मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग

जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च

‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला.

जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास

१९६१ साली युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी कुणीही एकजण दरवर्षी संदेश देतो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. पहिल्या वर्षी १९६२ साली पहिला संदेश देणारी व्यक्ती म्हणजे ज्यो कॉक्चू होते.

वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एके काळी काही मातब्बर नाटय़गृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटय़गृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटय़गृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे.

पूर्वी नाटक कंपनी बस घेऊन त्यामध्ये सर्व नेपथ्य व कलाकारांना समवेत दौऱ्यावर निघायची व १५ / २० दिवसांचा दौरा आटपून परत जायची गावोगावच्या स्थानिक वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिराती यायच्या. दोन दिवस आधी तिकीट विक्री सुरु व्हायची आणि रसिक प्रेक्षक रांग लावून तिकिटे खरेदी करायचे.

हल्ली नाटकांचे दर ५०० /३००/२०० असे असतात.या मुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित  बिघडते  म्हणून प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे.

लंडन मध्ये दि माउस ट्रॅप नावाचे नाटक सुरु आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑक्टोबर ,१९५२ रोजी सादर केला गेला. तेंव्हापासून हे नाटक रोज अव्याहतपणे सादर केले जाते. रूढी आणि परंपरा प्रिय ब्रिटिश जनता या अगाथा ख्रिती च्या या रहस्यमय नाटकाचा  शेवट माहीत असला तरी येणाऱ्या पाहुण्याला  हे नाटक दाखवायला नेतात. कधी कधी एका दिवसात जास्त प्रयोग देखील केले जातात. १८ नोव्हेंबर,२०१२ साली या नाटकाचा २५००० वा प्रयोग सादर झाला.कलाकार बदलत गेले मात्र नाटक सुरूच आहे.१६ मार्च २०२० पर्यंत सतत चालू राहिला. कोविड-१९ साथीच्या आजारा दरम्यान हे नाटक तात्पुरते बंद करावे लागले. त्यानंतर १७ मे २०२१ रोजी या नाटकाचे पुन्हा प्रयोग सुरु झाले.

तसे एखादे गाजलेले  नाटक मुंबई / पुण्यासारख्या शहरात दररोज सादर व्हायला हवे. महाराष्ट्र शासन कोट्यवधी रुपये कितीतरी टाळता येणाऱ्या गोष्टीवर खर्च करत असते. सरकारने मराठीचा मानबिंदू म्हणून असे एखादे नाटक निवडावे व गावोगावीच्या कलाकारांना ते सादर करायला सांगावे आणि त्यांना त्या बद्दल मानधन द्यावे. तिकीट विक्री अल्प दरात करावी म्हणजे प्रेक्षक येतील आणि कमी पडणारे पैसे शासनाने घालावेत, या मुळे रंगभूमी जिवंत राहील आणि त्या साठी फार मोठा खर्च येईल असे वाटत नाही.मात्र परंपरा जपल्याचे श्रेय सरकारला जाईल.नाटक कोणते ठरवावे ते त्यातल्या जाणकार लोकांना विचारून किंवा प्रेक्षकांचे बहुमत घेऊन ठरवावे असे वाटते. पुणे आणि मुंबई ही दोन्ही महानगरे आहेत आणि येथे दररोज ये जा करणाऱ्या लोकांची संख्या खूप असल्यामुळे प्रेक्षकांची उणीव भासणार नाही.

जीव तोडून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या,मन लाऊन काम करणाऱ्या,पडद्यावरील तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांना आणि त्यांना टाळ्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन, दाद आणि प्रेरणा देणाऱ्या रसिक प्रेक्षक वर्ग यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माहिती संकलन : श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈