?पुस्तकावर बोलू काही?

☆ अवकाळी विळखा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – श्री महादेव बी. बुरुटे ☆

कथासंग्रह: अवकाळी विळखा

लेखक: सचिन वसंत पाटील.

प्रकाशक: गवळी प्रकाशन, इस्लामपूर

पाने: २०४

किमंत: ३१० रुपये

श्री सचिन वसंत पाटील

शेतकऱ्यांच्या काळीज व्यथा : अवकाळी विळखा

विळखा म्हणजे मिठी ! या मिठीचे अनेक प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या कंबरेभोवती पडलेला अनेक संकटांचा विळखा म्हणजे जणू मगरमिठीच ! कितीही धडपड केली तरी सैल न होणारा अजगराचा विळखाच तो . हाडं खिळखिळी करुन त्यांचा भुगा केल्याशिवाय तृप्त न होणारा अक्राळविक्राळ…!! असाच प्रकर्षाने अनुभव येतो तो कथाकार सचिन वसंत पाटील यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला “अवकाळी विळखा” हा कथासंग्रह वाचताना. शेती, माती आणि शेतकरी यांची जीवा – शिवाची नाळ जन्मताच जुळलेली असते. कुठल्या ना कुठल्या  विळख्यात ती आवळत जाते. बळीराजा या उपाधीने गौरवलेला बळीराजा नवीन अर्थव्यवस्थेत भरडला जातो, चिरडला जातो. आतल्या आत झुरत राहतो. त्यामुळे बळीराजा ही उपाधीच हास्यास्पद ठरली आहे कि काय, असे वाटू लागते.

या संग्रहातील सर्वच कथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या टांगत्या तलवारीची भिषण सत्य वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. या अवकाळी विळख्यात ‘घुसमट’ कथेत आपणास परिस्थितीचे चटके सोसत द्विधा अवस्थेत होरपळणारा विलास भेटतो. शेती मातीवर आईप्रमाणे श्रद्धा असणारा विलास शेत विकण्याच्या सल्ल्याने काळजात फाटत जातो. पैसेवाल्यांच्या त्याच्या दारिद्र्याच्या जखमांवर मिठ चोळणारे उग्र शब्द आणि व्यवहाराने अंतरबाह्य घुसमटून जातो. कथा वाचताना तो विलास म्हणजे आपण कधी होतो हे कळतच नाही.

शेतीत पीक पेरुन त्याचं उत्पन्न हातात येईपर्यंत कोणकोणत्या दिव्व्यातून शेतकऱ्यांना जावे लागते. डोक्यावरील अनेक समस्यारुपी टांगत्या तलवारींचा प्राणपणाने सामना करावा लागतो. त्यातून तावून सुलाखून निघालं तर कुठे चार पैसे हातात पडतात, . मजुरांची टंचाई हाही अलिकडे भेडसावणारा प्रश्न, अर्थात विळखाच झाला आहे. निसर्गाचे तांडव आणि मजूर समस्या यात हवालदिल झालेला नामा ‘टांगती तलवार’ या कथेत बरंच काही सांगून जातो.

मातीत जन्मलेला आणि मातीतच विलीन होणारा एक सच्चा शेतकरी नारुकाका ‘सुर्यास्त’ या कथेत भेटतो.  एक सच्च्या भुमिपुत्र असलेल्या नारुकाकाच्या भयानक वास्तववादी जगण्याची ही शोकांतिका आहे. पिढीतील अंतर आणि काळानुसार होणाऱ्या बदलात, निसर्ग बदलात त्या त्या पिढीतील लोकांची होणारी घुसमट या कथेत वाचून मन हेलावते. शेती-मातीवर नितांत श्रद्धा असलेल्या शेतकरी जीवनाचा अचूक वेध घेणारी ही कथा साहित्यिक मुल्ल्याच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाची आहे.

कृत्रिम टंचाई आणि काळा बाजार  ही तर नेहमीचीच समस्या ! ‘उद्रेक’ या कथेत रासायनिक खताची ऐन मोक्याच्या वेळी कृत्रिम टंचाई होते. शासकीय भ्रष्टाचारावर वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात कसा संताप येतो आणि त्यातून होणारा त्यांचा उद्रेक  कसा व्यक्त होतो हे दाखविले आहे.

तसेच शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन पिकवलेल्या मालाचा फायदा दलाल उठवतात हे ‘तुपातली वांगी ‘ या कथेत दिसून येते. कर्ता धर्ता बळीराजा भिकेकंगाल राहतो हे सांगत असतानाच सचिन पाटील यांनी जर शेतकऱ्यांनी ही मधली दलालांची फळी मोडून काढली आणि आपला माल आपणच विकला तर शेतकरी व ग्राहक या दोघांनाही ते फायद्याचे ठरणार असल्याचा भविष्यकालिन दृष्टिकोण कथन केला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तसा शेतकऱ्यांचा दृष्टिकोणही आज उदयास येताना दिसतो आहे.

या कथासंग्रहात ‘वाट’ कथेत ऊस शेतीची परिस्थिती आणि इतरांनी त्यात जाणून-बुजून नाडलेला हतबल पांडबा भेटतो. त्याची घरसंसाराचा मेळ घालण्यासाठी होणारी घुसमट पाहून मन द्रवते. ‘दिवसमान’ कथेत  राबराब राबून मुलांच्या जवानीत आपल्याला सुख मिळेल या आशेवर वाटचाल केलेला महादेवबापु भेटतो. उतारवयातही पोरांच्या अविचारी कर्तव्याने त्याची पोटासाठी चाललेली धडपड पाहून अंतःकरण व्यथीत होते. ‘कष्टाची भाकरी’ कथेत द्राक्ष बागेतील नुकसानीने वैफल्यग्रस्त होवून व्यसनात बुडालेल्या विनायकला जेंव्हा शिक्षणाची खोटी प्रतिष्ठा सोडून कोणतेही काम करुन कष्टाची भाकरी मिळवण्यातली गोडी लागते हे वाचून मनाला दिलासा मिळतो.

नानाची कुस्तीतली ‘लढत’ ही खरी कुस्तीतली लढत नसून संसाररुपी कुस्ती जिंकण्याचा त्याचा प्राणपणाने चाललेला लढा असल्याचे जाणवते. घर फिरले की घराचे वासेही फिरतात याची प्रकर्षाने प्रचिती येते. तर ‘मैत्री’ कथेत अलिकडे फोफावलेल्या फसव्या स्किमा, त्यात होणारी फसगत, व्यसनाधिनता, नामदेवसारख्या स्वच्छ मनाच्या माणसाची मित्राने केलेली फसवणूक पहायला मिळते. ‘बुजगावणं’ कथेमध्ये झटपट मिळणाऱ्या पैशासाठी शेत एम. आय. डी. सी. ला देणारा अधुनिक पोरगा आणि या धक्क्याने वेडा झालेला वृद्ध शामूतात्या आहे.

‘सांभाळ रे… ‘  कथेत पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला गेलेल्या विकाची विठ्ठलाभोवती पडलेल्या संधीसाधुंच्या गराड्यात होणारी घोर निराशा पहायला मिळते. पवित्र चंद्रभागेची केलेली गटारगंगा, श्रद्धा- अंधश्रद्धांच्यात अजूनही अडकलेला समाज वाचून मन उद्वीघ्न होते. याउलट ‘रान’ कथेत रानमातीच्या सुगंधासाठी असुसलेला सखाराम भेटला की मन आनंदते. शिर्षक कथेत अवकाळी विळख्यात बेचीराख झालेली शेती पाहिली की अंतःकरण करपल्याशिवाय राहत नाही. पण या अवकाळीला वृक्ष तोड हीच कारणीभूत असून आता झाडे लावली पाहिजेत हा विचार ऐकला की दिलासाही मिळतो.

या पुस्तकातील प्रसंग वाचताना लेखकाच्या सुक्ष्म निरीक्षण आणि वर्णन करण्याची खुबी वाचकाला खिळवून ठेवते. काही कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. त्यातला आशय पुन्हा पुन्हा गडद होत वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावतो.

असा हा अतिशय बोलके आणि समर्पक मुखपृष्ठ असलेला कथासंग्रह ‘अवकाळी विळखा’. यातील शेतकरी अनेक संकटात अडकुन सुद्धा शेती माती व शेतकरी यांची नाळ तुटू न देता सुखेनैव वाटचालीची बीजे रुजवणारा आहे. हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाला आहे हे मला अभिमानपुर्वक नमूद करावेसे वाटते.

©  श्री महादेव बी. बुरुटे

संपर्क – ६५०, जे. मार्ग, शेगांव, ता., जि. सांगली  Pin – 416404 Mob- 9765374805, Email: burutemahadev@gmail

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments