पुढे काय वाढून ठेवलंय त्याची प्रतिक्षा करत होता!
विमानाचं अंडर कॅरेज सुरक्षितपणे उघडलं! तीनही चाकं व्यवस्थित बाहेर पडली! विमान उंची कमी करत करत योग्य दिशेने रनवेकडे येऊ लागलं! विमान इतक्या परफेक्ट लाईनवर होतं की पायलटला काही दिसत नाहीये हे खरंच वाटत नव्हतं! प्रत्यक्षात नियंत्रण कक्षातून मिळणाऱ्या फक्त सूचनांच्या बळावर विमान उतरत होतं!
सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच विमान एका बाजूने कलंडल्या सारखं झालं आणि विमानाच्या मागच्या दोन चाकांपैकी एक चाक बॅरियरच्या सिमेंट पोलला टच झाल्यामुळे तुटून गेलं. आता मागचं एकच चाक उरलं होतं, ते टेकून नीट बॅलन्स झाला तर पुढचं टेकणार! गती आणखी कमी करण्यासाठी, चाक तुटताच किलरसरांनी टेलशूट (मागे उघडणारं पॅराशूट) ओपन केलं होतं !
शेवटी विमान एका बाजूला घसरून बाॅडी घासल्यामुळे आग लागणार, हे आता सगळ्यांना कळून चुकलं होतं! क्रॅश व्यवस्थापन पुढच्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी अति सज्ज झालं होतं !
अति समिप….सावधान….
विमानाची गती संपता संपता ते तिरकं तिरकं जात असताना काँक्रिटच्या रनवेवर बाॅडी टेकणार नाही असं दोन चाकांवर बॅलन्स करत ते रनवे सोडून बाजूच्या मातीवर आल्याची खात्री पटल्यावरच किलर सरांनी इंजिन स्विच ऑफ केलं आणि विमानाला आग लागण्यापासूनही वाचवलं!
डाॅक्टरनी किलर सर कसे आहेत ते पहाण्यासाठी काॅकपिटकडे धाव घेतली. त्यांच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर इतकं सुजलं होतं की सेफ्टी बेल्ट कापून काढल्यानंतर सुद्धा त्याना काॅकपिटमधून बाहेर काढणं अवघड झालं होतं! चेहर्यावर ना नाक दिसत होतं ना डोळे! बेल्ट कापता कापताच ते बेशुद्ध झाले! कसंबसं काॅकपिटमधून बाहेर काढून त्याना आय एन एस वलसुरा ला नेव्हीच्या हाॅस्पिटलमधे दाखल केलं, तेव्हा ते कोमात गेले होते!
सतरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ह्या महारथीने अचाट पराक्रम करून देशाचं एक विमान आणि एक जिगरबाज पायलट वाचवला आणि पुन्हा आकाशात झेप घ्यायला सज्ज झाला !
इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !
लेखक : श्री विद्याधर गणेश आठवले.
प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈