सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ तर मी का नाही ?… डाॅ. बिंदुमाधव पुजारी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव – तर मी का नाही?

लेखक – डॉ. बिंदुमाधव पुजारी

पृष्ठे – ३२४ मूल्य – ४५० रु.

नुकतेच एक चांगले पुसताक वाचनात आले. ‘…. तर मी का नाही?’ मिरजेतील ख्यातनाम सर्जन डॉ. बिंदुमाधव पुजारी यांचे हे आत्मचरित्र. वेगळे वाटणारे हे शीर्षक पाहिले आणि मनात कुतुहल निर्माण झाले.

सुरूवातीला त्यांनी लिहिलय, ‘माझा डॉक्टर आणि त्यानंतर सर्जन होण्याचा प्रवास हा योगायोग, दैव, आणि खूप खडतर वाटचाल इत्यादींचे मिश्रण होते. मी वैद्यकीयशास्त्र हे आवडीने घेतले नाही किंवा नाकारले पण नाही. जे नशिबी आले, ते जिद्दीने स्वीकारले. एक गोष्ट मात्र नक्की. कोणताही विषय स्वीकारला की मी त्यात स्वत:ला संपूर्ण झोकून देत असे. मग कितीही कष्ट करावे लागले आणि यातना सोसाव्या लागल्या तरीही माझी तयारी असे.  एखादी गोष्ट जर दुसर्‍याला करता येत असेल, तर ती  मला का करता येणार नाही? मी ती करणारच.’ ते पुढे लिहितात, ज्यावेळी इंग्रजी चौथीत इंग्रजीत ते नापास झाले होते, तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणाले होते, ‘तुझ्या वर्गातील अठ्ठावीस मुले पास झाली आहेत. तर तू का पास होणार नाहीस? अभ्यास कर म्हणजे तूही पास होशील.’ त्यांनी भरपूर अभ्यास केला. ते नुसतेच पास झाले नाहीत, तर चांगले  गुण त्यांनी मिळवले. त्यावेळी  गुरुवाणीतून स्फूर्ती घेऊन त्यांनी जीवन प्रवास सुरू केला आणि ते उत्तम गुण मिळवत राहिले. अव्वल येत राहिले. त्यांच्या सार्‍या जीवनाचे सूत्र, ‘हे इतर करू शकतात, तर मी का नाही? (करू शकणार?) हे राहिले. ते त्यांनी हृदयस्थ केले  म्हणून मग आत्मचरित्राचे नावही नक्की झाले,   ‘…. तर मी का नाही?  

नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी) इथे वेदशास्त्र पारंगत, पौरोहित्य करणार्‍या अशा पुजारी घराण्यात २४ एप्रील १९३५ मध्ये डॉक्टर बिंदुमाधव यांचा जन्म झाला. सुरूवातीला ते नरसोबाची वाडी हे गाव कसं वसलं आणि पुजारी हे आडनाव कसं अस्तित्वात आलं, त्याचा इतिहास देतात. श्रीनृसिंहसरस्वती १४२२साली या स्थानी तपश्चर्येला आले. तेथून जवळच असलेल्या आलास या गावातून भैरव जेरे त्यांचे दर्शन घेऊन पुढे शिरोळ येथे जोसकी करण्यासाठी जात. श्रीनृसिंहसरस्वती जेव्हा गाणगापूरला जायला निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या पादुकांचे ठसे तिथे ठेवले आणि त्यांनी भैरव जेरे यांना तुम्ही वंशपरांपरागत या पादुकांची पूजा करावी, असे सांगितले. पुढे त्यांना एक मुलगा, नंतर त्या मुलाला चार मुले झाली. त्यांचा वंशवेल वाढत गेला. श्रींच्या पादुकांची पूजा करणारे म्हणून जेरे घराणे पुजारी या नावाने ओळखले जाऊ लागले. भैरंभट हा त्यांचा मूळ पुरुष. त्याप्रमाणेच गावाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, लोकजीवन, श्रींची पूजा-अर्चा, सण- उत्सव, इत्यादिंची माहितीही सुरूवातीला सांगितली आहे. त्यावेळच्या समस्या- दुष्काळ, साथीचे रोग, वैद्यकीय (अ)सुविधा, शिक्षणाच्या सोयी, गांधीवधांनंतर गावात झालेले जळीत प्रकरण, त्याचा लोकजीवनावर झालेला परिणाम या सगळ्याचे वर्णन सुरूवातीला येते. ही सगळी माहिती वेधक आणि मनोरंजक पद्धतीने यात येते.

गावातील धार्मिक वातावरण, घरातील जुने वळण, एकत्र कुटुंब, यामुळे, ‘सहनशीलता, समानता, समजूतदारपणा, खिलाडू वृत्ती, सांघिक भावना, कष्टाची तयारी इ. गोष्टी लहानपणीच आमच्या अंगात मुरल्या होत्या. त्याचा पुढील आयुष्यात आम्हाला फार उपयोग झाला’, असे ते सांगतात.  त्या काळात, सोयी-सुविधांच्या अभावी, जीवन, विशेषत: ग्रामीण जीवन कष्टप्रद होते. लहान मुलांनाही त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे कष्टाची कामे करावी लागत. डॉक्टर म्हणतात, त्यांचे लहानपण कष्टात, तरीही आनंदात मजेत गेले.

माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती. त्यासाठी कुरूंदवाडला जावे लागे. वर्षातले नऊ महीने, प्रथम नावेतून पंचगंगा नदीच्या पलिकडे जावे लागे. नंतर कुरूंदवाडच्या वेशीपर्यंत चालत जाऊन पुढे तीन मैल अनवाणी चालत जावे लागे. पावसाळ्यात, भरपूर पाऊस, प्रचंड वेगाने वहाणारे पाणी, घोंगावणारे वारे, यातून नाव बाहेर काढणे बिकट असे. प्रवास भीतीदायक, धोकादायक वाटायचा. असा सारा त्रास, कष्ट सहन करत वाडीतील अन्य मुलांप्रमाणे डॉक्टरांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. ७८% गुण मिळवून ते शाळांत परीक्षा पास झाले.

पुढे कॉलेज ते एम.बी.बी.एस.पर्यंतच्या खडतर शैक्षणिक प्रवासाची माहिती येते. आर्थिक विवंचनेमुळे हा शैक्षणिक प्रवास खडतर झाला होता. शिष्यवृत्ती होती, पण जेवणाचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कधी मेसच्या सेक्रेटरीचे काम केले, कधी एका मुलाला तासभर अ‍ॅनाटॉमी शिकवून त्याच्या डब्यात जेवणाची सोय करून घेतली.

बिंदुमाधव मुळात मेडिकलकडे कसे गेले, याचाही एक किस्सा आहे. एफ. वाय. ला ते सायन्स विभागात व गणितात विद्यापीठात पहिले आले. इंजींनियारिंगला जायचा त्यांचा विचार होता, पण रिझल्टच्या वेळी काही प्रतिष्ठित मंडळी त्यांना भेटायला आली. त्यांनी सुचवले, त्याने डॉक्टर व्हावे. पंचक्रोशीत कुरूंदवाडच्या डॉ. वाटव्यांशिवाय कुणी एम.बी.बी.एस. डॉक्टर नाही. बिंदू उत्तम डॉक्टर होऊ शकेल. त्यांच्या वडलांनाही ती कल्पना पसंत पडली. त्या सर्वांचा आग्रह पाहून ते मेडिकलला जायला तयार झाले.  

या पुस्तकात त्यांनी आपल्या लहानपणाच्या, शिक्षण घेत असतानाच्या, नोकरी करत असतानाच्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यानंतरच्या, कॉन्फरन्स काळातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. पुस्तकात शेवटी व्यवसाय काळातल्या निवडाक बारा आठवणी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे लेखन, व्याख्याने, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्या त्या वेळचे फोटो असा सगळा भाग पारिशिष्टात दिलेला आहे

डॉक्टर१९५९ आली एम.बी.बी.एस. झाले व १९६३ साली एम.एस. झाले. सुरवातीला चार वर्षे त्यांनी सरकारी नोकरी केली. १९६५पासून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९६८साली त्यांचे ‘श्री हॉस्पिटल’ स्वत:च्या वास्तूत गेले.

१९६४साली त्यांचा विवाह बंगलोरयेथील डॉ. इंदुमती कुलकर्णी यांच्याशी झाला. त्या माधवी कुलकर्णी बनून डॉक्टरांच्या घरात आल्या आणि दुधात साखर विरघळावी, तशा त्यांच्या जीवनात विरघळून गेल्या.

प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस ला जाऊ लागले. तिथे होणारी भाषणे, चर्चा यातून त्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपल्या ज्ञानाचाही इतरांनाही  फायदा करून दिला.

पुस्तक वाचत असताना डॉक्टरांची खास गुणवैशिष्ट्ये लाक्षत येतात, ती अशी— प्रखर बुद्धिमत्ता, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, अभ्यास आणि संशोधनाची वृत्ती, सौजन्यशील-मृदू स्वभाव, अफाट लोकसंग्रह. नीटनेटकेपणा हा त्यांचा आणखी एक विशेष. आपल्या सगळ्या पेशंटसचे व्यवास्थित रेकॉर्ड त्यांनी ठेवले. ओपरेशन्सच्या वेळचे फोटो घेऊन तयार केलेल्या पारदर्शिका (स्लाईडस), प्रबंध-व्याख्यानांची तयारी या सगळ्यात त्यांचा नीटनेटकेपणा जाणवतो.

‘… तर मी का नाही?’ हे आत्मचरित्र जितके माहितीपूर्ण आहे, तितकेच ते रसाळही झालेले आहे. त्याचे श्रेय उत्तम शब्दांकन करणार्‍या प्रा. डॉ. मुकुंद पुजारी यांनाही द्यावे लागेल. साधी प्रासादिक, ओघवती, उत्सुकता वाढवणार्‍या भाषेत पुस्तकाचे लेखन झाले आहे. डॉ.चा मोठेपणा सांगणारा त्यांचा स्वत:चा लेखही यात आहेच. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.(श्रीमती) स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना पुस्तकाचे सार आणि महत्व मोजक्या शब्दात सांगणारी, लक्षवेधी अशी आहे. एका कृतार्थ जीवनाची वेधक कहाणी यात आपल्याला वाचायला मिळते.

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments