श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले – आता तुही २८ वर्षाचा असशील.मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल.मी असं करतो,मुली बघायला सुरुवात करतो” – आता इथून पुढे)

“पण तू पाठवलेली स्थळं बाबांना चालणार नाहीत “

“तेही खरंच आहे.पण तुझ्या बाबांचे नातेवाईकही तुझ्यासाठी स्थळं पाहतील असं वाटत नाही “” बरोबर. बाबांचं त्यांच्याशीही पटत नाही. तूच मुली पहा पण मुलीकडच्यांना सांगून ठेव की ते बाबांना भेटल्यावर तुझ्या ओळखीचा उल्लेखही करणार नाहीत.”

“चालेल.तू काही काळजी करु नकोस. मी करतो सगळं व्यवस्थित.”

” मामा मुलगी अशी खमकी पहा की तिने बाबांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे “

मामा हसला.  ” बरोबर आहे तुझं.मनात आणलं तर तीच सरळ करु शकते त्यांना.बघतो तसं “त्याने फोन ठेवला.वैभवला हायसं वाटलं.बहिण गेली तरी मामाने भाच्याशी संबंध तोडले नव्हते.

एक दिवस वैभव संध्याकाळी घरी आला पण घरात शांतता पाहून त्याला आश्चर्य वाटलं.यावेळी त्याचे वडील टिव्हीवरच्या बातम्या बघत बसलेले असत.

“बाबा ss”त्याने हाक मारली.पण उत्तर आलं नाही. बुट काढून तो जयंतरावांच्या बेडरुमकडे गेला.पाहतो तर जयंतराव पलंगाखाली अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते.

“काय झालं?” त्याने विचारलं “पलंगावरुन पडलात का?”

त्यांनी ओठ हलवले.पण तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही.

“बोला ना! काय झालं?”

त्यांनी परत ओठ हलवले.पण घशातून आवाज बाहेर आला नाही.

“बरं ठिक आहे. उठा पलंगावर झोपा “

त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाकडे इशारा केला.वैभवने उजव्या पायाला हात लावून पाहिला.त्यांचा पायजमा वर करुन पाहिला.तिथेही काही जखम नव्हती.

” काही तर झालेलं नाहिये.बरं ठिक आहे.मी तुम्हांला उचलतो “

त्यांच्या काखेतून दोन्ही हात घालून त्याने त्यांना उचललं पण जयंतराव पायच टेकवत नव्हते.मोठ्या मुश्कीलीने त्याने त्यांना पलंगावर बसवलं.

“झोपा आता “

जयंतरावांनी परत एकदा डाव्या हाताने उजवा पाय आणि हाताकडे इशारा केला.वैभवने त्यांच्या उजव्या पायाकडे पाहिलं.तो निर्जीवपणे लटकत होता.वैभव चमकला. एकदम त्याच्या लक्षात आलं आणि तो मुळापासून हादरला.त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला होता.त्यात त्यांची वाचा तर गेली होतीच पण उजवा पाय आणि हात कामातून गेले होते.तो बराच वेळ सुन्नावस्थेत बसून राहिला. हजारो विचार त्याच्या डोक्यात दाटून आले.मग त्याच्या लक्षात आलं.असं बसून चालणार नव्हतं.त्यांना ताबडतोब हाँस्पिटलमध्ये अँडमीट करणं गरजेचं होतं.त्याने अँम्ब्युलन्सला फोन लावला.एका चांगल्या हाँस्पिटलमध्ये अँडमीट केलं.त्याचा संशय खरा ठरला होता.तो पँरँलिसीसचाच अटँक होता.

“डाँक्टर ते बरे होतील का यातून?”त्याने चिंतातूर आवाजात डाँक्टरांना विचारलं.

“आपण प्रयत्न करु.पण रिकव्हरीला किती वेळ लागेल आपण सांगू शकत नाही. तुम्हांला आता त्यांची खुप काळजी घ्यावी लागेल.त्यांचं सगळं बेडवरच करावं लागणार आहे.तेव्हा त्यांना स्वच्छ ठेवणं, रोज मालीश करणं,वेळच्या वेळी मेडिसीन देणं या गोष्टी तुम्हांलाच कराव्या लागणार आहेत. “

वैभवने मान डोलावली आणि तो विचारात गढून गेला.थोड्या वेळाने त्याने सगळ्या नातेवाईकांना कळवलं.नातेवाईक येतीलही.दोनचार सहानुभूतीचे शब्द बोलतील पण जयंतरावांच्या सेवेसाठी कुणीही थांबणार नाही हे त्याला माहित होतं.मामा आला तेव्हा तो त्याच्या गळ्यात पडून खुप रडला.

“वैभव एखादा माणूस लावून घे त्यांचं सगळं करायला.म्हणजे तू मोकळा रहाशील. “

” अशी माणसं खुप पैसे मागतात मामा शिवाय मी घरात नसेन.त्याने घरात चोऱ्याबिऱ्या केल्या तर?”

” ती रिस्क तर आहेच पण पर्याय तरी काय आहे?तुला एकट्याला ते करणं कठीण आहे.आणि पैशांची काही काळजी करु नकोस.मी देत जाईन “

“ज्या बाबांनी तुला आयुष्यभर शिव्या दिल्या त्यांच्या सेवेसाठी तू पैसे देणार?”

” मी तुझ्यासाठी करतोय हे सर्व. तुझं आरोग्य आणि मनःस्वास्थ्य बिघडू नये म्हणून “

वैभव गहिवरला.त्याने परत मामाला मिठी मारली.

पंधरा दिवसांनी तब्येतीत काहीही सुधारणा होत नाही हे पाहून जयंतरावांना घरी पाठवण्यात आलं.वैभवने घरात आल्यावर त्यांना पलंगावर झोपवलं.त्यांच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं.तिथे कोणत्याही भावना त्याला दिसल्या नाहीत. त्याच्या मनात विचार आला ‘या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्यात घालवलं.आज हा असा लाचार होऊन पडलाय.बरी जिरली.आता कुणावर हुकूमत गाजवणार?ती घमेंड ,अहंकार यांना कसं कुरवाळणार?खरंच छान झालं.देवाने छान शिक्षा केली.आता तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून रहाणार.आता मीच कसा तुम्हांला नाचवतो बघा.’

त्याने आनंदाने जयंतरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते त्याच्याचकडे पहात होते.मात्र आता त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं.ते वैभवबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं स्मित होतं की वैभवची थट्टा करणारं होतं ते वैभवला कळलं नाही. थोड्या वेळाने त्याला कळलं आणि तो हादरुन गेला.त्या स्मितामागचा अर्थ त्याला कळला होता.ते विजयाचं हसू होतं.विकलांग होऊनही जयंतरावांची सरशी झाली होती. लोकलाजेस्तव का होईना वैभवला वडिलांची सेवा करावीच लागणार होती .त्यांची तब्येत अजून बिघडू नये म्हणून त्यांच्या आरोग्याची जास्तच काळजी त्याला घ्यावी लागणार होती.वडिल विकलांग आहेत म्हणून त्याच्याशी कुणी मुलगी लवकर लग्न करणार नव्हती.कदाचित ते जिवंत आहेत तोपर्यंत त्याचं लग्न होणं कठीण होतं किंवा मग रुप,शिक्षण,सामाजिक दर्जा विसरुन,अनेक तडजोडी स्विकारुन वैभवला मुलगी निवडावी लागली असती.म्हणजे बायकोबद्दल ज्या ज्या कल्पना त्याने केल्या होत्या,जी जी स्वप्नं रंगवली होती ती पुर्णत्वाला येणं अशक्यच दिसत होतं.

त्या विचारासरशी वैभवचं डोकं तापू लागलं.वडिलांकडे पहात तो संतापाने ओरडला,

“झालं समाधान?आयुष्यभर माझ्या आईचा छळ केलात,तिच्या माहेरच्यांचा छळ केलात.आता मीच उरलो होतो तर माझाही छळ सुरु केलात ना?मी आता कामंधामं सोडून फक्त तुमच्याकडेच बघत रहायचं का?माझीही काही स्वप्नं आहेत,काही महत्वाकांक्षा आहेत.त्या सगळ्यांवर मी तुमच्यासाठी पाणी सोडायचं का?…..……”

तो संतापाने ओरडत होता.त्यांच्या दुष्ट वागणुकीचा इतिहास उकरुन काढत होता.

जयंतराव बोलू तर शकत नव्हते पण मुलाच्या अशा ओरडण्याने ते घाबरुन गेल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.जोरजोराने बोलता बोलता एका क्षणी वैभवचा तोल गेला आणि तो किंचाळून म्हणाला,

“असा माझा मानसिक, शारीरिक छळ करण्यापेक्षा तुम्ही मरुन का नाही गेलात?”

ते ऐकून आधीच भेदरुन गेलेले जयंतराव घशातून विचित्र आवाज काढत ढसाढसा रडू लागले.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.बापाला इतकं केविलवाणं रडतांना वैभव आज पहिल्यांदाच पहात होता.त्याच्यातल्या संतापाची जागा हळूहळू करुणेनं घ्यायला सुरुवात केली.ह्रदयाला पीळ पडू लागला.त्याला लहानपणापासूनचे वडील आठवायला लागले.एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे लाड करणारे,त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे,त्याला थोडंही काही लागलं की कासावीस होणारे,सायकलवरुन त्याला शाळेत पोहचवणारे,त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करणारे,त्याचा प्रत्येक हट्ट पुरवणारे वडील त्याला आठवू लागले.एकदा त्याचा अपघात होऊन तो पंधरा दिवस हाँस्पिटलमध्ये अँडमीट होता तेव्हा दिवसरात्र ते त्याच्याजवळ बसून होते.बायको आणि मेव्हण्याशी ते वाईट वागत असले तरी वैभवशी ते नेहमीच प्रेमाने वागत आले होते.त्यांच्या तापट स्वभावामुळे वैभव मोठा झाल्यावर दोघा बापलेकांचे थोडेफार खटके उडायचे पण तेव्हा जयंतरावच बऱ्याचवेळा नमतं घ्यायचे.वैभव नागपूरला शिकण्यासाठी निघाला तेव्हा त्याला निरोप देतांना त्यांनी मारलेली मिठी आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी वैभवला आजही आठवत होतं.त्या आठवणींनी वैभव कासावीस झाला.’आज वडिलांची वाईट अवस्था झाली म्हणून आपण त्यांच्यावर संतापतोय,ओरडतोय.समजा त्यांच्याऐवजी आपलीच अशी अवस्था असती तर ते असेच आपल्याशी वाईट वागले असते?नाही.आपल्याला असंच मरुन जा म्हणाले असते? शक्यच नाही.दुसऱ्यांशी ते कसेही वागले तरी बाप म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य चोख पार पाडलं आणि मुलगा म्हणून आपलं कर्तव्य निभावण्याची वेळ आली तर आपण अशी चिडचिड करतोय.त्यांना सरळ मरुन जा असं म्हणतोय ‘ या विचारासरशी वैभवला आपल्या वागण्याची लाज वाटली.त्याला एकदम गहिवरुन आलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली.

“नका रडू बाबा.नका रडू.मी चुकलो.मी असं बोलायला नको होतं.तुम्हाला माझ्याशिवाय आणि मलाही तुमच्याशिवाय या जगात दुसरं कोण आहे?काही काळजी करु नका मी तुमचं सगळं व्यवस्थित करेन “

त्याने त्यांच्याकडे पाहिलं.ते अजूनही केविलवाणे रडत होते.वैभवला एकदम भडभडून आलं.तो रडू लागला तसं जयंतरावांनी डाव्या हाताने त्याला जवळ ओढलं आणि ते त्याच्या डोक्यावरुन,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागले.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments