मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे (2) मुलगी झाली हो 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे

‘अहो.. शुक… शुक … इकडे… इकडे … सुधाताई.. इकडे…’

‘ कोण तुम्ही? मी ओळखलं नाही….’

‘बरोबर आहे. मला कशाला तुम्ही ओळखाल? आम्ही साध्यासुध्या बायका… तुम्ही सुमन ताईंना ओळखाल. त्या स्टार लाईट नं! आम्ही एक पणती …. मिणमिणती….’

तसं नाही हो… मास्क आहे नं चेहर्‍यावर, म्हणून ओळखलं नाही….’

‘घ्या! हा काढला मास्क.’

‘अरे, सरलाताई होय. …खरंच मास्कमुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. काय म्हणताहात?’

‘मी कुठे काय म्हणतीय? तुमची ती सरली म्हणतीय  काही- बाही . पुरस्कार मिळालाय ना तिला!’

‘पुरस्कार…. कसला पुरस्कार?’

‘जसं काही माहीतच नाही तुम्हाला ?’

‘नाही… खरंच माहीत नाही.’

‘अहो, गावभर सांगत सुटलीय ती… आणि तुम्हाला कसं नाही सांगितलं ? एवढी खास मैत्रीण तुमची’

‘आहो, एवढी खास मैत्रीण तुमची…’

‘खरं सांगू का, गेल्या महिन्याभरात भेट नाही झाली आमची. पण पुरस्कार कसला मिळालाय तिला? ‘

‘आदर्श समाज सेविकेचा पुरस्कार मिळालाय तिला!’

‘कुठल्या संस्थेने वगैरे दिलाय?‘.

‘नाही हो…’

‘मग नगरपालिकेचा आहे?’

‘नाही… नाही…

‘मग जिल्हा परिषदेचा असेल?’

‘बघा एवढीच लायकी आहे नं तिची? पण तिला राज्य पुरस्कार मिळालाय. ’

‘अरे वा! आता घरी गेल्यावर पहिल्यांदा तिला फोन करते.’

‘असतील तिचे कुणी काके-मामे वर!’

‘वर?;

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते वर…’

‘अं…’

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते, तर मलाही हा पुरस्कार मिळाला असता, होय की नाही?’

‘पण तिचे कुणी काके-मामे वर नाहीत.’

‘या फक्त बोलायच्या गोष्टी!’

‘पण तिचा काम खरोखरच पुरस्कार मिळण्याइतकं आहे!’

‘पण माझा कामही तिच्याइतकंच आहे. किंबहुना जरा जास्तच आहे, होय की नाही? काय? ‘

‘हं!

‘आहे ना! मग सांग…. सांगच … मला पुरस्कार मिळण्यात काय अडचण होती?’

‘नाही… कहीच अडचण नव्हती. मिळेल ना… पुढल्या वर्षी मिळेल. ‘

‘तुम्ही मला आश्वासन का देताय?

‘मग काय खात्रीने सांगू? सांगते … पुढल्या वर्षी तुम्हाला पुरस्कार मिळेल.’

‘तुम्ही निवड समितीच्या सभासद आहात का?’

‘मग खात्रीने कशा सांगू शकता?’

‘‘मग काय करू?’

‘कामाला लागा!’

‘कसलं काम?’

‘मंत्रालायावर मोर्चा घेऊन जा.’

‘कोण मी?’

‘नाही तर दुसरं कोण?’ मला पुरस्कार मिळावा, म्हणून मीच मोर्चा घेऊन गेले, तर कसं दिसेल?’

‘हं! बरोबर बोललात तुम्ही…आणी?’

‘घोषणा द्या. आवाज उठवा…’’कोणत्या घोषणा?’

‘बंद करा. बंद करा. पुरस्कार निवडीची पद्धत बंद करा. पुरस्कार निवडीची ही पद्धत बंद करा. नवे निकष तयार करा. हाय!हाय!… निवड समिती हाय!हाय!… आपल्या नातेवाईकांना पुरस्कार देणारी निवड समिती तयार करणारे सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे झालय?’

‘असंच झालय. तुम्हाला काय माहिती?

‘तुम्हाला तरी काय माहिती?’

‘मला पुरस्कार मिळालानाही, याचाच अर्थ तो’

‘मला नाही तसं वाटत…’

‘’पण तुम्हाला घोषणा देण्यात काय अडचण आहे?’

‘अं… म्हणजे… अडाचण अशी नाही.पण…’

‘आता तुमचं पण…परंतु पुरे. घोषणा द्या. ‘बंद करा… बंद करा… पुरस्कारासाठी निवड करायची ही पद्धत बंद करा… ही पद्धत चुकीची आहे. नवीन निकष तयार करा. हाय… हाय… निवड समिती हाय… हाय… निवड समिती नियुक्त करणारं सरकार हाय… हाय…आपले लोक , नातेवाईक यांची निवड करून त्यांना पुरस्कार देणारं सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे घडले?’

‘पण तुला घोषणा द्यायला काय होतय? घोषणा खर्‍या असल्या पाहिजेत, असं थोडंच आहे? आणखीही घोषणा देता येतील’

‘आणखीही? त्या कोणत्या? ‘

 ‘ चालणार नाही. ‘चालणार नाही. शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ चालणार नाही. … चालणार नाही. घोषणाबाजी चालणार नाही.’

‘आहो, घोषणाबाजी नव्हे, शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ही घोषणाबाजी कुठे करायची आहे?’

‘कुठे म्हणजे…. मोर्चात’’

‘पण मोर्चा कुणाविरुद्ध काढायचाय ?’

‘घ्या! बारा वर्ष रामायण वाचलं, रामाची सीता कोण ?’

‘कोण होती?’

बहीण. रामाची नाही माझी.सीतेवर रामाने अन्याय केला आणि सरारणे माझ्यावर! म्हणजे सरकारच्या निवड समितीने माझ्यावर. यासाठीच तर मोर्चा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे. नाही चालणार… नाही चालणार… पुरस्कार घोषित करण्यात शिफारसबाजी नाही चालणार… रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘

‘मिळाला पाहिजे… मिळालाच पाहिजे…’

‘मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘  

‘…. रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…’

‘घोषित करा…. घोषित करा… नवीन पुरस्कार घोषित करा…’

‘पण हे सगळं कोण करणार?’

‘कोण म्हणजे?तुम्ही…’

‘मी?’

‘तुम्ही एकट्या नाही हो… तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी…ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे, त्या सगळ्यांनी.’

‘ मोर्चा काढायचा, घोषणा द्यायच्या, मला वाटतं, हे सगळं जरा जास्तच होईल.’

‘ जास्त नाही अन् कमी नाही. तुम्हाला मोर्चा काढायचाय. मंत्रालयात जाऊन पदाधिकार्‍यांना निवेदन द्यायचय. विरोधी पक्ष कदाचीत् याचा इशू करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त होईल.नवीन सरकार येळ. नवी निवड समीती बनेल. ‘

‘मग?’

‘त्यात माझे कुणी काके-मामे आतील.कुणी माझ्या ओळखीचा त्या निवड समितीत असेल. माझ्यावर श्रद्धा असलेले कुणी तरी त्यात असेल. ‘

‘नाही… नाही… असं काहीही होणार नाही. कुठली गोष्ट कुठे नेलीत आपण!’

‘का नाही होणार? तुम्ही स्वत:ला माझी मैत्रीण म्हणवता नं? मैत्रीणीसाथठी आपण एवढं करू शकत नाही? मग ही मैत्री काय कामाची?’

‘आमचं सगळ्यांचं आपल्याला मूक समर्थन असेल, पण मोर्चा वगैरे…. नाही बाबा नाही’

मशनात जाओ तुमचं मूक समर्थन! असल्या मैत्रीणी कसल्या कामाच्या? दगाबाज कुठल्या! तुम्ही सगळ्या तिची मिठाई खाऊन बसल्या असाल.  मिठाईशी ईमान ठेवायलाच हवं! मला असा पुरस्कार मिळाला असता, तर पार्टी दिली असती, अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. पार्टी घ्यायलासुद्धा नशीब लागतं!’

हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्याकडून पार्टी घ्यायला नशीब लागतं!’

(२)  मुलगी झाली हो –

अंसाक्काच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू झाली होती. तिच्या सुनेचे दिवस भरत आले होते. आज सकाळपासून तिला कळा सुरू झाल्या होत्या. अंसाक्काने लगबगीने कडकडीत पाणी केले. सुनेला न्हाऊ घातले. सदाशिव बायकोला घेऊन दवाखान्यात गेला.

अंसाक्का घरातली कामं अवरता आवरता दवाखान्यातून येणार्‍या निरोपाची वाट पाहू लागली. तिला खात्री होती, ‘आपल्याला नातूच होणार. आपल्या घराण्याची रीतच हाय तशी. आपल्या सासूला पैला मुलगा झाला. तोच आपला नवरा. आपल्याला बी पैला सदाशिव झालेला. दिराचा सोमू पैला. सोमूचा समीर पैला. आपली मुलगी सुरेखाला पैला मुलगाच. सदाशिवाला बी पैला मुलगाच व्हनार. सुमाचं पोट बी पुढे हुतं. डव्हाळे कडक. सारखी थकल्यावानी मलूल असायची. समदी मुलाचीच लक्षणं की.’

बारा वाजता सदाशिव सांगत आला. ‘सुमी बाळंत झाली. बाळ-बाळंतीण खुशाल हायती. आई, तुला नात झाली.’

‘काय?’ तिच्यावर जसा निराशेचा डोंगर कोसळला. तिला नातू हवा होता. नात नव्हे. डॉक्टरांनी संध्याकाळचं घरी सोडलं. अंसाक्का फुरंगटून बसलेली. तिने ना भाकर तुकडा घेतला. ना नव्या जिवावरून ओवाळून टाकला. शेवटी शेजारणीने भाकर तुकडा घेतला. ओवाळून बाळ-बाळंतिणीला घरात घेतले. अंसाक्का तशीच रुसून बसलेली. ‘अशी कशी मुलगी झाली? पैला मुलगा व्हायाची आपल्या घराण्याची रीत हाय. नातूच हवाय आपल्याला. ही रांड कशी तडफडली मधेच!’ असेच काही-बाही विचार अंसाक्काच्या मनात येऊ लागले.

आसपासच्या आया-बाया बाळाला पाहायला आल्या.

‘आजी, बघा तरी किती गोड, देखणी हाय तुमची नात. ‘ कुणीसं म्हंटलं. अंसाक्काचं हूं नाही की चूं नाही. ती आपली रूसलेली. जागची हललीसुद्धा नाही. अशी कशी मुलगी झाली, याच विचारात गुंतलेली. एवढ्यात कमळाबाईचं बोलणं तिला ऐकू आलं,

‘अगदी आजीसारखी दिसतीय नाही?’

‘व्हय! अगदी दुसरी अंसाक्काच!’

अंसाक्काचं कुतूहल चाळवलं. ती सुनेच्या दिशेने बघू लागली. अग, जवळ ये बघ. कशी तुज्यावाणी दिसतेय. नाक, डोळं, फुगरे गाल समदं तुझंच!’ आता अंसाक्काला राहवेना. ती उठून बाळाजवळ गेली. अगदी अंसाक्कासारखंच रंगरूप. ‘लहानपणी आपण अशाच दिसत असणार.’ अंसाक्काला वाटलं. तिने नातीला उचललं. छातीशी धरलं आणि तिचे पटापट मुके घेऊ लागली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈